बुधवार, १२ ऑक्टोबर, २०११

अश्रू

तो
ती काय करत असेल आता.... कदाचित रडून-रडून डोळे सुजले असतील.... जगजीत सिंह गेल्याचा धक्‍का तीनं कसा सहन केला असणार... वेड्यासारखी प्रेम करायची त्याच्यावर. त्याच्या गजलांवर मरायचीच म्हणा ना....वो कागज कि कश्‍ती हे तिचं आवडतं गाणं... हात छुटे भी तो रिश्‍ते नही छोडा करते.... या गझलेप्रमाणे तिने अनेकवेळा जगण्याचा प्रयत्नही केला पण जमला नाही.... जगणं गाण्याचे शब्द बनतात... पण गाण्याच्या शब्दांवरच्या मार्गावरुन चालणं सोप्प नसतं, हे तिला जाणवून गेलं त्यामुळेच तिनं हात सोडवून घेतला... ती गाण्यात रमायची... .. पण गजलांवर तिचं खास प्रेम....प्रत्येकवेळी ती नवनव्या गजलांवर बोलायची... तिच्या जगण्याच्या अनेक आधारांपैकी एक आधार गझल आहे हे नक्‍की.. त्यामुळे या आधाराला बसलेला धक्‍का तीनं कसा सहन केला असेल देव जाणे... कदाचित दारं खिडक्‍या बंद करुन जगजितचीच एखादी कॅसेट प्ले केली असेल... किंवा त्या अंधारात उशी ओली होईपर्यंत रडत बसली असेल...गुलजार आणि जगजीत सिंह या दोघांच्या शब्द -सुरावर तिचे अनेक इमले उभे आहेत, अशा इमल्यांना असे धक्‍के थोडे जडच जातात.....

ती
जगजीत सिंह गेले...त्याला बातमी समजल्यावर तो कसा रिऍक्‍ट झाला असेल.... त्याला धक्‍का बसला असेल... छे धक्‍का बसणाऱ्यांमध्ये तो कधीच नव्हता.... ब्रेन हॅमरेज झालेलं होतं... डॉक्‍टरांनी प्रयत्न केले पण ते अपुरे पडले एवढंच म्हणेल आणि मान एका दिशेला फिरवून गप्प बसेल.... माहित नाही नक्‍की तो कसा रिऍक्‍ट झाला असेल... संवेदना तशा त्याच्या बोथटच झाल्यात जणू.... सुख -दुःख मानायला वेळ कोणाकडे आहे, हे त्याचं तत्वज्ञान....त्यात माणसं मरायचीच कधी ना कधी हे नेहमीचंच वाक्‍य त्यानं नक्‍की कोणाच्या तरी तोंडावर फेकलं असणार... पण जगजीत वेगळाच माणुस... या माणसाकडे काय शक्‍ती आहे नाही, जखमांना तोच उघडं करतो आणि त्यावर हळुवार फुंकरही घालतो.... जखमा ओल्या ठेवताना त्यातील वेदना हलकेच सुखावह करण्याचे जे कसब त्याच्यात आहे ते मुळी कुणाच्यात नाहीच...शब्दांच्या अर्थांना सुरातून त्यानंच प्रवाहीत करावं... त्याचं गाणं रेडीओवर लागावं आणि ऐन दुपारी कातरवेळीची हुुरहूर जाणवावी... त्याच्यासारखा सूरकर्मी सापडणं मुश्‍किल... बंधमुक्‍त गाताना, ऐकणाऱ्याला बंधिस्त करण्याची त्याची हातोटी जगावेगळी... ही सारी वाक्‍ये तर त्याचीच की... त्यामुळं जगजीत गेल्याचं त्याला नक्‍कीच दुःख झालं असणार... रात्री घरी आल्यावर त्यानं जगजीतच्या गझला लावल्याच असतील... आणि त्या ऐकताना नाकावर अश्रुचा थेंब आला असणारच....