मंगळवार, २६ जुलै, २०११

पैंजण

तिनं कपाटातून जुनं पैंजण काढलं आणि तिच्यासमोर ठेवलं.
हं! घाल हे..
तिची सोळा - सतरा वर्षांची पोरगी पसरली होती.
तिच्या पसरलेल्या पायावर तिनं जोरात चापट मारली...
""हे असं फतकाल मांडून बसायचं न्हाई, असं कितीयेळा सांगिटलंय. कवा अक्‍कल येणार हाय देवास ठावूक. बारकी ऱ्हायली न्हाईस आता. '' तिच्या आईचा तोंडाचा पट्‌टा चालू झाला.
तिनं पाय मागं घेतले, पण तिचं आईकडं लक्षच नव्हतं. गेल्या काही दिवसांपासून ती सारखी चिडचिड करत होती. रोज रोज सूचनांचे डोस पाजायची. त्यामुळं तिला त्यात नवीन काहीच वाटलं नाही. आईकडं दुर्लक्ष करत ती टी.व्ही.चे चॅनेल बदलू लागली.
तिच्या आईचा तोंडाचा पट्‌टा सुरूच होता. तिचं सगळं लक्ष टीव्हीकडेच होतं.
मी काय म्हणते आहे...
आपल्या बोलण्याकडं पोरीचं लक्षच नाही कळल्यावर तिची चिडचिड आणखी वाढली. तिनं सरळ टीव्ही बंद केला आणि तिच्यासमोर टाकलेलं पैंजण तिच्या हातात दिलं.
"घाल हे....'
"अगं हे ल्हान व्हईल. सातवीत असताना घेतलं होतंस.'
"काय होत न्हाई एका दिसानं.. माघारी आल्यावर काढून टाक..
पण आपण जातोय कुठं....
तुला दाखवाय न्यायची हाय!
गेल्या चार-पाच दिवसांपासून आईची धावपळ अशाच काही कामासाठी चाललीय हे तिला कळत होतं. पण तिने स्पष्ट काही सांगितलं नव्हतं. त्यामुळे विचारायचा प्रश्‍न नव्हता. आता मात्र आईनं सरळ दाखवायचीच भाषा केल्याने ती जाम पिसाळलीच. मला काही लगीनबिगीन नाही करायचं, आताशी कुठं कॉलेजात जायाला लागलीय. धाव्हीला चांगलं मार्क मिळाल्यावर तूच म्हणाली व्हतीस की, तू शिक, तू मोठी झाल्याबिगर तुझं लगीन करणार न्हाई म्हणून..
म्हणले व्हते... पण आताचं आयकायचं... निमूटपणे ते पैंजण घाल पायात... बोडक्‍या पायांनी जायाचं न्हाई.
तिला माहीत होतं, आईला आता विरोध केला तर ती मारायला कमी करणार नाही. आज तिचा चुलताही घरात नव्हता. ज्याच्याजवळ तिला तक्रार करता आली असती. आज जाऊन येऊ या. एवढं काय तातडीनं लगीन लावीत न्हाई, असा विचार करून ती उठली. तिनं ते पैंजण घेतलं आणि पायात घालू लागली.
आये, येत न्हाई गं...
अगं फासकी मोठी कर म्हंजे ईल.... तिच्या आईनं पर्याय सुचविला.
तिनं फासकी मोठी केली आणि ते पैंजण ओढून पायात घातलं....तरी काही ते येईना..
तिची आई बघत होती.. तिनं चटकन पुढे होऊन ती फासकी मोठी केली आणि जोरात दाबली. ते पैंजण ओढून ताणून तिच्या पायात बसले, पण त्याचे ते टोक तिच्या पायात रुतलं. ती जोरात ओरडली, पण त्याचा तिच्या आईवर परिणाम झाला नाही. तिनं तशीच कपाटातील तिची नवी कोरी साडी काढली आणि तिच्यासमोर टाकली.
नेस ही.... चल... पावणे धा ची गाडी हाय.... मामा बी तिथंच येणार हाय.
तिच्या पायातल्या पैंजणाची फासकी रुतत होती, पण तिला माहीत होतं, आई माया करायला लागली, की गाय होते, नाही तर कडकलक्ष्मीचा अवतार. झिंज्या पकडून बुकलून काढील. त्यामुळं तिनं साडी उचलली. पायात पैंजण फारच रुतत होतं.
"यंदा अकरावीला हाय', मुलगी काय करते, या मुलाच्या बापाने विचारलेल्या प्रश्‍नावर मामानेच उत्तर दिले.
मग शिकवा की तिला.. लवकर का लगीन करतायसा? मुलाच्या बापाने तिच्याकडे एकदा बघितलं आणि मामाला प्रश्‍न केला.
मामा काही बोलला नाही.
मुलगा तरतरीत होता. तो काही बोलला नाही. पण त्याला ही मुलगी पसंत पडलेली त्याच्या नजरेत दिसत होते.
आमचा मुलगा दहावी नापास हाय, काय? घरची पाच एकर शेती हाय, ती त्योच कसतोय. खायाला ल्यायला कमी न्हाई, पर थेरं इथं चालणार न्हायती. राबायला पाहिजे तवा खायला मिळंल.
तिची आई मुलाच्या बापाच्या प्रत्येक वाक्‍यावर डोके हलवत होती.
मग हातावर पाणी टाकू आजच....
व्हंय पर पोरीला आठरावं बी लागल्यालं न्हाई ! कायद्याचं काय? पोराकडच्या एकाने शंका विचारली.
तेची काळजी तुमी करू नका. शाळेचा मास्तर हाय माझ्या वळखीचा... वरीस दीड वरीस वाढवून दिल.
मग घालायचं का आज हातावर पाणी.. मुलाच्या बापानं आग्रह सोडला नाही.
तिची आई गडबडली.... तिनं मामाला खुणावलं... कोपऱ्यात नेलं....
ही माणसं जरा जास्तच घाई करत्यात .... मामानं तोंडावर बोट ठेवलं...
अगं पोराची आई जाऊन वरीस झाले... हाताची गाठ तोंडाशी पडत न्हाई....पोरीचं कल्याण व्हील...
पर समदं जमायचं कसं.. माझ्या अंगावरच्या ह्या चार टिकल्याशिवाय काई न्हाई....
तू नग काळजी करू, मी हाय.... पण पोरीला इचारायला पाहिजे....
तिनं हाक मारली... ती आली.... काय गं... पोरगा कसा हाय!
आये, शिकलेला न्हाई...
मग काय धोंडा न्हाई, पाच एकर शेती हाय....एकर इकला तरी लाखाची मालकीण व्हशील.
ती काही बोलली न्हाई.... पोरगं दिसायला चांगलंच होतं.. घरदारपण बरं दिसत होतं.. नकार द्यायला तिच्याजवळ दुसरं कारण नव्हतं..
चला तर मग हातावर पाणी टाकू.... मामानं सांगितलं.....
लग्नन झालं... लग्नाच्या फेऱ्यात पोरीच्या पायातील पैंजण लोकांच्या नजरेत आलं.. रुतलेल्या फासकीतून रक्‍त येत होतं.... पण कोणी बोललं नाही..
पोरीचं लग्न करून ती परतली.... पोरीचा चुलता भलताच बिघडला होता...पण बोलला नाही...
तिच्या शेजारीनं विषय काढलाच... का गं एवढी घाई केलीस... शिकली असती पोरगी....तिच्या शेजारच्या चार-पाच बायांनी तोच प्रश्‍न विचारला...
तिला काही सुचेना.... सकाळपासनं तिनं धरलेला बांध सुटला....
मला नगो व्हती व्हंय माजी पोर.... अजून न्हाणपण पण सरलं न्हाई तिचं.... पर काय करणार.... पाच दिस झालं तेला, ह्यो रेडा मला म्हणतोय कसा... पोरगी तुजी ताजीतवानी दिसतीया.... तवापसनं डोळ्याला डोळा लागला न्हाई माजा...
तिच्या आईचा हुंदका सुटला.... पोरीच्या चुलत्याची वाईट नजर व्हती....राक्षसानं मला खाल्ली आता हिला खायचा....
पोरीच्या पायात रुतलेल्या पैंजणापेक्षा तिच्या आईची कळ जरा जास्त मोठी होती.....

शुक्रवार, १५ जुलै, २०११

पाऊस

तो....
काळ्या ढगांचा हिला एवढा नाद का? नादच, नाही तर काय!
ढग जमू लागले की ही तिची उरत नाही. सगळी हातातील कामे बाजूला टाकून ती अंगणात येते, ढगांच्या काळ्या पंखाखाली स्वतःला हरवून बसते. कानठळ्या बसविणारा तो ढगांचा गडगडाट ऐकण्यासाठी जन्माची आतूर झाल्यासारखी वाटते. निसर्गातील प्रत्येक श्‍वासाला घाबरवून सोडणाऱ्या त्या आवाजाने हिला कोणती मोहिनी घातली आहे कोणास ठावूक. पण तिला तो आवाज आवडतो. त्या लखलखणाऱ्या विजांचा तिच्या नितळणाऱ्या सावळ्या चेहऱ्यावरून परावर्तीत होणारा तो प्रकाश जेव्हा माझ्या खिडकीत येतो त्यावेळी तो गोळा करून साठवून ठेवावा वाटतो. किती पावसाळे लोटले पण, पहिल्यांदा तिला पावसात भिजताना बघितले तेव्हाची "ती' आणि आजची "ती' तशीच आहे उत्कट. उत्कटता हाच तर तिच्यातील आणि पावसातील समानतेचा धागा. कधी कधी प्रश्‍न पडतो की, तिचा हा सावळा रंग तिने ढगांकडून घेतला की ढगांनी तिच्याकडून. दोघांकडेही स्वतः रिते होऊन दुसऱ्याला सर्वस्व देण्याचा गुण. पाऊस जणू तिच्यात पुरता भिनला आहे. कधी ती गडगडाटासह येणाऱ्या वादळी पावसासारखी वाटते तर कधी आषाढातल्या मुक्त होऊन कोसळणाऱ्या सरीसारखी, तर कधी श्रावणसरींसारखी हलकेच बरसत राहते. ती अशी बरसत राहते म्हणूनच तर आपल्या रखरखीत आयुष्यात हिरवाई आहे....

ती
"तो' असा का आहे हा प्रश्‍नच आहे. वळवाच्या ढगांसारखा अगदी अनाकलनीय. कधी कोसळेल? कधी नाही काहीच पत्ता लागू देत नाही. पावसाचं याला वावडं म्हणावं तर तासन्‌तास खिडकीत बसून "तो' पाऊस न्याहाळत असतो; पण त्याने कधी ओंजळ गजाबाहेर काढून हात ओले केल्याचं स्मरत नाही. पावसात चालायची वेळच जर आली, तर इतका अंग चोरुन चालतो की रेनकोटवरचा पाऊसही जणू त्याच्या अंगाला छेडतो की काय असे वाटते. भर पावसात हा इतका कोरडा कसा राहू शकतो? कधी कधी ढगांनाच जणू तो जमत असेल तर मला भिजवून दाखवा, असे आव्हान करतो आणि त्यावर हे आव्हान न पेलवल्याने ढग थयथयाट करतात की काय असे वाटून जाते. पण तो आहे तसाच आहे म्हणून तर मी आहे. तो त्या खिडकीत उभा असतो त्यामुळेच तर त्या ढगांच्या आवाजाची भीती नाही वाटत. एकटीला भयग्रस्त करणारे ते ढग, तो सोबतीला असला की
अगदी सुतासारखे सरळ वागायला लागतात. मग त्यांच्या त्या गर्जनेत ढोलांचा नाद ऐकायला मिळतो, विजांचा लखलखाट अंगभर घ्यावा वाटतो, पण त्यासाठी तो खिडकीत उभा असायला हवा. तो समोर असतो त्यामुळेच तर हे ढग आणि वीज आपल्या मर्यादा नाही सोडत...

शनिवार, ९ जुलै, २०११

कपाटातील समृध्द अडगळ

जगातील कोणत्याही ललित साहित्याचा मूळ गाभा वाचकांचे रंजन करणे हाच असतो, किंबहुना तोच असायला हवा. समाजप्रबोधन, नीतीमत्तांची शिकवणी साहित्यांनी घ्यायला हरकत नाही; पण त्यापूर्वी त्यांचा मूळ गाभा रसरशीत असायला हवा. जर एखादी कथा, कविता, नाटक, कादंबरी या गाभ्यापासून दूर गेली तर ती कलाकृती कागदांचे भेंडोळे किंवा चांगल्या वेष्टणातील रद्दी एवढ्यापुरतीच मर्यादित राहते. अशा कलाकृतीकडून वाचकही काही अपेक्षा करत नाहीत आणि प्रकाशक आणि लेखक दोघांनाही त्यातून काही मिळत नाही. बऱ्याचदा जाहिरातबाजी आणि लेखकाचे नाव वापरून प्रकाशक दुय्यम, तिय्यम दर्जाचे पुस्तक वाचकांच्या माथ्यावर मारण्यात यशस्वी होतात. पॉप्युलर प्रकाशनचे रामदास भटकळ याबाबतीत प्रचंड यशस्वी झाल्याचे दिसत आहे. ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, प्राध्यापक श्रीयुत भालचंद्र नेमाडे यांची हिंदू जगण्याची समृद्घ अडगळ कादंबरी प्रसिद्ध करून आणि प्रसिद्धीला आणून रामदास भटकळ यांनी मराठीजनांवर जो काही उपकार केला आहे त्याला तोड नाही. अत्रेंच्या भाषेत सांगायचे झाल्यास गेल्या दहा हजार वर्षांत असे पुस्तक छे.., कादंबरी छे.., प्रबंध छे.., झोपेची गोळी जे काही त्यांनी प्रसिद्ध केले आहे तसे प्रसिद्धीस आणण्याची कुणाच्या बापाच्यात धमक नाही.
अनेक साहित्यिकांची उतरत्या वयात प्रतिभा संपुष्टास गेलेली असते. प्रतिभेचे तळे आटले, की हे जुन्या काळात रमू लागतात; मग प्रतिभेच्या अत्युच्च स्थानी असताना यांच्या हातातून निसटलेली काही पाने त्यावेळी त्यांना दुय्यम दर्जाची वाटलेली, पण आता हातातून काहीच निसटत नसल्याने आधार वाटू लागतात. मग हे साहित्यिक असे कागदाचे कपटे गोळा करून एका पोत्यात बांधतात आणि त्याला काही तरी नाव देतात. अनेकवेळा हा प्रयोग यशस्वीही होतो. त्या कागदांच्या बोळ्यातून काहीतरी हाताला लागते. उरलेला कचरा जरी सोडला तरी काही तरी हाताला लागले म्हणून वाचकही खूश असतो. रा. रा. नेमाडेंनीही असाच सगळा कचरा एका पोत्यात भरला. त्याला गोंडस असे नावही दिले "हिंदू'. हे िंहंदू नाव का, तर त्या पोत्याबाबतीत काही तरी वाद निर्माण होईल आणि पोती हातोहात खपली जातील. "होराभूषण' नेमाडेंचा हा होरा पक्‍का खरा ठरला. पोती भराभर खपली खरे; पण लोकांनी त्याचे तोंड उघडले आणि हातात फक्‍त संदर्भहीन कागदांचे कपटे मिळायला लागले. त्यामुळे लोकांनी एकदा ते तोंड झाकले ते पुन्हा काही उघडले नाही. त्यामुळे 650 रुपयांची ही कादंबरी कपाटातील समृद्ध अडगळ ठरते.
साहित्यिकाची प्रत्येक कलाकृती एकटी असते. लेखकाने यापूर्वी काय लिहिले आणि ते कसे होते यावर त्याने नंतर लिहिलेल्या पुस्तकांना प्राथमिक ग्राहक मिळण्यासाठी फायदा होतो खरा; परंतु त्या प्रत्येक पुस्तकाची स्वतःची ओळख निर्माण झाली तरच साहित्यिक यशस्वी ठरतो, नाही तर लेखक अमुक"कार' तमुक"कार' बनतो. एखाद्या लेखकाच्या दृष्टीने असे "कार' बनणेही खूप मोठे भाग्याचे असल्याने तो त्यावर समाधानी असतो. पण जातिवंत लेखकाला त्याची स्वतःची ओळख एखाद्या पुस्तकावरून व्हावी, असे वाटत नसते. त्यामुळे तो प्रत्येकवेळी प्रतिभेची नवनवी शिखरे चढत राहतो. त्यामुळे त्याची मागची पुस्तके कितीही गाजली असली तरी तो नूतन नवा भेटतो. नेमाडेंच्या बाबतीत अगदी तसेच म्हणायला गेल्यास ते "कोसला'पुरतेच मर्यादित राहतात आणि उद्या त्यांची ओळख सांगायची झाल्यास "कोसला'कार म्हणूनच सांगावी लागेल. प्राध्यापकी पिंड असलेल्या नेमाडेंना हिंदू धर्माबद्दल लिहायचे होते, त्यांना जातीपातीबद्दल लिहायचे होते, त्यांना ब्राह्मणी संस्कृतीबद्दल लिहायचे होते, रुढी-परंपरा यावर लिहायचे होते, त्यांना प्रत्येक गोष्टीवर लिहायचे होते, पण त्यासाठीचा आराखडा सापडत नव्हता. मग ते पस्तीस वर्षे लिहित राहिले, जमेल तसे आणि जमेल तेवढे.. घरात कागदांची नुसती अडगळ निर्माण झाली. आता ही अडगळ कमी करण्यासाठी त्यांनी पोती शोधायला सुरवात केली. या कागदाच्या कपटांना एका धाग्यात गुंतविणे आवश्‍यक होते. सध्या प्रबंध आणि शोधनिबंधांना कोणी कुत्रं खात नाही. विचारवंतांची पुस्तके ग्रंथालयांच्या कपाटात धूळ खात पडली आहेत. अशात या कपटांना विकून चांगला पैसा मिळविण्याच्या दृष्टीने कादंबरीसारखा मार्ग हा सोयीस्कर होता. त्यामुळे त्यांनी कादंबरीचं पोतं निवडलं. ज्या पोत्यात ही सगळी कागदे घातल्यानंतर ते विकलंही गेलं पाहिजे. मग त्या पोत
्याच्या नावावरून वाद निर्माण झाला पाहिजे. मग काय करायचे तर पोत्याला "वादळी' नाव द्यायचे. समाजातील भावनांचे ध्रुवीकरण झाल्याच्या काळात त्यांना "हिंदू' नावाचं पोतं सापडलं. त्यात त्यांनी हा सगळा पसारा कोंबला आणि तो खंडेराव नावाच्या एका काल्पनिक पात्राला पकडून त्याच्यावर वाचकांच्या दारात नेऊन टाकण्याची जबाबदारी सोपविली.
मुळात नेमाडेंना काय म्हणायचे आहे, कशासाठी म्हणायचे आहे आणि का म्हणायचे आहे हे काहीच या कादंबरीतून स्पष्ट होत नाही. त्यांना हिंदू धर्मातील रुढी-परंपरांवर टीकाही करायची आहे आणि त्याबद्दल भूमिकाही घ्यायची नाही. ब्राह्मणांना दुखवायचेही नाही आणि सोडायचेही नाही. केवळ मत्सर आणि आपल्याला खूप काही कळतं एवढं सांगण्यासाठी त्यांनी 603 पाने खर्ची घालण्याचे कारण नव्हते. त्यांनी मोठ्याने ओरडून सांगितलं असतं, की मला खूप काही कळतं आणि मी यांचा यांचा मत्सर करतोय, तर नेमाडेंचे साहित्यिक पुण्य एवढेही लयाला गेलेले नाही. त्यामुळे मराठी माणसांनी मान डोलविली असती. पण महाकाव्य लिहिण्याच्या अट्टहासापोटी त्यांनी केलेला हा कारभार आहे. पुस्तकातील त्रुटींबद्दल लिहायचे तर प्रत्येक पानावर त्रुटीच आहे. "नेमाडपंथी' भाषा म्हणून लोकांच्या डोक्‍यावर काहीही थापायचे हे योग्य नाही. रंजकता तर नाहीच, पण निवेदनाच्या पातळीवरही सगळा सावळा गोंधळ आहे. शेजारी झेंडू बामची डबी ठेवून वाचायला बसले तरी वाचता येत नाही. कादंबरी कुठल्याच पातळीवर चांगली नाही. ज्यांच्या सहनशक्‍तीची परीक्षा घ्यायची आहे अशा लोकांसाठी ही कादंबरी खूप चांगली आहे. त्यांनी ती वाचावी आणि सहनशक्‍ती दाखवावी हे माझे आव्हान आहे.