रविवार, ३० ऑक्टोबर, २०११

दोन पत्रं


आता वाहनांची वर्दळ बरीच कमी झाली होती. रात्रीचे 12 वाजून गेले असतील, मघापासून पुलाभोवती फिरणारा तो पुलाखाली आला. पुलाच्या एका खांबाशेजारी एक दगड होता, त्यावर तो रेलून बसला. दिवसभर वणवण करत भटकलेले शरीर थकून गेलं होतं. पण पोटातील भूक डोळ्यातील झोपेला अडवून धरत होती. त्यानं खूप प्रयत्न केला; पण झोप येत नव्हती. डोळ्यासमोरून बायको आणि पोराचा चेहरा जात नव्हता; काय करत असतील... हाच विचार त्याच्या मनात येत होता... कदाचित बायको रडून रडून थकून गेली असेल... बिचारीच्या डोळ्यातील पाणी आटलं असेल पण हुंदका अजून तसाच असेल.... खूप प्रेम करायची...तिच्यामुळेच पूर्णत्व आलं आहे.... पण.... पोराला अजून काही कळत नाही. पण आपला बाबा चार दिवसांपासून घरी का परतला नाही, हा प्रश्‍न त्यालाही पडला असेलच. हा प्रश्‍न विचारून विचारून त्यानं आईला भंडावून सोडलं असेल. त्याला दोघांची काळजी वाटली... त्यांच्या आठवाने त्याचे डोळे भरुन आले...त्याने हलकेच गालावर आलेले थेंब पुसले...

चार दिवसापूर्वी ऑफीसला जातो सांगून तो बाहेर पडला होता. तो अद्याप घरी पतला नव्हता. चार महिन्यापूर्वीच कंपनीने त्याला मंदिच्या कारणावरून काढलं होतं. बायकोला हा धक्‍का सहन होणार नाही... बिचारी फार सोसते आणि आता विचारांनीही खंगायची... लग्नापासून तिच्या अंगाला तसं काही लागलंच नाही...कदाचित मला सोडून जाईल...छे ती सोडून जाण्याचा विचार येताच त्याला कसंतरी झालं... तिच्याशिवाय मी नाही जगू शकत. ती आहे म्हणून मी आहे....वीज चमकावी तसा तो विचार त्याच्या मेंदूतून सरसरला.... त्यामुळे त्यानं ही गोष्ट बायकोला सांगायचं टाळलं.मग तो रोज ऑफीससाठी म्हणून बाहेर पडायचा आणि नोकरी शोधत कंपन्यांची दारं झिजवत राहायचा. दिवस जात होते आणि जमा पुंजी संपत होती. दोन महिने खुळ्या आशेतच गेले. आता त्याला निराशा येऊ लागली होती, पण काहीतरी प्रयत्न केलेच पाहिजेत म्हणून तो रोज घराबाहेर पडायचा आणि रात्री उशिरा परतायचा. पण काही उपयोग व्हायचा नाही.... घरात बायको-पोरापुढे हसताना... त्यांच्याशी गप्पा गोष्टी करताना त्याची नजर चोर बनायची... त्याची बायकोही त्याच्या नजरेत नजर मिसळायला टाळायचीच.... चार दिवसांपूर्वी तो असाच घराबाहेर पडत होता एवढ्यात बायकोचे ते शब्द त्याच्या कानावर पडले.... पोरगं कसला तरी हट्ट करत होतं, त्याची आई त्याला समजावत होती.
आज बाबांचा पगार होणार आहे, ते नक्की आणतील हं !
तिचा तो "नक्‍की' शब्द त्याला दिवसभर टोचत राहीला. संध्याकाळ झाली... मंदिराच्या पायऱ्यांवरुन तो खाली उतरला.... आता घराकडे जायचं तर पोरगं हट्‌ट करणार... त्याला आणि बायकोला समजाविताही येणार नाही....कदाचित आपल्याला नोकरी नाही म्हणून ती सोडूनही जाईल... छे तिने सोडून जाण्याची कल्पनाही त्याला सहन झाली नाही.... त्याला काहीच सुचेना...
तो मटकन खाली बसला... थोडावेळ तिथेच बसून राहिला.... आज घराकडेच जायचं नाही हे त्यानं मनाशी पक्‍क ठरवून टाकलं...मग शहरात फिरत राहिला रात्री एका बसमध्ये चढला कंडक्‍टरने त्याच्याकडे बघून न बघितल्यासारखं केलं.... बस कुठे निघाली हेही त्याला माहित नव्हतं.. एका स्टॉपवर बस थांबली.. सगळे उतरले हाही उतरला... रात्र बरीच झाली होती....मग तो रस्त्यावरुन फिरु लागला.... दिवसभराच्या कंटाळ्याने पाय पुरते थकले होते...त्याची नजर कुठे निवारा मिळतो का याचा शोध घेऊ लागली.... तिथल्याच रस्त्याच्या एका पुलाखाली त्यानं आपलं ठाण मांडलं. आणि तिथे तो झोपून गेला.....
आता गाड्यांचा आवाज पूर्ण मंदावत होता. गेली चार दिवस तो या पुलाच्या आधाराने जगत होता. कपडे आता मळके म्हणण्यापलिकडे गेले होते. दाढी वाढली होती. आणि चपलाचा तुटका बंद त्याच्या भिकारीपणांच्या लक्षणांना आणखी अधोरेखीत करत होता. दोन दिवसापूर्वी सकाळी फिरायला येणाऱ्यापैकी कोणीतरी त्याच्यासमोर शिळी चपाती ठेवली; त्यावेळी तो मनाशीच हसला. दुपारपर्यंत त्यानं त्या चपातीला हात लावला नाही. नंतर मात्र पोटाने मनावर विजय मिळविला.चपातीचा प्रत्येक घास खाताना त्याला प्रचंड वेदना होत होत्या... नंतर तिसऱ्या दिवशी आणि आजही कोणीतरी चपात्या आणून त्याच्यापुढे टाकल्या..... त्याला पहिल्यांदा त्या खाव्यात असं वाटलं पण नंतर त्यानं धीर केला त्यानं हात लावला नाही... दुपारी कधीतरी कुत्री त्याभोवती जमा झालेली त्यानं बघितलं आणि मग तो वेड्यासारखा हसत राहिला....
आता त्याला काही सुचत नव्हतं... कुत्र्याचं जगणं त्याला नकोच होतं....त्यानं खिसा चाचपला.... पेन अजून खिशात होते. त्यानं समोरच्या कचरा कुंडांतील एक कागद उचलला आणि रेल्वे स्टेशनच्या दिशेने चालायला लागला.
दुसऱ्या दिवशी पहाटे रेल्वे पोलिसांना रुळावर एक बॉडी मिळाली आणि खिशात एक पत्र
प्रिय,
रिमा.
आपल्या लग्नाला 3 वर्षे झाली. या तीन वर्षात जेवढं सुख देता येईल तेवढं मी देण्याचा प्रयत्न केला. सप्तपदीची सगळी वचनं मी पाळण्याचा प्रयत्न केला; पण आता ते शक्‍य नाही. तू सोडून जाण्यापेक्षा तू सोडून जाण्याची भीतीच मोठी आहे...ही व्दिधा सहन होत नाही... जगायचं तुझ्याशिवाय ही कल्पनाही सहन होत नाही..... म्हणून मी जगाचा निरोप घेतोय; जमलं तर माफ कर.
तुझाच रघू

पोलिसांनी पत्र वाचलं आणि त्या पत्रावरील पत्ता. त्या पत्त्यावर ते पोचले तर घराला मोठं कूलूप होतं. पोलिसांनी शेजारी चौकशी केली. त्यांना एक पाकिट मिळाल आणि त्यात रघुच्या नावाने एक पत्र


रघु.
आपल्या लग्नाला तीन वर्षे झाली. पण या तीन वर्षात मी तुमची कधीच होऊ शकले नाही... सप्तपदीची वचंन मी पाळू शकले नाही. खरे तर मी हे आधीच सांगायला हवं होतं... मनाविरुद्ध लग्न झालं होतं माझं... मला तुम्हाल धोका द्यायचा नव्हता....त्यामुळे नेटाने तीनवर्षे संसार केला पण आता हि व्दिधा सहन होत नाही... त्यामुळे मी आता सोडून जात आहे कायमचीच.... सोबत पिंटूंला घेऊन जात आहे... जमलं तर माला माफ करा.



*** 27 आक्‍टोबरच्या "ंसकाळ'च्या स्मार्ट सोबतीमध्ये छापून आलेली माझी लघुकथा ***

1 टिप्पणी:

हेरंब म्हणाले...

निःशब्द.. शेवटचा धक्का टिपिकल सुषमेय स्टाईल !!