शनिवार, १८ फेब्रुवारी, २०१२

प्रिय, प्रिय

प्रिय,
पहिले पत्र लिहिताना लगेच दुसरे पत्र लिहिण्याचे वचन दिले तर होते पण ते काही पाळता आले नाही. काही तरी खटोटोप करुन चार ओळी लिहिण्याचा मनोदयही केला होता, पण तेही जमलं नाही. आयुष्य असंच असतं. सगळीच गणितं आपल्या म्हणण्यानुसार सुटत नाहीत, काही फासे नकळत जास्त पडतात, तर कधी कमी पडतात. गुणाकार करायला जाताना ज्यादा आलेल्या अंकाना वजाबाकीत टाकावे लागते तर कधी भागाकारच जमत नाही. एकूण बाकी शुन्य काही येत नाही आणि गणित काही सुटत नाही. मग एका आकड्यांनी गणित सुटलं नाही म्हणून दुसऱ्या आकड्यांशी खेळ मांडायचा. अगदी शेवटपर्यंत डोक्‍याच्या शिरा ताणायच्या... पण तरीही गणित काही सुटत नाही. प्रत्येक माणसासाठी वेगळं गणित असतं हेच खरं आणि ज्याचा-त्यानं त्या गणिताचा फॉर्म्यूला शोधणं गरजेचं असतं. कधी कोणाला हा फॉर्म्युला सापडतो तर कधी कोणाला हा सापडत नाही. पण जोपर्यंत हा फॉर्म्यूला सापडत नाही तोपर्यंतचा प्रवास चालूच ठेवावा लागतो. हा नाही तर तो, तो नाही तर तो असे रोज नवे फॉर्म्यूले शोधत त्यात आकडे मांडून बसावे लागते किंवा मग गणितच सोडून देऊन होईल ते होऊ द्या, ही भूमिका घ्यावी लागते. माझं गणित तसं कच्चच त्यामुळे असे काही फॉर्म्यूले शोधत मी काही बसत नाही. जे आकडे येतात त्यांना मी हाय म्हणतो, आणि सरळ बाजुला निघून जातो. अनेकवेळा मग असे हे सुटलेले आकडे रात्री, अपरात्री डोळ्यासमोर येऊन नाच करतात, फेर धरुन नाचू लागतात. दरदरुन घाम सुटतो आणि डोक्‍यातील पेंशीचा रक्‍तप्रवाह आणखी गरम करतात, त्यावेळीही त्या आकड्यांना पकडून त्यांना त्याच्या जाग्यावर बसवावं आणि एका झटक्‍यात गणित सोडवून टाकावं, असं वाटतं खरं पण गणित चुकण्याचीच भीती मनाचा इतका ताबा घेते की मग नकळत हातातून हे आकडे कसे सुटतात हेच कळत नाही. मग पुन्हा प्रवास सुरु होतो आकड्यांना टाळण्याचा, त्यांच्यापासून तोंड लपविण्याचा.... अरे, पत्र लिहिण्यास वेळ का लागला एवढयाचे कारण एवढं मोठं लिहिणं म्हणजे जास्तच आहे ना ! जाऊ देत... पण खरे सांगू पहिले पत्र लिहिल्यानंतर दुसऱ्या पत्रात काय लिहायचे हेच कळेनासे झाले होते. कालच्या सगळ्या घटना आठवून बघितल्या. काय तुला सांगता येईल याची यादी करुन बघितली, पण तुला सांगण्यासारखं असं काहीच घडलं नाही. गाडी दोन वेळा पंक्‍चर झाली आणि बुटाची लेस सुटल्याने पडता-पडता वाचलो, या दोन घटना तशा तुला सांगण्यासारख्या होत्या, पण त्यातही गंम्मत अशी काही नव्हती. त्यामुळे काय सांगावे हा प्रश्‍न पडला... त्यामुळे पत्र दोन दिवस उशीरा लिहितोय... बाकी तुझं उत्तम चालंलं असेलच.....

तुझाच....