शुक्रवार, १ ऑक्टोबर, २०१०

निळा.....

या समुद्रात आणि मनात तसे बरेच साम्य.... समुद्र अथांग आणि मनाचाही कोठे थांग लागतो......दोघांनाही भरती-ओहटी येते... समुद्रालाही मर्यादा पाळायला लागतात आणि मनालाही.... दोघांनीही मर्यादा सोडली की अनर्थच.... मग मागे उरतो केवळ कचारा, गाळ, असह्य करुन सोडणारा कुजलेला कुबट वास ... एक लाट चटकन आली तिने मघाशी ओढलेल्या रेघोट्या घेऊन निघून गेली.... मनावरचे आठवणींचे ओरखडे असे मिटले असते तर.... पुन्हा डोक्‍यात विचारांनी गलका सुरु केला.... एका विचारातून दुसरा आणि दुसऱ्यातून तिसरा.... पण ही साखळी कुठे आहे... एका कडीतून दुसऱ्या कडीत घेवून जाणारा विचार हवा... पण तसे होत नाही.... सगळेच आपली मतं मांडतात आणि मग गलका होतो.... डोकं भणभणतं....पण या विचारातून बाहेर कसं पडायचं.... एक विचार मारायला दुसरा विचार डोक्‍यात आणायचा.... पण पहिल्याने ती जागा सोडायला तर हवी. ती जागा सोडली तर पुढे जाता येतं पण पहिल्या विचाराने जागाच सोडली नाही तर... तर मग साचलेपण येतं..... विचारांच्या गलक्‍याचा आवाज जसा टीपेला पोहचला तसं तिचं डोकं भणभणायला लागलं.... तिची चलबिचल वाढली. ती थरथरली.... सुरकुतलेली तिची गोरी कातडी आणखी पांढरी पडू लागली....
चला आत, वारा सुटायला लागलाय....तिच्यासोबत आलेल्या त्या मुलीने तिच्या आंगावरची शाल सरळ केली. आणि तिला उठण्यासाठी हात दिला... तिने तो हात नाकारला... स्वतःच उठण्याचा प्रयत्न केला... पण अशक्‍तपणाने तो फसला.... ती मुलगी सरळ पुढे झाली तिने दोन्ही हातांनी तिच्या हातांना धरलं आणि तिला उठण्यास मदत केली. यावेळी मात्र तिने कोणताच प्रतिकार केला नाही.... तिच्या खांद्याच्या आधाराने ती चालू लागली... समुद्रावरची तिची दृष्टी तशी खिळून होती....
ती राहात होती त्या खोलीतूनही समुद्र दिसायचा....समुद्र पाहायचा तिला नादच लागला होता.....ती इथे आल्यापासून ती समुद्राला डोळ्यात साठवत होती...ती खिडकीत बसुन राहिली.... काळोखाचा पडदा गडद झाला, तशी ती उठली... जेवणावरची वासनाच उठली होती... तरी तिने दोन घास पाण्याबरोबर घशात कोंबले...जेवणापेक्षा तिला दिल्या जाणाऱ्या औषधांच्या गोळ्याच जास्त होत्या.... रोज गोळ्या घेताना तिला वाटायचं अजून कशी जगण्याची वासना टिकून आहे....कधी कधी गोळ्या घ्यायची इच्छा नसली की तिचा नवरा तिला समजावयाचा... गेलेल्या माणसांचा विचार करु नको....आपल्याला जगलं पाहिजे, माझ्यासाठी तरी तू जग.... मग तासन्‌ तास ती लेकरांच्या फोटाखाली आसवं ढाळीत बसायची.... नवराच मग घास भरवायचा, गोळ्या द्यायचा..... पण ते गेल्यापासून तिला काहीच सुचेना....काही काळ तिने गोळ्या नाकारुन बघितल्याही ....मग पाय बांधून, हात बांधून गोळ्या चारणं सुरु झालं....मग तिनं गोळ्या नाकारणं बंद केलं..
दुसऱ्या दिवशीही ती किनाऱ्यावर बसून राहिली.... समुद्राची निळाई तिच्या निळ्या डोळ्यात साठत राहिली... या समुद्राचा रंगही निळा आणि आकाशाचाही रंग निळाच.... किती दिवसांनी ती आकाशाकडे बघत होती... दिवस छे किती वर्ष झाली आकाशाकडे बघून... रोज दिसाणारी ही निळाई डोळ्यात का साठत नव्हती....तिचा नवरा तिला म्हणायचा... तुझ्या डोळ्यात मला काहीच दिसत नाही.... या निळ्या रंगाचा अर्थ काय?, ती काही बोलायची नाही.... समोरचा सागरही तसाच निळा तिच्या डोळ्यांसारखा. या आकाशाची निळाईच या सागरात प्रतिबिंबित होते.... तो निर्वाताचा, पोकळीचा रंगच खरा..... मग तिला जाणवलं आपले डोळेही असेच निळे.... पोकळीचा रंग ल्यायलेले... आता पोकळीच तर उरली बाकी काहीच नाही... आठवणीच्या पापुद्य्रात केवळ पोकळी.... अंनतांचा ध्यास घेणारी.... ती उठली.... अडखळत ती घरात शिरली.... होत्या नव्हत्या त्या गोळ्या तिने घेतल्या..... सकाळी कोणीतरी दार उघडलं.... आजाराला कंटाळून आत्महत्या असा पोलिस रिपोर्ट आला....एक पोकळी दुसऱ्या पोकळीत विलीन झाली होती...

७ टिप्पण्या:

THEPROPHET म्हणाले...

अप्रतिम!
मी नेहमी तुमचा ब्लॉग वाचतो! तुमच्या लघुकथा मला खूप आवडतात!

SUSHMEY म्हणाले...

THANS PROPHET KEEP READING

आनंद पत्रे म्हणाले...

निव्वळ अप्रतिम...

हेरंब म्हणाले...

सुषमेय, नेहमीप्रमाणेच कमाल केली आहेस.. उत्कृष्ट !!

SUSHMEY म्हणाले...

thanks herambh and aanand

prajkta म्हणाले...

zakas. mast jamli aahe. nilya rangache weglech mahtwa smor aale

Vijay Deshmukh म्हणाले...

प्रत्येक कथेचा शेवट दुखी का आहे ? तिन्ही रंगाच्या कथा फारच जबरदस्त लिहिल्या आहेत. शुभेच्छा !