रविवार, २० नोव्हेंबर, २०११

चर्चा में युवराज

युवराजांनी टीव्ही बंद केला, रिमोट फेकून दिला आणि जोरात हाक मारली. चापलुसी करणाऱ्यांपैकी एक दोन जण धावत युवराजांच्या शयनकक्षात आले. युवराज अस्वस्थपणे येरझाऱ्या मारत होते. हातोपे मागे सारत होते, पुढे घेत होते. त्यांच्या गालावरची खळी आणखी खोल झाल्यासारखी दिसत होती. चापलुसी करणाऱ्यांना समजेना युवराज एवढे अस्वस्थ का आहेत? एकाने धीर केला आणि विचारलेच, साहेब काय झालं आहे? एवढी चिंता कशाची...? युवराजांनी एकदा चापलुसी करणाऱ्याकडे बघितलं.
अरे ! हे राज ठाकरे कोण? केवढा आहे त्यांचा पक्ष? किती राज्यात सत्ता आहे, किती आमदार, खासदार आहेत... बोला लवकर बोला...
साहेब फारसे काही नाही... महाराष्ट्र प्रदेशी 13 आमदार असलेला छोटा पक्ष आहे. आपल्या तुलनेत तर काहीच नाही. कुठे आपला पक्ष आणि कुठे राज ठाकरे यांचा पक्ष... चापलुसी करणारे जशी-जशी माहिती सांगत होते तसे युवराज संतापत होते...
अरे! एवढासा पक्ष आणि त्यांच्या नेत्याच्या भाषणाचे लाईव्ह प्रक्षेपण आणि आमची केंद्रात सत्ता, 9-10 राज्यांत सत्ता, तरी कोणी आमचे लाईव्ह भाषण दाखवत नाही, म्हणजे काय? आमच्या भाषणाची बातमी दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात आतल्या पानात कुठेतरी आणि राज ठाकरे काहीही बोलायला लागले की लाईव्ह. हे काही बरोबर नाही. आपलंही भाषण लाईव्ह झालं पाहिजे शोधा काय जादू असते त्यांच्या भाषणात, ज्यामुळे राज ठाकरेंचे भाषण लाईव्ह दाखविले जाते... शोधा...
चापलुसी करणाऱ्यापैकी दुसरा एक जण पुढे झाला, साहेब राज ठाकरेंसारखे आपले भाषण लाईव्ह व्हायचे असेल तर भाषण चर्चेत यायला हवे... काही तरी असं बोललं पाहिजे, की सगळ्या वर्तमानपत्रात त्याची मेन बातमी झाली पाहिजे... पुढचे चार-पाच दिवस सगळ्या वाहिन्यांवर त्याचीच चर्चा झाली पाहिजे... विरोधी पक्षाने हिरीरीने पुढे येत त्यावर बोलले पाहिजे.
युवराजांना स्वप्ने पडू लागली... सगळ्या चॅनेलवर आपलीच चर्चा... सगळे आपल्याविषयीच बोलताहेत... युवराजांनी सचिवाला भाषण लिहायला सांगितले, ""यावेळी असे भाषण लिहा, की साऱ्या वर्तमानपत्रांची मुख्य बातमी झाली पाहिजे, चार दिवस आपलीच चर्चा झाली पाहिजे.'' सचिवांनी भाषण लिहिले... खूप मोठे भाषण लिहिले... युवराजांनी एकदा वाचले आणि फाडून टाकले... यापेक्षा जोरकस लिहा... चर्चा लक्षात ठेवा... चर्चा झाली पाहिजे... सचिवाने पुन्हा भाषण लिहिले. युवराजांनी पुन्हा भाषण फाडून टाकले... सचिवाने तिसऱ्यांदा भाषण लिहिले. युवराजांना यावेळी भाषण आवडले नाही त्यांनी स्वतः पेन हातात घेतलं आणि एका टाकात भाषण लिहून टाकलं... आता हे भाषण केलं, की आपलीच चर्चा... केवळ उत्तर प्रदेशी नाही तर महाराष्ट्रदेशीही आपलीच चर्चा... युवराज आपल्याच स्वप्नात रंगून गेले.
भाषणाचा दिवस उजाडला... युवराज स्टेजवर माईकपुढे उभे राहिले, चापलुसी करणाऱ्या काहींनी घोषणा द्यायला सुरवात केली, युवराजांनी हातोपे वर केले आणि भाषण द्यायला सुरवात केली लोक बावरून बसले... युवराज बोलत सुटले... जोरकसपणे हातवारे करीत राहिले... भाषण संपवून युवराज खुर्चीवर येऊन बसले, कसं झालं भाषण... जोरकस झालं ना...? स्वतःवर खुश होत युवराजांनी विचारलं... चापलुसी करणाऱ्याने मान डोलावली युवराजांना घाई झाली हे टीव्हीवाले काय चर्चा करताहेत... त्यावर आपले लोक काय प्रतिक्रिया देत आहेत... युवराज घाई-घाईने घरी आले टीव्ही लावला... सटासट चॅनेल सर्फ केलं सगळीकडे युवराजच दिसत होते... युवराजांनी एका चॅनेलवर रिमोट स्थिर ठेवला... चर्चा में युवराज .. लोकांच्या भावनेला ठेच... लोकांची युवराजांनी माफी मागावी... युवराजांना कळेना आपलं काय चुकलं... त्यांच्या जोरकस भाषणाची चिरफाड सुरू होती आणि त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांकडून त्याबाबत खुलासा मागितला जात होता... पक्षाच्या नेत्यांना उत्तर देताना कठीण जात होतं... युवराजांच्या भाषणाने पक्षाला फायदा होण्याऐवजी तोटाच होण्याची शक्‍यता जास्त होती... युवराज बावरले... त्यांनी सचिवाला विचारलं, ठाकरे भाषण करतात त्यावेळी त्यांच्यावर स्तुतिसुमने आणि आपण बोललो की जाब, असं का? सचिव हळूच कानात बोलला... साहेब विरोधक खरं बोलण्यासाठी भाषण करतात आणि सत्ताधाऱ्यांना खरं लपवावं लागतं...

****"सकाळ'मध्ये 20 नोव्हेंबरला छापून आलेला माझाच लेख****




1 टिप्पणी:

भोवरा म्हणाले...

छान मजा आली वाचून