बुधवार, २४ फेब्रुवारी, २०१०

शेकडो समुद्रांचा ओलावा

बास झालं! उठा आता... हा रस्ता पुरा करायचाय... भाकरीचा शेवटचा घास तोंडात जायच्याआधीच मुकादमाची हाक ऐकून ती थोडी वैतागलीच... हातातला घास तसाच तोंडात कोंबत तिने घटाघटा पाणी प्यायलं.... डोक्‍यावर बांधलेला टॉवेल सावरत तिनं मांडीवरल्या लेकराला झाडाला बांधलेल्या झोळीत टाकलं... तिच्या हिसक्‍याच्या उठण्यानं ते जागं झालं आणि त्या झोळीत उठून बसलं...मुकादमाचा तोंडाचा पट्‌टा सुरुच होता... एकेकीचं नाव घेत कामाला लागायच्या तो सुचना देत होता.... हीचं नाव घेऊन तो ओरडलाच... बाई पोराला घरात ठेवा, इथं कामं असतात.... असं काहीबाही तो बडबडत राहिला.... ती उठली...तिच्या बरोबरच्या बाया मुकादमाला शिव्या देतच उठल्या... काळ मागे लागल्यासारखाच मेला पाठिवर बसतो.... त्या पुटपुटल्या.... पण हे काम सुटलं तर लवकर काम हाताला मिळायचं नाही...त्यामुळे त्या त्याच्या मागनं चालू लागल्या. तीही उठली... हातात झाडू घेवून रस्ता साफ करु लागली.... हात हालवा बाई.... सगळी धूळ गेली पाहिजे.... डांबर चिकटत नाही त्याशिवाय... मुकादम अशा सुचना देतच होता. एवढ्यात तिला तिच्या तान्हुल्याच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. पहिल्यांदा तिने त्याकडे दुर्लक्षच केले, पण ते कळवळायला लागल्यावर ती उठली... आईचा स्पर्श झाल्यावर तेही रडायचं थांबलं... तिच्याकडे बघून खुदकन हसलंही.... वादी हाय जन्माचा! म्हणत तिनं त्याला झोळीतून उचललं... पटपटा त्याचे मुके घेतले.... मग त्याला पुन्हा झोळीत ठेवलं... आई लांब गेली तशी ते पुन्हा रडायला लागलं... ती मागे वळली... त्याला कडेवर घेतलं आणि काम चालू आहे तिथं त्याला आणलं... वर सूर्य आग ओतत होता...तापलेला रस्ता उष्ण उच्छ्शास सोडत होता....तिनं डोक्‍याचा टॉवेल सोडला त्या तापलेल्या रस्त्यावरच तो पसरला... तान्हुल्या गालाचा पापा घेत त्याला त्यावर ठेवलं....आणि पुन्हा हातात झाडणी घेतली.... तापलेल्या उन्हात ते तान्हुलं तिथंच खेळतं राहिलं...
. त्याला आईच्या डोळ्यांतील शेकडो समुद्र ओलावा देत होते....

मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०१०

पंड्या

पुर्वी गावाकडे आमच्या घरी अनेक माणसं यायची.... गोंधळी, रामदासी अशी बरीच माणसं त्यात असायची... आजीने तर अनेक विधवा, परितक्‍त्या बायांना आमच्या वाड्याच्या समोरच्या खोलीत राहायची मुभा दिली होती. घरातील नीटवाट, पाणी भरण्याची कामं या बाया करायच्या आणि मग आजीच त्यांना लागेल तो शिधा द्यायची.... खूप वर्षे हे असंच चालू होतं. यामध्येच एक यायचा म्हणजे काशिचा पंड्या. साठी पार केलेला... डोक्‍याचा गोटा, कळकट मळकट धोतर आणि तशीच कळकट पिशवी खांद्याला अडकवलेला पंड्या दरवर्षी हिवाळ्यात आमच्या घरी यायचा. हा काशिहून यायचा म्हणे ...आणि तेथील गंगाजल आणि काळा दोरा आम्हाला द्यायचा. खरे तर तो काशिचा पंडित पण का कोणास ठावूक आमच्या घरातील सगळ्या बाया-बापड्या त्याला पंड्याच म्हणायच्या. विशेष म्हणजे तो आला हे कळल्यावर आमच्या आत्याही खास त्याच्याकडून काशिचा गंडा बांधायला माहेरला यायच्या. तो महाराष्ट्रातील बऱ्याच देशस्थांच्या घरी जायचा, आमच्या अनेक पाहुण्यांकडे तो कधी ना कधी गेलेला असायचाच... कुणाकडे उन्हाळ्यात... कुणाकडे पावसाळ्यात...सगळीकडे तो त्याच्या त्या कळकट मळकट पिशवीतून काळ्यामीट्‌ट बाटलीतील गंगाजल पाजायचा. माझे वडील नेहमी म्हणायचे हा कुठला जातोय काशिला, इथेच पंचगंगेचं पाणी बाटतील भरत असेल आणि आंबाबाईच्या देवळातील दोरे वाटत असेल.... पण असं असलं तरी तेही त्याच्याकडून भक्‍तीभावानं पाणी घ्यायचे आचमन करुन डोक्‍याला हात पुसायचे....आणि वर्षभर तो काळा गंडा हातात जपायचे... असा हा पंड्या कमरेत वाकलेला, अनुनासिक हिंदी बोलणारा, कर्मठ दरवर्षी हिवाळ्यात आमच्या घरी मुक्‍कामला यायचा. एकदा आला की किमान पंधरा दिवस त्याचा मुक्‍काम हालयाचा नाही.
खरे तर पंड्याचा आम्हाला फार राग यायचं कारण काहीच नव्हतं....पण त्याच्याकडून काळा गंडा बांधून घेणं म्हणजे एक दिव्यच असायचं. काळा दोरा बांधला की
त्याला नमस्कार करायला लागायचा....नमस्कार केला की तो दोन्ही हातांनी जोराचा धपाटा पाठीवर मारायचा.. त्याने पाठित सणकच भरायची... त्यामुळे पंड्याचा आम्हाला प्रचंड राग यायचा......तर त्याला बायकांची शिवाशिव चालयची नाही याचा घरातील बायकांना त्रास. शीव... शीव...शीव असा कायमचा जप त्याच्या तोंडात असायचा...त्याच्यासाठी सडलेले तांदूळ, स्टोव्ह, तांब्याच्या घागरीत पाणी याची तजवीज करायला लागायची...तो स्वयंपाक करत असला की त्याच्याशेजारी कोणी गेल्याचे त्याला आवडायचे नाही. खासकरुन बायकांनी. त्याने म्हणे स्वतःच केलेल्या स्वयंपाकाशिवाय दुसरा घास तोंडात टाकला नव्हता.. कधी मधी आई स्वयंपाक घरात गेलीच तर
लगेच म्हणायचा
दूर... दूर...दूर.. भाभींजी आप थोडा अलग रहें.... आईला याचा प्रचंड राग यायचा
मेल्याने माझ्याच घरातील स्वयंपाकघरावर आपला हक्‍क सांगितलाय.. आई पुटपुटायची.... तो पंड्या लगेच माझ्या आजीकडे आईची तक्रार करायचा. मग आजी म्हणायची, ""त्याला नका रे त्रास देवू काशिचा ब्राह्मण आहे.... ब्रह्मचारी आहे.... शाप देईल...... दरवर्षी तो यायचा नंतर नंतर तो थकत चालला होता..... पण पीळ मात्र तसाच... शीव..शीव..शीव..चा जप कायम....आता तर आजीही नव्हती जिच्याकडे तक्रार करायला.... एकदा आई अशीच चिडली... म्हणाली, दक्षिणा घ्या आणि चालते व्हा... तुमची नाटकं इथं कोणी सहन करणार नाही... मग तो आमच्या शेजाऱ्यांच्या घरी गेला.... तिथून पुढे कुठे गेला ते कळलेच नाही.... नंतर बरेच वर्षे पंड्या आला नाही... आम्हालाही त्याची आठवण आली नाही.... नंतर एकदा माझ्या मावशीनं सांगितलं.... तो तिच्या गावात राहायचा एकटाच... नंतर नंतर त्याला स्वयंपाक करायला जमायचं नाही... पण त्याने हेका सोडला नाही.... मग एकदिवस त्याने स्वतःला रेल्वेखाली झोकून दिलं..... पोलिस रिपोर्टमध्ये आलं 80 वर्षांचा माणूस... आत्महत्या.... सोबत पिशवी, त्यात एक पाण्याची बाटली आणि काही काळे दोरे....

शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०१०

बंद दरवाजा

कोण आहे?... दारावची थाप ऐकून नाराजीनेच तो ओरडला... पापण्या उघडण्याचा त्याने प्रयत्न केला पण जाडावलेल्या पापण्या उघडण्यास तयार नव्हत्या... हळू हळू दारावरचा थापांचा वेग वाढला... आता तर त्याला राग आला... अंगावरचे पांघरुण बाजुला सारुन त्याने दार उघडले.... समोर एक अनोळखी माणूस बघून त्याचा पारा पार चढला...
कोण तुम्ही? काय काम आहे?.
मी... मी... तो अडखळला...
काय मी... मी... आहो पहाटेचे चार वाजताहेत आणि तुम्ही कुणाच्याही दारावर थापा काय मारताय.?.. त्याने शक्‍य तितका राग दाबण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या बोलण्यातून तो जाणवलाच...
नाही... मी... थोडावेळ आत येवू का?...
त्याच्या विस्कटलेल्या केसांवरुन आणि अंगावरच्या कपड्यावरुन तो कोणी भूकेला भिकारीच वाटत होता... त्याला आत घेतले तर तो पुन्हा जेवण मागणार....नकोच ती कटकट
आतबित काय नको..त्या बाहेरच्या माणसाने काही तरी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्याने ऐकले नाही.... ओ... चालते व्हा बघू येथून... च्यायला रात्रभर काम करायचं... आणि ह्या कटकटी...
त्याने दरवाजा बंद करुन घेतला... बंद कसला त्याने तो जोरात आदळलाच...
मग त्याने बेडवर स्वतःला सैल सोडलं... जडावलेल्या पापण्या पुन्हा बंद झाल्या...
थोड्या वेळाने पुन्हा दारावची थाप ऐकू आली... त्याने कुस बदलली... पण दार उघडले नाही... ती थाप थोडी जोरात झाली... मग थांबली...
दुपारी आकरा बारा वाजता कधीतरी तो उठला...दरवाजाच्या कडीला लावलेला पेपर हाती घेतला आणि मग एक, एक पान उलटत ... एक अन्‌ एक बातमी वाचून काढली... रात्रभर उपसंपादकगिरी केलेल्या कामांतील काही चुका आता त्याला ठळक जाणवू लागल्या...काही शब्दांचा त्यालाच राग आला.... हा इथे नको होता वापरायला.... ही ची जागा चुकलीय.... या बातमीत च लावायचाच राहिलाच की.... असं तो मनाशी काहीतरी पुटपुटला... त्याने पेपर मिटला... मग त्याला पहाटेच्याच्या प्रसंगाची आठवण झाली... कुणाला तरी सांगायचे म्हणून त्याने फोन लावला...
पण फोन बराचवेळ वाजला तरी उचलला नाही... त्याने दोनदा प्रयत्न केला पण काहीच उत्तर नाही... त्याने मग दुसरा फोन लावला....
काय बातम्या कशा लागल्या... चांगल्या... तिकडून फारसा उत्साह नव्हताच....
का रे आवाज असा का?
गोट्या गेला...
तो किंचाळला... कसा?
काल त्याला हार्ट अटॅक आला होता...दवाखान्यात पोहचलाच नाही....
अरे पण...
अरे पहाटेच त्याला हार्ट अटॅक आला...त्याच्या वडिलांना काहीच कळलं नाही....ते इथे नवीन आलेत ना... त्यांना इथले काहीच माहिती नाही... त्यामुळे ते तिथूनच जवळ असलेल्या कुठल्या तरी गोट्याच्या मित्राच्या घरी
गेले होते, काही गाडीची व्यवस्था होते का बघायला.... पण त्याने यांना बघून दारच बंद करुन घेतले......तो नंतर बरच काही सांगत होता.... पण त्याच्या हातातून मोबाईल केव्हाच पडून गेला होता...
आता त्याला भोवळ आली...... समोरच आरसा होता... त्यात त्याने पाहिले.... त्याला उगाचच आपले पुढचे दोन दात सुळ्यांसारखे भासले.... त्यावर रक्‍तही होतं....

शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१०

मौनाची भाषांतरे व्हावीत

तिच्या पैंजणाची रुणझुण ऐकली की तो तिथेच थबकायचा. मग त्याच्या समोरचे सगळे रंग बदलून जायचे. भरदुपारीही मग त्याला पश्‍चिमेची गुलाबी प्रभा दिसायची. तो तसाच होता. अगदी वेडा. ती समोर आली की मग मात्र तो मुग्ध व्हायचा. तिच्या प्रत्येक हालचाली तो डोळे भरून पाहायचा. मग घसा खाकरून बोलण्याचा प्रयत्न करायचा; पण ओठ साथ द्यायचे नाहीत, जीभ वळायची नाही. बोलायचं असायचं एक आणि तो भलतंच बोलून जायचा. तिला हे जाणवायचं; पण तिही काही बोलायची नाही. फक्‍त हसत राहायची, गालावर आलेले केस मागे घेत राहायची. मग त्याची अवस्था बघून आपणच काहीतरी सांगत राहायची. खूप बोलल्यावर मग ती जाते म्हणायची, तो थांबवायचा तिला. ""जाऊ नको,'' म्हणायचा... थोडा वेळ परत ती थांबायची. मग जायला निघायची. मग त्याच्या हृदयाची धडधड आणखी वाढायची; पण तिला अडवायचं बळ त्याच्या हातात यायचं नाही. ती निघून गेली की, मग याला सगळे विषय सुचायचे... काय बोलायचे होते, ते सगळे आठवायचे. मघाशी बोलताना आपण खूपच मूर्खपणा केला, हेही त्याला जाणवायचे. मग तो स्वतःच्याच डोक्‍यावर एक टपली मारायचा. जोरात शीळ फुंकायचा आणि पुन्हा ती कधी भेटेल याची वाट बघत राहायचा. पुन्हा ती भेटली की याचं असंच व्हायचं. ती त्याला नेहमी म्हणायची, ""तू असा कसा?'' मग तो गप्प बसायचा. काही प्रश्‍नांची उत्तरे नाही देता येत, असं काहीबाही समजावयाचा. मग तीही ताणायची नाही. त्याला त्याच्या स्थितीत सोडून द्यायची. कस्तुरीमृगाच्या बेंबीसारखं त्यांचं प्रेम दरवळत राहायचं आणि ते दोघेही त्याच्याच शोधात हिंडत राहायचे. माझं तुझ्यावर प्रेम आहे, असं तिला सांगायलाच पाहिजे का? तिला ते समजत नसेल का, असं त्याला वाटायचं. तर त्याचं माझ्यावर प्रेम आहे, तर तो मग सांगत का नाही, असं तिला वाटायचं आणि मग दोघेही मौन बाळगून राहायचे. उद्याच्या व्हॅलेंटाईन डेनिमित्त त्यांच्या मौनांची भाषांतरे व्हावीत.