गुरुवार, २८ मार्च, २०१३

प्रिय,


प्रिय,
दुपार टळली आहे. उन्हाची सरळ किरणे आता तिरपी झाली आहेत. झरोयेणाऱ्या किरणांनी आपल्या पावलांचा वेग वाढविला आहे. इथे खिडकीत बसून आता हे पत्र लिहिताना समोरच्या झाडांवरील पक्ष्यांची लगबग वाढलेली जाणवत आहे. झाडांच्या बुडख्याशी पडलेल्या पानांची सळसळही वाढली आहे. मध्येच कोकिळेचा स्वर ऐकू येत आहे. वसंत आल्याची ती खूण. म्हणजे तसे प्रत्येक ऋतूच्या येण्याचे पडघम वाजतातच. म्हणजे बघ, वर्षा ऋतू येणार असेल तर एखादा वळीव आधीच पडतो. ढगांचा गडगडाट, विजांचा लखलखाट सांगत असतो की अरे! पुढे पावसाळा येणार आहे, तयार राहा. पावसाळा ऋतू सम्राटाप्रअसतो, येताना आणि जातानाही शंखनाद होतो. तो येतोही असा, की सगळं आपल्या आधीन करून टाकतो. बाकीचे ऋतू तुलनेत शांत.
आता हेच बघ ना.. हेमंत, शिशिर येतात चोरपावलाने आणि जातातही चोरपावलाने. अगदी आपल्या उत्कर्षाच्या काळात त्यांचे अस्तित्व जाणवते एवढेच. पण वसंत यापेक्षा निराळा. तो येतोही मंद सुरांनी आणि जातोही भैरवी गाऊन.. ही मैफल संपू नये वाटत असतानाच तो निघतो.. हेमंत अजून सरलाही नाही, त्याअगोदरच कोकिळेने आपला तंबोरा लावायला घेतला आहे. झाडांनी आपल्याभोवती पिकल्या पानांचा सडा घातला आहे. फांद्यांवर हळूहळू पालवी फुटू लागली आहे. हे असंच होतं माझं, नेहमी भरकटत राहतो... लिहायचे असते एक आणि लिहितो भलतेच.
तुला माहीतच आहे, ज्यावेळी जे बोलायचे ते बोलता कुठे आले मला? जाऊ देत! तर सांगत होतो, माझ्या घरासमोरच्या शेवग्याची अशीच पानगळती सुरू आहे. त्याची ती इवलीशी पिवळी पाने अंगणात मुबागडत असतात... दिवाळी-दसऱ्याला आपण जशी अंगणात मोठी रांगोळी घालतो तशी ती पानांची स्वैर रांगोळी पसरलेली असते.. आताही खिडकीतून बघताना या पिकल्या पानांची पाठशिवण सुरू आहे. त्यातच मध्ये-मध्ये दिसणारी ही सावरीची म्हातारी म्हणजे लपाछपीचा खेळ खेळणाऱ्या पोरांमध्ये लिंबू-टिंबू पोरं जशी लुडबुडतात तसंच आहे हे. या सावरीच्या कापसाला म्हातारी का म्हणत असतील याचं मला नेहमी कोडं पडतं. छे! हे तर एखाद्या लहानग्याला त्याच्या आईने झालरीचे टोपडे घातले आहे, त्याला दृष्ट लागू नये म्हणून कपाळाला, गालाला, हनुवटीला तीट लावली आहे आणि अंगणात खेळायला सोडले आहे असेच वाटते. ते पोर मग अशा पाठशिवणीच्या खेळात मध्ये-मध्ये लुडबुडत राहातं... आता हेच बघ, त्या पाठशिवणीच्या खेळात रममाण झालेलं एक पान लपण्यासाठी हळूच खिडकीतून आत आलं आहे. माझ्या टेबलवरच्या उघड्या वहीच्या पानांत अलगद जाऊन बसलं आहे. मी ही वही अशीच मिटली तर ते तिथेच राहील... कित्येक दिवस, महिने, कदाचित वर्षही... मग त्या पानाचे आणि त्या वहीच्या पानाचेही नाते जमून जाईल. मी हलकेच वही मिटून टाकली.. वहीप्रमाने मनही मिटता येत असतं तर किती बरं झालं असतं ना? पण मन मिटता येत नाही...
आता या वसंतात अंगणातील, परसातील सगळी झाडे नव्याने हिरवीगार होतील. जुनी पाने गळून ताजीतवानी होतील.. पण मनाचं तसं होत नाही ना? पिकलेल्या पानांना मन लगेच सोडत नाही.. ती गळूनही पडत नाहीत लवकर... कदाचित पडलीच तर नवी पालवी... छे! नवी पालवी येईलच असे नाही... अगदी आमच्या मळ्यात कित्येक वर्षांपासून उभ्या असलेल्या वठलेल्या आंब्यासारखंच हे.. अनेक ऋतू येऊन गेले.. पण त्या आंब्याला पुन्हा काही पालवी फुटली नाही... दर पावसाळ्यात त्याच्या खोडावर शेवाळ साठतं, खोड हिरवंगार होतं... काही काळासाठी आम्ही सुखावून जातो.. पण पुन्हा त्या वठलेल्या लाकडाचा आणखी एक भाग तुटून जातो... दरवर्षी असं होतं.... या वसंतातही ते आंब्याचं झाड असंच पालवीविना उभं राहील.. त्याच्यासाठी वसंत आणि ग्रीष्यात काहीच फरक नाही... मातीत मिसळेपर्यंत त्याचा वसंतही असाच ग्रीष्जाईल.. पण मनाचं तसं होत नाही ना! मातीत मिसळेपर्यंत त्याला जगावं लागतं... चढलेल्या शेवाळाला पालवीसारखं जपावं लागतं... खरंच ना? तुला माहीत आहे, मी काय सांगतो आहे आणि काय सांगू पाहतोय... यावर्षीच्या वसंतात तू शेवाळाला सोडून पालवीला जपशील अशी अशा करतो... पुढचे मग कितीही ग्रीष्आले तरी त्यात ती पाने तगून राहतील आणि तुला टवटवीत करत राहतील... बाकी पत्र खूप लांबलंय... दिवेलागणीची वेळ झाली आहे.. वाराही मस्त सुटलाय... काळजी घे... यंदा पालवीला खुडू नको... एवढंच....
तुझाच........

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: