रविवार, १४ मार्च, २०१०

याद तुझी......

आम्ही थोर पत्रकार नाही आहोत. पोटासाठी काम करावे, पोट भरुन उरले तर दिमागाला खाद्य पुरवावे, अगदीच अपचन झाले असेल आणि वैद्याने लंघनाचा सल्ला दिला असेल तर थोडे होन आणि काही नाणी शिल्लक राहिली समजून एखादा चित्रपट बघण्याची हौस आम्ही पुरवत आलो आहोत. वर उल्लेखल्याप्रमाणे आम्ही लेखणीशी निगडीत धंदा करत असल्याने आम्हास अनेक ठिकाणी प्रतिष्ठा मिळते, तसे काही ठिकाणी आम्हास श्‍वानकुलीन समजून हाड हाडही केले जाते. पण आम्ही अशांकडे दुर्लक्ष करतो आणि लेखणी पाजरतोच. खरे तर नाटक आणि सिनेमांना आम्ही आमचा गनीमच मानला आहे. दिसला की घातली वाघनखे, काढला कोथळा बाहेर... पण आलिकडे असे काहीतरी वेगळे होऊ लागले आहे की ती चित्रपटातील सगळी मुर्खपणाची गाणी, आणि नट नट्यांचे धावणे, पळणे आवडू लागले आहे..... अगा विपरीत झाले म्हणून आम्ही हे आमच्या तिर्थरुपांना सांगितले, त्यांनी नेहमीप्रमाणे पहाडी हास्याचा आवाज करीत कोण आहे रे ती असा सरळ प्रश्‍न आम्हांस पुसला. तिर्थरुपांना सगळ्या प्रश्‍नांची उत्तरे आवडत नाहीत हे एव्हाना आमच्या ध्यानात आले असल्याने आम्ही सरळ मातोश्रींच्या पायात झुकलो. मातोश्रींनीही आम्हाला तोच प्रश्‍न पुसल्याने एकंदरीतच आमचे काही खरे नाही हे आम्हाला कळून चुकले. सांप्रतसमयी आमचे मन एका कन्येवर जडल्याचे तुम्हाला कळले असेलच पण तो विषय नाही. आमचे मन कुठेतरी लागल्याचे आम्हास खूप महिन्यांपासून ज्ञात आहे, पण अलिकडच्या काळात आम्ही मुर्खपेटीच्यासमोर बसून तासनतास ते प्रेमकाव्याने ओथंबलेले चित्रपट बघतो आहोत, प्रियतमेच्या विरहात डावा हात तोंडावर घेत, पिंजारलेल्या केंसावरुन हात फिरविणाऱ्या तरुणसदृश प्रौढाचे काळ्या पांढऱ्या रंगातील चित्रपट बघतो आहोत. आम्ही कोण कुळातील, आमचा काय हुद्दा याचे स्मरण न ठेवता आम्ही आता शिळही फुंकतो आहोत.. कोण अधर्म हा म्हणून आमुचे स
गे सोयरे आमच्याकडे बघत आहेत किंतू त्यांसी दुखवावे हा हेतू आमुच्या मनी कधी शिवला नाही, तत्कारणी आम्ही गप्प बसतो. सांप्रत समयी थ्री इडीयटनामक चित्रपटात महान तत्ववेत्ते जे की आमीर खान यांनी समस्त तरुणांना धडा शिकविता शिकविता त्यातील कन्येला सांगितले तैसेच आमुच्या बाबतीतच होत आहे. आता याला जर कोणी नावे ठेवत असेल तर ठेवो बुवा......

सोमवार, १ मार्च, २०१०

जुगार तुम्ही जिंकलात

प्रिय डॉ. सलील यांना,
स. न. वि. वि.
परवा शनिवारी कोल्हापुरात तुमचा गाणी मनातील हा कार्यक्रम झाला. कार्यक्रम सुंदर होता, आवडला या प्रतिक्रीया तर खूप लोकांकडून तुम्हाला आल्याच असतील, त्या पुन्हा इथे देण्यात आणि तुमचा वेळ घेण्यात अर्थ नाही. खरे तर सोन्याला सोने किंवा हिऱ्याला हिरा म्हणणे म्हणजे वेळ वाया घालविणे आहे. त्यामुळे तुमचा कार्यक्रम आणि तो चांगला झाला या गोष्टी एका सुत्राच्या बरोबर चिन्हाच्या आल्याड पल्याडच्या दोन बाजू आहेत. पण पत्र हे सांगण्यासाठी लिहिलंच नाही.
पत्र लिहिण्यामागे खरं कारण खूप दिवसांनी एखाद्या संगीतकाराने आपली पहिली निर्मिती रंगमंचावर सादर केली. अलिकडे माध्यमांच्या प्रसारामुळे गाणी गाजतात, लोकांच्या ओठावरही येतात पण ती कानावर अनेकवेळा आदळल्याने, गाण्यात फार दम आहे म्हणून नाही. त्यामुळे एकदा का हा पूर ओसरला की मग मागे उरतो तो केवळ कचराच. अशात तुमची गाणी खूप गाजली आणि ओठावर नुसती आलीच नाहीत तर ती रेंगाळलीही आणि मनात घर करुन राहिली. त्याच त्या कार्यक्रमांना खूप प्रसिध्दी आणि पैसा मिळत असतानाही तुम्ही "गाणी मनातली' हा कार्यक्रम घेवून आलात. खरे तर डॉ. सलील कुलकर्णी आणि संदीप खरे हे ब्रॅंडींग इतके मोठे आहे की पुण्यात तुमचा सोलो कार्यक्रम झाला असता तरी लोकांनी तोबा गर्दी केली असती. पण तरीही कोल्हापुरात कार्यक्रम घेण्याचा जुगार तुम्ही खेळलात. पहिल्यांदाज डाव मांडावा आणि तिन्ही एक्‍के हाती लागावे तसा तो जुगार तुम्ही जिंकलातही. रंगमंचाखालून तुमच्या उत्स्फूर्ततेला आणि आत्मविश्‍वासाला सलामही ठोकला गेला. खरे तर तुमच्या समकालीन संगीतकारांत तुम्ही ठसा उमटविला आहे. आमच्या जन्माअगोदरची गाणी गातच आम्ही मोठे झालो... मधल्या काळात खूपच सुमार दर्जाचे संगीत महाराष्ट्राला ऐकायला मिळाले. सौमित्रची गीते आणि मिलींद इंगळे यांचा आवाज घेवून आलेल्या गारव्याने कोरड्या घशात ओलावा निर्माण केला खरा पण तोही कट पेस्ट असाच होता, कारण त्यापुर्वी हिंदीत त्याच संगीताने यश मिळविले होते मग त्याच बोलांवर मराठी शब्द पेरले गेले. सौमित्र यांच्या शब्दांनी मात्र तरीही जादू केलीच. पण संदीप खरे आणि सलील कुलकर्णी या जोडीने मराठी भावगीतांना पुन्हा सोनेरी दिवस आणले. हे सगळं लिहिण्यामाने केवळ तुमची स्तुती करावी हा हेतू नाही, स्तूती करायची असेल तर आता पायलीला पन्नास भाट मिळतात, आणि अशी तुणतुणी मला वाजवता येतच नाही. पण कोल्हापुरात तुम्ही केलेल्या नव्या प्रयोगाबद्दल तुमचे अभिनंदन आणि मला खात्री आहे की तुम्ही यापुढेही आमचा विश्‍वास ढळू देणार नाही.