गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०१९

स्पर्श

स्पर्श
प्रवीण कुलकर्णी
या इथेच तुझे घर आहे ना.. हो इथेच.. या नव्या बिल्डिंग झाल्यात खऱ्या पण पुढच्या  वळणावर एक भलं मोठं वडाचं झाड होतं. त्याखाली चहाची टपरी आणि तिथेच कोपऱ्यात तुमचं घर.... हो ना...आणि हो आई आता काय करते, कॉलेजला असताना केवळ तुझ्या आईचाच तेवढा क्लास मी अटेंड करायचो तुला माहीत आहे ना...
तो खूप बोलत होता... बावीस वर्षांनी भेटला होता... मध्ये काहीच आतापत्ता नाही.. ना त्याने तिला भेटायचा प्रयत्न केला ना तिने....आज अचानक हा या कार्यक्रमात भेटला......छे किती बदललाय...डोळे खोल गेलेत... साधारणतः या वयात वजन वाढलेले असते हा अधिकच बारीक झालाय...केसांनी साथ सोडलीय आणि गालपटे आत गेली आहेत.... हा कार्यक्रमाला आहे माहीत असते तर आलेच नसते... कदाचीत आलेही असते... काय ठावूक... ती आपल्याच विचारात होती...
मी काय म्हटलं... काय... मॅडम कशा आहेत... त्यानं पुन्हा विचारलं तशी ती भानावर आली..
हं... आई ना.... आई जाऊनच झाली १२ वर्षे
काय.. त्याला आश्चर्याचा धक्का बसला होता.
पण एवढ्या लवकर कश्या?
माहीत नाही... पण ताण होता... चालता चालता ती थांबली.. तिनं त्याच्याकडे परत एकदा बघितले...डोळ्यावरचा चष्मा हलक्या हाताने सावरला... काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला पण तोंडातून शब्द उमटला नाही...
हं... म्हणून तोही गप्प राहिला..
तो घुटमळला... काय बोलायचे त्याला काहीच सूचेना... थांबायचे तर का? आणि जायचे तरी कसे...
थोडावेळ चालत राहिला... तिच्या पावलाच्या पावलांशी गती मिळवित राहिला.
घरी येशील... तिच्या या प्रश्नावर मात्र त्याला काय उत्तर द्यावे कळले नाही...तो नुसताच हं.. म्हणाला...
कॉलेजला असताना तो यायचा तिच्या घरी... तिचे ते घर...आईचं आणि लेकीचं विश्व होतं... संपूर्ण घर मॅडमनी आपल्या हातांनी सजवलेलं.. कोपरा आणि कोपऱ्याला त्यांच्या त्या स्निग्ध स्पर्शाची जाणीव असल्यासारखे.....
बावीस वर्षांनी पुन्हा तो त्या दारात आला होता... त्या घराची चौकट त्याला पुन्हा खुणावत होती.... अजुनी तसाच रंग होता... थोडा काळपटलेला होता... पण तो जपला होता...दारावरची पाटी तशीच होती... बाहेरची झाडेही बरीच तशीच दिसत होती... तो पूर्वीचे ते घर आणि आत्ताचे घर यांत फरक करण्याचा, साम्य शोधण्याचा प्रयत्न करत होता... पण दोन्ही फसत होतं.... आठवणींवर काळाची जळमटं होती त्यामुळे साम्यही धुरकट आणि फरकही अस्पष्टच होते... त्याला आठवलं.. पहिल्यांदा तो तिच्या घरी आला त्यावेळी मॅडमनी दार उघडलेले... त्यांच्या कपाळावरच्या आठ्या.... मग तो येत राहिला.. तिला भेटायला अनेक निमित्ताने... कधी नोट्स, कधी पथनाट्याचे वाचन, कधी सहज म्हणून...
तिने दार उघडले... समोरच्या भिंतीवरचे कृष्णाचे ते पेंटींग तसेच होते... आठवणींनी जळमटांतून मार्ग काढला होता... ते मॅडमचे पेनाचे स्टँडही तसेच होते... अगदी खिडक्यांचे पडदेही तसेच होते...
घर अगदी तसेच आहे नाही... त्यानं बोलण्याचा प्रयत्न केला...
नाही... ती स्पष्ट बोलली...
बावीस वर्षांपूर्वी हे घर होतं.... आता फक्त निर्जिवतेतील रेखिवपणा आहे तसा ठेवण्याचा प्रयत्न आहे...
तो गप्प बसला...
चहा घेणार...
नाही... मी चहा नाही घेत...
का रे... तुला तर चहा खूप आवडायचा... आई एकदा चहावरून तुला रागावल्याचे आठवते काय?
हो... मग
चहा सोडला मी....
हं....एकदा तुला भेटायचे होते... आई गेल्यापासून तर ही रोजचीच इच्छा होती... पण कसं ते कळत नव्हतं... म्हणजे भेटणं अवघड होतं असं नाही.. पण भेटल्यावर काय बोलायचे हे कळत नव्हते. त्यामुळे गेली दहा वर्षे भेटणं टाळलं... कदाचीत  नशिबानेच आज भेटलो आहे... ती बोलता बोलता गप्प झाली...
बराच वेळ शांततेत गेला... तो खिडकीपाशी गेला... त्याने पडदा बाजुला केला... ते चाफ्याचं झाड अजूनही त्या कंपाऊंडच्या कोपऱ्यात तसेच होते...
ती त्याच्या मागे आली...
चाफ्याचं झाड ही पद्मा गोळेंची कविता इथेच या खिडकीत उभा राहून मॅडमकडून ऐकली होती... प्रत्येक प्रसंगाची, प्रत्येक स्थितीची अशी एक कविता असते... असं त्या म्हणायच्या आणि त्यांना त्या प्रत्येकवेळी आठवायच्याही...कवितांचे आणि त्यांचे एक अलौकीक नाते होते...
हो... आयुष्य तर ती तसेच जगली होती...
हे घे.. तिची ही डायरी... काही कविता आहेत यात तिच्या... काही आठवणी आणि बरेचसे न सांगता येणारे क्षण...
बावीस वर्षांपूर्वीच्या त्या संध्याकाळी जशी ती होती अगदी तशीच ती राहिली पुढची बारा वर्षे... ती बोलत होती...
तो केवळ खिडकीतून बाहेर बघत नव्हता तर काळाची पाने मागे ढकलून काही क्षण सापडताहेत का बघत होता...
आईने मला दत्तक घेतले होते... हे तर सर्वांनाच माहीत आहे.. तिच्या आयुष्याला स्पर्श करून गेलेला तू एकमेव होतास... तिचं आयुष्य भरून वाहणारा होतास... तू गेलास आणि आई तो स्पर्श तुझ्या आठवणींसकट जपू लागली... या पडद्यांनाही कोणी दुसऱ्याने स्पर्श केलेला तिला खपायचे नाही... मघापासून त्याने डोळ्यांच्या कडांमध्ये रोखून धरलेल्या धरणाने बांध फोडलाच..
ती जवळ आली... तीने त्याचा हात हातात घेतला आणि हलकेच दाबला....
तो रडत राहिला.... ती कुठेतरी आहे याच आशेने त्याची पोकळी भरलेली होती आज त्या पोकळीतून आशाही  संपली होती...

बुधवार, ९ सप्टेंबर, २०१५

प्रिय

प्रिय
खूप दिवसांनी पत्र लिहितोय. दिवस. कदाचित वर्षही उलटून गेले असेल. असो. मुंबईच्या या धावपळीच्या जगण्यात पाठिवरचे ओझे पोटावर कधी आले हे कळलेच नाही. (इथे मुंबईत पाठिवरची सॅक पोटावर घ्यावी लागते हे तुला माहितच आहे.) अर्थात हे माझे रडगाणे ऐकवायला हे पत्र लिहिले नाही. तसे पत्र लिहायला एकच एक कारणही नाही. अनेक कारणे आहेत... खरे तर कारण असे नाहीच.... काल रात्री बगळयांची माळ फुले अजुनी अंबरात हे गाणं कोठूनसं  कानावर आलं....आणि  सर्रकन आठवणींच्या पक्ष्यांचा थवा आकाशात उडाला.
तुला आठवतं तुझ्या टेस्टीमोनीयलवर मी ‘छेडीती पानात बीन थेंब पावसाचे ’ हे कडवं टाकलं होतं. किती हसली होतीस. म्हणाली होतीस टेस्टीमोनीयलवर काय टाकायचे असते हे तरी कळते का? मी नेहमीप्रमाणे गप्प बसून होतो. गप्प कसला शब्दच सुचायचे नाहीत. या शब्दांइतके दगाबाज कोणी नाही. ऐनवेळी योग्य शब्दाने तुमचा हात धरला, असे होतच नाही. मग अक्षरांची जुळवाजुळव करायची आणि जे जुळेल त्याला शब्द म्हणायची माझी पद्धत. त्यावेळी ही अक्षरांची जुळवाजुळवही करता आली नाही. काल हे गाणं ऐकताना पुन्हा त्या सगळ्यांची आठवण झाली. वा. रा. कातांनी किती हळुवार लिहिलय. ओल्या रानात खुले ऊन अभ्रकाचे, मन कवडा घन घुमतो दूर डोंगरात..... अशी ती ओळ होती. मी एवढेच कडवे टाकले होते. हातांसह सोन्याची सांज गुंफता आली नाही हे खरेच.... पण अशा अनेक सांज आठवणींनी गुंफल्या आहेत... मला कल्पनाच भारी वाटते..... त्या गाठी, त्या गोष्टी नारळीच्या खाली पौर्णिमाच तव नयनी भरदिवसा झाली..प्रत्येक शब्दावर जीव ओवाळून टाकावा वाटते..यातील शेवटचे कडवे तर कळस आहे...
तू गेलिस तोडुनि ती माळ, सर्व धागे
फडफडणे पंखांचे शुभ्र उरे मागे
सलते ती तडफड का कधि तुझ्या उरात? .   प्रेमात न पडलेलाही एखादा या कडव्यासाठी प्रेमात पडेल.... जगण्याचे अवघे रंग एखाद्या सांजेत मिसळावेत असे हे गीत आहे..... बर्‍याच दिवसांनी पत्र लिहितोय. फार काही लिहित नाही.....पुन्हा कधीतरी......
                                            तुझाच

शुक्रवार, २९ ऑगस्ट, २०१४

पहिलटकरीण


किती गोंडस आणि निरागस असतात ना रे ही बाळं.. त्यांचे गाल बघ किती मऊ जणू सावरीचा कापूसच...जनरल वॉर्डमधील बाळांना बघत त्याचे तोंड सुरू होते.
शू.... डॉक्‍टरांनी त्याच्याकडे बघत बोट ओठावर ठेवले.. आपण नंतर केबिनमध्ये बोलू आता मी राउंड मारून येतो असे म्हणत डॉक्‍टर एक एक बेडवरील बाळ बाळंतिणीला तपासत पुढे चालले होते.
तो डॉक्‍टरांच्या मागून जात होता. हसरी बाळं, रडणारी बाळं... आई झाल्याचा कृतार्थ चेहऱ्यावर ओसंडून वाहणाऱ्या आया.. तो बघत होता.. कधी न राहून डॉक्‍टरांशी बोलत होता.. डॉक्‍टर त्याचा मित्रच होते, त्यामुळे त्याची बडबड ते सहन करत होते.
स्पेशल रुममधील एका बेडपाशी त्याला ती काचेची पेटी दिसली, आणि त्यात ते बाळ. तो कित्येक वर्ष त्या हॉस्पिटलमध्ये येत होता. ही पेटीतील बाळे त्याला अस्वस्थ करायची. त्यातही पेटी एका बाजूला आणि बाळाची आई दुसऱ्याच ठिकाणी त्यामुळे त्यांची होणारी तगमग त्याला जाणवायची. तो डॉक्‍टरांना म्हणालाही होता अरे ती काचेची पेटी आणि आई एकत्र ठेवली तर चालत नाही का? डॉक्‍टर नेहमी त्याला त्याची कारणे देत. कधी त्याला पटायची कधी त्याला पटायची नाहीत, पण तो पुन्हा प्रश्‍न विचारत राहायचा.
डॉक्‍टरांनी स्टेथेस्कोप कानाला लावला आणि काचेच्या पेटीतील बाळाच्या छातीचे ठोके मोजले. समोरच्याच बेडवर त्या बाळाची आई होती. पहिलटकरीण असावी. जास्तीत जास्त अठरा एकोणीस वर्षांची असावी. रडून रडून तिचे डोळे सुजले होते, आणि गालावर अश्रू वाळून गेले होते. तो कितीतरी वर्ष त्या हॉस्पिटलमध्ये येत होता. अशा आया तो नेहमी बघत होता. तिचे नातेवाईक बहुतेक आई-वडील भाऊ असावेत. डॉक्‍टर बाळाला तपासत होते. नातेवाइकांची घालमेल सुरू होती. बिचारी बाळाची आई गलितगात्र होऊन बाळाकडे बघत होती.
डॉक्‍टरांनी पुन्हा पुन्हा बाळाच्या छातीवर स्टेथेस्कोप ठेवला आणि शांतपणे वर बघितले आणि मान हलविली.
नातेवाईंकानी डॉक्‍टरांच्या मानेचा अर्थ समजून घेतला आणि निराशेने एकमेकांकडे बघितले. डॉक्‍टर पुन्हा दुसऱ्या रुमकडे वळले, तसा तो अस्वस्थ होऊन डॉक्‍टरांच्या केबीनकडे वळला.
राऊंड मारून परतलेल्या डॉक्‍टरांनी आपल्या अंगावरचा ऍप्रन बाजूला काढून ठेवला आणि म्हणाले,
बोला, काय आणि विशेष... डॉक्‍टरांच्या बोलण्याने तो भानावर आला.
काही खास नाही... त्या बाळाचा विचार डोक्‍यात आला रे... पहिलटकरीन असेल ना? किती दिवस लागतील रे त्याला बरे व्हायला... अजून तिने त्याला छातीशीही धरलं नसेल...
डॉक्‍टरांनी मान हलवली...आणि गप्प बसले.. पण त्याची तगमग वाढत होती, एक मात्र बरे केलेस... त्या बाळाला त्याच्या आईशेजारी ठेवलेस... पेटी दुसऱ्या खोलीत ठेवली की त्या बिचाऱ्या आईला बाळाला बघताही येत नाही रे.. ती तर तीळ तीळ मरत असते जणू...
डॉक्‍टर उठले, त्यांनी त्याच्या डोळ्याला डोळे भिडवायचे टाळले..
एक सांगू...पण कोणाला सांगू नकोस.. डॉक्‍टर पुटपुटले
ह.. त्याची उत्सुकता ताणली...
या काचेच्या पेट्या खरे तर बाळासाठी जीवनदायी असतात, मात्र आजचे पेटीतील बाळ जगवायसाठी नाही तर मरण्यासाठी ठेवले आहे. तू म्हणतोस ते खरे आहे ती पहिलटकरीणच आहे पण 16 वर्षांची आहे रे आणि तिचं लग्नही झालेले नाही....
त्याला समजायचे ते समजले...पण ते बाळ त्याच्या डोळ्यासमोरून काही हटत नव्हते...



शुक्रवार, २३ मे, २०१४

प्रिय,


प्रिय,
बाहेर अवकाळी पाऊस अक्षरशः धुमाकूळ घालतोय. गारांच्या माऱ्यामुळे गाल लालबुंद झाले होते. अजूनही कपाळावर ओल्या बटा रेंगाळत आहेत. गाडी पार्क करण्याच्या ठिकाणी कुत्र्याचे एक पिल्लू अंग चोरून बसले होते. गाडी बघून ते तिथेच सरकले. आपल्या लुकलुकत्या डोळ्यांनी माझ्याकडे ते करुण नजरेने बघत राहिले. मी त्याला परत पावसात तर पिटाळणार नाही ना? असा सवाल त्याच्या त्या भेदरलेल्या डोळ्यांत होता. मी हलकेच गाडी स्टॅंडला लावली आणि त्याला तिथेच सोडून दिले. त्या अंधाऱ्या कोपऱ्यात ते तसेच उजेडाच्या आशेने रात्रभर कुडकुडत पडलं असेल. अशा मिट्‌ट काळोखाच्या काही रात्री सरता सरत नाहीत. अशा अनेक रात्री मी जागून काढल्या आहेत. दारातल्या चांदण्यांना साक्षी ठेवून. या रात्री खरेतर कालिंदीच्या डोहासारख्या असतात. लांबून शांत वाटणाऱ्या पण आत कालियाचे विष पचविणाऱ्या.

कालिंदिच्या डोहाचे वैशिष्ट्यच असे की तो डोह पेलवतही नाही आणि सोडवतही नाही. हा कालियामर्दनापुर्वीचा डोह खऱ्या अर्थाने आपल्या डोळ्यात साठवला तो राधेने. व्याकुळतेने. विरहाने.कृष्णभेटीची आस लागून. कृष्णभेटीचा आस म्हणण्यापेक्षा राधेचा आसच मुळी कृष्ण होता. त्याच्यामुळेच तर तिला गती होती. एवढ्यानेही राधेचा डोह पुरा होत नाही, त्याच्यावरचे तरंग अजून स्पष्ट होत नाहीत. कारण व्याकुळता तर अहल्या, शबरी आणि सीतेच्याही डोळ्यांत होती पण कालिंदीचा काळाभिन्न डोह काही त्या डोळ्यांत कधी दिसला नाही.
अहल्या तर शिळा होऊन पडली होती. त्यामुळे निर्जीव डोळ्यांमध्ये "राम'भेटीने प्राण आतले गेले आणि मग ते काही काळ झरलेही पण तेवढेच. इथे मला ग्रेसचे ते रुपक आठवते. ग्रेस म्हणतो, राम त्या शिळेजवळून जाताना तिचा गळा दाटून आला. न जाणो तो तसाच निघून गेला तर. अहल्येचे अश्रू रामाच्या पाद्यपुजेइतकेच. त्या अश्रुत राम विरघळणारा नव्हता की प्रवाहीत होणारा नव्हता. शबरीच्या डोळ्यातही रामभेटीची व्याकुळता होतीच. त्यामुळेच तर रामाला तिने डोळे भरून साठवून घेतले. पण तरीही तिच्या डोळ्यातला तो डोह कधीच नव्हता. होता फक्‍त राम राम आणि राम. कालिंदीच्या डोहाला खरे तर विरहाचा पदर आहे. अहल्या आणि शबरीला भेटीपर्यंतची आस होती. त्यानंतर राम तिथे थांबणारा नव्हताच.
रावणाच्या तावडीत सापडलेल्या सीतेच्या डोळ्यांनाही रामाची प्रतीक्षा होती. होती तडफ, आग आणि वेदना. सीतेच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंच्या प्रवाहातच लंका संपून गेली. खरे तर तिचे डोळे आग ओकत होते. मारुतीच्या शेपटाला लावलेल्या आगीपेक्षाही भयंकर ज्वाला सीतेच्या डोळ्यांतून उमटत होत्या म्हणून मारुतीच्या निमित्ताने लंका दहन झाली. कालिंदीचा डोह जर तिच्या डोळ्यांत असता तर लंका कधीच जळली नसती. ती तर समुद्राच्या पोटात गेली असती. त्यामुळे राधेचा डोह मोठा. तो अचल आणि काळाभिन्न. कालियाच्या विखारी शेपटासारख्या आर्ततेने तो डोह प्रवाहबंदी केला आहे, आणि त्याला प्रवाहबंदी आहे म्हणून तर तो खोल आहे. त्यामुळे राधेला कालियामर्दनाची आशा आहे.
आपल्या नशिबी असतात कालियाच्या विखारी शेपटाचे तडाखे. त्यामुळेच रात्रीचा काळोख कितीही खोल आणि गडद असला, कितीही कालींदिच्या डोहासारखा असला तरी तो डोळ्यांत साठवता येत नाही. डोहाची आर्तता नाही. त्यामुळे कालियामर्दन नाही.....
बाहेर, प्राजक्‍तांचा सडा पडला असणार त्याचा गंध घरभर पसरला आहे. अगदी तुझ्या आठवणींसारखा....

तुझाच 

रविवार, १० नोव्हेंबर, २०१३

लाडू....




""लाडू येतात ना रे तुला?''

बाईंनी कपाळावर आठ्या आणतच विचारलं.

आपल्या खांद्यावरचा झारा दोन्ही हाताने सावरत महादेवने फक्‍त आपल्या ओठांना विलग केलं. त्याचे निम्म्याहून दात पडलेलं बोळकं खूपच विचित्र वाटलं.

सहा फूट उंची, डोक्‍याला टक्‍कल, अंगात कळकट-मळकट शर्ट आणि तसलीच तेलकट पॅंट, पायांना चपलांचा कधी स्पर्श झाला होता की नाही याबाबत शंकाच यावी, असे राकटलेले पाय. वर्षानुवर्ष चुलीच्या धगीसमोर बसून रापलेल्या चेहऱ्याच्या महादेवच्या ओठावरचे हसू मात्र कधी रापले नव्हते. कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर "त्याला काय लागतंय' या तीन शब्दांनी सुरू करून महादेव बोलायला लागला की त्याचे बोलणे थांबवणे जाम कठीण होऊन जायचे. बुंदीचा शेवटचा घास संपल्यावर त्याचे हात जसे लाडू वळवायचे थांबायचे तसा अचानक कधी तरी तोच थांबायचा. मग पुढचा माणूस बोलायचा.




""काय विचारलं मी? तुला लाडू येतात ना ?'' बाईंनी आवाजात जितका शांतपणा आणता येईल तितका आणला.

""त्याला काय लागतंय?'' महादेवाने आपल्या तोंडाचा पट्टा सुरू केला... ""आहो, आयुष्यभर तेच तर काम केलं आहे. बाईसाहेब, मी वळलेल्या लाडवांना बघूनच लोकांचे समाधान होते. तोंडात लाडू गेला की लाडवाबरोबर माणूस पण विरघळतो बघा. अहो! तिसरी पिढी आमची लाडू वळणारी. मी जन्माला आलो त्यावेळी आमच्या अण्णांनी म्हणजे आमच्या वडिलांनी चार पायलीचं लाडवाचं कंत्राट घेतलं होतं. आई लाडू वळत होती आणि त्याचवेळी तिच्या पोटात दुखायला लागलं. त्यातनं पण तिनं तीन पायलीचे लाडू वळलेच. मग मी जन्माला आलो. अण्णांनी आधी उरलेले लाडू वळले आणि मगच माझं तोंड बघितलं. माझा आणि लाडवाचा तिथून जो संबंध आहे, तो अजून तसाच आहे. तुमचे किती पायलीचे लाडू वळायचे आहेत?''

बाईंनी त्या रापलेल्या चेहऱ्याकडे परत बघितले. त्याच्या कळकट-मळकट कपड्यांवरून पुन्हा नजर फिरविली.

""अंघोळ करतोस ना रोज?'' बाईंनी त्रासिकपणे प्रश्‍न केला.

हा प्रश्‍न आता त्याला नेहमीचा आणि परिचयाचा होता.

""त्याला काय लागतंय, परवाच चार साबण आणलेत...''

"बरं बरं...' आता हा आपले अंघोळ पुराण सांगणार हे बघून बाईंनी त्याला थांबवलं.

""किती पायलीचे लाडू करायचे आहेत?'' महादेवाने आपल्या खांद्यावरचा झारा दोन्ही हातांनी आणखी घट्ट पकडत पुन्हा विचारले.

""हे पायलीचे गणित काही कळत नाही. तूच सांग, पन्नास माणसांना पुरवठा यायला हवेत.''

""त्याला काय लागतंय, पण माणसं कुठली आहेत त्यावर अवलंबून. तुमच्यासारखी सुशिक्षित आहेत, की आमच्यासारखी गावाकडची. म्हणजे तुमच्यासारखी माणसं असली की कमी लागतात, पण आमच्यासारखी असली की दे दणका...! तुम्हाला सांगतो, परवाच मी एका लग्नाचे लाडू केले होते. परवा. पण त्यालाही झाली चार-पाच वर्षे. माणसं होती शंभरच. पण दोन पायलीचे लाडू पुरले नाहीत...''

""पाच किलोचे लाडू करायचे आहेत आणि तेही न बोलता. जमेल का?'' बाईंच्या पाठीमागून साहेबांनीच विचारले.

""त्याला काय लागतंय...'' महादेवने बोलायचा पुन्हा प्रयत्न केला.

""त्याला तोंड बंद करायला लागतंय.'' साहेबांनी त्याला थांबवलं.

बाई खूप हसल्या आणि आत निघून गेल्या. महादेव आपल्या टकलावरून हात फिरवत तिथेच पायरीवर उभा राहीला.

""ये आत. चहा घेणार?''

साहेबांनी त्याला आत बोलवत विचारलं.

""न नको... म्हणजे सकाळी-सकाळी दोनदा झाला ना चहा. त्यामुळे आता चहा घेतला की पित्त होतं. मग चार दिवस काम होत नाही. अंगावर हे मोठे मोठे फोड उठतात'' महादेवने कमीत कमी शब्दांत उत्तर देण्याचा प्रयत्न केला.

""हं... बरं..!''

""कधी करणार लाडू, किती साहित्य लागेल?'' बाईंनी आतूनच विचारलं.

""आज आत्ता.'' महादेवने क्षणाचा विलंब न करता उत्तर दिलं.

""अरे, आज कसं शक्‍य आहे...? फक्‍त विचारायचं होतं की किती साहित्य लागेल, यासाठी तुला बोलावलंय.''

""नाही बाईसाहेब, आज आणा की साहित्य. पाच किलोला किती लागणार आहे साहित्य. दोन तासाचं तर काम.''

""अरे पण...''

""हवं तर मजुरी कमी करा; पण आज कराच बाईसाहेब लाडू.'' महादेवने आपलं म्हणणं जितकं रेटता येईल तितकं रेटलं.

""अरे, पण आज का जबरदस्ती आहे का?... बाईंच्या बोलण्यात नाखुशी साफ दिसत होती.

""न नाही पण...'' महादेवाची जीभ जरा आडखळलीच.

""काय... आज साहित्याची यादी दे आणि ये उद्या-परवा मी तुझ्या त्या मित्राजवळ निरोप ठेवते.''

महादेवनं यादी दिली आणि खाली ठेवलेला झारा पुन्हा खांद्यावर घेतला. जाता जाता त्याचा पाय घुटमळलाच.

""बाईसाहेब बोलवा हां नक्‍की! लोकं बोलावतात, साहित्याची यादी ठेवून घेतात आणि पुन्हा लाडू करायला परत कोण बोलवत नाही. आजकाल लाडू कोण खातंय म्हणतात, आणि बेत बदलतो. या हातांना झारा धरण्याशिवाय आणि लाडू वळण्याशिवाय दुसरं काही येत नाही हो. हातात झारा नसला की हात थरथरतात. दोन महिन्यात एकपण काम नाही मिळालं. बाईसाहेब, रोज पोरगी विचारते, "बाबा, आज येताना लाडू आणणार?' पोरीला बाजारातून लाडू घ्यायला पैसे नाहीत. या हातांनी नेहमी पायली - चार पायलीचे लाडू केले. आता किलो-दोन किलोचे लाडू केले की ती चव येत नाही. त्यामुळे बेकरीवाले कामावर ठेवत नाहीत.'' त्याचे खोबणीतील डोळे आणखी खोल गेल्यासारखे वाटले.

त्याने झारा उचलला अणि तो जायला लागला.

""थांब.''

बाई आत गेल्या. त्यांनी कागदात गुंडाळून दोन लाडू आणले होते.

""हे लाडू दे तुझ्या पोरीला.''

""नको बाईसाहेब, बुंदीच्या लाडवाची चव रव्याच्या लाडवाला येणार नाही आणि पोरीला असे तुपात-बिपात केलेल्या लाडवाची चव कळली तर अवघड होईल. नकोच.''

""आज हे लाडू दे... उद्या ये आमच्याकडे... आम्ही लाडवाचा बेत देऊ की नाही माहीत नाही. पण तू उद्या आमच्याकडे लाडू नक्‍की करायला ये.''

महादेवच्या हातातला लाडू चटकन खाली पडला. त्याला बाईंचे पाय दिसले. क्षणभर त्याला बाईंचे पाय धरावे वाटले; पण फुटलेल्या लाडवाला गोळा करताना त्याला ते जमलं नाही.


सकाळ'च्या 7 November च्या स्मार्ट सोबतीमध्ये प्रसिद्ध झालेली लघुकथा

शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०१३

चहा


अजूनही साखर डबल लागते का रे?... तिने स्वयंपाकघरातूनच जोरात विचारले...
""न.. नाही... साखर नको...''
""का? काय रे, काय झालं... डॉक्‍टरांनी बंदी घातली आहे का साखर खायला? तू ज्या पद्धतीने साखर खायचास ना, त्यावरून तर हे कधी ना कधी होणार होतंच म्हणा!''
""हं..!'' त्याने नुसता हुंकार सोडला.
""किती चहा प्यायचास... त्यात ती डबल साखर... दोन तासांच्या गप्पांमध्ये पाच कप चहा व्हायचा तुझा... मी एकदा संजयला म्हटलंही होतं, अरे, माझा एक मित्र होता.. तो फक्‍त चहाने आंघोळ करायचा बाकी होता...!
तुला आठवतं, एकदा तू म्हटला होतास... काश... ये बारिश च्याय की होती... तो कितना मजा आता! अरे ते वाक्‍य आठवून मी कितीदा हसलीय...''
""हं!'' त्याने पुन्हा हसण्याचा प्रयत्न केला.
""अरे तू बोलत का नाहीस? किती बडबडायचास! तोंडात एक तर चहा किंवा शब्द!! त्याशिवाय तुझं तोंड आठवता आठवत नाही...'' ती खळखळून हसली.
""काही नाही गं! त्या वयात असतो तो पोरकटपणा...''
त्याने पुन्हा तिच्याकडे वर मान करून बघितले आणि पुन्हा डोळे फिरवले.
""बाकी चहा पिण्याव्यतिरिक्‍त काही करतोस की केवळ चहाच पित असतोस.. खातो-बितोस की नाही?...'' ती पुन्हा खळखळून हसली.
""नाही... एक ग्रंथालय चालवतो.''
""अरे, ग्रंथालय आणि तू?'' तिने फक्‍त उडी मारायची बाकी होती. ""तुला पुस्तकांची कधीपासून आवड निर्माण झाली?... मला तर म्हणायचास, पुस्तकांपासून तुला लांब एका बेटावर ठेवलं पाहिजे... आणि तूच पुस्तकांच्या दुनियेत?... तुला आठवतं, तू केलेली ती कविता... आई शप्पथ! कसले शब्द एकमेकांना जोडले होतेस... कविता होय ती?... निव्वळ फालतूपणा होता..!''
""तुला आठवते ती कविता?...'' त्याने चमकून विचारलं.
""अरे अगदी शब्द अन्‌ शब्द आठवते...''
""हं!'' त्याने नेहमीप्रमाणे चेहऱ्यावर शांतपणा आणण्याचा प्रयत्न करत काहीतरी प्रतसाद द्यायचा म्हणून दिला.
""थांब, चहा आणते हं...'' म्हणत ती आत उठून गेली...
तो शांतपणे कोचावर रेलून बसला. समोर राधा-कृष्णाचे भले मोठे पेंटिंग होते.
तो उठला. पेंटिंगजवळ गेला. त्याच्या भोवतीही अनेक चित्रे होती. बहुतांश राधा-कृष्णाचीच... अनेक नामी चित्रकारांची. काही नुसत्या बासऱ्या आणि एक-दोन मोरपिसांची चित्रे.
""अरे, संजयला खूप आवड होती पेंटिंगची. त्यानेच जमवलीत सगळी... फिरतीची नोकरी असल्यानं त्याला मिळवताही आली...'' तिच्या या वाक्‍यासरशी तो चटकन्‌ भानावर आला. ती चहाचा ट्रे घेऊन आली होती. तिने ट्रे बाजूला ठेवला आणि पेंटिंगजवळ येऊन सांगू लागली...
""हे पेंटिंग राजस्थानमधून आणले... हे पंजाबमधून... हे बांगलादेशातील एका गावातून...'' ती एक एक पेंटिंग दाखवत होती. ते कोठून आणले, कोणाचे आहे, हे सांगत होती. तिने त्या राधा-कृष्णाची माहिती सोडून सगळ्या पेंटिंगची माहिती सांगितली. त्याचे फारसे लक्ष त्याकडे नव्हते.
""अरे चहा थंड होतोय...''
""हा...''
""तू नाही चहा घेत...?''
""अं? नाही!''
""हं!'' त्याने पुन्हा काहीतरी बोलायचे म्हणून बोलायचा प्रयत्न केला. पण जमला नाही.
""जरा बशी देतेस...''
""अरे, चहा थंडच तर झालाय... मग बशी कशाला...''
""हं...'' पुन्हा त्याने हुंकार सोडला आणि गप्प बसला.
""थांब, मी गरम करून आणते चहा! किती वेळ झाला ना...''
""हं! चालेल...'' म्हणत त्याने मान डोलावली.
तिने लगबगीने चहाचा कप उचलला आणि ती आत गेली.
""बरं, असं करता का... आय मीन... असं करतेस का, चहा राहूदेच...''
""का रे?... बरं राहू दे...'' तिने पण पुन्हा आग्रह नाही केला.
""ग्रंथालयात किती पुस्तकं आहेत?'' तिने काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं.
""भरपूर आहेत! रजनीश आणि जे. कृष्णमूर्तींची तर जवळपास सगळीच आहेत... कुठून कुठून मागवली माहितीए... '' आपण फारच उत्साहात सांगतोय हे जाणवून तो पुन्हा गप्प राहिला.
आता तिने फक्‍त "हं'चा हुंकार सोडला...
""अरे त्या बाजारात तुला मी बघितलं आणि मला पटलंच नाही... तू आणि इथे? शक्‍यच नाही! पण तू... तूच होतास!! बाय द वे, तू कसा या शहरात...?''
""कृष्णमूर्तींच्या व्याख्यानाची एक सीडी इथे होती... ज्यांच्याकडे ती आहे ते गृहस्थ खूप वयस्कर आहेत ना... मग म्हटलं आपणच यावं... खूप जुनी आहे...
तू कविता करतेस का गं... अजून?''
""नाही जमत आता...''
तिने भिंतीवर लावलेल्या राधा-कृष्णाच्या पेंटिंगकडे बघत विचारलं... ""आणि तू पेंटिंग बंदच केलं असशील ना?''
त्याने फक्‍त मान डोलावली...
""चल, माझी चारची ट्रेन आहे. मी निघतो आता...''
तो निघायला उठला तशी तीही उठली. ""चहाही नाही घेतलास आणि चाललास...''
""माझ्याऐवजी तू घे! पोचेल मला...'' गिळता गिळता त्याच्या तोंडातून सांडलंच.
""हं...''
""पण चहा करताना केवळ दूध उकळू नको म्हणजे झालं...''
तो उठला. जसा आला तसा निघून गेला.
त्याच्या पाठमोऱ्या देहाकडे बघत ती किती काळ उभी होती कोणास ठाऊक. मग ती उठली. किचनमध्ये गेली. चहाच्या डब्यात चहा नव्हताच. संजय होता तोपर्यंत घरात चहा असायचा तरी. संजय गेल्यापासून चहा आणणंही बंद झालं होतं. आज तिला खूप मोकळं मोकळं वाटत होतं.
चहा प्यायची खूप तलफ आली होती.

"सकाळ'च्या 10 ऑक्‍टोबरच्या स्मार्ट सोबतीमध्ये प्रसिद्ध झालेली लघुकथा

सोमवार, २६ ऑगस्ट, २०१३

यावेळीही गाडी चुकली


खिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते ज्येष्ठ साहित्यीकास निवडण्याचा आणि अध्यक्षपदाचाच सन्मान ठेवण्याची संधी यावेळीही साहित्य महामंडळाने गमावली आहे. एकच चूक वारंवार करण्यात खरे तर महामंडळाइतकी दुसरी संस्था नसावी.
चार-सहा टाळक्‍यांनाच मतदानाचा अधिकार असलेल्या साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत अनेक ज्येष्ठ साहित्यीक उतरण्यास तयार नसतात. त्याचा फायदा घेऊन अगदी "टुकार' लोक निवडून आल्याचा इतिहास आहे. त्याची पुनरावृत्ती यावेळच्याही साहित्य संमेनलनात होणार नाहीच असे नाही. प्रा. फ. मु. शिंदें यांचा अपवाद वगळता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निवडणूक रिंगणात उरलेली तीनही नावे तशी खूपच डावी आहेत. खरे तर त्यांची साहित्यीक वाटचाल तपासून बघितली तरी त्यात त्यांनी "अखिल भारतीय मराठी' साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अर्जच भरला याचेच कौतुक वाटते.
साहित्य संमेलनाचा मेळावा दरवर्षी भरतो. (आठवा, बाळासाहेब ठाकरे यांनी याला बैलमेळा म्हटले होते.... त्यावेळी सगळे साहित्यीक तुटून पडले होते... नंतर त्यांच्यात इतक्‍या लाथाळ्या निर्माण र्झाल्या की बाळासाहेबांनाही वाटलं असेल अरे आपण तर बैल म्हटलं होतं... ही तर लाथा घालणारी गाढवं निघाली...) तर हा साहित्य संमेलनाचा मेळावा दरवर्षी भरत असतो. त्यात येरेगबाळे- पोट्‌टे सोट्‌टे आपले विचार मांडत असतात... वर्तमानपत्रे आणि न्यूज चॅनेलच्यादृष्टीने मजकुराचा भाग होतो आणि हौशी कवी, नवोदित लेखकांना झब्बा कुर्ता घालून आपण मोठे साहित्यिकच आहोत असे मंडपातून फिरताना वाटते... अयोजकांना मलई खायला मिळते शिवाय अत्तराचा फाया लावून इकडे-तिकडे बागडत मिरवायला मिळते... राजकारण्यांना भाषणं ठोकायला व्यासपीठ मिळते. गावातील रिकाम टेकड्यांना वेळ जायला साधन मिळते. साहित्य प्रकारच्या काही प्रमाणातील उथळ चर्चेशिवाय बाकी सगळ्या गोष्टींचा उहापोह मात्र चांगला होतो. बाकी साहित्यविषयक संमेलनात काहीच घडत नाही. त्यामुळे साहित्य संमेनलनांना चर्चेत आणण्यासाठी कधी नथुरामला पत्रिकेवर आणले जाते तर कधी परशुरामाच्या कुऱ्हाडीला, कधी तुकारामांच्या पुस्तकावरुन वाद होतो तर कधी स्वागत अध्यक्ष कोणी राजकारणीच असल्याचे बघुन सुत्रेच द्यायला माजी साहित्य संमेलनाध्यक्ष नकार देतो... एकूण काय साहित्य संमेलन नसून ते आता भंगार संमेलन झाले आहे. यंदा तर हे भंगार संमेलन होण्याची सुरवात अर्ज भरण्यापासूनच झाली आहे. साहित्य संमेलनाचा अर्ज भरणाऱ्यांपैकी तीन जणांना तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनताच काय पण साहित्याशी निगडीत असलेले लोकही ओळखत नाहीत.
त्या बाई.... नाव काय ओ त्यांचं... वर्तमानपत्रात ललीत विभागात काम करणाऱ्या संपादकीय मंडळींनी केलेला हा प्रश्‍न प्रभा गणोरकर यांच्याबाबतीत केलेला असून तो अनेक गोष्टी सांगून जाणारा आहे. (स्त्रीवाद्यांनी लगेच ओरडायला सुरवात करू नये... हा स्त्रीत्वाबद्दल नाही तर त्यांच्या लेखन कारकिर्दीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणारा प्रश्‍न होता..) चार-सहा पुस्तके आपल्या नावावर लागली आणि डोक्‍यावरचे केस थोडे पांढरे झाले, आणि चारसहा कार्यक्रमात यजमानांसोबत फिरले की लगेच हे स्वतःला ज्येष्ठ वगैरे समजतात आणि कुठल्याही निवडणुकीत भाग घेतात... अरुण गोडबोले यांचे लिखाण तर वर्तमानपत्रीयच आहे.. खरे तर ते वर्तमान आणि पत्री असेच आहे.. ते लिहिले त्याच्या दुसऱ्या दिवशीच उडाले होते...आपण मराठी भाषेत असे कोणते साहित्य निर्माण केले की, पुढच्या शंभर वर्षांनंतरही आपण लिहिलेल्या हजारो कचरा पानातील चार ओळी तरी महाराष्ट्राच्या घरा-घरांपर्यंत पोचल्या असतील... एकही नाही...मग कशाला हा अट्टहास? त्या अरुण गोडबोले यांनी एका पुस्तकावर लेखकाच्या नावाखाली आपल्या अनेक डिग्य्रा लावल्यात.(डिग्रीचे अनेक वचन डिग्य्रा होतं का ओ...) त्यात अमुक तमुक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ही पाटीही उपयोगी ठरावी यासाठी अट्टहास दिसतो. त्यांची पर्यटनाची पुस्तके चाळण्याचा मोह एकदा झाला होता; पण तोही त्या गणोरकरबाईंच्या कवितांसारखाच अनाकलनीय असल्याने सोडला... (गणोरकरच ना त्या... )
या दोघांपेक्षा सर्वात मोठा विनोद म्हणजे संजय सोनवणी यांनी साहित्य संमेलनाचा अर्ज भरला आहे... (आम्हाला जातीयवादी रंग येतोय का?) संजय सोनवणीच ना? आम्हाला यांची नावेच माहीत नाहीत. हे कोण तर प्रकाशक. हे प्रकाशकांच्या मेळाव्याचे अध्यक्ष होऊ इच्छित आहेत काय? ... नाही. हे मग विचारवंत... अरेच्चा साहित्यिक आणि विचारवंत वेगळे असतात का? संजय सोनवणी हे फेसबुक आणि ब्लॉगवरच्या लोकांना माहिती आहेत म्हणे...बामणांना शिव्या घातल्या की, चार लोक लाईक करतात.. आठ लोक प्रतिक्रिया देतात आणि दहा लोक तुम्हाला निधर्मी वगैरे म्हणतात. (हे जैनधर्मीयांच्या मेळाव्यात जाणार आणि तिथे आम्हाला अल्पसंख्याक म्हणून फायदे द्या म्हणणार; परत मला जातीयवादाचा रंग येतोय) त्यांच्यासोबत असणाऱ्यांची नावे आणि जात तपासावी का हा विचार आमच्या मनात आला; पण आम्ही तो कटाक्षाने टाळला... तरीही यांनी असं काय लेखन केले की, यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वगैरे करावे...यांची म्हणे 80 पुस्तके आहेत... (एखादी औदुंबरसारखी कविता लिहिली असती तरी पुरे झाले असते.) पुस्तके प्रकाशीत कशी होतात. त्याच्या पहिल्या आवृत्त्या कशा खपविल्या जातात याबाबत एक स्वतंत्र लेख होऊ शकतो. त्यामुळे तो विषय आम्ही घेत नाही.. (यांनी म्हणे, आणखी कसला तरी भंगार व्यवसायही केला होता. आम्ही भंगार व्यवसाय म्हटलंय, भंगाराचा नाही...) त्यामुळे छे.. पटत नाही बुवा..
आता हे लोक त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसणार ज्या खुर्चीत दुर्गा भागवत बसल्या होत्या, ज्या खुर्चीत पु. ल. देशपांडे बसले होते, ज्या खुर्चीत आचार्य अत्रे बसले होते. ज्यांनी साहित्याला वळण लावले. विचार कसा निर्भिड असतो हे सांगितले. तेथून हे लोक मारे गप्पा मारणार मराठी जगली पाहिजे याच्या...
तुमच्या हातात जर मराठी साहित्याचा दोर दिला तर तो तुटणार हे नक्‍कीच... 

शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०१३

स्वतंत्र

इथे सही करा... वकिलाने कागदाच्या तळातील जागा दाखविली...
तिने निमूटपणे पेन उचललं आणि सही केली...
""हां... पोटगीदाखल तुम्हाला दरमहा दहा हजार, तुमच्या नावे असलेली कार आणि तुम्हाला घातलेले दागिने तुमच्याकडेच राहतील. तरीही तुम्हाला आणखी काही हवे असल्यास साहेबांनी सांगायला सांगितले आहे... मी इथे दोन ओळींची जागा शिल्लक ठेवली आहे...'' वकील ब्ला ब्ला ब्ला बोलत होता... त्याच्या बोलण्याकडे तिचे जराही लक्ष नव्हते...
""आणखी कुठे सही...?'' तिने प्रश्‍न केला.
""तुम्हाला आणखी काही नको?''
""नको! जेवढं दिलंय तेच खूप आहे...''
वकिलाने पेन पुढे केलं.. सहीची जागा दाखविली... ""हां इथे सही...''
तिने निमूटपणे पुन्हा सही केली...
""हं, झालं...''
""साहेब नाही आले...?'' तिने वकिलाकडे बघितले.
""तुम्हाला भेटायचे आहे त्यांना?''
""हो!''
वकिलाने फोन लावला... तो तिथेच कुठे तरी असावा. अगदी भेटायला व्याकूळ असल्यासारखा तो पटकन समोर आला.
तिने त्याच्याकडे बघितले. काहीतरी बोलायला हवे म्हणून ती म्हणाली, ""झाल्या सह्या.''
""हं...'' त्याने फक्‍त हुंकार दिला.
""आता?''
""आता काय?''
""काही नाही...'' तिला प्रचंड अवघडलेपण आलं होतं...
""तुला या वेळी इथे बोलावलं म्हणून अडचण नाही ना झाली... म्हणजे तुझ्या ऑफीसमुळे..'' त्याने जितकं थंड राहता येईल तितकं राहण्याचा प्रयत्न केला.
""न.. नाही... नाही...'' तिनेही सावरून घ्यायचा प्रयत्न केला...
""उलट केतकर आलेत सोडायला... त्यांच्याच गाडीतून आले इथे...''
तिच्या या वाक्‍यासरशी तिच्यावर रोखलेले त्याचे डोळे अलगद बाजूला गेले...
""हं..'' त्याने पुन्हा हुंकार दिला...
""ऑफिसच्या ड्रायव्हरकडून गाडी पाठवून देते...'' ती काही तरी बोलायचे म्हणून बोलली..
""नको नको... ती राहू दे तुझ्याकडेच... मी लिहिलंय त्यात... गाडी तुझ्याकडेच राहावी म्हणून... ती तुझ्याच नावावर आहे ना?''
""नकोय मला खरं... मी तुझ्या नावावर करून देईन..''
""पण...''
""जाऊ देत... तुला एक विचारायचं होतं...''
""तू या सह्यांसाठी आजचाच दिवस का निवडलास...?''
""काही खास नाही... वकिलाला वेळ होता म्हणून..'' त्याने तिच्याकडे न बघता उत्तर दिले...
तिनेही मग ताणले नाही...
""चल... जाऊ मी आता...'' त्याने आपला वरचा ओठ दातांत दाबला आणि फक्‍त मान डोलावली...
तो तिथेच थांबून होता...
न बघता ती पायऱ्या झपझप उतरली आणि गाडीत बसली... गाडीत बसताना तिला जाणवलं की तो तिच्याकडेच बघत आहे.....
गाडी सुरू झाली.... तिने पर्समधून रुमाल काढला आणि डोळे पुसले....
केतकरांकडे बघत म्हणाली.. ""थॅंक्‍स...''
""कशाबद्दल....?''
""आज तू होतास म्हणून त्याने अडवले नाही... आणि त्याने अडवले नाही म्हणून मी त्याला सोडू शकले...''
केतकरने फक्‍त मान हलवली....
""पण काय गं... घटस्फोटाचे हे पाऊल उचलण्याची खरंच गरज होती?''
""नाही... पण माझ्यासमोर याशिवाय पर्यायच नव्हता..''
""पण यामुळे तो कोलमडला नसेल?''
""हं... तो काय, मी नाही कोलमडले... पण आता सुखाने मरेल तरी...!''
""तुला आठवतं, आठ वर्षांपूर्वी याच दिवशी तू आमच्या लग्नाचा साक्षीदार म्हणून सह्या केल्या होत्यास...''
माणसाने खरेच एवढे प्रेम करू नये!
""मीही प्रेम केलं.. अगदी स्वतःपेक्षा जास्त प्रेम त्याच्यावर केलं.. मला नाही तरी दुसरं कोण होतं प्रेम करण्यासारखं.. पण तरीही त्याच्याइतकं प्रेम करणं मला नाही जमलं...
तुला माहीत आहे... आमच्या घरातील एकही वस्तू त्याच्या नावावर नाही... घर, कार, साधा टेलिफोनसुद्धा माझ्याच नावावर...
त्याला एकदा विचारलं, का रे! सगळी कामं मला करायला लावायला तू लग्न केलंस की काय?
त्यावर तो एवढा अपसेट्‌ झाला होता... म्हणाला, नाही गं... प्रत्येक वेळी तुझं नाव लिहायला मिळावं म्हणून मी सगळ्या वस्तू तुझ्या नावावर केल्यात...
स्वयंपाक करत असताना ओट्याशेजारी खुर्ची ठेवून बसायचा...
काय रे, एवढं काय आहे माझ्यात? असं म्हटलं की नुसता हसायचा... काही बोलायचा नाही...
मी पुन्हा नोकरी करते म्हटल्यावर लगेच त्याने तुला फोन केला... मला यायला-जायला त्रास होऊ नये म्हणून कार घेतली....''
""हं...'' केतकरने हुंकार सोडला...
""आठ महिन्यांपूर्वी त्याची डायरी वाचली नसती तर....''
तिने हुंदका दाबायचा प्रयत्न केला... पण जमलं नाही...
""तो मरणार यात शंका नाही; पण तो रोज मरताना मला बघवणार नव्हतं.... आणि त्यालाही आता आपलं रोजचं मरण लपवताना त्रास नाही होणार, कामाच्या टूर काढून दिवसेंदिवस बाहेर राहावं लागणार नाही...''
केतकरने तिचा हात हातात घेण्याचा प्रयत्न केला... पण तिने हलकेच तो बाजूला घेतला...
""डायरीत त्याने लिहिलेलं वाक्‍य तुला सांगितलेलं आठवतंय?''
""...एका बाजूला हाडांच्या सांध्यात लपून राहिलेला हा कॅन्सर मला जगू देणार नाही. जगात माझ्यानंतर कोण हिचे? कसे होईल हिचे? अनाथाश्रमाच्या पायरीवर सोडून जाणारी आई आणि मध्यात संसार सोडून जाणारा मी यांत फरक तो काय? ती किमान बरी तरी... ओढ लावून गेली नाही... मी मात्र प्रेमाचे जाळे तिच्याभोवती विणून आता निघून जातोय...''
तिला बोलता येत नव्हते...
केतकरने गाडी थांबवली.. ती गाडीतून उतरली....
दहा वर्षांपूर्वी मी याच होस्टेलवर राहात होते... तुला आठवतं... माझ्यासारख्या अनाथ मुलीवर त्याने इतकं प्रेम केलं, की मला पुन्हा अनाथ करताना त्याचा जीव गुदमरायला लागला होता रे... मी समोर असताना त्याला त्याचा शेवटचा श्‍वास घेणंही जड जाईल.... लोक मला कृतघ्न आणि नालायकही म्हणतील. पण मी त्याला सोडलेलं नाही... त्याच्या गळ्याभोवती माझ्या प्रेमाचा फास लागलाय तो थोडा सैल केला इतकंच... तो
स्वतंत्र होईल... पण मी मात्र कायमची अडकेन... 

शुक्रवार, ५ जुलै, २०१३

प्रिय,

बाहेर ज्येष्ठातला पाऊस अखंडपणे कोसळतोय. रात्रीच्या या काळाखोत पावसाचा तेवढा आवाज ऐकू येतोय.. जणू आता सगळं आपल्या मिठीत घेऊन वाहून नेण्यासाठी आतुर असलेला हा पाऊस कधी थांबेल की नाही असंच वाटू लागलंय. रात्र, बाहेर मुसळधार कोसळणारा पाऊस, अशावेळी एकटं वाटतं. हा एकटेपणा दूर करण्याचा एक पर्याय असतो तो म्हणजे तुला पत्र लिहिण्याचा. पत्राच्या सोबतीने तुला सोबतीला आणण्याचा.. या मिट्ट अंधारात टेबलावरची ही मेणबत्ती आपल्या तुटपुंज्या शक्‍तीने तेवत आहे. खिडकीतून येणाऱ्या ओलसर वाऱ्याला न जुमानता तिची जगण्याची लढाई सुरू आहे. कधी कधी तिची ज्योत थरथरते, पण तेवढीच... पुन्हा ती ताठ मानेने तेवत राहते. अगदी थकलेल्या म्हातारीसारखी ती करारीपणे जगत आहे...
संध्याकाळची गोष्ट... दुपारपासूनच सुरू असलेल्या पावसाने सगळीकडे पाणी पाणी केले होते. झाडांवरून पावसाच्या पाण्याच्या धारा वाहू लागल्या होत्या. इथे आमच्या घराच्या समोरच्या झाडावर असाच एक कावळा आपल्या सर्व शक्‍तीनिशी पावसाशी लढत असलेला मी बघितला.
आपल्या कोवळ्या काळ्या पंखावर पावसाचे बाण सहन करत तो फांद्यांच्या आधाराने पावसाच्या डोळ्यांत डोळा घालून बसला होता..त्याचे ते काट्या-कुट्याचे घरटे खाली कोसळले होते... फांद्यांचा आडोसा अपुरा पडत होता... त्याच्या तलम काळ्या पंखांचा आता पार झाडू होऊ गेला आहे. हे त्यालाही माहीत होते, पण तरीही त्याने आपली फांदी सोडली नव्हते... तिथून अगदी एका झेपेच्या अंतरावर माझ्या घराची बाल्कनी आहे. त्यात तो आला असता तरी त्याला कोणी हुसकावून लावले नसते तरी तो त्या झाडावर बसून राहिला. आपल्या मोडतोडत्या घरट्याकडे बघत. पावसाचे टपोरे थेंब आपल्या पंखावर झेलत. आताही तो या किर्र अंधारात त्याच फांदीवर तिथेच तसाच पडून असेल नया ज्येष्ठातल्या पावसाला तशी माया कमीच... तू म्हणायचीस नेहमी... "" मला वळिवाचा पाऊस आवडतो, कारण तो येतोच मुळी नाद करत, ढोल-ताशे घेऊन. येताना वाजत गाजत येतो आणि जाताना सगळा कचरा आपल्यासोबत नेतो, उन्हाने रापलेली मनं आणि तापलेल्या जमिनीला तृप्त करुन मागे ठेवतो फओलावा. ज्येष्ठ-आषाढ हे निमंत्रितांसारखे येतात. आपल्या ठराविक जागेवर बसतात आणि उठतात. कोसळतातही कर्तव्य केल्यासारखे. त्यांना माया नसतेच.'' खरंच आहे तुझं. आता बघ हा पाऊस येता तसाच. अगदी आपल्या कामाचे आठ तास मोजून भरावेत, यासाठी जणू केव्हापासून कोसळतो आहे.. त्याबरोबर आता वाराही जोराचा सुटला आहे.... मघापासून धीराने वाऱ्याचे आव्हान पेलणारी मेणबत्ती आता जास्तच थरथरू लागली आहे. या लढाईत ती जिंकणे अशक्‍य आहे. त्यामुळे आता पत्र अपुर्ण ठेवून झोपेला जवळ करणे हेच उत्तम...!
सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा मला त्या आपल्या काट्या-कुट्याच्या घरट्याकडे बघत फांदीवर पाऊस झेलणाऱ्या कावळ्याची आठवण आली..
पत्र पूर्ण करावे की कावळ्याला बघावे या द्विधा अवस्थेत होतो. पण पहिल्यांदा तो कावळा बघावा आणि मग पत्राला हात घालावे असे वाटले म्हणून मी अंगणात गेलो. अंगणात त्या झाडाखाली पडलेल्या काट्या-कुट्याच्या घरट्याशेजारी तो कावळाही अचेतन होऊन पडला होता. त्याचे पंख त्या विस्कटलेल्या घरट्यासारखेच विस्कटले होते. त्याच्याच कडेला दुपारी पोरांनी सोडलेल्या नावांचे कागद. मला आता कळतंय की तुला ज्येष्ठ-आषाढातला पाऊस का आवडत नाही... कावळ्याची घरे ज्येष्ठ-आषाढातच कोसळतात... आणि कधी कधी कावळेही....!

                                                                                                                                                  तुझाच....

शुक्रवार, १० मे, २०१३

प्रिय,



कशी आहेस? काही प्रश्‍न हे उगाचच विचारले जातात ना? त्या प्रश्‍नांना तसा अर्थ नसतो. त्याची उत्तरे माहीत असतात. पण तरीही सुखात! हा शब्द ऐकण्यासाठी कान नेहमीच आतुर असतात. अनेकदा कानाचे आणि मनाचे पटत नाही; पण कानावर जास्त विश्‍वास ठेवावा लागतो. मागच्या वेळी मी ग्रेसबद्दल लिहिलं होतं. आठवतं... ग्रेस मनात शिरता शिरत नाही आणि एकदा शिरला की तो निघता-निघत नाही... तो रेंगाळत राहतो... त्याचे आर्त शब्द कानांत घट्ट आवाज करून राहतात.. अनेक अर्थांचे शेले ओढून आणलेले ते शब्द आपले सगळे शेले हळुहळू सोडून देतात...
अगदी हवेत शब्दांना फेकावे आणि त्या शब्दांना त्याने शब्दांनीच तोलून धरावे असे काही... पण केवळ शब्दांच्या आणि प्रतिमांच्या प्रेमात पडलेला हा कवी नव्हता. तो जपणूकदार होता... आपल्या सगळ्या जखमांची जपणूक करायचा. ग्रेस यांनी आपल्या शेवटच्या काळात लिहिलेल्या ओल्या वेळूच्या बासरीचे सूर आता माझ्या कानात घुमत आहेत... खरे तर ही कला त्यांनाच जमू शकते... पोकळ वेळूत कोणीही फुंकर मारून सुरांना आळवू शकते... ग्रेस प्राणांनी फुंकतात... त्यामुळे ओल्या वेळूची बासरीही मग सूरमयी होऊन जाते... दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी लढत असताना ग्रेस यांच्या श्‍वासातून उमटलेले हे सूर आहेत. मला त्यात आर्तता दिसते. कधी भूतकाळाशी नाते जोडण्याचा प्रयत्न दिसतो. प्रतिमांच्या चौकटीतून जगाला बघणारा हा कवी प्रतिमांची चौकट एवढी मोठी करतो, की त्यात आपणही सामावून जातो. कधी कधी वाटते, की तो हा प्रतिमांचा पसारा सगळा आवरून, छे! उधळून देऊन मुक्‍तपणे लिहितो की काय? पण पुन्हा तो मागे फिरतो आणि प्रतिमांमध्ये अडकत राहतो. कर्करोगासारखा असाध्य रोग झालेला असताना जगण्याच्या भूतकाळाच्या पाटीवर पुसलेल्या आठवणींच्या रेषा त्यांना आठवत नसतील, असे म्हणणे म्हणजे तो त्यांच्यावरच अन्याय आहे. त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक लेखांत जणू याच रेषा त्यांनी ठळक करण्याचा प्रयत्न केला आहे, पण त्यांना पुन्हा प्रतिमांची चौकट घातली आहे इतकेच! या प्रतिमांच्या चौकटीत त्यांना सापडला तो देवदास... कर्करोगाशी हॉस्पिटलमध्ये झुंज देत असताना, त्या औषधांच्या आणि फिनेलच्या वातावरणात त्यांना देवदास का आठवतो?... तो केवळ आठवत नाही तर तो समग्र आठवतो. त्याच्या मनाच्या कप्प्यांसह आठवतो... चार दशकांहून अधिक प्रवास केल्यानंतर अगदी शेवटी त्यांना आठवतो तो देवदास... तोच देवदास जो पार्वतीच्या प्रेमात अखंड बुडालेला आहे... पण का? देवदासच का आठवला?
...ही देवदासाची मरणवाट नाही तर हा पार्वतीव्यतिरिक्‍त उरलेल्या जीवनसलगीचा एकमेव घाट आहे, अशी ओळ लिहिणाऱ्या ग्रेस यांना पार्वतीबरोबर घालवलेले क्षण जितके देवदासला आठवतात किंबहुना छळतात तितकेच ते छळतात जणू... गंमत आहे बघ... मला यांमध्ये प्रतिमांच्या जंजाळात अडकवून हलकेच आपले सांगणे पोचविण्याचा प्रयत्न दिसतो. तो तर त्यांच्या लेखनशैलीचा अविभाज्य घटक होता, पण यावेळी त्यांनी निवडलेल्या प्रतिमा सामान्य डोळ्यांच्या माणसांनाही स्पष्ट दिसतात... देवदासचे दुःख सगळ्यात मोठे का वाटते? कारण तो पार्वतीवर आसक्‍त नाही... आसक्‍ती ही प्रेमाची पायरीच असू शकत नाही... शरदचंद्रांनी लिहिलेल्या 1917 च्या या कादंबरीच्या नायकाचे आणि नायिकेचे अंतरंग कळण्यासाठी प्रेम करायला हवे... पार्वती आपल्याला मिळणार नाही, म्हटल्यावर देवदास कोलमडतो... ग्रेस म्हणतात, जगाकडून आलेली समीकरणे अनेक असतात. गोमेचा एक पाय तुटला म्हणून काय झाले... पण गोमेच्या अनेक पायांपैकी एक पाय तुटल्यावर तिच्या जीवाचा समग्र आकृतिबंध शबलित होतो, कलंकित होतो त्याचे काय? किती सहजतेने खरे सांगून टाकले... काय झालं... आयुष्य थांबतं का कोणासाठी? जगणं म्हणजे एवढंच का? हे सरळ नियम लोकांनी कुबड्यांसारखे निर्माण केले आहेत. त्याला उत्तरे देण्याची गरज नसते... जगण्याची रीतच अशी, की त्यात आकृतिबंध तुमचा हवा... अगदी तुझा हवा... पण तसं होत नाही... गोमेचा पाय करून टाकतात... आणि प्रश्‍नाची कुबडी हातात देऊन टाकतात... कुबड्या कधीच पायाची जागा घेऊ शकत नाहीत... त्या आधार देतील; पण पाय नाही होऊ शकत... आणि त्या चालण्याला प्रवास म्हणायचं की आयुष्य... खरे तर ते खुरटत चालणं... ढकलणं...
मी डोळे मिटून बघतो... अगदी आज माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस असावा, या कल्पनेने डोळे मिटतो... आता या क्षणी मिटलेले डोळे कायमचे मिटले तर त्या अखंड अंधाराच्या प्रवासात डोळयांच्या पटावर कुठले चित्र उमटेल याचा मी विचार करतो, त्यावेळी तुझा एकच चेहरा दिसतो... अगदी हसरा... सोबत देणारा... त्या मिटलेल्या पापण्यांवर आपले गरम ओठ टेकवणारा... कदाचित हा कल्पनेचा खेळ असावा. आपण मिटलेले डोळे उघडले जाणार आहेत, याचा विश्‍वास कुठेतरी मनात खोल रुतून बसलेला असतो. त्यामुळे त्याचे काही वाटत नाही... पण खरोखर आपला मृत्यू समोर दिसतोय हे बघितल्यावर माणसाच्या मनात नेमके काय येत असेल...?

इथे आठवतो तो भीष्म... शरशय्येवर पडलेला भीष्म... उत्तरायणाची वाट बघणारा भीष्म... स्वतःच्या बापासाठी राजगादीवर लाथ मारून अखंड ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा करणारा देवव्रत, भावासाठी राजकुमारींना पळवून आणणारा भाऊ, सत्यवतीने कुरूवंशवाढीसाठी प्रतिज्ञा मोडण्यासाठी भरीस घालूनही न बधलेला भीष्म... परशुरामासारख्या योद्‌ध्यासमोरही हार न पत्करणारा पण द्रौपदीच्या वस्त्रहरणावेळी गप्प राहणारा भीष्म... शरशय्येवर पडलेल्या आणि उत्तरायणाची वाट बघणाऱ्या भीष्माच्या डोळ्यासमोर काय येत असेल...? त्याच्या दीडशे वर्षांच्या आयुष्याच्या कुठल्या गोष्टी अगदी ठळक दिसत असतील... बापासाठी भीष्मप्रतिज्ञा केल्याचा दिवस की त्यानंतरचा दिवस...? राजा प्रदीपचा नातू आणि शंतनू-गंगेचा मुलगा देवव्रत याने आपल्या ताकदीच्या मनोनिग्रहाच्या जोरावर प्रतिज्ञा घेतली खरी; पण... त्या रात्री त्याला खरंच झोप लागली असेल...? त्याच्या डोळ्यांतही एखादा चेहरा तरळला नसेल का? मला वाटतं... शरशय्येवर आडवा झाल्यावर भीष्माच्या डोळ्यासमोर तोच चेहरा दिसत असणार... आठवणींचा गुंता झाला असणार... त्या प्रत्येक बाणाबरोबरची टोचणी त्याला जाणवत असणार... तो कोणाचा तरी देवव्रत होता... कधी तरी कोणीतरी देवव्रताच्या मनाच्या झरोक्‍यात प्रवेशलं असणार आणि भीष्माच्या प्रतिज्ञेच्या ओझ्याखाली ते दबून गेलेलं... मृत्यूशय्येवर पडलेल्या भीष्माला माफी मागावी वाटली असेल का? खरे म्हणजे तो राजगादी सोडून बाकीचे राजवैभव उपभोगत होता. पण त्यात त्याने ब्रह्मचर्य व्रताचे पालन का केले? सत्यवतीने विनवूनही त्याने विचित्रवीर्याच्या बायकांना का हात लावला नाही... कुरुवंशाचे खरे रक्‍त त्याच्या नसा-नसात वाहत असताना त्याला व्यासाचा आधार का घ्यावा वाटला? या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला की ती त्या मनाच्या झरोक्‍याशी येऊन मिळतात. त्याने घेतलेली शपथ जर आणखी कोणाच्या भाळी लिहिली गेली असेल तर त्याचा उल्लेख महाभारतात नाही; पण त्यावेळी तो अस्तित्वात नसेलच कशावरून... आपल्यामागून असं फरफटलेलं आयुष्य त्याने कदाचित बघितले असेल... आणि त्याचा दोषी तोच होता... त्यामुळेच तर त्याला त्या बाणांची टोचणी फार लागली नाही. त्यापेक्षा मोठी टोचणी त्याला लागून राहिली होती. ग्रेस म्हणतात तसे गोमेचा एक पाय... त्याने एक पाय तोडला पण पुन्हा जे कलंकित आयुष्य त्याच्यासाठी भोगावे लागले त्याचे काय? देवव्रताचा भीष्म झाला... तसेच कोणीतरी हे व्रत आपलेच समजून जगले नसेलच असे नाही... कदाचित त्या चेहऱ्याला पुन्हा बघण्यासाठीच उत्तरायणाचा बहाणा करून भीष्म जिवंत राहिला नसेल कशावरून...?

मंगळवार, २ एप्रिल, २०१३

प्रिय,


हे पत्र 26 मार्चला लिहिलं होतं.....फक्‍त पोस्ट आता करतोय....


प्रिय,
आज 26 मार्च. बरोबर याच दिवशी वर्षापूर्वी एक प्रतिभावंत आत्मा आपला देह सोडून आपल्या जगात निघून गेला. ग्रेस त्याच्या जगात निघून गेला. खरे तर तो इथे कधी रमलाच नाही. तो इथला कधी नव्हताच, त्याचे जग वेगळे. तो त्या आपल्या जगात निघून गेला. ग्रेस गेला. माणिक गोडघाटे नावाच्या माणसाचा देह त्याने त्यागला. त्याची इथे घुसमट झाली की नाही माहीत नाही. जाण्याच्या दिवशी त्याचे पाय इथेच राहण्यासाठी थोडे घुटमळले की नाही माहीत नाही; कदाचित थोडे घुटमळले असतील. पण तरीही त्याला आपले पाय सोडवून घ्यायला फारसा त्रास झाला नसेल. खरे तर त्या दिवशी तो फक्‍त आपल्या दृष्टिआड झाला. ज्या दिवशी माणिक गोडघाटे नावाच्या देहाला "ग्रेस'ची ओळख पटली, त्याच दिवसापासून त्याचा त्या गूढ अंधारात जाण्याचा प्रवास सुरू झाला होता. या प्रवासात तो एकटा निघाला खरे; पण त्याला तो एकट्याचा प्रवास नको होता. त्या प्रवासात सोबत येण्यासाठी त्याने अनेकांना शब्दांच्या माध्यमातून साद घातली; पण ती साद ऐकण्याचे कान फार थोड्याच जणांकडे होते. जी. ए. कुलकर्णींकडे तो कान होता. पण जी. ए. तर त्याच्याआधीच त्या अंधारात निघून गेले होते. त्यांच्या जाण्याने त्या अंधाराला सोनेरी किनार लागली होती. तरी ग्रेस
बाकीच्या लोकांना साद घालत राहिला, वाट दाखवत राहिला. आपल्यासोबतीने येण्याचे आमंत्रण देत राहिला; पण त्या वाटेवरून चालण्याचे धाडस फारसे कोणी करू शकले नाही. तो कंठाच्या मुळापासून साद देत राहिला; पण त्या सादेतील आवाज बहुतांश जणांच्या कानापर्यंत पोचत नव्हता. ज्यांच्या कानापर्यंत पोचत होता, त्यांनाही त्यात अधिक गोंधळच जाणवायचा. त्यामुळे त्याच्या त्या वाटेला कोणी गेले नाही. खरे तर ग्रेस इथे रमलाच नाही. तो इथे रमला असता तर माणिक गोडघाटेच्या देहाची ग्रेसशी ओळख झाली नसती. तो ग्रेस होता. आपल्या भाळावरची जखम तो अशी दाखवी, की समोरच्याला ती जखम न वाटता नक्षीदार गोंदण असल्याचे वाटून जाई. ग्रेस गेला. पण जाताना त्याने जखमांची केलेली गोंदणे तशीच ठेवून गेला. इथे इतकी वर्षे राहिल्याचे ते कदाचित देणं असेल. तशी त्याने कोणतीच देणी बाकी ठेवली नव्हती. त्या देण्यावर कित्येक पिढ्या गुजराण करू शकतील. अर्थात ही संपत्ती वापरण्यासाठी त्याचा वारसा सांगणारे हवेत, ते मिळोत म्हणजे झाले. मला ग्रेसचा वंश वाढलेला बघायचा आहे. जखमा जपाव्यात तर ग्रेसने. भळभळत्या जखमेवर तो हलकेच फुंकर घालतो आणि नकळत भरत आलेल्या जखमेत नखही खुपसतो. त्याला जखमेची वेदना सहनही होत नाही आणि तो तिला सोडतही नाही.
तो असा का? हा प्रश्‍न नाही, कारण तो ग्रेस. ग्रेस मनावर उमटतो. ग्रेसचा मुक्‍काम तिथे. त्याला जर मेंदूच्या खिडकीतून बघायचा प्रयत्न केला तर त्याचा चेहरा धूसर होत जातो. दाढीआड लपवलेल्या चेहऱ्यावरच्या वेदनांच्या खुणा अस्पष्ट होत जातात, नव्हे तर चेहराच अस्पष्ट होत जातो. त्यामुळे त्याचा मनावरचा मुक्‍काम हलवू नये. खरे तर सगळीच मनावरची घरटी उचलून मेंदूच्या पेशींवर ठेवली तर ती टुमदार दिसतात खरी; पण त्यांच्या भिंती ठिसूळ होऊन गेलेल्या असतात. त्यामुळे अशी घरटी मेंदूच्या पेशींवर रुजत नाहीत. त्यांना मनावरच ठेवून द्यावे. अगदी मोडक्‍या-तोडक्‍या अवस्थेत त्यांना तिथेच रुजू द्यावे. ग्रेस अशी घरटी करणारा खरा "क्रिएटिव्ह'. तो म्हणायचाही creativity is my life and its conviction is my character...' ग्रेस असं बोलून जायचा आणि मग त्याचा अर्थ समजावत-बिमजावत बसायचा नाही. याचा अर्थ काय काढायचा माणसानं? conviction चा अर्थ डिक्‍शनरीत खूप गंमतीदार आहे; एक तर शिक्षा किंवा दृढ विश्‍वास. गम्मत म्हणजे ग्रेसला दोन्ही लागू होते. त्याला नेमके काय म्हणायचे होते? पण त्याचा त्याच्या निर्मितीवर असलेला दृढ विश्‍वासच जास्त महत्त्वाचा वाटत असणार. खरे तर त्याला love is my life असं म्हणायचं असणार. खूप मोठ्या माणसांनाही सगळ्याच वेळी सगळंच खरं कुठे बोलता येतं. तो प्रचंड प्रेमी होता. कशावरून विचारलंस तर सांगता येणार नाही. पण होता खरे. प्रेमी फक्‍त प्रेम करणाऱ्यांनाच म्हणायचे? मला नाही पटत, प्रेमासाठी भुकेलेल्यांना, ज्यांचा शोध अखंड सुरू असतो त्यांनाही प्रेमीच म्हणायला हवे. ग्रेस शोधणारा... प्रत्येकाचा शोध वेगळा. ग्रेसचा मार्ग वेगळा. त्यामुळे त्याच्या कवितांमधून उमटणारा अर्थ प्रत्येकाला वेगवेळा लागतो. ज्यांच्या मनापर्यंत ती कविता पोचली, त्यांनी त्या कवितेला आपल्यापरीने अर्थ लावले. काही कविता आपण कधी ऐकतो, कोणाच्या तोंडून ऐकतो यावरही त्याचा अर्थ अवलंबून असतो का? "भय इथले संपत नाही...' ग्रेसचीच कविता. तुझ्या तोंडून ऐकलेली... त्यापूर्वीही बऱ्याचवेळा ऐकली होती आणि त्यानंतरही बऱ्याचवेळा ऐकली. पण काळजाच्या खोलीत शिरली ती तुझ्या तोंडून ऐकलेली. तसे सगळेच शब्द. my conviction is my life... असं आज मला म्हणावंसं वाटतं आणि त्याचा नेमका अर्थ काय हे तुलाच शोधायला लावावं वाटतं....
तुझाच...

गुरुवार, २८ मार्च, २०१३

प्रिय,


प्रिय,
दुपार टळली आहे. उन्हाची सरळ किरणे आता तिरपी झाली आहेत. झरोयेणाऱ्या किरणांनी आपल्या पावलांचा वेग वाढविला आहे. इथे खिडकीत बसून आता हे पत्र लिहिताना समोरच्या झाडांवरील पक्ष्यांची लगबग वाढलेली जाणवत आहे. झाडांच्या बुडख्याशी पडलेल्या पानांची सळसळही वाढली आहे. मध्येच कोकिळेचा स्वर ऐकू येत आहे. वसंत आल्याची ती खूण. म्हणजे तसे प्रत्येक ऋतूच्या येण्याचे पडघम वाजतातच. म्हणजे बघ, वर्षा ऋतू येणार असेल तर एखादा वळीव आधीच पडतो. ढगांचा गडगडाट, विजांचा लखलखाट सांगत असतो की अरे! पुढे पावसाळा येणार आहे, तयार राहा. पावसाळा ऋतू सम्राटाप्रअसतो, येताना आणि जातानाही शंखनाद होतो. तो येतोही असा, की सगळं आपल्या आधीन करून टाकतो. बाकीचे ऋतू तुलनेत शांत.
आता हेच बघ ना.. हेमंत, शिशिर येतात चोरपावलाने आणि जातातही चोरपावलाने. अगदी आपल्या उत्कर्षाच्या काळात त्यांचे अस्तित्व जाणवते एवढेच. पण वसंत यापेक्षा निराळा. तो येतोही मंद सुरांनी आणि जातोही भैरवी गाऊन.. ही मैफल संपू नये वाटत असतानाच तो निघतो.. हेमंत अजून सरलाही नाही, त्याअगोदरच कोकिळेने आपला तंबोरा लावायला घेतला आहे. झाडांनी आपल्याभोवती पिकल्या पानांचा सडा घातला आहे. फांद्यांवर हळूहळू पालवी फुटू लागली आहे. हे असंच होतं माझं, नेहमी भरकटत राहतो... लिहायचे असते एक आणि लिहितो भलतेच.
तुला माहीतच आहे, ज्यावेळी जे बोलायचे ते बोलता कुठे आले मला? जाऊ देत! तर सांगत होतो, माझ्या घरासमोरच्या शेवग्याची अशीच पानगळती सुरू आहे. त्याची ती इवलीशी पिवळी पाने अंगणात मुबागडत असतात... दिवाळी-दसऱ्याला आपण जशी अंगणात मोठी रांगोळी घालतो तशी ती पानांची स्वैर रांगोळी पसरलेली असते.. आताही खिडकीतून बघताना या पिकल्या पानांची पाठशिवण सुरू आहे. त्यातच मध्ये-मध्ये दिसणारी ही सावरीची म्हातारी म्हणजे लपाछपीचा खेळ खेळणाऱ्या पोरांमध्ये लिंबू-टिंबू पोरं जशी लुडबुडतात तसंच आहे हे. या सावरीच्या कापसाला म्हातारी का म्हणत असतील याचं मला नेहमी कोडं पडतं. छे! हे तर एखाद्या लहानग्याला त्याच्या आईने झालरीचे टोपडे घातले आहे, त्याला दृष्ट लागू नये म्हणून कपाळाला, गालाला, हनुवटीला तीट लावली आहे आणि अंगणात खेळायला सोडले आहे असेच वाटते. ते पोर मग अशा पाठशिवणीच्या खेळात मध्ये-मध्ये लुडबुडत राहातं... आता हेच बघ, त्या पाठशिवणीच्या खेळात रममाण झालेलं एक पान लपण्यासाठी हळूच खिडकीतून आत आलं आहे. माझ्या टेबलवरच्या उघड्या वहीच्या पानांत अलगद जाऊन बसलं आहे. मी ही वही अशीच मिटली तर ते तिथेच राहील... कित्येक दिवस, महिने, कदाचित वर्षही... मग त्या पानाचे आणि त्या वहीच्या पानाचेही नाते जमून जाईल. मी हलकेच वही मिटून टाकली.. वहीप्रमाने मनही मिटता येत असतं तर किती बरं झालं असतं ना? पण मन मिटता येत नाही...
आता या वसंतात अंगणातील, परसातील सगळी झाडे नव्याने हिरवीगार होतील. जुनी पाने गळून ताजीतवानी होतील.. पण मनाचं तसं होत नाही ना? पिकलेल्या पानांना मन लगेच सोडत नाही.. ती गळूनही पडत नाहीत लवकर... कदाचित पडलीच तर नवी पालवी... छे! नवी पालवी येईलच असे नाही... अगदी आमच्या मळ्यात कित्येक वर्षांपासून उभ्या असलेल्या वठलेल्या आंब्यासारखंच हे.. अनेक ऋतू येऊन गेले.. पण त्या आंब्याला पुन्हा काही पालवी फुटली नाही... दर पावसाळ्यात त्याच्या खोडावर शेवाळ साठतं, खोड हिरवंगार होतं... काही काळासाठी आम्ही सुखावून जातो.. पण पुन्हा त्या वठलेल्या लाकडाचा आणखी एक भाग तुटून जातो... दरवर्षी असं होतं.... या वसंतातही ते आंब्याचं झाड असंच पालवीविना उभं राहील.. त्याच्यासाठी वसंत आणि ग्रीष्यात काहीच फरक नाही... मातीत मिसळेपर्यंत त्याचा वसंतही असाच ग्रीष्जाईल.. पण मनाचं तसं होत नाही ना! मातीत मिसळेपर्यंत त्याला जगावं लागतं... चढलेल्या शेवाळाला पालवीसारखं जपावं लागतं... खरंच ना? तुला माहीत आहे, मी काय सांगतो आहे आणि काय सांगू पाहतोय... यावर्षीच्या वसंतात तू शेवाळाला सोडून पालवीला जपशील अशी अशा करतो... पुढचे मग कितीही ग्रीष्आले तरी त्यात ती पाने तगून राहतील आणि तुला टवटवीत करत राहतील... बाकी पत्र खूप लांबलंय... दिवेलागणीची वेळ झाली आहे.. वाराही मस्त सुटलाय... काळजी घे... यंदा पालवीला खुडू नको... एवढंच....
तुझाच........