बुधवार, ९ सप्टेंबर, २०१५

प्रिय

प्रिय
खूप दिवसांनी पत्र लिहितोय. दिवस. कदाचित वर्षही उलटून गेले असेल. असो. मुंबईच्या या धावपळीच्या जगण्यात पाठिवरचे ओझे पोटावर कधी आले हे कळलेच नाही. (इथे मुंबईत पाठिवरची सॅक पोटावर घ्यावी लागते हे तुला माहितच आहे.) अर्थात हे माझे रडगाणे ऐकवायला हे पत्र लिहिले नाही. तसे पत्र लिहायला एकच एक कारणही नाही. अनेक कारणे आहेत... खरे तर कारण असे नाहीच.... काल रात्री बगळयांची माळ फुले अजुनी अंबरात हे गाणं कोठूनसं  कानावर आलं....आणि  सर्रकन आठवणींच्या पक्ष्यांचा थवा आकाशात उडाला.
तुला आठवतं तुझ्या टेस्टीमोनीयलवर मी ‘छेडीती पानात बीन थेंब पावसाचे ’ हे कडवं टाकलं होतं. किती हसली होतीस. म्हणाली होतीस टेस्टीमोनीयलवर काय टाकायचे असते हे तरी कळते का? मी नेहमीप्रमाणे गप्प बसून होतो. गप्प कसला शब्दच सुचायचे नाहीत. या शब्दांइतके दगाबाज कोणी नाही. ऐनवेळी योग्य शब्दाने तुमचा हात धरला, असे होतच नाही. मग अक्षरांची जुळवाजुळव करायची आणि जे जुळेल त्याला शब्द म्हणायची माझी पद्धत. त्यावेळी ही अक्षरांची जुळवाजुळवही करता आली नाही. काल हे गाणं ऐकताना पुन्हा त्या सगळ्यांची आठवण झाली. वा. रा. कातांनी किती हळुवार लिहिलय. ओल्या रानात खुले ऊन अभ्रकाचे, मन कवडा घन घुमतो दूर डोंगरात..... अशी ती ओळ होती. मी एवढेच कडवे टाकले होते. हातांसह सोन्याची सांज गुंफता आली नाही हे खरेच.... पण अशा अनेक सांज आठवणींनी गुंफल्या आहेत... मला कल्पनाच भारी वाटते..... त्या गाठी, त्या गोष्टी नारळीच्या खाली पौर्णिमाच तव नयनी भरदिवसा झाली..प्रत्येक शब्दावर जीव ओवाळून टाकावा वाटते..यातील शेवटचे कडवे तर कळस आहे...
तू गेलिस तोडुनि ती माळ, सर्व धागे
फडफडणे पंखांचे शुभ्र उरे मागे
सलते ती तडफड का कधि तुझ्या उरात? .   प्रेमात न पडलेलाही एखादा या कडव्यासाठी प्रेमात पडेल.... जगण्याचे अवघे रंग एखाद्या सांजेत मिसळावेत असे हे गीत आहे..... बर्‍याच दिवसांनी पत्र लिहितोय. फार काही लिहित नाही.....पुन्हा कधीतरी......
                                            तुझाच