सोमवार, २५ फेब्रुवारी, २०१३

प्रिय,


खूप दिवसांनी पत्र लिहितोय. इतके दिवस पत्राला का उशीर हा काही तुला प्रश्‍न पडणार नाही. आणि खरेतर माझ्याकडेही त्याचे असे खास उत्तर नाही. कंटाळा, आळस हे माझ्या नावाचे काही समानार्थी शब्द आहेत. (त्यात तू म्हणतेस तो मूर्ख हा शब्दही आहेच!).त्यामुळे कोणत्याही प्रश्‍नाचे माझे सरळ साधे उत्तर असते. कंटाळा! अर्थात काही करण्याचा उत्साह असण्याचे काही प्रयोजन तरी हवे... जाऊ देत. पत्र लिहिण्यास एक कारण मात्र आज मस्त आहे.. काल 24 फेब्रुवारीला पन्हाळ्यावर चंद्रशेखर गाडगीळांच्या गायनाचा कार्यक्रम झाला. मैफल खासगी स्वरुपाचीच होती. आणि ती रंगलीही अशी की खूपच खासगी वाटून गेली. अगदी पौर्णिमेचा चंद्र आपल्या पूर्ण तेजाने आकाशात माथ्यावर येऊन आपली किरणांची बरसात करत होता आणि त्याचवेळी गाडगीळ "" फिर वही श्‍याम वही गम, वही तनहाई है, दिल को समझाने तेरी याद चली आई है... '' गात होते. तलतच्या आवाजात लागलेला सूर गाडगीळांनी तंतोतंत लावला होता. आणि तीच आर्तता होती. रात्रीततल्या त्या चंद्रबिंबाकडे बघत त्यावर सुरांचा अभिषेक ते घालत होते. व्हायोलिनवर फिरणार गज तर लिलया फिरत होता. या वाद्याचे वैशिष्ट्यच असे की त्याची तार ही उसाच्या पानाइतकी धारधार असते. चटकन कोणी उसाच्या पानावरुन हात फिरवावा आणि बोटे रक्‍तबंबाळ व्हावीत इतकी ताकद व्हायोलिनमध्ये आहे. तो गज त्या तारांवर पडला की मनाशी तो तार जोडू पहातो. आणि गझलेची जर त्याला फूस असेल तर तो ती तार आणखी धारधार होत जाते. त्यामुळेच ती ""फिर वही...चे सूर आणि तुझी याद एकदमच आली.... नारळांच्या झावळ्यांमधून डोकावणाऱ्या त्या चंद्राकडे बघत कानातून मनात अलगद उतरणारी ती गझल तुझ्यापर्यंत तो चंद्र वाहून नेतो आहे की काय असे वाटून गेले. तू आत्ता त्या चंद्राकडे एकटक बघत बसली असशील असे वाटून गेले. आणि तो आपला दुवा साधतोय असा भास झाला. मैफीलीचा रंग वाढत होता.. गाडगीळ रंगात आले होते. आपल्या गायकीचे एक एक अनुभव सांगत होते. आणि अचानक त्यांनी एक शेर ऐकवला...

किस किस को बताएँगे जुदाई का सबब हम
तू मुझसे खफा है तो ज़माने के लिए आ

पन्हाळ्याच्या त्या उघड्या वातावरणात गार वारा अलगद गरम वाटू लागला..

रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ
आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिए आ...

ंदी हसन साहेबांचीची ही गझल पूर्वीही मी ऐकली होती, पण खरेच यावेळी ती आणखी वेगळी वाटली. अहमद फराज यांनी ती लिहिलीय अप्रतिम. पण मनापर्यंत पोचविण्यासाठी जो सूर लावावा लागतो तो मेहंदी हसन साहेबांचा तर लागतोच पण काल गाडगीळांचाही लागला. त्या शब्दांच्या अर्थापर्यंत ते घेऊन गेले आणि तिथून पुढचा प्रवास अर्थात तुझ्यासोबतीनेच झाला. गम्मत बघ कार्यक्रमाची सुरवात भजनाने झाली आणि शेवट गझलेने. देवाला भजन का आवडते याचा प्रत्यय मला काल पुन्हा उमजला. भजनातील भाव सुरांच्या रस्त्यावरून धावत सुटतात ते भगवंताच्या चरणापाशीच जाऊन थांबतात, गझलही तशीच अगदी शब्दांचे रुपेरी रूप घेऊन आलेले भाव आर्ततेच्या सुरांना जेव्हा मिठी मारतात तेव्हा ते मनात घर करत नाही तर तिथून आपला रस्ता शोधत हव्या त्या ठिकाणी पोचतात. त्यामुळेच ज्यावेळी कार्यक्रमाचा शेवट "तोच चंद्रमा नभात या गाण्याने झाला त्यावेळी... एकांती मजसमीप तीच तूही कामीनी.. हे शब्द खोटे नाही वाटले..!

तुझाच...