गुरुवार, १६ सप्टेंबर, २०१०

गांधीवाद आता पेलवत नाही....

गांधीवाद आता पेलवत नाही....

कोणतीही राजकीय व्यवस्था परिपूर्ण असत नाही. सगळ्यांना खुश ठेवणे हे कोणत्याही व्यवस्थेला शक्‍यच नाही, त्यामुळे अशी राजकीय व्यवस्था असली पाहिजे जी बहुसंख्यांकांना खुश करणारी आणि अल्पसंख्यांकाना नाराज न करणारी. लोकशाहीत ती मुल्ये अंतर्भूत असतात म्हणूनच लोकशाही ही सध्याच्या ज्ञात राजकीय व्यवस्थेत सर्वोत्कृष्ट मानली गेली, पण तरीही लोकशाहीने बहुसंख्यांचे हित जोपासले का?( इथे बहुसंख्यांक या शब्दाचा अर्थ बहुसंख्यांक असाच आहे. भारतात अल्पसंख्यांक, बहुसंख्यांक अशा शब्दांना जाती धर्माचा वास येतो, तो अर्थ इथे अपेक्षित नाही. त्यामुळेच जर गरीब, मध्यमवर्गीय आणि श्रीमंत असे वर्ग केले तर गरीब या वर्गात, जो बहुसंख्यांक आहे त्यात हिंदूंबरोबर मुस्लिम, ख्रिश्‍चन आणि बौध येतातच) हा प्रश्‍नच आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगाच्या पाठिवर लोकशाहीने भांडवलदारांचे पाय चेपण्यातच धन्यता मानली आहे. सकृतदर्शनी सगळं चांगलं दिसत असलं तरी व्यवस्था म्हणून अनेक बाबतीत लोकशाही अपयशी ठरली आहे, हे मान्यच करावे लागेल.
अंधपणाने लोकशाहीवर प्रेम करणाऱ्यांचा दावा असतो की, गरीबातील गरीबाला राजव्यवस्थेत स्थान लोकशाहीनेच मिळाले, गरीब-अशिक्षीत जात-धर्म यांपलीकडे जाऊन आपला नेता आणि राज्यकर्ते कोण असावेत हे ठरविण्याचा अधिकार लोकशाहीनेच दिला. पण सध्याची परिस्थीती बघितली तर खरेच हा अधिकार आता उरला आहे का? कि केवळ सांगडा उरला आहे. गेल्या लोकसभेत आणि विधानसभेतील निवडणूक लढविणाऱ्या कोणत्याही उमेदवाराच्या खासगी स्वीय सहायकला विचारले तर तो सांगेल की निवडणूक लढविण्याचा खर्च किती आला ते. या अकड्यांवरील शुन्य कीती असतात हेही सर्वसामान्य लोकांना कळत नाही मग निवडणूक लढविणे तर सोडाच.
लोकशाही ही धनिकांची बाटीक बनली आहे की काय हा प्रश्‍न उपस्थित होतो. लोकसभेत उधळलेल्या नोटांनी हे आणखी स्पष्ट केले आहे.

बहुसंख्यांकांचे धिंडवडे
जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारत बिरुदावली मिरवतो. लोकसंख्येच्या अंकशास्त्रानुसार भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाहीवादी देश आहे, यात शंका नाही, पण लोकशाही म्हणजे केवळ लोकांना मतदानाचा अधिकार एवढंच मर्यादित आहे का? की त्यापुढे जाऊन काही वेगळे आहे हे तपासायला गेले तर हातात केवळ कचरा कचरा आणि कचराच लागतो. लोकशाहीत खरे तर मुखवट्यांचे राज्य असते. जसा सण येता तसा मुखवटा चढवून रस्त्यावर नाच करणाऱ्यांप्रमाणे प्रत्येकवेळा मुखवटा बदलला जातो. हे बहुतेक मुखवटे बहुसंख्यांकाना खुश करण्यासाठीच चढविलेले असतात, या मुखवट्यामागचा भेसुर चेहरा मात्र दिसत नाही.
साधे उदाहरण घ्यायचे झाल्यास शेतकऱ्यांसाठी दिलेल्या कर्जमाफीचे घेता येईल. ज्या देशाची लोकसंख्या आगामी काळात दिडशे कोटींच्या घरात जाईल आणि या वाढलेल्या तोंडांची भूक भागविण्यासाठी जे हात दिवसरात्र राबताहेत, संसदेत बसलेले लोक ज्यांच्या मतावर निवडून आले आहेत त्यांचे (शेतीसाठी घेतलेले) कर्ज माफ करताना सरकारने दयाळू आणि दानशूरपणाचा मुखवटा असा काही घातला होता की कर्जमाफी घेणाऱ्या हातांना आपण खूप मोठे पातक करतो आहोत की काय असा भास होत राहिला. पण त्याचवेळी उद्योगजगताला सरकारेन जे स्टीम्युलेटींग पॅकेज दिले त्याचा गाजावाजा झाला नाही. देशातील 70 टक्‍के जनता ही शेतीवर अवलंबून आहे. त्या 70 टक्‍के म्हणजेच जवळपास 90 कोटी लोकसंख्येसाठी सरकारने 60 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली तर जी संख्या एक कोटींपेक्षा कमी आहे, त्या लोकसंख्येसाठी सरकारने स्टीम्युलेटींग पॅकेज दिले, ज्याव्दारे सरकारच्या तिजोरीत येणारे 16 हजार कोटी रुपये थांबले किंबहूना ते या उद्योजकांना मिळाले. प्रश्‍न हे बरोबर की चूक असा नाही. प्रश्‍न आहे तो नैतीकतेचा आणि सरकारी दायित्वाचा. शेतकऱ्यांच्या पुढे टाकलेल्या तुकड्यांचा गाजावाजा होतो तर मग या उद्योगांना खाऊ घातलेल्या श्रीखंड पुरीचाही गाजावाजा व्हायलाच हवा.
खरे तर एकूणच राजकीय व्यवस्थेकडे बघण्याचा दृष्टीकोन लोकांनी बदलायला हवा. जगातील सर्व कालीन आणि सर्व राजकीय व्यवस्थांनी आम्ही तुमच्यासाठी "सर्वकाही' करतो असा असेच सांगितले. खरे तर राजकीय व्यवस्था ही सर्वसामान्यांनी त्यांचे जगणे सुसह्या व्हावे म्हणून स्वीकरलेले एक साधन आहे. जसं एखाद्या चित्रकाराने जर खूप चांगले चित्र काढले तर त्याचे श्रेय कुंचल्याला जात नाही तसेच राजकीय व्यवस्थेचे आहे. मग याच्या पुढचा भाग असा येतो की जर चित्र चांगले झाले नाही तर याचा अर्थ चित्रकारालाच बाद म्हणावे लागेल. तसे म्हणण्यातही अडचण नाही, पण त्याचबरोबर हेही तपासायला हवे की कुंचला कुठे बिघडला नाही का? आणि जर हा कुंचलाच बिघडलेला असेल तर मग तो बदलायचे धाडस हवे. इथे येणारे चित्र महत्त्वाचे, त्यामुळे कुंचला कीतीही रेखीव असला तरी तो बदलायचे धाडस चित्रकाराने दाखविले पाहिजे. त्याचप्रमाणे राजकीय व्यवस्था समाजातील स्वास्थ्य टिकवून त्याची प्रगती घडविण्याचे साधन आहे. त्यामुळे जर हे साधनच बिघडले असेल तर ते बदलायचा पर्याय ठेवायलाच हवा. त्यामुळेच राज्यकर्ते जेव्हा म्हणतात की आम्ही हे केले ते केले त्यावेळी त्यांना प्रश्‍न विचारायला हवा की तुमची नेमणूकच त्यासाठी आहे. राज्यकर्ते जेव्हा सांगतात की आम्ही एक कोटीचा निधी तुमच्यासाठी आणला, शंभर कोटींची विकासकामे केली, त्यावेळी त्यांना विचाराला हवे की बाबांनो हे कोटींचे आकडे तुम्ही कोणाच्या जीवावर बोलता आहात, आम्ही इथे श्‍वास घेतो त्यावरच फक्‍त कर लावलेला नाही. नाही तर सर्वच गोष्टींवर कर लागतोच की. त्यामुळे आमच्या खिशातून काढून तुम्ही खर्च केले आणि वर आम्हालाच सांगता की आम्ही खर्च केला म्हणून. आता हा पैसा खर्च करतानाही तो आमच्याच वाट्याला परिपूण येतो कुठे. पिकाला पाणी देणाऱ्या पाईपलाईला जर शंभर छिद्रे पाडली आणि तीन दिवस
पाणी देत जरी राहिलो तरी पीक वाळायचे तसे वाळणारच की त्याच प्रमाणे हा पैसा खर्च होतो. गरीबांच्या नावाने योजना तयार करायची, त्यासाठी निधीची तरतूद करायची आणि मग त्या योजनेतून पैशाचा रतीब खात राहायचे. राजीव गांधी नेहमी म्हणत असत जर शंभर रुपयांची योजना जाहीर केली तर तळात येईपर्यंत केवळ पंधरा पैशांचेच काम होते.. ती परिस्थीती राजीव गांधी सत्तेत येण्यापुर्वीही होती आणि आजही आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार राज्यकर्तेच आहे.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने हे पुन्हा अधोरेखीत झाले आहे. 46 हजार कोटी रुपये या स्पर्धेच्या आयोजनासाठी खर्च करण्यात आले आहेत. 16 हजार कोटी रुपये आफ्रीकेतील अनेक देशांचे वार्षीक अर्थसंकल्पही एवढा नाही. हे पैसे आले कोठून. लोकांनी घाम गाळून मिळविलेल्या पैसे कराच्या मार्गातून सरकारकडे जमा झाले आणि तेच पैसे सरकारने (खोट्या) प्रतष्ठिेसाठी खर्च केले. खर्च केले म्हणण्यापेक्षा मुठभर लोकांच्या खिशात कोंबले. हजारो कोटी रुपयांचा घोटाळ झाला. घोटाळा हा शब्दच चुकीचा चक्‍क पैसे खाल्ले. आता बरेच पोपट हे सांगतात की राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित केल्यामुळे देशातील पर्यटन क्षेत्राचा विकास होण्यास मदत होईल म्हणून. पण हे काही खरे नाही. कुठलेही नियोजन नसताना केवळ कल्पनांच्या भरारीवर मांडलेली ही गृहीतके आहेत. हे 46 हजार कोटी रुपये काही पर्यटनक्षेत्रांच्या विकासासाठी खर्च केले जाणार नाहीत. त्यामुुळे राष्ट्रकुलच्या निमित्ताने जे लोक येतील ते लोक पर्यटनस्थळांना भेट देतीलही पण पुढे काय?. कोणत्याही तयारीशिवाय परीक्षेला बसल्यानंतर जी अवस्था होते तीच अवस्था होणार. हेच लोक पुन्हा आपपल्या देशात परतल्यानंतर येथील पर्यटनस्थळांचे वर्णन करतील आणि जे चार लोक येणार होते तेही कमी हाईल. कोणत्याही निर्णयाच्या दोन बाजू असतातच एक चांगली आणि एक वाईट. बहुसंख्य लोकांना जो निर्णय अपील होतो तो निर्णय घेणे इष्ट. मुळात ज्या देशातील 30 कोटींहून अधिक जनता एकवेळ उपाशी राहते त्या देशाने असे खेळावर पैसे लुटावेत का? हा प्रश्‍न आहे, आणि त्यापुढे जाऊन इतके पैसे खर्च केल्यानंतर तरी देशातील काही खेळांत प्रगती होणार आहे का?...या प्रश्‍नांची उत्तरे नकारात्मकच येतात. हे 46 हजार कोटी खेळासाठी आणि खेळांडूंसाठी वापले असते तर भारतात अनेक चांगली क्रीडासंकुले उभारली गेली असती. खेळाडूं
च्या गरजा पूर्ण झाल्या असत्या आणि केवळ पदकांच्या जीवावर आपण अनेक देशांत मानाचे आणि आदराचे स्थान मिळविले असते. पण आपल्या लोकांना सगळे झटपट पाहिजे असते. अगदी मान-सन्मानही. राष्ट्रकुलसारखी स्पर्धा आपण का आयोजित करतो आहोत हेच कळत नाही. चीनने ऑलिम्पीक स्पर्धा आयोजित केली म्हणून जर तुम्हाला पोटशुळ उठून जर स्पर्धा आयोजित करत असाल तर आकलेची डीवाळखोरीच आहे. त्या देशाच्या आर्थिक संरचनेची आणि आपल्या आर्थिक संरचेनेची तुलना होत नाही पण केवळ अमुक तमुक देशाने ही स्पर्धा आयोजित केली तर मग मी का नाही हा पोरखेळ आहे. आपली आर्थिक स्थीती बघून आपण पाय पसले पाहिजेत. केवळ राष्ट्रकुल स्पर्धाच नाही तर सगळ्याच बाबतीत आता आपण नापास झालो आहोत, सगळी व्यवस्था सडली आहे आताच जर बदल केला नाही तर उद्या तो बदल करणे शक्‍यही होणार नाही. सापाचे गांडुळ करण्याच्या दिशेने आपला प्रवास चालला आहे. एकदा का आपण गांडूळ झालो की आपल्याला फणाच काढता येणार नाही.

व्यवस्था उलथवून टाकली पाहिजे.....
गेल्या पन्नास वर्षात आपल्याला लोकांनी बऱ्याच वाईट गोष्टी शिकविल्या. तो त्यांच्या धोरणंचा भाग होता. एखाद्या लहान मुलाला जर सारखंच ांगितले की तू खूप महान आहेस तर तोही त्याची शेखी मिरवायला लागतो तसेच आपले झाले आहे. गांधीजींचे कार्य आणि गांधीवाद या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एखादी गोष्ट एखाद्या वेळी योग्य असली तर ती सर्व काळात योग्य ठरतेच असे नाही. गांधीवादाबद्दल तसाच वास येतो. एखाद्या समाजाला निष्क्रीय करण्याचा तो मार्ग आहे की काय अशी शंका येतो. युरोपीय देशांच्या इतिहासाकडे बघितले तर ते कधीच राजकारणात नजीकचा विचार करताना दिसत नाही, त्यांना दुरगामी परिणाम हवे असतात. त्यामुळेच भारतीय समाजापुढे एक आदर्शवाद ठेवून त्या निष्क्रीय करण्याचे काम त्यांनी केले. गांधीवाद केवळ अहिंसा आणि सत्य या दोनच चाकांभोवती फिरत नाही तर त्यांच्या चरख्याप्रमाणे तो जीवनातील प्रत्येक घटकांत सामावलेला आहे. गांधीवादाची उद्दीष्ट्ये उच्च असली तरी तो मार्ग खूपच काट्याकुट्यांचा आहे. व्यवस्था बदलण्याची ताकद गांधीवादात नाही( ती गांधीजींच्यात होती यात शंका नाही). त्यामुळे गांधीवाद जोपासत व्यवस्थेवर हल्ला करता येणार नाही.कदाचीत एखादी अशी वेळ येते की जिथे सर्वकालीन मुल्यांना बाजुला ठेवून क्रांती घडवावी लागते. त्यावेळी घडणाऱ्या सगळ्या गोष्टी मुल्यांच्या कसोटीवर बरोबरच असतील असे नाही पण येणाऱ्या पिढ्यांसाठी त्या गोष्टी करणे आवश्‍यक असते. आणि बरोबर की चूक हे ठरविणार कोण? आपण आपल्या उन्नतीसाठी जर एखादी व्यवस्था बदलत असू तर तो आपला अधिकार आहे. त्याचे मार्ग नैतीक आणि माणुसकीला धरुन असावेत एवढीच अपेक्षा.

सोमवार, ६ सप्टेंबर, २०१०

प्रशांत!

"सकाळ'चे उपसंपादक प्रशांत कुलकणीं यांचे अपघाती निधन झाले त्यावेळी "सकाळ'मध्ये लिहलेला हा लेख......
प्रशांत

प्रशांत! नावाप्रमाणेच तुमचा उत्साह उधाणलेल्या समुद्रासारखा होता. शांत स्मिताचे तुम्हाला तसे वावडेच, एखाद्या निरागस बालकाप्रमाणे भावना चटकन तुमच्या डोळ्यांत दिसायच्या. खरे तर मी तुम्हाला प्रशांत अशी हाक कधी मारलीच नाही. तसा तो माझा अधिकारही नाही; पण मी सर म्हणून जरी हाक मारत असलो तरी त्याचा नात्यात कधी दुरावा आला नाही. एक सीनिअर आणि एक ज्युनिअर एवढे नाते कधीच नव्हते. खास मैत्रीचे नाते होते, असेही मी म्हणणार नाही; पण जी केमिस्ट्री जमली होती ती केवळ आपल्यातच! त्याला मग कोणी मैत्रीचे नाव देवो वा आणखी काही.जगणे किती सहज असते हे तुमच्यावरून जाणवायचे. अगदी झऱ्यासारखे तुमचे वाहणे... तुम्ही नेहमी वाहत राहिला, अगदी निर्मळ. राग, लोभ, मत्सर या भावनांसह तुम्ही होता. अगदी सामान्यांप्रमाणे; पण तरीही तुमच्यात वेगळेपण होते. कोणत्याही गोष्टीचा पुरेपूर उपभोग घ्यायची तुमची मनीषा सदैव असायची. ऑफिसमध्ये कधी तुमचा शर्ट चुरगळलेला पाहिला नाही की सलग दुसऱ्या दिवशी तोच शर्ट अंगावर दिसला नाही; पण म्हणून तुम्ही इतरांना कधी नावे ठेवले नाही. अगदी कामाच्या बाबतीत आपल्यात बऱ्याच वेळा मतभेद झाले, अबोला झाला; पण हे फार काळ ताणले गेले नाही, यात बहुतेक वेळा तुमचाच हात पहिल्यांदा माझ्या खांद्यावर पडायचा. जसे तुमचे राहणे टापटिप, तसे बोलणेही. थोडे अनुनासिक असले तरी त्याला टिपिकल बाज होता. आपले म्हणणे जर खरे असेल, तर समोर कुणीही असले तरी तुम्ही माघार घ्यायचा नाही आणि आपल्यापेक्षा जर समोरच्याला जादा माहिती असेल तर तुम्हील लहानांनाही विचारायला संकोचायचा नाही. एकूणच तुम्ही पहिल्यापासून थोडे इतरांपासून वेगळेच. तुम्ही मनगटी घड्याळही उजव्या हातावर घालत असायचा, याबाबत एकदा मी तुम्हाला विचारले होते, की घड्याळ उजव्या हातात का घालता? त्यावर तुमचे सरळ आणि साधे उत्तर होते. जसे घड्याळ
डाव्या हातात घालण्याला काही कारण नाही, तसे उजव्या हातात न घालायलाही कारण नाही. एकूण तुमचे व्यक्‍तिमत्त्व सर्वांत राहून सर्वांत वेगळे. घरातही तुम्ही लहान मीही लहान. तुम्ही नेहमी म्हणायचा नकटे व्हावे पण धाकटे होऊ नये. मी मात्र तुम्हाला विरोध करायचो. त्यावेळी तुम्ही म्हणायचा, जितके लाड होतात तितकेच फटकेही खायला लागतात. त्यापेक्षा सर्वांत मोठे असावे. असे अनेक विषयांवर आपल्या चर्चा व्हायच्या. बहुतेक त्या खासगी असायच्या.शेवटी, तुमचे तुमच्या पिल्यावर खूप प्रेम. होय तुम्ही तुमच्या यशला चार चौघांतही पिल्याच म्हणायचा. बाप होणे सोपे; पण बापपण निभावणे अवघड; पण तारेवरची त्रिस्थळी नोकरी करूनही तुम्ही तुमच्या पिल्याला जपले अगदी त्याची आई बनून. वहिनी नोकरीनिमित्त बाहेर असल्याने तुमच्यावरच त्याची जबाबदारी. त्यामुळे कामावर आलेल्या आईला पिलाची काळजी वाटून कसे व्याकूळ होते, अगदी तुम्ही तसे असायचा. रात्री कधी कधी तुम्हाला वेळ होणार असेल, तर तुमची ती तळमळ जाणवत राहायची. कदाचित देवालाही अशीच माणसे आवडत असावीत म्हणूनच तर त्याने तुम्हाला बोलावून घेतले. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीच आकाशातून चंद्र गायब व्हावा आणि अमावस्या यावी, अगदी तसे तुम्ही गेला. आता तारे कितीही लुकलुकले तरी चंद्राची जागा कोण घेणार?

लोखंड तापलंय आताच घाव हवा !

तेजस्विनी सावंतच्या सत्कारावेळी अचानक व्यासपीठावर येऊन अनघा घैसास यांनी खेळाडूंची व्यथा मांडली. अनेक दिवस दबलेल्या भावनांना घैसास यांनी आवाज दिला. घैसास यांनी जे केले ते बरोबर की चूक, त्यांची तळमळ बरोबर; पण व्यासपीठ चूक अशा पद्धतीच्या चर्चा आता रंगू लागल्या आहे. या चर्चा एका अंगाने सुरूच राहतील; पण खरा मुद्दा यामुळे पुन्हा एकदा बाहेर आला आहे. अनेक खेळांत विजयी पताका लावणाऱ्या या राज्याला क्रीडा धोरणच नाही, राज्यकर्त्यांना क्रीडा क्षेत्राविषयी फार आत्मीयता नाही, हे पुन्हा ठळक झाले आहे. केवळ आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने अनेक खेळाडूंना खेळांत करिअर करता येत नाही. (सुहास खामकर याला केवळ पैशाअभावी स्पर्धेत भाग घेता आला नाही) खेळाची आणि खेळाडूंची फरपट होत असताना त्यांना मदत कशी करायची, हेच अनेकवेळ क्रीडा संघटनांना कळत नाही. एखाद्या खेळाडूचाच प्रश्‍न असेल तर अर्ज-विनंत्या करून काहीवेळा प्रश्‍न मार्गीही लागतो; पण त्याचा सर्वंकष उपयोग होताना दिसत नाही. त्यामुळे पुन्हा ये रे माझ्या मागल्या... हेच सुरू राहते. आता अनघा घैसास यांनी मांडलेल्या मतांमुळे सर्वच माध्यमांनी हा प्रश्‍न उचलून धरला आहे. भीष्मराज बाम यांच्यासारख्या तज्ज्ञांनीही या प्रश्‍नात लक्ष घातले आहे. एखादा प्रश्‍न सुटावयाचा झाल्यास त्याला एखादे तत्कालीन कारण लागते. अनघा घैसास यांनी दाखविलेल्या धाडसाचे रूपांतर जर सरकारच्या निर्णयात करायचे असेल तर क्रीडा संघटनांनी आता आपला आवाज वाढविला पाहिजे. कोल्हापूरसारख्या जिथे प्राथमिक सोयी-सुविधाही मोठ्या मुश्‍किलीने मिळतात तिथे तेजस्विनी, वीरधवलसारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होतात. तिथे जर या सोयी-सुविधा योग्य आणि माफक दरात मिळाल्या तर खेळाडूंची खाण बनेल, यात शंका नाही; पण गरज आहे ती आवाज उठविण्याची. अनेक ठिकाणी, अनेकां
नी वेगवेगळ्या वेळी आवाज उठविण्यापेक्षा अनेकांनी एकाचवेळी आवाज उठविला, तर काही निर्णय होतात, हा इतिहास आहे. कोल्हापूरचा समाज प्रचंड सजग आहे. जर सरकार मदत करत नसेल, तर त्या मदतीची वाट न बघता इथला प्रत्येकजण आपापल्या परीने मदत करतो, हे साऱ्यांनाच ठावूक आहे; पण एवढा अप्पलपोटेपणा कोल्हापूरला परवडणारा नाही. राज्याचा विचार करून कोल्हापूरनेच प्रथक संघर्षासाठी बाह्या सरसावल्या पाहिजेत. इथल्या मातीतच संघर्षाचा वास आहे. कोल्हापूरने पुढाकार घेतला तर राज्याचे क्रीडाधोरण निश्‍चित होईलच; पण पुन्हा कुठल्याही खेळाडूला केवळ पैसा नाही म्हणून खेळणे बंद करावे लागणार नाही. लोखंड तापले आहे, गरज आहे ती घाव घालण्याची !

रविवार, ५ सप्टेंबर, २०१०

भाषेतील प्रदूषणही रोखणे आवश्‍यक

""पुढनं लेफ्ट मारा !''
""जोतिबाला जायला रस्ता कुठला?'' असं विचारल्यावर वाघबीळच्या पायथ्याशी असलेल्या एका भाजी विक्रेत्या बाईने दिलेलं हे उत्तर... आय वॉज... आय वील टेल यू... ओपीडीत बसलेल्या डॉक्‍टरचं उत्तर... अरे तू मॅरीड केलंस म्हणे... दहावीपर्यंत वर्गात असलेल्या मित्राचा प्रश्‍न... अशी अनेक उदाहरणे देता येतील... अगदी अफलातून... या सगळ्या मंडळींना एवढंच माहीत आहे, की इंग्रजी शब्द वापरल्याने पुढच्या माणसावर प्रभाव पडतो. ही तीनही उदाहरणे वेगवेगळ्या आर्थिक आणि सामाजिक वर्गातील आहेत. त्यांचे शिक्षणही वेगवेगळे आहेत. म्हणजे भाजी विकणारी बाई दुसरी-तिसरीला गेली असेल तर डॉक्‍टरबाई एमबीबीएस आहेत. म्हणजेच तिसरी, दहावी आणि एमबीबीएस शिक्षण घेतलेल्या तिघांनाही इंग्रजीचा सोस आहे. यातील कदाचित डॉक्‍टरबाईंना इंग्रजीचा वापर जास्त करावा लागत असेल. त्यांच्या त्या व्यवसायाची गरजही असेल; पण
तरीही प्रश्‍न राहतो तो त्यातील शुद्धतेचा. तो केवळ गडबड आणि गोंधळाचा परिणाम नव्हता तर मुळातच व्याकरणाचा आणि त्यांचा फार जवळचा संबंध वाटत नव्हता. कारण नंतरची अनेक वाक्‍यं त्या अशाच मोडक्‍या तोडक्‍या इंग्रजीत बोलत राहिल्या. का? पुढच्या माणसाला इंग्रजीत बोललेलं फार जास्त कळतं म्हणून, की पुढच्या माणसाला कळूच नये म्हणून; की मी एवढं शिकलेय आणि मराठीत कसं बोलणार म्हणून? यांतील तिसरं कारण जरा जास्त महत्त्वाचं आहे. संभाषण हे दोन्ही व्यक्‍तीत समान पातळीवर व्हायला पाहिजे; पण पुढच्या माणसापेक्षा मी जरा जास्त हुशार आहे हे ठसवायचं असेल तर मग इंग्रजीतून संभाषणाला सुरवात केली जाते. जेणेकरून मला यातील जरा जास्त कळतं; तुम्ही माझं म्हणणं मान्य करा, असा त्यात अर्थ गर्भित असतो. असू द्या... तो अर्थ असण्यासही ना नाही. पण मग ती भाषा तरी नीट यायला हवी ना! केवळ भाषेचा विचार करता आपल्याला मातृभाषा जरी व्यवस्थित येत असली तरी पुढच्या माणसावर प्रभाव पडतो. अगदी चपखल प्रभाव पडतो. "तू मॅरीड केलंस म्हणे' पेक्षा "तू लग्न केलंस म्हणे' हे त्याला नीट विचारता आलं असतं. पण प्रभाव टाकण्याच्या नादात त्याचा असलेला थोडा प्रभावही कमी झाला. भाजी विक्रेत्या बाईचं इंग्रजी मात्र चिंतेचं कारण आहे. कारण तिनं तो शब्द वापरला तो पुढच्या माणसावर प्रभाव टाकण्यासाठी मुळीच नाही. "लेफ्ट मारा', "टायमाला' यांसारखे शब्द त्यांच्या बोलण्यात घट्ट बसू लागले आहेत आणि मराठीची गंगोत्री इथेच आहे. इथेच इंग्रजीचं मराठीतील प्रदूषण थोपवलं पाहिजे. म्हणजे या लोकांना इंग्रजीपासून लांब ठेवा असा अर्थ काढू नये तर खेड्यात शिकविणाऱ्या शिक्षकांनी भाषेवर अधिक काम केले पाहिजे. मराठी आणि इंग्रजीची भेसळ करायला लागू नये इतक्‍या दोन्ही भाषा यायला हव्यात, याची दक्षता त्यांनीच घ्यायला हवी.

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०१०

झरा वाहता झाला....

त्यांनी त्याच्या पायातले बूट काढले. अंगावर पांघरूण घातले. त्याच्या छातीवरचा तिचा फोटो त्यांनी हळूच त्याच्या हातातून सोडवून घेतला. डोक्‍याखाली उशी सारली, उशी सारता सारता त्याच्या तोंडाचा दर्प त्यांना असह्य झाला. त्यांनी मग त्याच्या खोलीत पडलेले अस्ताव्यस्त कपडे सरळ केले. टेबलावरची पुस्तकं सरळ लावली. अनाथ लॅपटॉप, मोबाईल जागेवर ठेवले. दहा-साडेदहाच्या दरम्यान त्याला जाग आली. तो उठल्याची चाहूल लागताच त्यांनी त्याच्यासाठी चहा केला. त्याच्या हातात चहाचा मग देताना त्यांनी विचारलं, ""आज ऑफिसला जाणं फार महत्त्वाचं आहे का?'' त्यांच्या त्या आकस्मिक प्रश्‍नाने तो बावचळला. खरं म्हणजे दहा वाजून गेल्यानंतरही त्यांना घरात बघूनच त्याला आश्‍चर्य वाटलं होतं. ""नाही तसं काही नाही. फोन करून सांगावं लागेल फक्‍त, काही काम आहे का बाबा?''
""काम असं काही नाही; पण अरे नवा एक सिनेमा आलाय, बघावं म्हणतोय, म्हटलं तुला वेळ असेल, तर तुझ्यासोबतीनं बघावा.''
त्याच्या हातात पोह्यांची प्लेट देता देता त्यांनी सांगितलं. त्याचे बाबा कधीच हिटलर नव्हते. तो जे म्हणेल त्याला त्यांनी पाठिंबा दिला होता. हे कर, ते करू नको, असं त्यांनी म्हटलेलं त्याला आठवलं नाही. तो विभाग जणू आईनंच उचललेला. असं असलं, तरी त्यांनी कधी त्याला यापूर्वी चहा करून दिलेला, अथवा पोह्याची प्लेट हातात दिलेलीही आठवली नाही.
""फोन करून बघतो. बघतो म्हणजे बॉसला येत नाही म्हणून फक्‍त सांगतो.''
सिनेमा बघून आल्यावर या सिनेमाला आज आपण का आलो होतो, याचाच प्रश्‍न त्यांना पडला होता. बाबा नंतर खूप वेळ त्या सिनेमावर बोलत होते.
""तुम्ही नेहमी बाहेर जेवायला कुठे जाता रे?''
""तसं काही नाही, जसा ग्रुप असेल तसा जातो.''
""आवडीचं एखादं ठिकाण असेलच की.''
त्यानं नाव सांगितलं. दोघे जेवले. बाबांच्या वागण्यातील तो सगळा बदल तो दिवसभर अनुभवत होता. आता त्याला असह्य झालं.
त्यानं सरळ विचारलं, ""काय झालं, आज एवढा बदल का?''
""काही नाही रे, म्हटलं, तुझ्या जवळ जाता येतं का बघावं.''
त्याला काही कळलं नाही.
""कोण आहे रे ती?''
बाबांनी आता थेट प्रश्‍न विचारल्यावर त्याला लपवता आलं नाही. त्यानं सांगितलं ""कोण ती...''
""नाही म्हणाली?'' बाबांच्या प्रश्‍नावर तो चपापला.
""हो! कालच तिला विचारलं.''
""काय म्हणाली?''
""तू माझ्या लायकीचा नाहीस.''
""म्हणून दारू प्यायची?''
तो पुन्हा चपापला.
""सगळं आयुष्य तिच्यावर उधळून लावीन...'' त्यांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि हलकेच दाबला.
""टाक की मग उधळून, अडवलंय कोणी?''
बाबांच्या त्या उत्तरावर त्याला काय बोलावं ते सुचेना.
""एखाद्यासाठी संपूर्ण आयुष्य उधळणं सोपी गोष्ट नाही आणि म्हटलं, तर अवघडही नाही.
तुझ्या आईशी मला लग्न नव्हतं करायचं...''
तो शांत राहिला.
""...होतं एका मुलीवर प्रेम. होतं म्हणजे आहे. अगदी जिवापाड प्रेम केलं. तिनं सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ऐकल्या. एकदा मला म्हणाली लग्न करून टाक, तेही मान्य केलं. आयुष्य उधळून लावणं यापेक्षा काय वेगळं असतं; पण त्यानं माझ्या आणि तुझ्या आईच्या नात्यात कधी बाधा आली नाही...''
तो बाबांकडे बघत राहिला. एक झरा खूप काळानंतर वाहिला होता.

सोमवार, ९ ऑगस्ट, २०१०

कर्ण

तो प्रश्‍न तिच्या मनात रेंगाळत राहिला. गेल्या वीस वर्षांत हजाराहून अधिक पत्रकारांनी मुलाखती घेतल्या असतील, प्रकट मुलाखतीही खूप झाल्या पण हा प्रश्‍न कोणीच विचारला नाही, किंबहूना तसा विचार आपल्या मनालाही कधी शिवला नाही. आतापर्यंत किती प्रकारचे लेखन केले,नाटक, कादंबरी, चित्रपट, टिव्ही मालिकांची स्क्रीप्ट ललीतमधील कित्येक प्रकार हाताळले, पण तसा विचारच कधी मनात शिरला नाही.
शिरला नाही की कधी कुठल्या पात्रात तो लपला ...?
सगळं कसं कपोकल्पीत असतं, असं ती आजवर सांगत आली. पहिल्या कादबंरीला जेव्हा राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला तेव्हा किती लोकांनी मुलाखती घेतल्या. हे सगळं कल्पनेतलं, सुचलेलं, पाहिलेलं, दुसऱ्याचे अनुभव अशी ती उत्तरे देत राहिले. पण मनाचा एक कोपरा रात्री-अपरात्री जागे करायचा आणि ठासून सांगायचा पात्रांच्या ओझ्याखाली तूच आहेस बघ ती पात्रे बाजुला सारुन... पण त्या पात्रांचा पालापाचोळा बाजुला करण्याचा प्रयत्न तिने केला नाही.
पण आजच्या त्या प्रश्‍नाने ती पार गोंधळून गेली.... मनावर चढविलेली सगळी पुट दूर करुन खोल काहीतरी आत शोध घ्यावा अस तिला वाटून गेलं. खूप थकल्यासारखंही तिला झालं.
""प्राक्‍तनात माझ्या पाच नवरे होते हे मला कुठे ठावूक होते, मस्ययंत्रात फिरणाऱ्या मत्स्याचा वेध घेण्यास येणाऱ्या प्रत्येक नृपात आपण आपला पती बघत होतो. पण दरबारातील एकाही नृपाला तो मत्स्यवेध सोडाच पण धनुष्यास प्रत्यंचा जोडणे शक्‍य झाले नाही. मग तरीही कर्ण सभेत आपल्यावर आपल्या पायाचा थरकाप का उडाला. त्याचे ते अजस्र बाहु, ती डोळे दीपवणारी कुंडले बघुन आपले डोळे का दीपले नाहीत. त्याने ते धनुष्य उचलले आणि आपण कर्णाला नकार दिला, का? या प्रश्‍नाचे उत्तर माझ्याकडेही नाही. श्रेष्ठ वर्णासाठी, श्रीकृष्णाने सांगितले म्हणून की त्यावेळी आपली मती कुंठीत झाली म्हणून. वस्त्रहरणाचा आदेश देणारा कर्ण हा इतिहासात नोंदविला जाईल पण तो नवरा म्हणून कुठे वाईट होता. जुगारात हरल्यावर आपल्या बायकोला पणाला लावणाऱ्या सम्राटापेक्षा तो नक्‍कीच मोठा होता, आणि नशीबाचे खेळ बघा सूत कुळातील म्हणून ज्याला नाकारलं तो तर पांडवांचा भ्राता निघावा. यापेक्षा दैवदुर्विलास कोणता...कृष्णाला पुढे महाभारत घडवायचे होत म्हणून का त्यानं मला कर्णाला न वरण्याचं सांगितलं.'' द्रौपदीच्या भूमिकेत काम करणाऱ्या नायिकेच्या तोंडातील ती वाक्‍य होती. अगदी सहज तिच्या हातातून ते उतरली गेले. कादंबरीतली ही वाक्‍ये खरे तर द्रौपदीच्या मनातील अवस्था दाखविणारी पण तीच वाक्‍ये तो पत्रकार आपल्याला सांगत होता. आणि चेहऱ्यावरचे भाव निरखीत होता. आणि त्यानं विचारलं,
"" तुम्ही काय केलं असतं, कर्णाला वरलं असतं की अर्जुनाची वाट बघितली असती....''
त्या प्रश्‍नाने ती चरकली... आयुष्यात अनेक प्रश्‍न विचारले, कधी चोरट्या चर्चाही झाल्या, त्याचं कधीच काही वाटलं नाही, पण या प्रश्‍नाने ती भांबावली. खरंच आपण काय केलं असतं, अर्जुनाची वाट बघितली असती...की कर्णाला होय म्हटलं असतं....ती अडखळली... नाही देता येणार या प्रश्‍नाचे उत्तर... त्यानंही मग ताणलं नाही.... त्यानं फक्‍त एक चिठ्‌ठी तिच्या हातात दिली. आणि सांगितलं या प्रश्‍नाचं उत्तर मिळालं की मग वाचा...ज्यांची ही चिठ्‌ठी आहे त्यांची ही शेवटची इच्छा आहे. तिला वाटलं जाऊ दे की काय ती अट पाळायची, पत्र वाचून टाकू.... पण नंतर तिलाच वाटून गेलं.. खरंच आपण काय केलं असतं.. तिची अस्वस्थता वाढली....रात्रभर तिला झोप लागली नाही...पहाटेपर्यंत तिला उत्तर मिळाले नाही.... तिने पत्र उघडले....
प्रिय,
कर्ण आणि माझ्यात एक फरक आहे. द्रौपदीने नाकारल्यावर कर्णाने तिचा सूड उगविला पण मला तुझा राग करता आला नाही. किंबहुना अर्जूनापेक्षा जास्त मी प्रेम केलं. अगदी आयुष्यभर......
कॉलेजमध्ये असताना तिला लग्नाची मागणी घालणारा तो. त्याला आपण का नकार दिला, तिला काहीच कळलं नाही...
तिचे डोळे भरुन आले...तिला तिच्या प्रश्‍नाचं उत्तर मिळालं होतं.... तिनं अर्जूनाची वाट बघितली कारण तिला कर्णच कळाला नव्हता....

बुधवार, २८ जुलै, २०१०

पत्र

नाव काय रे तुझं? जेवलास की नाही? आई कुठाय तुझी? काही खाणार का? तिनं प्रश्‍नांची सरबत्ती सुरू केली. त्यानं हूं की चू केलं नाही. बहुतेक खूप रडल्याने त्याचा चेहरा सुजला होता... पण कुठेही मारल्याचे घाव नव्हते... नाकातून बाहेर आलेला शेंबूड त्यानं आत ओढला आणि पुन्हा तो त्या टेलिफोन खांबाला धरून राहिला... त्याची ती शांतता तिला स्वस्थ बसू देत नव्हती. सकाळी दहा वाजता ते आठ वर्षांचं पोर त्या खांबाशेजारी बसलेलं होतं. गोबऱ्या गालांचं. गोरंपान आणि अंगात चांगले कपडे असलेलं पोरगं मोठ्या खात्या-पित्या घरातलं वाटत होतं. पहिल्यांदा कोणीतरी असेल म्हणून तिनं त्याकडे साफ दुर्लक्ष केलं... दुपार झाली... ते तिथंच बसून होतं... त्याच्याकडे बघायचं नाही, असं अनेकदा ठरवूनही तिची नजर त्याच्याकडे पुन्हा पुन्हा जात होती... आता त्याच्याकडे बघायचं नाही असं ठरवून ती नजर वळवायची... संध्याकाळ झाली तशी ती अस्वस्थ झाली... त्या पोराची तिला आता दया येऊ लागली, ते चुकलंय की कोणी त्याला इथे आणून सोडलंय, याची विचारपूस करावी म्हणून ती त्याच्याजवळ गेली... तिनं त्याला नाव-गाव विचारलं; पण ते काही बोललं नाही... तिनं त्याला हरतऱ्हेची आमिषे दाखवून बघितली; पण ते बधलं नाही... खांबाचा हात काही त्यानं सोडला नाही... तिला काही सुचेना... त्याला त्याच्या स्थितीवर सोडूनही जाता येईना आणि थांबताही येईना... काही क्षण तिला पोलिसांना फोन करावा वाटला; पण तिला धाडस झालं नाही... पोलिस येणार, त्याला घेवून जाणार... पुन्हा हे तिथंही नाही बोललं तर त्याला बालसुधारगृहात ठेवणार... ती अनेक वर्षे तिथं नोकरीला होती... पोलिसांना फोन म्हणजे त्याच्यासाठी नरकाचा दरवाजा आपल्या हाताने उघडण्यासारखंच... ती आता अस्वस्थ झाली... तिला काहीच सुचेना... त्याला त्याच्या अवस्थेवर सोडून द्यायचं तिनं मनाशी पक्‍कं केलं आणि ती घरात गेली... देवापाशी दिवा लावला... थो
डं कुंकू कपाळाला लावलं... सकाळचं बरंच जेवण शिल्लक होतं... तिनं टीव्हीचा रिमोट हातात घेतला... एक एक चॅनेलवरून ती सरकू लागली... पण मन रमेना... त्या पोराचा विचार मनातून जाता जात नव्हता... खिडकीतून बघावं काय, तो कुठे गेला असा विचार करून ती दोनदा खिडकीपाशी गेलीही. पण तिनं खिडकी उघडली नाही... पण ते जर तिथं असेल तर त्याला अंधाराची भीती नको म्हणून तिनं बाहेरचा दिवा लावला... रात्री बऱ्याच उशिराने तिला झोप आली... पहाटे जाग आल्यावर तिनं पहिल्यांदा खिडकी उघडली आणि त्या खांबाकडे तिनं बघितलं. ते पोरगं तिथं नव्हतं... रात्रीच्या थंडीत ते कुठेतरी गेलं असेल... कुठे गेलं असेल ते... घरी सुखरूप पोचलं असेल का? कोण असतील त्याचे आई-वडील... असे अनेक प्रश्‍नांचे तरंग तिच्या मनात उमटत राहिले. पण तिनं त्याला बगल दिली....ते सुखरुप असेल असा मनाशी समज करून तिनं चहाचं आधण ठेवलं आणि पेपर आला का बघण्यासाठी तिनं दार उघडलं... दारातच ते पोरगं पाय मुडपून झोपलं होतं... अगदी निरागस.. त्याच्या मुठी वळल्या होत्या... त्या वळलेल्या एका मुठीत एक चिठ्ठी होती... तिनं अलगद ती चिठ्ठी सोडवून घेतली...
त्यावर लिहिलं होतं...
प्रिय, संगीता,
याची आई चार वर्षांपूर्वी गेली... कॅन्सरने माझं आयुष्य अवघ्या चार महिन्यांवर आलं आहे... यापुढे याला पाळणारे हजारो मिळतील... पण सांभाळणारं कोणीच नाही... याचा सांभाळ कर...
ज्याच्यासाठी ती आयुष्यभर अविवाहित राहिली होती त्या दिलीपचं ते पत्र होतं...

सोमवार, २६ जुलै, २०१०

नायक

ते पुस्तक बाजुला ठेव आणि ऑर्डर दे... मी माझ्या मित्राला सांगत होतो.. अरे ! हे पुस्तक हातात घेतल्यापासून सोडवतच नाही... आपल्याकडे कुठे होतात असे प्रयोग...सगळे भाषांतरीत किंवा रुपांतरीत....खरी नाटकं होतात... तिकडे युरोपात...
च्यायला तुझं हे असंच असतं.....मरु दे रे तो शेक्‍सपीअर.....
शेक्‍सपीअर कधीच मरणार नाही..... मी मरु दे म्हटल्याक्षणी आमच्या टेबलसमोर येवून ऑर्डसाठी उभा असलेला वेटर म्हणाला....
मला काही सुचलं नाही.... तोही मग काही बोलला नाही.... ऑर्डर घेतली आणि निघून गेला.....नंतर अनेकवेळा त्या हॉटेलमध्ये माझं जाणं-येणं-आणि खाणं होत राहिलं, कधी तो असायचा कधी नसायचा... असला तर ऑर्डर घेण्यावाचून तो काही करायचा नाही.... दोन तीनवेळा मी त्याला बोलतं करण्यासाठी शेक्‍सपीअर, हॅम्लेट असं काही तर बरळत राहिलो पण त्याच्याकडून प्रत्यूत्तर आलं नाही... मात्र मला एक जाणवलं तो असा काही विषय निघाला की त्याला त्याचा प्रचंड त्रास होत असावा, त्यामुळे तो ऑर्डर न घेताच जात असे आणि मग दुसराच कोणी तरी वेटर येवून ऑर्डर घ्यायचा.
एका शनिवारी असाच त्याच हॉटेलसमोरुन जाताना तो बाहेर बसलेला दिसला...
काय रे असा बाहेर का बसलायस.... उगाचच स्वतःच्या इस्त्री केलेल्या कपड्यांचा गर्व होऊन मी त्याला एकेरी हाक मारली.... त्यालाही बहुतेक त्याची सवय झाली असावी त्यामुळे तो काही बोलला नाही.... मग मी त्याच्याजवळ जावून बसलो... काय विशेष!
आज तेवीस एप्रिल.... शेक्‍सपीअर आजच्याच दिवशी गेला....गेला? छे ! तो तर कधी जातच नाही....ठेवून जातो मागे शोकांतिका.... जगण्यातल्या सगळ्या वेदना तशाच ठेवून.....
नंतर तो भेटत राहिला... हॉटेलमध्ये तो काही बोलायचा नाही... पण दर शनिवारी मात्र हॉटेलच्या बाहेरच्या कट्ट्यावर माझी वाट बघत राहायचा... मी भेटलो की मग त्याच्या मनावरची जळमटं थोडी दूर व्हायची... मग बोलत राहायचा इस्किलस, सॉफक्‍लिस, युरिपीडीज, इब्सेन या साऱ्यांविषयी....हॅम्लेट आणि लिअर तर त्याची दैवतंच जणू त्यातील प्रसंगच्या प्रसंग तो म्हणायचा... आख्खा लिअर उभा करायचा...अलीकडे आता त्याला ये-जा बोलावताना जीभ जड व्हायची... पण तोच म्हणाला... आता थोडीही मान वर काढणं मला पेलावणारं नाही... तू मला ये-जाच कर... मीही मग त्याला त्रास दिला नाही....त्याला त्याच्या जागेवर सोडून दिलं... त्यातूनही एकदा त्याला मी विचारलं.... तू इथे म्हणजे हॉटेलमध्ये कसा म्हणून, पण तो बोलला नाही...... त्याचे ते निस्तेज डोळे केवळ हलले.... आणि तो उठला....
माझा प्रश्‍न आवडला नसेल, तर राहू दे पण बोलायचं टाळू नको... मी म्हटलं.
तो काही बोलला नाही... पण त्या प्रश्‍नाचा त्याच्यावर फारसा फरकही झाल्याचे जाणवला नाही. त्यानंतरही तो अनेकवेळा अनेक विषयांवर बोलत राहायचा....
एकदा असाच तो बसलेला असताना त्याच्या हातात काहीतरी होतं....मी खोदून खोदून विचारल्यावर त्यानं तो फोटो दाखविला....
लग्नानंतर पाचच दिवसात सहकारी प्रोफसरबरोबरच पळून गेली..... एवढंच म्हणाला
मला काय समजायचं ते समजलं... मी गप्प बसलो त्याला पुढचं काही विचारलं नाही.... एखाद्या शनिवारी मी भेटलो नाही की अस्वस्थ व्हायचा.... पण काही बोलायचा नाही.... तू येत जारे एवढंच म्हणायचा... एकदा मी म्हटलं अरे तुला जर माझी आठवण आली की एखादा फोन करत जा ना.... तो म्हणाला नको रे तुम्ही कामात असता तुम्हाला त्रास द्यायला आवडत नाही.... मी काही समजावून सांगितलं तरी तो ऐकणार नव्हताच.... मग बळेच मी त्याच्या खिशात माझे कार्ड कोंबले....
यावर माझा मोबाईल नंबर आहे.... तुला फोन करावा वाटला की कर .....मी काही फार बिझी असत नाही....
तो काही बोलला नाही.... पण त्याने ते कार्ड फेकूनही दिलं नाही..... नंतर अनेक आठवडे त्या हॉटेलात मला जाता आले नाही.....
एक दिवस रात्री उपसंपादकगीरीचे काम करत असताना पोलिस ठाण्यातून फोन आला.....ओळख पटवायची होती... मी गेलो तो तोच होता....
डोक्‍यात जोराचा मार बसल्याने गेला, बहुतेक कुणीतरी बेदम चोपलेले दिसते.... पोलिसाने बातमीच्या अंगाने माहिती पुरविली...मी काही बोललो नाही... सरळ हॉटेलमध्ये गेलो...ं
मॅनेजरला विचारलं, "" काय झालं, त्याला कोणी मारलं.''
काही नाही ओ.. चांगला... चांगला म्हणता म्हणता नालायक निघाला साला, आहो हॉटेलमध्ये आलेल्या बाईचा हात धरला..... लोकांनी बेदम मारलं मी तरी काय करणार... लोक हॉटेलात यायचे बंद व्हायचे..... मारलं ते बरंच झालं.....
मला त्याचं पुढचं बोलणं ऐकूच आलं नाही.... जाता जाता त्या हॉटेलमालकाला विचारलं तो काही बोलला का?
त्या बाईला शीला म्हणत होता.....आहो एका प्रोफेसरची बायको ती ....
मला काहीच सूचलं नाही.... ज्या नायकांच्या प्रेमात तो होता... त्यांच्याच पंक्‍तीत तो केव्हाच जावून बसला होता....आणखी एक शोकांतिका बस्स!

सोमवार, १२ जुलै, २०१०

मोगरा!

प्रवेशाच्या रांगेत शेवटच्या क्रमांकावर तो होता. येता-जाता शिक्षक त्याच्याजवळ थांबत त्याची विचारपूस करत. बी.एस्सी.च्या दुसऱ्या वर्षात तो वर्गात पहिला आला होता. भौतिक शास्त्रासारख्या विषयात तर त्याला पैकीच्या पैकी गुण मिळाले होते. त्याच्याकडून महाविद्यालयाला खूपच अपेक्षा होत्या. त्याने विद्यापीठात प्रथम यावे अशी सगळ्या प्राध्यापकांची इच्छा होती. तो मात्र शांत होता. अगदी बुद्धासारखा. कोणी त्याला "जिनीअस,' तर कोणी "न्यूटन' म्हणून हाक मारत; पण त्याच्या चेहऱ्यावरची स्मिताची लकेर कधी बदलली नाही. शिक्षक त्याच्याजवळ येऊन थांबत. त्याची विचारपूस करत. त्याच्या खांद्यावर हात ठेवत आणि पुढे जात.
प्रवेशाचा आजचा शेवटचा दिवस असल्याने सगळेच गडबडीत होते. कार्यालयातील कर्मचारी आपल्या नेहमीच्या शैलीत समोरच्या विद्यार्थ्यांवर खेकसत होता. प्रत्येक अर्जातील चुका त्याला पृथ्वीगोलाएवढ्या दिसत आणि हर्क्‍युलससारखा त्याचा भार आपल्या खांद्यावर पडल्यासारखा त्याचा चेहरा होई.
"शेवटच्या दिवशीच तुम्हाला कशी जाग येते,' असा प्रश्‍न जवळपास प्रत्येकाला विचारत एक-एक अर्ज हातावेगळा करत होता. रांग कूर्मगतीने पुढे सरकत होती. रांगेत आता त्याच्या मागेही मुले आली होती. शनिवार असल्याने कार्यालय दुपारीच बंद होणार, हे निश्‍चित होते. त्यामुळे रांगेत चुळबूळ सुरू झाली. सोमवारी जादा शुल्क भरून अर्ज स्वीकारले जाणार होते. त्यामुळे मधल्या एक-दोन मुलांनी सोमवारचा पर्याय खुला करत काढता पाय घेतला.
बाराचे ठोके वाजले, तसे अनेकांच्या हृदयाचे ठोके चुकले. तासाभरात अर्ज भरला नाही, तर सोमवारी उगाच दोन-अडीचशे रुपयांना फटका बसणार होता. त्यातच ज्यांना दुसऱ्या वर्षाला कमी गुण होते त्यांना "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश' या अटीमुळे आवडीचा विषय मिळतो की नाही, याचीही धाकधूक होतीच. त्यामुळेच रांगेत चुळबूळ वाढली. तो मात्र शांत होता. मघाशी त्याच्याशी बोलून पुढे गेलेल्या प्राध्यापकांपैकी एक जण त्याच्याकडेच येत होते. त्याच्यापाशी आले, त्याच्याकडे बघून त्यांनी स्मित केले आणि त्याच्या मागे उभ्या असलेल्या विद्यार्थ्याकडे बघत म्हणाले, ""इथं काय करतोय? रांगेतून आज तुला प्रवेश मिळणार नाही. चल.'' तो मुलगा त्यांच्या पाठीमागून गेला. जाताना त्याने आपल्या बरोबरच्या मुलांनाही नेले. तो मात्र शांत होता. बरोबर एक वाजता त्याचा क्रमांक आला. त्याने आपला अर्ज त्या कारकुनाच्या हातात दिला आणि घड्याळाने एकाचा टोला दिला. कारकुनाने एकदा त्याच्याकडे बघितले आणि दुसऱ्याच मिनिटात पावती हातात दिली. ""सरांना सांगितलं असतंस, तर लगेच काम झालं असतं. रांगेत उभं राहण्याची गरज नव्हती,'' तो भाबडेपणाने म्हणाला. त्याचे वडील त्याच कॉलेजमध्ये उपप्राचार्य होते.
""मोगऱ्याच्या वेलीला वाढण्यासाठी आधाराची गरज असते, फुलण्यासाठी नाही. त्यामुळे चालताना कुबड्या घेतल्या तेवढ्याच पुरेशा आहेत. आता आणखी कशाचाही कुबड्या नकोत मला,'' बाजूला ठेवलेली कुबडी उचलत तो शांतपणे म्हणाला आणि निघून गेला.
खिडकीतून वाऱ्याची झुळूक आली. का कोणास ठाऊक; पण कारकुनाला त्यातून मोगऱ्याचा गंध जाणवला.

बुधवार, ३० जून, २०१०

पाण्याचा थेंब

सकाळपासून पावसाची रिपरिप थांबली नव्हती. तिच्या अंगावरची खोळ केव्हाच भिजून ती आता गळू लागली होती. डोक्‍यापासून ती चिंब भिजली होती... तशातच तिनं घराला जवळ केलं. अंगावरची ओली साडी तशीच ठेवून ती गोठ्यात शिरली आणि धारा काढायला सुरवात केली. आज डेअरीला दूध घातले नाही तर उद्याची मीठभाकर मिळणार नाही याची तिला जाणीव होती. तिने पटापट धारा आटोपल्या. डेअरीला दूध घातलं आणि तशीच ती घरी परतली. अंगावरची साडी आता सुकायला लागली होती. चुलीच्या धगीत ती आणखी सुकेल म्हणून तिनं निखाऱ्यावर फुंकर मारली आणि शेणी आत सारली. आगीने पेट घेतल्यावर तिनं साडीचा पदर जरा त्यावर सुकवायचा प्रयत्न केला आणि मिश्रीचं बोट तोंडात कोंबलं. तिचं दहा वर्षांचं पोर शाळेतनं पळत घरात आलं. चिखलाने माखलेल्या कपड्यांसहच ते तिला जाऊन बिलगलं. तिनं त्याला तसंच बाजूला सारलं. ते थोडं हिरमुसलं; पण लगेच बाहेर खेळायला पळालं. तिनं चुलीवर चहाचं आदण ठेवलं आणि परत त्याला तिनं हाक मारली. ते मघाच्याच वेगानं परत आत आलं, कपातला चहा त्यानं बशीत घालून भुरकायला सुरवात केली. चहा भुरकून झाल्यावर त्याला काही तरी आठवलं, मग म्हणालं, ""आये, यंदा चंद्री याली तरी च्या काळाच की.'' ती काही बोलली नाही. तसलाच काळा चहा तीही प्यायली आणि मालकिणीच्या घरी भांड्याला गेली. भांडी घासता घासता मालकीण मोठ्यानं ओरडताना तिनं ऐकलं. काय झालं म्हणून ती आत आली तर तिच्या पोराएवढंच मालकिणीचं पोरगं व्हॉं करून रडत होतं आणि त्याची आई त्याला जबरदस्तीनं दूध पाजत होती. निम्मे दूध खाली सांडत होतं. ते नको नको म्हणत होतं, पाय आपटत होतं. ती तशीच घरी आली. दारात तिचं पोर खेळत होतं. तिला त्याला जाऊन मिठी मारावी वाटली; पण धीर झाला नाही. तिच्या डोळ्यातून एकच थेंब आला; पण त्याचा प्रवाह दिवसभर पाऊस पडून भरलेल्या नाल्यापेक्षा जास्त होता.

बुधवार, २८ एप्रिल, २०१०

नाणी..

आई-वडील नाहीत, भूक लागलीय रुपाया द्या की! अकरा-बारा वर्षांचं ते पोर काकुळतीला येऊन मंदिरात येणाऱ्या जाणाऱ्यांकडे हात पसरत होतं. कोणी हातावर त्याच्या एखाद्‌ दुसरं नाणं टेकवत, तर कोणी तसंच निघून जाई. हळूहळू मंदिरातील गर्दी कमी होऊ लागली... त्याच्या शर्टच्या खिशातही नाणी खूप जमा झाली... त्यानं सगळी नाणी काढली, ती मोजली आणि पुन्हा खिशात कोंबली... आणखी चार रुपयांची त्याला गरज होती म्हणून ते पुन्हा मंदिराच्या दारात आलं. येणाऱ्यांपुढे हात पसरत राहिलं. मंदिराच्या दिशेनं येणाऱ्या सुटा-बुटातील माणसांकडे त्यानं पाहिलं. आता यानं पाच रुपयांचं नाणं दिलं की, संपलं म्हणून त्यानं त्याच्याकडे हात पसरला आणि पुन्हा आई-वडील नसल्याचं पालुपद सुरू केलं... त्या साहेबानं त्याच्याकडे एकदा बघितलं, तुच्छतेनं मान फिरविली आणि तो चालू लागला. त्याच्या मागून येणाऱ्यानं पोरांकडं बघितलं आणि त्याला त्याचा संताप आला. त्यानं पोराला धरलं आणि दोन मुस्काटात मारल्या... आई मेली काय, म्हणत तो त्याला मारू लागला. साहेबाला आता त्या पोराची दया आली. त्यानं मागं वळून त्या माणसाच्या हातातून त्याची सुटका केली. पैसे द्यायचे नसतील तर नका देऊ, पण मारू नका... साहोबानं सुनावलं.... त्या माणसानं साहेबांकडे बघितलं आणि रागानं पुन्हा पोराच्या मुस्काटात मारली, "ह्यो माझा भाचा हाय आणि त्येची आई जित्ती हाय.... असं काही काही सांगत राहिला. साहेबाला काही कळलं नाही. त्यानं तरीही त्या पोराचा हात त्या माणसाच्या हातातून सोडवला. बॅगेतील पाण्याची बाटली बाहेर काढली आणि त्या पोराला पाणी पाजलं. "तुझी आई जिवंत आहे ना?' साहेबानं प्रश्‍न विचारला. "हो!' पोरानं डाव्या मनगटानं शेंबूड पुसला आणि रल्या ओढातून ते पुटपुटलं. त्याला शांत होऊ दिलं आणि मग साहेबांनं विचारलं, "मग भीक का मागतोस? आईनं सांगितलं का?' त्याला आता धीर आला. "आईनं नाही
सांगितलं, पण...' त्यानं खिशातून ती सगळी नाणी बाहेर काढली. ती पुन्हा मोजली "यात आणखी दोन रुपये घालून परीक्षेची फी भरणार आहे... उद्या लगेचच भरायची आहे. हॉटेलात काम मागायला गेलो त्यांनी दिवसाला 20 रुपयेच देणार म्हणून सांगितलम्हणून इथं आलो.' फीसाठी पैसे पाहिजेत म्हटल्यावर कोणी पैसे द्यायला तयार नव्हते. म्हणून आई-वडिल मेले म्हणून पैसे मागायला लागलो. साहेबाला काही कळलं नाही. साहेबाचा हात नकळत खिशात गेला. त्याला तिथं नाणी लागली, पण ती त्याला द्यावी वाटली नाहीत. खिशाचं पेन त्यानं काढलं आणि त्याच्या हातात टेकवलं आणि... साहेब मंदिरात न जाताच निघून गेला.

गुरुवार, १ एप्रिल, २०१०

एप्रिल फुल !

रात्रीचे बाराचे ठोके पडले आणि तिचा मोबाईल वाजला...डोळे तारवटतच तिने तो उचलला आणि हॅलो म्हटलं.....हॅलो मी दारात उभा आहे.. दार उघड... त्याचा आवाज ऐकून ती थोडी बावचळली.....एवढ्या रात्री का आला असेल? काहीतरी नक्‍की महत्त्वाचं काम असेल म्हणून तिने दार उघडलं... दारात कोणी नाही बघून तिनं दार बंद केलं आणि त्याला फोन लावला... तो मोठ्याने ओरडलाच...एप्रिल फुल. ती स्वतःशीच हसली. फोन ठेवला आणि आडवी झाली. तिने झोपायचा प्रयत्न केला, पण झोप येईना. मागचे दिवस आठवत राहिले. तो पहिल्यांदा भेटलेला... कॉलेजमध्ये त्याने केलेली धमाल... नंतर त्याने केलेलं प्रपोज. त्याच्याशी आपण लग्न करणार आहे म्हटल्यावर आईने केलेला थयथयाट...
किती दिवस तो आईला समजावत होता. त्यासाठी रोज तिच्या शाळेत जात होता. आईच म्हणाली नंतर, जर त्यानं मला प्रपोज केलं असतं तर मीही हो म्हटलं असतं. खूप बडबड्या. लग्नानंतर किती काळजी घेत होता. एकेकदा त्याच्या त्या काळजीचाही वीट यायचा. आपण त्याला म्हणायचो की नको काळजी करत जाऊ एवढी. पण तो साधं डोकं दुखत असलं तरी रात्र रात्र बसून राहायचा. एकदा असंच ऑफीसच्या ट्रीपला गेल्यावर याचे एवढे फोन आले की शेवटी त्याला बास असं सांगावं लागलं. त्यानं तरी ऐकलं नाही. फोन वाजत राहिला. बॉस म्हणालाच असले अँटीने बदलावे. त्यावेळी काही वाटले नाही. पण नंतर तसं साचत राहिलं.
बॉसच्या शेजारी असताना याचा फोन आला की बॉसचं डोकं फिरायचं. मग तो कामात न झालेल्या चुकाही दाखवत राहायचा. त्याचा त्रास होऊ लागला. त्याची अति काळजी आता अंगावर येवू लागली. चिड येवू लागली. मग, एकदा त्याला सरळ सांगून टाकलं, आपलं यापुढे एकत्र राहाणं शक्‍य नाही. तो काही बोलला नाही. नंतर त्या आवेगातच आपण घटस्फोटाची कागदपत्रे केली. त्यानं का हा प्रश्‍न न विचारताच सही केली.
मग फोन बंद झाले. पहिले काही महिने छान गेले. बॉस नेहमीप्रमाणे बोलत होता. मग अचानक एक दिवस बॉसने छेडले... मैत्रीणीजवळ आपण खूप रडलो. पण दुसऱ्याच दिवशी बॉसने केबीनमध्ये बोलवून पाय धरले. बॉसचा सुजलेला चेहराच सांगत होता की त्याने रात्री त्याला बदड बदड बदडले असणार. त्याला फोन केला. तोच उत्साह खूप बडबडला. मग फोन खाली ठेवला. त्या रात्री खूप एकटं वाटलं. मग नंतर तो फोन करत राहायचा. आधी विचारायचा की तू रिकामी आहेस का? मग बोलू का विचारायचा आणि बोलायचा. त्याचा तो त्रयस्थपणा अंगावर यायचा. पण धीर नाही झाला. मग एक दिवस त्याला सरळ विचारलं आपण पुन्हा लग्न करुया का? लगेच हसला. मग म्हणाला, नको... आपल्या लग्नाची तारीख एक एप्रिल होती. एकदा "फुल' बनल्यावर तीच चूक पुन्हा कशाला !