रविवार, २४ एप्रिल, २०११

कडी जोडणारा संपादक



कडी जोडणारा संपादक

वर्तमानपत्रे आपला चेहरा गमावून बसली आहेत, अशी ओरड आता अभिजनांमध्ये सारखी होताना दिसते. संपादकांचा चेहरा वर्तमानपत्रात दिसत नाही अशा आशयाच्या चर्चाही घडत आहे. वाचकांची रुची आणि वर्तमानपत्रांना आलेले भांडवली स्वरुप या कारणांनी अभिजनांच्या या चर्चामध्ये तथ्य नाहीच असे नाही, पण तरीही काही संपादक आपला चेहरा अंकातून दाखवत आले आहेत. पण केवळ संपादकांचा चेहरा वर्तमापत्रात दिसून चालत नाही तर संपादकांमध्ये समाजाला एकवटण्याची आणि त्या समाजाला एका दिशेने घेऊन जाण्याची ताकद असली पाहिजे. स्वातंत्र्यपुर्व काळात अनेक संपादकांनी समाज एकवटण्याचे काम केले, स्वातंत्र्यानंतरही अनेक प्रश्‍नांच्याबाबतीत संपादकांनी समाजाजागृती करुन त्याला दिशा देण्याचे काम केले नाहीच असे नाही, पण तरीही गेल्या काही वर्षांचा ताजा इतिहास बघता संपादक मंडळींना हे काम जमल्याचे दिसत नाही. पण कोल्हापूरच्या 24 एप्रिलच्या पंचगंगा वाचवुया मोहिमेला मिळालेला प्रतिसाद बघता ही तुटलेली साखळी जोडण्याचे काम "सकाळ'चे कार्यकारी संपादक श्रीराम पवार करत आहेत हे दिसते. संपादकाला लागणारी वैचारीक बैठक त्यांची घट्‌ट तर आहेच पण त्याशिवाय समाजाला एकवटण्याची आणि त्याला दिशा देण्याची विलक्षण ताकद त्यांच्यात आहे.
कोल्हापुरातील "झाडे लावा' ही मोहिम असो वा पंचगंगा स्वच्छता मोहिम या दोन्ही मोहिमांचे रुपांतर लोकचळवळीत करण्याची हातोटी आणि त्यापाठिमागचे तात्वीक अधिष्ठान पवारसर यांच्याकडे आहे. एकीकडे वर्तमानपत्रे रोजच्या घडामोडी देत असताना त्याच घडामोडींवर लिहिणारे अनेक संपादक आहेत ( ते चूकही नाही), तर दुसरीकडे आपल्याच विचारांना कवटाळून समाजातील सगळे प्रश्‍न त्याच चष्म्यातून बघत लिहिणारे संपादक आहेत. वेगळे विषय मांडणे आणि ते लावून धरणे हेही समजण्यासारखे आहे पण त्या पलिकडे जाऊन काहीतरी करता येईल का हे बघणे आणि त्यासाठी पुढाकार घेणे ही गोष्ट आव्हानात्मकच नव्हे तर अवघडही आहे. लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न काय हे हेरुण तो प्रश्‍न सोडविण्यासाठी त्यांनाच पुढे आणण्याची ताकद तुमच्या लेखणीत पाहिजे. पवारसर यांच्याकडे ही लेखणीची ताकद तर आहेच पण तो प्रश्‍न काय हे हेरण्याची दृष्टी आहे. त्यामुळेच "सकाळ'च्या या दोन्ही मोहिमा लोकचळवळ बनल्या.

1 टिप्पणी:

teja म्हणाले...

wa wa ....ani far mahatvache....gr8 point