बुधवार, २७ जानेवारी, २०१०

चांगुलपणा, पावित्र्य हीच खरी शक्‍ती

चांगुलपणा, पावित्र्य हीच खरी शक्‍ती

विवेकानंदांसारख्या सन्यस्त जीवन जगणाऱ्या प्रभुतीने पैशाला महत्त्व दिले नाही, यात आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही; पण पैशाची निकड त्यांनीही अमान्य केलेली नाही. मात्र पैसा हेच सर्वस्व नाही हे ते वारंवार सांगतात. तरुणच देशाचे भवितव्य बदलतील! असा गाढ आशावाद दाखविणाऱ्या विवेकानंदांचे विचार आजही तरुणांना प्रेरणादायी आहेत.-----------
""आपण गरीब आहोत असे समजू नका. केवळ पैसा हीच जगातील शक्‍ती नव्हे; चांगुलपणा, पावित्र्य हीच खरी शक्‍ती होय. साऱ्या जगात हीच खरी शक्‍ती आहे. हे तुम्ही स्वतःच बाहेर येऊन पाहा.''
2 नोव्हेंबर 1883 मध्ये अळसिंगा पेरुमल या आपल्या गुरुबंधूंना लिहिलेल्या पत्रामध्ये विवेकानंदांनी नितीमत्ता आणि पावित्र्याला पैशापेक्षा जास्त महत्त्व आहे हे पटवून दिले आहे.
शिकागो येथे सर्वधर्मपरिषदेत विवेकानंदांनी "ते' ऐतिहासिक भाषण केले. त्या भाषणाआधी त्यांना पैशाची आवश्‍यकता होती आणि त्यासाठीच त्यांनी पेरुमल यांना पत्र लिहिले असल्याचे जाणवते. पेरुमल यांना काही कारणांनी पैसे जमविता आले नाहीत, त्याबद्दल ते स्वतःला दोषी मानत होते. त्यामुळे पेरुमल यांना समजावताना विवेकानंदांनी वरील पत्र लिहिले. त्या पत्रात, पैसा हेच सर्वस्व नसल्याचे ते पटवून देतात. केवळ याच पत्रात नव्हे तर विवेकानंदांनी त्या काळात ज्या-ज्या वेळी भारतात पत्र लिहिले त्या-त्या वेळी पैशाला महत्त्व देऊ नका, पैसा हा आवश्‍यक असला तरी तो सर्वस्व नाही, हेच वारंवार सांगितले.
अमेरिका म्हणजे पैशाचं झाड! याबद्दल भारतात वाटणारी उत्सुकता आणि ते मिळत नसल्याचे दुःख हे त्या काळातही होतेच; पण अमेरिकेतील ऐषोआरामबद्दल येथे वाटणाऱ्या कुतुहलामुळे आणि तो ऐषोआराम मिळत नसल्याचे वाईट वाटून घेणाऱ्या आपल्या गुरुबंधूंना ते समजावून सांगताना आपल्याकडे पैसा नसला तरी अनेक अशा गोष्टी आहेत ज्यांची पैशात मोजमाप करता येणार नाही हे ते सांगतात.
पैसा हेच दुःखाचे मूळ असेल तर इथे (अमेरिकेत) तो प्रश्‍न नाही; मग येथील लोक दुःखी का? कारण येथे नितीमत्ता नाही. त्यापेक्षा भारतातील लोक अधिक सुखी आहेत. आपल्याकडे काय नाही याचा विचार करण्यापेक्षा प्रत्येकवेळी आपल्याकडे काय अधिक आहे! याचा विचार करायला हवा ! हेच ते वारंवार सांगतात.
म्हैसूरच्या राजेसाहेबांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात,""पाश्‍चात्य लोक आमच्या जातीभेदांवर कितीही टीका करोत; पण त्यांच्यात आमच्यापेक्षा देखील वाईट असा जातीभेद आहे आणि तो म्हणजे पैशावर उभारलेला जातीभेद, अर्थगत जातिभेद. अमेरिकन लोक म्हणतात की सर्व शक्‍तीमान डॉलर काहीही करू शकतो; पण या देशात जेवढे कायदे आहेत तेवढे जगात इतरत्र कुठेही नाहीत आणि येथील लोक कायद्यांना जेवढे धाब्यावर बसवितात तेवढे दुसरीकडे कुठे आढळत नाही. साधारणपणे आपले गरीब लोक या पाश्‍चात्यांपेक्षा कितीतरी अधिक नितीमान आहेत आणि हीच आपली शक्ती आहे.
खास करुन तरुणांना मार्गदर्शन करताना विवेकानंदांनी धर्म आणि जगणं यांची सांगड घातली आहे. स्पर्धा असतेच, पण ही स्पर्धा कुठल्या पातळीपर्यंत करायची हे ठरविले पाहिजे. आजच्या धकाधकीच्या आणि उर फुटेपर्यंत धावायला लावणाऱ्या स्पर्धेत तरुणांना पैसा सर्वस्व वाटू लागला आहे. पैसा काहीही करु शकतो. त्यामुळे पैशासाठी काहीही हे सूत्र ठळक झाले आहे. याच सूत्राला गिरवत तरुणाई पुढे जात आहे. मग पैसा मिळाला नाही की निराशा आणि निराशेतून आत्महत्या! अशा दुष्टचक्रात तरुणाई सापडत आहे; पण कोणत्याही दुष्टचक्राला भेदण्याची ताकद केवळ तरुणांतच आहे हा अशावाद ते जागवत राहातात.
त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक पत्रातून आशावाद आणि जगण्याची उर्मी यांना प्रथम प्राधान्य दिल्याचे जाणते. खास करुन कर्मकांड म्हणजे धर्म नसून नितीमत्ता हाच धर्म आहे हेच ते वारंवार पटवून देतात. धर्म आणि जगणं यांची सांगड घालताना जगण्यापासून धर्माला वेगळं करता येत नसल्याचे ते स्पष्ट करतात.आज "पैसा' या शब्दाभोवतीच यशापयश केंद्रीत होत असताना विवेकानंद तरुण सहकाऱ्यांना विवेक, नितीमत्ता यांची किंमत पैशात करता येणार नाही, हे सोदाहरण स्पष्ट करतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: