रविवार, २० नोव्हेंबर, २०११

चर्चा में युवराज

युवराजांनी टीव्ही बंद केला, रिमोट फेकून दिला आणि जोरात हाक मारली. चापलुसी करणाऱ्यांपैकी एक दोन जण धावत युवराजांच्या शयनकक्षात आले. युवराज अस्वस्थपणे येरझाऱ्या मारत होते. हातोपे मागे सारत होते, पुढे घेत होते. त्यांच्या गालावरची खळी आणखी खोल झाल्यासारखी दिसत होती. चापलुसी करणाऱ्यांना समजेना युवराज एवढे अस्वस्थ का आहेत? एकाने धीर केला आणि विचारलेच, साहेब काय झालं आहे? एवढी चिंता कशाची...? युवराजांनी एकदा चापलुसी करणाऱ्याकडे बघितलं.
अरे ! हे राज ठाकरे कोण? केवढा आहे त्यांचा पक्ष? किती राज्यात सत्ता आहे, किती आमदार, खासदार आहेत... बोला लवकर बोला...
साहेब फारसे काही नाही... महाराष्ट्र प्रदेशी 13 आमदार असलेला छोटा पक्ष आहे. आपल्या तुलनेत तर काहीच नाही. कुठे आपला पक्ष आणि कुठे राज ठाकरे यांचा पक्ष... चापलुसी करणारे जशी-जशी माहिती सांगत होते तसे युवराज संतापत होते...
अरे! एवढासा पक्ष आणि त्यांच्या नेत्याच्या भाषणाचे लाईव्ह प्रक्षेपण आणि आमची केंद्रात सत्ता, 9-10 राज्यांत सत्ता, तरी कोणी आमचे लाईव्ह भाषण दाखवत नाही, म्हणजे काय? आमच्या भाषणाची बातमी दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात आतल्या पानात कुठेतरी आणि राज ठाकरे काहीही बोलायला लागले की लाईव्ह. हे काही बरोबर नाही. आपलंही भाषण लाईव्ह झालं पाहिजे शोधा काय जादू असते त्यांच्या भाषणात, ज्यामुळे राज ठाकरेंचे भाषण लाईव्ह दाखविले जाते... शोधा...
चापलुसी करणाऱ्यापैकी दुसरा एक जण पुढे झाला, साहेब राज ठाकरेंसारखे आपले भाषण लाईव्ह व्हायचे असेल तर भाषण चर्चेत यायला हवे... काही तरी असं बोललं पाहिजे, की सगळ्या वर्तमानपत्रात त्याची मेन बातमी झाली पाहिजे... पुढचे चार-पाच दिवस सगळ्या वाहिन्यांवर त्याचीच चर्चा झाली पाहिजे... विरोधी पक्षाने हिरीरीने पुढे येत त्यावर बोलले पाहिजे.
युवराजांना स्वप्ने पडू लागली... सगळ्या चॅनेलवर आपलीच चर्चा... सगळे आपल्याविषयीच बोलताहेत... युवराजांनी सचिवाला भाषण लिहायला सांगितले, ""यावेळी असे भाषण लिहा, की साऱ्या वर्तमानपत्रांची मुख्य बातमी झाली पाहिजे, चार दिवस आपलीच चर्चा झाली पाहिजे.'' सचिवांनी भाषण लिहिले... खूप मोठे भाषण लिहिले... युवराजांनी एकदा वाचले आणि फाडून टाकले... यापेक्षा जोरकस लिहा... चर्चा लक्षात ठेवा... चर्चा झाली पाहिजे... सचिवाने पुन्हा भाषण लिहिले. युवराजांनी पुन्हा भाषण फाडून टाकले... सचिवाने तिसऱ्यांदा भाषण लिहिले. युवराजांना यावेळी भाषण आवडले नाही त्यांनी स्वतः पेन हातात घेतलं आणि एका टाकात भाषण लिहून टाकलं... आता हे भाषण केलं, की आपलीच चर्चा... केवळ उत्तर प्रदेशी नाही तर महाराष्ट्रदेशीही आपलीच चर्चा... युवराज आपल्याच स्वप्नात रंगून गेले.
भाषणाचा दिवस उजाडला... युवराज स्टेजवर माईकपुढे उभे राहिले, चापलुसी करणाऱ्या काहींनी घोषणा द्यायला सुरवात केली, युवराजांनी हातोपे वर केले आणि भाषण द्यायला सुरवात केली लोक बावरून बसले... युवराज बोलत सुटले... जोरकसपणे हातवारे करीत राहिले... भाषण संपवून युवराज खुर्चीवर येऊन बसले, कसं झालं भाषण... जोरकस झालं ना...? स्वतःवर खुश होत युवराजांनी विचारलं... चापलुसी करणाऱ्याने मान डोलावली युवराजांना घाई झाली हे टीव्हीवाले काय चर्चा करताहेत... त्यावर आपले लोक काय प्रतिक्रिया देत आहेत... युवराज घाई-घाईने घरी आले टीव्ही लावला... सटासट चॅनेल सर्फ केलं सगळीकडे युवराजच दिसत होते... युवराजांनी एका चॅनेलवर रिमोट स्थिर ठेवला... चर्चा में युवराज .. लोकांच्या भावनेला ठेच... लोकांची युवराजांनी माफी मागावी... युवराजांना कळेना आपलं काय चुकलं... त्यांच्या जोरकस भाषणाची चिरफाड सुरू होती आणि त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांकडून त्याबाबत खुलासा मागितला जात होता... पक्षाच्या नेत्यांना उत्तर देताना कठीण जात होतं... युवराजांच्या भाषणाने पक्षाला फायदा होण्याऐवजी तोटाच होण्याची शक्‍यता जास्त होती... युवराज बावरले... त्यांनी सचिवाला विचारलं, ठाकरे भाषण करतात त्यावेळी त्यांच्यावर स्तुतिसुमने आणि आपण बोललो की जाब, असं का? सचिव हळूच कानात बोलला... साहेब विरोधक खरं बोलण्यासाठी भाषण करतात आणि सत्ताधाऱ्यांना खरं लपवावं लागतं...

****"सकाळ'मध्ये 20 नोव्हेंबरला छापून आलेला माझाच लेख****




रविवार, १३ नोव्हेंबर, २०११

डबल बेल...

बाईंनी पुन्हा घड्याळात बघितलं. आपल्या विस्कटलेल्या केसांवरून हात फिरवला, पण केस काही बसले नाहीत... साडी जरा सारकी-वारकी करायचा प्रयत्न केला, आणि बाई बसमध्ये चढल्या. कंडक्‍टरने डबल बेल मारली आणि जोरात घोषणा केली, "इथून पुढच्या प्रवासाला आता आणखी दोन रुपये तिकीटवाढ करण्यात आली आहे.' तिकीट दरवाढ ऐकल्यावर बसमध्ये कुजबूज सुरू झाली... हा अन्याय आहे? मागच्याच थांब्यावर तिकीट दरवाढ करण्यात आली होती. आता परत दरवाढ... अशक्‍य आहे... आम्ही तिकीट दरवाढ खपवून घेणार नाही, कपाळाला भगव्या पट्ट्या बांधलेल्या काही प्रवाशांनी जोरात घोषणा केली. या प्रवाशांबाबत लांब फटकून राहणाऱ्या काही हिरव्या पट्ट्या बांधलेल्या लोकांनीही अशीच घोषणा केली... बाई सगळं बघत होत्या... समजून घेत होत्या... तिकीट दरवाढीला विरोध करणाऱ्यांबाबत त्यांना आता "ममत्व' वाटू लागले तर... आता या सगळ्याच्या आंदोलनात बाईही पडल्या तर... अवघड होईल म्हणून कंडक्‍टर भांबावला होता... त्यानं आशेनं चालक सरदारजींवर नजर खिळविली... पण त्यांनी हूं की चूं केलं नाही... गाडीतील गोंधळ वाढतोय तसा त्यांनी आपली तुरबान आणखी खाली खेचत आवाज कानापर्यंत पोचणार नाही याची काळजी घ्यायला सुरवात केली. बाईंच्या हे ध्यानी आलं. त्यांनी आता या कालव्यात आपलाही आवाज मिसळायला सुरवात केली. तुरबानीतून आवाज पोहोचेपर्यंत आवाजाचा पिच मोठा करत त्यांनी घोषणा दिली... अन्यायी तिकीट दरवाढ मागे घेतलीच पाहिजे... तिकीट वाढ मागे घेतलीच पाहिजे... बसमधल्या साऱ्यांचेच लक्ष आता बाईंवर खिळून राहिले. बाईंनी दिलेल्या स्टेपनीवरच तर गाडी चालू आहे. त्यामुळे बाई म्हणताहेत त्या प्रमाणे तिकीट दरवाढ मागे घेतली जाईल... अशी सगळ्यांना अशा लागली... कपाळावर भगव्या पट्ट्या बांधलेल्या प्रवाशांना घाई झाली... बाईंनी आता स्टेपनी काढून घ्यावी... म्हणजे ही गाडी इथेच थांबेल... सरदारज
ी जातील आणि शेठजी गाडी चालवतील... त्यांनी मनाचे मांडे खायला सुरवात केली... बाईंच्या घोषणेने कंडक्‍टर गोंधळला. आता या वळणावर जर बाईंनी स्टेपनी काढून घ्यायचा निर्णय घेतला तर पुढचा प्रवास करायचा कसा... आणखी कोणाकडे स्टेपनी उपलब्ध होऊ शकते का? झाली तर ती किती काळ टिकेल... कंडक्‍टरच्या डोक्‍याचा भुगा झाला... तो सरळ सरदारजींच्या पाशी गेला... बाई नाराज आहेत... स्टेपनी मागितली तर... काही तरी उपाय केला पाहिजे... बाईंना समजावलं पाहिजे... सरदारजींनी आरशातून बघितलं... बसमध्ये गोंधळ सुरू होता... भगवे, निळे, हिरवे सगळे पट्टे बांधलेले तिकीट दरवाढीचा विरोध करत होते... त्यातून त्यांना बाई दिसल्या... बाई आपल्या कपाळावर आलेले केस मागे घेत जोरात घोषणा देत होत्या.... तिकीट दरवाढ मागे घेतलीच पाहिजे... घेतलीच पाहिजे, घेतलीच पाहिजे. त्यांचे काही सहकारी त्यांच्या घोषणेला साथ देत होते... आता हे सगळे जर ओरडत राहिले तर गोंधळ वाढणार हे बघून सरदारजींनी गाडी धाब्यावर थांबविली... बाईंसाठी लस्सी मागवली... लोकांना वाटू लागलं. बाई चर्चा करताहेत... तिकीट दरवाढ मागे घेतली जाणार... काहींना आनंदाच्या उकळ्या फुटल्या... भगवे पट्टेवाले चर्चा फिसकटण्याची वाट बघू लागले... आता चर्चा फिसकटेल... बाई स्टेपनी काढून घेतील... त्यांचे मनाचे मांडे सुरू झाले... धाब्यावरून गाडी सुटायला लागली... सरदारजींनी स्टार्टर मारला... बाई बसमध्ये चढल्या... आता साऱ्यांचीच उत्सुकता शिगेला पोचली... तिकीट दरवाढ मागे घेतली जाणार का? स्टेपनी काढली जाणार का? काही वेळ बाई बोलल्याच नाहीत... कंडक्‍टरने डबल बेल मारली... लोक कुजबुजायला लागले... बाईंनी घोषणा केली... पुढच्या थांब्यावर आणखी दोन रुपयांनी तिकीट दरवाढ होणार होती, माझ्यामुळे ती थांबली... भगवे पट्टेवाले, हिरवे पट्टेवाले, निळे पट्टेवाले मघाच्या घोषणा देऊन दमून गेले होते... कंडक्‍टरने पुन्हा डबल बेल
मारली... या वेळी सरदारजींनी बसमधले दिवे बंद केले... कोणी काही बोलत नव्हते, घोषणा नव्हत्या... कुजबुज नव्हती... होती ती केवळ झोप...!!

****"सकाळ'मध्ये 13 नोव्हेंबरला छापून आलेला माझाच लेख****

रविवार, ६ नोव्हेंबर, २०११

खाली डोकं वर पाय...

बाबांनी आपल्या काळ्या लांब वाढलेल्या दाढीवरून पुन्हा हात फिरविला आणि आपला डावा डोळा आणखी लहान करत मानेनं आणखी एक मुरका मारला... प्रेक्षकांतल्या काही बायका लाजल्या... "तो अब मै आप को शीर्षासन कर के दिखाता हुँ!' असं म्हणत बाबांनी आपलं खाली डोकं वर पाय केले... लोकांनी जोरात टाळ्या वाजवल्या... बाबांना नेमके काही कळेना... अरे मी इथे योग शिकवतोय आणि लोक त्याला सर्कस समजून टाळ्या काय वाजवताहेत... बाबा गरजले... "टाळ्या वाजवू नका, तुम्हीही करण्याचा प्रयत्न करा...' काही पोरा-सोरांनी प्रयत्न केला; पण तो पार फसला... बाबा पुन्हा पुन्हा स्टेजवर उड्या मारत होते... पोट आत घेत होते, बाहेर काढत होते... काही जण बाबांप्रमाणे करायचा प्रयत्न करत होते; तर बरेच जण बाबांचा स्टेज परफॉर्मन्स बघून हसत होते, टाळ्या वाजवत होते... बाबांनी मोठ्याने स्टेजवर उडी मारली आणि एका झटक्‍यात खाली डोके वर पाय केले आणि तशाच अवस्थेत घोषणा केली... या सरकारला असंच खाली डोकं वर पाय करायला लावीन... प्रेक्षकांनी जोरात टाळ्या वाजविल्या आणि बाबांना प्रोत्साहन दिलं...

बाबा मनोमनी खूश झाले... आपल्या वर्गाला येणाऱ्या प्रेक्षकांनी साथ दिली की मग झालं... बाबा गावोगाव सांगत सुटले... लोक त्यांचं ऐकायचे... त्यांच्या शीर्षासनाला टाळ्या ठोकायचे आणि घरी परतायचे... बाबांना वाटायचं, लोक आपल्या मागे आहेत, त्यांच्या जीवावर आपण सरकारला खाली डोकं वर पाय करायला लावू...
मग बाबा जोरात उड्या मारायचे... हातवारे करत सुटायचे... तिरकी मान करत डावा डोळा आणखी बारीक करत राहायचे.... शीर्षासन कसं आरोग्याला चांगलं आहे सांगायचे... देशासाठी, लोकांसाठी शीर्षासन सरकारला करावंच लागणार हे ते पुन्हा पुन्हा सांगत होते... लोक माना डोलवत होते... बाबा खूश होत होते... दिवस ठरला... स्टेज ठरलं... सरकारला धडा शिकवायला बाबांनी मुहूर्त बघितला... बाबांचा आवेग बघितल्यावर सगळ्यांनाच वाटायला लागलं, आता सरकारचे खाली डोके वर पाय होणार... सरकार घाबरणार... बाबा मनोमनी खूश होते... बाबा स्टेजवरून सांगत होते... आदेश देत होते... लोक पोट आत घेत होते, बाहेर काढत होते... बाबांना आता विश्‍वास आला, आता आपण सरकारला शीर्षासन करायला लावू... बाबा दाढीवरून हात फिरवत होते, डोळा बारीक करून प्रेक्षकांकडे बघत होते... आता सरकारचे शीर्षासन नक्‍की... रात्र चढत चालली तशी बाबांच्या स्टेजवरच्या उड्या वाढल्या... लोक पेंगाळून झोपले... पण बाबा मात्र कधी पोट आत घेत, कधी बाहेर सोडत... असंच बाबांनी पोट आत घेतलं आणि ते बाहेर काढणार इतक्‍यात सरकारच्या सैनिकांनी त्यांनाच स्टेजवरून बाहेर काढलं... बाबा तोंड लपवत-छपवत बाहेर आले... लोक चिडले... सरकारने बाबांचा घात केला... सैनिकांची कारवाई रात्री झाली... सरकारला काही सुचेना... बाबांचा महिमा कसा कमी करायचा... सरकारचा एक मानकरी पुढे झाला... बाबांच्या दाढीला हात घालायची त्यानं घोषणा केली... लोक बोलू लागले, आता बाबा आणि यांच्यात चकमक उडणार... बाबा सांगत राहिले, नखावर नख घासत राहा... केस काळे ठेवत राहा... मानकऱ्याच्या लक्षात आलं... लोकांना नखावर नख घासायला सांगणाऱ्या बाबांच्या दाढीचे दोन केस पांढरे आहेत... मानकऱ्याने लगेच ढोल वाजवायला सुरवात केली... बाबांच्या दाढीत पांढरे केस... बाबांचं हे काम एकट्याचे नसून "सांघी'क आहे... लोकांनाही बाबांच्या दाढीतले हे पांढरे केस दिसू लागले... लोक कु
जबुजू लागले... मानकऱ्याचे काम झाले... सरकारला संधी मिळाली... सरकारचं खाली डोकं वर पाय करण्याच्या गप्पा मारणाऱ्या बाबांचंच सरकारने खाली डोकं वर पाय केलं होतं... आणि त्यांच्या संघातलेच इतर जण "सर्कस' कशी झाली म्हणून टाळ्या वाजवत राहिले...!!

6 नोव्हेंबरच्या सकाळ मधील माझा लेख