रविवार, १३ नोव्हेंबर, २०११

डबल बेल...

बाईंनी पुन्हा घड्याळात बघितलं. आपल्या विस्कटलेल्या केसांवरून हात फिरवला, पण केस काही बसले नाहीत... साडी जरा सारकी-वारकी करायचा प्रयत्न केला, आणि बाई बसमध्ये चढल्या. कंडक्‍टरने डबल बेल मारली आणि जोरात घोषणा केली, "इथून पुढच्या प्रवासाला आता आणखी दोन रुपये तिकीटवाढ करण्यात आली आहे.' तिकीट दरवाढ ऐकल्यावर बसमध्ये कुजबूज सुरू झाली... हा अन्याय आहे? मागच्याच थांब्यावर तिकीट दरवाढ करण्यात आली होती. आता परत दरवाढ... अशक्‍य आहे... आम्ही तिकीट दरवाढ खपवून घेणार नाही, कपाळाला भगव्या पट्ट्या बांधलेल्या काही प्रवाशांनी जोरात घोषणा केली. या प्रवाशांबाबत लांब फटकून राहणाऱ्या काही हिरव्या पट्ट्या बांधलेल्या लोकांनीही अशीच घोषणा केली... बाई सगळं बघत होत्या... समजून घेत होत्या... तिकीट दरवाढीला विरोध करणाऱ्यांबाबत त्यांना आता "ममत्व' वाटू लागले तर... आता या सगळ्याच्या आंदोलनात बाईही पडल्या तर... अवघड होईल म्हणून कंडक्‍टर भांबावला होता... त्यानं आशेनं चालक सरदारजींवर नजर खिळविली... पण त्यांनी हूं की चूं केलं नाही... गाडीतील गोंधळ वाढतोय तसा त्यांनी आपली तुरबान आणखी खाली खेचत आवाज कानापर्यंत पोचणार नाही याची काळजी घ्यायला सुरवात केली. बाईंच्या हे ध्यानी आलं. त्यांनी आता या कालव्यात आपलाही आवाज मिसळायला सुरवात केली. तुरबानीतून आवाज पोहोचेपर्यंत आवाजाचा पिच मोठा करत त्यांनी घोषणा दिली... अन्यायी तिकीट दरवाढ मागे घेतलीच पाहिजे... तिकीट वाढ मागे घेतलीच पाहिजे... बसमधल्या साऱ्यांचेच लक्ष आता बाईंवर खिळून राहिले. बाईंनी दिलेल्या स्टेपनीवरच तर गाडी चालू आहे. त्यामुळे बाई म्हणताहेत त्या प्रमाणे तिकीट दरवाढ मागे घेतली जाईल... अशी सगळ्यांना अशा लागली... कपाळावर भगव्या पट्ट्या बांधलेल्या प्रवाशांना घाई झाली... बाईंनी आता स्टेपनी काढून घ्यावी... म्हणजे ही गाडी इथेच थांबेल... सरदारज
ी जातील आणि शेठजी गाडी चालवतील... त्यांनी मनाचे मांडे खायला सुरवात केली... बाईंच्या घोषणेने कंडक्‍टर गोंधळला. आता या वळणावर जर बाईंनी स्टेपनी काढून घ्यायचा निर्णय घेतला तर पुढचा प्रवास करायचा कसा... आणखी कोणाकडे स्टेपनी उपलब्ध होऊ शकते का? झाली तर ती किती काळ टिकेल... कंडक्‍टरच्या डोक्‍याचा भुगा झाला... तो सरळ सरदारजींच्या पाशी गेला... बाई नाराज आहेत... स्टेपनी मागितली तर... काही तरी उपाय केला पाहिजे... बाईंना समजावलं पाहिजे... सरदारजींनी आरशातून बघितलं... बसमध्ये गोंधळ सुरू होता... भगवे, निळे, हिरवे सगळे पट्टे बांधलेले तिकीट दरवाढीचा विरोध करत होते... त्यातून त्यांना बाई दिसल्या... बाई आपल्या कपाळावर आलेले केस मागे घेत जोरात घोषणा देत होत्या.... तिकीट दरवाढ मागे घेतलीच पाहिजे... घेतलीच पाहिजे, घेतलीच पाहिजे. त्यांचे काही सहकारी त्यांच्या घोषणेला साथ देत होते... आता हे सगळे जर ओरडत राहिले तर गोंधळ वाढणार हे बघून सरदारजींनी गाडी धाब्यावर थांबविली... बाईंसाठी लस्सी मागवली... लोकांना वाटू लागलं. बाई चर्चा करताहेत... तिकीट दरवाढ मागे घेतली जाणार... काहींना आनंदाच्या उकळ्या फुटल्या... भगवे पट्टेवाले चर्चा फिसकटण्याची वाट बघू लागले... आता चर्चा फिसकटेल... बाई स्टेपनी काढून घेतील... त्यांचे मनाचे मांडे सुरू झाले... धाब्यावरून गाडी सुटायला लागली... सरदारजींनी स्टार्टर मारला... बाई बसमध्ये चढल्या... आता साऱ्यांचीच उत्सुकता शिगेला पोचली... तिकीट दरवाढ मागे घेतली जाणार का? स्टेपनी काढली जाणार का? काही वेळ बाई बोलल्याच नाहीत... कंडक्‍टरने डबल बेल मारली... लोक कुजबुजायला लागले... बाईंनी घोषणा केली... पुढच्या थांब्यावर आणखी दोन रुपयांनी तिकीट दरवाढ होणार होती, माझ्यामुळे ती थांबली... भगवे पट्टेवाले, हिरवे पट्टेवाले, निळे पट्टेवाले मघाच्या घोषणा देऊन दमून गेले होते... कंडक्‍टरने पुन्हा डबल बेल
मारली... या वेळी सरदारजींनी बसमधले दिवे बंद केले... कोणी काही बोलत नव्हते, घोषणा नव्हत्या... कुजबुज नव्हती... होती ती केवळ झोप...!!

****"सकाळ'मध्ये 13 नोव्हेंबरला छापून आलेला माझाच लेख****