रविवार, २ सप्टेंबर, २०१२

प्रिय,



तुझी आठवण आली की... छे! आठवण हा शब्दच चुकीचा. तुझ्याशी खूप बोलावं वाटलं की पत्र लिहिणं हे आता माझं नित्याचं झालं आहे. तुझ्याशी बोलायचे म्हणजेच तुला पत्र लिहायचे, म्हणजे तुझं वेगळं अस्तित्व मान्य करायचं. म्हणूनच या पत्र लिहिण्याच्या काळापुरता का होईना, मी तुझ्यापासून वेगळा होतो. तुला माझ्यातून बाहेर काढून, तुझ्याशी गप्पा मारण्याचा हा एकच मार्ग माझ्याकडे आता उरला आहे. एवढंच. जगातील माहीत झालेली प्रत्येक गोष्ट तुला सांगावी, त्या गोष्टीकडे तुझ्या डोळ्यांनी बघावे अशी खूप इच्छा असते, पण.. पण हा पण आडवा येतो. म्हणून हा पत्रप्रपंच. तुझ्यापर्यंत पोचण्याचा. तुला पुन्हा पुन्हा आळवत स्वतःला जगवत ठेवण्याचा. एकदा का तू समोर आलीस की मग अनेक गोष्टी सुचू लागतात. काही उपयोगाच्या काही निरूपयोगी, तरीही मग मी बरळत राहातो. तुझ्याशी बोलत राहातो अखंडपणे. आताही असंच होईल. विषय एक आणि मी भलतंच काहीतरी सांगत राहीन.......
रामायणाचा मी अनेक अंगाने विचार करतो. रामायणातील प्रत्येक पात्र प्रत्येकवेळी वेगळी भासतात. त्याच्याकडे तर्काने बघितले तर ती आपापल्या जागा सोडून दुसऱ्याच जागा घेताना दिसतात. श्रद्धेने बघितले तर त्यांच्यात दैवत्व दिसते, तर डोळ्यांना मर्यादा दिसतात. पण हीच पात्रे मनाच्या चक्षुतून बघितली की तर त्यांची उंची कैक पटीने वाढते. रामायण आणि महाभारताचे हेच तर वैशिष्ट्य आहे कि त्यांतील अनेक पात्रे आपल्याला आपल्या कुवतीप्रमाणे भेटतात. ती कोणालाच भेट नाकारत नाहीत. जसे समोरच्याला हवे तसेच ती भेटत राहातात. आता हेच बघ. रामायणात जर उत्तम प्रेमकथा आहेत असं म्हटलं तर तुलाही शंका येईल. पण खरेच रामायणात अप्रतिम अशा प्रेमकथा आहेत. राम-सीता, रावण-मंदोदरी, लक्ष्मण-उर्मिला अशा अनेक. पण यांत प्रेमाचे सगळे रंग दिसतात ते राम-सीता प्रेमकथेत. रावण-मंदोदरीला कधी वियोग सहनच करावा लागला नाही. रावणाचे मंदोदरीवर इतके प्रेम होते, त्यामुळेच समोर सीतेसारखी रुपगर्वीता असतानाही त्याचे मन चळले नाही. लक्ष्मण-उर्मिला यांच्यात वियोगाचा एक मोठा कालखंड आला पण नंतर ते एकत्र झाले. अगदी शेवटपर्यंत. राम-सीतेच्या प्राक्‍तनात मात्र मिलन-वियोग-मिलन आणि पुन्हा वियोग आहे. खरे तर खूप मोठी आणि उत्सुकतेने ताणलेली ही प्रेमकथा आहे. आपल्या पुराणांनी याबाबत अनेक श्‍लोक लिहिले आहेत. ते अनेकदा अतिशयोक्‍ती अलंकारांनी सजलेले वाटतात, तरीही त्यात राम आणि सीतेच्या प्रेमाचे रंग अचूकतेने टिपलेले आहेत. एका श्‍लोकाचा अर्थच मुळी असा आहे. रावणाने सीतेला पळवून आणून अशोकवनात ठेवलेली असते. रामाच्या वियोगाने सीता प्रचंड दुःखी झालेली आहे आणि तिला रामाशिवाय दुसरे काहीच सुचत नाही. ती तिच्या सेवेत असलेल्या त्रीजटा नामक राक्षसीला म्हणते, त्रीजटे मला आता भीती वाटू लागली आहे. ज्या प्रमाणे किडा कुंभार माशीचे सतत ध्यान करतो आणि तिचेच रुप घेतो, अगदी तसेच माझे झाले आहे. मी रामाचा इतका विचार करते, त्याचे इतके चिंतन करते की मला कधी कधी वाटते की मी रामच होऊन जाईन. पण मी राम झाले तर संसारसुख कसे घेणार?, त्यावर त्रीजटा तिला म्हणते, ""अगं तू जसा रामाचा विचार करतेस अगदी तसाच रामही तुझाच विचार आणि चिंतन करतो आहे. त्यामुळे जर तू राम बनलीस तर तोही सीता बनेल. मग राम बनलेली तू रावणाचा वध कर आणि आपल्या सीतेकडे जा.
राम आणि सीतेतला हा प्रेमगंध खरेच अगदी वेगळा आहे. विरह
प्रेमाचा हा रंग विरहात असलेल्यांनाच कळतो, कळावा. विरह रंग हाच तर प्रेमाचा खरा रंग. मलाही कधी कधी वाटतं माझंही असंच होईल. मलाही तुझ्याशिवाय दुसरं काहीच सुचत नाही. जगण्याचे मार्ग सगळे तुझ्याभोवतीच घुमत राहातात. मी तुझा इतका विचार करतो आहे की कदाचित मी तूच बनून जातो की काय असं वाटत राहातं. तुझ्या बोलण्यासारखं बोलू लागतो. अलीकडे तर अनेक शब्द तुझेच तोंडात येतात. तुझ्या आवडी निवडी माझ्याच होऊन गेल्या आहेत. कधी कधी मी चटकन असा बोलून वा वागून जातो की मी असा नव्हतोच कधी . कुंभारमाशीच्या चिंतनात अडकलेल्या किड्यासारखा मीही कुंभारमाशीच होऊ लागलो आहे. पण या कुंभारमाशी होण्यातही एक मजा आहे. एक गुंगी आहे हे खरेच.
तुझाच...

1 टिप्पणी:

Unknown म्हणाले...

आपला ब्लॉग GinkgoBlogs वर जोडण्यात आलेला आहे. तुम्ही या http://www.ginkgoblogs.com/FAQs.aspx#registration पत्त्यावर जाऊन आपला ब्लॉग claim कसा करायचा ते पाहू शकता. जर आपल्याला हा ब्लॉग GinkgoBlogs वरून काडून टाकायचा असेल तर आम्हाला पुढील पत्यावर ईमेल करू शकता GinkGoTeam@ginkgoblogs.com