सोमवार, ६ सप्टेंबर, २०१०

लोखंड तापलंय आताच घाव हवा !

तेजस्विनी सावंतच्या सत्कारावेळी अचानक व्यासपीठावर येऊन अनघा घैसास यांनी खेळाडूंची व्यथा मांडली. अनेक दिवस दबलेल्या भावनांना घैसास यांनी आवाज दिला. घैसास यांनी जे केले ते बरोबर की चूक, त्यांची तळमळ बरोबर; पण व्यासपीठ चूक अशा पद्धतीच्या चर्चा आता रंगू लागल्या आहे. या चर्चा एका अंगाने सुरूच राहतील; पण खरा मुद्दा यामुळे पुन्हा एकदा बाहेर आला आहे. अनेक खेळांत विजयी पताका लावणाऱ्या या राज्याला क्रीडा धोरणच नाही, राज्यकर्त्यांना क्रीडा क्षेत्राविषयी फार आत्मीयता नाही, हे पुन्हा ठळक झाले आहे. केवळ आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने अनेक खेळाडूंना खेळांत करिअर करता येत नाही. (सुहास खामकर याला केवळ पैशाअभावी स्पर्धेत भाग घेता आला नाही) खेळाची आणि खेळाडूंची फरपट होत असताना त्यांना मदत कशी करायची, हेच अनेकवेळ क्रीडा संघटनांना कळत नाही. एखाद्या खेळाडूचाच प्रश्‍न असेल तर अर्ज-विनंत्या करून काहीवेळा प्रश्‍न मार्गीही लागतो; पण त्याचा सर्वंकष उपयोग होताना दिसत नाही. त्यामुळे पुन्हा ये रे माझ्या मागल्या... हेच सुरू राहते. आता अनघा घैसास यांनी मांडलेल्या मतांमुळे सर्वच माध्यमांनी हा प्रश्‍न उचलून धरला आहे. भीष्मराज बाम यांच्यासारख्या तज्ज्ञांनीही या प्रश्‍नात लक्ष घातले आहे. एखादा प्रश्‍न सुटावयाचा झाल्यास त्याला एखादे तत्कालीन कारण लागते. अनघा घैसास यांनी दाखविलेल्या धाडसाचे रूपांतर जर सरकारच्या निर्णयात करायचे असेल तर क्रीडा संघटनांनी आता आपला आवाज वाढविला पाहिजे. कोल्हापूरसारख्या जिथे प्राथमिक सोयी-सुविधाही मोठ्या मुश्‍किलीने मिळतात तिथे तेजस्विनी, वीरधवलसारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होतात. तिथे जर या सोयी-सुविधा योग्य आणि माफक दरात मिळाल्या तर खेळाडूंची खाण बनेल, यात शंका नाही; पण गरज आहे ती आवाज उठविण्याची. अनेक ठिकाणी, अनेकां
नी वेगवेगळ्या वेळी आवाज उठविण्यापेक्षा अनेकांनी एकाचवेळी आवाज उठविला, तर काही निर्णय होतात, हा इतिहास आहे. कोल्हापूरचा समाज प्रचंड सजग आहे. जर सरकार मदत करत नसेल, तर त्या मदतीची वाट न बघता इथला प्रत्येकजण आपापल्या परीने मदत करतो, हे साऱ्यांनाच ठावूक आहे; पण एवढा अप्पलपोटेपणा कोल्हापूरला परवडणारा नाही. राज्याचा विचार करून कोल्हापूरनेच प्रथक संघर्षासाठी बाह्या सरसावल्या पाहिजेत. इथल्या मातीतच संघर्षाचा वास आहे. कोल्हापूरने पुढाकार घेतला तर राज्याचे क्रीडाधोरण निश्‍चित होईलच; पण पुन्हा कुठल्याही खेळाडूला केवळ पैसा नाही म्हणून खेळणे बंद करावे लागणार नाही. लोखंड तापले आहे, गरज आहे ती घाव घालण्याची !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: