सोमवार, २६ ऑगस्ट, २०१३

यावेळीही गाडी चुकली


खिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते ज्येष्ठ साहित्यीकास निवडण्याचा आणि अध्यक्षपदाचाच सन्मान ठेवण्याची संधी यावेळीही साहित्य महामंडळाने गमावली आहे. एकच चूक वारंवार करण्यात खरे तर महामंडळाइतकी दुसरी संस्था नसावी.
चार-सहा टाळक्‍यांनाच मतदानाचा अधिकार असलेल्या साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत अनेक ज्येष्ठ साहित्यीक उतरण्यास तयार नसतात. त्याचा फायदा घेऊन अगदी "टुकार' लोक निवडून आल्याचा इतिहास आहे. त्याची पुनरावृत्ती यावेळच्याही साहित्य संमेनलनात होणार नाहीच असे नाही. प्रा. फ. मु. शिंदें यांचा अपवाद वगळता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निवडणूक रिंगणात उरलेली तीनही नावे तशी खूपच डावी आहेत. खरे तर त्यांची साहित्यीक वाटचाल तपासून बघितली तरी त्यात त्यांनी "अखिल भारतीय मराठी' साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अर्जच भरला याचेच कौतुक वाटते.
साहित्य संमेलनाचा मेळावा दरवर्षी भरतो. (आठवा, बाळासाहेब ठाकरे यांनी याला बैलमेळा म्हटले होते.... त्यावेळी सगळे साहित्यीक तुटून पडले होते... नंतर त्यांच्यात इतक्‍या लाथाळ्या निर्माण र्झाल्या की बाळासाहेबांनाही वाटलं असेल अरे आपण तर बैल म्हटलं होतं... ही तर लाथा घालणारी गाढवं निघाली...) तर हा साहित्य संमेलनाचा मेळावा दरवर्षी भरत असतो. त्यात येरेगबाळे- पोट्‌टे सोट्‌टे आपले विचार मांडत असतात... वर्तमानपत्रे आणि न्यूज चॅनेलच्यादृष्टीने मजकुराचा भाग होतो आणि हौशी कवी, नवोदित लेखकांना झब्बा कुर्ता घालून आपण मोठे साहित्यिकच आहोत असे मंडपातून फिरताना वाटते... अयोजकांना मलई खायला मिळते शिवाय अत्तराचा फाया लावून इकडे-तिकडे बागडत मिरवायला मिळते... राजकारण्यांना भाषणं ठोकायला व्यासपीठ मिळते. गावातील रिकाम टेकड्यांना वेळ जायला साधन मिळते. साहित्य प्रकारच्या काही प्रमाणातील उथळ चर्चेशिवाय बाकी सगळ्या गोष्टींचा उहापोह मात्र चांगला होतो. बाकी साहित्यविषयक संमेलनात काहीच घडत नाही. त्यामुळे साहित्य संमेनलनांना चर्चेत आणण्यासाठी कधी नथुरामला पत्रिकेवर आणले जाते तर कधी परशुरामाच्या कुऱ्हाडीला, कधी तुकारामांच्या पुस्तकावरुन वाद होतो तर कधी स्वागत अध्यक्ष कोणी राजकारणीच असल्याचे बघुन सुत्रेच द्यायला माजी साहित्य संमेलनाध्यक्ष नकार देतो... एकूण काय साहित्य संमेलन नसून ते आता भंगार संमेलन झाले आहे. यंदा तर हे भंगार संमेलन होण्याची सुरवात अर्ज भरण्यापासूनच झाली आहे. साहित्य संमेलनाचा अर्ज भरणाऱ्यांपैकी तीन जणांना तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनताच काय पण साहित्याशी निगडीत असलेले लोकही ओळखत नाहीत.
त्या बाई.... नाव काय ओ त्यांचं... वर्तमानपत्रात ललीत विभागात काम करणाऱ्या संपादकीय मंडळींनी केलेला हा प्रश्‍न प्रभा गणोरकर यांच्याबाबतीत केलेला असून तो अनेक गोष्टी सांगून जाणारा आहे. (स्त्रीवाद्यांनी लगेच ओरडायला सुरवात करू नये... हा स्त्रीत्वाबद्दल नाही तर त्यांच्या लेखन कारकिर्दीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणारा प्रश्‍न होता..) चार-सहा पुस्तके आपल्या नावावर लागली आणि डोक्‍यावरचे केस थोडे पांढरे झाले, आणि चारसहा कार्यक्रमात यजमानांसोबत फिरले की लगेच हे स्वतःला ज्येष्ठ वगैरे समजतात आणि कुठल्याही निवडणुकीत भाग घेतात... अरुण गोडबोले यांचे लिखाण तर वर्तमानपत्रीयच आहे.. खरे तर ते वर्तमान आणि पत्री असेच आहे.. ते लिहिले त्याच्या दुसऱ्या दिवशीच उडाले होते...आपण मराठी भाषेत असे कोणते साहित्य निर्माण केले की, पुढच्या शंभर वर्षांनंतरही आपण लिहिलेल्या हजारो कचरा पानातील चार ओळी तरी महाराष्ट्राच्या घरा-घरांपर्यंत पोचल्या असतील... एकही नाही...मग कशाला हा अट्टहास? त्या अरुण गोडबोले यांनी एका पुस्तकावर लेखकाच्या नावाखाली आपल्या अनेक डिग्य्रा लावल्यात.(डिग्रीचे अनेक वचन डिग्य्रा होतं का ओ...) त्यात अमुक तमुक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ही पाटीही उपयोगी ठरावी यासाठी अट्टहास दिसतो. त्यांची पर्यटनाची पुस्तके चाळण्याचा मोह एकदा झाला होता; पण तोही त्या गणोरकरबाईंच्या कवितांसारखाच अनाकलनीय असल्याने सोडला... (गणोरकरच ना त्या... )
या दोघांपेक्षा सर्वात मोठा विनोद म्हणजे संजय सोनवणी यांनी साहित्य संमेलनाचा अर्ज भरला आहे... (आम्हाला जातीयवादी रंग येतोय का?) संजय सोनवणीच ना? आम्हाला यांची नावेच माहीत नाहीत. हे कोण तर प्रकाशक. हे प्रकाशकांच्या मेळाव्याचे अध्यक्ष होऊ इच्छित आहेत काय? ... नाही. हे मग विचारवंत... अरेच्चा साहित्यिक आणि विचारवंत वेगळे असतात का? संजय सोनवणी हे फेसबुक आणि ब्लॉगवरच्या लोकांना माहिती आहेत म्हणे...बामणांना शिव्या घातल्या की, चार लोक लाईक करतात.. आठ लोक प्रतिक्रिया देतात आणि दहा लोक तुम्हाला निधर्मी वगैरे म्हणतात. (हे जैनधर्मीयांच्या मेळाव्यात जाणार आणि तिथे आम्हाला अल्पसंख्याक म्हणून फायदे द्या म्हणणार; परत मला जातीयवादाचा रंग येतोय) त्यांच्यासोबत असणाऱ्यांची नावे आणि जात तपासावी का हा विचार आमच्या मनात आला; पण आम्ही तो कटाक्षाने टाळला... तरीही यांनी असं काय लेखन केले की, यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वगैरे करावे...यांची म्हणे 80 पुस्तके आहेत... (एखादी औदुंबरसारखी कविता लिहिली असती तरी पुरे झाले असते.) पुस्तके प्रकाशीत कशी होतात. त्याच्या पहिल्या आवृत्त्या कशा खपविल्या जातात याबाबत एक स्वतंत्र लेख होऊ शकतो. त्यामुळे तो विषय आम्ही घेत नाही.. (यांनी म्हणे, आणखी कसला तरी भंगार व्यवसायही केला होता. आम्ही भंगार व्यवसाय म्हटलंय, भंगाराचा नाही...) त्यामुळे छे.. पटत नाही बुवा..
आता हे लोक त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसणार ज्या खुर्चीत दुर्गा भागवत बसल्या होत्या, ज्या खुर्चीत पु. ल. देशपांडे बसले होते, ज्या खुर्चीत आचार्य अत्रे बसले होते. ज्यांनी साहित्याला वळण लावले. विचार कसा निर्भिड असतो हे सांगितले. तेथून हे लोक मारे गप्पा मारणार मराठी जगली पाहिजे याच्या...
तुमच्या हातात जर मराठी साहित्याचा दोर दिला तर तो तुटणार हे नक्‍कीच...