बुधवार, २८ एप्रिल, २०१०

नाणी..

आई-वडील नाहीत, भूक लागलीय रुपाया द्या की! अकरा-बारा वर्षांचं ते पोर काकुळतीला येऊन मंदिरात येणाऱ्या जाणाऱ्यांकडे हात पसरत होतं. कोणी हातावर त्याच्या एखाद्‌ दुसरं नाणं टेकवत, तर कोणी तसंच निघून जाई. हळूहळू मंदिरातील गर्दी कमी होऊ लागली... त्याच्या शर्टच्या खिशातही नाणी खूप जमा झाली... त्यानं सगळी नाणी काढली, ती मोजली आणि पुन्हा खिशात कोंबली... आणखी चार रुपयांची त्याला गरज होती म्हणून ते पुन्हा मंदिराच्या दारात आलं. येणाऱ्यांपुढे हात पसरत राहिलं. मंदिराच्या दिशेनं येणाऱ्या सुटा-बुटातील माणसांकडे त्यानं पाहिलं. आता यानं पाच रुपयांचं नाणं दिलं की, संपलं म्हणून त्यानं त्याच्याकडे हात पसरला आणि पुन्हा आई-वडील नसल्याचं पालुपद सुरू केलं... त्या साहेबानं त्याच्याकडे एकदा बघितलं, तुच्छतेनं मान फिरविली आणि तो चालू लागला. त्याच्या मागून येणाऱ्यानं पोरांकडं बघितलं आणि त्याला त्याचा संताप आला. त्यानं पोराला धरलं आणि दोन मुस्काटात मारल्या... आई मेली काय, म्हणत तो त्याला मारू लागला. साहेबाला आता त्या पोराची दया आली. त्यानं मागं वळून त्या माणसाच्या हातातून त्याची सुटका केली. पैसे द्यायचे नसतील तर नका देऊ, पण मारू नका... साहोबानं सुनावलं.... त्या माणसानं साहेबांकडे बघितलं आणि रागानं पुन्हा पोराच्या मुस्काटात मारली, "ह्यो माझा भाचा हाय आणि त्येची आई जित्ती हाय.... असं काही काही सांगत राहिला. साहेबाला काही कळलं नाही. त्यानं तरीही त्या पोराचा हात त्या माणसाच्या हातातून सोडवला. बॅगेतील पाण्याची बाटली बाहेर काढली आणि त्या पोराला पाणी पाजलं. "तुझी आई जिवंत आहे ना?' साहेबानं प्रश्‍न विचारला. "हो!' पोरानं डाव्या मनगटानं शेंबूड पुसला आणि रल्या ओढातून ते पुटपुटलं. त्याला शांत होऊ दिलं आणि मग साहेबांनं विचारलं, "मग भीक का मागतोस? आईनं सांगितलं का?' त्याला आता धीर आला. "आईनं नाही
सांगितलं, पण...' त्यानं खिशातून ती सगळी नाणी बाहेर काढली. ती पुन्हा मोजली "यात आणखी दोन रुपये घालून परीक्षेची फी भरणार आहे... उद्या लगेचच भरायची आहे. हॉटेलात काम मागायला गेलो त्यांनी दिवसाला 20 रुपयेच देणार म्हणून सांगितलम्हणून इथं आलो.' फीसाठी पैसे पाहिजेत म्हटल्यावर कोणी पैसे द्यायला तयार नव्हते. म्हणून आई-वडिल मेले म्हणून पैसे मागायला लागलो. साहेबाला काही कळलं नाही. साहेबाचा हात नकळत खिशात गेला. त्याला तिथं नाणी लागली, पण ती त्याला द्यावी वाटली नाहीत. खिशाचं पेन त्यानं काढलं आणि त्याच्या हातात टेकवलं आणि... साहेब मंदिरात न जाताच निघून गेला.

गुरुवार, १ एप्रिल, २०१०

एप्रिल फुल !

रात्रीचे बाराचे ठोके पडले आणि तिचा मोबाईल वाजला...डोळे तारवटतच तिने तो उचलला आणि हॅलो म्हटलं.....हॅलो मी दारात उभा आहे.. दार उघड... त्याचा आवाज ऐकून ती थोडी बावचळली.....एवढ्या रात्री का आला असेल? काहीतरी नक्‍की महत्त्वाचं काम असेल म्हणून तिने दार उघडलं... दारात कोणी नाही बघून तिनं दार बंद केलं आणि त्याला फोन लावला... तो मोठ्याने ओरडलाच...एप्रिल फुल. ती स्वतःशीच हसली. फोन ठेवला आणि आडवी झाली. तिने झोपायचा प्रयत्न केला, पण झोप येईना. मागचे दिवस आठवत राहिले. तो पहिल्यांदा भेटलेला... कॉलेजमध्ये त्याने केलेली धमाल... नंतर त्याने केलेलं प्रपोज. त्याच्याशी आपण लग्न करणार आहे म्हटल्यावर आईने केलेला थयथयाट...
किती दिवस तो आईला समजावत होता. त्यासाठी रोज तिच्या शाळेत जात होता. आईच म्हणाली नंतर, जर त्यानं मला प्रपोज केलं असतं तर मीही हो म्हटलं असतं. खूप बडबड्या. लग्नानंतर किती काळजी घेत होता. एकेकदा त्याच्या त्या काळजीचाही वीट यायचा. आपण त्याला म्हणायचो की नको काळजी करत जाऊ एवढी. पण तो साधं डोकं दुखत असलं तरी रात्र रात्र बसून राहायचा. एकदा असंच ऑफीसच्या ट्रीपला गेल्यावर याचे एवढे फोन आले की शेवटी त्याला बास असं सांगावं लागलं. त्यानं तरी ऐकलं नाही. फोन वाजत राहिला. बॉस म्हणालाच असले अँटीने बदलावे. त्यावेळी काही वाटले नाही. पण नंतर तसं साचत राहिलं.
बॉसच्या शेजारी असताना याचा फोन आला की बॉसचं डोकं फिरायचं. मग तो कामात न झालेल्या चुकाही दाखवत राहायचा. त्याचा त्रास होऊ लागला. त्याची अति काळजी आता अंगावर येवू लागली. चिड येवू लागली. मग, एकदा त्याला सरळ सांगून टाकलं, आपलं यापुढे एकत्र राहाणं शक्‍य नाही. तो काही बोलला नाही. नंतर त्या आवेगातच आपण घटस्फोटाची कागदपत्रे केली. त्यानं का हा प्रश्‍न न विचारताच सही केली.
मग फोन बंद झाले. पहिले काही महिने छान गेले. बॉस नेहमीप्रमाणे बोलत होता. मग अचानक एक दिवस बॉसने छेडले... मैत्रीणीजवळ आपण खूप रडलो. पण दुसऱ्याच दिवशी बॉसने केबीनमध्ये बोलवून पाय धरले. बॉसचा सुजलेला चेहराच सांगत होता की त्याने रात्री त्याला बदड बदड बदडले असणार. त्याला फोन केला. तोच उत्साह खूप बडबडला. मग फोन खाली ठेवला. त्या रात्री खूप एकटं वाटलं. मग नंतर तो फोन करत राहायचा. आधी विचारायचा की तू रिकामी आहेस का? मग बोलू का विचारायचा आणि बोलायचा. त्याचा तो त्रयस्थपणा अंगावर यायचा. पण धीर नाही झाला. मग एक दिवस त्याला सरळ विचारलं आपण पुन्हा लग्न करुया का? लगेच हसला. मग म्हणाला, नको... आपल्या लग्नाची तारीख एक एप्रिल होती. एकदा "फुल' बनल्यावर तीच चूक पुन्हा कशाला !