गुरुवार, २९ ऑक्टोबर, २००९

पन्नास रुपडे......

माय! आजचा शेवटचा दिस हाय, आज जर पैसं दिलं नाय तर मास्तर शाळंत बसू देणार नाय.... बारा-तेरा वर्षाच्या पोरानं काकुळतीला येत आईचा पदर धरत तिला थांबवायचा प्रयत्न केला....ती थांबली... त्याच्या रडवेल्या चेहऱ्याकडे तिनं निमिषभर बघितलं पण त्याच्या डोळ्यात बघणं तिला पेलवलं नाही.... तिने पदराचा काठ त्याच्या हातातून सोडवला ...आणि निघून गेली...

बाई! पोरगं आठ दिस झालं, मागं लागलंया आज त्याला पैकं दिलं नायी तर त्येला मास्तर शाळंत बसू देणार नाय... म्होरल्या पगारातनं कापून घ्या की....भांडी घासता घासता ती ज्या घरी धुनं-भांडी करायची तिथल्या मालकीनीकडं तीनं पन्नास रुपयांची मागणी केली...
नाही गं ! आत्ता कुठले माझ्याकडे पैसे... आणि साहेबही बाहेरगावी गेलेत ना... तुला पुढच्या आठवड्यात पैसे देते काय... तिच्या पुढे आणखी चार भांडी आणून ठेवत मालकीनीनं नकाराची घंटा वाजवली.
मग, तीनं खूप गया-वया केली... पण मालकीनीनं काही पन्नासाची नोट तिच्या हातावर ठेवली नाही.... नंतर ती निघून गेली...
काही पोराचं शिक्षण बिक्षण थांबत नाही... हिलाच पाहिजे असतील पैसे, गावाला जायला... मालकीन स्वतःशीच पुटपुटली...
नंतर चार दिवस झाले तरी ती कामावर आली नाही...
मालकिनीचा संशय आणखी गडद झाला... कोणीतरी नक्‍की हिला पैसे दिले असणार आणि ही नक्‍की गावाला गेली असणार... पण आता मालकिनिला धुन्या-भांड्याचा कंटाळा येवू लागला होता.... ती आज नाही पण पुन्हा कधी येणार हे तरी कळावं म्हणून ती तिच्या घराकडं गेली...
त्या एवढ्याशा झोपडीत खूप माणसं बघून तिला काही सुचलं नाही.... तिनं शेजारच्या बाईकडं चौकशी केली....
बाई ! ती मेली....
मेली.... मालकिनीला आता भोवळ यायला लागली होती...
आवं परवाच्या दिशी पोराला पैकं पायजे म्हणून ती म्होरल्या बिल्डींगवर कामाला गेलती....असलं काम कवा केलं न्हवतं न्हवं......पाचव्या मजल्यावरनं पाय घसरला... खाली पडली.... जागच्या जागी गेली बघा.....
मालकिनीला काय करावं कळलं न्हायी.....ती घराकडे जाण्यासाठी वळली....
त्या झोपडीसमोरच तिचं ते पोरगं विटी-दांडूनं खेळत होतं.... त्याला बहुतेक मास्तरांनी शाळेतनं काढलं होतं.......

सोमवार, २६ ऑक्टोबर, २००९

खिडकी

ऑफीसला जाताना तो नेहमी त्या घरासमोर थांबायचा. त्या घराच्या दरवाजाचे ते मोठे कुलूप त्याला जितके अस्वस्थ करायचे, त्यापेक्षाही अधिक त्याला त्या दरवाजाशेजारील खिडकी अस्वस्थ करायची. बंद दरवाजाआडच्या खिडकीतील तिचा चेहरा बघितला की त्याला सुचायचं नाही.... चालताना त्याचा वेग तिथे मंद व्हायचा.. वळून वळून तो त्या खिडकीत बघत राहायचा आणि मग स्वतःला समजावत पुढे जायचा.... तो रोज त्या खिडकीकडे बघयाचा... ती नेहमी तिथेच असायची कधी शुन्यात नजर लावून बसलेली.... तर कधी तिच्या खिडकीत चढलेला मोगऱ्याच्या वेलाला कुरवाळत... त्याशिवाय ती वेगळं काही करताना दिसायची नाही...... कधी कधी तिच्या डोक्‍यावर पट्‌टी बांधलेली असायची....तर कधी चेहऱ्यावर ओरखडे असायचे....डोळे खोल गेलेल्या तिच्याकडे बघितलं की त्याला चिड यायची... अलिकडे तर तो त्या खिडकीत बघायचंही टाळायचा, पण त्याला ते जमायचं नाही... तिचा तो केविलवाणा चेहरा काही तरी मदत मागतोय, असं नेहमी त्याला वाटायचं... सरळ जावून ते कुलूप तोडावं, असं त्याला वाटायचं, पण त्याला धीर झाला नाही.... एकदा रविवारी तो असाच त्या रस्त्यावरुन चालला होता... तो दरवाजा उघडा होता आणि तीही खिडकीतही नव्हती.... तो खूप वेळ तिथं रेंगाळला पण त्या खिडकीत ना ती आली ना कोणतीही हालचाल दिसली, मग कंटाळून तो निघून गेला.... त्या रात्री त्याला झोप लागली नाही.... घरी काहीच करायला नव्हतं म्हणून ऑफीसला जायला तो लवकरच घराबाहेर पडला.... त्या घरापाशी आल्यावर एक चाळीशीचा माणूस त्या दरवाजाला कुलूप लावताना त्याला दिसला....त्याला वाटलं तो तिचा नवरा असावा.... तो थोडे मागेच थांबला मग त्याच्यामागून तो चालू लागला... बस स्टॉपवर आल्यावर त्याच्याशी काहीतरी बोलायचं म्हणून त्याने अमुक तमुक गाडी गेली का? विचारलं.... त्यानं शांतपणे नाही म्हटलं.... मग तो रोज त्याच वेळेत त्या बस स्टॉपवर यायचा ... त्याच्याशी बोलायचा
प्रयत्न करायचा पण तो बोलायचा नाही..... आता त्याला त्याचा राग यायला लागला.... त्याला खडसावून विचारायचं म्हणून त्यानं मनाशी पक्‍क केलं पण त्याचा भिडस्त स्वभाव त्याला साथ देत नव्हता.... तरीही एके दिवशी त्यानं त्याला बस स्टॉपवर गाठलंच .... त्यानं तिचा विषय काढताच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले....त्याने सरळ त्याला जाबच विचारला का? तुम्ही तिला कैद केलंय.... काय गुन्हा आहे तिचा.... त्याच्या चेहऱ्यावरचे रागाचे भाव मावळले....
तुम्हाला वेळ असेल तर चला माझ्याबरोबर , त्यानं विचारलं....
मग तो त्याच्यामागून परत त्याच्या घरी आला... त्यानं कुलूप काढलं, सोफ्यावर टाकलं.... ती खिडकीत तशीच होती...
त्यानं हाक मारली
"" मनू '' तीनं हू केलं नाही कि चू..... मग तो तिच्याजवळ गेला....मग त्याच्याजवळ
आला... जरा बाहेर थांबता तिनं कपडे ओले केले आहेत, तेवढे बदलतो.... त्याला त्याच्या नजरेला नजर देता आली नाही...तो बाहेर आला....परत मागे फिरुन त्याच्याशी बोलण्याचा त्याला धीर झाला नाही....

रविवार, २५ ऑक्टोबर, २००९

कायदा

हॅ, हॅ, हॅ करत ते अवघं दहा-बारा वर्षांचं पोरगं हात पुढे करत माझ्यासमोर आलं.... कपाळावर मळवट भरलेला, जटा वाढलेल्या, कमरेला चिंद्या गुडाळलेल्या... पायात मोठाले वाळे घातलेल्या त्या पोराकडे बघत मी काहीतरी देण्यासाठी खिशात हात घातला पण हाताला काहीच लागलं नाही... मी तसाच हात त्याच्या हातात देत खांदे उडविले.... ते पोरगं काही बोललं नाही. तसंच ते पुढच्या, मग पुढच्या असं करत त्या गोलाकार जमावात फिरत राहिलं... त्याची बहुतेक आई असावी ती, ढोलकीवर काठी फिरवत मधीच हॅ हॅ हॅ करत होती.....सगळ्या गर्दीत फिरल्यावर त्याच्या हाताला थोडी नाणी लागली.... ती समोरच्या त्या कपाटासदृश्‍य देव्हाऱ्यासमोर ठेवत त्याने त्यावर ठेवलेला चाबूक उचलला... मग हवेत दोन तीन फटके मारत त्याने समोरच्या गर्दीकडे बघितलं आणि स्वतःच्या अंगावर त्या चाबकाचे फटके मारायला सुरवात केली एक, दोन, तीन, चार...... अंगावर चाबकाचे फटके मारून झाल्यावर ते पोरगं पुन्हा त्या गर्दीकडे वळलं मघासारखा हात पुढे करत परत ते फिरलं.... मग आणखी थोडी नाणी त्याला मिळाली.... मघाची आणि आताची नाणी बघून ते हिरमुसलं त्यानं आईकडं बघितलं.... आईचं ढोलकीवर काठी फिरवत हॅ हॅ हॅ करणं सुरुच होतं........ मग त्याची आई समोर आली.... तिच्या हातात मोरपीसांचा पंखा होता....तिनं ती मोरपीसं त्याच्या दंडावर फिरवलं.... ती ते मोरपीस फिरवायला लागली तसं ते पोरगं कळवलं... पण त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले नाहीत.... भीतीने त्यानं अंग आक्रसून घेतलं.... पण त्याच्या आईनं एका हाताने त्याचा दंड पकडत दुसऱ्या दंडावर मोरपीस फिरवणं सुरुच ठेवलं...मग तिनं ते मोरपीस त्या देव्हाऱ्यावर ठेवत तिथली मोठी सुई उचलली.... त्याच्या हातावर ती बळेच दिली आणि ढोलकीवर काठी जोरात घासली.... आता ते पोरगं उठलं.. ती मोठी सुई त्यानं त्या गर्दीला दाखविली आणि दुडक्‍या चालीत स्वतःभोवती गिरकी घेत त्यानं ती आपल्या दंडा
वर टोचली..... ती सुई घुसली... रक्‍ताची चिळकांडी उडाली.... मी डोळे घट्‌ट मिटले... आता ते पोरगं पुढं झालं नाही... त्याची आई पुढे झाली.... कुणी नाणी टाकली... कुणी नोटा टाकल्या...तिने सगळे पैसे गोळा केले आणि डोक्‍यावर तो देव्हारा घेतला आणि चालू लागली..... तिचं ते पोरगं.... दंड चोळत तिच्या मागून चालू लागली..... गर्दी ओसरली.....रस्ता मोकळा झाला.... रस्त्याच्या पलीकडील घराच्या भिंतीवर लिहलं होतं... बालकांचा निरागसपणा हिरावून घेऊ नका...... बालकांना कामाला लावू नका....कायद्यानं बंदी आहे.....

गुरुवार, १५ ऑक्टोबर, २००९

ओझं

माई ! दिवाळी हाय, काय करंजी लाडू असत्याल तर घाला गरिबाच्या झोळीत..... वाड्याच्या अंगणात आलेल्या त्या भिकारणीकडे बघून तिचं मस्तक तापलं.... चल बाहेर हो आधी... चल... तिनं थरथरत्या आवाजात फर्मान सोडलं... पण ती हलली नाही आपली लाचार नजर तिच्याकडे टाकत तिथल्या पायरीवर ती पसरली.... हातातील ताटली समोर ठेवत तीनं माई द्या चा घोष लावला.... त्या भिकारणीचं ते पसरणं तिला आवडलं नाही.
चल म्हटलं ना! काही, मिळणार नाही.... उचल ती ताटली आणि निघ... तिनं शब्दात जितका जोर आणायचा तितका आणला....
पण तरी ती भिकारीण हालली नाही....
माई! आज दिवाळी हाय कालपसनं कायबी खाल्लं नाही.... खायाला कायतरी द्या... गरीबाचा आशीर्वाद लागंल.... घरात दुधा-तुपाच्या नद्या व्हातील.... त्या चौसोपी वाड्याकडं बघत ती असं काही बाही बडबडत राहिली....
आता मात्र ती अस्वस्थ झाली....तिला त्या भिकारणीला वाड्याबाहेर कसे घालवायचे हेच कळत नव्हतं.
ती पुन्हा जोरात खेककसली... चल बाहेर काही काही मिळणार नाही....
आपला केवीलवाणा चेहरा आणखी केवीलवाणा करत ती तिथंच बसून राहिली..
तिला हाताला धरावं आणि सरळ वाड्याबाहेर काढावं असं तिला वाटून गेलं पण तिच्या हातात ते बळ आलं नाही.....
भिकारणीनं आपल्या फाटक्‍या झोळीतील काहीबाही काढलं आणि ताटलीत टाकलं.... माई पानी तरी द्या....
आता मात्र कळस झाला.... हे खाऊन झाल्यावर जाणार ना येथून..तिनं विचारलं......भिकारणीनं मान डोलावली.....
तिनं कळकट मळकट तांब्यातून पाणी आणलं.... भिकारणीनं थोडं खाल्ल,पाणी प्यायली आणि आल्या वाटनं निघून गेली...
तिनं दरवाजा लावला.... त्या मोठ्या वाड्याचा दरवाजा थोडा करकरला आणि बंद झाला. बंद दरवजाकडं बघंत ती तिथंच थोडावेळ बसली.... मग उठली... काटी टेकत टेकत ती सोप्यात आली.... मग तिथं बसून राहिली.... दिवे लागणीची वेळ आल्यावर तिनं दरवाजा उघडला..... बाहेर सगळीकडे दिव्यांची झगमगाट होती...ती स्वतःशीच हसली... . तिने तुळशीपाशी आणि बाहेर एक एक दिवा लावला.....मग ती देवापाशी दिवा लावायला गेली.... जुन्या समईतील संपत आलेली वात तिने पुढे ढकलली आणि काडी पेटवली....समई लागली....मग तिच्या लक्षात आलं, अरे आज तर लक्ष्मीपूजन.... मग कनवटीची चार नाणी तिनं काढली आणि ती देवासमोर ठेवली....दिवाळीचा नैवैद्य काय दाखवावा, म्हणून तिला प्रश्‍न पडला... घरी काहीच नव्हतं... नंतर तिच्या लक्षात आलं मघाशी जी भिकारीण बसून गेली तिथं तिची एक करंजी तशीच पडलीय.... ती उठली आणि तिनं ती करंजी उचलली... त्या करंजीचं ओझं तिला तिच्या आयुष्यापेक्षा जास्त वाटलं.....

सोमवार, १२ ऑक्टोबर, २००९

डोळे......

खिडकीच्या काचेवर चोच मारणाऱ्या त्या चिमणीकडे बघून आईचा जीव कळवळला... तिला चार तांदळाचे दाणे टाक रे असं म्हणून तिने रोळी माझ्यासमोर ठेवली. मी माझ्या मुठीत मावेल तितके तांदूळ घेतले आणि खडीकीसमोर ते टाकले. ती चिमणी घाबरुन उडून गेली. मी हिरमुसून परत आलो... आई म्हणाली येईल थोड्या वेळाने लांब उभा राहा.... मी खूप वेळ तिची वाट बघितली पण पुन्हा ती काही आली नाही.... नंतर पुन्हा एक दिवस ती परत त्याच खिडकीत आली आणि काचेवर चोच मारत राहीली. मी आईला सांगितलं... आईनं लांबून हलक्‍या हाताने तांदूळ टाकले... चिमणी उडाली पण ती लांब गेली नाही... आजुबाजूचा अंदाज घेत टुणटुण उड्या मारत एक एक तांदूळ ती टीपत राहीली..... मग थोड्यावेळाने ती परत निघून गेली. मी आईला विचालं, ""आई ती परत येईल.? आई हो म्हणाली...
मग दुसऱ्या दिवशीही ती आली... मी अंगणात काहीतरी करत होतो.... आईनं हाक मारली. तुझी चिमणी आली बघ म्हणून मी धावत आलो... रोळीतील तांदूळ मुठभरुन घेणार इतक्‍यात आईनं कण्यांचा एक डबा माझ्यासमोर ठेवला.""यातील तांदूळ घालत जा'' आईन सांगितलं. मी मूठभर कण्या घेतल्या आणि आईनं जसं लांबून तांदूळ टाकले तसे टाकल्या... आता चिमणी घाबरली नाही...तिने धिटपणे काही दाणे टीपले आणि निघून गेली.... मग रोजचाच आमचा हा खेळ बनला.... रोज शाळेतून आल्यावर मी त्या खिडकीच्या काचेकडे बघत तासनतास बसायचो... ती येईल याची वाट बघत.... तीही नित्यनेमाने यायची.... मी तिला कण्या टाकायचो, ती त्या टीपायची आणि परत निघून जायची.... अलीकडे तर आई मी शाळेतून यायच्या वेळी खिडकीतच खावू ठेवायची. त्या चिमणीचा मुक्‍कामही आता वाढू लागला होता.... एकदिवस मी बघितलं की तिने खडकीच्या वरच्या कोपऱ्यात काही काटक्‍या गोळा करुन घर बांधलंय..... मग मी रोज त्या घरट्यात डोकाऊन बघयचो पण त्याला हात लावायचा नाही, असं आईनं बजावलेलं होतं, त्यामुळं त्याला हात लावायची इच्छा होऊनही मी हात लावला नाही... एक दिवस त्यात मला छोटी छोटी अंडी दिसली.... आईनं सांगितलं की काही दिवसांनी त्यातून पिलं बाहेर येतील म्हणून.... मी वाट बघायचो रोज आईला विचारायचो, आई रोज उद्या म्हणायची... आणि एक दिवस त्यातून चिवचिवाट सुरु झाला.... मी आनंदानं आईला सांगितलं... आईन त्या दिवशी मला रोळीतील तांदूळ घ्यायला मुभा दिली होती.... मग मी रोज संध्याकाळी त्या खिडकीपाशी बसून त्या इवल्याश्‍या चिमण्यांचा चिवचिवाट ऐकायचो.... आई ओरडायची....अभ्यासाला बैस म्हणून पण तिने कधी चिमणीला दोष दिला नाही.... चोचीच चोच घालून दाणे भरवणं बघितलं की मला मजा वाटायची.... माझ्यासाठी आईनही तोच प्रसंग कित्येकवेळा बघितला होता....
एका संध्याकाळी मी असाच शाळेतून पळत आलो.. दप्तर बाजुला टाकलं... आईनं खिडकीत शिरा आणि पाणी ठेवलं होतं. मी हातपाय न धुताच हातात प्लेट घेवून त्या खिडकीच्या कोपऱ्याकडे बघत होतो.... तिथं ते घरटंच दिसलं नाही.... मला काही कळलं नाही.... मी धावत आईला जावून विचारलं... आई खिडकीपाशी आली तिनं बघितलं ..... खिडकीच्या खाली ते काट्याकुट्यांचं घरटं पडलं होतं.... आणि जवळच काही पिसं पडली होती.....ती चिमणी चिवचिवाट करत इकडून तिकटे फिरत होती...खिडकीच्या काचेवर चोच मारत होती... आईनं माझ्याकडं बघीतल आणि मला कवळून घेतलं आणि तिने डोळ्याच्या कडा पुसल्या....आजही आईचे ते डोळे मला अस्वस्थ करतात.....

शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २००९

प्रचार

आमक्‍या, तमक्‍याला मत द्या, तेच तुमचा विकास करु शकतात, उठा प्रगतीचा मार्ग धरा.... अशा घोषणा देत एक गाडी येत होती.... घोषणांचा आवाज जसा टिपेला पोहचला तसे त्याने तोंडावरील टॉवेल बाजुला सारला. डोळे उघडले आणि समोरच्या रस्त्याकडे बघितले...... गाडी आली घोषणा देत निघून गेली.... आवाज क्षीण झाला तसे त्याने बाजुला केलेला टॉवेल पुन्हा तोंडावर घेतला आपला डावा हात मानेखाली घालत तो कुशीवर वळला... डोळे मिटले आणि पुन्हा झोपी जाण्याचा प्रयत्न करु लागला....पण त्याला त्यात यश आले नाही.... त्याने मघाशी आलेल्या गाडीला आणि ज्या नेत्याचा प्रचार ती गाडी करत होती त्या नेत्यालाही जोराची शिवी हासडली......दोन्ही हात वर करुन त्याने जोरात आळस झटकला आणि त्याच वडाच्या झाडाला टेकून बसला.... कडेला पडलेली एक काठी त्याने हातात घेतली.... ती मोडली... त्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि फेकून दिले.... समोर पडलेला दगड उचलून थोडी माती खरवटायचा प्रयत्न केला पण त्यातही त्याला मजा आली नाही.... मग तो उठला आणि रस्त्याच्या कडेला जावून बसला.... डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजुला लांब लांबवर कोणी नव्हतं. मग त्याने स्वतःलाच एक जोरात शिवी हासडली आणि तिथल्या दगडावर तो बसला. मळलेला शर्ट आणि पॅंट बघून त्याने किमान पंधरा दिवसांत कपडे बदललेले नाहीत हे सांगायला कोणा जोतिष्याची गरज नव्हती. विस्कटलेल्या केसांना माती लागून लागून तांबडा रंग आलेला....अशा अवस्थेत तो तिथेच बसून राहिला. इतक्‍यात पुन्हा एक गाडी आली याही गाडीवर मघासारखाच एक स्पिकर होता... पण त्यातून घोषणा येत नव्हत्या... ती गाडी अगदी त्याच्या जवळ आली आणि थांबली....चालकाने कुठल्यातरी गावाचा पत्ता विचारला... त्यानेही तो सांगितला... चालकाने गाडी सुरु केली आणि तो थोडा पुढे गेला...आणि थांबला.... त्याने गाडी मागे घेतली आणि पुन्हा त्याच्याजवळ लावली... त्याला काही कळेना...
तुला वाचायला येतं...चालकाने विचारलं...
येतं की.....त्याने सरळ साधं उत्तर दिलं...
मग हे वाचून दाखव.... चालकाने एक चिटोरी त्याच्यापुढे ठेवली....
मघाशी जी गाडी घोषणा देत गेली होती त्याच या घोषणा होत्या.... त्याने जोरात त्या घोषणा वाचल्या....
चालकाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले....
एकवेळचं जेवण आणि शंभर रुपये देईन, घोषणा द्यायला येतोस का? त्याने विचारलं....
याच्याकडे नकार द्यायला कारण नव्हतं, तो गाडीत बसला..... माईक हातात घेत त्याने उच्चरवात घोषणा द्यायला सुरवात केली...
एक एक गाव करत ते त्या नेत्याची सभा होती तिथे आले.... सभा अजून सुरु व्हायची होती... इतक्‍यात त्याच्या हातात आणखी एक कागद आला... त्याने तो सफाईदारपणे वाचला.....नेत्याने भाषण केले... पण लोकांच्या टाळ्या काही पडल्या नाहीत.
सभा झाली... आलेले लोक परतले.
नेत्याच्या गाड्यामागे मघाच्या चालकाने आपली गाडी लावली... थोडे अंतर गेल्यावर नेत्याने आपली गाडी थांबवली... तो उतरला मागे थांबलेल्या यांच्या गाडीकडे आला.... त्याने जोरात विचारले मघाशी गाडीतून भाषण कोण करत होता... चालकाने त्याच्याकडे बोट दाखविले.... नेत्याने त्याच्याकडे बघितलं आणि नाकं मुरडलं.... कुठल्या गावचा... त्यानं गावचं नाव सांगितलं.... नाव.... त्यानं नाव सांगितलं....नेत्याचा चेहरा उजळला....त्याने आपल्या सहकाऱ्याला हाक मारली.... त्याच्याकडून काही पैसे घेतले... चालकाकडे देत काही पांढरे कपडे खरेदी करा आणि उद्या प्रचाराला या. असं सांगून तो नेता आपल्या गाडीत बसून निघून गेला.
चालकाने सांगितल्याप्रमाणे त्याला कपडे घेवून दिले...त्याला घरात सोडले... आणि निघून गेला.
दुसऱ्या दिवशी गाडी त्याला न्यायला आली.... तोही पांढरे कपडे घालून तयार होता.... त्याला एका सभेच्या ठिकाणी नेलं गेलं. नेत्याच्या सहकाऱ्याने त्याच्यासमोर एक कागद पुढे केला.... त्याने तो बघितला. त्यात नेत्याने केलेल्या विकासकामे होती... तो व्यासपीठावर चढला.... माईक त्याने हातात घेतला.... नेत्याच्या विकासकामांचा पाढा वाचता वाचता तो थांबला.... त्यात लिहले होते दहा हजार युवकांना नोकरी दिली.... त्याने व्यासपीठाकडे बघितले नेता खूष होऊन आपल्या केसांवर हात फिरवत होता... मग त्याने समोर बसलेल्या श्रोत्यांवर एक नजर फिरवली आणि खड्या आवाजात त्याने सांगितले याच नेत्यामुळे आज दहा हजार एक लोकांना रोजगार मिळाला... त्यातील एकावर त्याने उगाचच भर दिला.....

मंगळवार, ६ ऑक्टोबर, २००९

बघा जमलं तर थोडे ओझे उतरवून....

प्रति,
राजू परुळेकर यांना
आपण खूप मोठे पत्रकार, लेखक, सुत्रसंचालक, मुलाखतकार, राजकीय विश्‍लेषक आणि "विचारवंत' आहात हे माहित असूनही हा पत्राचा अट्‌टहास. विचारवंतांनी विचार मांडावेत आणि आमच्यासारख्या डोक्‍यात बटाटे असलेल्यांनी ते निमूटपणे मान्य करावेत हे सरळ साध सूत्र आजपर्यंत आम्ही (इथे आदरार्थी एकवचन नाही... आमची सगळी जमात या अर्थाने आहे.) पाळलं; पण काय होतं बटाट्याला जर ओलाव्याचा स्पर्श लागला तर त्यालाही मग कोंब फुटतात. तुमच्या लेखनाच्या सानिध्यात आल्यानंतर खूपदा आमच्या सडक्‍या डोक्‍यातील कुचक्‍या बटाट्यांना कोंब फुटले.. पण विचारवंतांनी विचार करायचा असतो, आपल्यासारख्यांनी नाही हा एकच विचार डोक्‍यात ठेवून हे कोंब आम्ही खूडत राहिलो. पण आता हे विचारांचे कोंब दसऱ्यात भोम वाढावे, तसे वाढल्याने ते तुमच्याच दारात आणून टाकत आहे एवढंच.
तुम्ही कोणाबद्दल लिहावे, काय लिहावे, काय उद्देशाने लिहावे हा तुमचा वैयक्‍तीक प्रश्‍न असला तरी "विचारवंतांनी' आणि लेखकांनी (कदाचित तुम्ही स्वतः ला विचारवंत मानत नसाल आणि त्यामुळे ही माझी जबाबदारी नाही असं म्हणू शकाल म्हणून लेखक हा शब्द. तुम्ही लेखक आहात हे तुम्हीच मान्य केले आहे.) मांडलेले विचार त्याचे वैयक्‍तीक राहात नाहीत. अर्थात ते वैयक्‍तीक राहू नयेत याचसाठी तर लिहलेले असतात हे आम्हाला (पुन्हा इथे आणि इथून पुढे सर्वच ठिकाणी आदरार्थी एकवचन नाही... आमची सगळी जमात या अर्थाने आहे.) ठावूक आहे, त्यामुळे त्या विचारांना आपलेच विचार समजून ते आम्ही आधी गिरवतो आणि नंतर मिरवतो. पण... विचारवंतांनी आपली मतं विचार म्हणून लादायला सुरवात केली त्यावेळेपासून आम्हाला या विचारवंतांनी खूप छळलंय. खास करुन राजकिय विश्‍लेषकांनी. राजकिय विश्‍लेषणाला आवश्‍यक असणारी माहिती आणि थोडे शब्दांचं पाठबळ असले की विचाराचे पंतग उडवायला खूप मोठे आकाश मिळते. आता तर इतके चॅनेल झाले आहेत की भाषण येणाऱ्या सगळ्यांना चांगले दिवस आले आहेत. त्यामुळे जो-तो उठतो आणि विश्‍लेषण करत सुटतो. पण यात तुम्ही खूप वेगळे होता. राजकीय विश्‍लेषणातही तुमचा समाजशास्त्राचा अभ्यास आम्हाला भारावून टाकत आला आहे. त्यामुळेच आमच्यामधील अनेक जण तुमचे चाहते झाले आहेत, पण अलिकडील तुमचे लिखाण आणि तुम्ही टीव्हीवर मांडत असलेले विचार ऐकले की आम्हाला आमचीच लाज वाटू लागली आहे. कधी काळी आम्ही साऱ्यांना आम्ही परुळेकरांचा आदर्श समोर ठेवलाय तुम्हीही ठेवा हे आग्रहाने सांगत होतो पण... पण सारंच मुसळ केरात गेलं.
मुळात तुमच्याबद्‌दल आम्हाला फारसा राग नाही. पण तुम्ही ज्या पद्धतीने विचार मांडायला लागलाय ते बघता तुम्ही प्रगतीचा सोपा मार्ग शोधलाय असाच वास येत आहे. खऱ्या-खोट्यात आम्ही जात नाही, पण जे समोर दिसतंय त्यावरुन तरी तुम्ही भविष्यात मनसेचे प्रवक्‍ते (किंवा उद्या सामनासदृश मनसेने एखादे वृत्तपत्र काढले तर त्याचे संपादक) वगैरे झालेले दिसला तर त्यात आश्‍चर्य वाटायला नको. उद्धव (मर्द) ठाकरे नावाचा जो काही लेख लिहिला आहे तो पूर्वदोष आणि मताभिन्नतेचा उत्कृष्ट नमुना आहे. लेखकाने वैयक्‍तीक विचार मांडताना त्याला एकतर वैयक्‍तीक रुप द्यावे किंवा जर त्याला सार्वमताचा रंग चढवायचा असेल तर सार्वमत काय आहे हे तपासून बघावे. वरवर बघता तुमचा लेख सार्वमत तपासून लिहिला आहे,असं वाटत असलं तरी तो फक्‍त शब्दखेळ आहे, आणि हा खेळ खेळताना समोरच्या वाचकालाही गृहीत धरले आहे. उद्धव ठाकरे चांगले की राज ठाकरे या वादात आम्हाला पडायचे नाही. आम्हाला दोघांबद्दलही तितकाच आदर आहे. पण राज ठाकरे यांच्या पाठिमागे संस्कृत नेता हे विशेषण लावताना जिथं तुमच्या लेखणीतील शाई (किंवा संगणकावरील कळ) फार सैल होते तिथेच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल लिहिताना वस्तूस्थितीचा उगाच टेंभा मिरवताय हे जाणवत राहातं. राज यांना चांगले म्हणण्याचा तुम्हाला अधिकार आहेच, ते चांगले आहेत याबद्दल आमच्याही मनात शंका नाही पण (परुळेकर तुम्ही चार वाक्‍य झाली की पण म्हणायला आम्हाला भाग पाडताय. पण म्हणायचं नाही असा "पण' करुनही) याचा अर्थ तुम्ही इतरांची उंची कमी दाखवून राज यांची उंची वाढवायचा प्रयत्न करताय. उद्धव ठाकरे यांना कमी लेखण्यासाठी त्यांनी उच्चारेले काही "शब्द' म्हणजेच त्यांचे व्यक्‍तीमत्व दाखविण्याचा तुम्ही केलेला अट्‌टहास बाळबोध वाटतो. राजकारणातील भाषणालाच त्या माणसाचे व्यक्‍तीमत्व मानाय
चे हे आमच्यासारख्या मठ्‌ठ माणसांनी. पण तुमच्यासारख्या विश्‍लेषकांनी तर व्यासपीठावर न बोलताही नेता कोणते शब्द पेरुन गेला याचा उहापोह करावा. परिस्थीती कोणती आणि समोरचा श्रोता काय मानसिकतेचा आहे हे बघूनच नेते भाषण करतात. यात प्रत्येकवेळा त्यांचे व्यक्‍तीमत्व शंभर टक्‍के असतेच असे नाही. उच्चारलेला शब्दाचा नेमका काय अर्थ हे विश्‍लेषकाने सांगावे त्याच शब्दात त्याने स्वतःला अडकवून ठेवू नये.
आपल्याकडचे जवळजवळ सर्वच पत्रकार कुठल्या ना कुठल्या विचाराने प्रभावित असतात त्यांचा त्यांच्या लेखनावर परिणाम होतोच यात तुम्ही अपवाद असावे असंही आमचं म्हणणं नाही पण विचाराने प्रभावीत असणे आणि विचारांचे ओझं घेवून फिरणं यात नक्‍कीच फरक आहे. विचारांचं ओझं डोक्‍यावर असेल तर त्याशिवाय दुसरा विचार डोक्‍यात शिरत नाही. बघा जमलं तर थोडे ओझे उतरवून....
ता. क.
वरील पत्र लिहिताना इंग्रजी शब्दांचा वापर मुद्दामच केलेला नाही. पण ज्या राज ठाकरे यांच्याबरोबरच्या मैत्रीचे गोडवे तुम्ही गाता त्यांच्या राजकारणानेच तुम्ही प्रेरीत दिसता नाहीतर तुम्ही "अल्केमीस्ट्री' हे सदराचे नाव ठेवलेच नसते.

सोमवार, ५ ऑक्टोबर, २००९

पुन्हा पुन्हा पुन्हा

रस्त्याच्या कडेच्या कचरा कोंडाळ्यात तीनं आपला थरथरता हात घातला. कचऱ्याच्या पिशव्या तपासता तपासता तिच्या हाताला काहीतरी लागलं. त्यातलीच एक प्लॅस्टीकची पिशवी तीनं रिकामी केली आणि त्यात तो "ऐवज' कोंबला. पुन्हा तिचं चाचपणं सुरु होतं.आणखी थोड्या वेळानं तिला त्यात काहीतरी सापडलं. तिनं तेही त्या पिशवीत कोंबलं. कोंडाळ्याच्या कडेला पडलेली वाकडीतिकडी काठी तिनं डाव्या हातात घेतली आणि शरिराची लक्‍तरं त्याच्या साहाय्याने उचलण्याचा प्रयत्न केला. एक एक अवयवय उचलत ती अर्धवाकलेल्या अवस्थेत उभी राहिली. कळकट मळकट साडीला तिनं हात पुसला आणि मघाचा "ऐवज' उजव्या हातात घेवून तिने रस्त्याच्या कडेला नाला वाहावा तसं स्वतःला वाहतं केलं. भंगारवाल्याच्या दुकानासमोर उभी राहात तिनं तो ऐवज त्याच्यासमोर ठेवला. त्यानं निरुत्साहानंच त्याकडं बघीतलं आणि दोन रुपयांची दोन नाणी तिच्याकडे भिरकावली. समोर पडलेली ती नाणी उचलण्यासाठी ती खाली वाकली आणि तिच्या वाकड्या काठीचा धक्‍का त्या पिशवीला बसला. सकाळपासून गावातले निम्मे कचाराकोंडाळे शोधून आणलेल्या त्या पिशवीतल्या बाटल्या खाली पडल्या आणि खळकण असा आवाज आला. मागे वाकलेला दुकानदाराने चटकन पाठ फिरवली आणि बघितलं. बाटल्यांच्या काचांकडे बघत तिच्या हातातील त्या दोन नाण्याकडे त्याचे लक्ष गेले. त्याकडे लक्ष जातातच त्याने तिच्या हातावर झडप घातली आणि ती नाणी हिसकावून घेतली. ती काही बोलली नाही. फुटलेल्या काचा तिनंच गोळा केल्या. त्या मघाच्या पिशवीत कोंबल्या. त्या कोंबता कोंबता त्यातील एक काच तिच्या हातात घुसली तिनं ती जोरात ओढली. पण बराचवेळ रक्‍ताचा थेंबही बाहेर आला नाही.... रक्‍त यायला पोटात काहीतरी असाव लागतं...