मंगळवार, ३ नोव्हेंबर, २००९

लोकशाहीची लक्‍तरे.................

महाराष्ट्रातील 288 पैकी 184 आमदारांची संपत्ती पाच कोटींपेक्षा अधिक आहे तर अवघ्या सहा आमदारांची घोषित संपत्ती पाच लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे. लोकशाही ही धनिकांची बाटीक आहे हे पुन्हा एकदा अधोरेखीत झालं आहे. त्यामुळे आपण लोकशाहीचा का टेंभा मिरवतोय त्याचा गांभीर्याने विचार करायला हवा.


लोकशाहीची लक्‍तरे.................

एखादी व्यवस्था चांगली की वाईट हे व्यवस्थेमध्ये अंतर्भूत गोष्टींवर जितके अवलंबून असते त्यापेक्षाही जास्त ती व्यवस्था राबविणारे ती कशी राबवितात यावर अवंबून असते. व्यवस्थेतील त्रुटी राबविणाऱ्यांमुळे जर कमी होत असतील तर ती व्यवस्था चांगली म्हणायला पाहिजे, त्याचवेळी राबविणाऱ्या हातांतील व्यवस्था कठपुतळी बनत असेल, तर व्यवस्थेतच काही त्रुटी आहेत असे मानून ती व्यवस्था बदलायला हवी. मानवी चुका म्हणून व्यवस्थेची पाठराखण करणे म्हणजे तिच्या त्रुटींवर पांघरुण घालण्याचा प्रकार आहे. व्यवस्थेपेक्षा माणूस मोठा मानला गेला तरच व्यवस्थेकडे तटस्थ नजरेने बघता येऊ शकते.
लोकांनी लोकांसाठी लोकांकरवी चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही, अशी लोकशाहीची व्याख्या अब्राहम लिंकन यांनी जरी केली असली तरी तीही काही लोकशाहीच्या निर्मितीपुर्वी केलेली नाही. ज्या लोकशाही व्यवस्थेतनू ते अमेरिकेचे राष्ट्रपती बनले त्याच लोकशाहीची त्यांनी व्याख्या केली. (अमेरिकेचे ते 16 वे राष्ट्रपती बनले होते.) त्यामुळे ही व्याख्या काही अलीप्ततेतून आलेली नाही. ज्या व्यवस्थेचा लाभ उठवून सत्तास्थानापर्यंत ते पोहचले त्याचे गोडवे त्यांना गावे लागणार यात शंका नाही. जगभरातील राज्यशास्त्राच्या पुस्तकातून ती व्याख्या आहे तशी जरी शिकविली जात असली तरी त्यातील त्रुटीकडे फारसे लक्ष दिले जात नाही. यामागे एक तर ज्या देशांनी लोकशाही व्यवस्थेचा पुरस्कार केला आहे त्या देशांतील प्रस्थापींतासाठी लोकशाही ही प्रतिष्ठेची बनली आहे. लोकशाही मुल्य म्हणजेच मानवी मुल्य असाच एक अर्थ अधोरेखीत केला आहे. त्यामुळे त्याविरोधात बोलले तर सरळ राष्ट्रद्रोहच ठरतो आणि मग त्याच्यावर एक अलिखित बहिष्कार आणला जातो. आणि ज्या देशांनी लोकशाही स्वीकारलेली नाही तेथील जनतेच्या दृष्टीने ही व्यवस्था म्हणजे स्वर्गीय आहे, असंच वाटतं त्यामुळे ते त्याचा पुरस्कार करतात. त्यामुळे लोकशाही म्हणजे नेमके काय हेही पुन्हा एकदा तपासायला हवे.
लोकशाहीवादी सगळ्यात जास्त टेंभा मिरवतात ते व्यक्‍ती स्वातंत्र्य आणि समान संधी(?)बद्दल. व्यक्‍ती स्वातंत्र्य आणि समान संधी म्हणजे काय याच्या व्याख्याही त्यांनीच केल्या, त्या व्याख्या करताना व्यवस्थेचा लाभ सर्वांना न होता तो ठरावीक लोकांना व्हावा, याचा छुपा अजेंडा राबविण्यात आला. लहान मुलांना औषध कडू लागू नये म्हणून त्यावर साखरेचा मुलामा दिलेला असतो अगदी त्याचप्रमाणे लोकशाहीच्या व्याख्या करण्यात आल्या. त्या सकृतदर्शनी गोड वाटत असल्या तरी त्याच्या अंतरंगात कडवटपणा भरुन राहिला आहे. लहानमुलांना दिलेल्या औषधांचह रोगावर तरी उपाय होता पण इथे तर रोग्याला जगण्याचा अधिकारच नाकारला जातो आहे आणि ही वस्तुस्थिती आहे.
आज महाराष्ट्रातील 288 पैकी 184 आमदारांची संपत्ती पाच कोटी किंवा त्यापेक्षा अधिक आहे. लोकशाही मार्गाने निवडूण आलेल्या या आमदारांना 22 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक मतदारांनी पसंती दिलेली नाही. त्यामुळे जवळ जवळ 78 टक्‍के जनतेचे हे लोक प्रतिनिधीत्व करतात आणि कायदे मंडळाचे सदस्य म्हणून हेच लोक काम पाहाणार असतील तर त्यात ते जनतेचा किती आणि स्वतःचा किती विचार करणार हे स्पष्टच आहे. ज्या महाराष्ट्रातील साडे नऊकोटी जनतेचे हे लोक प्रतिनिधीत्व करताहेत त्यापैकी जवळपास निम्या लोकांना दिवसभर काम केल्याशिवाय संध्याकाळी जेवण मिळत नाही. (महाराष्ट्रात बालकामगारांची संख्या कमी दिसत असली तरी तीही सरकारी कागदपत्रांवरच, घर सांभाळणे आणि गुरांना चारायला घेवून जाणाऱ्या बालकांना शिक्षण नाकारुन कामालाच लावले जात आहे, या वस्तुस्थितीवर पडदा झाकला जातो.) दारिद्य्र रेषेखालील लोकांची संख्या त्यांच्या घरात असलेल्या चैनीच्या वस्तूवरुन ठरविणे आणि चैनिच्या गोष्टी कोणत्या हेही सरकारनेच ठरविणे हे म्हणजे नकाराला कायद्याचे पाठबळच देणे आहे. (आठवा महाराष्ट्रात एकेकाळी एका मंत्र्याने चहा म्हणजे चैनी मानलं होते). घरात टिव्ही आहे किंवा नाही यावरच जर दारिद्य्ररेषा ठरणार असेल तर सरकार किती नकारात्मक काम करते याकडे लक्ष जाते.
जवळपास 20 टक्‍क्‍यांहून अधिक जनतेसाठी प्राथमिक शिक्षण तर 60 टक्‍के जनतेसाठी उच्चशिक्षण हे मध्यमवर्गीयांसाठी शोरुममध्ये ठेवलेल्या चकचकीत गाडीसारखंच स्वप्न आहे. ती गाडी घ्यायला कोणाची ना नाही पण ती घेण्याची ऐपतच या समाजात नाही. किमान मध्यमवर्गीयांनी गाडी घ्यावी यासाठी लाखाची गाडी बाजारात येते पण इथे शिक्षण मिळूच नये म्हणून यंत्रणा काम करते आहे. (खासगी संस्थांतर्फे चालविल्या जाणाऱ्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना शुल्क ठरविण्याचा अधिकार संस्थांना देण्याचा सरकार विचार करत आहे.) आरोग्याबाबतीत तर यापेक्षा कमालीची वाईट अवस्था आहे.गरीबांना आणखी दारिद्य्रात कसं टाकता येईल, त्यांना लाचार कसं करता येईल यासाठी संपत्तीतून सत्ता आणि सत्तेतून संपत्ती हे सूत्र राबविले जात आहे.
लोकशाहीने सर्वांना समान अधिकार दिले आहेत. लोकशाहीने अधिकार दिले म्हणजे नेमके काय असा प्रश्‍न उपस्थित होतो, जे
अधिकार जन्मानं मिळतात त्याला लोकशाहीने मान्यता दिलेली आहे. पण हे अधिकार देताना त्यात पारदर्शकता ठेवलेली नाही. कल्याणकारी राज्यात सर्वांना संपत्ती मिळविण्याचा अधिकार असला पाहिजे, पण सर्वांना अधिकार म्हणजे सरकारातीलच सर्वांना असा काढला जात आहे. लोकशाही ही सध्या ज्ञात असलेल्या इतर राज्यपध्दतीपेक्षा चांगली असेलही पण ती काही परिपूर्ण नाही आणि जर तिलाच परिपूर्ण मानले तर त्यापेक्षा पुढे कसे जायचे... या राज्यपध्दतीपेक्षा आणखी चांगली व्यवस्था काळाच्या पोटात नक्‍कीच दडलेली असेल.....

गुरुवार, २९ ऑक्टोबर, २००९

पन्नास रुपडे......

माय! आजचा शेवटचा दिस हाय, आज जर पैसं दिलं नाय तर मास्तर शाळंत बसू देणार नाय.... बारा-तेरा वर्षाच्या पोरानं काकुळतीला येत आईचा पदर धरत तिला थांबवायचा प्रयत्न केला....ती थांबली... त्याच्या रडवेल्या चेहऱ्याकडे तिनं निमिषभर बघितलं पण त्याच्या डोळ्यात बघणं तिला पेलवलं नाही.... तिने पदराचा काठ त्याच्या हातातून सोडवला ...आणि निघून गेली...

बाई! पोरगं आठ दिस झालं, मागं लागलंया आज त्याला पैकं दिलं नायी तर त्येला मास्तर शाळंत बसू देणार नाय... म्होरल्या पगारातनं कापून घ्या की....भांडी घासता घासता ती ज्या घरी धुनं-भांडी करायची तिथल्या मालकीनीकडं तीनं पन्नास रुपयांची मागणी केली...
नाही गं ! आत्ता कुठले माझ्याकडे पैसे... आणि साहेबही बाहेरगावी गेलेत ना... तुला पुढच्या आठवड्यात पैसे देते काय... तिच्या पुढे आणखी चार भांडी आणून ठेवत मालकीनीनं नकाराची घंटा वाजवली.
मग, तीनं खूप गया-वया केली... पण मालकीनीनं काही पन्नासाची नोट तिच्या हातावर ठेवली नाही.... नंतर ती निघून गेली...
काही पोराचं शिक्षण बिक्षण थांबत नाही... हिलाच पाहिजे असतील पैसे, गावाला जायला... मालकीन स्वतःशीच पुटपुटली...
नंतर चार दिवस झाले तरी ती कामावर आली नाही...
मालकिनीचा संशय आणखी गडद झाला... कोणीतरी नक्‍की हिला पैसे दिले असणार आणि ही नक्‍की गावाला गेली असणार... पण आता मालकिनिला धुन्या-भांड्याचा कंटाळा येवू लागला होता.... ती आज नाही पण पुन्हा कधी येणार हे तरी कळावं म्हणून ती तिच्या घराकडं गेली...
त्या एवढ्याशा झोपडीत खूप माणसं बघून तिला काही सुचलं नाही.... तिनं शेजारच्या बाईकडं चौकशी केली....
बाई ! ती मेली....
मेली.... मालकिनीला आता भोवळ यायला लागली होती...
आवं परवाच्या दिशी पोराला पैकं पायजे म्हणून ती म्होरल्या बिल्डींगवर कामाला गेलती....असलं काम कवा केलं न्हवतं न्हवं......पाचव्या मजल्यावरनं पाय घसरला... खाली पडली.... जागच्या जागी गेली बघा.....
मालकिनीला काय करावं कळलं न्हायी.....ती घराकडे जाण्यासाठी वळली....
त्या झोपडीसमोरच तिचं ते पोरगं विटी-दांडूनं खेळत होतं.... त्याला बहुतेक मास्तरांनी शाळेतनं काढलं होतं.......

सोमवार, २६ ऑक्टोबर, २००९

खिडकी

ऑफीसला जाताना तो नेहमी त्या घरासमोर थांबायचा. त्या घराच्या दरवाजाचे ते मोठे कुलूप त्याला जितके अस्वस्थ करायचे, त्यापेक्षाही अधिक त्याला त्या दरवाजाशेजारील खिडकी अस्वस्थ करायची. बंद दरवाजाआडच्या खिडकीतील तिचा चेहरा बघितला की त्याला सुचायचं नाही.... चालताना त्याचा वेग तिथे मंद व्हायचा.. वळून वळून तो त्या खिडकीत बघत राहायचा आणि मग स्वतःला समजावत पुढे जायचा.... तो रोज त्या खिडकीकडे बघयाचा... ती नेहमी तिथेच असायची कधी शुन्यात नजर लावून बसलेली.... तर कधी तिच्या खिडकीत चढलेला मोगऱ्याच्या वेलाला कुरवाळत... त्याशिवाय ती वेगळं काही करताना दिसायची नाही...... कधी कधी तिच्या डोक्‍यावर पट्‌टी बांधलेली असायची....तर कधी चेहऱ्यावर ओरखडे असायचे....डोळे खोल गेलेल्या तिच्याकडे बघितलं की त्याला चिड यायची... अलिकडे तर तो त्या खिडकीत बघायचंही टाळायचा, पण त्याला ते जमायचं नाही... तिचा तो केविलवाणा चेहरा काही तरी मदत मागतोय, असं नेहमी त्याला वाटायचं... सरळ जावून ते कुलूप तोडावं, असं त्याला वाटायचं, पण त्याला धीर झाला नाही.... एकदा रविवारी तो असाच त्या रस्त्यावरुन चालला होता... तो दरवाजा उघडा होता आणि तीही खिडकीतही नव्हती.... तो खूप वेळ तिथं रेंगाळला पण त्या खिडकीत ना ती आली ना कोणतीही हालचाल दिसली, मग कंटाळून तो निघून गेला.... त्या रात्री त्याला झोप लागली नाही.... घरी काहीच करायला नव्हतं म्हणून ऑफीसला जायला तो लवकरच घराबाहेर पडला.... त्या घरापाशी आल्यावर एक चाळीशीचा माणूस त्या दरवाजाला कुलूप लावताना त्याला दिसला....त्याला वाटलं तो तिचा नवरा असावा.... तो थोडे मागेच थांबला मग त्याच्यामागून तो चालू लागला... बस स्टॉपवर आल्यावर त्याच्याशी काहीतरी बोलायचं म्हणून त्याने अमुक तमुक गाडी गेली का? विचारलं.... त्यानं शांतपणे नाही म्हटलं.... मग तो रोज त्याच वेळेत त्या बस स्टॉपवर यायचा ... त्याच्याशी बोलायचा
प्रयत्न करायचा पण तो बोलायचा नाही..... आता त्याला त्याचा राग यायला लागला.... त्याला खडसावून विचारायचं म्हणून त्यानं मनाशी पक्‍क केलं पण त्याचा भिडस्त स्वभाव त्याला साथ देत नव्हता.... तरीही एके दिवशी त्यानं त्याला बस स्टॉपवर गाठलंच .... त्यानं तिचा विषय काढताच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले....त्याने सरळ त्याला जाबच विचारला का? तुम्ही तिला कैद केलंय.... काय गुन्हा आहे तिचा.... त्याच्या चेहऱ्यावरचे रागाचे भाव मावळले....
तुम्हाला वेळ असेल तर चला माझ्याबरोबर , त्यानं विचारलं....
मग तो त्याच्यामागून परत त्याच्या घरी आला... त्यानं कुलूप काढलं, सोफ्यावर टाकलं.... ती खिडकीत तशीच होती...
त्यानं हाक मारली
"" मनू '' तीनं हू केलं नाही कि चू..... मग तो तिच्याजवळ गेला....मग त्याच्याजवळ
आला... जरा बाहेर थांबता तिनं कपडे ओले केले आहेत, तेवढे बदलतो.... त्याला त्याच्या नजरेला नजर देता आली नाही...तो बाहेर आला....परत मागे फिरुन त्याच्याशी बोलण्याचा त्याला धीर झाला नाही....

रविवार, २५ ऑक्टोबर, २००९

कायदा

हॅ, हॅ, हॅ करत ते अवघं दहा-बारा वर्षांचं पोरगं हात पुढे करत माझ्यासमोर आलं.... कपाळावर मळवट भरलेला, जटा वाढलेल्या, कमरेला चिंद्या गुडाळलेल्या... पायात मोठाले वाळे घातलेल्या त्या पोराकडे बघत मी काहीतरी देण्यासाठी खिशात हात घातला पण हाताला काहीच लागलं नाही... मी तसाच हात त्याच्या हातात देत खांदे उडविले.... ते पोरगं काही बोललं नाही. तसंच ते पुढच्या, मग पुढच्या असं करत त्या गोलाकार जमावात फिरत राहिलं... त्याची बहुतेक आई असावी ती, ढोलकीवर काठी फिरवत मधीच हॅ हॅ हॅ करत होती.....सगळ्या गर्दीत फिरल्यावर त्याच्या हाताला थोडी नाणी लागली.... ती समोरच्या त्या कपाटासदृश्‍य देव्हाऱ्यासमोर ठेवत त्याने त्यावर ठेवलेला चाबूक उचलला... मग हवेत दोन तीन फटके मारत त्याने समोरच्या गर्दीकडे बघितलं आणि स्वतःच्या अंगावर त्या चाबकाचे फटके मारायला सुरवात केली एक, दोन, तीन, चार...... अंगावर चाबकाचे फटके मारून झाल्यावर ते पोरगं पुन्हा त्या गर्दीकडे वळलं मघासारखा हात पुढे करत परत ते फिरलं.... मग आणखी थोडी नाणी त्याला मिळाली.... मघाची आणि आताची नाणी बघून ते हिरमुसलं त्यानं आईकडं बघितलं.... आईचं ढोलकीवर काठी फिरवत हॅ हॅ हॅ करणं सुरुच होतं........ मग त्याची आई समोर आली.... तिच्या हातात मोरपीसांचा पंखा होता....तिनं ती मोरपीसं त्याच्या दंडावर फिरवलं.... ती ते मोरपीस फिरवायला लागली तसं ते पोरगं कळवलं... पण त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले नाहीत.... भीतीने त्यानं अंग आक्रसून घेतलं.... पण त्याच्या आईनं एका हाताने त्याचा दंड पकडत दुसऱ्या दंडावर मोरपीस फिरवणं सुरुच ठेवलं...मग तिनं ते मोरपीस त्या देव्हाऱ्यावर ठेवत तिथली मोठी सुई उचलली.... त्याच्या हातावर ती बळेच दिली आणि ढोलकीवर काठी जोरात घासली.... आता ते पोरगं उठलं.. ती मोठी सुई त्यानं त्या गर्दीला दाखविली आणि दुडक्‍या चालीत स्वतःभोवती गिरकी घेत त्यानं ती आपल्या दंडा
वर टोचली..... ती सुई घुसली... रक्‍ताची चिळकांडी उडाली.... मी डोळे घट्‌ट मिटले... आता ते पोरगं पुढं झालं नाही... त्याची आई पुढे झाली.... कुणी नाणी टाकली... कुणी नोटा टाकल्या...तिने सगळे पैसे गोळा केले आणि डोक्‍यावर तो देव्हारा घेतला आणि चालू लागली..... तिचं ते पोरगं.... दंड चोळत तिच्या मागून चालू लागली..... गर्दी ओसरली.....रस्ता मोकळा झाला.... रस्त्याच्या पलीकडील घराच्या भिंतीवर लिहलं होतं... बालकांचा निरागसपणा हिरावून घेऊ नका...... बालकांना कामाला लावू नका....कायद्यानं बंदी आहे.....

गुरुवार, १५ ऑक्टोबर, २००९

ओझं

माई ! दिवाळी हाय, काय करंजी लाडू असत्याल तर घाला गरिबाच्या झोळीत..... वाड्याच्या अंगणात आलेल्या त्या भिकारणीकडे बघून तिचं मस्तक तापलं.... चल बाहेर हो आधी... चल... तिनं थरथरत्या आवाजात फर्मान सोडलं... पण ती हलली नाही आपली लाचार नजर तिच्याकडे टाकत तिथल्या पायरीवर ती पसरली.... हातातील ताटली समोर ठेवत तीनं माई द्या चा घोष लावला.... त्या भिकारणीचं ते पसरणं तिला आवडलं नाही.
चल म्हटलं ना! काही, मिळणार नाही.... उचल ती ताटली आणि निघ... तिनं शब्दात जितका जोर आणायचा तितका आणला....
पण तरी ती भिकारीण हालली नाही....
माई! आज दिवाळी हाय कालपसनं कायबी खाल्लं नाही.... खायाला कायतरी द्या... गरीबाचा आशीर्वाद लागंल.... घरात दुधा-तुपाच्या नद्या व्हातील.... त्या चौसोपी वाड्याकडं बघत ती असं काही बाही बडबडत राहिली....
आता मात्र ती अस्वस्थ झाली....तिला त्या भिकारणीला वाड्याबाहेर कसे घालवायचे हेच कळत नव्हतं.
ती पुन्हा जोरात खेककसली... चल बाहेर काही काही मिळणार नाही....
आपला केवीलवाणा चेहरा आणखी केवीलवाणा करत ती तिथंच बसून राहिली..
तिला हाताला धरावं आणि सरळ वाड्याबाहेर काढावं असं तिला वाटून गेलं पण तिच्या हातात ते बळ आलं नाही.....
भिकारणीनं आपल्या फाटक्‍या झोळीतील काहीबाही काढलं आणि ताटलीत टाकलं.... माई पानी तरी द्या....
आता मात्र कळस झाला.... हे खाऊन झाल्यावर जाणार ना येथून..तिनं विचारलं......भिकारणीनं मान डोलावली.....
तिनं कळकट मळकट तांब्यातून पाणी आणलं.... भिकारणीनं थोडं खाल्ल,पाणी प्यायली आणि आल्या वाटनं निघून गेली...
तिनं दरवाजा लावला.... त्या मोठ्या वाड्याचा दरवाजा थोडा करकरला आणि बंद झाला. बंद दरवजाकडं बघंत ती तिथंच थोडावेळ बसली.... मग उठली... काटी टेकत टेकत ती सोप्यात आली.... मग तिथं बसून राहिली.... दिवे लागणीची वेळ आल्यावर तिनं दरवाजा उघडला..... बाहेर सगळीकडे दिव्यांची झगमगाट होती...ती स्वतःशीच हसली... . तिने तुळशीपाशी आणि बाहेर एक एक दिवा लावला.....मग ती देवापाशी दिवा लावायला गेली.... जुन्या समईतील संपत आलेली वात तिने पुढे ढकलली आणि काडी पेटवली....समई लागली....मग तिच्या लक्षात आलं, अरे आज तर लक्ष्मीपूजन.... मग कनवटीची चार नाणी तिनं काढली आणि ती देवासमोर ठेवली....दिवाळीचा नैवैद्य काय दाखवावा, म्हणून तिला प्रश्‍न पडला... घरी काहीच नव्हतं... नंतर तिच्या लक्षात आलं मघाशी जी भिकारीण बसून गेली तिथं तिची एक करंजी तशीच पडलीय.... ती उठली आणि तिनं ती करंजी उचलली... त्या करंजीचं ओझं तिला तिच्या आयुष्यापेक्षा जास्त वाटलं.....

सोमवार, १२ ऑक्टोबर, २००९

डोळे......

खिडकीच्या काचेवर चोच मारणाऱ्या त्या चिमणीकडे बघून आईचा जीव कळवळला... तिला चार तांदळाचे दाणे टाक रे असं म्हणून तिने रोळी माझ्यासमोर ठेवली. मी माझ्या मुठीत मावेल तितके तांदूळ घेतले आणि खडीकीसमोर ते टाकले. ती चिमणी घाबरुन उडून गेली. मी हिरमुसून परत आलो... आई म्हणाली येईल थोड्या वेळाने लांब उभा राहा.... मी खूप वेळ तिची वाट बघितली पण पुन्हा ती काही आली नाही.... नंतर पुन्हा एक दिवस ती परत त्याच खिडकीत आली आणि काचेवर चोच मारत राहीली. मी आईला सांगितलं... आईनं लांबून हलक्‍या हाताने तांदूळ टाकले... चिमणी उडाली पण ती लांब गेली नाही... आजुबाजूचा अंदाज घेत टुणटुण उड्या मारत एक एक तांदूळ ती टीपत राहीली..... मग थोड्यावेळाने ती परत निघून गेली. मी आईला विचालं, ""आई ती परत येईल.? आई हो म्हणाली...
मग दुसऱ्या दिवशीही ती आली... मी अंगणात काहीतरी करत होतो.... आईनं हाक मारली. तुझी चिमणी आली बघ म्हणून मी धावत आलो... रोळीतील तांदूळ मुठभरुन घेणार इतक्‍यात आईनं कण्यांचा एक डबा माझ्यासमोर ठेवला.""यातील तांदूळ घालत जा'' आईन सांगितलं. मी मूठभर कण्या घेतल्या आणि आईनं जसं लांबून तांदूळ टाकले तसे टाकल्या... आता चिमणी घाबरली नाही...तिने धिटपणे काही दाणे टीपले आणि निघून गेली.... मग रोजचाच आमचा हा खेळ बनला.... रोज शाळेतून आल्यावर मी त्या खिडकीच्या काचेकडे बघत तासनतास बसायचो... ती येईल याची वाट बघत.... तीही नित्यनेमाने यायची.... मी तिला कण्या टाकायचो, ती त्या टीपायची आणि परत निघून जायची.... अलीकडे तर आई मी शाळेतून यायच्या वेळी खिडकीतच खावू ठेवायची. त्या चिमणीचा मुक्‍कामही आता वाढू लागला होता.... एकदिवस मी बघितलं की तिने खडकीच्या वरच्या कोपऱ्यात काही काटक्‍या गोळा करुन घर बांधलंय..... मग मी रोज त्या घरट्यात डोकाऊन बघयचो पण त्याला हात लावायचा नाही, असं आईनं बजावलेलं होतं, त्यामुळं त्याला हात लावायची इच्छा होऊनही मी हात लावला नाही... एक दिवस त्यात मला छोटी छोटी अंडी दिसली.... आईनं सांगितलं की काही दिवसांनी त्यातून पिलं बाहेर येतील म्हणून.... मी वाट बघायचो रोज आईला विचारायचो, आई रोज उद्या म्हणायची... आणि एक दिवस त्यातून चिवचिवाट सुरु झाला.... मी आनंदानं आईला सांगितलं... आईन त्या दिवशी मला रोळीतील तांदूळ घ्यायला मुभा दिली होती.... मग मी रोज संध्याकाळी त्या खिडकीपाशी बसून त्या इवल्याश्‍या चिमण्यांचा चिवचिवाट ऐकायचो.... आई ओरडायची....अभ्यासाला बैस म्हणून पण तिने कधी चिमणीला दोष दिला नाही.... चोचीच चोच घालून दाणे भरवणं बघितलं की मला मजा वाटायची.... माझ्यासाठी आईनही तोच प्रसंग कित्येकवेळा बघितला होता....
एका संध्याकाळी मी असाच शाळेतून पळत आलो.. दप्तर बाजुला टाकलं... आईनं खिडकीत शिरा आणि पाणी ठेवलं होतं. मी हातपाय न धुताच हातात प्लेट घेवून त्या खिडकीच्या कोपऱ्याकडे बघत होतो.... तिथं ते घरटंच दिसलं नाही.... मला काही कळलं नाही.... मी धावत आईला जावून विचारलं... आई खिडकीपाशी आली तिनं बघितलं ..... खिडकीच्या खाली ते काट्याकुट्यांचं घरटं पडलं होतं.... आणि जवळच काही पिसं पडली होती.....ती चिमणी चिवचिवाट करत इकडून तिकटे फिरत होती...खिडकीच्या काचेवर चोच मारत होती... आईनं माझ्याकडं बघीतल आणि मला कवळून घेतलं आणि तिने डोळ्याच्या कडा पुसल्या....आजही आईचे ते डोळे मला अस्वस्थ करतात.....

शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २००९

प्रचार

आमक्‍या, तमक्‍याला मत द्या, तेच तुमचा विकास करु शकतात, उठा प्रगतीचा मार्ग धरा.... अशा घोषणा देत एक गाडी येत होती.... घोषणांचा आवाज जसा टिपेला पोहचला तसे त्याने तोंडावरील टॉवेल बाजुला सारला. डोळे उघडले आणि समोरच्या रस्त्याकडे बघितले...... गाडी आली घोषणा देत निघून गेली.... आवाज क्षीण झाला तसे त्याने बाजुला केलेला टॉवेल पुन्हा तोंडावर घेतला आपला डावा हात मानेखाली घालत तो कुशीवर वळला... डोळे मिटले आणि पुन्हा झोपी जाण्याचा प्रयत्न करु लागला....पण त्याला त्यात यश आले नाही.... त्याने मघाशी आलेल्या गाडीला आणि ज्या नेत्याचा प्रचार ती गाडी करत होती त्या नेत्यालाही जोराची शिवी हासडली......दोन्ही हात वर करुन त्याने जोरात आळस झटकला आणि त्याच वडाच्या झाडाला टेकून बसला.... कडेला पडलेली एक काठी त्याने हातात घेतली.... ती मोडली... त्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि फेकून दिले.... समोर पडलेला दगड उचलून थोडी माती खरवटायचा प्रयत्न केला पण त्यातही त्याला मजा आली नाही.... मग तो उठला आणि रस्त्याच्या कडेला जावून बसला.... डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजुला लांब लांबवर कोणी नव्हतं. मग त्याने स्वतःलाच एक जोरात शिवी हासडली आणि तिथल्या दगडावर तो बसला. मळलेला शर्ट आणि पॅंट बघून त्याने किमान पंधरा दिवसांत कपडे बदललेले नाहीत हे सांगायला कोणा जोतिष्याची गरज नव्हती. विस्कटलेल्या केसांना माती लागून लागून तांबडा रंग आलेला....अशा अवस्थेत तो तिथेच बसून राहिला. इतक्‍यात पुन्हा एक गाडी आली याही गाडीवर मघासारखाच एक स्पिकर होता... पण त्यातून घोषणा येत नव्हत्या... ती गाडी अगदी त्याच्या जवळ आली आणि थांबली....चालकाने कुठल्यातरी गावाचा पत्ता विचारला... त्यानेही तो सांगितला... चालकाने गाडी सुरु केली आणि तो थोडा पुढे गेला...आणि थांबला.... त्याने गाडी मागे घेतली आणि पुन्हा त्याच्याजवळ लावली... त्याला काही कळेना...
तुला वाचायला येतं...चालकाने विचारलं...
येतं की.....त्याने सरळ साधं उत्तर दिलं...
मग हे वाचून दाखव.... चालकाने एक चिटोरी त्याच्यापुढे ठेवली....
मघाशी जी गाडी घोषणा देत गेली होती त्याच या घोषणा होत्या.... त्याने जोरात त्या घोषणा वाचल्या....
चालकाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले....
एकवेळचं जेवण आणि शंभर रुपये देईन, घोषणा द्यायला येतोस का? त्याने विचारलं....
याच्याकडे नकार द्यायला कारण नव्हतं, तो गाडीत बसला..... माईक हातात घेत त्याने उच्चरवात घोषणा द्यायला सुरवात केली...
एक एक गाव करत ते त्या नेत्याची सभा होती तिथे आले.... सभा अजून सुरु व्हायची होती... इतक्‍यात त्याच्या हातात आणखी एक कागद आला... त्याने तो सफाईदारपणे वाचला.....नेत्याने भाषण केले... पण लोकांच्या टाळ्या काही पडल्या नाहीत.
सभा झाली... आलेले लोक परतले.
नेत्याच्या गाड्यामागे मघाच्या चालकाने आपली गाडी लावली... थोडे अंतर गेल्यावर नेत्याने आपली गाडी थांबवली... तो उतरला मागे थांबलेल्या यांच्या गाडीकडे आला.... त्याने जोरात विचारले मघाशी गाडीतून भाषण कोण करत होता... चालकाने त्याच्याकडे बोट दाखविले.... नेत्याने त्याच्याकडे बघितलं आणि नाकं मुरडलं.... कुठल्या गावचा... त्यानं गावचं नाव सांगितलं.... नाव.... त्यानं नाव सांगितलं....नेत्याचा चेहरा उजळला....त्याने आपल्या सहकाऱ्याला हाक मारली.... त्याच्याकडून काही पैसे घेतले... चालकाकडे देत काही पांढरे कपडे खरेदी करा आणि उद्या प्रचाराला या. असं सांगून तो नेता आपल्या गाडीत बसून निघून गेला.
चालकाने सांगितल्याप्रमाणे त्याला कपडे घेवून दिले...त्याला घरात सोडले... आणि निघून गेला.
दुसऱ्या दिवशी गाडी त्याला न्यायला आली.... तोही पांढरे कपडे घालून तयार होता.... त्याला एका सभेच्या ठिकाणी नेलं गेलं. नेत्याच्या सहकाऱ्याने त्याच्यासमोर एक कागद पुढे केला.... त्याने तो बघितला. त्यात नेत्याने केलेल्या विकासकामे होती... तो व्यासपीठावर चढला.... माईक त्याने हातात घेतला.... नेत्याच्या विकासकामांचा पाढा वाचता वाचता तो थांबला.... त्यात लिहले होते दहा हजार युवकांना नोकरी दिली.... त्याने व्यासपीठाकडे बघितले नेता खूष होऊन आपल्या केसांवर हात फिरवत होता... मग त्याने समोर बसलेल्या श्रोत्यांवर एक नजर फिरवली आणि खड्या आवाजात त्याने सांगितले याच नेत्यामुळे आज दहा हजार एक लोकांना रोजगार मिळाला... त्यातील एकावर त्याने उगाचच भर दिला.....

मंगळवार, ६ ऑक्टोबर, २००९

बघा जमलं तर थोडे ओझे उतरवून....

प्रति,
राजू परुळेकर यांना
आपण खूप मोठे पत्रकार, लेखक, सुत्रसंचालक, मुलाखतकार, राजकीय विश्‍लेषक आणि "विचारवंत' आहात हे माहित असूनही हा पत्राचा अट्‌टहास. विचारवंतांनी विचार मांडावेत आणि आमच्यासारख्या डोक्‍यात बटाटे असलेल्यांनी ते निमूटपणे मान्य करावेत हे सरळ साध सूत्र आजपर्यंत आम्ही (इथे आदरार्थी एकवचन नाही... आमची सगळी जमात या अर्थाने आहे.) पाळलं; पण काय होतं बटाट्याला जर ओलाव्याचा स्पर्श लागला तर त्यालाही मग कोंब फुटतात. तुमच्या लेखनाच्या सानिध्यात आल्यानंतर खूपदा आमच्या सडक्‍या डोक्‍यातील कुचक्‍या बटाट्यांना कोंब फुटले.. पण विचारवंतांनी विचार करायचा असतो, आपल्यासारख्यांनी नाही हा एकच विचार डोक्‍यात ठेवून हे कोंब आम्ही खूडत राहिलो. पण आता हे विचारांचे कोंब दसऱ्यात भोम वाढावे, तसे वाढल्याने ते तुमच्याच दारात आणून टाकत आहे एवढंच.
तुम्ही कोणाबद्दल लिहावे, काय लिहावे, काय उद्देशाने लिहावे हा तुमचा वैयक्‍तीक प्रश्‍न असला तरी "विचारवंतांनी' आणि लेखकांनी (कदाचित तुम्ही स्वतः ला विचारवंत मानत नसाल आणि त्यामुळे ही माझी जबाबदारी नाही असं म्हणू शकाल म्हणून लेखक हा शब्द. तुम्ही लेखक आहात हे तुम्हीच मान्य केले आहे.) मांडलेले विचार त्याचे वैयक्‍तीक राहात नाहीत. अर्थात ते वैयक्‍तीक राहू नयेत याचसाठी तर लिहलेले असतात हे आम्हाला (पुन्हा इथे आणि इथून पुढे सर्वच ठिकाणी आदरार्थी एकवचन नाही... आमची सगळी जमात या अर्थाने आहे.) ठावूक आहे, त्यामुळे त्या विचारांना आपलेच विचार समजून ते आम्ही आधी गिरवतो आणि नंतर मिरवतो. पण... विचारवंतांनी आपली मतं विचार म्हणून लादायला सुरवात केली त्यावेळेपासून आम्हाला या विचारवंतांनी खूप छळलंय. खास करुन राजकिय विश्‍लेषकांनी. राजकिय विश्‍लेषणाला आवश्‍यक असणारी माहिती आणि थोडे शब्दांचं पाठबळ असले की विचाराचे पंतग उडवायला खूप मोठे आकाश मिळते. आता तर इतके चॅनेल झाले आहेत की भाषण येणाऱ्या सगळ्यांना चांगले दिवस आले आहेत. त्यामुळे जो-तो उठतो आणि विश्‍लेषण करत सुटतो. पण यात तुम्ही खूप वेगळे होता. राजकीय विश्‍लेषणातही तुमचा समाजशास्त्राचा अभ्यास आम्हाला भारावून टाकत आला आहे. त्यामुळेच आमच्यामधील अनेक जण तुमचे चाहते झाले आहेत, पण अलिकडील तुमचे लिखाण आणि तुम्ही टीव्हीवर मांडत असलेले विचार ऐकले की आम्हाला आमचीच लाज वाटू लागली आहे. कधी काळी आम्ही साऱ्यांना आम्ही परुळेकरांचा आदर्श समोर ठेवलाय तुम्हीही ठेवा हे आग्रहाने सांगत होतो पण... पण सारंच मुसळ केरात गेलं.
मुळात तुमच्याबद्‌दल आम्हाला फारसा राग नाही. पण तुम्ही ज्या पद्धतीने विचार मांडायला लागलाय ते बघता तुम्ही प्रगतीचा सोपा मार्ग शोधलाय असाच वास येत आहे. खऱ्या-खोट्यात आम्ही जात नाही, पण जे समोर दिसतंय त्यावरुन तरी तुम्ही भविष्यात मनसेचे प्रवक्‍ते (किंवा उद्या सामनासदृश मनसेने एखादे वृत्तपत्र काढले तर त्याचे संपादक) वगैरे झालेले दिसला तर त्यात आश्‍चर्य वाटायला नको. उद्धव (मर्द) ठाकरे नावाचा जो काही लेख लिहिला आहे तो पूर्वदोष आणि मताभिन्नतेचा उत्कृष्ट नमुना आहे. लेखकाने वैयक्‍तीक विचार मांडताना त्याला एकतर वैयक्‍तीक रुप द्यावे किंवा जर त्याला सार्वमताचा रंग चढवायचा असेल तर सार्वमत काय आहे हे तपासून बघावे. वरवर बघता तुमचा लेख सार्वमत तपासून लिहिला आहे,असं वाटत असलं तरी तो फक्‍त शब्दखेळ आहे, आणि हा खेळ खेळताना समोरच्या वाचकालाही गृहीत धरले आहे. उद्धव ठाकरे चांगले की राज ठाकरे या वादात आम्हाला पडायचे नाही. आम्हाला दोघांबद्दलही तितकाच आदर आहे. पण राज ठाकरे यांच्या पाठिमागे संस्कृत नेता हे विशेषण लावताना जिथं तुमच्या लेखणीतील शाई (किंवा संगणकावरील कळ) फार सैल होते तिथेच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल लिहिताना वस्तूस्थितीचा उगाच टेंभा मिरवताय हे जाणवत राहातं. राज यांना चांगले म्हणण्याचा तुम्हाला अधिकार आहेच, ते चांगले आहेत याबद्दल आमच्याही मनात शंका नाही पण (परुळेकर तुम्ही चार वाक्‍य झाली की पण म्हणायला आम्हाला भाग पाडताय. पण म्हणायचं नाही असा "पण' करुनही) याचा अर्थ तुम्ही इतरांची उंची कमी दाखवून राज यांची उंची वाढवायचा प्रयत्न करताय. उद्धव ठाकरे यांना कमी लेखण्यासाठी त्यांनी उच्चारेले काही "शब्द' म्हणजेच त्यांचे व्यक्‍तीमत्व दाखविण्याचा तुम्ही केलेला अट्‌टहास बाळबोध वाटतो. राजकारणातील भाषणालाच त्या माणसाचे व्यक्‍तीमत्व मानाय
चे हे आमच्यासारख्या मठ्‌ठ माणसांनी. पण तुमच्यासारख्या विश्‍लेषकांनी तर व्यासपीठावर न बोलताही नेता कोणते शब्द पेरुन गेला याचा उहापोह करावा. परिस्थीती कोणती आणि समोरचा श्रोता काय मानसिकतेचा आहे हे बघूनच नेते भाषण करतात. यात प्रत्येकवेळा त्यांचे व्यक्‍तीमत्व शंभर टक्‍के असतेच असे नाही. उच्चारलेला शब्दाचा नेमका काय अर्थ हे विश्‍लेषकाने सांगावे त्याच शब्दात त्याने स्वतःला अडकवून ठेवू नये.
आपल्याकडचे जवळजवळ सर्वच पत्रकार कुठल्या ना कुठल्या विचाराने प्रभावित असतात त्यांचा त्यांच्या लेखनावर परिणाम होतोच यात तुम्ही अपवाद असावे असंही आमचं म्हणणं नाही पण विचाराने प्रभावीत असणे आणि विचारांचे ओझं घेवून फिरणं यात नक्‍कीच फरक आहे. विचारांचं ओझं डोक्‍यावर असेल तर त्याशिवाय दुसरा विचार डोक्‍यात शिरत नाही. बघा जमलं तर थोडे ओझे उतरवून....
ता. क.
वरील पत्र लिहिताना इंग्रजी शब्दांचा वापर मुद्दामच केलेला नाही. पण ज्या राज ठाकरे यांच्याबरोबरच्या मैत्रीचे गोडवे तुम्ही गाता त्यांच्या राजकारणानेच तुम्ही प्रेरीत दिसता नाहीतर तुम्ही "अल्केमीस्ट्री' हे सदराचे नाव ठेवलेच नसते.

सोमवार, ५ ऑक्टोबर, २००९

पुन्हा पुन्हा पुन्हा

रस्त्याच्या कडेच्या कचरा कोंडाळ्यात तीनं आपला थरथरता हात घातला. कचऱ्याच्या पिशव्या तपासता तपासता तिच्या हाताला काहीतरी लागलं. त्यातलीच एक प्लॅस्टीकची पिशवी तीनं रिकामी केली आणि त्यात तो "ऐवज' कोंबला. पुन्हा तिचं चाचपणं सुरु होतं.आणखी थोड्या वेळानं तिला त्यात काहीतरी सापडलं. तिनं तेही त्या पिशवीत कोंबलं. कोंडाळ्याच्या कडेला पडलेली वाकडीतिकडी काठी तिनं डाव्या हातात घेतली आणि शरिराची लक्‍तरं त्याच्या साहाय्याने उचलण्याचा प्रयत्न केला. एक एक अवयवय उचलत ती अर्धवाकलेल्या अवस्थेत उभी राहिली. कळकट मळकट साडीला तिनं हात पुसला आणि मघाचा "ऐवज' उजव्या हातात घेवून तिने रस्त्याच्या कडेला नाला वाहावा तसं स्वतःला वाहतं केलं. भंगारवाल्याच्या दुकानासमोर उभी राहात तिनं तो ऐवज त्याच्यासमोर ठेवला. त्यानं निरुत्साहानंच त्याकडं बघीतलं आणि दोन रुपयांची दोन नाणी तिच्याकडे भिरकावली. समोर पडलेली ती नाणी उचलण्यासाठी ती खाली वाकली आणि तिच्या वाकड्या काठीचा धक्‍का त्या पिशवीला बसला. सकाळपासून गावातले निम्मे कचाराकोंडाळे शोधून आणलेल्या त्या पिशवीतल्या बाटल्या खाली पडल्या आणि खळकण असा आवाज आला. मागे वाकलेला दुकानदाराने चटकन पाठ फिरवली आणि बघितलं. बाटल्यांच्या काचांकडे बघत तिच्या हातातील त्या दोन नाण्याकडे त्याचे लक्ष गेले. त्याकडे लक्ष जातातच त्याने तिच्या हातावर झडप घातली आणि ती नाणी हिसकावून घेतली. ती काही बोलली नाही. फुटलेल्या काचा तिनंच गोळा केल्या. त्या मघाच्या पिशवीत कोंबल्या. त्या कोंबता कोंबता त्यातील एक काच तिच्या हातात घुसली तिनं ती जोरात ओढली. पण बराचवेळ रक्‍ताचा थेंबही बाहेर आला नाही.... रक्‍त यायला पोटात काहीतरी असाव लागतं...

सोमवार, २१ सप्टेंबर, २००९

हात दाखवून...


प्रसंग पहिला

महाराज! मुख्यमंत्रिपदाची माळ माझ्या गळ्यात केव्हा पडेल? आपला उजवा हात महाराजांपुढे करत त्या "नेत्याने' शब्दात जितका "विनय' आणता येईल तितका आणला.
महाराजांनी उजव्या पायाच्या मांडीवर डावा पाय टाकून त्याचा अंगठा उजव्या हाताने धरत, डाव्या हाताने जाणव्याला हिसका दिला. पंचांगावर ठेवलेल्या पाचशेच्या नोटेकडे लक्ष देत त्यांनी अनुनासिक स्वरात मुख्यमंत्री, मुख्यमंत्री असा जप सुरू केला.
काय झालं महाराज?
त्याचे काय आहे, राहू जरा वक्री आहे, बुधही अष्टमस्थानी आहे. पण गुरूचे पाठबळ चांगले आहे. "सुराज्य' आणणारे आहे.
महाराज म्हणजे मुख्यमंत्री होण्यात अडचण...
अडचण अशी काही नाही; पण... महाराजांनी "पण' उगाच लांबवला. पण गृहकलह दिसतो. नाराज ग्रहांची संख्या जास्त आहे. घरच्या लढाईत सैनिकांची मदत घ्यावी लागेल.
म्हणजे मी समजलो नाही महाराज.
त्याचे असे आहे. इथे तुम्हाला सैनिकाबरोबर लढायला लागणार आहे. त्यासाठी दुसऱ्या सैन्याची कुमक मागवावी लागेल, कसे. महाराजांनी मुद्द्याला हात घातला.
महाराज त्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण त्यात यश येईल नव्हे. साहेबांचे मन काही कळत नाही.
येईल म्हणजे येणारच, पंचांगावर आणखी पाचशेची नोट बघून महाराजांनी विश्‍वास दिला. तुम्ही जोर धरा. अहो, त्यांनाही गरज आहे. त्यांनाही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवायचा आहे ना! तृतीय आघाडीवरच्या ग्रहांचे फासे व्यवस्थित पडले तर मुख्यमंत्री तुम्हीच.

प्रसंग दोन
महाराज, महाराज, मुख्यमंत्रिपदाचा योग कधी आहे जरा बघा की... परदेशात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला नेता आल्याचे बघून महाराज मोठे खूश झाले. पंचांगाची पाने उलटसुलट करत नेत्याकडे तिरप्या नजरेने त्यांनी बघितले. काय देखणे रूप, पण चेहऱ्यावर अस्वस्थता खूप बघून महाराजांनी उगाचच उच्छवास जोरात टाकला.
मुख्यमंत्रिपद, जरा कठीण दिसतंय. त्याचे काय आहे. तुमच्याकडे ते गुण आहेत; पण ग्रहांचे पाठबळ नाही ना. घरच्या लढाईत तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागतोय. महाराजांनी खुलासा केला.
अहो मी घरचा मंत्री आहे म्हटल्यावर घरच्या लढाईकडे जास्त वेळ द्यावा लागणारच की...
ते घर नव्हे! आपल्या नाकपुड्या फुगवत महाराजांनी सांगितले. अहो सांगली, तासगाव अशा संस्थानात तुमचा जास्त वेळ जातो ना त्याबद्दल बोलतोय. हा ग्रहकाळ काही मुख्यमंत्रिपदासाठी अनुकूल नाही.
मग उपमुख्यमंत्रिपद तरी... मागच्या वेळी हुकलेली संधी मिळेल नव्हे?
महाराजांनी आता अंदाज काढला. पंचांगावर पैसे दिसत नसल्याचे बघून मोठा पॉज घेतला. मांडीवरचा पाय जोरात हलवत जानव्यातून अंगठा फिरवला. साहेबांच्या ते लक्षात आले. त्यांनी हजाराची नोट पंचांगावर सारली.
या वेळी संधी साधणार म्हणजे साधणार... पण त्यासाठी इतरांच्या "भुजा'तील बळ कमी झाले पाहिजे. कसे...

प्रसंग तीन
"साहेब' आले आहेत म्हटल्यावर महाराज स्वतः समोर गेले. तुम्ही मला बोलवायचे नाही का? महाराजांनी दारातून स्वागत करत करत साहेबांना विचारले.
"त्याचे काय आहे भटजीबुवा, आम्हाला आता वेळ मिळाला, इकडून जात होतो म्हटले तुम्हाला भेटून जावे.' साहेबांनी सांगितले.
तुमचं शिक्षणाचे एवढे काम, सरस्वतीची सेवा करताय बघा तुम्ही... आपल्या पोराला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळाल्याचे आठवून महाराजांनी मधाचे जितके बोट लावता येईल तितके लावण्याचा प्रयत्न केला.
ते राहू द्या, या वेळी तरी आम्ही मुख्यमंत्री होणार का? साहेबांनी थेट प्रश्‍नाला हात घातला.
होणार म्हणजे होणार, ही काळ्या दगडावरची रेष आहे. महाराजांनी पुन्हा मधाळ स्वर आणत स्तुतीचा "पतंग' हवेत उडविला.
पण मागच्या वेळी तुम्ही तसेच म्हटला होता. साहेबांनी दुखत्या नसेवर बोट ठेवले.
अहो! त्यावेळी राहू काळ चालू होता ना... पण या वेळी तुम्ही मुख्यमंत्री आणि युवराज आमदार होणार म्हणजे होणार.

प्रसंग चार
नमस्कार महाराज! त्या नेत्याने आल्या आल्या महाराजांच्या पायालाच स्पर्श केला आणि महाराजांच्या कडेलाच मांडी घालून बसला.
एवढा मोठा नेता आणि वागणे कसे सर्वसामान्यासारखे. नेत्याचा हा साधेपणा बघून महाराजांना गहिवरून आले.
महाराज, काय होईल... नेत्याने एवढेच विचारले.
आघाडीबाबत प्रश्‍न म्हटला तर आघाडीचा प्रश्‍न निकालात निघालाय. मतदारसंघ गेला असला तर मतदारसंघातील प्रमुख विरोधक यांच्याच पक्षाकडून विधानपरिषदेवर मग प्रश्‍न कशाबद्दल असेल? महाराजांना काही कळेना.
कशाचे काय होईल?
अहो! मंत्रिपदाचे आणखी कशाचे...
तुम्ही निश्‍चिंत राहा... पण खरे सांगू मागच्यावेळीच तुम्हीच मुख्यमंत्री झाला असता. सगळ्या ग्रहांचे पाठबळ तुम्हालाच होते. पण माशी कशात शिंकली कोणास ठाऊक!
एकदा चूक झाली ती झाली... पण उपमुख्यमंत्रिपदाची माळही गेली हो... त्याचे काय? नेत्याने नेहमीप्रमाणे आपली नजर खाली झुकवत मान तिरकी करत विचारले.
अहो! उपमुख्यमंत्री काय तुम्ही या वेळी मुख्यमंत्री व्हाल. कसे? महाराजांनी कसेंवर फारच जोर दिला.
.........................................
ता.क. ः महाराजांना आता कळेना की नेमका कोण मुख्यमंत्री होणार? त्यांनी 22 ऑक्‍टोबरच्या तीर्थयात्रेचे तिकीट बुक करून ठेवले.

शुक्रवार, १८ सप्टेंबर, २००९

डोळ्यांची "शाळा'


गुरुजी! गुरुजी! पाचवीच्या वर्गात मुन्ना आणि बंटी भांडताहेत. एकमेकांच्या गळपट्ट्या धरताहेत. स्टाफरुमध्ये पळत आलेल्या दक्षिण्यानं धापा टाकत गुरुजींना सांगितलं. बहुतेक या भांडणात त्यालाही दोन-तीन बसल्या असतील, असा त्याचा अवतार बघून गुरुजी उठले आणि त्याच्याबरोबर चालू लागले.
काय रे आज काय कारण ः गुरुजी
काही नाही गुरुजी कमळीला वही कोणी आणि कशी दिली त्यावरून भांडणं सुरू आहेत.
म्हणजे? ः गुरुजी
अहो! गेल्या वाढदिवसाला मिळालेल्या वह्यांपैकी एक वही बंटीनं कमळीला दिली, तर मुन्नानं बाजारात जाऊन विकत घेऊन वही दिली.
मग देईनात की! यात भांडायचं काय?
तसं नाही गुरुजी, पण कमळीनं दोघांच्याही वह्या घेतल्या ना.
गुरुजींना आता कळेना. अरे वह्या दिल्या म्हटल्यावर घेणारच. त्यात भांडायचं कारण काय ः गुरुजी
तसं नाही गुरुजी, तिनं बंटीकडून वह्या घेताना बंटीला डोळा मारला, तर मुन्नाकडून घेताना मुन्नालापण डोळा मारला. आता त्यांच्यात भांडण चाललंय, ते डोळा खरा मारला कुणाला.
गुरुजींचं डोकं फिरलं अरे गेली पाच वर्षे बघतोय एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून चालणारे हे दोघे एकदम भांडायला का लागलेत.
काय रे, ते दोघे भांडताहेत का?
काही नाही गुरुजी, वहीचं निमित्त आहे सगळं. दोघांचाही जीव आहे कमळीवर; पण ती नेमकी कुणाची हेच कळेना. मग तिला पटवायला दोघंही काही ना काही करताहेत आणि भांडणात अडकताहेत. दक्षिण्यानं खुलासा केला.
........
गुरुजी आणि दक्षिण्या वर्गाजवळ येतात
........
मुन्नानं बंटीची आणि बंटीनं मुन्नाची गळपट्टी धरलेलेली. दोघं एकमेकांकडं बघून दात-ओठ खात भांडत होते. गुरुजी आलेले बघून दोघंही आपापल्या बाकावर जाऊन बसले.
काय रे, आतापर्यंत तुम्ही चांगले मित्र होता ना? अगदी हातावर बांधलेल्या घड्याळासारखं नातं होतं ना तुमचं, मग असं भांडताय का? ः गुरुजींनी प्रश्‍नपत्रीकाच उघडली.
गुरुजी, मी आपला माझ्या रस्त्यानं चाललोय; पण हाच "वाम' मार्गाला लागलाय. बंटीनं खुलासा केला.
वाम मार्गाला! एवढूश्‍या पोरांकडून वाम मार्ग वगैरे ऐकून गुरुजींना घामच फुटला.
मागच्या वेळी नाही का डाव्यांबरोबर हा लग्नात अक्षता घेऊन उभा होता. बंटीनं आपलं घोडं पुढं दामटलं.
नाही, गुरुजी मी माझ्या रस्त्यानं चाललोय. यालाच मी आडवा येतोय, असं वाटतंय. त्याला मी काय करू. आपलं उगाच ज्यात-त्यात नाक खुपसायचं. कमळीवरच नाही, तर काकांच्या साखरेवरही याचा डोळा होता, आता त्यात काही जमलं नाही म्हणून माझ्याशी भांडतोय. मुन्नानं आपलं म्हणनं मांडलं.
आता गुरुजींना काहीच समजेना. कमळी काय, साखर काय, डावा काय, काही काही कळेना. त्यांनी मघाशी त्यांच्याकडे आलेल्या दक्षिण्याला जवळ बोलावलं आणि विचारलं, ही भानगड काय आहे.
भानगड वैगेरे काही नाही गुरुजी. कमळी एकदा याला डोळा मारते तर एकदा त्याला; पण ती नेमकी कोणाची होणार हेच कळत नाही.
पण आतापर्यंत ती त्या दिंगतात कीर्ती असणाऱ्या विजयबरोबर फिरत होती ना.?
होती की. मागं एकदा तिची साथ सुटली ती अजून काय जमली नाही बघा. त्यामुळे आता ती नेमकी कोणाला होय म्हणणार हेच कळत नाही. एवढंच नाही तो किल्ल्यावरचा आपला संजयही तिच्यावर बाण रोखून आहे.
बाण ः गुरुजी
नयनबाण.
मग त्यालाही डोळा मारते की काय ती... गुरुजींनी आवाक होऊन विचारलं.
काय माहीत, आता 22 आक्‍टोबरलाच काय ते कळेल.

गुरुवार, १७ सप्टेंबर, २००९

गर्दीतील "माणूस'



कोल्हापूर एसटी स्टॅंडवर सोलापूर फलाटावर बसलेल्या त्या वृद्धेकडं लक्ष जाण्याचं काहीच कारण नव्हतं. विस्कटलेले पांढरे केस, अस्ताव्यस्त झालेली मळकी साडी, शेजारीच गाठोडेसदृश असलेली पिशवी आणि त्यावर असलेली काठी बघून ती कोणी भिकारीच वाटत होती. गाडीची वाट पाहणाऱ्या स्टॅंडवरील माझ्यासारख्या अनेकांनी तिच्याकडं बघून न बघितल्यासारखं केलं; पण मला मात्र तिची आशाळभूत नजर अस्वस्थ करत होती. तिच्याकडं लक्ष द्यायचं नाही असं ठरवूनही नजर मात्र तिच्याकडंच वळत होती. अर्ध्याएक तासात तिच्याजवळून जवळपास पन्नासएक लोक इकडेतिकडं गेले; पण तिनं कोणाकडेच पैसे मागितले नाहीत आणि कोणी तिला पैसेही टाकले नाहीत. एवढ्यात एक पन्नाशीचा विजार-शर्ट घातलेला माणूस तिथं आला. तो काहीतरी तिच्याशी बोलला आणि निघून गेला. मला वाटलं काही पैसे देऊन तो गेला असेल; पण तो परत आला. त्याच्या हातात ब्रेड आणि पेला होता. बहुतेक त्यात चहा असावा. तिनं तो ब्रेड आणि चहा संपवला. तो माणूस पेला घेऊन परत गेला आणि पुन्हा आला. एसटीची चौकशी करून परत तिथं आला. मग मात्र मला राहावलं नाही. मी त्याच्याजवळ गेलो. शांतपणे त्यांच्या मागे उभा राहिलो, तो तिला सांगत होता, "आता लगेचच एसटी आहे.' एवढ्यात एसटी लागली. त्यानं तिची काठी आणि गाठोडं एका हातात घेतलं आणि दुसऱ्या हातानं तिला आधार दिला. मला ते गाठोडं घ्यावं वाटलं; पण धीर झाला नाही. त्यानं तिला सोलापूरच्या एसटीत बसविलं आणि कंडक्‍टरकडून तिकीट घेतले. तिच्या त्या गाठोड्यात ते ठेवत त्यानं ते कुठे ठेवलं ते कंडक्‍टरला दाखविलं. जाताना पन्नासाची नोट तिच्या हातावर ठेवत रिक्षानं जा, असं त्यानं सांगितलं. एसटीतून उतरल्यावर मी त्याला नाव विचारलं, पण तो फक्‍त हसला आणि ज्या गर्दीतून तो आला होता त्याच गर्दीत पुन्हा मिसळला. कोण असावा तो?

सोमवार, ७ सप्टेंबर, २००९

प्राथमिक शिक्षकांची मानसिकता बदलायला हवी


कल्याणकारी राज्यात सरकारी दायित्त्व फार मोठे असले तरी ज्या समाजाच्या जाणिवा जाग्या असतात त्या समाजाला सरकारपेक्षा स्वतःवरच फार विश्‍वास असतो आणि आज तोच डळमळताना दिसत आहे. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा खालविण्यात अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे शिक्षकांची बदललेली मानसिकता हा आहे, आणि त्यावर फार कमी प्रमाणात लक्ष दिले जात आहेत.

प्राथमिक शिक्षकांची मानसिकता बदलायला हवी


दहावीची मंडळाची परीक्षा असावी की नसावी हा वाद गेली अनेक वर्षे अधूनमधून डोके वर काढतो, त्याप्रमाणे तो सध्याही जोरात सुरू आहे. शिक्षणतज्ज्ञांतच दोन मोठे गट पडले आहेत. त्यांच्या जोडीला मानसशास्त्रतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्तेही हिरीरीने सहभागी होताना दिसत आहेत. मोठ-मोठी चर्चासत्रे बोलाविली जात आहेत आणि त्या चर्चासत्रांना शहरात इंग्रजी शाळांत शिकणारे आणि शिकविणारे दोघेही पोटतिडकीने मते मांडत आहेत. शैक्षणिक गुणवत्तेपेक्षा परीक्षाकेंद्रीत विद्यार्थी बनत चालल्याची ओरड सगळेच करत आहेत आणि त्याच्या बाजूने आणि विरोधात मते मांडली जात आहेत. ज्याप्रमाणे इतर सर्वच क्षेत्रात ग्रामीण भागाचे प्रश्‍न शहरातील मंडळी अभ्यासूपणे मांडतात त्याचप्रमाणे शिक्षणाच्या दर्जाविषयीही जमीनस्तरावर काम करणाऱ्या खेडेगावातील शिक्षकाला न विचारता शहरात राहाणाऱ्या आणि कधी तरी ग्रामीण भागात जावून शाळांना भेट देणाऱ्या तथाकथीत शिक्षणतज्ज्ञांना विचारुन निष्कर्षापर्यंत पोहचले जात असल्याचे चित्र आहे.
आज प्राथमिक शिक्षणाचा दर्जा खालावला आहे आणि हा खालाविण्याचा आलेख आणखी तीव्र होत असल्याचे म्हणणे सगळेच मांडताना दिसत आहेत. प्राथमिक शिक्षण हा संपूर्ण व्यक्‍तीमत्त्वाचा एक महत्त्वाचा (अपवादात्मक ठिकाणी नसला तरी) घटक आहे हे सारेच मान्य करतात. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा खालाविण्याला सरकार आणि सरकारची धोरणेच जबाबदार आहेत हा सरळ साधा निष्कर्ष मांडला जातो. कल्याणकारी राज्यात सरकारी दायित्त्व फार मोठे असले तरी ज्या समाजाच्या जाणिवा जाग्या असतात त्या समाजाला सरकारपेक्षा स्वतःवरच फार विश्‍वास असतो आणि आज तोच डळमळताना दिसत आहे. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा खालविण्यात अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे शिक्षकांची बदललेली मानसिकता हा आहे, आणि त्यावर फार कमी प्रमाणात लक्ष दिले जात आहेत.
शिक्षण देणे हे पुण्यकर्म संपून आठ-दहा दशके उलटून गेली असली तरी शिक्षकीपेशातील त्याग अजून टिकून होता. त्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन नक्‍कीच चांगला होता. अगदी पंधरा वर्षांपुर्वीचे प्राथमिक शिक्षक आणि सध्याचे शिक्षक यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. फरक केवळ विजार जावून पॅंट आली आणि गुरुंजीचे सर झाले या बाह्य रुपात नाही तर शिक्षकांचा शिक्षकीपेशाकडे बघण्याचा आणि समाजाचा शिक्षकांकडे बघण्याच्या दृष्टीचा अर्थात मानसिकतेचा फरक आहे.
अगदी 70 च्या दशकांपर्यंत शिक्षकच विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचे शिल्पकार होते. एखादा विद्यार्थी शाळेत आला नाही तर त्याला घेवून येण्यासाठी वर्गातीलच चार मुलांना पाठवत असत. उचल बांगडी हा प्रकार त्यावेळी सर्रास चालायचा. शाळेबाहेरही जर एखादा मुलगा उनाडक्‍या करत असेल तर त्याला शाळा मास्तरांचा धाक असायचा अर्थात या धाकापोटी अनेक विद्यार्थ्यांनी शाळेला कायमचा रामराम केला ही गोष्ट खरीच पण मुलांना प्रत्येक गोष्ट ही आलीच पाहिजे हा ध्यास पराकोटीचा होता. इतर कोणत्याही नोकरीपेक्षा त्याकाळात शिक्षकाला मिळणारा पगार तुटपुंजा असला तरी त्यात तो समाधानी असायचा. शाळाबाह्य उपक्रमातही शाळेतीलच जे विद्यार्थी कच्चे आहेत त्यांना शिकविण्याचा एकमात्र धंदा असायचा (कोणतीही फी न घेता). विद्यार्थ्यांत सामाजिक जाणिवा जागृत करण्यात या शिक्षकांचा हात सर्वात मोठा होता. विशेष म्हणजे ज्या समाजातून (जातीचा इथे संदर्भ नाही) विद्यार्थी येत त्याच समाजातून शिक्षक येत असल्याने विद्यार्थ्यांना तो आपला वाटे. त्याने दिलेली उदाहरणे आपली वाटत आणि ती त्यांच्या जगण्यातील होती.
पण गेल्या दोन दशकांत शिक्षकांत प्रचंड बदल होत गेला. मास्तराचा गुरुजी आणि गुरुजीचा सर होणाऱ्या बदलात धोतर जावून विजार आणि विजार जावून जीन्स एवढाच फरक राहिला नाही तर शिक्षक समाजापासून दुरावत गेला. त्यामुळे विद्यार्थी शिक्षक यांच्यातील दरी रुंदावत गेली. प्राथमिक शिक्षणाचा उगम आणि संगम शहरी आणि ग्रामीण भागात एकच असला तरी त्याचा प्रवाह वेगवेगळ्या स्तरातून वाहतो आणि हाच मुद्‌दा बऱ्याचदा दुर्लक्षीत राहातो. शहरातील प्राथमिक शिक्षणापुढची संकटे वेगळी आणि ग्रामीण भागातील वेगळी आहेत. जीथे शहरात एका संथ लयीत प्राथमिक शिक्षण देणे सुरु आहे त्याचवेळी ग्रामीण भागात त्याची वाट फारच बिकट आहे. अनेक बांध पार करुन त्याला संगमापर्यंत पोहाचावे लागते. त्यामुळे या प्रवाहात पडलेल्यांना मार्गदर्शन करणारेही तितक्‍याच ताकदीचे पोहणारे हवेत.
गाव तेथे शाळा आणि वर्ग तिथे शिक्षक ही योजना कितीही लाभदायक वाटली तरी तिचे परीणाम मात्र तितकेसे चांगले दिसत नाहीत. शिक्षकांना मिळणारा पगार आणि त्यांना मिळणाऱ्या अनेक सोयी-सुविधांमुळे अनेकजण शिक्षकीपेशाकडे वळले आहेत. यात नागरी विद्यार्थी जसे आहेत तसेच ग्रामीण भागातीलच नागरी बेटांच्या संस्कृतीत वाढलेल्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी ज्या सामाजिकस्तरातून येतात त्या समाजाशी शिक्षकांचा संबंध असत नाही. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी ही दरी केवळ रुंद होत नाही तर ती खोलही होत आहे. त्यामुळे शिक्षक एका परीने शिकवत राहातो आणि विद्यार्थी कोरडाच राहातो. त्यामुळे दहावीपर्यंत पोहचलेला विद्यार्थी दहावीत नापास होतो.
मला काय करायचे, मी एकटा काय करणार, माझा पगार थांबणार आहे थोडीच , या मानसिकतेतूनच विद्यार्थ्यांना शिकविलं जाते. याला काही अपवाद आहेत पण सर्रास हेच दिसत आहे. हे चित्र ग्रामीण आणि शहरात सारखेच दिसत असले तरी त्याचा विचार मात्र पुन्हा वेगळा करायला हवा. एखाद्या विद्यार्थ्याला शहरात एखादी शाळा नाही आवडली तर त्याला पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे संधी दवडली जाण्याची शक्‍यता कमी आहे. पण ग्रामीण भागात शाळाच एक, एकशिक्षकी असल्याने तिथे जे पदरात पडलं आहे ते पवित्र मानायला हवे. एकंदरीतच प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावयचा असेल तर प्राथमिक शिक्षकांची मानसिकता बदलायला हवी.(त्यांच्यावर असलेल्या शालाबाह्य कामांना गृहीत धरुन).

गुरुवार, २७ ऑगस्ट, २००९

मोठी माणसं...

"तुम्ही जेवढे लहान होता, तेवढेच तुम्ही मोठे होता' अशा अर्थाचा इंग्रजीत एक वाक्‌प्रचार आहे. त्याचा प्रत्यय या महिन्यात दोनदा आला. मॅगसेसे पुरस्कारविजेते आणि "नाही रे' वर्गाचे प्रश्‍न पोटतिडकीने मांडणारे पी. साईनाथ व संपूर्ण जगाला दहशतवादी "कसाब' कोण हे दाखविणारे ज्येष्ठ छायाचित्रकार श्रीराम वेर्णेकर यांच्याशी संवाद साधण्याचा योग जुळून आला. दोघेही पत्रकार. आपल्या पेशाशी प्रामाणिक आणि तितकीच मोठी माणसंही. पी. साईनाथ यांच्याशी संवाद साधताना त्यांच्यातील प्रांजळ माणूस प्रखरतेने भेटला. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रश्‍नांवर जरी मी लक्ष वेधले असले तरी "इनाडू'ने (आंध्र प्रदेशमधील एक दैनिक) हा प्रश्‍न सर्वात आधी खूप जोरकसपणे मांडला, हे सांगायला ते विसरले नाहीत किंबहुना त्याचे सारे श्रेय आपले एकट्याचे नसल्याचेही त्यांनी नम्रपणे सांगितले. खरे तर पी. साईनाथ यांच्या पत्रकारितेमुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडे सरकारने गांभीर्याने पाहिले हे सर्वज्ञात आहे; मात्र तरीही त्याचे सर्व श्रेय घेण्यापेक्षा त्यांनी ते इनाडूच्या संबंधित पत्रकाराला दिले. यातच त्यांचे मोठेपण दिसून येते. जगन फडणीस पुरस्कार स्वीकारण्यास आलेल्या श्री. वेर्णेकरांशीही संवाद साधताना दुसरी तशीच मोठी व्यक्ती भेटल्याचे समाधान लाभले. त्यांना एका पत्रकाराने विचारले, की खरंच तुम्हाला स्वतसुरक्षितता, वर्तमानपत्राने दिलेले काम, की सामाजिक दायित्व मोठे वाटते? त्यांनी क्षणाचा विलंब न करता सुरक्षिततेला प्रथम क्रमांक देत सामाजिक दायित्वाला अखेरचा क्रमांक दिला. खरे तर जिवावर उदार होऊनच त्यांनी कसाबचे छायाचित्र काढले. हॅंडग्रेनेड फेकत, गोळीबार करत असलेल्या दहशतवाद्यावर फ्लॅश मारणे म्हणजे मृत्यूचे छायाचित्र घेण्यासारखेच; पण तरीही त्या घटनेला उगाच मोठा साज न चढवता त्यांनी
वास्तविकता मांडली. खरे तर त्यांना कामाप्रति असलेली निष्ठा, त्याबद्दल जिवावर उदार होणे अशा पद्धतीची गुळगुळीत वाझोडता आली असती आणि त्यांच्या तोंडी ती वाईटही दिसली नसती; पण तरीही अत्यंत नम्रपणे त्यांनी परिस्थितीजन्य निर्णय कसे घ्यावे लागतात हेच सांगितले.
या दोन्ही माणसांनी उत्तुंग यश मिळविले. हे यश मिळविताना त्यांनी अपार कष्ट घेतले; पण तरीही त्यांच्या वागण्या-बोलण्यात कसलाही अभिनिवेश नाही. समोरच्यांना तेवढेच योग्य लेखत त्यांचा यथोचित सन्मानच केला, माणूसपण विसरले नाहीत म्हणूनच ते मोठे झाले.

20 जुलै 2009

बुधवार, १२ ऑगस्ट, २००९

प्रति, सुप्रिया मॅडम,

प्रति, सुप्रिया मॅडम,
गेल्या शुक्रवारी पुस्तक घेण्या-देण्याच्या निमित्ताने तुमची भेट झाली. खूप दिवसांपासून तुम्हाला भेटण्याची इच्छा होतीच, पण तसा योग येत नव्हता. तो यानिमित्ताने आला. भेटीपूर्वी तुमच्याबद्दल वाटणारा आदर भेटीनंतर दुप्पट-चौपट झाला. अनेकवेळा आपण एखाद्याचे लेखन वाचतो किंवा त्या लेखकाबद्दल इतरांनी सांगितलेल्या गोष्टीवरुन त्याची मनात एक प्रतिमा तयार करतो. याला मी पूर्वग्रह असं म्हणत नाही, पण अशा चौकटीत आपण लेखकाला ठेवतो. त्यामुळे आपल्यातील अस्वस्थता थोडी कमी होते. तशी एक प्रतिमा तुमच्याबद्दल माझ्या मानात होतीच. पण जेव्हा प्रत्यक्षात तुमच्याशी बोलणं झालं, त्यावेळी प्रत्यक्ष बऱ्याचवेळा प्रतिमेच्या खूपच उत्कट असंत हे माझ्यालेखी पुन्हा अधोरेखीत झालं.(याचं श्रेय मा. भोसलेसाहेबांना जाते.)
एक आठवड्यानंतर पत्र लिहण्याला एक कारण आहे ते म्हणजे तुमची पुस्तके. शुक्रवारी संध्याकाळी "पॉपकॉर्न' वाचायला घेतलं. पहिला लेख वाचल्यानंतर दुसरा आणि दुसऱ्यानंतर तिसरा लेख वाचण्याचा मोह आवरता आवरला नाही. बऱ्याचवेळा रात्री बेडवर पडल्यावर झोप येईपर्यंत पुस्तक नाकासमोर राहातं आणि त्यानंतर ते उलटं छातीवर कधी पडतं हे कळतच नाही..पण एखाद्या लहान मुलापुढे खाऊचा डबा ठेवला तर ते मूल किती हरखून जाईल तेवढाच हरखून गेलो. घड्याळाच्या काट्याकडे लक्ष देत आता हा शेवटचाच लेख वाचायचा आणि झोपायचा असा विचारही केला. लाईट बंद केली पण तरी एक अस्वस्थता कायम राहीली आणि पुन्हा लाईट लावला पुस्तक पूर्ण केलं मगच शांत झोप आली. विशेष म्हणजे मला आता जेव्हा जेव्हा खूप अस्वस्थ वाटेल आणि रिलॅक्‍स होण्यासाठी एक लेख सकाळी आणि एक लेख रात्री वाचण्याचा डोस पुरेल हे नक्‍की!
"टाईमपास' मात्र पाच- सहा वर्षांपुर्वी माझ्या वाचनात आलं नाही हे बरे झाले. बऱ्याचवेळेला शब्दांचा समोरचा अर्थ दिसतो तसा असतोच असं नाही. किंवा एखाद्या वाक्‍याचाही अर्थ असाच संदर्भहीन आला तर त्याच्या छटा वेगळ्याच दिसतात. किमान मला तरी समुहातील शब्द आणि समुहाबाहेरचा शब्द वेगवेगळा भासतो. पुस्तकांत येणारा शब्द हा रिलेतील खेळाडूसारखा असतो अगदी आपल्या हातातील काठी पुढच्या खेळाडूच्या हातात देणारा, तर एकटा शब्द धावण्याच्या स्पर्धेत एकटा धावत असल्यासारखा. त्यामुळे शब्दांचे समोरचेच अर्थ घेण्याच्या वयात मला हे पुस्तक कदाचित आवडलं नसतं. पण आज मात्र हे पुस्तक वाचताना जगण्यातली शुचिर्भूतता ही कल्पनेतच असते पण जसं जगलो तसं मांडणं याला किती धीटपणा असावा लागतो याची जाणीव आहे. त्यामुळे हे पुस्तक डोक्‍यात कमी जातं आणि मनात घर करुन बसतं. प्रोतिमांचं जगणं जितकं प्रवाही आहे, त्याहीपेक्षा तुम्ही केलेलं त्याचं भाषांतर. या प्रवाहात एकदा माणूस पडला की पुन्हा किनाऱ्याचा शोध तो घेत नाही अगदी शेवटापर्यंतच तो येवून पोहोचतो. यासाठी तुम्हाला धन्यवाद!

ता.क. काही व्याकरणाच्या चुका असतील तर क्षमा! मी त्या सुधारण्याचा प्रयत्न करत आहे.

मंगळवार, ११ ऑगस्ट, २००९

चांगदेवाची अवस्था

प्रती,
े,
खरंच चांगदेवाची काय अवस्था झाली असेल, हे मला आत्ता नक्‍की कळते. अर्थात मी चांगदेव नाही आणि तू ज्ञानेश्‍वर नाहीस तरीही मायना काय लिहावा हा प्रश्‍नच होता. परत पत्र लिहिताना एकेरी उल्लेख करावा की आदर व्यक्‍त करावा काहीच कळलं नाही. शेवटी शब्द तरी तुम्हाला कुठपर्यंत साथ देणार फक्‍त भावना महत्वाच्या. त्या व्यक्‍त झाल्या की शब्दांचं काम संपलं. म्हणजे त्यांचं काम हे फक्‍त वाहकांचं. तुमच्या अभियांत्रिकी भाषेत सांगायचं झालं, तर शब्द काही भावनांचे चांगले वाहक नाहीत. गरजेला उपयोगी पडतात एवढाच त्यांचा कार्यभार.
कुणाचे पत्र, का लिहिलं असेल, गरज होती का अशा प्रश्‍नांची एक रांग तुझ्या मनात असणार हे नक्‍की. पण या प्रश्‍नांच्या जाळ्यातून बाहेर आल्यावर तुलाही पटेल. तशी आपली ओळख "तोंडदेखली' असंही म्हणता येत नाही. तरी आपली ओळख आहे. बऱ्याचदा आपल्या भोवती असणारे सगळे आपल्याशी खूप चांगलं बोलत असतात, आपल्याबद्दल त्यांच्या मनात खूप चांगल्या भावना असतात तरीही काही गोष्टींसाठी मात्र त्यांच्याकडे वेळ असतोच असं नाही. जगाच्या दृष्टीने अगदी शुल्लक गोष्टी असतील पण त्या गोष्टी आपल्यासाठी खूप मोठ्या असतात. जगण्याचं बळ देवून जाणाऱ्या असतात. आमचे एक आकाशवाणीवरील सहकारी आहेत, श्रीनिवास जरंडीकर तू नाव ऐकून असशील त्यांना पदोन्नती मिळाली. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांना एखादं पुस्तक भेट देता येईल का हे बघण्यासाठी मी "ग्रंथ'मध्ये गेलो होतो. अनेक पुस्तके बघीतल्यानंतर एक पुस्तक हाती लागलं ते संदीप खरे यांच्या कवितांचे. हा कवितासंग्रह तुलाही आवडेल असा चटकन विचार माझ्या मनात आला. खरे तर तू लेक्‍चरर म्हणून रुजू झाल्यावरच तुला एखादे पुस्तक देवून तुझे अभिनंदन करावे अशी इच्छा होती पण एकतर आपली ओळख अगदीच त्रोटक आणि त्यात तू मुलगी. थोडं स्पष्ट लिहतोय पण त्याला इलाज नाही. यानं मुद्दाम पुस्तक भेट दिलं की काय ही भावना साहाजिक उमटली असती. त्यामुळे तो विचार मी बाजुला ठेवला. खरे तर कविता आवडणारी लोकं खूप आहेत पण कवितांवर प्रेम करणारी लोकं खूप कमी आहेत. आणि मग अशा विषयांवर चर्चा करणारी माणसं मिळत नाहीत. मग अतृप्ततेची भावना रेंगाळत राहते. काहीच सूचत नाही. बिघडलं काय असं कोणी विचारलं तर त्याचं उत्तर काही नाही असंच तर असतं पण बिघाड दुरुस्त कसा करायचा हेही सूचत नाही. अशावेळी तुझ्यासारखे मित्र असणं आवश्‍यक असतं.
तुझ्या नव्या भूमिकेसाठी अभिनंदन !

प्रवीण कुलकर्णी
कोल्हापूर
11 ऑगस्ट 2009

ता. क. तुला आवडलं नसेल तर तसा स्क्रॅपही तू ऑर्कूटवर टाकू शकतेस. थोडं वाईट वाटेल बाकी शुन्य!

प्रती, जरंडीकर सर यांना

प्रती,
जरंडीकर सर यांना,
मोबाईल फोनमुळे आजकाल पत्र लिहिण्याचा सराव उरलेला नाही. किंबहुना आमच्या पिढीने परीक्षेत जेवढी पत्रे लिहिली तेवढीच. बाकी कार्यालयीन रुक्ष पत्रे लिहीत असलो तरी त्याला "अर्ज' (मनातून कितीही राग असला तरी) हेच स्वरूप राहिले. सांगायचा मुद्दा असा, की बऱ्याच मोठ्या कालावधीत पत्र लिहिण्याचा योग तसा आलेला नाही. त्यामुळे पत्रात जर काही चुका असतील तर त्या समजून घ्याल, ही अपेक्षा.
परवाच्या दिवशी तुमच्याशी फोनवर बोलताना तुम्हाला पदोन्नती मिळाली हे समजले. फोनवरुन शुभेच्छाही दिल्या; पण या शुभेच्छात तो ओलावा नव्हता, की काय याची रुखरुख मलाच लागून राहिली. आजकाल शुभेच्छांचे मेसेज या मोबाईलवरुन त्या मोबाईलवर सगळीकडे बागडत असतात, ज्याने धक्‍का दिला त्याचा मेसेज, एवढंच. बाकी सगळा शब्दांचा बुडबुडा. त्यामुळे मेसेज पाठवावा की न पाठवावा या द्विधा मनःस्थितीत होतो. बऱ्याचदा फोनवरुन बोलताना आपल्या नेमक्‍या काय भावना आहेत हे समोरच्याला कळतेच असे नाही. त्यासाठी लागणारे शब्दांचे गुच्छ प्रत्येक वेळी आपल्याकडे असतातच असे नाही आणि मग एखाद्या सुंदर घटनेच्या आनंदाच्या कळ्या फुलतातच असे नाही. त्यामुळे हा पत्राचा अट्टहास.
तुम्हाला मिळालेल्या पदोन्नतीबद्दल अभिनंदन! अगदी खूप वर्षांचा नसला तरी गेल्या तीन वर्षांच्या आपल्या स्नेहात मला हे
माहीत आहे की, तुमचे (सरकारी कर्मचारी असला तरी) कामावर किती प्रेम आहे. आपण पुढच्या आठवड्यात सुटीवर जाणार असाल तर या आठवड्यात बारा बारा तास काम केल्याचे मी बघितले आहे. तुमची कामाबद्दलची निष्ठा आणि झोकून घेणे, त्यासाठी लागणारे कष्ट उपसणे बघितले की तुमच्यापेक्षा आम्ही किती लहान आहे हे लक्षात येते. त्यामुळेच या पदोन्नतीतील आणखी महत्त्व. बाकी तुमच्यापेक्षा वयाने (तांत्रिक अर्थाने), अनुभवाने आणि बुद्धीने सगळ्याच बाबतीत खूप लहान आहे. भावना पोहोचविणे एवढाच या पत्राचा उद्देश, बाकी काहीच नाही.
पुन्हा एकदा तुमचे अभिनंदन!
प्रवीण कुलकर्णी
कोल्हापूर
11 ऑगस्ट 2009

प्रती, जरंडीकर सर यांना

प्रती,
जरंडीकर सर यांना,
मोबाईल फोनमुळे आजकाल पत्र लिहिण्याचा सराव उरलेला नाही. किंबहुना आमच्या पिढीने परीक्षेत जेवढी पत्रे लिहिली तेवढीच. बाकी कार्यालयीन रुक्ष पत्रे लिहीत असलो तरी त्याला "अर्ज' (मनातून कितीही राग असला तरी) हेच स्वरूप राहिले. सांगायचा मुद्दा असा, की बऱ्याच मोठ्या कालावधीत पत्र लिहिण्याचा योग तसा आलेला नाही. त्यामुळे पत्रात जर काही चुका असतील तर त्या समजून घ्याल, ही अपेक्षा.
परवाच्या दिवशी तुमच्याशी फोनवर बोलताना तुम्हाला पदोन्नती मिळाली हे समजले. फोनवरुन शुभेच्छाही दिल्या; पण या शुभेच्छात तो ओलावा नव्हता, की काय याची रुखरुख मलाच लागून राहिली. आजकाल शुभेच्छांचे मेसेज या मोबाईलवरुन त्या मोबाईलवर सगळीकडे बागडत असतात, ज्याने धक्‍का दिला त्याचा मेसेज, एवढंच. बाकी सगळा शब्दांचा बुडबुडा. त्यामुळे मेसेज पाठवावा की न पाठवावा या द्विधा मनःस्थितीत होतो. बऱ्याचदा फोनवरुन बोलताना आपल्या नेमक्‍या काय भावना आहेत हे समोरच्याला कळतेच असे नाही. त्यासाठी लागणारे शब्दांचे गुच्छ प्रत्येक वेळी आपल्याकडे असतातच असे नाही आणि मग एखाद्या सुंदर घटनेच्या आनंदाच्या कळ्या फुलतातच असे नाही. त्यामुळे हा पत्राचा अट्टहास.
तुम्हाला मिळालेल्या पदोन्नतीबद्दल अभिनंदन! अगदी खूप वर्षांचा नसला तरी गेल्या तीन वर्षांच्या आपल्या स्नेहात मला हे
माहीत आहे की, तुमचे (सरकारी कर्मचारी असला तरी) कामावर किती प्रेम आहे. आपण पुढच्या आठवड्यात सुटीवर जाणार असाल तर या आठवड्यात बारा बारा तास काम केल्याचे मी बघितले आहे. तुमची कामाबद्दलची निष्ठा आणि झोकून घेणे, त्यासाठी लागणारे कष्ट उपसणे बघितले की तुमच्यापेक्षा आम्ही किती लहान आहे हे लक्षात येते. त्यामुळेच या पदोन्नतीतील आणखी महत्त्व. बाकी तुमच्यापेक्षा वयाने (तांत्रिक अर्थाने), अनुभवाने आणि बुद्धीने सगळ्याच बाबतीत खूप लहान आहे. भावना पोहोचविणे एवढाच या पत्राचा उद्देश, बाकी काहीच नाही.
पुन्हा एकदा तुमचे अभिनंदन!
प्रवीण कुलकर्णी
कोल्हापूर
11 ऑगस्ट 2009

मंगळवार, १४ एप्रिल, २००९

धर्म, पुतळा आणि गल्लत



त्यानं जगाला हसवलं. हसवताना जात-पात, धर्म कधी पाहिला नाही. परिस्थितीने अनेक वेळा त्याच्याविरोधात बंड पुकारलं; पण त्यानं त्या परिस्थितीला आपल्या कलेत डोकावू दिलं नाही... चार्ली चॅप्लिन हे त्या थोर कलाकराचं नाव. त्याच्या पुतळ्याच्या अनुषंगाने कर्नाटकात निर्माण झालेला वाद यातना देणारा आहे.

एकीकडे महाराष्ट्रात साहित्य संमेलन आणि आनंद यादव यांच्या पुस्तक आणि त्यांच्या संमेलनाध्यक्षपदाच्या अनुषंगाने घडलेल्या गोष्टींबाबत जोरदार चर्चा होत असतानाच तिकडे कर्नाटकातही अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याचा गळा घोटण्यात आला. धर्म आणि कला यांची अनावश्‍यक गल्लत झाल्यावर काय स्थिती निर्माण होऊ शकते, याचे एक उदाहरण सध्या कर्नाटकात पाहायला मिळते. तिथल्या राज्यकर्त्यांनी धर्मालाच कलेच्या खांद्यावर बसवून टाकले आहे. धर्माचा बोजा सहन न होऊन लडखडणाऱ्या कलेकडे राज्यकर्ते त्रयस्थासारखे बघत आहेत. त्यामुळेच ज्याचा धर्म केवळ लोकांना हसविणे हा होता त्या चार्ली चॅप्लीनच्या पुतळ्याला तो केवळ ख्रिश्‍चन आहे म्हणून विरोध होत आहे. केवढा हा दैवदुर्विलास!
चार्ली चॅप्लीन यांचा 67 फूट उंचीचा पुतळा पश्‍चिम किनारपट्टीवरील पदूवारी या गावात उभारण्यात येणार होता. कर्नाटकातील प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक हेमंत हेगडे त्यांच्या आगामी चित्रपटासाठी हा पुतळा उभारणार होते; पण स्थानिकांनी या पुतळ्यास विरोध केला. त्यासाठी प्रमुख कारण होते ते चार्ली चॅप्लीन यांच्या धर्माचे. ज्या जागेवर हा पुतळा उभारण्यात येणार होता, तेथे समोरच एक मंदिर आहे. हिंदूंच्या मंदिराच्या दारात एका ख्रिश्‍चन माणसाचा पुतळा उभा करू देणार नाही असे स्थानिकांचे म्हणणे आहे. मुखवटा स्थानिकांचा असला, तरी हिंदुत्ववादी संघटनांची भूमिकाच स्थानिकांच्या मुखातून बाहेर पडत आहे हे उघड आहे. विशेष म्हणजे हा पुतळा कायमस्वरूपीही नव्हता. केवळ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होईपर्यंतच पुतळा त्या ठिकाणी उभारला जाणार होता. त्यानंतर तो तेथून हलविलाही जाणार होता; पण तरीही स्थानिकांनी त्याला जोरदार विरोध केला.
विशेष म्हणजे प्रशासनाची भूमिका या प्रकरणात बोटचेपी आहे. कलेचे स्वातंत्र्यच धोक्‍यात येत असताना प्रशासन विरोधकांची बाजू घेत आहे. कला आणि धार्मिकता या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कलेला धर्म असत नाही. धर्माच्या पलीकडे कला असते, म्हणूनच कलाकार धर्मातीत असतात. त्यामुळेच त्यांच्या अभिव्यक्‍तीला पाठिंब्याची आवश्‍यकता असते. समाजाने आणि राज्यकर्त्यांनी कलाकारांना प्रोत्साहन द्यावे असे अभिप्रेत असते. इथे कलाकारांना प्रोत्साबन लांबच उलट त्यांना दबावाखाली काम करावे लागत आहे. "विशिष्ट' समुदायाला न आवडणारे भाष्य केले, तर त्यांच्यावर हल्ला होण्याची भीतीही आहे. याची उदाहरणे रोजच समोर येऊ लागली आहेत. स्वयंघोषित धर्म आणि संस्कृतीरक्षकांनी कर्नाटकातच पबमधील महिलांना मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच ही दुसरी घटना घडली आहे. कर्नाटकात अल्पसंख्याकांवर हल्ला, प्रार्थनास्थळांवर हल्ला असे प्रकार तर आता नित्याचेच होऊ लागले आहेत. एका विशिष्ट पक्षाची सत्ता असली, की आपला धार्मिकतेचा अजेंडा पुढे ढकलता येतो हे तथाकथित संस्कृतीरक्षकांना पाठ झाले आहे. त्याचाच फायदा घेत त्यांनी चॅप्लीनच्या पुतळ्यास विरोध केला आहे. पुतळ्याला विरोध करण्यामागे काही तात्विक दृष्टिकोन असता तर तो समजून घेता आला असता; पण केवळ चॅप्लीन ख्रिश्‍चन आहे आणि हिंदू मंदिरासमोर एका ख्रिश्‍चन माणसाचा पुतळा उभा राहणे म्हणजे धर्म बुडणे असा अपप्रचार करण्यात आला. विशेष म्हणजे हा पुतळा कोणा ख्रिश्‍चन मिशनऱ्यांना उभा करायचा नव्हता, तर तो एका हिंदू दिग्दर्शकाला आपल्या चित्रपटासाठी उभा करायचा होता; पण याला अविचाराने विरोध करण्यात आला.
पुतळ्याला झालेला विरोध पाहून कर्नाटकातील नाट्य आणि चित्रपट क्षेत्रांतील अनेकांना धक्‍काच बसला. अभिव्यक्‍ती आणि कलेचा संकोच होतो आहे, असा टाहोही त्यांनी फोडला; पण त्याकडे कोणी लक्ष दिले नाही. एरवी राज्यकर्त्यांना अवैध, अनैतिक कामे करण्यास परवानगी लागतेच असे नाही; पण पुतळ्यासाठी ग्रामपंचायतीने परवानगी दिलेली नाही आणि स्थानिकांच्या भावना महत्त्वाच्या असे समर्थन करण्यात येत आहे. ते दुर्देवी आहे.