सोमवार, २६ ऑगस्ट, २०१३

यावेळीही गाडी चुकली


खिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते ज्येष्ठ साहित्यीकास निवडण्याचा आणि अध्यक्षपदाचाच सन्मान ठेवण्याची संधी यावेळीही साहित्य महामंडळाने गमावली आहे. एकच चूक वारंवार करण्यात खरे तर महामंडळाइतकी दुसरी संस्था नसावी.
चार-सहा टाळक्‍यांनाच मतदानाचा अधिकार असलेल्या साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत अनेक ज्येष्ठ साहित्यीक उतरण्यास तयार नसतात. त्याचा फायदा घेऊन अगदी "टुकार' लोक निवडून आल्याचा इतिहास आहे. त्याची पुनरावृत्ती यावेळच्याही साहित्य संमेनलनात होणार नाहीच असे नाही. प्रा. फ. मु. शिंदें यांचा अपवाद वगळता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निवडणूक रिंगणात उरलेली तीनही नावे तशी खूपच डावी आहेत. खरे तर त्यांची साहित्यीक वाटचाल तपासून बघितली तरी त्यात त्यांनी "अखिल भारतीय मराठी' साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अर्जच भरला याचेच कौतुक वाटते.
साहित्य संमेलनाचा मेळावा दरवर्षी भरतो. (आठवा, बाळासाहेब ठाकरे यांनी याला बैलमेळा म्हटले होते.... त्यावेळी सगळे साहित्यीक तुटून पडले होते... नंतर त्यांच्यात इतक्‍या लाथाळ्या निर्माण र्झाल्या की बाळासाहेबांनाही वाटलं असेल अरे आपण तर बैल म्हटलं होतं... ही तर लाथा घालणारी गाढवं निघाली...) तर हा साहित्य संमेलनाचा मेळावा दरवर्षी भरत असतो. त्यात येरेगबाळे- पोट्‌टे सोट्‌टे आपले विचार मांडत असतात... वर्तमानपत्रे आणि न्यूज चॅनेलच्यादृष्टीने मजकुराचा भाग होतो आणि हौशी कवी, नवोदित लेखकांना झब्बा कुर्ता घालून आपण मोठे साहित्यिकच आहोत असे मंडपातून फिरताना वाटते... अयोजकांना मलई खायला मिळते शिवाय अत्तराचा फाया लावून इकडे-तिकडे बागडत मिरवायला मिळते... राजकारण्यांना भाषणं ठोकायला व्यासपीठ मिळते. गावातील रिकाम टेकड्यांना वेळ जायला साधन मिळते. साहित्य प्रकारच्या काही प्रमाणातील उथळ चर्चेशिवाय बाकी सगळ्या गोष्टींचा उहापोह मात्र चांगला होतो. बाकी साहित्यविषयक संमेलनात काहीच घडत नाही. त्यामुळे साहित्य संमेनलनांना चर्चेत आणण्यासाठी कधी नथुरामला पत्रिकेवर आणले जाते तर कधी परशुरामाच्या कुऱ्हाडीला, कधी तुकारामांच्या पुस्तकावरुन वाद होतो तर कधी स्वागत अध्यक्ष कोणी राजकारणीच असल्याचे बघुन सुत्रेच द्यायला माजी साहित्य संमेलनाध्यक्ष नकार देतो... एकूण काय साहित्य संमेलन नसून ते आता भंगार संमेलन झाले आहे. यंदा तर हे भंगार संमेलन होण्याची सुरवात अर्ज भरण्यापासूनच झाली आहे. साहित्य संमेलनाचा अर्ज भरणाऱ्यांपैकी तीन जणांना तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनताच काय पण साहित्याशी निगडीत असलेले लोकही ओळखत नाहीत.
त्या बाई.... नाव काय ओ त्यांचं... वर्तमानपत्रात ललीत विभागात काम करणाऱ्या संपादकीय मंडळींनी केलेला हा प्रश्‍न प्रभा गणोरकर यांच्याबाबतीत केलेला असून तो अनेक गोष्टी सांगून जाणारा आहे. (स्त्रीवाद्यांनी लगेच ओरडायला सुरवात करू नये... हा स्त्रीत्वाबद्दल नाही तर त्यांच्या लेखन कारकिर्दीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणारा प्रश्‍न होता..) चार-सहा पुस्तके आपल्या नावावर लागली आणि डोक्‍यावरचे केस थोडे पांढरे झाले, आणि चारसहा कार्यक्रमात यजमानांसोबत फिरले की लगेच हे स्वतःला ज्येष्ठ वगैरे समजतात आणि कुठल्याही निवडणुकीत भाग घेतात... अरुण गोडबोले यांचे लिखाण तर वर्तमानपत्रीयच आहे.. खरे तर ते वर्तमान आणि पत्री असेच आहे.. ते लिहिले त्याच्या दुसऱ्या दिवशीच उडाले होते...आपण मराठी भाषेत असे कोणते साहित्य निर्माण केले की, पुढच्या शंभर वर्षांनंतरही आपण लिहिलेल्या हजारो कचरा पानातील चार ओळी तरी महाराष्ट्राच्या घरा-घरांपर्यंत पोचल्या असतील... एकही नाही...मग कशाला हा अट्टहास? त्या अरुण गोडबोले यांनी एका पुस्तकावर लेखकाच्या नावाखाली आपल्या अनेक डिग्य्रा लावल्यात.(डिग्रीचे अनेक वचन डिग्य्रा होतं का ओ...) त्यात अमुक तमुक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ही पाटीही उपयोगी ठरावी यासाठी अट्टहास दिसतो. त्यांची पर्यटनाची पुस्तके चाळण्याचा मोह एकदा झाला होता; पण तोही त्या गणोरकरबाईंच्या कवितांसारखाच अनाकलनीय असल्याने सोडला... (गणोरकरच ना त्या... )
या दोघांपेक्षा सर्वात मोठा विनोद म्हणजे संजय सोनवणी यांनी साहित्य संमेलनाचा अर्ज भरला आहे... (आम्हाला जातीयवादी रंग येतोय का?) संजय सोनवणीच ना? आम्हाला यांची नावेच माहीत नाहीत. हे कोण तर प्रकाशक. हे प्रकाशकांच्या मेळाव्याचे अध्यक्ष होऊ इच्छित आहेत काय? ... नाही. हे मग विचारवंत... अरेच्चा साहित्यिक आणि विचारवंत वेगळे असतात का? संजय सोनवणी हे फेसबुक आणि ब्लॉगवरच्या लोकांना माहिती आहेत म्हणे...बामणांना शिव्या घातल्या की, चार लोक लाईक करतात.. आठ लोक प्रतिक्रिया देतात आणि दहा लोक तुम्हाला निधर्मी वगैरे म्हणतात. (हे जैनधर्मीयांच्या मेळाव्यात जाणार आणि तिथे आम्हाला अल्पसंख्याक म्हणून फायदे द्या म्हणणार; परत मला जातीयवादाचा रंग येतोय) त्यांच्यासोबत असणाऱ्यांची नावे आणि जात तपासावी का हा विचार आमच्या मनात आला; पण आम्ही तो कटाक्षाने टाळला... तरीही यांनी असं काय लेखन केले की, यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वगैरे करावे...यांची म्हणे 80 पुस्तके आहेत... (एखादी औदुंबरसारखी कविता लिहिली असती तरी पुरे झाले असते.) पुस्तके प्रकाशीत कशी होतात. त्याच्या पहिल्या आवृत्त्या कशा खपविल्या जातात याबाबत एक स्वतंत्र लेख होऊ शकतो. त्यामुळे तो विषय आम्ही घेत नाही.. (यांनी म्हणे, आणखी कसला तरी भंगार व्यवसायही केला होता. आम्ही भंगार व्यवसाय म्हटलंय, भंगाराचा नाही...) त्यामुळे छे.. पटत नाही बुवा..
आता हे लोक त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसणार ज्या खुर्चीत दुर्गा भागवत बसल्या होत्या, ज्या खुर्चीत पु. ल. देशपांडे बसले होते, ज्या खुर्चीत आचार्य अत्रे बसले होते. ज्यांनी साहित्याला वळण लावले. विचार कसा निर्भिड असतो हे सांगितले. तेथून हे लोक मारे गप्पा मारणार मराठी जगली पाहिजे याच्या...
तुमच्या हातात जर मराठी साहित्याचा दोर दिला तर तो तुटणार हे नक्‍कीच... 

शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०१३

स्वतंत्र

इथे सही करा... वकिलाने कागदाच्या तळातील जागा दाखविली...
तिने निमूटपणे पेन उचललं आणि सही केली...
""हां... पोटगीदाखल तुम्हाला दरमहा दहा हजार, तुमच्या नावे असलेली कार आणि तुम्हाला घातलेले दागिने तुमच्याकडेच राहतील. तरीही तुम्हाला आणखी काही हवे असल्यास साहेबांनी सांगायला सांगितले आहे... मी इथे दोन ओळींची जागा शिल्लक ठेवली आहे...'' वकील ब्ला ब्ला ब्ला बोलत होता... त्याच्या बोलण्याकडे तिचे जराही लक्ष नव्हते...
""आणखी कुठे सही...?'' तिने प्रश्‍न केला.
""तुम्हाला आणखी काही नको?''
""नको! जेवढं दिलंय तेच खूप आहे...''
वकिलाने पेन पुढे केलं.. सहीची जागा दाखविली... ""हां इथे सही...''
तिने निमूटपणे पुन्हा सही केली...
""हं, झालं...''
""साहेब नाही आले...?'' तिने वकिलाकडे बघितले.
""तुम्हाला भेटायचे आहे त्यांना?''
""हो!''
वकिलाने फोन लावला... तो तिथेच कुठे तरी असावा. अगदी भेटायला व्याकूळ असल्यासारखा तो पटकन समोर आला.
तिने त्याच्याकडे बघितले. काहीतरी बोलायला हवे म्हणून ती म्हणाली, ""झाल्या सह्या.''
""हं...'' त्याने फक्‍त हुंकार दिला.
""आता?''
""आता काय?''
""काही नाही...'' तिला प्रचंड अवघडलेपण आलं होतं...
""तुला या वेळी इथे बोलावलं म्हणून अडचण नाही ना झाली... म्हणजे तुझ्या ऑफीसमुळे..'' त्याने जितकं थंड राहता येईल तितकं राहण्याचा प्रयत्न केला.
""न.. नाही... नाही...'' तिनेही सावरून घ्यायचा प्रयत्न केला...
""उलट केतकर आलेत सोडायला... त्यांच्याच गाडीतून आले इथे...''
तिच्या या वाक्‍यासरशी तिच्यावर रोखलेले त्याचे डोळे अलगद बाजूला गेले...
""हं..'' त्याने पुन्हा हुंकार दिला...
""ऑफिसच्या ड्रायव्हरकडून गाडी पाठवून देते...'' ती काही तरी बोलायचे म्हणून बोलली..
""नको नको... ती राहू दे तुझ्याकडेच... मी लिहिलंय त्यात... गाडी तुझ्याकडेच राहावी म्हणून... ती तुझ्याच नावावर आहे ना?''
""नकोय मला खरं... मी तुझ्या नावावर करून देईन..''
""पण...''
""जाऊ देत... तुला एक विचारायचं होतं...''
""तू या सह्यांसाठी आजचाच दिवस का निवडलास...?''
""काही खास नाही... वकिलाला वेळ होता म्हणून..'' त्याने तिच्याकडे न बघता उत्तर दिले...
तिनेही मग ताणले नाही...
""चल... जाऊ मी आता...'' त्याने आपला वरचा ओठ दातांत दाबला आणि फक्‍त मान डोलावली...
तो तिथेच थांबून होता...
न बघता ती पायऱ्या झपझप उतरली आणि गाडीत बसली... गाडीत बसताना तिला जाणवलं की तो तिच्याकडेच बघत आहे.....
गाडी सुरू झाली.... तिने पर्समधून रुमाल काढला आणि डोळे पुसले....
केतकरांकडे बघत म्हणाली.. ""थॅंक्‍स...''
""कशाबद्दल....?''
""आज तू होतास म्हणून त्याने अडवले नाही... आणि त्याने अडवले नाही म्हणून मी त्याला सोडू शकले...''
केतकरने फक्‍त मान हलवली....
""पण काय गं... घटस्फोटाचे हे पाऊल उचलण्याची खरंच गरज होती?''
""नाही... पण माझ्यासमोर याशिवाय पर्यायच नव्हता..''
""पण यामुळे तो कोलमडला नसेल?''
""हं... तो काय, मी नाही कोलमडले... पण आता सुखाने मरेल तरी...!''
""तुला आठवतं, आठ वर्षांपूर्वी याच दिवशी तू आमच्या लग्नाचा साक्षीदार म्हणून सह्या केल्या होत्यास...''
माणसाने खरेच एवढे प्रेम करू नये!
""मीही प्रेम केलं.. अगदी स्वतःपेक्षा जास्त प्रेम त्याच्यावर केलं.. मला नाही तरी दुसरं कोण होतं प्रेम करण्यासारखं.. पण तरीही त्याच्याइतकं प्रेम करणं मला नाही जमलं...
तुला माहीत आहे... आमच्या घरातील एकही वस्तू त्याच्या नावावर नाही... घर, कार, साधा टेलिफोनसुद्धा माझ्याच नावावर...
त्याला एकदा विचारलं, का रे! सगळी कामं मला करायला लावायला तू लग्न केलंस की काय?
त्यावर तो एवढा अपसेट्‌ झाला होता... म्हणाला, नाही गं... प्रत्येक वेळी तुझं नाव लिहायला मिळावं म्हणून मी सगळ्या वस्तू तुझ्या नावावर केल्यात...
स्वयंपाक करत असताना ओट्याशेजारी खुर्ची ठेवून बसायचा...
काय रे, एवढं काय आहे माझ्यात? असं म्हटलं की नुसता हसायचा... काही बोलायचा नाही...
मी पुन्हा नोकरी करते म्हटल्यावर लगेच त्याने तुला फोन केला... मला यायला-जायला त्रास होऊ नये म्हणून कार घेतली....''
""हं...'' केतकरने हुंकार सोडला...
""आठ महिन्यांपूर्वी त्याची डायरी वाचली नसती तर....''
तिने हुंदका दाबायचा प्रयत्न केला... पण जमलं नाही...
""तो मरणार यात शंका नाही; पण तो रोज मरताना मला बघवणार नव्हतं.... आणि त्यालाही आता आपलं रोजचं मरण लपवताना त्रास नाही होणार, कामाच्या टूर काढून दिवसेंदिवस बाहेर राहावं लागणार नाही...''
केतकरने तिचा हात हातात घेण्याचा प्रयत्न केला... पण तिने हलकेच तो बाजूला घेतला...
""डायरीत त्याने लिहिलेलं वाक्‍य तुला सांगितलेलं आठवतंय?''
""...एका बाजूला हाडांच्या सांध्यात लपून राहिलेला हा कॅन्सर मला जगू देणार नाही. जगात माझ्यानंतर कोण हिचे? कसे होईल हिचे? अनाथाश्रमाच्या पायरीवर सोडून जाणारी आई आणि मध्यात संसार सोडून जाणारा मी यांत फरक तो काय? ती किमान बरी तरी... ओढ लावून गेली नाही... मी मात्र प्रेमाचे जाळे तिच्याभोवती विणून आता निघून जातोय...''
तिला बोलता येत नव्हते...
केतकरने गाडी थांबवली.. ती गाडीतून उतरली....
दहा वर्षांपूर्वी मी याच होस्टेलवर राहात होते... तुला आठवतं... माझ्यासारख्या अनाथ मुलीवर त्याने इतकं प्रेम केलं, की मला पुन्हा अनाथ करताना त्याचा जीव गुदमरायला लागला होता रे... मी समोर असताना त्याला त्याचा शेवटचा श्‍वास घेणंही जड जाईल.... लोक मला कृतघ्न आणि नालायकही म्हणतील. पण मी त्याला सोडलेलं नाही... त्याच्या गळ्याभोवती माझ्या प्रेमाचा फास लागलाय तो थोडा सैल केला इतकंच... तो
स्वतंत्र होईल... पण मी मात्र कायमची अडकेन...