सोमवार, १४ मार्च, २०११

ठिपका.....


त्याने थरथरत्या हाताने कपाटातील कागद काढले. ते पिवळसर कागद त्याने एकदा नाकापाशी नेले आणि जोरात श्‍वास घेतला. त्याची ही जुनी सवय, केव्हा लागली कोणास ठावूक. आता त्याची पहिली कादंबरी येऊनही 50 वर्षे उलटली असतील, मग दुसरी, मग तिसरी.. किती कादंबऱ्या, नाटके, लघुकथासंग्रह येत राहिले, त्याचे आकडे त्याचे चाहते मोजत राहिले, हा मात्र लिहित राहिला. अनुभवांना आणि कल्पनांना अगदी चंदनाचे लेप लावत लिहीत राहिला. पण काहीही लिहायला बसले की पहिल्यांदा कोऱ्या कागदांचा गंध श्‍वासात भरुन घ्यायची त्याची सवय सुटली नाही. नंतर नंतरच्या काळात तर त्याला अनेकांनी सल्ले दिले, की असे कागदावर लिहित राहू नका. संगणकाचा वापर कर, पण त्याने ते फारसे मनावर घेतले नाही. शाई पेनातील पहिला शब्द जेव्हा कागदारवर उमटतो, त्यावेळेचा आनंद कळपटावरच्या कळा दाबून येणार नाही, असे त्याचे म्हणणे असायचे. दोन वर्षांपुर्वी झालेल्या अपघातानंतर मात्र त्याचा आणि पेन-कागदांचा संबंध तुटलाच होता. हॉस्पीटलमधुन घरी आल्यावर तो अनेक दिवस बेडवर पडूनच होता. डोक्‍यात कल्पनांचे डोंगर तयार होत नव्हते असे नाही, पण थकलेल्या गात्रांना ते डोंगर उचलायचे सामर्थ्यच राहिले नव्हते. कित्येकदा त्याचा त्याला त्रास व्हायचा. कल्पनांचे डोंगर आपल्या अंगावर कोसळून त्यात गुदमरुन जातोय की काय, असे त्याला वाटत राहायचे. मग तो बडबडायचा, हातवारे करायचा.. मोठ्याने ओरडायचाही. त्याच्या आजुबाजुचे लोक मग चिडायचे. कोणी म्हणायचे त्याला वेड लागलंय, तर कोणी म्हणायचे तो बोलतो त्यात दैवी काही तरी आहे, त्याला समजायचे ते, पण तो त्याकडे दुर्लक्ष करायचा. त्याला ना वेडा म्हणवून घ्यायचं होतं, ना कोणी अवतारी पुरुष. तो बडबडायचा. झाडांशी, ढगांशी, पक्ष्यांशी कोणाशीही बोलत राहायचा, कल्पनांचे डोंगर विरघळेपर्यंत तो बोलायचा. ते डोंगर विरघळले की मग तो हलका व्हायचा आणि शांत झोपी जायचा. बेडवरुन तो खाली आला तरी त्याने लिहणं सुरु केलं नव्हतं. आता लेखक म्हणून संन्यास घ्यावा असा विचार डोक्‍यात यायचा पण मन त्याला विरोध करत राहायचे.लिहिण्यासाठीचा मनाएवढा उत्साह गात्रांत राहिला नव्हता. तरीही मन त्याची पाठ सोडत नव्हते.
आज मात्र त्याला राहावलं नाही. या कल्पनांच्या डोंगरांना असेच विरघळून द्यायचे नाही, हे त्याने मनाशी पक्‍के केले. काहीही झाले, तरी आज पेनातील शाई प्रवाहीत करायचीच. त्याने कागद टेबलवर ठेवले आणि पेनाचे टोपण काढले. पेनाचे टोपण काढताना बारीकसा किंचीत किनरा येणारा आवाज त्याने ऐकण्याचा प्रयत्न केला, पण तो आवाज काही त्याच्या मेंदूपर्यंत पोचला नाही. पेनाची ती सोनेरी पिवळी निप त्याने डोळ्यात साठवून घेतली. समोरच्या कागदांकडे त्याने एकवार बघितले आणि पेनाची निप त्या कागदावर रोवली. पेन उचलण्यातील तेजी बोटे कधीच विसरुन गेली होती. काही सेंकद तसेच गेले. एक मोठा ठिपका कागदावर उमटला. त्यानंतर पुढचा, आणि परत पुढचा शब्द ठिपका बनूनच कागदावर राहिला. त्याचे ते थरथरणारे हात थांबले. आयुष्यभर ज्या कागदाने आणि पेनाने प्रामाणिकपणे सेवा केली त्यांनी त्याची साथ सोडून दिली होती. तो तसाच त्या टेबलवर डोके टेकून बसला. काही वेळाने कोणीतरी दार वाजवले...दार उघडले नाही. कागदावरचा ठिपका त्याच्या श्‍वासांवर जाऊन बसला होता.
..................................
भेटवस्तू हा असा प्रकार आहे की, जो आपण पुढच्या माणसाला सांगतो की तू माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहेस. त्यात त्याची किंमत देणाऱ्यावर आणि घेणाऱ्यावर असते. आपल्याकडची सर्वात लाडकी गोष्ट त्याच व्यक्‍तीला दिली जाते जो आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची असते, मग पैशाच्या बाजारात तिची किंमत काहीही होवो. अगदी असेच. स्वप्नांना सत्यात उतरायला निघालेल्या माझ्या मित्राला माझी ही नवी कोरी कथा भेट. happy journy...

५ टिप्पण्या:

THEPROPHET म्हणाले...

मस्त आहे कथा... तुमच्या मित्राला आमच्याही शुभेच्छा!

रवींद्र म्हणाले...

सुषमेयजी,
नमस्कार !
कुठून येतात या नव कल्पना. प्रत्येक नवी गोष्ट मनाला टोचणी तरी लावते किंवा मन अंतर्मुख करते.
मला तर वाटतेय कि, आपण आता ललित लेख आणि लघुकथा यांचा सुवर्णमध्य साधणारा कथासंग्रह प्रकाशित करावा.
आपण आपल्या मित्रास,जशी हि कथा अर्पण करून भेट दिली आहे. तशी हि माझ्या कडून शुभेच्छांची

SUSHMEY म्हणाले...

thanks prophet... thanks

SUSHMEY म्हणाले...

@ ravindraji... khup khup dhanyawad.... tumha sarwanmulech jamata ho

rohinivinayak म्हणाले...

khup chhan!