गुरुवार, २७ ऑगस्ट, २००९

मोठी माणसं...

"तुम्ही जेवढे लहान होता, तेवढेच तुम्ही मोठे होता' अशा अर्थाचा इंग्रजीत एक वाक्‌प्रचार आहे. त्याचा प्रत्यय या महिन्यात दोनदा आला. मॅगसेसे पुरस्कारविजेते आणि "नाही रे' वर्गाचे प्रश्‍न पोटतिडकीने मांडणारे पी. साईनाथ व संपूर्ण जगाला दहशतवादी "कसाब' कोण हे दाखविणारे ज्येष्ठ छायाचित्रकार श्रीराम वेर्णेकर यांच्याशी संवाद साधण्याचा योग जुळून आला. दोघेही पत्रकार. आपल्या पेशाशी प्रामाणिक आणि तितकीच मोठी माणसंही. पी. साईनाथ यांच्याशी संवाद साधताना त्यांच्यातील प्रांजळ माणूस प्रखरतेने भेटला. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रश्‍नांवर जरी मी लक्ष वेधले असले तरी "इनाडू'ने (आंध्र प्रदेशमधील एक दैनिक) हा प्रश्‍न सर्वात आधी खूप जोरकसपणे मांडला, हे सांगायला ते विसरले नाहीत किंबहुना त्याचे सारे श्रेय आपले एकट्याचे नसल्याचेही त्यांनी नम्रपणे सांगितले. खरे तर पी. साईनाथ यांच्या पत्रकारितेमुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडे सरकारने गांभीर्याने पाहिले हे सर्वज्ञात आहे; मात्र तरीही त्याचे सर्व श्रेय घेण्यापेक्षा त्यांनी ते इनाडूच्या संबंधित पत्रकाराला दिले. यातच त्यांचे मोठेपण दिसून येते. जगन फडणीस पुरस्कार स्वीकारण्यास आलेल्या श्री. वेर्णेकरांशीही संवाद साधताना दुसरी तशीच मोठी व्यक्ती भेटल्याचे समाधान लाभले. त्यांना एका पत्रकाराने विचारले, की खरंच तुम्हाला स्वतसुरक्षितता, वर्तमानपत्राने दिलेले काम, की सामाजिक दायित्व मोठे वाटते? त्यांनी क्षणाचा विलंब न करता सुरक्षिततेला प्रथम क्रमांक देत सामाजिक दायित्वाला अखेरचा क्रमांक दिला. खरे तर जिवावर उदार होऊनच त्यांनी कसाबचे छायाचित्र काढले. हॅंडग्रेनेड फेकत, गोळीबार करत असलेल्या दहशतवाद्यावर फ्लॅश मारणे म्हणजे मृत्यूचे छायाचित्र घेण्यासारखेच; पण तरीही त्या घटनेला उगाच मोठा साज न चढवता त्यांनी
वास्तविकता मांडली. खरे तर त्यांना कामाप्रति असलेली निष्ठा, त्याबद्दल जिवावर उदार होणे अशा पद्धतीची गुळगुळीत वाझोडता आली असती आणि त्यांच्या तोंडी ती वाईटही दिसली नसती; पण तरीही अत्यंत नम्रपणे त्यांनी परिस्थितीजन्य निर्णय कसे घ्यावे लागतात हेच सांगितले.
या दोन्ही माणसांनी उत्तुंग यश मिळविले. हे यश मिळविताना त्यांनी अपार कष्ट घेतले; पण तरीही त्यांच्या वागण्या-बोलण्यात कसलाही अभिनिवेश नाही. समोरच्यांना तेवढेच योग्य लेखत त्यांचा यथोचित सन्मानच केला, माणूसपण विसरले नाहीत म्हणूनच ते मोठे झाले.

20 जुलै 2009

बुधवार, १२ ऑगस्ट, २००९

प्रति, सुप्रिया मॅडम,

प्रति, सुप्रिया मॅडम,
गेल्या शुक्रवारी पुस्तक घेण्या-देण्याच्या निमित्ताने तुमची भेट झाली. खूप दिवसांपासून तुम्हाला भेटण्याची इच्छा होतीच, पण तसा योग येत नव्हता. तो यानिमित्ताने आला. भेटीपूर्वी तुमच्याबद्दल वाटणारा आदर भेटीनंतर दुप्पट-चौपट झाला. अनेकवेळा आपण एखाद्याचे लेखन वाचतो किंवा त्या लेखकाबद्दल इतरांनी सांगितलेल्या गोष्टीवरुन त्याची मनात एक प्रतिमा तयार करतो. याला मी पूर्वग्रह असं म्हणत नाही, पण अशा चौकटीत आपण लेखकाला ठेवतो. त्यामुळे आपल्यातील अस्वस्थता थोडी कमी होते. तशी एक प्रतिमा तुमच्याबद्दल माझ्या मानात होतीच. पण जेव्हा प्रत्यक्षात तुमच्याशी बोलणं झालं, त्यावेळी प्रत्यक्ष बऱ्याचवेळा प्रतिमेच्या खूपच उत्कट असंत हे माझ्यालेखी पुन्हा अधोरेखीत झालं.(याचं श्रेय मा. भोसलेसाहेबांना जाते.)
एक आठवड्यानंतर पत्र लिहण्याला एक कारण आहे ते म्हणजे तुमची पुस्तके. शुक्रवारी संध्याकाळी "पॉपकॉर्न' वाचायला घेतलं. पहिला लेख वाचल्यानंतर दुसरा आणि दुसऱ्यानंतर तिसरा लेख वाचण्याचा मोह आवरता आवरला नाही. बऱ्याचवेळा रात्री बेडवर पडल्यावर झोप येईपर्यंत पुस्तक नाकासमोर राहातं आणि त्यानंतर ते उलटं छातीवर कधी पडतं हे कळतच नाही..पण एखाद्या लहान मुलापुढे खाऊचा डबा ठेवला तर ते मूल किती हरखून जाईल तेवढाच हरखून गेलो. घड्याळाच्या काट्याकडे लक्ष देत आता हा शेवटचाच लेख वाचायचा आणि झोपायचा असा विचारही केला. लाईट बंद केली पण तरी एक अस्वस्थता कायम राहीली आणि पुन्हा लाईट लावला पुस्तक पूर्ण केलं मगच शांत झोप आली. विशेष म्हणजे मला आता जेव्हा जेव्हा खूप अस्वस्थ वाटेल आणि रिलॅक्‍स होण्यासाठी एक लेख सकाळी आणि एक लेख रात्री वाचण्याचा डोस पुरेल हे नक्‍की!
"टाईमपास' मात्र पाच- सहा वर्षांपुर्वी माझ्या वाचनात आलं नाही हे बरे झाले. बऱ्याचवेळेला शब्दांचा समोरचा अर्थ दिसतो तसा असतोच असं नाही. किंवा एखाद्या वाक्‍याचाही अर्थ असाच संदर्भहीन आला तर त्याच्या छटा वेगळ्याच दिसतात. किमान मला तरी समुहातील शब्द आणि समुहाबाहेरचा शब्द वेगवेगळा भासतो. पुस्तकांत येणारा शब्द हा रिलेतील खेळाडूसारखा असतो अगदी आपल्या हातातील काठी पुढच्या खेळाडूच्या हातात देणारा, तर एकटा शब्द धावण्याच्या स्पर्धेत एकटा धावत असल्यासारखा. त्यामुळे शब्दांचे समोरचेच अर्थ घेण्याच्या वयात मला हे पुस्तक कदाचित आवडलं नसतं. पण आज मात्र हे पुस्तक वाचताना जगण्यातली शुचिर्भूतता ही कल्पनेतच असते पण जसं जगलो तसं मांडणं याला किती धीटपणा असावा लागतो याची जाणीव आहे. त्यामुळे हे पुस्तक डोक्‍यात कमी जातं आणि मनात घर करुन बसतं. प्रोतिमांचं जगणं जितकं प्रवाही आहे, त्याहीपेक्षा तुम्ही केलेलं त्याचं भाषांतर. या प्रवाहात एकदा माणूस पडला की पुन्हा किनाऱ्याचा शोध तो घेत नाही अगदी शेवटापर्यंतच तो येवून पोहोचतो. यासाठी तुम्हाला धन्यवाद!

ता.क. काही व्याकरणाच्या चुका असतील तर क्षमा! मी त्या सुधारण्याचा प्रयत्न करत आहे.

मंगळवार, ११ ऑगस्ट, २००९

चांगदेवाची अवस्था

प्रती,
े,
खरंच चांगदेवाची काय अवस्था झाली असेल, हे मला आत्ता नक्‍की कळते. अर्थात मी चांगदेव नाही आणि तू ज्ञानेश्‍वर नाहीस तरीही मायना काय लिहावा हा प्रश्‍नच होता. परत पत्र लिहिताना एकेरी उल्लेख करावा की आदर व्यक्‍त करावा काहीच कळलं नाही. शेवटी शब्द तरी तुम्हाला कुठपर्यंत साथ देणार फक्‍त भावना महत्वाच्या. त्या व्यक्‍त झाल्या की शब्दांचं काम संपलं. म्हणजे त्यांचं काम हे फक्‍त वाहकांचं. तुमच्या अभियांत्रिकी भाषेत सांगायचं झालं, तर शब्द काही भावनांचे चांगले वाहक नाहीत. गरजेला उपयोगी पडतात एवढाच त्यांचा कार्यभार.
कुणाचे पत्र, का लिहिलं असेल, गरज होती का अशा प्रश्‍नांची एक रांग तुझ्या मनात असणार हे नक्‍की. पण या प्रश्‍नांच्या जाळ्यातून बाहेर आल्यावर तुलाही पटेल. तशी आपली ओळख "तोंडदेखली' असंही म्हणता येत नाही. तरी आपली ओळख आहे. बऱ्याचदा आपल्या भोवती असणारे सगळे आपल्याशी खूप चांगलं बोलत असतात, आपल्याबद्दल त्यांच्या मनात खूप चांगल्या भावना असतात तरीही काही गोष्टींसाठी मात्र त्यांच्याकडे वेळ असतोच असं नाही. जगाच्या दृष्टीने अगदी शुल्लक गोष्टी असतील पण त्या गोष्टी आपल्यासाठी खूप मोठ्या असतात. जगण्याचं बळ देवून जाणाऱ्या असतात. आमचे एक आकाशवाणीवरील सहकारी आहेत, श्रीनिवास जरंडीकर तू नाव ऐकून असशील त्यांना पदोन्नती मिळाली. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांना एखादं पुस्तक भेट देता येईल का हे बघण्यासाठी मी "ग्रंथ'मध्ये गेलो होतो. अनेक पुस्तके बघीतल्यानंतर एक पुस्तक हाती लागलं ते संदीप खरे यांच्या कवितांचे. हा कवितासंग्रह तुलाही आवडेल असा चटकन विचार माझ्या मनात आला. खरे तर तू लेक्‍चरर म्हणून रुजू झाल्यावरच तुला एखादे पुस्तक देवून तुझे अभिनंदन करावे अशी इच्छा होती पण एकतर आपली ओळख अगदीच त्रोटक आणि त्यात तू मुलगी. थोडं स्पष्ट लिहतोय पण त्याला इलाज नाही. यानं मुद्दाम पुस्तक भेट दिलं की काय ही भावना साहाजिक उमटली असती. त्यामुळे तो विचार मी बाजुला ठेवला. खरे तर कविता आवडणारी लोकं खूप आहेत पण कवितांवर प्रेम करणारी लोकं खूप कमी आहेत. आणि मग अशा विषयांवर चर्चा करणारी माणसं मिळत नाहीत. मग अतृप्ततेची भावना रेंगाळत राहते. काहीच सूचत नाही. बिघडलं काय असं कोणी विचारलं तर त्याचं उत्तर काही नाही असंच तर असतं पण बिघाड दुरुस्त कसा करायचा हेही सूचत नाही. अशावेळी तुझ्यासारखे मित्र असणं आवश्‍यक असतं.
तुझ्या नव्या भूमिकेसाठी अभिनंदन !

प्रवीण कुलकर्णी
कोल्हापूर
11 ऑगस्ट 2009

ता. क. तुला आवडलं नसेल तर तसा स्क्रॅपही तू ऑर्कूटवर टाकू शकतेस. थोडं वाईट वाटेल बाकी शुन्य!

प्रती, जरंडीकर सर यांना

प्रती,
जरंडीकर सर यांना,
मोबाईल फोनमुळे आजकाल पत्र लिहिण्याचा सराव उरलेला नाही. किंबहुना आमच्या पिढीने परीक्षेत जेवढी पत्रे लिहिली तेवढीच. बाकी कार्यालयीन रुक्ष पत्रे लिहीत असलो तरी त्याला "अर्ज' (मनातून कितीही राग असला तरी) हेच स्वरूप राहिले. सांगायचा मुद्दा असा, की बऱ्याच मोठ्या कालावधीत पत्र लिहिण्याचा योग तसा आलेला नाही. त्यामुळे पत्रात जर काही चुका असतील तर त्या समजून घ्याल, ही अपेक्षा.
परवाच्या दिवशी तुमच्याशी फोनवर बोलताना तुम्हाला पदोन्नती मिळाली हे समजले. फोनवरुन शुभेच्छाही दिल्या; पण या शुभेच्छात तो ओलावा नव्हता, की काय याची रुखरुख मलाच लागून राहिली. आजकाल शुभेच्छांचे मेसेज या मोबाईलवरुन त्या मोबाईलवर सगळीकडे बागडत असतात, ज्याने धक्‍का दिला त्याचा मेसेज, एवढंच. बाकी सगळा शब्दांचा बुडबुडा. त्यामुळे मेसेज पाठवावा की न पाठवावा या द्विधा मनःस्थितीत होतो. बऱ्याचदा फोनवरुन बोलताना आपल्या नेमक्‍या काय भावना आहेत हे समोरच्याला कळतेच असे नाही. त्यासाठी लागणारे शब्दांचे गुच्छ प्रत्येक वेळी आपल्याकडे असतातच असे नाही आणि मग एखाद्या सुंदर घटनेच्या आनंदाच्या कळ्या फुलतातच असे नाही. त्यामुळे हा पत्राचा अट्टहास.
तुम्हाला मिळालेल्या पदोन्नतीबद्दल अभिनंदन! अगदी खूप वर्षांचा नसला तरी गेल्या तीन वर्षांच्या आपल्या स्नेहात मला हे
माहीत आहे की, तुमचे (सरकारी कर्मचारी असला तरी) कामावर किती प्रेम आहे. आपण पुढच्या आठवड्यात सुटीवर जाणार असाल तर या आठवड्यात बारा बारा तास काम केल्याचे मी बघितले आहे. तुमची कामाबद्दलची निष्ठा आणि झोकून घेणे, त्यासाठी लागणारे कष्ट उपसणे बघितले की तुमच्यापेक्षा आम्ही किती लहान आहे हे लक्षात येते. त्यामुळेच या पदोन्नतीतील आणखी महत्त्व. बाकी तुमच्यापेक्षा वयाने (तांत्रिक अर्थाने), अनुभवाने आणि बुद्धीने सगळ्याच बाबतीत खूप लहान आहे. भावना पोहोचविणे एवढाच या पत्राचा उद्देश, बाकी काहीच नाही.
पुन्हा एकदा तुमचे अभिनंदन!
प्रवीण कुलकर्णी
कोल्हापूर
11 ऑगस्ट 2009

प्रती, जरंडीकर सर यांना

प्रती,
जरंडीकर सर यांना,
मोबाईल फोनमुळे आजकाल पत्र लिहिण्याचा सराव उरलेला नाही. किंबहुना आमच्या पिढीने परीक्षेत जेवढी पत्रे लिहिली तेवढीच. बाकी कार्यालयीन रुक्ष पत्रे लिहीत असलो तरी त्याला "अर्ज' (मनातून कितीही राग असला तरी) हेच स्वरूप राहिले. सांगायचा मुद्दा असा, की बऱ्याच मोठ्या कालावधीत पत्र लिहिण्याचा योग तसा आलेला नाही. त्यामुळे पत्रात जर काही चुका असतील तर त्या समजून घ्याल, ही अपेक्षा.
परवाच्या दिवशी तुमच्याशी फोनवर बोलताना तुम्हाला पदोन्नती मिळाली हे समजले. फोनवरुन शुभेच्छाही दिल्या; पण या शुभेच्छात तो ओलावा नव्हता, की काय याची रुखरुख मलाच लागून राहिली. आजकाल शुभेच्छांचे मेसेज या मोबाईलवरुन त्या मोबाईलवर सगळीकडे बागडत असतात, ज्याने धक्‍का दिला त्याचा मेसेज, एवढंच. बाकी सगळा शब्दांचा बुडबुडा. त्यामुळे मेसेज पाठवावा की न पाठवावा या द्विधा मनःस्थितीत होतो. बऱ्याचदा फोनवरुन बोलताना आपल्या नेमक्‍या काय भावना आहेत हे समोरच्याला कळतेच असे नाही. त्यासाठी लागणारे शब्दांचे गुच्छ प्रत्येक वेळी आपल्याकडे असतातच असे नाही आणि मग एखाद्या सुंदर घटनेच्या आनंदाच्या कळ्या फुलतातच असे नाही. त्यामुळे हा पत्राचा अट्टहास.
तुम्हाला मिळालेल्या पदोन्नतीबद्दल अभिनंदन! अगदी खूप वर्षांचा नसला तरी गेल्या तीन वर्षांच्या आपल्या स्नेहात मला हे
माहीत आहे की, तुमचे (सरकारी कर्मचारी असला तरी) कामावर किती प्रेम आहे. आपण पुढच्या आठवड्यात सुटीवर जाणार असाल तर या आठवड्यात बारा बारा तास काम केल्याचे मी बघितले आहे. तुमची कामाबद्दलची निष्ठा आणि झोकून घेणे, त्यासाठी लागणारे कष्ट उपसणे बघितले की तुमच्यापेक्षा आम्ही किती लहान आहे हे लक्षात येते. त्यामुळेच या पदोन्नतीतील आणखी महत्त्व. बाकी तुमच्यापेक्षा वयाने (तांत्रिक अर्थाने), अनुभवाने आणि बुद्धीने सगळ्याच बाबतीत खूप लहान आहे. भावना पोहोचविणे एवढाच या पत्राचा उद्देश, बाकी काहीच नाही.
पुन्हा एकदा तुमचे अभिनंदन!
प्रवीण कुलकर्णी
कोल्हापूर
11 ऑगस्ट 2009