रविवार, ३० ऑक्टोबर, २०११

पोपटपंची

सारथ्याने लगाम हातात घेतले आणि चाबूक मारला. घोडे उधळले... रथाने वेग घेतला. हवेत एक धुळीचा लोट उठला... कोणी म्हणाले, आता रथ हाकून काय उपयोग, फार वेळ झाला... कोणी म्हणाले, आता रथ हाकला तरी रथपत्यालाच त्याचा फायदा होईल असे म्हणता येणार नाही... काहींनी मात्र रथपती अजून कसे पट्टीचे रथपती आहेत आणि तेच कसे उद्या सिंहासनावर बसतील, हे ठासून सांगायला सुरवात केली... रथपती मात्र हवालदिल झाले होते... रथातून उठणाऱ्या धुळीपेक्षा या अशाच धुळीची वावटळं त्यांच्याभोवती फिरत होती... यातून मार्ग कसा काढायचा हेच त्यांना कळत नव्हतं... एवढ्यात...
नमस्ते, नमस्ते, नमस्ते....रथपतींकडे बघून पोपट जोरात किंचाळला.. त्या पोपटाकडे बघून रथपत्याने रथ थांबण्यिाचा आदेश दिला. हा पोपट खूप महान दिसतो. नाही तरी आपल्या मनात असलेला "नमस्ते' त्याला कसं कळलं. रथपती खाली उतरले. समोर पोपटवाला आपल्या पोपटाला डाळ खाऊ घालत होता.
महाराज... महाराज... रथपतींनी धोशा लावला... पोपटवाला खूश झाला. एवढा मोठा रथपती, पण आपल्यासमोर येऊन थांबल्याचे त्याला आश्‍चर्य वाटले. पण जमेल तितके आश्‍चर्य त्याने लपवले.
रथपतीने पुन्हा धोशा लावला...
महाराज... महाराज... नमस्ते सदा वत्सले केलं, यात्रा काढल्या, लोहपुरुषाची बिरुदावली मिरवून घेतली, अनेक जिने चढलो तरी माशी कुठं तरी शिंकते आहे. पंतप्रधानपदाची रेष काही हातावर उमटत नाही... काही तरी उपाय सांगा महाराज... उपाय सांगा? त्यांनी आपल्या थरथरत्या हाताने पोपटवाल्यासमोर "नोट' ठेवली. पोपटवाल्याने एकदा नोटेकडे आणि दुसऱ्यांदा रथपतींच्या चेहऱ्याकडे बघितले.
"लाल'बुंद चेहऱ्यावरची चिंतेची "कृष्ण' रेघ पोपटवाल्याला उठून दिसली.
पोपटवाल्याने नोट दाखवताच पोपटाने एक कार्ड चोचीत पकडले आणि पोपटवाल्याच्या हाती दिले.
""तुम्ही म्हणता तेवढं पक्षानं तुम्हाला दिलं नाही, लोकांना तुम्ही पुढं आणता, पण लोक मात्र तुमचं नाव घेत नाहीत. तुम्ही धाडसाचे, पण आता वय साथ देत नाही... "रामा'चं नाव सोडल्यापासून त्रास फार होतो आहे. ''
पोपटवाल्याने आपल्या तोंडाचा पट्टा सुरू केला. रथपतींची अस्वस्थता वाढू लागली. हा पोपट भलताच हुशार निघाला.
""महाराज भूतकाळ चांगला सांगितलात; पण भविष्याचं काय? पंतप्रधान होईन का नाही...?''
पोपटवाल्याने मघाशी ठेवलेल्या नोटेकडे पुन्हा बघितलं. रथपतींच्या रथाच्या मानाने "नोट अगदीच तोकडी होती. त्या नोटेकडे बघून काय भविष्य सांगायचं हेच त्याला कळेना.
""तुमची इच्छा फार, पण दैव साथ देत नाही. तुमच्या मार्गात चार चार ग्रह वक्री आहेत. त्यांची शांती केली पाहिजे. ''
""त्यासाठी उपाय काही महाराज... ''रथपत्याने आग्रह सोडला नाही.
""उपाय भारी आहे... पण झेपला पाहिजे. नागासाठी दुधाचा पूर आणला पाहिजे. मेद आणि मोद दोन्ही वाढले, की पदापर्यंत पोचण्याचा मार्ग आणखी कठीण... त्यामुळे तब्येत चांगली ठेवण्यासाठी "गड' सर केले पाहिजेत. ''
""महाराज मग तरी मार्ग सुकर होईल ना?''
""एवढं करूनही खरे तर सांगता येत नाही.''
""का का महाराज? आता आणखी काही अडचणी..?''
""अडचणी खूप आहेत.'' पोपटवाल्याने "नोटे'कडे पुन्हा लक्ष देत सांगायला सुरवात केली. ""अहो राहू आणि केतूचा अनिष्ट काळ चालू आहे. हे दोन्ही जोपर्यंत तुमच्या कुंडलीत आहेत तोपर्यंत या पदापर्यंत पोचणे अवघडच.''
""मग यावर काही उपाय...?''
""उपाय आहे, पण तो जालीम आहे. "भागवत' धर्माचा आधार घ्यायला पाहिजे... त्या मोहनासमोर नतमस्तक झालं की सगळं ठीक होतं. ''
पोपटवाल्याचा हा उपाय ऐकून रथपती उठले. त्यांनी पोपटवाल्याला नमस्कार केला आणि ते निघू लागले.
एवढ्यात पोपटवाला मोठ्याने बोलला,
""आणखी एक करायचे... लोकसभेत सरकार पाडण्यासाठी "नोट' कामाला आली नसली तरी चांगलं भविष्य ऐकण्यासाठी "चांगली नोट नकामी येते.''

***30 आक्‍टोबरच्या "ंसकाळ'मध्ये छापून आलेला माझा लेख***

उंटाचं पोर...

नदीच्या त्या पुलावरून जाताना त्याला नेहमी तिथं थांबावं वाटायचं. नदीच्या दोन्ही बाजूला पसरलेल्या त्या हिरवळीवर मस्त पडून राहावं, त्या हिरवळीवरून प्रतिबिंबित झालेली उन्हं अंगावर झेलावीत. रात्री तिथून चांदण्यांचा प्रकाश अंगावर ल्यावा, असं काहीबाही त्याला वाटत राहायचं. नदीवरील पुलावरून जाताना त्याची जी स्वप्नं सुरू व्हायची ती ऑफिस येईपर्यंत. स्वप्न बघणं हा त्याचा जणू नित्यक्रमच बनला होता. नदीपेक्षा तिचा किनारा त्याला फार आपला वाटायचा. त्या किनाऱ्यावर बसून दिवस अन्‌ दिवस घालवावा, असं त्याला वाटत राहायचं. पण ही स्वप्नांची माळ ऑफिसच्या दारात येताच विरून जायची. कामाच्या ओझ्याखाली माळेचे मणी पिचून जायचे. पण दुसऱ्या दिवशी परत ते मणी चमकत त्याच्या डोळ्यासमोर यायचे आणि त्यातील धाग्याप्रमाणे तो त्यात गुंगून जायचा. आजही त्यानं पुलावरून जाताना सहज त्या नदीकिनाऱ्याकडं बघितलं आणि त्याला आश्‍चर्य वाटलं. एक उमदा उंट... छे उंटीण असावी ती... तिच्यासोबत एक पिल्लूही होतं. अगदी तिच्यासारखंच... त्या किनाऱ्यावर होती... ती उंटीण कुणाचीही पर्वा न करता त्या कुरणात हिंडत होती. तिचं ते पिल्लू तिच्या मागे मागे करत होतं. त्यांच्या मागे दोन-तीन गाढवं आणि एखाद-दुसरी मेंढी. त्या हिरव्यागार हिरवळीवर मनसोक्‍तपणे चरणारी ती उंटीण, त्या गाढव आणि मेंढ्यांचे जणू नेतृत्वच करीत होती. कळपाच्या प्रमुखाप्रमाणे ती डौलदारपणे, आपल्याच मस्तीत चरत होती. त्यानं गाडी थांबविली आणि त्या उंटीणीला न्याहाळायला सुरवात केली... तपकिरी रंगाचे ते उमदे जनावर एखाद्या राजाच्या सांडणीस्वारांच्या
तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या सैनिकाने प्रेमाने वाढवावे त्याप्रमाणे असावे असे वाटले. तिचे ते भुरभुरीत केस नदीवरून वाहणाऱ्या वाऱ्यांना कुठलीच दाद देत नव्हते. कशाचीच तमा न बाळगता आपल्या ऐटीत ती उंटीण चरत होती आणि तिच्या मागून ते पिल्लू... ती गाढवं... आणि मेंढ्या...
ती उंटीण चरत होती त्याच्या पलीकडेच थोड्या अंतरावर काही माणसांची लगबग चालू होती. गेल्या पावसाळ्यात पुराने खचलेली जमीन भराव टाकून ते ती सपाट करत होते.
मग रोज तो त्या पुलावर थांबून त्या उंटीणीला आणि तिच्या पिलाला निरखायचा. ती उंटीण आणि तिचं ते विजातीय कुटुंब आपल्या मस्तीत त्या कुरणावर ताव मारायचं. ती उंटीण मध्येच आपल्या पिलाला चाटायची... त्याची माया करत राहायची..
आता त्या पलीकडचा भराव टाकून तिथं पालं उभी राहिली होती. कधी कधी तो आता त्या उंटीणीबरोबर त्या पालांकडेही नजर टाकायचा. त्या पालांतून खेळणारी मुलं आणि तेथील माणसांना निरखायचा. खरे तर त्यांच्या त्या मुक्‍त जगण्याचा त्याला हेवा वाटायचा. खास करून त्या पालातील "त्या' माणसाचा. तो त्या उंटीणीप्रमाणेच त्या पालांचा प्रमुख असावा. काळाकुट्ट, पिळदार शरीराचा, त्याच्या दंडावरचा तो काळा दोरा आणि उंटीणीच्या गळ्यातील काळी दोरी यामध्ये त्याला बरेच साम्य दिसायचे. तो पुलावर थांबून त्याला निरखायचा. शहरात फिरतानाही तो कुठे कुठे दिसायचा, कधी गटार खणताना, कधी कुठल्या इमारतीच्या बांधकामावर काम करताना, तर कधी त्या उंटीणीवर पोरांना बसवून फेरफटका मारताना... अलीकडे तो त्याच्याकडे बघतो हे त्यालाही कळले होते. त्यामुळे तोही याच्याकडे बघून ओळखीचा हसायचा, पण दोघांत बोलणं व्हायचं नाही. कधी कधी रात्री ऑफिसमधून परतताना त्याच्या पालाशेजारी लावलेली शेकोटी त्याला दिसायची. त्या शेकोटीभोवती तो आणि त्याची बायको आणि त्याची ती दोन चिल्लीपिल्ली दिसायची. त्या कडाक्‍याच्या थंडीत ती तिथंच झोपलेली असायची. कधी अंगावर पांघरुण असायचे तर कधी तेही नसायचे. तो मात्र रात्रीच्या जागत्यासारखा त्या सगळ्यांसाठी जागा असायचा. ती उंटीण आणि तिचं पिल्लूही तिथेच असायचे... थंडी संपली तसे ते नदीभोवतीचं ते गवतही आता खुरटलं होतं. उन्हाच्या सरळ किरणांना ती उंटीण जुमानायची नाही. खरे तर ती सरळ किरणांना आपल्या तिरप्या मानेवर झेलत जणू आव्हान द्यायची... भर उन्हात काम करताना तिचा मालकही उन्हाला आव्हान द्यायचा. त्याच्या त्या रापलेल्या काळ्या शरीरावर घामाचे थेंब मोत्यांसारखे चमकायचे... आता अलीकडे तो त्याच्याकडे बघायचा. हसायचा. "क्‍या साब' असं बोलायचाही. त्यालाही बरं वाटायचं.
पावसाळा सुरू झाला तसं नदीचं पाणी वाढू लागलं. नदीने आपला विस्तार करायला सुरवात केली. तिथली बरीच पालं उठली होती... फक्‍त त्याचे पाल तिथे तसेच होते... पावसाच्या धारांत पालांचे कापड टिकाव धरत नव्हतं. त्यावरचा प्लास्टिकचा कागद वाऱ्यावर उडून जायचा. तो मालक त्या पालाला ठीक करायचा प्रयत्न करायचा... पण तो कुठे टिकाव धरणार होता... तो आता त्याच्याकडे बघायचा; पण हसायचा नाही. ती उंटीण आणि तिचं ते पिल्लू आता नदीपासून दूर रस्त्याकडेला झाडाचा आडोसा घेत उभे राहिलेले असायचे... तिचे ते विजातीय कुटुंब एक एक करत गायब झालं होतं. बहुतेक मालकाने ते विकले असावे. आता पावसामुळे त्या उंटीणीचे तपकिरी केस काळे पडले होते. त्या उमद्या जनावराला काय करावे तेच कळत नव्हते. पाऊस त्याच्या अंगावर पेलवत नव्हता. जणू पावसाने त्याचे अंग कुजवायला सुरवात केली होती. अंगावर अनेक जखमा झाल्या होत्या. त्याच्याकडे बघवत नव्हते. तिच्या जखमी कासेमुळे पिलाचीही उपासमार होत असावी. पावसाने ते फार बिथरलं होतं. त्या एवढ्याशा जीवाला तो पाऊस सहन होत नव्हता... येणारे-जाणारे रस्त्यात थांबून त्या उंटीणीकडे बघायचे, पिलाबाबत हळहळायचे आणि मालकाला शिव्या घालायचे... पाऊस जोराचा सुरू होता... नदीचे पाणी वाढत होते... एके दिवशी त्या पालाशेजारी कसलीशी गर्दी झाली म्हणून तो पाहायला थांबला... काही प्राणीप्रेमी त्याची ती उंटीण घेऊन चालले होते... तो दयावया करत होता. पाया पडत होता... जगण्याचे तेच एक साधन राहिल्याचे वारंवार सांगत होता. पण ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते... प्राणीप्रेमींपैकी एकाने त्या उंटीणीचे पिल्लू ओढत आणले. त्याने त्याच्यासमोर उभे केले आणि त्याला दोन शिव्या घातल्या.
बघ. या छोट्या जीवाचे हाल काय झाले आहेत... तुम्हाला जनावरं सांभाळता येत नाही तर पाळता कशाला... त्यातील एकाने आणखी शिवी हासडली. तो रडत होता. गयावया करत होता. आता ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. त्यांनी एक मोठा ट्रक आणला.. त्यात त्या उंटीणीला आणि त्या पिलाला घातले. ट्रक गेला, तशी गर्दी ओसरली. पावसाची रिमझीम सुरूच होती. परवाच्या जोराच्या वादळी पावसानं त्याचे ते पाल पार विस्कटून गेलं होतं. तो, त्याची बायको आणि त्याचं ते चार-पाच वर्षांचं पोर त्या गेलेल्या ट्रककडे शून्य नजरेने बघत होते. पुढे जावं. त्याच्या खांद्यावर हात ठेवून धीर द्यावा म्हणून तो पुढे गेला. तो पुढे झाला तशी त्याची बायको पालात शिरली...
त्यानं त्याच्या खांद्यावर हात ठेवला. एवढ्यात त्याच्या डोळ्यातील पाण्याचा लोट बेभानपणे सुटला.
"साब..' एवढाच शब्द त्याला ऐकू आला अणि मग पालाच्या आत गेलेल्या त्याच्या बायकोचा जोराचा हुंदका....
साब ए लोक पुछते है, उस बछडे को देखा क्‍यों नही... परसो रात आयी बाढ में मेरा बच्चा बह गया... पुलीसने कहा यहॉं गैरकानुनी रहते हो! ...किसी से कुछ नही कहना... नही तो जेल में सड जाओगे...
त्याला काही सुचेनासं झालं... इथं उंटाच्या पोरापेक्षा माणसाचं पोर फार स्वस्त झालं होतं...!!

*** आकांक्षा दिवाळी अंकात छापून आलेली लघुकथा***

दोन पत्रं


आता वाहनांची वर्दळ बरीच कमी झाली होती. रात्रीचे 12 वाजून गेले असतील, मघापासून पुलाभोवती फिरणारा तो पुलाखाली आला. पुलाच्या एका खांबाशेजारी एक दगड होता, त्यावर तो रेलून बसला. दिवसभर वणवण करत भटकलेले शरीर थकून गेलं होतं. पण पोटातील भूक डोळ्यातील झोपेला अडवून धरत होती. त्यानं खूप प्रयत्न केला; पण झोप येत नव्हती. डोळ्यासमोरून बायको आणि पोराचा चेहरा जात नव्हता; काय करत असतील... हाच विचार त्याच्या मनात येत होता... कदाचित बायको रडून रडून थकून गेली असेल... बिचारीच्या डोळ्यातील पाणी आटलं असेल पण हुंदका अजून तसाच असेल.... खूप प्रेम करायची...तिच्यामुळेच पूर्णत्व आलं आहे.... पण.... पोराला अजून काही कळत नाही. पण आपला बाबा चार दिवसांपासून घरी का परतला नाही, हा प्रश्‍न त्यालाही पडला असेलच. हा प्रश्‍न विचारून विचारून त्यानं आईला भंडावून सोडलं असेल. त्याला दोघांची काळजी वाटली... त्यांच्या आठवाने त्याचे डोळे भरुन आले...त्याने हलकेच गालावर आलेले थेंब पुसले...

चार दिवसापूर्वी ऑफीसला जातो सांगून तो बाहेर पडला होता. तो अद्याप घरी पतला नव्हता. चार महिन्यापूर्वीच कंपनीने त्याला मंदिच्या कारणावरून काढलं होतं. बायकोला हा धक्‍का सहन होणार नाही... बिचारी फार सोसते आणि आता विचारांनीही खंगायची... लग्नापासून तिच्या अंगाला तसं काही लागलंच नाही...कदाचित मला सोडून जाईल...छे ती सोडून जाण्याचा विचार येताच त्याला कसंतरी झालं... तिच्याशिवाय मी नाही जगू शकत. ती आहे म्हणून मी आहे....वीज चमकावी तसा तो विचार त्याच्या मेंदूतून सरसरला.... त्यामुळे त्यानं ही गोष्ट बायकोला सांगायचं टाळलं.मग तो रोज ऑफीससाठी म्हणून बाहेर पडायचा आणि नोकरी शोधत कंपन्यांची दारं झिजवत राहायचा. दिवस जात होते आणि जमा पुंजी संपत होती. दोन महिने खुळ्या आशेतच गेले. आता त्याला निराशा येऊ लागली होती, पण काहीतरी प्रयत्न केलेच पाहिजेत म्हणून तो रोज घराबाहेर पडायचा आणि रात्री उशिरा परतायचा. पण काही उपयोग व्हायचा नाही.... घरात बायको-पोरापुढे हसताना... त्यांच्याशी गप्पा गोष्टी करताना त्याची नजर चोर बनायची... त्याची बायकोही त्याच्या नजरेत नजर मिसळायला टाळायचीच.... चार दिवसांपूर्वी तो असाच घराबाहेर पडत होता एवढ्यात बायकोचे ते शब्द त्याच्या कानावर पडले.... पोरगं कसला तरी हट्ट करत होतं, त्याची आई त्याला समजावत होती.
आज बाबांचा पगार होणार आहे, ते नक्की आणतील हं !
तिचा तो "नक्‍की' शब्द त्याला दिवसभर टोचत राहीला. संध्याकाळ झाली... मंदिराच्या पायऱ्यांवरुन तो खाली उतरला.... आता घराकडे जायचं तर पोरगं हट्‌ट करणार... त्याला आणि बायकोला समजाविताही येणार नाही....कदाचित आपल्याला नोकरी नाही म्हणून ती सोडूनही जाईल... छे तिने सोडून जाण्याची कल्पनाही त्याला सहन झाली नाही.... त्याला काहीच सुचेना...
तो मटकन खाली बसला... थोडावेळ तिथेच बसून राहिला.... आज घराकडेच जायचं नाही हे त्यानं मनाशी पक्‍क ठरवून टाकलं...मग शहरात फिरत राहिला रात्री एका बसमध्ये चढला कंडक्‍टरने त्याच्याकडे बघून न बघितल्यासारखं केलं.... बस कुठे निघाली हेही त्याला माहित नव्हतं.. एका स्टॉपवर बस थांबली.. सगळे उतरले हाही उतरला... रात्र बरीच झाली होती....मग तो रस्त्यावरुन फिरु लागला.... दिवसभराच्या कंटाळ्याने पाय पुरते थकले होते...त्याची नजर कुठे निवारा मिळतो का याचा शोध घेऊ लागली.... तिथल्याच रस्त्याच्या एका पुलाखाली त्यानं आपलं ठाण मांडलं. आणि तिथे तो झोपून गेला.....
आता गाड्यांचा आवाज पूर्ण मंदावत होता. गेली चार दिवस तो या पुलाच्या आधाराने जगत होता. कपडे आता मळके म्हणण्यापलिकडे गेले होते. दाढी वाढली होती. आणि चपलाचा तुटका बंद त्याच्या भिकारीपणांच्या लक्षणांना आणखी अधोरेखीत करत होता. दोन दिवसापूर्वी सकाळी फिरायला येणाऱ्यापैकी कोणीतरी त्याच्यासमोर शिळी चपाती ठेवली; त्यावेळी तो मनाशीच हसला. दुपारपर्यंत त्यानं त्या चपातीला हात लावला नाही. नंतर मात्र पोटाने मनावर विजय मिळविला.चपातीचा प्रत्येक घास खाताना त्याला प्रचंड वेदना होत होत्या... नंतर तिसऱ्या दिवशी आणि आजही कोणीतरी चपात्या आणून त्याच्यापुढे टाकल्या..... त्याला पहिल्यांदा त्या खाव्यात असं वाटलं पण नंतर त्यानं धीर केला त्यानं हात लावला नाही... दुपारी कधीतरी कुत्री त्याभोवती जमा झालेली त्यानं बघितलं आणि मग तो वेड्यासारखा हसत राहिला....
आता त्याला काही सुचत नव्हतं... कुत्र्याचं जगणं त्याला नकोच होतं....त्यानं खिसा चाचपला.... पेन अजून खिशात होते. त्यानं समोरच्या कचरा कुंडांतील एक कागद उचलला आणि रेल्वे स्टेशनच्या दिशेने चालायला लागला.
दुसऱ्या दिवशी पहाटे रेल्वे पोलिसांना रुळावर एक बॉडी मिळाली आणि खिशात एक पत्र
प्रिय,
रिमा.
आपल्या लग्नाला 3 वर्षे झाली. या तीन वर्षात जेवढं सुख देता येईल तेवढं मी देण्याचा प्रयत्न केला. सप्तपदीची सगळी वचनं मी पाळण्याचा प्रयत्न केला; पण आता ते शक्‍य नाही. तू सोडून जाण्यापेक्षा तू सोडून जाण्याची भीतीच मोठी आहे...ही व्दिधा सहन होत नाही... जगायचं तुझ्याशिवाय ही कल्पनाही सहन होत नाही..... म्हणून मी जगाचा निरोप घेतोय; जमलं तर माफ कर.
तुझाच रघू

पोलिसांनी पत्र वाचलं आणि त्या पत्रावरील पत्ता. त्या पत्त्यावर ते पोचले तर घराला मोठं कूलूप होतं. पोलिसांनी शेजारी चौकशी केली. त्यांना एक पाकिट मिळाल आणि त्यात रघुच्या नावाने एक पत्र


रघु.
आपल्या लग्नाला तीन वर्षे झाली. पण या तीन वर्षात मी तुमची कधीच होऊ शकले नाही... सप्तपदीची वचंन मी पाळू शकले नाही. खरे तर मी हे आधीच सांगायला हवं होतं... मनाविरुद्ध लग्न झालं होतं माझं... मला तुम्हाल धोका द्यायचा नव्हता....त्यामुळे नेटाने तीनवर्षे संसार केला पण आता हि व्दिधा सहन होत नाही... त्यामुळे मी आता सोडून जात आहे कायमचीच.... सोबत पिंटूंला घेऊन जात आहे... जमलं तर माला माफ करा.



*** 27 आक्‍टोबरच्या "ंसकाळ'च्या स्मार्ट सोबतीमध्ये छापून आलेली माझी लघुकथा ***

बुधवार, २६ ऑक्टोबर, २०११

पौर्णिमा...

तो
गॅलरीत उभं राहून तासन्‌ तास चंद्र न्याहाळण्यात काय मजा असते कोणास ठाऊक. पण ती न्याहाळत बसायची... रात्री तीन तीन वाजता उठून गॅलरीतून चंद्र बघायची... हा चंद्र किती वेगळा भासतो नाही? तिचा नेहमीचा प्रश्‍न.. या प्रश्‍नाचे तिला उत्तर हवे असायचेच असे नाही... पण ती रोज हा प्रश्‍न विचारायची... अशा वेळी कधी चहा किंवा कॉफीचा मग तिच्या हाती दिला की नुसती हसायची... गालातल्या गालात... तिच्या त्या गोबऱ्या सावळ्या गालांवर एक चमक दिसायची.... चंद्राचा प्रकाश तिच्या गालावरून ओघळत राहायचा... ती चंद्राला न्याहाळात राहायची आणि मी तिला... चंद्राची कितीतरी रूपं तिनं कॅमेराबद्ध केली होती... प्रत्येकवेळा तिच्या नजरेतून दिसणारा चंद्र वेगळा भासायचा... तो तिचा चंद्र होता... जणू तिच्यासाठीच रोज उगवायचा... तिच्या भावनांच्या वेग आवेगाप्रमाणे आपली रूपं बदलायचा... कधी झावळ्यांच्या आडोशातून तिला बघायचा तर कधी ढगांशी लपाछपी खेळायचा... तिच्या विस्कटलेल्या केसांत जणू रातराणीचा गंध भरत राहायचा... ती होतीच तशी... जगण्याची मजा लुटणारी... ही अमावस्या नसतीच तर?... कधी कधी ती प्रश्‍न विचारायची.
""अगं अमावस्या आहे, म्हणूनच तर चंद्राच्या या कला दिसतात ना!''
माझं हे उत्तर तिला कळायचं, पण पटायचं नाही... पण मग ती जास्त बोलायची नाही, गप्प राहायची. तिनं बहुतेक अमावस्या स्वीकारली होती... अशा कितीतरी अमावस्या तिनं स्वीकारल्या होत्याच, कदाचित त्या सगळ्या अमावस्या विसरण्यासाठीच ती चंद्राला जवळ करत होती... त्या आठवणीतून बाहेर पडण्यासाठीच... पण कधी कधी या आठवांचे ढग एवढे गडद व्हायचे की त्यातून चंद्र दिसायचाच नाही... मग एक हुंदका गॅलरीतून यायचा... अशा वेळी तिच्यासोबत असावं... हलकेच तिच्या खांद्यावर हात ठेवावा, असं वाटायचं. पण काही ढग गळलेलेच बरे म्हणून मग मीही लांब राहायचो. तिच्या मोकळ्या होणाऱ्या आकाशासाठी... मग त्यानंतर तिचा चेहरा पौर्णिमेच्या चंद्रासारखा दिसायचा पूर्ण... अपूर्णतेची त्यात छटाही असायची नाही.

--------------------------

ती

त्याला चंद्र आवडतो का माहीत नाही... नसेल. कदाचित असेलही; पण... आपल्यासाठी तासन्‌ तास गॅलरीत बसून चंद्र बघायचा... आपण काहीबाही बडबडत राहायचो. पण तो नुसता गप्प बसायचा ...कधी कधी वाटायचं, हा चंद्राकडे बघतो की आपल्याकडे?... एकदा त्याला विचारलंही, ""अरे चंद्र बघ किती मस्त दिसतोय, पौर्णिमा हा पूर्णत्वाचा उत्सव असतो बघ.. अपूर्णतेचा लवलेशही नसतो...'' त्यावेळी एकदाच म्हणाला होता,
""पूर्णत्वात मजा नाही... पूर्णत्व आलं की लय सुरू होते... त्यामुळे मजा आहे ती अपूर्णतेत... त्याला अपूर्ण राहायला आवडायचे... तो पाण्याचा ग्लासही पूर्णपणे प्यायचा नाही... थोडं पाणी शिल्लक ठेवायचा... त्यामुळे तो बहुतेक वेळा चंद्राकडे न बघता आपल्याकडेच बघत असल्याचा भास व्हायचा... रात्री तीन-तीन वाजता आपल्यासाठी कॉफी देताना त्याचा चेहरा असाच द्वितीयेच्या चंद्रासारखा दिसायचा.... पूर्णत्वाची आस असलेला... पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत असलेला तो वेगळाच आहे.... त्याचा चेहराच अनेकवेळा अमावस्येत साथ देतो... तो नसलेल्यापणाची, अर्धवटपणाची जाणीव पिऊन टाकतो. तेच त्याचे वैशिष्ट्य आहे... त्याच्या चेहऱ्यावर एक अजिब लकीर आहे... चंद्रावरच्या खळग्यासारखी ही लकेर नेहमी आधाराचा हात द्यायला तयार असते, पण कधी कधी आधारालाही आधार लागतोच ना... पण त्याची नजर कधी आधार मागत नाही. अपूर्णतेत मजा जशी तो मानतो तशीच सोसण्यात... अशा वेळी त्याला एकटं सोडणं हेच चांगलं... अशावेळी त्याच्या चेहऱ्यावरचे ढग आपण हलकेच दूर करावेत. त्याचा चेहरा हातात घेऊन त्याला विश्‍वास द्यावा, असं वाटून जायचं. पण आपल्याला ते जमलं नाही... मग तो नजर चुकवत राहायचा. आपल्या वेदना सहन करत राहायचा... त्याचे ढग कधीच फुटले नाहीत... ढग फुटायला, त्यातून पाणी बरसायला गारव्याच्या बिजांचा शिरकाव व्हायला लागतोच की... अनेकदा आपण त्याच्या दारापर्यंत पोचून त्याला रितं करण्याचा विचार केला खरा; पण दारावर थाप मारून आपण अनेकदा मागे फिरलो आहे... आताही त्याच्या ढगांना गारव्याच्या स्पर्शाची आस लागून असेल... कदाचित मग त्यानंतर दिसणारा चेहरा पौर्णिमेच्या चंद्रासारखा पूर्ण दिसून जाईल. त्यात अपूर्णतेची कोणतीच भावना असणार नाही.

https://docs.google.com/open?id=0B6FpjbggjhRAMDdmMzFmMDUtOTA2Mi00YjlhLWJlNjEtMWY2MjllMzk2NTJl 

बुधवार, १२ ऑक्टोबर, २०११

अश्रू

तो
ती काय करत असेल आता.... कदाचित रडून-रडून डोळे सुजले असतील.... जगजीत सिंह गेल्याचा धक्‍का तीनं कसा सहन केला असणार... वेड्यासारखी प्रेम करायची त्याच्यावर. त्याच्या गजलांवर मरायचीच म्हणा ना....वो कागज कि कश्‍ती हे तिचं आवडतं गाणं... हात छुटे भी तो रिश्‍ते नही छोडा करते.... या गझलेप्रमाणे तिने अनेकवेळा जगण्याचा प्रयत्नही केला पण जमला नाही.... जगणं गाण्याचे शब्द बनतात... पण गाण्याच्या शब्दांवरच्या मार्गावरुन चालणं सोप्प नसतं, हे तिला जाणवून गेलं त्यामुळेच तिनं हात सोडवून घेतला... ती गाण्यात रमायची... .. पण गजलांवर तिचं खास प्रेम....प्रत्येकवेळी ती नवनव्या गजलांवर बोलायची... तिच्या जगण्याच्या अनेक आधारांपैकी एक आधार गझल आहे हे नक्‍की.. त्यामुळे या आधाराला बसलेला धक्‍का तीनं कसा सहन केला असेल देव जाणे... कदाचित दारं खिडक्‍या बंद करुन जगजितचीच एखादी कॅसेट प्ले केली असेल... किंवा त्या अंधारात उशी ओली होईपर्यंत रडत बसली असेल...गुलजार आणि जगजीत सिंह या दोघांच्या शब्द -सुरावर तिचे अनेक इमले उभे आहेत, अशा इमल्यांना असे धक्‍के थोडे जडच जातात.....

ती
जगजीत सिंह गेले...त्याला बातमी समजल्यावर तो कसा रिऍक्‍ट झाला असेल.... त्याला धक्‍का बसला असेल... छे धक्‍का बसणाऱ्यांमध्ये तो कधीच नव्हता.... ब्रेन हॅमरेज झालेलं होतं... डॉक्‍टरांनी प्रयत्न केले पण ते अपुरे पडले एवढंच म्हणेल आणि मान एका दिशेला फिरवून गप्प बसेल.... माहित नाही नक्‍की तो कसा रिऍक्‍ट झाला असेल... संवेदना तशा त्याच्या बोथटच झाल्यात जणू.... सुख -दुःख मानायला वेळ कोणाकडे आहे, हे त्याचं तत्वज्ञान....त्यात माणसं मरायचीच कधी ना कधी हे नेहमीचंच वाक्‍य त्यानं नक्‍की कोणाच्या तरी तोंडावर फेकलं असणार... पण जगजीत वेगळाच माणुस... या माणसाकडे काय शक्‍ती आहे नाही, जखमांना तोच उघडं करतो आणि त्यावर हळुवार फुंकरही घालतो.... जखमा ओल्या ठेवताना त्यातील वेदना हलकेच सुखावह करण्याचे जे कसब त्याच्यात आहे ते मुळी कुणाच्यात नाहीच...शब्दांच्या अर्थांना सुरातून त्यानंच प्रवाहीत करावं... त्याचं गाणं रेडीओवर लागावं आणि ऐन दुपारी कातरवेळीची हुुरहूर जाणवावी... त्याच्यासारखा सूरकर्मी सापडणं मुश्‍किल... बंधमुक्‍त गाताना, ऐकणाऱ्याला बंधिस्त करण्याची त्याची हातोटी जगावेगळी... ही सारी वाक्‍ये तर त्याचीच की... त्यामुळं जगजीत गेल्याचं त्याला नक्‍कीच दुःख झालं असणार... रात्री घरी आल्यावर त्यानं जगजीतच्या गझला लावल्याच असतील... आणि त्या ऐकताना नाकावर अश्रुचा थेंब आला असणारच....