सोमवार, ७ सप्टेंबर, २००९

प्राथमिक शिक्षकांची मानसिकता बदलायला हवी


कल्याणकारी राज्यात सरकारी दायित्त्व फार मोठे असले तरी ज्या समाजाच्या जाणिवा जाग्या असतात त्या समाजाला सरकारपेक्षा स्वतःवरच फार विश्‍वास असतो आणि आज तोच डळमळताना दिसत आहे. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा खालविण्यात अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे शिक्षकांची बदललेली मानसिकता हा आहे, आणि त्यावर फार कमी प्रमाणात लक्ष दिले जात आहेत.

प्राथमिक शिक्षकांची मानसिकता बदलायला हवी


दहावीची मंडळाची परीक्षा असावी की नसावी हा वाद गेली अनेक वर्षे अधूनमधून डोके वर काढतो, त्याप्रमाणे तो सध्याही जोरात सुरू आहे. शिक्षणतज्ज्ञांतच दोन मोठे गट पडले आहेत. त्यांच्या जोडीला मानसशास्त्रतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्तेही हिरीरीने सहभागी होताना दिसत आहेत. मोठ-मोठी चर्चासत्रे बोलाविली जात आहेत आणि त्या चर्चासत्रांना शहरात इंग्रजी शाळांत शिकणारे आणि शिकविणारे दोघेही पोटतिडकीने मते मांडत आहेत. शैक्षणिक गुणवत्तेपेक्षा परीक्षाकेंद्रीत विद्यार्थी बनत चालल्याची ओरड सगळेच करत आहेत आणि त्याच्या बाजूने आणि विरोधात मते मांडली जात आहेत. ज्याप्रमाणे इतर सर्वच क्षेत्रात ग्रामीण भागाचे प्रश्‍न शहरातील मंडळी अभ्यासूपणे मांडतात त्याचप्रमाणे शिक्षणाच्या दर्जाविषयीही जमीनस्तरावर काम करणाऱ्या खेडेगावातील शिक्षकाला न विचारता शहरात राहाणाऱ्या आणि कधी तरी ग्रामीण भागात जावून शाळांना भेट देणाऱ्या तथाकथीत शिक्षणतज्ज्ञांना विचारुन निष्कर्षापर्यंत पोहचले जात असल्याचे चित्र आहे.
आज प्राथमिक शिक्षणाचा दर्जा खालावला आहे आणि हा खालाविण्याचा आलेख आणखी तीव्र होत असल्याचे म्हणणे सगळेच मांडताना दिसत आहेत. प्राथमिक शिक्षण हा संपूर्ण व्यक्‍तीमत्त्वाचा एक महत्त्वाचा (अपवादात्मक ठिकाणी नसला तरी) घटक आहे हे सारेच मान्य करतात. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा खालाविण्याला सरकार आणि सरकारची धोरणेच जबाबदार आहेत हा सरळ साधा निष्कर्ष मांडला जातो. कल्याणकारी राज्यात सरकारी दायित्त्व फार मोठे असले तरी ज्या समाजाच्या जाणिवा जाग्या असतात त्या समाजाला सरकारपेक्षा स्वतःवरच फार विश्‍वास असतो आणि आज तोच डळमळताना दिसत आहे. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा खालविण्यात अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे शिक्षकांची बदललेली मानसिकता हा आहे, आणि त्यावर फार कमी प्रमाणात लक्ष दिले जात आहेत.
शिक्षण देणे हे पुण्यकर्म संपून आठ-दहा दशके उलटून गेली असली तरी शिक्षकीपेशातील त्याग अजून टिकून होता. त्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन नक्‍कीच चांगला होता. अगदी पंधरा वर्षांपुर्वीचे प्राथमिक शिक्षक आणि सध्याचे शिक्षक यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. फरक केवळ विजार जावून पॅंट आली आणि गुरुंजीचे सर झाले या बाह्य रुपात नाही तर शिक्षकांचा शिक्षकीपेशाकडे बघण्याचा आणि समाजाचा शिक्षकांकडे बघण्याच्या दृष्टीचा अर्थात मानसिकतेचा फरक आहे.
अगदी 70 च्या दशकांपर्यंत शिक्षकच विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचे शिल्पकार होते. एखादा विद्यार्थी शाळेत आला नाही तर त्याला घेवून येण्यासाठी वर्गातीलच चार मुलांना पाठवत असत. उचल बांगडी हा प्रकार त्यावेळी सर्रास चालायचा. शाळेबाहेरही जर एखादा मुलगा उनाडक्‍या करत असेल तर त्याला शाळा मास्तरांचा धाक असायचा अर्थात या धाकापोटी अनेक विद्यार्थ्यांनी शाळेला कायमचा रामराम केला ही गोष्ट खरीच पण मुलांना प्रत्येक गोष्ट ही आलीच पाहिजे हा ध्यास पराकोटीचा होता. इतर कोणत्याही नोकरीपेक्षा त्याकाळात शिक्षकाला मिळणारा पगार तुटपुंजा असला तरी त्यात तो समाधानी असायचा. शाळाबाह्य उपक्रमातही शाळेतीलच जे विद्यार्थी कच्चे आहेत त्यांना शिकविण्याचा एकमात्र धंदा असायचा (कोणतीही फी न घेता). विद्यार्थ्यांत सामाजिक जाणिवा जागृत करण्यात या शिक्षकांचा हात सर्वात मोठा होता. विशेष म्हणजे ज्या समाजातून (जातीचा इथे संदर्भ नाही) विद्यार्थी येत त्याच समाजातून शिक्षक येत असल्याने विद्यार्थ्यांना तो आपला वाटे. त्याने दिलेली उदाहरणे आपली वाटत आणि ती त्यांच्या जगण्यातील होती.
पण गेल्या दोन दशकांत शिक्षकांत प्रचंड बदल होत गेला. मास्तराचा गुरुजी आणि गुरुजीचा सर होणाऱ्या बदलात धोतर जावून विजार आणि विजार जावून जीन्स एवढाच फरक राहिला नाही तर शिक्षक समाजापासून दुरावत गेला. त्यामुळे विद्यार्थी शिक्षक यांच्यातील दरी रुंदावत गेली. प्राथमिक शिक्षणाचा उगम आणि संगम शहरी आणि ग्रामीण भागात एकच असला तरी त्याचा प्रवाह वेगवेगळ्या स्तरातून वाहतो आणि हाच मुद्‌दा बऱ्याचदा दुर्लक्षीत राहातो. शहरातील प्राथमिक शिक्षणापुढची संकटे वेगळी आणि ग्रामीण भागातील वेगळी आहेत. जीथे शहरात एका संथ लयीत प्राथमिक शिक्षण देणे सुरु आहे त्याचवेळी ग्रामीण भागात त्याची वाट फारच बिकट आहे. अनेक बांध पार करुन त्याला संगमापर्यंत पोहाचावे लागते. त्यामुळे या प्रवाहात पडलेल्यांना मार्गदर्शन करणारेही तितक्‍याच ताकदीचे पोहणारे हवेत.
गाव तेथे शाळा आणि वर्ग तिथे शिक्षक ही योजना कितीही लाभदायक वाटली तरी तिचे परीणाम मात्र तितकेसे चांगले दिसत नाहीत. शिक्षकांना मिळणारा पगार आणि त्यांना मिळणाऱ्या अनेक सोयी-सुविधांमुळे अनेकजण शिक्षकीपेशाकडे वळले आहेत. यात नागरी विद्यार्थी जसे आहेत तसेच ग्रामीण भागातीलच नागरी बेटांच्या संस्कृतीत वाढलेल्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी ज्या सामाजिकस्तरातून येतात त्या समाजाशी शिक्षकांचा संबंध असत नाही. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी ही दरी केवळ रुंद होत नाही तर ती खोलही होत आहे. त्यामुळे शिक्षक एका परीने शिकवत राहातो आणि विद्यार्थी कोरडाच राहातो. त्यामुळे दहावीपर्यंत पोहचलेला विद्यार्थी दहावीत नापास होतो.
मला काय करायचे, मी एकटा काय करणार, माझा पगार थांबणार आहे थोडीच , या मानसिकतेतूनच विद्यार्थ्यांना शिकविलं जाते. याला काही अपवाद आहेत पण सर्रास हेच दिसत आहे. हे चित्र ग्रामीण आणि शहरात सारखेच दिसत असले तरी त्याचा विचार मात्र पुन्हा वेगळा करायला हवा. एखाद्या विद्यार्थ्याला शहरात एखादी शाळा नाही आवडली तर त्याला पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे संधी दवडली जाण्याची शक्‍यता कमी आहे. पण ग्रामीण भागात शाळाच एक, एकशिक्षकी असल्याने तिथे जे पदरात पडलं आहे ते पवित्र मानायला हवे. एकंदरीतच प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावयचा असेल तर प्राथमिक शिक्षकांची मानसिकता बदलायला हवी.(त्यांच्यावर असलेल्या शालाबाह्य कामांना गृहीत धरुन).

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: