रविवार, १७ मार्च, २०१३

पतंग


प्रति,
जन्म आणि मृत्यू आपल्या हातात असत नाही. आपण कोणाच्या पोटी जन्माला यायचं, आपलं लिंग काय असावं, आपला रंग काय असावा, कोणत्या जातीत, कोणत्या धर्मात जन्माला यायचं याबाबत आपल्या हातात काहीही असत नाही. असतं ते पुढे आलेले आयुष्य जगणं, ते जास्तीत जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न करणं. पण तेही आपल्या हातात कुठे असतं?. तुम्ही कोण व्हायचं हे तुम्ही ठरवू शकलात तरी तुम्ही ते व्हालच असे नाही. झालाच तर तुम्हाला हवा असलेला आनंद त्यात मिळेलच असे नाही. तुमच्या अवती-भवती कुठली माणसे असावीत, कुठली नसावीत काहीच ठरवता येत नाही. प्रवासाचा रस्ता आपण निवडलेला असला तरी त्या प्रवासातील सांगाती आपल्याला निवडता येत नाहीत. ते बरे असतील तर तो प्रवास सुखाचा होतो नाही तर मग मुक्‍कामाचे ठिकाण येईपर्यंतची धडपड. आपण हे मिळविले ते मिळविले म्हणतो खरे....
पण ते खरेच आपण मिळवलेले असते की आपले विधीलीखित आपल्याला तिथपर्यंत पोचवते? आपली इच्छा असो वा नसो? तो प्रवास करावा लागतो. आपल्याला वाटते आपण मुक्‍त आहोत, पण खरेच आपण मुक्‍त असतो की आपल्या दोऱ्या दुसऱ्याच कोणाच्या हातात असतात? अगदी पतंगासारख्या. विधिलीखिताच्या दोराशी घट्‌ट बांधलेले आणि वाऱ्याच्या हिंदोळ्यावर भरकटणारे. त्यात त्याची मर्जी कुठे असते? वाऱ्याची दिशा, त्याचा वेग आणि विधिलिखीत दोराच्या हिसक्‍याप्रमाणे प्रवास सुरू होतो. कधी उंच जातो तर कधी खाली कोसळतो. पुन्हा उडण्याचे त्राण आणि बळ पंखात असेल तर पुन्हा उडतोही. पण सगळ्याच पतंगाच्या नशिबी आकाशात घिरट्या घालत राहाणे कुठे असते? कधी कधी विधीलिखिताच्या लेखणीचा झटका एवढा मोठा असतो की वाऱ्याचा हिंदोळ्यावर डोलणाऱ्या पतंगावर ते वारंच स्वार होतं. मग फाटून कोसळणं एवढाच कार्यभार राहातो. एखाद्या इमारतीच्या कोपऱ्यात, झाडाच्या फांदीत अडकून पडणे हेच नशिबी येतं. आकाशात भरारी मारून थकून जमिनीवर कोसळलेल्या पतंगाला मुक्‍ती मिळत असेल, पण वाऱ्याच्या झटक्‍याने वा दोर तुटून झाडांच्या फांद्यांवर अडकून पडलेल्या पतंगाला मुक्‍ती कुठे.. तो तर वेदनेचा सांगाती. ती वेदना केवळ फाटल्याची असत नाही... फाटलेपणाची आणि दुखावल्याची वेदना तर असतेच ती नसते असे नाही पण त्याहीपेक्षा मोठी वेदना असते ती दुर्लक्षित झाल्याची, निरुपयोगी झाल्याची... त्या अवस्थेतून त्याला कोणीच बाहेर काढू शकत नाही. अगदी कोणी काढलंच तर तो आपली उंच भरारी घ्यायची ताकदच गमावून बसलेला असतो. कायमचे हे अपंगत्व केवळ शारीरिक कुठे असते ती तर मनोवस्था असते. सर्वांच्या नजरेतून उमटणारा केविलवाणा भाव आणि खोटे दुःख असह्य होते. नजरेतील केविलवाणा भाव बदलत जात पुन्हा दुर्लक्षित परावर्तित होणारा भाव टोचण्या देत राहातो... ? पराभवाचं दुःख खूप मोठं असतं. पण त्याहीपेक्षा जास्त दुःख पराभवानंतर आलेल्या दुर्लक्षपणाचं. लोकांच्या डोळ्यातून पाझरणाऱ्या अविश्‍वासाची वेदना खूप भयानक असते. प्रत्येक नजर सांगत असते की अरे तू पराजित आहेस तुला बोलायचा हक्‍क नाही. तुला नजर वर करायचा अधिकार नाही. मेलेल्या गोमेला ज्या प्रमाणे पुन्हा पुन्हा ठेचले जाते अगदी तसेच या नजरा प्रत्येकवेळा ठेचत राहातात. तुमच्यातील उभे राहाण्याचे बळ शोषित राहातात.....मग तो पराभव कसला का असेना. नैतिक-अनैतिक. प्रत्येकवेळी अनैतिक असते ते तितके अनैतिक असतेच का? की त्याचीही काही रूपं असतात? गुन्हा आणि अनैतिक हे एकाच बाजूला कसे असू शकते? काहीच कळत नाही...
याक्षणी असंख्य विचार डोक्‍यात घिरट्या घालत आहेत. मरणासाठी कारणांची जंत्री तयार करत आहेत. प्रत्येक कारण वेगळे. पण तरीही ते गरजेचे. त्या-त्या वेळेला मरणाला ते कारण उपयोगीही. पण त्या कारणांनी काही मरण यावे वाटले नाही. अगदीच विचार आला नसेल असे नाही, पण यापासून लांब जावे, खूप लांब जावे एवढे वाटले असणार, पण सगळं संपून देऊन जगणंच नाकारावे असे काही वाटले नाही. अपमान, पराजय आणि अवहेलना या गोष्टी नित्याच्याच होत्या. त्यामुळे काही काळाने तो जगण्याचा भाग बनला होता. तरीही प्रश्‍न पडतो माणसं आत्महत्या का करतात? केवळ जगण्याचा कंटाळा आला म्हणून? की जगण्याचा वीट आला म्हणून? जगण्याचे प्रयोजन राहिले नाही म्हणून की मरणातून पुन्हा जन्माला येऊन नवा डाव मांडावा म्हणून? असाध्य रोगाला कंटाळून आत्महत्या करणारे जसे आहेत तसे डॉक्‍टरांकडे काही दिवस मला जगायचे आहे म्हणून रडणारेही असतातच की. दोघांचे रोग सारखेच पण तरीही एकाला जीवनेच्छा तर दुसऱ्याला मरण जवळ करावे वाटते. काय फरक दोघांच्या वेदनांतील? नवरा चांगला मिळाला नाही म्हणून आत्महत्या करणाऱ्या स्त्रिया आहेत तशाच मिळालेली फिक्‍की पाने मांडून डाव रंगविणाऱ्या स्त्रियाही असतात. मग यांत फरक काय? जगण्याचा स्वतःचा अधिकारच का लोक नाकारतात...? यांसारख्या अनेक प्रश्‍नांनी आता माझ्या मनात गर्दी केली आहे. कुठल्याच प्रश्‍नाचे ठोस उत्तर मिळत नाही. ते उत्तर मिळाले असते तर लोकांनी जगण्याची ही कारणे आणि मरण्याची ही कारणे अशी सरळ भेदाभेद केली नसती का? मरण्याच्या कारणांपासून दूर नेणारी अनेक औषधे आणि सल्लाकेंद्रे बाजारात उपलब्ध आहेत पण तरीही लोक त्याकडे न जाता सरळ मरण का पत्करतात? गुंता.... गुंता.... गुंता...
अगदी काही वेळाने समोर ठेवलेला दोर माझ्या गळ्याभोवती आवळला जाईल. श्‍वांसांचे येणे-जाणे बळजबरीने बंद होईल. पायांची हातांची एक धडफड होईल आणि पुन्हा सगळं शरीर शांत होईल..... काही काळ तसाच जाईल... मग दारात पडलेल्या दुधाच्या पिशव्या आणि पेपर... खोलीतून येणारा कुजका वास यांमुळे शेजाऱ्या-पाजाऱ्यांना संशय येईल.... दार उघडलं जाईल... लटकेल्या देहाकडे बघून लोक लोक आत्महत्या म्हणतील. पण खरेच ही आत्महत्या आहे का? आत्महत्या म्हणजे काय? हत्या या शब्दात कुणाचे तरी नुकसान आहे. पण मी जे काही करायला निघालो आहे त्या कोणाचे नुकसान आहे का? छे! असा कोणीच समोर दिसत नाही ज्याचं माझ्याविना आडून राहील. आई-वडील चारऐवजी आठदिवस रडतील, छे! रडतील की नाही हेही माहित नाही. कदाचित रडणारही नाहीत. गेल्या 20 वर्षात त्यांनी कधी कदर केली नाही आता का रडतील. ओळखणारही नाहीत कदाचित. त्यांच्या जगण्याचा मी काही अविभाज्य घटक वैगेरे कधीच नव्हतो. भाऊ-बहिणींना मी जिवंत आहे किंवा नाही हेही माहित नाही. कदाचित दरवर्षी त्यांच्या मेळाव्यात माझी आठवण निघत असेलही, यावेळच्या मेळाव्यात काहींचे डोळे ओलही होतील... अगदी लहाणपणीच्या एकदोन आठवणी काढून... पण त्यापेक्षा फार काही नाही होणार... त्यांना काही तरी आपलं हरवलंय असे वाटणार नाही. नुकसान तर नाहीच नाही... यापेक्षा काय? मी आता आत्महत्या केली किंवा माझा अपघात होऊन मृत्यू झाला किंवा मी आणखी चाळीस वर्षे जगलो तरी जे हयात असतील त्यांना माझ्याबद्दल यापेक्षा काही वेगळे वाटणार नाही. अगदीच स्पष्ट सांगायचे झाल्यास मी मेल्याचे कोणाला काहीच वाईट वाटणार नाही. मी आणखी काही काळ जगलो तरी त्या जगण्याचेही कोणाला काहीच वाटणार नाही. मग का जगायचे? केवळ श्‍वास चालू आहेत म्हणून ? जगण्याला काही तरी प्रयोजन नको का? कोणतीही गोष्ट शाश्‍वत असत नाही. अगदी आज ज्या गोष्टी चिरंतन वाटतात त्याही चिरंतन नाहीत, त्यांचाही प्रवास लयाकडेच सुरू आहे. वेग कमी असेल पण लय सुरूच आहे. मग आपण का जगायचे. लयापर्यंत पोचेपर्यंत श्‍वास घ्यायचा.... पण का? आणि त्यातून मिळवायचे काय? काहीच नाही. राहणार काय? काहीच नाही...... आताही हे सगळे शब्दांचे बुडबुडे.. यांतून काही मिळणार नाही.

लावलेला दोर, त्याची लांबी. त्याचा पीळ पोलिस तपासतील. पडलेल्या स्टुलाचे फोटो काढले जातील. खिशातील या चिठ्‌ठीचा संबंध लावण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रेमभंग की आर्थिक अडचण? व्यवसायात खोट की आणखी काही कारण? काही चुका? काही काही श्‍लेष काढले जातील. त्यातून नसलेल्या जवळच्या माणसांना आणखी त्रास दिला जाईल. जिवंत होता त्यावेळी त्रास आणि आता मेला तरी त्रास म्हणून ते या घटनेकडे बघतील. मग कारण काय द्यावे. द्यायचे म्हणून द्यावे की खरोखरचे द्यावे. जीवनेच्छा संपली हे कारण ठीक आहे. पण ही जीवनेच्छा का संपली याचा मग पोलिस शोध घेत राहातील. कदाचित त्यासाठी कोणाला तरी कारणीभूत ठरवून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतील. उभे-आडवे प्रश्‍न विचारून त्याला सोडून देतील. पण त्याला त्रास व्हायचा तो होणारच. तो रोखायचा कसा.? आजाराला कंटाळून म्हटलं तर मग डॉक्‍टरांच्या काही चिठ्ठ्या तरी सापडायला हव्यात. पण त्याही सापडणार नाहीत. मग काय? प्रेमभंग छे! वयाच्या साठाव्या वर्षी प्रेमभंगाचे कारण चालेल? मग म्हातारा चाळवला होता हा श्‍लेष काढला जाईल. आता हेच बघा मी मेल्यानंतर माझ्या मृत शरीराकडे बघून लोकांना काय वाटेल याचीही भीती वाटते.. मेल्यानंतर मला चाळवलेला म्हातारा किंवा आणखी काही म्हटले तर काय फरक पडणार... पण ती भीती आहेच... पण केवळ आपल्याला म्हातारा चाळवला होता म्हणण्याचा राग नाही, त्याचे कारण ते आत्महत्येमागे कारण नाही... जे खरे कारण आहे ते द्यायला काय हरकत आहे.. लोक विश्‍वास ठेवो अथवा न ठेवो..

आता माझी जी अवस्था आहे त्याला प्रेमभंग म्हणता येईल? छे! ! प्रेमलय म्हणता येईल किंवा आठवणींचा लय. काहीच कळेनासे झाले आहे. वयाच्या 27 वर्षी प्रेमात पडल्यानंतर आणि एकोणतीशीत नकार मिळाल्यानंतर वयाच्या साठाव्या वर्षी आत्महत्या..... हे कारण कसे लागू होईल. पण हेच खरे आहे. 27 ते 29 या दोन वर्षांत मिळालेल्या सहवासाच्या आठवणींवर पुढची तीस वर्षे निभावली. ती आठवणींची पुंजी तीस वर्षे पुरवून खाल्ली. आता सगळं संपलं. त्या पुरचुंडीचा चोळा-मोळा झाला आहे. आता पुन्हा पुन्हा त्या पुरचुंडीकडे वळून बघून तो आनंद मिळेनासा झाला आहे. नव्या आठवणींसाठीचे दरवाजे केव्हाच बंद करून ठेवले होते. आता त्या दरवाजांना पुन्हा उघडणे शक्‍यच नाही. त्याच्या बिजागरी केव्हाच गंजून गेल्या आहेत. त्यावर लाथ मारावी तशा काळाच्या आघाताने कमकुवत झालेल्या भिंतीच कोसळताहेत. त्या एकेक कोसळलेल्या भिंती आता सहन करण्याच्या पलीकडे गेल्या आहे. त्यामुळे सगळंच उद्‌ध्वस्त करावं असं वाटतंय. गेल्या तीस वर्षांचे संचीत त्या दोन वर्षांत दडलेलं होतं. एखादं माणुस तुमच्या आयुष्यात किती काळ असावं हे तुमच्या हातात असत नाही. पण जेवढा वेळ तुमच्यासोबत असणार आहे त्या वेळेच्या आठवणी तुम्हाला कितीकाळ पुरतात त्यावर बरेच अवलंबून आहे. प्रत्यक्षात जगातली कुठलीच भाषा "प्रेम' ही संकल्पना पूर्णपणे मांडू नाही शकत. काळजी म्हणजे प्रेम? सेक्‍स म्हणजे प्रेम? आदर म्हणजे प्रेम? छे! ! अशा कुठल्याच चौकटीत प्रेमाला बसवता येत नाही. अगदी स्पर्श न करता गेली तीस वर्षे मी जगलोच आहे. अगदी तिने टाकलेला तो एक कटाक्ष आता-आतापर्यंत अंतःकरण ढवळून टाकायचा. त्या कटाक्षाच्या आठवणींच्या नशेसाठी हे शरीर असावं असे वाटायचे. त्यासाठीच तर हे शरीर जपलं. पण अलीकडे ती नशा काही उरली नाही. नशेला शरीराची गरज असते. शरीराशिवाय नशा येत नाही. त्यामुळे शरीर आवश्‍यक असते. आता मात्र आठवणींची पुरचुंडी कितीही हुंगली तरी ती नशा आता चढायची बंद झाली आहे. व्यसनी माणसाला जसे पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीकडे वळावे वाटते तसे मात्र होते आहे. मेंदूतील प्रत्येक कण आणि कण पुन्हा पुन्हा बंड करतो आहे. आता गेल्या तीस वर्षात कॅन्व्हासवरील चित्रांवर पुन्हा पुन्हा गिरवून त्याचे रंग एकमेकांत इतके गुंतले आहेत की मूळचे चित्रही आठवेनासे झाले आहे. असह्य.. असह्य आणि असह्य ही एकच भावना आता वारंवार उचंबळून येत आहे. जगण्याचे प्रयोजन हलकेच कोणीतरी काढून घेतल्याची भावना दृढ होत आहे. आता काय करायचे हेच कळत नाही. शरीराचे हे चोचले पुरविणे शक्‍य नाही. बाजारात तुम्हाला सेक्‍स मिळतो अगदी हवा तितका मिळतो पण "मन' मिळत नाही. ते मिळविताही येत नाही. ते विधीलिखितानं तुमच्या भाळी लिहिलं असावं लागतं. कोणाच्या मनात स्थान मिळवायचे हे तुम्ही ठरवू शकत नाही. दया, करुणा या भावना तुम्ही जाग्या करालही पण प्रेम छे!! प्रेम नाही उत्पन्न करू शकत. सहवासाने माया निर्माण होते, त्याची सवय लागते पण प्रेम नक्‍कीच नाही. सहवास संपला की सवयीने माणुस अस्ताव्यस्त होतो... पण तो काही काळापुरताच ... पण पुन्हा तो पुर्वपदावर येतो, एका सवयीपासून दुसऱ्या सवयीकडे तो वळतो. प्रेमाचं तसं असत नाही. गेल्या तीस वर्षांचे संचीत संपले आहे. आता जगण्याला प्रयोजन राहिले नाही. म्हणून हा दोर गळ्यात. आता गळा आवळला की डोळ्यासमोर अंधार येईल. गिजबटेल्या कॅन्व्हासवरचे चित्रही काळे बनून जाईल. जाणिवांच्या काळ्या रंगात हा काळा रंग मिसळून जाईल. मग कोणतेच रंग राहणार नाहीत. अंधार... ती कोण याचा शोध मात्र होऊ नये एवढीच अपेक्षा....

सर ! पीएमचा रिपोर्ट गळा आवळल्यानेच मृत्यू असा आलाय. पण बॉडी न्यायला कोणी आलेलं नाही. काय करायचं?
हवलदाराच्या प्रश्‍नासरशी, त्या इन्स्पेक्‍टरची तंद्री तुटली. त्याने हातातले ते पत्र टेबलावर ठेवले. डोळ्यांच्या कडा पुसल्या...आणि आवाजात जितकी जरब आणता येईल तितकी आणली....
काय?
सर ! बॉडी न्यायला कोणी आलं नाही. काय करायचं? आपण लावायची का विल्हेवाट.!
नाही..थांब....
त्याची फाईल बघू.... फोटो बघू!
हवालदाराने तातडीने त्याचा फोटो काढून दिला...
सर ! काय करू विल्हेवाट लावू...
नाही... ?
काय करायचे.. हवालदाराने पुन्हा प्रश्‍न केला?
रिपोर्ट फाईल काढ, त्यात लिही.
बॉडी ताब्यात घेणारा ः सुहास रामचंद्र फडके.
वय 28
ृताशी नाते ः मुलगा....
................................................................
चार वर्षापूर्वी त्याला नोकरी लागल्यानंतर त्याच्या आईने अशीच आत्महत्या केली होती. तिनेही चिठ्‌ठी लिहिली होती, पतंगाचा दोर तुटल्याने पतंग भरकटतो, मी मात्र स्वतःच्याच हाताने दोर तोडला. मग भरकटलेपण आले... मग अडगळीत जाऊन पडणेही नशिबात आले.... छे!! अडगळीत कुठे तुझ्या बाबांच्या संसारात तर अडकून पडले होते. संसारत काही त्रास नाही झाला... पण शरीराला त्रास झाला नाही म्हणून शरीर का जोपासायचे... काही वेदना त्यापलीकडच्या असतात... पण आता सहन होत नाही रे! दोर तर खूप आधीच तुटला होता. तरी संसाराच्या वाऱ्यावर बरेच वर्षे घिरट्या घालत राहिले... तुझे बाबा होते आणि पुन्हा नव्हतेही. सगळं सारखंच... तुला तुझ्या पायावर उभे करण्यासाठी जगत होते. आज तू तुझ्या पायावर उभा राहिलास. आता पतंगाला मोक्ष मिळायला हरकत नाही...
त्यानं घर पालथं घातल्यावर एका पुस्तकात एक फोटो सापडला होता... आज आत्महत्या केलेल्या माणसाशी तो चेहरा बराच जुळता होता....
............................................