स्वान्त सुखाय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
स्वान्त सुखाय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ६ ऑगस्ट, २०१२

फेडरर तू हरायला नको होतस....

मला टेनिसमधला "टे' कळत नाही,
रॅकेट कशाची असते काही माहीत नाही,
बॅक हॅण्ड, फोर हॅण्ड मला समजत नाहीत
पण तरीही फेडरर तू हरायला नको होतस....

सर्व्हीस म्हणजे काय याचा मला पत्ता नाही
गुणांचा तक्‍ता कसा केला जातो, कळत नाही
ब्रेक पॉंईट म्हणजे कशाला ब्रेक ते समजत नाही
पण तरीही फेडरर तू हरायला नको होतस....

स्ट्रेट ड्राईव्ह आणि कव्हर ड्राईव्ह
टेनीसमध्येही असतं का माहीत नाही..
चेंडू प्रेक्षकांत भिरकावल्यावर टाळ्या
मिळतात का हेही माहीत नाही
पण तरीही फेडरर तू हरायला नको होतंस...


टेनिसमधला तू बादशाह वैगेरे असशील
अनेक लढाया तू जिंकल्या असशीलही
पण तरीही तू उपयोगाचा नाहीस.....
तू खरंच हरायला नको होतंस...

मला गोल्डन चेरी माहीत नाही..
पण मला माहीत आहे डोळ्यांतील अश्रुंची किंमत
लाखो डोळ्यांतून तुझ्यासाठी गालावर आलेल्या
आणि त्यापेक्षा जास्त "त्या' दोन डोळ्यांतील अश्रू,
तुझ्या हरण्यामुळे तसेच डोळ्यात थबकून राहिलेले
त्या दोन डोळ्यांसाठी किमान तू हरायला नको होतसं...

फेडरर खरेच तू जिंकायला हवं होतंस, त्या दोन डोळ्यांसाठी तरी.......

(लंडन ऑलिंपिकमध्ये ब्रिटनच्या अँडी मरेने रॉजर फेडररला हरवून गोल्ड जिंकल्यानंतर) 

रविवार, १५ एप्रिल, २०१२

एक सांज अनुभवायलाच हवी

जगण्याचे संदर्भ बदललेत... एक एक मिनिट महत्त्वाचा ठरू लागलाय... कामं तर पाचवीला पुजल्यासारखीच मागं लागली आहेत... हात रिकामे म्हणून रिकामा वेळ म्हणायचा, तर तोही रिकामा कुठे आहे? मेंदूत तणाव निर्माण करणाऱ्या पेशी कॅन्सरसारख्या वाढत असतातच की! त्या स्वस्थ कुठे बसू देतात... मग एक दिवस सरतो... आठवडे सरतात... महिने, वर्षेही कधी सरून गेली हेच कळत नाही... मागे वळून बघितले तर पाऊलखुणाही दिसत नाहीत... खरं आहे ना!
जरा बाहेर पडून बघा... चैत्र फुललाय... झाडांची हिरवी-पोपटी पालवी सूर्याच्या डोळ्यांत डोळे घालून पाहत आहे... कधी पावसाळ्यात पाऊस आला म्हणून ज्या झाडाखाली थांबलो होतो, त्या झाडांना आता तांबड्या-पिवळ्या फुलांचे गुच्छ लगडलेले आहेत... तापलेले रस्ते मुजोर वाटताहेत खरे, पण ती मुजोरी नाही... नाराजी आहे. संध्याकाळी भरून वाहणाऱ्या रस्त्यांवर दुपारी कोणीच नसते याची... आणि नेहमी पश्‍चिमेच्याच दिशेकडून येणारे ढग आता कुठल्याही दिशेने येत आहेत. आभाळ काळ्या-निळ्या ढगांनी गच्च होत आहे... दिवसभर तापलेल्या धरित्रीवर जणू छत घालावे म्हणून ढग दाटीवाटीने बसलेले असतात... मग हलकेच टप टप करत टपोरे थेंब पडताहेत... कधी कधी गाराही पडताहेत... पण हे अनुभवायला थोडं बाहेर पडायला हवं. एक संध्याकाळ एकटेच रस्त्यावर येऊन फिरायला हवं... किमान खिडक्‍यांची दारे पडद्यातून मुक्‍त करायला हवीत.
चैत्र-वैशाखातला पाऊस हा श्रावणातल्या पावसापेक्षा वेगळा... त्याचा आवेग वेगळा... त्याची गती वेगळी... तो येणार याची खात्री नसते आणि जाताना काय नेईल याचा नेम नसतो; म्हणूनच तर तो कधी काय होईल हे सांगता न येण्यासारख्या आयुष्यासारखा असतो.. "अनप्रेडिक्‍टेबल'. तो येतानाही आवाज करत येणार आणि गेल्यानंतरही आपल्या खुणा मागे ठेवणार... ढगांचा गडगडाट आणि विजांचा लखखाट होतोय, ढग गच्च दाटून आलेत म्हणून तुम्ही घरातून बाहेर पडलाच नाहीत तर त्या दिवशी पाऊस यायचाच नाही आणि आज पाऊस नाही येणार म्हणून तुम्ही बाहेर पडावे आणि त्यावेळी हृदयाचा ठोका चुकविण्यासारखी सर्रकन वीज चमकावी आणि धबाबा पाऊस कोसळावा... खरी मजा इथे आहे... या पावसात एकदा भिजलं की मग अख्खा चैत्र-वैशाख कितीही आग ओकत राहिला तरी त्याचा राग येत नाही... चैत्रातील एक संध्याकाळ खरंच अनुभवायला हवी... अगदी पावसाच्या गच्च मिठीत शिरताना अंगावरचा "ब्रॅंडेड' ड्रेस भिजतोय, याची काळजी सोडायला हवी. चिखल बूट, सॅंडलला जरा लागलाच पाहिजे... डोक्‍यावरून ओघळणारे थेंब नाकाच्या शेंड्यावरून अलगद तोंडात घेताना जी मजा आहे ती पंधरा-वीस रुपयांच्या मिनरल वॉटरमध्ये नक्‍कीच नाही. पाकिटातील नोटांना तसेच भिजू द्यावे. बघा या महिन्यात एक संध्याकाळ अशी जगता येते का? संध्याकाळचा बाहेर पडणारा पाऊस मनात साठवता येतो का?... खरंच एक सांज अनुभवायलाच हवी!


** 14 एप्रिललच्या "सकाळ' मध्ये छापून आलेला माझा लेख....**

रविवार, २० फेब्रुवारी, २०११

युतीचा नवा खेळ


भारतीय जनता पक्ष असो वा शिवसेना या दोन्ही पक्षांना आता युती स्वबळावर सत्तेत येईल याबाबत आत्मविश्‍वास उरलेला नाही. जोपर्यंत दलित समाज युतीबरोबर येत नाही, तोपर्यंत युतीला बहुमत मिळणार नाही, हे त्यांना पक्‍के ठाऊक झाले आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांना पायघड्या घातल्या नसत्या तरच नवल. शिवसेनेला आगामी मुंबई महापालिकेसाठी रामदास आठवले पाहिजे आहेत, तर भाजप लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका अपेक्षित धरून चालला आहे. त्यामुळे भाजपला आता कसल्याही परिस्थितीत महाराष्ट्रातून स्वतःचे आणि मित्रपक्षांचे खासदार निवडून आणायचे आहेत. त्यासाठीच मुंडेंची बांधणी सुरू आहे.



लो कसभा आणि विधानसभा निवडणुकांना अजून बराच अवधी आहे. गेल्या निवडणुकांत काय चुका झाल्या, याचे आत्मपरीक्षण सर्वच पक्षांनी केले आहे. तरीही आता पुन्हा निवडणुका जवळ आल्यासारखी विधाने विरोधी पक्षांच्या नेत्याकंडून होत आहेत. यात विरोधी पक्षाची ताकद वाढविण्याचा जसा प्रयत्न आहे, तसाच सत्ताधाऱ्यांच्या मनातही चलबिचल निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. गोपीनाथ मुंडे यांनी जाहीर सभेत मनसेशी युती करणे कसे गरजेचे आहे, हे आकडेवारीनिशी सांगितले. त्याचदरम्यान रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. या दोन्ही घडामोडींनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नव्या गणिताबाबत चर्चा रंगू लागली आहे. खरे तर भीमशक्ती- शिवशक्ती एकत्र येण्याची गोष्ट काही नवी नाही. यापूर्वीही अशा पद्धतीचे प्रयत्न झाले आहेत आणि त्या वेळीही केवळ चर्चाच रंगली होती. त्यानंतरही रामदास आठवले ज्या राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत होते, त्यांच्यासोबतच राहिले आणि शिवशक्ती आणि भीमशक्‍ती एकत्र येण्याची चर्चा हे केवळ एरंडाचे गुऱ्हाळ ठरले. यावेळीही तशीच परिस्थिती निर्माण होणारच नाही असे नाही; पण मागच्या वेळीपेक्षा या वेळी ही युती होण्याच्या दिशेने रंकाळ्याचा नंदी एक तांदूळ पुढे सरकला आहे, हे निश्‍चित.
शिवसेनेला आता गरज आहे मुंबई महापालिका जिंकण्याची. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या जोडीला विरोधात मनसे असल्याने मुंबई महापालिका जिंकण्यासाठी विरोधातील ताकद जेवढी कमी करता येईल तेवढी करण्याकडे त्यांचे लक्ष आहे. मुंबई ही शिवसेनेची पेढी आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला मुंबई जिंकायची आहे.
मुंबईतील दलित मते मिळविण्यासाठी रामदास आठवलेंची शिवसेनेला गरज आहे. (त्यासाठी ते काही जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्याच्या तयारीतही आहेत.) रामदास आठवले जर शिवसेनेला मिळाले तर निवडणुकीची ही प्रश्‍नपत्रिका सोपी जाणार नसली तरी त्यातील दोन-तीन प्रश्‍नांची उत्तरे अगोदरच माहीत असल्याने प्रश्‍नपत्रिकेला सामोरे जातानाचा आत्मविश्‍वास वाढेल, यात शंका नाही. त्यामुळे शिवसेनेला आठवलेंची गरजच आहे. याच वेळी रामदास आठवलेंनाही लोकसभेचा पराभव जिव्हारी लागला आहे. आघाडीशी युती करूनही आपल्याला काहीच मिळाले नसल्याची भावना त्यांची तीव्र झाली आहे. हीच भावना कमी-जास्त प्रमाणात त्यांच्या कार्यकर्त्यांतही आहे. ग्रामीण पातळीवर काम करत असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादी-कॉंग्रेसने गृहीतच धरले आहे. त्यामुळे त्यांनाही आघाडीशी संबंध नकोसे झाले आहेत. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या विचारांचा मेळ रिपब्लिकन विचारांशी बसत नसला तरी अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांत हा मेळ बसू लागला आहे. त्यामुळे समान कार्यक्रम ठरवून एकत्र यायला हरकत नाही, अशीच भावना दलित कार्यकर्त्यांची आहे. आगामी विधानसभा निवडणुका व्हायच्या तेव्हा होवोत; पण पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुंकाअगोदर ही युती झाली तर स्थानिक स्वराज्य संस्थांत युतीच्या बळावर आपली ताकद वाढेल, असा विश्‍वास या कार्यकर्त्यांना वाटत आहे. तरीही रामदास आठवलेंना आपल्यासोबत घेण्यासाठी युतीच्या नेत्यांना दोन पावले मागे यावे लागेल, हे निश्‍चित!
मनसेबाबत गोपीनाथ मुंडेंनी युतीचे केलेले वक्तव्य आणि राज ठाकरे यांनी त्याबाबत केलेला इन्कार दोघांच्याही राजकारणाचा भाग आहे. मुंडे आता दिल्लीत असल्याने दिल्लीतल्या वाऱ्याप्रमाणे ते बोलतात आणि राज ठाकरेंना दिल्लीतल्या वाऱ्यापेक्षा मुंबईचे खारे वारे जास्त प्रिय आहे. केंद्रातील आघाडी सरकार भ्रष्टाचाराच्या घोटाळ्यात सापडल्याने हे सरकार कधी कोसळते, अशी वाट भाजप बघत आहे. त्यामुळेच कोहाळा पडला तर काय काय करायचे, याची रणनीती ते आतापासून बनवायला लागले आहेत. आज मनसे युतीसोबत नसली तरी उद्या होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत मनसेने युतीत सहभागी व्हावे, यासाठीच हा प्रयत्न आहे. (त्यामुळेच रविशंकर यांनी मनसेबाबतचा निर्णय भाजपचे वरिष्ठ नेते घेतील न म्हणता एनडीए घेईल, असंच म्हटलं आहे.) पण यात एक फरक आहे. शिवशक्‍ती-भीमशक्‍ती एकत्र यावी, ही दोन्ही पक्षांच्या नेत्यांची जशी इच्छा आहे, तशीच ती त्यांच्या कार्यकर्त्यांचीही इच्छा आहे. त्या प्रमाणात भाजप-मनसे एकत्र येण्यास मनसेचे ना नेते इच्छुक आहेत ना कार्यकर्ते.

बुधवार, ९ फेब्रुवारी, २०११

हे डोळे पुन्हा दिसणार...


तिच्या डोळ्यांनी घायाळ झालेल्यांची संख्या कमी नाही। अगदी अख्खा चित्रपट तिच्या डोळ्यांसाठीच बघणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. तिने नुसती पापण्यांची उघडझाप केली, तरी अनेक थांबलेली हृदये धडधडायची. अगदी तिच्या चेहऱ्यावरची रेघ बघता बघता मरण यावं, अशी इच्छा बाळगणारे कमी नव्हते, नाहीत. कोमेजलेली फुलेही तिच्या हसण्याने पुन्हा टवटवीत व्हायची. ती मीनाक्षी होती, ती रोहिणी होती, ती नूतन होती. नूतन यांचे टपाल तिकीट टपाल खाते प्रकाशित करणार आहे. आपले बोलके डोळे रूपेरी पडद्यावर ठेवून गेलेल्या या अभिनेत्रीची आठवण राहावी म्हणून हे टपाल तिकीट खचितच नाही, तर तो टपाल खात्याचा सन्मानच आहे."नूतनचा चेहराच एक अभिनयाचे व्यासपीठ होते. आजही जेव्हा तिचे चित्रपट बघतो, तेव्हा तिच्या चेहऱ्याशिवाय नजर दुसरीकडे वळत नाही' नाना पाटेकरसारख्या स्पष्ट आणि खरे बोलणाऱ्या अभिनयसम्राटाचे हे उद्‌गार नूतन यांचा गौरव अधिकच अधोरेखित करतात. नूतन यांचा मुखाभिनय त्यांच्या डोळ्यांतून प्रवाहित होत होता. त्यांचे हरिणीसारखे डोळे आणि पातळ ओठ एखाद्या सामान्य प्रसंगातही प्राण भरायचे. स्मिता पाटील, तब्बू किंवा दीप्ती नवल या नूतन यांच्या अभिनयाच्या विस्तारकच वाटतात. "बंदिनी' हा नूतन यांचा प्रचित्रपट. यात प्रत्येक फ्रेममध्ये नूतन नव्याने भेटतात. डोळ्यांतील भाव इतक्‍या सहजतेने बदलतात, की प्रेक्षक त्या डोळ्यांभोवतीच घुटमळत राहतो. एकीकडे त्यांचे ते पातळ ओठ थरथरत निशब्दता व्यक्त करतात आणि त्याच वेळी त्यांचे डोळे ती निशब्दतेला चिरून ओरडत राहतात. त्यांच्या याच अभिनयावर बेहद्द खूश झालेल्या दिलीप कुमार यांनी मी "कर्मा'पूर्वी नूतन यांच्याबरोबर चित्रपट का केला नाही, असा स्वत:ला प्रश्‍न विचारतात. दिलीप कुमार असो वा अशोक कुमार किंवा अमिताभ यांच्यासोबतच्या फ्रेम नूतन यांचा मुद्राअभिनय ठळकच होत नाही तर तो सहकलाकाराच्या चेहऱ्यावरचा चेहरा बनून जातो.संकोच, प्रेम, माया, हुरहूर हे भाव डोळ्यांतून अगदी सहजपणे उतरत होते. "मै तो भूल गयी बाबूल का देस, पिया का घर प्यारा लगे', हे गाणे याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. अशा या मुद्रेला टपाल खात्याने मुद्रित केले नसते तर नवलच; पण नूतन यांच्या तिकिटावर शिक्का मारताना पोस्टमनचे डोळे मात्र भरून येणार, हे निश्‍चित!



रविवार, १४ मार्च, २०१०

याद तुझी......

आम्ही थोर पत्रकार नाही आहोत. पोटासाठी काम करावे, पोट भरुन उरले तर दिमागाला खाद्य पुरवावे, अगदीच अपचन झाले असेल आणि वैद्याने लंघनाचा सल्ला दिला असेल तर थोडे होन आणि काही नाणी शिल्लक राहिली समजून एखादा चित्रपट बघण्याची हौस आम्ही पुरवत आलो आहोत. वर उल्लेखल्याप्रमाणे आम्ही लेखणीशी निगडीत धंदा करत असल्याने आम्हास अनेक ठिकाणी प्रतिष्ठा मिळते, तसे काही ठिकाणी आम्हास श्‍वानकुलीन समजून हाड हाडही केले जाते. पण आम्ही अशांकडे दुर्लक्ष करतो आणि लेखणी पाजरतोच. खरे तर नाटक आणि सिनेमांना आम्ही आमचा गनीमच मानला आहे. दिसला की घातली वाघनखे, काढला कोथळा बाहेर... पण आलिकडे असे काहीतरी वेगळे होऊ लागले आहे की ती चित्रपटातील सगळी मुर्खपणाची गाणी, आणि नट नट्यांचे धावणे, पळणे आवडू लागले आहे..... अगा विपरीत झाले म्हणून आम्ही हे आमच्या तिर्थरुपांना सांगितले, त्यांनी नेहमीप्रमाणे पहाडी हास्याचा आवाज करीत कोण आहे रे ती असा सरळ प्रश्‍न आम्हांस पुसला. तिर्थरुपांना सगळ्या प्रश्‍नांची उत्तरे आवडत नाहीत हे एव्हाना आमच्या ध्यानात आले असल्याने आम्ही सरळ मातोश्रींच्या पायात झुकलो. मातोश्रींनीही आम्हाला तोच प्रश्‍न पुसल्याने एकंदरीतच आमचे काही खरे नाही हे आम्हाला कळून चुकले. सांप्रतसमयी आमचे मन एका कन्येवर जडल्याचे तुम्हाला कळले असेलच पण तो विषय नाही. आमचे मन कुठेतरी लागल्याचे आम्हास खूप महिन्यांपासून ज्ञात आहे, पण अलिकडच्या काळात आम्ही मुर्खपेटीच्यासमोर बसून तासनतास ते प्रेमकाव्याने ओथंबलेले चित्रपट बघतो आहोत, प्रियतमेच्या विरहात डावा हात तोंडावर घेत, पिंजारलेल्या केंसावरुन हात फिरविणाऱ्या तरुणसदृश प्रौढाचे काळ्या पांढऱ्या रंगातील चित्रपट बघतो आहोत. आम्ही कोण कुळातील, आमचा काय हुद्दा याचे स्मरण न ठेवता आम्ही आता शिळही फुंकतो आहोत.. कोण अधर्म हा म्हणून आमुचे स
गे सोयरे आमच्याकडे बघत आहेत किंतू त्यांसी दुखवावे हा हेतू आमुच्या मनी कधी शिवला नाही, तत्कारणी आम्ही गप्प बसतो. सांप्रत समयी थ्री इडीयटनामक चित्रपटात महान तत्ववेत्ते जे की आमीर खान यांनी समस्त तरुणांना धडा शिकविता शिकविता त्यातील कन्येला सांगितले तैसेच आमुच्या बाबतीतच होत आहे. आता याला जर कोणी नावे ठेवत असेल तर ठेवो बुवा......

सोमवार, १ मार्च, २०१०

जुगार तुम्ही जिंकलात

प्रिय डॉ. सलील यांना,
स. न. वि. वि.
परवा शनिवारी कोल्हापुरात तुमचा गाणी मनातील हा कार्यक्रम झाला. कार्यक्रम सुंदर होता, आवडला या प्रतिक्रीया तर खूप लोकांकडून तुम्हाला आल्याच असतील, त्या पुन्हा इथे देण्यात आणि तुमचा वेळ घेण्यात अर्थ नाही. खरे तर सोन्याला सोने किंवा हिऱ्याला हिरा म्हणणे म्हणजे वेळ वाया घालविणे आहे. त्यामुळे तुमचा कार्यक्रम आणि तो चांगला झाला या गोष्टी एका सुत्राच्या बरोबर चिन्हाच्या आल्याड पल्याडच्या दोन बाजू आहेत. पण पत्र हे सांगण्यासाठी लिहिलंच नाही.
पत्र लिहिण्यामागे खरं कारण खूप दिवसांनी एखाद्या संगीतकाराने आपली पहिली निर्मिती रंगमंचावर सादर केली. अलिकडे माध्यमांच्या प्रसारामुळे गाणी गाजतात, लोकांच्या ओठावरही येतात पण ती कानावर अनेकवेळा आदळल्याने, गाण्यात फार दम आहे म्हणून नाही. त्यामुळे एकदा का हा पूर ओसरला की मग मागे उरतो तो केवळ कचराच. अशात तुमची गाणी खूप गाजली आणि ओठावर नुसती आलीच नाहीत तर ती रेंगाळलीही आणि मनात घर करुन राहिली. त्याच त्या कार्यक्रमांना खूप प्रसिध्दी आणि पैसा मिळत असतानाही तुम्ही "गाणी मनातली' हा कार्यक्रम घेवून आलात. खरे तर डॉ. सलील कुलकर्णी आणि संदीप खरे हे ब्रॅंडींग इतके मोठे आहे की पुण्यात तुमचा सोलो कार्यक्रम झाला असता तरी लोकांनी तोबा गर्दी केली असती. पण तरीही कोल्हापुरात कार्यक्रम घेण्याचा जुगार तुम्ही खेळलात. पहिल्यांदाज डाव मांडावा आणि तिन्ही एक्‍के हाती लागावे तसा तो जुगार तुम्ही जिंकलातही. रंगमंचाखालून तुमच्या उत्स्फूर्ततेला आणि आत्मविश्‍वासाला सलामही ठोकला गेला. खरे तर तुमच्या समकालीन संगीतकारांत तुम्ही ठसा उमटविला आहे. आमच्या जन्माअगोदरची गाणी गातच आम्ही मोठे झालो... मधल्या काळात खूपच सुमार दर्जाचे संगीत महाराष्ट्राला ऐकायला मिळाले. सौमित्रची गीते आणि मिलींद इंगळे यांचा आवाज घेवून आलेल्या गारव्याने कोरड्या घशात ओलावा निर्माण केला खरा पण तोही कट पेस्ट असाच होता, कारण त्यापुर्वी हिंदीत त्याच संगीताने यश मिळविले होते मग त्याच बोलांवर मराठी शब्द पेरले गेले. सौमित्र यांच्या शब्दांनी मात्र तरीही जादू केलीच. पण संदीप खरे आणि सलील कुलकर्णी या जोडीने मराठी भावगीतांना पुन्हा सोनेरी दिवस आणले. हे सगळं लिहिण्यामाने केवळ तुमची स्तुती करावी हा हेतू नाही, स्तूती करायची असेल तर आता पायलीला पन्नास भाट मिळतात, आणि अशी तुणतुणी मला वाजवता येतच नाही. पण कोल्हापुरात तुम्ही केलेल्या नव्या प्रयोगाबद्दल तुमचे अभिनंदन आणि मला खात्री आहे की तुम्ही यापुढेही आमचा विश्‍वास ढळू देणार नाही.