अस्वस्थ करणारे चेहरे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अस्वस्थ करणारे चेहरे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०१९

स्पर्श

स्पर्श
प्रवीण कुलकर्णी
या इथेच तुझे घर आहे ना.. हो इथेच.. या नव्या बिल्डिंग झाल्यात खऱ्या पण पुढच्या  वळणावर एक भलं मोठं वडाचं झाड होतं. त्याखाली चहाची टपरी आणि तिथेच कोपऱ्यात तुमचं घर.... हो ना...आणि हो आई आता काय करते, कॉलेजला असताना केवळ तुझ्या आईचाच तेवढा क्लास मी अटेंड करायचो तुला माहीत आहे ना...
तो खूप बोलत होता... बावीस वर्षांनी भेटला होता... मध्ये काहीच आतापत्ता नाही.. ना त्याने तिला भेटायचा प्रयत्न केला ना तिने....आज अचानक हा या कार्यक्रमात भेटला......छे किती बदललाय...डोळे खोल गेलेत... साधारणतः या वयात वजन वाढलेले असते हा अधिकच बारीक झालाय...केसांनी साथ सोडलीय आणि गालपटे आत गेली आहेत.... हा कार्यक्रमाला आहे माहीत असते तर आलेच नसते... कदाचीत आलेही असते... काय ठावूक... ती आपल्याच विचारात होती...
मी काय म्हटलं... काय... मॅडम कशा आहेत... त्यानं पुन्हा विचारलं तशी ती भानावर आली..
हं... आई ना.... आई जाऊनच झाली १२ वर्षे
काय.. त्याला आश्चर्याचा धक्का बसला होता.
पण एवढ्या लवकर कश्या?
माहीत नाही... पण ताण होता... चालता चालता ती थांबली.. तिनं त्याच्याकडे परत एकदा बघितले...डोळ्यावरचा चष्मा हलक्या हाताने सावरला... काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला पण तोंडातून शब्द उमटला नाही...
हं... म्हणून तोही गप्प राहिला..
तो घुटमळला... काय बोलायचे त्याला काहीच सूचेना... थांबायचे तर का? आणि जायचे तरी कसे...
थोडावेळ चालत राहिला... तिच्या पावलाच्या पावलांशी गती मिळवित राहिला.
घरी येशील... तिच्या या प्रश्नावर मात्र त्याला काय उत्तर द्यावे कळले नाही...तो नुसताच हं.. म्हणाला...
कॉलेजला असताना तो यायचा तिच्या घरी... तिचे ते घर...आईचं आणि लेकीचं विश्व होतं... संपूर्ण घर मॅडमनी आपल्या हातांनी सजवलेलं.. कोपरा आणि कोपऱ्याला त्यांच्या त्या स्निग्ध स्पर्शाची जाणीव असल्यासारखे.....
बावीस वर्षांनी पुन्हा तो त्या दारात आला होता... त्या घराची चौकट त्याला पुन्हा खुणावत होती.... अजुनी तसाच रंग होता... थोडा काळपटलेला होता... पण तो जपला होता...दारावरची पाटी तशीच होती... बाहेरची झाडेही बरीच तशीच दिसत होती... तो पूर्वीचे ते घर आणि आत्ताचे घर यांत फरक करण्याचा, साम्य शोधण्याचा प्रयत्न करत होता... पण दोन्ही फसत होतं.... आठवणींवर काळाची जळमटं होती त्यामुळे साम्यही धुरकट आणि फरकही अस्पष्टच होते... त्याला आठवलं.. पहिल्यांदा तो तिच्या घरी आला त्यावेळी मॅडमनी दार उघडलेले... त्यांच्या कपाळावरच्या आठ्या.... मग तो येत राहिला.. तिला भेटायला अनेक निमित्ताने... कधी नोट्स, कधी पथनाट्याचे वाचन, कधी सहज म्हणून...
तिने दार उघडले... समोरच्या भिंतीवरचे कृष्णाचे ते पेंटींग तसेच होते... आठवणींनी जळमटांतून मार्ग काढला होता... ते मॅडमचे पेनाचे स्टँडही तसेच होते... अगदी खिडक्यांचे पडदेही तसेच होते...
घर अगदी तसेच आहे नाही... त्यानं बोलण्याचा प्रयत्न केला...
नाही... ती स्पष्ट बोलली...
बावीस वर्षांपूर्वी हे घर होतं.... आता फक्त निर्जिवतेतील रेखिवपणा आहे तसा ठेवण्याचा प्रयत्न आहे...
तो गप्प बसला...
चहा घेणार...
नाही... मी चहा नाही घेत...
का रे... तुला तर चहा खूप आवडायचा... आई एकदा चहावरून तुला रागावल्याचे आठवते काय?
हो... मग
चहा सोडला मी....
हं....एकदा तुला भेटायचे होते... आई गेल्यापासून तर ही रोजचीच इच्छा होती... पण कसं ते कळत नव्हतं... म्हणजे भेटणं अवघड होतं असं नाही.. पण भेटल्यावर काय बोलायचे हे कळत नव्हते. त्यामुळे गेली दहा वर्षे भेटणं टाळलं... कदाचीत  नशिबानेच आज भेटलो आहे... ती बोलता बोलता गप्प झाली...
बराच वेळ शांततेत गेला... तो खिडकीपाशी गेला... त्याने पडदा बाजुला केला... ते चाफ्याचं झाड अजूनही त्या कंपाऊंडच्या कोपऱ्यात तसेच होते...
ती त्याच्या मागे आली...
चाफ्याचं झाड ही पद्मा गोळेंची कविता इथेच या खिडकीत उभा राहून मॅडमकडून ऐकली होती... प्रत्येक प्रसंगाची, प्रत्येक स्थितीची अशी एक कविता असते... असं त्या म्हणायच्या आणि त्यांना त्या प्रत्येकवेळी आठवायच्याही...कवितांचे आणि त्यांचे एक अलौकीक नाते होते...
हो... आयुष्य तर ती तसेच जगली होती...
हे घे.. तिची ही डायरी... काही कविता आहेत यात तिच्या... काही आठवणी आणि बरेचसे न सांगता येणारे क्षण...
बावीस वर्षांपूर्वीच्या त्या संध्याकाळी जशी ती होती अगदी तशीच ती राहिली पुढची बारा वर्षे... ती बोलत होती...
तो केवळ खिडकीतून बाहेर बघत नव्हता तर काळाची पाने मागे ढकलून काही क्षण सापडताहेत का बघत होता...
आईने मला दत्तक घेतले होते... हे तर सर्वांनाच माहीत आहे.. तिच्या आयुष्याला स्पर्श करून गेलेला तू एकमेव होतास... तिचं आयुष्य भरून वाहणारा होतास... तू गेलास आणि आई तो स्पर्श तुझ्या आठवणींसकट जपू लागली... या पडद्यांनाही कोणी दुसऱ्याने स्पर्श केलेला तिला खपायचे नाही... मघापासून त्याने डोळ्यांच्या कडांमध्ये रोखून धरलेल्या धरणाने बांध फोडलाच..
ती जवळ आली... तीने त्याचा हात हातात घेतला आणि हलकेच दाबला....
तो रडत राहिला.... ती कुठेतरी आहे याच आशेने त्याची पोकळी भरलेली होती आज त्या पोकळीतून आशाही  संपली होती...

शुक्रवार, २९ ऑगस्ट, २०१४

पहिलटकरीण


किती गोंडस आणि निरागस असतात ना रे ही बाळं.. त्यांचे गाल बघ किती मऊ जणू सावरीचा कापूसच...जनरल वॉर्डमधील बाळांना बघत त्याचे तोंड सुरू होते.
शू.... डॉक्‍टरांनी त्याच्याकडे बघत बोट ओठावर ठेवले.. आपण नंतर केबिनमध्ये बोलू आता मी राउंड मारून येतो असे म्हणत डॉक्‍टर एक एक बेडवरील बाळ बाळंतिणीला तपासत पुढे चालले होते.
तो डॉक्‍टरांच्या मागून जात होता. हसरी बाळं, रडणारी बाळं... आई झाल्याचा कृतार्थ चेहऱ्यावर ओसंडून वाहणाऱ्या आया.. तो बघत होता.. कधी न राहून डॉक्‍टरांशी बोलत होता.. डॉक्‍टर त्याचा मित्रच होते, त्यामुळे त्याची बडबड ते सहन करत होते.
स्पेशल रुममधील एका बेडपाशी त्याला ती काचेची पेटी दिसली, आणि त्यात ते बाळ. तो कित्येक वर्ष त्या हॉस्पिटलमध्ये येत होता. ही पेटीतील बाळे त्याला अस्वस्थ करायची. त्यातही पेटी एका बाजूला आणि बाळाची आई दुसऱ्याच ठिकाणी त्यामुळे त्यांची होणारी तगमग त्याला जाणवायची. तो डॉक्‍टरांना म्हणालाही होता अरे ती काचेची पेटी आणि आई एकत्र ठेवली तर चालत नाही का? डॉक्‍टर नेहमी त्याला त्याची कारणे देत. कधी त्याला पटायची कधी त्याला पटायची नाहीत, पण तो पुन्हा प्रश्‍न विचारत राहायचा.
डॉक्‍टरांनी स्टेथेस्कोप कानाला लावला आणि काचेच्या पेटीतील बाळाच्या छातीचे ठोके मोजले. समोरच्याच बेडवर त्या बाळाची आई होती. पहिलटकरीण असावी. जास्तीत जास्त अठरा एकोणीस वर्षांची असावी. रडून रडून तिचे डोळे सुजले होते, आणि गालावर अश्रू वाळून गेले होते. तो कितीतरी वर्ष त्या हॉस्पिटलमध्ये येत होता. अशा आया तो नेहमी बघत होता. तिचे नातेवाईक बहुतेक आई-वडील भाऊ असावेत. डॉक्‍टर बाळाला तपासत होते. नातेवाइकांची घालमेल सुरू होती. बिचारी बाळाची आई गलितगात्र होऊन बाळाकडे बघत होती.
डॉक्‍टरांनी पुन्हा पुन्हा बाळाच्या छातीवर स्टेथेस्कोप ठेवला आणि शांतपणे वर बघितले आणि मान हलविली.
नातेवाईंकानी डॉक्‍टरांच्या मानेचा अर्थ समजून घेतला आणि निराशेने एकमेकांकडे बघितले. डॉक्‍टर पुन्हा दुसऱ्या रुमकडे वळले, तसा तो अस्वस्थ होऊन डॉक्‍टरांच्या केबीनकडे वळला.
राऊंड मारून परतलेल्या डॉक्‍टरांनी आपल्या अंगावरचा ऍप्रन बाजूला काढून ठेवला आणि म्हणाले,
बोला, काय आणि विशेष... डॉक्‍टरांच्या बोलण्याने तो भानावर आला.
काही खास नाही... त्या बाळाचा विचार डोक्‍यात आला रे... पहिलटकरीन असेल ना? किती दिवस लागतील रे त्याला बरे व्हायला... अजून तिने त्याला छातीशीही धरलं नसेल...
डॉक्‍टरांनी मान हलवली...आणि गप्प बसले.. पण त्याची तगमग वाढत होती, एक मात्र बरे केलेस... त्या बाळाला त्याच्या आईशेजारी ठेवलेस... पेटी दुसऱ्या खोलीत ठेवली की त्या बिचाऱ्या आईला बाळाला बघताही येत नाही रे.. ती तर तीळ तीळ मरत असते जणू...
डॉक्‍टर उठले, त्यांनी त्याच्या डोळ्याला डोळे भिडवायचे टाळले..
एक सांगू...पण कोणाला सांगू नकोस.. डॉक्‍टर पुटपुटले
ह.. त्याची उत्सुकता ताणली...
या काचेच्या पेट्या खरे तर बाळासाठी जीवनदायी असतात, मात्र आजचे पेटीतील बाळ जगवायसाठी नाही तर मरण्यासाठी ठेवले आहे. तू म्हणतोस ते खरे आहे ती पहिलटकरीणच आहे पण 16 वर्षांची आहे रे आणि तिचं लग्नही झालेले नाही....
त्याला समजायचे ते समजले...पण ते बाळ त्याच्या डोळ्यासमोरून काही हटत नव्हते...



रविवार, १० नोव्हेंबर, २०१३

लाडू....




""लाडू येतात ना रे तुला?''

बाईंनी कपाळावर आठ्या आणतच विचारलं.

आपल्या खांद्यावरचा झारा दोन्ही हाताने सावरत महादेवने फक्‍त आपल्या ओठांना विलग केलं. त्याचे निम्म्याहून दात पडलेलं बोळकं खूपच विचित्र वाटलं.

सहा फूट उंची, डोक्‍याला टक्‍कल, अंगात कळकट-मळकट शर्ट आणि तसलीच तेलकट पॅंट, पायांना चपलांचा कधी स्पर्श झाला होता की नाही याबाबत शंकाच यावी, असे राकटलेले पाय. वर्षानुवर्ष चुलीच्या धगीसमोर बसून रापलेल्या चेहऱ्याच्या महादेवच्या ओठावरचे हसू मात्र कधी रापले नव्हते. कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर "त्याला काय लागतंय' या तीन शब्दांनी सुरू करून महादेव बोलायला लागला की त्याचे बोलणे थांबवणे जाम कठीण होऊन जायचे. बुंदीचा शेवटचा घास संपल्यावर त्याचे हात जसे लाडू वळवायचे थांबायचे तसा अचानक कधी तरी तोच थांबायचा. मग पुढचा माणूस बोलायचा.




""काय विचारलं मी? तुला लाडू येतात ना ?'' बाईंनी आवाजात जितका शांतपणा आणता येईल तितका आणला.

""त्याला काय लागतंय?'' महादेवाने आपल्या तोंडाचा पट्टा सुरू केला... ""आहो, आयुष्यभर तेच तर काम केलं आहे. बाईसाहेब, मी वळलेल्या लाडवांना बघूनच लोकांचे समाधान होते. तोंडात लाडू गेला की लाडवाबरोबर माणूस पण विरघळतो बघा. अहो! तिसरी पिढी आमची लाडू वळणारी. मी जन्माला आलो त्यावेळी आमच्या अण्णांनी म्हणजे आमच्या वडिलांनी चार पायलीचं लाडवाचं कंत्राट घेतलं होतं. आई लाडू वळत होती आणि त्याचवेळी तिच्या पोटात दुखायला लागलं. त्यातनं पण तिनं तीन पायलीचे लाडू वळलेच. मग मी जन्माला आलो. अण्णांनी आधी उरलेले लाडू वळले आणि मगच माझं तोंड बघितलं. माझा आणि लाडवाचा तिथून जो संबंध आहे, तो अजून तसाच आहे. तुमचे किती पायलीचे लाडू वळायचे आहेत?''

बाईंनी त्या रापलेल्या चेहऱ्याकडे परत बघितले. त्याच्या कळकट-मळकट कपड्यांवरून पुन्हा नजर फिरविली.

""अंघोळ करतोस ना रोज?'' बाईंनी त्रासिकपणे प्रश्‍न केला.

हा प्रश्‍न आता त्याला नेहमीचा आणि परिचयाचा होता.

""त्याला काय लागतंय, परवाच चार साबण आणलेत...''

"बरं बरं...' आता हा आपले अंघोळ पुराण सांगणार हे बघून बाईंनी त्याला थांबवलं.

""किती पायलीचे लाडू करायचे आहेत?'' महादेवाने आपल्या खांद्यावरचा झारा दोन्ही हातांनी आणखी घट्ट पकडत पुन्हा विचारले.

""हे पायलीचे गणित काही कळत नाही. तूच सांग, पन्नास माणसांना पुरवठा यायला हवेत.''

""त्याला काय लागतंय, पण माणसं कुठली आहेत त्यावर अवलंबून. तुमच्यासारखी सुशिक्षित आहेत, की आमच्यासारखी गावाकडची. म्हणजे तुमच्यासारखी माणसं असली की कमी लागतात, पण आमच्यासारखी असली की दे दणका...! तुम्हाला सांगतो, परवाच मी एका लग्नाचे लाडू केले होते. परवा. पण त्यालाही झाली चार-पाच वर्षे. माणसं होती शंभरच. पण दोन पायलीचे लाडू पुरले नाहीत...''

""पाच किलोचे लाडू करायचे आहेत आणि तेही न बोलता. जमेल का?'' बाईंच्या पाठीमागून साहेबांनीच विचारले.

""त्याला काय लागतंय...'' महादेवने बोलायचा पुन्हा प्रयत्न केला.

""त्याला तोंड बंद करायला लागतंय.'' साहेबांनी त्याला थांबवलं.

बाई खूप हसल्या आणि आत निघून गेल्या. महादेव आपल्या टकलावरून हात फिरवत तिथेच पायरीवर उभा राहीला.

""ये आत. चहा घेणार?''

साहेबांनी त्याला आत बोलवत विचारलं.

""न नको... म्हणजे सकाळी-सकाळी दोनदा झाला ना चहा. त्यामुळे आता चहा घेतला की पित्त होतं. मग चार दिवस काम होत नाही. अंगावर हे मोठे मोठे फोड उठतात'' महादेवने कमीत कमी शब्दांत उत्तर देण्याचा प्रयत्न केला.

""हं... बरं..!''

""कधी करणार लाडू, किती साहित्य लागेल?'' बाईंनी आतूनच विचारलं.

""आज आत्ता.'' महादेवने क्षणाचा विलंब न करता उत्तर दिलं.

""अरे, आज कसं शक्‍य आहे...? फक्‍त विचारायचं होतं की किती साहित्य लागेल, यासाठी तुला बोलावलंय.''

""नाही बाईसाहेब, आज आणा की साहित्य. पाच किलोला किती लागणार आहे साहित्य. दोन तासाचं तर काम.''

""अरे पण...''

""हवं तर मजुरी कमी करा; पण आज कराच बाईसाहेब लाडू.'' महादेवने आपलं म्हणणं जितकं रेटता येईल तितकं रेटलं.

""अरे, पण आज का जबरदस्ती आहे का?... बाईंच्या बोलण्यात नाखुशी साफ दिसत होती.

""न नाही पण...'' महादेवाची जीभ जरा आडखळलीच.

""काय... आज साहित्याची यादी दे आणि ये उद्या-परवा मी तुझ्या त्या मित्राजवळ निरोप ठेवते.''

महादेवनं यादी दिली आणि खाली ठेवलेला झारा पुन्हा खांद्यावर घेतला. जाता जाता त्याचा पाय घुटमळलाच.

""बाईसाहेब बोलवा हां नक्‍की! लोकं बोलावतात, साहित्याची यादी ठेवून घेतात आणि पुन्हा लाडू करायला परत कोण बोलवत नाही. आजकाल लाडू कोण खातंय म्हणतात, आणि बेत बदलतो. या हातांना झारा धरण्याशिवाय आणि लाडू वळण्याशिवाय दुसरं काही येत नाही हो. हातात झारा नसला की हात थरथरतात. दोन महिन्यात एकपण काम नाही मिळालं. बाईसाहेब, रोज पोरगी विचारते, "बाबा, आज येताना लाडू आणणार?' पोरीला बाजारातून लाडू घ्यायला पैसे नाहीत. या हातांनी नेहमी पायली - चार पायलीचे लाडू केले. आता किलो-दोन किलोचे लाडू केले की ती चव येत नाही. त्यामुळे बेकरीवाले कामावर ठेवत नाहीत.'' त्याचे खोबणीतील डोळे आणखी खोल गेल्यासारखे वाटले.

त्याने झारा उचलला अणि तो जायला लागला.

""थांब.''

बाई आत गेल्या. त्यांनी कागदात गुंडाळून दोन लाडू आणले होते.

""हे लाडू दे तुझ्या पोरीला.''

""नको बाईसाहेब, बुंदीच्या लाडवाची चव रव्याच्या लाडवाला येणार नाही आणि पोरीला असे तुपात-बिपात केलेल्या लाडवाची चव कळली तर अवघड होईल. नकोच.''

""आज हे लाडू दे... उद्या ये आमच्याकडे... आम्ही लाडवाचा बेत देऊ की नाही माहीत नाही. पण तू उद्या आमच्याकडे लाडू नक्‍की करायला ये.''

महादेवच्या हातातला लाडू चटकन खाली पडला. त्याला बाईंचे पाय दिसले. क्षणभर त्याला बाईंचे पाय धरावे वाटले; पण फुटलेल्या लाडवाला गोळा करताना त्याला ते जमलं नाही.


सकाळ'च्या 7 November च्या स्मार्ट सोबतीमध्ये प्रसिद्ध झालेली लघुकथा

शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०१३

चहा


अजूनही साखर डबल लागते का रे?... तिने स्वयंपाकघरातूनच जोरात विचारले...
""न.. नाही... साखर नको...''
""का? काय रे, काय झालं... डॉक्‍टरांनी बंदी घातली आहे का साखर खायला? तू ज्या पद्धतीने साखर खायचास ना, त्यावरून तर हे कधी ना कधी होणार होतंच म्हणा!''
""हं..!'' त्याने नुसता हुंकार सोडला.
""किती चहा प्यायचास... त्यात ती डबल साखर... दोन तासांच्या गप्पांमध्ये पाच कप चहा व्हायचा तुझा... मी एकदा संजयला म्हटलंही होतं, अरे, माझा एक मित्र होता.. तो फक्‍त चहाने आंघोळ करायचा बाकी होता...!
तुला आठवतं, एकदा तू म्हटला होतास... काश... ये बारिश च्याय की होती... तो कितना मजा आता! अरे ते वाक्‍य आठवून मी कितीदा हसलीय...''
""हं!'' त्याने पुन्हा हसण्याचा प्रयत्न केला.
""अरे तू बोलत का नाहीस? किती बडबडायचास! तोंडात एक तर चहा किंवा शब्द!! त्याशिवाय तुझं तोंड आठवता आठवत नाही...'' ती खळखळून हसली.
""काही नाही गं! त्या वयात असतो तो पोरकटपणा...''
त्याने पुन्हा तिच्याकडे वर मान करून बघितले आणि पुन्हा डोळे फिरवले.
""बाकी चहा पिण्याव्यतिरिक्‍त काही करतोस की केवळ चहाच पित असतोस.. खातो-बितोस की नाही?...'' ती पुन्हा खळखळून हसली.
""नाही... एक ग्रंथालय चालवतो.''
""अरे, ग्रंथालय आणि तू?'' तिने फक्‍त उडी मारायची बाकी होती. ""तुला पुस्तकांची कधीपासून आवड निर्माण झाली?... मला तर म्हणायचास, पुस्तकांपासून तुला लांब एका बेटावर ठेवलं पाहिजे... आणि तूच पुस्तकांच्या दुनियेत?... तुला आठवतं, तू केलेली ती कविता... आई शप्पथ! कसले शब्द एकमेकांना जोडले होतेस... कविता होय ती?... निव्वळ फालतूपणा होता..!''
""तुला आठवते ती कविता?...'' त्याने चमकून विचारलं.
""अरे अगदी शब्द अन्‌ शब्द आठवते...''
""हं!'' त्याने नेहमीप्रमाणे चेहऱ्यावर शांतपणा आणण्याचा प्रयत्न करत काहीतरी प्रतसाद द्यायचा म्हणून दिला.
""थांब, चहा आणते हं...'' म्हणत ती आत उठून गेली...
तो शांतपणे कोचावर रेलून बसला. समोर राधा-कृष्णाचे भले मोठे पेंटिंग होते.
तो उठला. पेंटिंगजवळ गेला. त्याच्या भोवतीही अनेक चित्रे होती. बहुतांश राधा-कृष्णाचीच... अनेक नामी चित्रकारांची. काही नुसत्या बासऱ्या आणि एक-दोन मोरपिसांची चित्रे.
""अरे, संजयला खूप आवड होती पेंटिंगची. त्यानेच जमवलीत सगळी... फिरतीची नोकरी असल्यानं त्याला मिळवताही आली...'' तिच्या या वाक्‍यासरशी तो चटकन्‌ भानावर आला. ती चहाचा ट्रे घेऊन आली होती. तिने ट्रे बाजूला ठेवला आणि पेंटिंगजवळ येऊन सांगू लागली...
""हे पेंटिंग राजस्थानमधून आणले... हे पंजाबमधून... हे बांगलादेशातील एका गावातून...'' ती एक एक पेंटिंग दाखवत होती. ते कोठून आणले, कोणाचे आहे, हे सांगत होती. तिने त्या राधा-कृष्णाची माहिती सोडून सगळ्या पेंटिंगची माहिती सांगितली. त्याचे फारसे लक्ष त्याकडे नव्हते.
""अरे चहा थंड होतोय...''
""हा...''
""तू नाही चहा घेत...?''
""अं? नाही!''
""हं!'' त्याने पुन्हा काहीतरी बोलायचे म्हणून बोलायचा प्रयत्न केला. पण जमला नाही.
""जरा बशी देतेस...''
""अरे, चहा थंडच तर झालाय... मग बशी कशाला...''
""हं...'' पुन्हा त्याने हुंकार सोडला आणि गप्प बसला.
""थांब, मी गरम करून आणते चहा! किती वेळ झाला ना...''
""हं! चालेल...'' म्हणत त्याने मान डोलावली.
तिने लगबगीने चहाचा कप उचलला आणि ती आत गेली.
""बरं, असं करता का... आय मीन... असं करतेस का, चहा राहूदेच...''
""का रे?... बरं राहू दे...'' तिने पण पुन्हा आग्रह नाही केला.
""ग्रंथालयात किती पुस्तकं आहेत?'' तिने काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं.
""भरपूर आहेत! रजनीश आणि जे. कृष्णमूर्तींची तर जवळपास सगळीच आहेत... कुठून कुठून मागवली माहितीए... '' आपण फारच उत्साहात सांगतोय हे जाणवून तो पुन्हा गप्प राहिला.
आता तिने फक्‍त "हं'चा हुंकार सोडला...
""अरे त्या बाजारात तुला मी बघितलं आणि मला पटलंच नाही... तू आणि इथे? शक्‍यच नाही! पण तू... तूच होतास!! बाय द वे, तू कसा या शहरात...?''
""कृष्णमूर्तींच्या व्याख्यानाची एक सीडी इथे होती... ज्यांच्याकडे ती आहे ते गृहस्थ खूप वयस्कर आहेत ना... मग म्हटलं आपणच यावं... खूप जुनी आहे...
तू कविता करतेस का गं... अजून?''
""नाही जमत आता...''
तिने भिंतीवर लावलेल्या राधा-कृष्णाच्या पेंटिंगकडे बघत विचारलं... ""आणि तू पेंटिंग बंदच केलं असशील ना?''
त्याने फक्‍त मान डोलावली...
""चल, माझी चारची ट्रेन आहे. मी निघतो आता...''
तो निघायला उठला तशी तीही उठली. ""चहाही नाही घेतलास आणि चाललास...''
""माझ्याऐवजी तू घे! पोचेल मला...'' गिळता गिळता त्याच्या तोंडातून सांडलंच.
""हं...''
""पण चहा करताना केवळ दूध उकळू नको म्हणजे झालं...''
तो उठला. जसा आला तसा निघून गेला.
त्याच्या पाठमोऱ्या देहाकडे बघत ती किती काळ उभी होती कोणास ठाऊक. मग ती उठली. किचनमध्ये गेली. चहाच्या डब्यात चहा नव्हताच. संजय होता तोपर्यंत घरात चहा असायचा तरी. संजय गेल्यापासून चहा आणणंही बंद झालं होतं. आज तिला खूप मोकळं मोकळं वाटत होतं.
चहा प्यायची खूप तलफ आली होती.

"सकाळ'च्या 10 ऑक्‍टोबरच्या स्मार्ट सोबतीमध्ये प्रसिद्ध झालेली लघुकथा

शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०१३

स्वतंत्र

इथे सही करा... वकिलाने कागदाच्या तळातील जागा दाखविली...
तिने निमूटपणे पेन उचललं आणि सही केली...
""हां... पोटगीदाखल तुम्हाला दरमहा दहा हजार, तुमच्या नावे असलेली कार आणि तुम्हाला घातलेले दागिने तुमच्याकडेच राहतील. तरीही तुम्हाला आणखी काही हवे असल्यास साहेबांनी सांगायला सांगितले आहे... मी इथे दोन ओळींची जागा शिल्लक ठेवली आहे...'' वकील ब्ला ब्ला ब्ला बोलत होता... त्याच्या बोलण्याकडे तिचे जराही लक्ष नव्हते...
""आणखी कुठे सही...?'' तिने प्रश्‍न केला.
""तुम्हाला आणखी काही नको?''
""नको! जेवढं दिलंय तेच खूप आहे...''
वकिलाने पेन पुढे केलं.. सहीची जागा दाखविली... ""हां इथे सही...''
तिने निमूटपणे पुन्हा सही केली...
""हं, झालं...''
""साहेब नाही आले...?'' तिने वकिलाकडे बघितले.
""तुम्हाला भेटायचे आहे त्यांना?''
""हो!''
वकिलाने फोन लावला... तो तिथेच कुठे तरी असावा. अगदी भेटायला व्याकूळ असल्यासारखा तो पटकन समोर आला.
तिने त्याच्याकडे बघितले. काहीतरी बोलायला हवे म्हणून ती म्हणाली, ""झाल्या सह्या.''
""हं...'' त्याने फक्‍त हुंकार दिला.
""आता?''
""आता काय?''
""काही नाही...'' तिला प्रचंड अवघडलेपण आलं होतं...
""तुला या वेळी इथे बोलावलं म्हणून अडचण नाही ना झाली... म्हणजे तुझ्या ऑफीसमुळे..'' त्याने जितकं थंड राहता येईल तितकं राहण्याचा प्रयत्न केला.
""न.. नाही... नाही...'' तिनेही सावरून घ्यायचा प्रयत्न केला...
""उलट केतकर आलेत सोडायला... त्यांच्याच गाडीतून आले इथे...''
तिच्या या वाक्‍यासरशी तिच्यावर रोखलेले त्याचे डोळे अलगद बाजूला गेले...
""हं..'' त्याने पुन्हा हुंकार दिला...
""ऑफिसच्या ड्रायव्हरकडून गाडी पाठवून देते...'' ती काही तरी बोलायचे म्हणून बोलली..
""नको नको... ती राहू दे तुझ्याकडेच... मी लिहिलंय त्यात... गाडी तुझ्याकडेच राहावी म्हणून... ती तुझ्याच नावावर आहे ना?''
""नकोय मला खरं... मी तुझ्या नावावर करून देईन..''
""पण...''
""जाऊ देत... तुला एक विचारायचं होतं...''
""तू या सह्यांसाठी आजचाच दिवस का निवडलास...?''
""काही खास नाही... वकिलाला वेळ होता म्हणून..'' त्याने तिच्याकडे न बघता उत्तर दिले...
तिनेही मग ताणले नाही...
""चल... जाऊ मी आता...'' त्याने आपला वरचा ओठ दातांत दाबला आणि फक्‍त मान डोलावली...
तो तिथेच थांबून होता...
न बघता ती पायऱ्या झपझप उतरली आणि गाडीत बसली... गाडीत बसताना तिला जाणवलं की तो तिच्याकडेच बघत आहे.....
गाडी सुरू झाली.... तिने पर्समधून रुमाल काढला आणि डोळे पुसले....
केतकरांकडे बघत म्हणाली.. ""थॅंक्‍स...''
""कशाबद्दल....?''
""आज तू होतास म्हणून त्याने अडवले नाही... आणि त्याने अडवले नाही म्हणून मी त्याला सोडू शकले...''
केतकरने फक्‍त मान हलवली....
""पण काय गं... घटस्फोटाचे हे पाऊल उचलण्याची खरंच गरज होती?''
""नाही... पण माझ्यासमोर याशिवाय पर्यायच नव्हता..''
""पण यामुळे तो कोलमडला नसेल?''
""हं... तो काय, मी नाही कोलमडले... पण आता सुखाने मरेल तरी...!''
""तुला आठवतं, आठ वर्षांपूर्वी याच दिवशी तू आमच्या लग्नाचा साक्षीदार म्हणून सह्या केल्या होत्यास...''
माणसाने खरेच एवढे प्रेम करू नये!
""मीही प्रेम केलं.. अगदी स्वतःपेक्षा जास्त प्रेम त्याच्यावर केलं.. मला नाही तरी दुसरं कोण होतं प्रेम करण्यासारखं.. पण तरीही त्याच्याइतकं प्रेम करणं मला नाही जमलं...
तुला माहीत आहे... आमच्या घरातील एकही वस्तू त्याच्या नावावर नाही... घर, कार, साधा टेलिफोनसुद्धा माझ्याच नावावर...
त्याला एकदा विचारलं, का रे! सगळी कामं मला करायला लावायला तू लग्न केलंस की काय?
त्यावर तो एवढा अपसेट्‌ झाला होता... म्हणाला, नाही गं... प्रत्येक वेळी तुझं नाव लिहायला मिळावं म्हणून मी सगळ्या वस्तू तुझ्या नावावर केल्यात...
स्वयंपाक करत असताना ओट्याशेजारी खुर्ची ठेवून बसायचा...
काय रे, एवढं काय आहे माझ्यात? असं म्हटलं की नुसता हसायचा... काही बोलायचा नाही...
मी पुन्हा नोकरी करते म्हटल्यावर लगेच त्याने तुला फोन केला... मला यायला-जायला त्रास होऊ नये म्हणून कार घेतली....''
""हं...'' केतकरने हुंकार सोडला...
""आठ महिन्यांपूर्वी त्याची डायरी वाचली नसती तर....''
तिने हुंदका दाबायचा प्रयत्न केला... पण जमलं नाही...
""तो मरणार यात शंका नाही; पण तो रोज मरताना मला बघवणार नव्हतं.... आणि त्यालाही आता आपलं रोजचं मरण लपवताना त्रास नाही होणार, कामाच्या टूर काढून दिवसेंदिवस बाहेर राहावं लागणार नाही...''
केतकरने तिचा हात हातात घेण्याचा प्रयत्न केला... पण तिने हलकेच तो बाजूला घेतला...
""डायरीत त्याने लिहिलेलं वाक्‍य तुला सांगितलेलं आठवतंय?''
""...एका बाजूला हाडांच्या सांध्यात लपून राहिलेला हा कॅन्सर मला जगू देणार नाही. जगात माझ्यानंतर कोण हिचे? कसे होईल हिचे? अनाथाश्रमाच्या पायरीवर सोडून जाणारी आई आणि मध्यात संसार सोडून जाणारा मी यांत फरक तो काय? ती किमान बरी तरी... ओढ लावून गेली नाही... मी मात्र प्रेमाचे जाळे तिच्याभोवती विणून आता निघून जातोय...''
तिला बोलता येत नव्हते...
केतकरने गाडी थांबवली.. ती गाडीतून उतरली....
दहा वर्षांपूर्वी मी याच होस्टेलवर राहात होते... तुला आठवतं... माझ्यासारख्या अनाथ मुलीवर त्याने इतकं प्रेम केलं, की मला पुन्हा अनाथ करताना त्याचा जीव गुदमरायला लागला होता रे... मी समोर असताना त्याला त्याचा शेवटचा श्‍वास घेणंही जड जाईल.... लोक मला कृतघ्न आणि नालायकही म्हणतील. पण मी त्याला सोडलेलं नाही... त्याच्या गळ्याभोवती माझ्या प्रेमाचा फास लागलाय तो थोडा सैल केला इतकंच... तो
स्वतंत्र होईल... पण मी मात्र कायमची अडकेन... 

रविवार, १७ मार्च, २०१३

पतंग


प्रति,
जन्म आणि मृत्यू आपल्या हातात असत नाही. आपण कोणाच्या पोटी जन्माला यायचं, आपलं लिंग काय असावं, आपला रंग काय असावा, कोणत्या जातीत, कोणत्या धर्मात जन्माला यायचं याबाबत आपल्या हातात काहीही असत नाही. असतं ते पुढे आलेले आयुष्य जगणं, ते जास्तीत जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न करणं. पण तेही आपल्या हातात कुठे असतं?. तुम्ही कोण व्हायचं हे तुम्ही ठरवू शकलात तरी तुम्ही ते व्हालच असे नाही. झालाच तर तुम्हाला हवा असलेला आनंद त्यात मिळेलच असे नाही. तुमच्या अवती-भवती कुठली माणसे असावीत, कुठली नसावीत काहीच ठरवता येत नाही. प्रवासाचा रस्ता आपण निवडलेला असला तरी त्या प्रवासातील सांगाती आपल्याला निवडता येत नाहीत. ते बरे असतील तर तो प्रवास सुखाचा होतो नाही तर मग मुक्‍कामाचे ठिकाण येईपर्यंतची धडपड. आपण हे मिळविले ते मिळविले म्हणतो खरे....
पण ते खरेच आपण मिळवलेले असते की आपले विधीलीखित आपल्याला तिथपर्यंत पोचवते? आपली इच्छा असो वा नसो? तो प्रवास करावा लागतो. आपल्याला वाटते आपण मुक्‍त आहोत, पण खरेच आपण मुक्‍त असतो की आपल्या दोऱ्या दुसऱ्याच कोणाच्या हातात असतात? अगदी पतंगासारख्या. विधिलीखिताच्या दोराशी घट्‌ट बांधलेले आणि वाऱ्याच्या हिंदोळ्यावर भरकटणारे. त्यात त्याची मर्जी कुठे असते? वाऱ्याची दिशा, त्याचा वेग आणि विधिलिखीत दोराच्या हिसक्‍याप्रमाणे प्रवास सुरू होतो. कधी उंच जातो तर कधी खाली कोसळतो. पुन्हा उडण्याचे त्राण आणि बळ पंखात असेल तर पुन्हा उडतोही. पण सगळ्याच पतंगाच्या नशिबी आकाशात घिरट्या घालत राहाणे कुठे असते? कधी कधी विधीलिखिताच्या लेखणीचा झटका एवढा मोठा असतो की वाऱ्याचा हिंदोळ्यावर डोलणाऱ्या पतंगावर ते वारंच स्वार होतं. मग फाटून कोसळणं एवढाच कार्यभार राहातो. एखाद्या इमारतीच्या कोपऱ्यात, झाडाच्या फांदीत अडकून पडणे हेच नशिबी येतं. आकाशात भरारी मारून थकून जमिनीवर कोसळलेल्या पतंगाला मुक्‍ती मिळत असेल, पण वाऱ्याच्या झटक्‍याने वा दोर तुटून झाडांच्या फांद्यांवर अडकून पडलेल्या पतंगाला मुक्‍ती कुठे.. तो तर वेदनेचा सांगाती. ती वेदना केवळ फाटल्याची असत नाही... फाटलेपणाची आणि दुखावल्याची वेदना तर असतेच ती नसते असे नाही पण त्याहीपेक्षा मोठी वेदना असते ती दुर्लक्षित झाल्याची, निरुपयोगी झाल्याची... त्या अवस्थेतून त्याला कोणीच बाहेर काढू शकत नाही. अगदी कोणी काढलंच तर तो आपली उंच भरारी घ्यायची ताकदच गमावून बसलेला असतो. कायमचे हे अपंगत्व केवळ शारीरिक कुठे असते ती तर मनोवस्था असते. सर्वांच्या नजरेतून उमटणारा केविलवाणा भाव आणि खोटे दुःख असह्य होते. नजरेतील केविलवाणा भाव बदलत जात पुन्हा दुर्लक्षित परावर्तित होणारा भाव टोचण्या देत राहातो... ? पराभवाचं दुःख खूप मोठं असतं. पण त्याहीपेक्षा जास्त दुःख पराभवानंतर आलेल्या दुर्लक्षपणाचं. लोकांच्या डोळ्यातून पाझरणाऱ्या अविश्‍वासाची वेदना खूप भयानक असते. प्रत्येक नजर सांगत असते की अरे तू पराजित आहेस तुला बोलायचा हक्‍क नाही. तुला नजर वर करायचा अधिकार नाही. मेलेल्या गोमेला ज्या प्रमाणे पुन्हा पुन्हा ठेचले जाते अगदी तसेच या नजरा प्रत्येकवेळा ठेचत राहातात. तुमच्यातील उभे राहाण्याचे बळ शोषित राहातात.....मग तो पराभव कसला का असेना. नैतिक-अनैतिक. प्रत्येकवेळी अनैतिक असते ते तितके अनैतिक असतेच का? की त्याचीही काही रूपं असतात? गुन्हा आणि अनैतिक हे एकाच बाजूला कसे असू शकते? काहीच कळत नाही...
याक्षणी असंख्य विचार डोक्‍यात घिरट्या घालत आहेत. मरणासाठी कारणांची जंत्री तयार करत आहेत. प्रत्येक कारण वेगळे. पण तरीही ते गरजेचे. त्या-त्या वेळेला मरणाला ते कारण उपयोगीही. पण त्या कारणांनी काही मरण यावे वाटले नाही. अगदीच विचार आला नसेल असे नाही, पण यापासून लांब जावे, खूप लांब जावे एवढे वाटले असणार, पण सगळं संपून देऊन जगणंच नाकारावे असे काही वाटले नाही. अपमान, पराजय आणि अवहेलना या गोष्टी नित्याच्याच होत्या. त्यामुळे काही काळाने तो जगण्याचा भाग बनला होता. तरीही प्रश्‍न पडतो माणसं आत्महत्या का करतात? केवळ जगण्याचा कंटाळा आला म्हणून? की जगण्याचा वीट आला म्हणून? जगण्याचे प्रयोजन राहिले नाही म्हणून की मरणातून पुन्हा जन्माला येऊन नवा डाव मांडावा म्हणून? असाध्य रोगाला कंटाळून आत्महत्या करणारे जसे आहेत तसे डॉक्‍टरांकडे काही दिवस मला जगायचे आहे म्हणून रडणारेही असतातच की. दोघांचे रोग सारखेच पण तरीही एकाला जीवनेच्छा तर दुसऱ्याला मरण जवळ करावे वाटते. काय फरक दोघांच्या वेदनांतील? नवरा चांगला मिळाला नाही म्हणून आत्महत्या करणाऱ्या स्त्रिया आहेत तशाच मिळालेली फिक्‍की पाने मांडून डाव रंगविणाऱ्या स्त्रियाही असतात. मग यांत फरक काय? जगण्याचा स्वतःचा अधिकारच का लोक नाकारतात...? यांसारख्या अनेक प्रश्‍नांनी आता माझ्या मनात गर्दी केली आहे. कुठल्याच प्रश्‍नाचे ठोस उत्तर मिळत नाही. ते उत्तर मिळाले असते तर लोकांनी जगण्याची ही कारणे आणि मरण्याची ही कारणे अशी सरळ भेदाभेद केली नसती का? मरण्याच्या कारणांपासून दूर नेणारी अनेक औषधे आणि सल्लाकेंद्रे बाजारात उपलब्ध आहेत पण तरीही लोक त्याकडे न जाता सरळ मरण का पत्करतात? गुंता.... गुंता.... गुंता...
अगदी काही वेळाने समोर ठेवलेला दोर माझ्या गळ्याभोवती आवळला जाईल. श्‍वांसांचे येणे-जाणे बळजबरीने बंद होईल. पायांची हातांची एक धडफड होईल आणि पुन्हा सगळं शरीर शांत होईल..... काही काळ तसाच जाईल... मग दारात पडलेल्या दुधाच्या पिशव्या आणि पेपर... खोलीतून येणारा कुजका वास यांमुळे शेजाऱ्या-पाजाऱ्यांना संशय येईल.... दार उघडलं जाईल... लटकेल्या देहाकडे बघून लोक लोक आत्महत्या म्हणतील. पण खरेच ही आत्महत्या आहे का? आत्महत्या म्हणजे काय? हत्या या शब्दात कुणाचे तरी नुकसान आहे. पण मी जे काही करायला निघालो आहे त्या कोणाचे नुकसान आहे का? छे! असा कोणीच समोर दिसत नाही ज्याचं माझ्याविना आडून राहील. आई-वडील चारऐवजी आठदिवस रडतील, छे! रडतील की नाही हेही माहित नाही. कदाचित रडणारही नाहीत. गेल्या 20 वर्षात त्यांनी कधी कदर केली नाही आता का रडतील. ओळखणारही नाहीत कदाचित. त्यांच्या जगण्याचा मी काही अविभाज्य घटक वैगेरे कधीच नव्हतो. भाऊ-बहिणींना मी जिवंत आहे किंवा नाही हेही माहित नाही. कदाचित दरवर्षी त्यांच्या मेळाव्यात माझी आठवण निघत असेलही, यावेळच्या मेळाव्यात काहींचे डोळे ओलही होतील... अगदी लहाणपणीच्या एकदोन आठवणी काढून... पण त्यापेक्षा फार काही नाही होणार... त्यांना काही तरी आपलं हरवलंय असे वाटणार नाही. नुकसान तर नाहीच नाही... यापेक्षा काय? मी आता आत्महत्या केली किंवा माझा अपघात होऊन मृत्यू झाला किंवा मी आणखी चाळीस वर्षे जगलो तरी जे हयात असतील त्यांना माझ्याबद्दल यापेक्षा काही वेगळे वाटणार नाही. अगदीच स्पष्ट सांगायचे झाल्यास मी मेल्याचे कोणाला काहीच वाईट वाटणार नाही. मी आणखी काही काळ जगलो तरी त्या जगण्याचेही कोणाला काहीच वाटणार नाही. मग का जगायचे? केवळ श्‍वास चालू आहेत म्हणून ? जगण्याला काही तरी प्रयोजन नको का? कोणतीही गोष्ट शाश्‍वत असत नाही. अगदी आज ज्या गोष्टी चिरंतन वाटतात त्याही चिरंतन नाहीत, त्यांचाही प्रवास लयाकडेच सुरू आहे. वेग कमी असेल पण लय सुरूच आहे. मग आपण का जगायचे. लयापर्यंत पोचेपर्यंत श्‍वास घ्यायचा.... पण का? आणि त्यातून मिळवायचे काय? काहीच नाही. राहणार काय? काहीच नाही...... आताही हे सगळे शब्दांचे बुडबुडे.. यांतून काही मिळणार नाही.

लावलेला दोर, त्याची लांबी. त्याचा पीळ पोलिस तपासतील. पडलेल्या स्टुलाचे फोटो काढले जातील. खिशातील या चिठ्‌ठीचा संबंध लावण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रेमभंग की आर्थिक अडचण? व्यवसायात खोट की आणखी काही कारण? काही चुका? काही काही श्‍लेष काढले जातील. त्यातून नसलेल्या जवळच्या माणसांना आणखी त्रास दिला जाईल. जिवंत होता त्यावेळी त्रास आणि आता मेला तरी त्रास म्हणून ते या घटनेकडे बघतील. मग कारण काय द्यावे. द्यायचे म्हणून द्यावे की खरोखरचे द्यावे. जीवनेच्छा संपली हे कारण ठीक आहे. पण ही जीवनेच्छा का संपली याचा मग पोलिस शोध घेत राहातील. कदाचित त्यासाठी कोणाला तरी कारणीभूत ठरवून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतील. उभे-आडवे प्रश्‍न विचारून त्याला सोडून देतील. पण त्याला त्रास व्हायचा तो होणारच. तो रोखायचा कसा.? आजाराला कंटाळून म्हटलं तर मग डॉक्‍टरांच्या काही चिठ्ठ्या तरी सापडायला हव्यात. पण त्याही सापडणार नाहीत. मग काय? प्रेमभंग छे! वयाच्या साठाव्या वर्षी प्रेमभंगाचे कारण चालेल? मग म्हातारा चाळवला होता हा श्‍लेष काढला जाईल. आता हेच बघा मी मेल्यानंतर माझ्या मृत शरीराकडे बघून लोकांना काय वाटेल याचीही भीती वाटते.. मेल्यानंतर मला चाळवलेला म्हातारा किंवा आणखी काही म्हटले तर काय फरक पडणार... पण ती भीती आहेच... पण केवळ आपल्याला म्हातारा चाळवला होता म्हणण्याचा राग नाही, त्याचे कारण ते आत्महत्येमागे कारण नाही... जे खरे कारण आहे ते द्यायला काय हरकत आहे.. लोक विश्‍वास ठेवो अथवा न ठेवो..

आता माझी जी अवस्था आहे त्याला प्रेमभंग म्हणता येईल? छे! ! प्रेमलय म्हणता येईल किंवा आठवणींचा लय. काहीच कळेनासे झाले आहे. वयाच्या 27 वर्षी प्रेमात पडल्यानंतर आणि एकोणतीशीत नकार मिळाल्यानंतर वयाच्या साठाव्या वर्षी आत्महत्या..... हे कारण कसे लागू होईल. पण हेच खरे आहे. 27 ते 29 या दोन वर्षांत मिळालेल्या सहवासाच्या आठवणींवर पुढची तीस वर्षे निभावली. ती आठवणींची पुंजी तीस वर्षे पुरवून खाल्ली. आता सगळं संपलं. त्या पुरचुंडीचा चोळा-मोळा झाला आहे. आता पुन्हा पुन्हा त्या पुरचुंडीकडे वळून बघून तो आनंद मिळेनासा झाला आहे. नव्या आठवणींसाठीचे दरवाजे केव्हाच बंद करून ठेवले होते. आता त्या दरवाजांना पुन्हा उघडणे शक्‍यच नाही. त्याच्या बिजागरी केव्हाच गंजून गेल्या आहेत. त्यावर लाथ मारावी तशा काळाच्या आघाताने कमकुवत झालेल्या भिंतीच कोसळताहेत. त्या एकेक कोसळलेल्या भिंती आता सहन करण्याच्या पलीकडे गेल्या आहे. त्यामुळे सगळंच उद्‌ध्वस्त करावं असं वाटतंय. गेल्या तीस वर्षांचे संचीत त्या दोन वर्षांत दडलेलं होतं. एखादं माणुस तुमच्या आयुष्यात किती काळ असावं हे तुमच्या हातात असत नाही. पण जेवढा वेळ तुमच्यासोबत असणार आहे त्या वेळेच्या आठवणी तुम्हाला कितीकाळ पुरतात त्यावर बरेच अवलंबून आहे. प्रत्यक्षात जगातली कुठलीच भाषा "प्रेम' ही संकल्पना पूर्णपणे मांडू नाही शकत. काळजी म्हणजे प्रेम? सेक्‍स म्हणजे प्रेम? आदर म्हणजे प्रेम? छे! ! अशा कुठल्याच चौकटीत प्रेमाला बसवता येत नाही. अगदी स्पर्श न करता गेली तीस वर्षे मी जगलोच आहे. अगदी तिने टाकलेला तो एक कटाक्ष आता-आतापर्यंत अंतःकरण ढवळून टाकायचा. त्या कटाक्षाच्या आठवणींच्या नशेसाठी हे शरीर असावं असे वाटायचे. त्यासाठीच तर हे शरीर जपलं. पण अलीकडे ती नशा काही उरली नाही. नशेला शरीराची गरज असते. शरीराशिवाय नशा येत नाही. त्यामुळे शरीर आवश्‍यक असते. आता मात्र आठवणींची पुरचुंडी कितीही हुंगली तरी ती नशा आता चढायची बंद झाली आहे. व्यसनी माणसाला जसे पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीकडे वळावे वाटते तसे मात्र होते आहे. मेंदूतील प्रत्येक कण आणि कण पुन्हा पुन्हा बंड करतो आहे. आता गेल्या तीस वर्षात कॅन्व्हासवरील चित्रांवर पुन्हा पुन्हा गिरवून त्याचे रंग एकमेकांत इतके गुंतले आहेत की मूळचे चित्रही आठवेनासे झाले आहे. असह्य.. असह्य आणि असह्य ही एकच भावना आता वारंवार उचंबळून येत आहे. जगण्याचे प्रयोजन हलकेच कोणीतरी काढून घेतल्याची भावना दृढ होत आहे. आता काय करायचे हेच कळत नाही. शरीराचे हे चोचले पुरविणे शक्‍य नाही. बाजारात तुम्हाला सेक्‍स मिळतो अगदी हवा तितका मिळतो पण "मन' मिळत नाही. ते मिळविताही येत नाही. ते विधीलिखितानं तुमच्या भाळी लिहिलं असावं लागतं. कोणाच्या मनात स्थान मिळवायचे हे तुम्ही ठरवू शकत नाही. दया, करुणा या भावना तुम्ही जाग्या करालही पण प्रेम छे!! प्रेम नाही उत्पन्न करू शकत. सहवासाने माया निर्माण होते, त्याची सवय लागते पण प्रेम नक्‍कीच नाही. सहवास संपला की सवयीने माणुस अस्ताव्यस्त होतो... पण तो काही काळापुरताच ... पण पुन्हा तो पुर्वपदावर येतो, एका सवयीपासून दुसऱ्या सवयीकडे तो वळतो. प्रेमाचं तसं असत नाही. गेल्या तीस वर्षांचे संचीत संपले आहे. आता जगण्याला प्रयोजन राहिले नाही. म्हणून हा दोर गळ्यात. आता गळा आवळला की डोळ्यासमोर अंधार येईल. गिजबटेल्या कॅन्व्हासवरचे चित्रही काळे बनून जाईल. जाणिवांच्या काळ्या रंगात हा काळा रंग मिसळून जाईल. मग कोणतेच रंग राहणार नाहीत. अंधार... ती कोण याचा शोध मात्र होऊ नये एवढीच अपेक्षा....

सर ! पीएमचा रिपोर्ट गळा आवळल्यानेच मृत्यू असा आलाय. पण बॉडी न्यायला कोणी आलेलं नाही. काय करायचं?
हवलदाराच्या प्रश्‍नासरशी, त्या इन्स्पेक्‍टरची तंद्री तुटली. त्याने हातातले ते पत्र टेबलावर ठेवले. डोळ्यांच्या कडा पुसल्या...आणि आवाजात जितकी जरब आणता येईल तितकी आणली....
काय?
सर ! बॉडी न्यायला कोणी आलं नाही. काय करायचं? आपण लावायची का विल्हेवाट.!
नाही..थांब....
त्याची फाईल बघू.... फोटो बघू!
हवालदाराने तातडीने त्याचा फोटो काढून दिला...
सर ! काय करू विल्हेवाट लावू...
नाही... ?
काय करायचे.. हवालदाराने पुन्हा प्रश्‍न केला?
रिपोर्ट फाईल काढ, त्यात लिही.
बॉडी ताब्यात घेणारा ः सुहास रामचंद्र फडके.
वय 28
ृताशी नाते ः मुलगा....
................................................................
चार वर्षापूर्वी त्याला नोकरी लागल्यानंतर त्याच्या आईने अशीच आत्महत्या केली होती. तिनेही चिठ्‌ठी लिहिली होती, पतंगाचा दोर तुटल्याने पतंग भरकटतो, मी मात्र स्वतःच्याच हाताने दोर तोडला. मग भरकटलेपण आले... मग अडगळीत जाऊन पडणेही नशिबात आले.... छे!! अडगळीत कुठे तुझ्या बाबांच्या संसारात तर अडकून पडले होते. संसारत काही त्रास नाही झाला... पण शरीराला त्रास झाला नाही म्हणून शरीर का जोपासायचे... काही वेदना त्यापलीकडच्या असतात... पण आता सहन होत नाही रे! दोर तर खूप आधीच तुटला होता. तरी संसाराच्या वाऱ्यावर बरेच वर्षे घिरट्या घालत राहिले... तुझे बाबा होते आणि पुन्हा नव्हतेही. सगळं सारखंच... तुला तुझ्या पायावर उभे करण्यासाठी जगत होते. आज तू तुझ्या पायावर उभा राहिलास. आता पतंगाला मोक्ष मिळायला हरकत नाही...
त्यानं घर पालथं घातल्यावर एका पुस्तकात एक फोटो सापडला होता... आज आत्महत्या केलेल्या माणसाशी तो चेहरा बराच जुळता होता....
............................................

रविवार, १० मार्च, २०१३

माया


""गुलजारांनी मायाला का मारलं असेल रे?''
दोरीवरचे कपडे काढता काढता तिने केलेल्या या प्रश्‍नाने तो थोडा आश्‍चर्यचकीतच झाला, पण त्याकडे त्याने दुर्लक्ष केले.
""सांग ना? गुलजारांनी मायाला का मारलं असेल? केवळ महेंद्रला एकटं ठेवण्यासाठी? की महेंद्रला नायक करण्यासाठी?... बोल ना?''
""कशाला आडकतेस सिनेमांत.. तीन तासांचा सिनेमा बघायचा, आवडला तर वेळ चांगला गेला म्हणायचं. नाही आवडला तर वेळ तरी गेला याचं समाधान मानायचं आणि सोडून द्यायचं.''
त्यानं आपलं सरळ तत्वज्ञान मांडलं.
"" हे खरंच, पण तरीही काही सिनेमे राहातातच ना मनात घर करुन. प्रभाव टाकतात, का माहित नाही, पण त्यातली पात्रं आपली वाटतात, त्यांच्या सुखानं आपण सुखावतो आणि दुःखानं दुःखी होतो. त्यामुळे वाटतं रे. तिचा काय दोष? तिनं कोणताही अपराध नाही केला.. आपल्या भावनांशी प्रामाणिक राहिली ती... महेंद्रला जमलं नाही ते... मग महेंद्रला मारायला नको का?...''

तो काहीच बोलला नाही... ती त्याच्याकडे उत्तराच्या अपेक्षेनं बघत होती.
""जर माया मेली नसती तर...
""तर काय?...''
""...तर महेंद्र नायक झाला असता?... त्याला नायक म्हणून लोकांनी स्वीकारलं असतं?... नसतं स्वीकारलं... महेंद्रला नायक करायला माया मरायलाच हवी होती.''

हातातला पेपर खाली घेतला आणि त्याने वर बघितलं. ती अस्वस्थ वाटत होती... बाहेर उत्साहाने भरलेली आणि आतून खूप एकटी.. एकाकी.. तसं ती बोलायची खूप.. सांगायचीही खूप.. पण गाळून... आडून आडून सांगायची... सर्वच दुःखांना सुखाचा मुलामा लावण्यात तिच्याइतकं पटाईत कोणीच नव्हतं. एकदा चुकून बोलून गेली होती, अवती-भवती माणसं खूप असतात... पण तो सगळा कचराच नाही रे?... पण तेवढंच.. नंतर कधी तिच्या बोलण्यातून अनुत्साह दिसला नाही. खळखळ कधी जाणवली नाही..
""मी काय विचारते आहे? लक्ष आहे का इकडे? तुझं बाबा त्या पेपरकडेच लक्ष..
""महेंद्रला नायक करण्यासाठी मायाने का मरायचं? की कथा पुढे जाण्यासाठी लेखकाला कुणाला तरी मारावंच लागतं? माया जगली असती तर तिचं अस्तित्व काय? महेंद्रसोबत ती राहिली असती तर काय? महेंद्र नायक राहिला असता? त्याचं नायकत्व त्याच्या एकटं राहण्यात आहे... म्हणूनच तर तर इंदू त्याला सोडून जाते आणि माया मरुन जाते... '' ती बोलत होती. विचारत होती.. तो मात्र गप्प होता..
""तू बोलत का नाहीस? खरंच ना? महेंद्र एकटा राहिला म्हणूनच तर नायक ना?...''

ती खूप वेळ विचारत राहिली.. पण तो काहीच बोलला नाही.. मग ती आपल्या कामांसाठी निघून गेली.
खरंच, महेंद्र आहे का नायक? च्छे! महेंद्र कुठला नायक?... चित्रपटाच्या लांबीत त्याला जास्त रोल आहे एवढंच. पण त्यामुळे तो नायक कुठे होतो? तो जगतो का? कोणासाठी? त्याचं मायावर प्रेम की इंदूवर? त्याला एकच निवडायची असेल तर ते शक्‍य आहे का? नायकाला ते जमलं पाहिजे. महेंद्रला कुठला निर्णय कधी घेता येतो? तो सर्वसामान्यांपेक्षा दुर्बळ, हतबल, कदाचित पिचलेलाही.. नायक कुठे पिचलेला असतो?...

त्याची नजर सहज समोरच्या आरशात गेली.. गालावरचे वाढलेले खुंट आणि कपाळावरची आठी त्याला स्वस्त बसू देत नव्हती. आपण जर महेंद्रच्या जागेवर असतो तर सर्वसामान्याप्रमाणे वागलो असतो? की आपली अवस्थाही अशीच झाली असती?.. इंदूला आपण सोडू शकलो असतो की मायाला?... इंदूला सोडणं तुुलनेत सोप्पं... मायाला सोडतो म्हटलं तरी सोडता येत नाही. तिच्याविना जगता येणं अशक्‍य आणि तिच्या सोबत जगणं त्याच्या प्राक्‍तनात नाही..!

त्याच्या विस्फारलेल्या डोळ्यांकडे आणि कपाळावरच्या आठ्यांकडे बघून ती जोरात हसली..
""अरे नको विचार करू इतका... मी सहज विचारलं.... जाऊ दे रे !''
जाऊ दे!
हा आपला परवलीचा शब्द.. प्रत्येक गोष्टीला जाऊच तर द्यायचं...! गुंत्यात अडकू नये यासाठी जाऊ दे... आपल्या बोलण्याचा विपर्यास्त काढला जाईल म्हणून जाऊ दे... सोप्या प्रश्‍नांची उत्तरं कठीण वाटू लागली की मग जाऊ दे... जाऊच तर दिलं आत्तापर्यंत... पण असं जाऊ दे म्हटल्यानं जातं का? गुंत्यातून पाय निघतो का?... मग असा एक एक गुंता वाढत जातो आणि तो गळ्याभोवती पाश टाकत राहातो... त्यात श्‍वास गुदमरत राहातो.. कधी कधी वाटतं... या गुंत्यांनी आपला गळा दाबून टाकावा आणि मोकळं करावं... पण इतक्‍या सहज मोकळं कसं होता येईल?...

मरते. का? लेखकही समाजाच्या खोट्या चौकटीतच अडकून पडला म्हणून? त्यालाही समाजाने ठरवून दिलेल्या रंगातच चित्र रंगवायला आवडतं म्हणून?... की... की त्याला पुन्हा पुन्हा महेंद्रला मारायचं आहे म्हणून..? माया सोडून जाते आणि सुटते... इंदूही स्वतःचा पदर सोडवून घेत दुसऱ्याच्या हातात हात घालून निघून जाते.. उरतो तो फक्‍त महेंद्र...! रोज मरायला...!!

डोक्‍यात असंख्य मुंग्या चावा घेत आहेत असं त्याला वाटून गेलं... विचारांची माळ कधी गुंफली आणि मायाचा चेहरा कधी पटलावर आला हे त्यालाच कळलं नाही... समोर बायको असूनही त्याला तीच दिसत होती... मेंदूचा सुक्ष्मातील सुक्ष्म भाग तिनेच व्यापून गेला होता.. त्याचीही ती जणू मायाच होती...
.........................

ती... आपल्यावर अतोनात प्रेम करणारी... आपल्यासाठी झुरणारी... कदाचित आपल्यापेक्षाही जास्त प्रेम करणारी... पण हलकेच हात सोडवून घेणारी... महेंद्र आणि आपल्यात तेवढे साम्य नक्‍की आहे. आहेच की.. तीही तितकीच सहज... निरपेक्ष आणि संवेदनशील... समाजाला फाट्यावर मारणारी... नकारातही ठाम आणि होकारातही ठाम... नकार देताना आपल्याभोवती सगळी कडी रचून स्वतःला सुरक्षीत करणारी आणि होकार देताना ती सगळी कडी मोडून टाकून जवळ घेणारी... प्रवाही... प्रवाहात ओढून घेणारी... त्या प्रवाहात तुम्हाला काय वाटते याला काही महत्त्व नाही... त्याची दिशा आणि पोचण्याचे स्थळ निश्‍चित असते.. त्यात तुम्हाला स्थान काहीच नाही.. त्यामुळंच
तिच्यासोबत संसार थाटायची स्वप्नं स्वप्नंच राहिली... ती स्वप्नं कसली होती... त्यात तर आपण किती तरी काळ जगलो होतो... तिच्या केसांना कुरवाळायचं होतं... गालांना गोंजारायचं होतं... तिच्या तप्त ओठांवर ओठ टेकवून तू फक्‍त माझीच आहेस हे सांगायचं होतं... तिच्या कुशीत शिरुन बरगड्या मोडेपर्यंत गच्च मिठी मारायची होती... प्रेम कुठे शारीर पातळीवर असतं..? नसतंच ते... पण स्पर्शाइतक्‍या सहज भाषेशिवाय ते पोचत नाही, एकरूप होता येत नाही... हे खरं... तिच्या स्वप्नांची पाखरं माझ्या डोळ्यांतून उडू द्यायची होती... पण नाही जमलं. काही वेळाच इतक्‍या वाईट असतात की त्या वेळांना काही बळी लागतात... तिने नकार दिला ती वेळ तशीच होती.. त्या वेळेला माझा बळी हवा होता. वेळेचे बळी आणि काळाचे बळी यांत फरक आहे. काळ एकदाच बळी मागतो आणि तो घेतला की पुन्हा मागे वळून बघत नाही. वेळ तसं करत नाही. ती असूरासारखी असते. तिला चटक लागते. रक्‍ताची. त्याच त्या रक्‍ताची. त्यामुळेच ती पुन्हा पुन्हा बळी घेत राहाते आणि पुन्हा पुन्हा जिवंतपणाचे पाणी शिंपडत राहाते... जिवंत करून पुन्हा बळी घेण्याचं कसब वेळेइतकं कोणाकडेही नाही...
........
त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं. ती जणू इंदूसारखीच भासत होती. इंदूसारखीच ती.. कर्तव्यनिष्ठ. सोशिक.. ही आपल्याला सोडून जाईल.. नाही कदाचित.. आणि माया मिळेल... तीही नाही मिळणार... इंदूकडे जाण्याचा रस्ता आपल्या हाताने उघडूही.. तिच्यापर्यंत शारीर पातळीवर पोहचूही पण मानसिक आधाराचे काय?.. ना इकडे ना तिकडे... लटकणं हेच प्राक्‍तन...
...............

रात्री केव्हा तरी तिला जाग आली... सकाळच्या एका प्रश्‍नाने त्याचा दिवस खराब गेला होता... आता झोप तरी निट लागली का बघायला ती उठली.. दिवे लावले... खोलीत तो नव्हताच.. नेहमीप्रमाणेच तो अभ्यासिकेत असणार म्हणून तिने अभ्यासिकेचं दार उघडलं... आणि जोरात हंबरडा फोडला... आयुष्यभर लटकत राहण्यापेक्षा एकदाच लटकलेलं बरं म्हणून त्यानं स्वतःला लटकून घेतलं होतं... काळापुढे वेळ हरली होती... तिच्या प्रश्‍नाचं उत्तर आता तिलाच नको होतं !

रविवार, २६ ऑगस्ट, २०१२

"पॉलीश'

"पॉलीश'
एवढाच शब्द त्याने उच्चारला आणि त्याच्यापुढे पाय पुढे केला.
झाडाखाली बसलेल्या त्या सत्तरीतल्या चांभाराने एकदा त्याच्याकडं बघितलं आणि आपल्याकडचा चपलांचा एक जोडा त्याच्यापुढं ढकलला.
त्याने त्या जोड्यात पाय घुसविले आणि तसाच उभा राहिला.
लय दिस झालं, पन बुटाचं हे मॉडेल नायी बघिटलं. मागं लय फॅशन व्हती याची, पर आता कोन न्हाय वापरत.
चांभाराच्या त्या वाक्‍याने त्याला उगाचच अंगावर मास चढल्यासारखं वाटलं. आपल्या पांढऱ्या शुभ्र मिश्‍यांवर ताव मारत त्यानं नुसतं स्मित केलं. उगाचच आपल्या दाढी केलेल्या तुळतुळीत गालावरून हात फिरवला. कोटाची बटने काढली आणि पुन्हा घातली.
साधं करू की पेशल?
हं. स्पेशल. त्यानं आवाजात जितका जरब आणता येईल तितका आणला.
सायब कसं हाय! तुमच्यासारख्या लोकांस्नी असा चकचकीतच बूट लागतो. चालायचं कुठं असतंया. गाडीत बसला की धूम निघाला.....
हं.. चांभाराच्या त्या जवळीकतेनं तो थोडा अस्वस्थ झाला. बोलून चालून चांभार, दिडदमड्या मिळविणार आणि किती आगाऊपणे बोलतो, असाच भाव त्याच्या चेहऱ्यावर होता.
किती वेळ? त्यानं पुन्हा आवाजात जरब आणण्याचा प्रयत्न केला, पण ती तितकीशी जमली नाही.
लय नायी, पर चकाकी तर आली पाईजे..
हं. तो गप्प बसला.
बराचवेळ शांतता तशीच राहिली. कोणीच काही बोललं नाही. त्या चांभाराचे हात वेगानं बुटावर फिरत होते. मघापासून हातापेक्षा वेगाने चालणारी त्याची जीभ थंड पडली होती. एक बूट झाल्यावर त्यानं दुसरा हातात घेतला. त्याच्यावर तो ब्रश फिरवू लागला.
आपण उगाचच त्याला थांबवलं, असं वाटून त्यानं काही तरी प्रश्‍न करायचा म्हणून केला.
हं. किती वर्षे झाली. इथे बसतोस?
हं...
आता त्या चांभारानं त्याचे शब्द ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि त्यानं गप्पपणे आपलं काम सुरूच ठेवले. सायबाने समोर बघितलं. उन तसं बऱ्यापैकी होतं. अंगातून आता घाम येऊ लागला होता. तो ज्या गाडीतून आला होता, ती नवीकोरी गाडी समोरच उभी होती. गाडीच्या थंडाव्यात जा,वं असं त्याला वाटून गेलं. पण त्यानं तो विचार टाळला. त्या चांभाराशेजारी असलेल्या एका मोडक्‍या खुर्चीवर त्यानं रुमाल टाकला आणि तिथंच बसून राहिला. काही क्षण तसेच गेले. ती शांतता त्याला आणखी डसू लागली.
त्यानं पुन्हा विचारलं.
किती वर्षे झाली. इथे बसतोस?
वरीस, दोन वरीस झालं असल की, इथं बसतो. तेच्याआगुदर.. तो बघा बंगला तिथं बसायचो. म्हणजे तिथं बंगला नव्हता. व्हतं एक घर. त्याच्या पुढ्यात एक झाड व्हुतं. तिथं बसायचो, न्हान व्हतो, तवापसनं.
त्यानं त्या बंगल्याकडे बघितलं. खूपच दिमाखात तो बंगला उभा होता.
मागल्या साली घर पाडलं. अन्‌ आता तिथं बंगला झाला. म्या ज्या झाडाखाली बसत हुतो ते झाड बी तोडलं गेलं. मंग काय. काही दिस बंगल्याच्या भित्तीला टेकून टाका घालायचो. पन एकदा वाचमन चिडला, म्हणाला सायबांकडं लय पावणं येणार हायती, उठ इथंनं. मग दोन चार दिसाला कोण कोण येत राहिलं आणि मग म्या सरळ इथ मुक्‍काम ठोकला.' तो बोलत होता.
""मोठ्या बंगल्यांस्नी न्हान माणसं पेलवत न्हायीत सायेब. तेंच्या शिरमंतीपुढं आपल्यावानी गबाळ्याचा कशापायी संसार थाटायचा. ह्या बुटांचं भारी असतंया बघा, गरीब दिसू लागली की हात फिरवायचा. थोडं पॉलीश केलं की झ्याक नव्यावानी दिसतंया. माणसांचं तसं नसतंया. माणसांना का कोणी पॉलीश करणार. म्हणलं त्यांचं नशीब त्यांच्याकडं आपलं आपल्याकडं. आपण जनमलोच तुटक्‍या चपलेवानी, दोन-चार टाकं काय घातलं तेवढंच आपलं. आता ते बी काय उपेगाचं न्हायी. शिवायला आता तळ बी राहिला न्हायी.''
हं.. सायबानं आता नुसता हुंकार भरला.
तू बघितलं आहेस त्या बंगल्यातील सायबांना? पुन्हा काहीतरी बोलायचं म्हणून त्यानं प्रश्‍न केला.
नाय बा, काळ्या काचंच्या गाड्यातली माणसं कुठं दिसत्यात गरीबाला. पर गाड्या बघितल्यात. लय झ्याक हायती. तुमची ही गाडी बी तशीच, पर त्या बंगल्यातील गाड्या लय निराळ्या. रोज येगळी गाडी.
तो गप्प बसून राहिला. त्यानं त्या बंगल्याकडं एक नजर टाकली आणि पुन्हा त्या चांभाराकडं. त्याने आता दोन्ही बूट चकचकीत करुन ठेवले होते.
चांभाराने त्याच्याकडे बघितले.
त्याने पैसे काढण्यासाठी खिशात हात घातला. पण तेवढ्यात गाडीचा ड्रायव्हर पुढे आला, ड्रायव्हरने पन्नासाची एक नोट त्याच्यापुढे ठेवली. साहेब गाडीत बसून निघून गेला. चांभाराने त्याच्या गाडीकडे बघितले. गाडी त्या बंगल्याच शिरली.
चांभार स्वतःशीच हसला. त्या बंगल्याच्या सायबालाच आपण सांगत व्हुतो की. त्याने मान हलवली आणि सायबानं टाकलेल्या पन्नाशीच्या नोटेकडं बघत चांभार पुटपुटला, आजचा दिस गेला आता, उद्याचं उद्या बघू.
त्यानं तिथं ठेवलेलं आपलं सामान आवरायला सुरवात केली. सायब बसलेल्या खुर्चीवर सायबाचा रुमाल तसाच होता. एवढा मोठ्‌ठा साहेब आणि त्याचा रुमाल बघून चांभाराला कसंतरीच वाटलं. रुमालाला पडलेल्या भोकांवरुन त्याला समजलं, त्या बंगल्यात जाण्यापूर्वी सायबालाही पॉलीश केलं होतं. माणसांना पॉलीश केलेलं त्यानं पहिल्यांदाच बघितलं होतं. 

शुक्रवार, ८ जून, २०१२

काजळी



काजळी

त्याने समईची वात हलकेच बाहेर काढली, काडेपेटीतील काडी पेटविली आणि हलकेच समईवर धरणार इतक्‍यात वीज चमकून गेली आणि त्यापाठोपाठ आलेल्या ढगांच्या गडगटाने खिडक्‍यांची तावदाने वाजली. तावदानांची बंधने झुगारुन आत आलेल्या वाऱ्याने हातातल्या काडीला अगोदर गच्च मिठी मारली तशी ती लाजून विझून गेली.
समई लावायची तर खिडक्‍या बंद केल्या पाहिजेत म्हणून तो उठला. त्याने खिडक्‍यांची दारे लावून घेतली. त्यावरचे पडदे लावून घेतले. बाहेर पाऊस कोसळायला लागला होता. धबाबा... हा कोसळणारा पाऊस मृगाचा नव्हता. वळीवाचा, आवेगाने आलेला... वाजत गाजत... वळीवाच्या पावसाला जितकी आतुरता असते तितकी मृगाच्या पावसाला नसते, असं त्याला पुर्वी वाटायचं. जणू तो प्रियकरासारखाच असतो, अगदी उत्कट... असं त्याचं ठाम मत होतं. आता छतावर टपोरे थेंब वाजू लागले होते. पावसाच्या आवेशात आता त्याचं अवघं घर आलं होतं. त्याला ते कोरडं हवं होतं... या मुरदाड पावसाने आपल्याला न सांगता आपल्या घराचा असा ताबा घेतल्याचा त्याला राग येऊ लागला होता.
कधी काळी त्याला वळीवाचा पाऊस प्रचंड आवडायचा. कधीही मग रात्री-अपरात्रीही पाऊस पडायला लागला की तो बाईक काढायचा आणि पावसात मनसोक्‍त भिजून घरी परतायचा. पाऊस मनात साठवून घ्यायचा. त्याच्याइतकी वळीवाच्या पावसाची कोणीच वाट बघितली नसेल... पहिला पाऊस अंगावर झेलण्यासाठी तो कुठलीही किंमत द्यायचा. एकदा ऑफीसची कसली तरी महत्त्वाची मिटींग सुरू होती. बाहेर ढगांनी गच्च दाटी केली होती. तो त्या मिटिंगरुममध्ये अस्वस्थपणे बसून राहिला होता. आता कुठल्याही क्षणी पाऊस पडायला सुरवात होईल, आणि इथली मिटींग तशीच सुरू राहिली तर.. या विचाराने तो अस्वस्थ होत होता.. बाहेर हलके हलके थेंब पडायला सुरवात झाले आणि त्याने मिटींगमध्ये स्पष्ट सांगितले, "" मला पावसात भिजायचे आहे. हा या वर्षीचा पहिला पाऊस आहे. आता पुन्हा पहिल्या पावसात भिजायला पुढच्या वर्षीशिवाय पर्याय नाही.'' गंमत म्हणजे त्या मिटींगला आलेल्या अनेकांनाही त्याचा हा पाऊसवेडेपणा आवडला आणि मिटींग भर पावसातच झाली. त्या मिटींगनंतर त्याला प्रमोशन मिळत गेली आणि मग त्याच्या आणि भिजण्याच्या आड कधी नोकरी आली नाही. पहिल्या पावसात मग तो भिजत राहायचा. कपड्यांसकट. ते कपडे मग अंगावरच वाळवायचा... पावसाच्या थेंबामुळे पडलेले डाग मग मिरवत राहायचा.. त्या डागांतून अत्तराचा वास येतो असं काही-बाही सांगत राहायचा. मग कधी-कधी उन्हाळा कडक वाटू लागला की तोच शर्ट घालून तो त्या पावसाच्या आठवणींत रमून जायचा. लोक त्याच्या माघारी मूर्ख, भावूक, मोठे पद मिळाले म्हणून असली थेरे सुचतात, असं म्हणायचे पण त्याकडे तो लक्ष द्यायचा नाही. त्या भिजून वाळलेल्या शर्टाचा त्याला अभिमान वाटायचा. दरवर्षीचे असे पहिल्या पावसात भिजलेले शर्ट त्याच्या कपाटात नांदत राहायचे. अलीकडे मात्र तो या पहिल्या पावसालाच घाबरायचा. काय कोण जाणे पण त्याला हा वळीवाचा पाऊस आवडायचा नाही.

ती शेवटची भेटली त्यालाही आता दहा वर्षे झाली. तिने नकार तर त्याअगोदर दहा वर्षांपुर्वी दिला होता. पण तरीही त्या दिवशी ती एवढंच म्हणाली होती...
तुला पहिला पाऊस आवडतो ना? त्याचा आवेग, त्याची आतुरता.. त्याचं निरपेक्ष अस्तीत्व.. त्याला ना धरतीवर काही पिकवायचे नसते ना नदी नाल्यांच्या प्रवाहात स्वतःला अडकवून घ्यायचे असते. त्याला फक्‍त समाधान द्यायचे असते, असं तू मानायचास ना?...
हो! एवढंच तो म्हणाला..
खरे तर तिला पाऊस नावडायचा नाही पण पावसावर तिने बोलावे इतका काही पाऊस तिला आवडत नव्हता खचितच.
पण तरीही त्याने आडवले नाही. तिला बोलू दिले.
...तूही वळीवाच्या पावसासारखाच रे. जगण्याची मजा एकाच गोष्टीतून अनुभवणारा. माझ्यावर वळीवाच्या उत्कटतेने प्रेम करणारा आणि नकारानंतर पुन्हा न परतणारा.. मला तू आषाढातल्या पावसासारखा हवा होतास. अनुराग करणारा... हक्‍काने पडणारा... आपल्या अस्तीत्वाने सगळं रान हिरवंगार करणारा... नद्या-नाल्यांतून ओसंडून वाहणारा... पण ती मजा तुला नाही कळली किंवा तू समजावून नाही घेतलीस... तु तुझ्याच मापाने सगळं मोजलंस... ती एवढंच म्हणाली आणि निघून गेली. कितीतरी दिवस त्याला तिच्या त्या शब्दांचे अर्थच समजले नाहीत. काही तरी बडबडायचे म्हणून ती बडबडली असेच वाटून तो आपल्या कामाला लागला... पण तिचे शब्द त्याच्या मेंदूत घर करुन राहिले होते.
चार वर्षांपुर्वी असाच तो खिडकीतून बाहेर बघत होता... बाहेर आषाढातला पाऊस कोसळत होता.. अखंडपणे... पण त्यात जोर-जबरदस्ती नव्हती... गवताच्या कोवळ्या पानालाही स्पर्श करताना त्याला काही यातना तर होत नाहीत याचीच जणू काळजी घेत असल्यासारखा. त्या दिवशी त्याला कळले.. ती काय म्हणाली ते... पण वेळ निघून गेली होती..
त्याने बाहेर बघितले... वळीवाचा पाऊस नेहमीप्रमाणे कोसळला आणि आता ओसरुनही गेला होता... त्याने पुन्हा काडेपेटीतील काडी पेटविली. समईच्या वातीने काजळी धरली होती. ही काजळी त्याला आज तरी काढता येणार नव्हती... समई आज पेटणार नव्हतीच..!


*** "सकाळ'च्या स्मार्टसोबतीमध्ये 7 जूनला प्रसिद्ध झालेली माझी लघुकथा 

शनिवार, २८ एप्रिल, २०१२

सुटी

किक्रेट खेळणाऱ्या त्या मुलांकडे तो एकटक बघत होता. कोणी चेंडू टाकत होता, कोणी बॅटने तो फटकावत होता. ती दहा बारा पोरं आपल्या खेळात रंगून गेली होती. ते. हातातील बोचकं सावरत ते सात-आठ वर्षांचं पोरगं त्या खेळणाऱ्या पोरांकडे बघत होतं. त्यांच्यात दंगा चालू होता. भांडणं होत होती.. जिंकणं-हरणं चालू होत. एकमेकांच्या उरावर बसणं चालू होतं. ते पोरगं आपल्या बोचक्‍याला सावरत शेजारच्याच गडग्यावर बसलं. हलकेच त्याने बोचकं बाजुला ठेवलं. ते ठेवताना त्यातली एक फाटकी-तुटकी बाहुली खाली पडली. मघाशी कचराकुंडी चाचपताना सापडलेली ती कापडी बाहुली त्याने हलकेच त्या बोचक्‍यात कोंबली होती.
गोट्या...
आईच्या चौथ्या हाकेनंतर त्या क्रिकेट खेळणाऱ्यापैकी बॅट घेतलेला मुलगा थोडा चलबिचल झाला. त्याने तरीही डाव तसाच चालू ठेवला. बोचकं सांभळणाऱ्या त्या पोरानं हाकेच्या दिशेकडे बघितलं. मग त्या पोरांकडे बघत राहिलं. त्या पोराची आई त्याला पुन्हा-पुन्हा हाक मारत होती. आणि ते मात्र आपल्या खेळांत गुंगून गेलं होतं. पोरांचा गोंधळ उडाला होता. चिडा-चिडी दंगामस्ती सुरु होती. कोणी त्यांना हाक मारते आहे याकडे त्यांचं लक्षच नव्हते. एवढ्यात त्या बॅट धरलेल्या पोरानं चेंडू टोलावला तो त्या बोचकं घेतलेल्या पोराच्या पायाशी आला. त्याला तो चेंडू आवडला. तो चेंडू उचलण्यासाठी ते खाली वाकलं पण इतक्‍यात दुसरं एक पोरगं तिथं आलं त्याने तो चेंडू उचलला आणि जोरात फेकला.
त्या पोरांत जावं, तो चेंडू हातात घ्यावा, बॅट घुमवावी.. असं त्या बोचकं घेतलेल्या पोराला वाटलं पण त्याने तो विचार सोडून दिला. त्या पोरांइतके चांगले कपडे त्याच्याकडं नव्हते, दिवसभर उन्हात काम केल्यानं अंग सगळं घामेजून गेलं होतं. त्यातच कचऱ्यात शोधा-शोध करुन त्याची सगळी घाण अंगाला लागली होती. अंग मळलं होतं, कपडे मळके होते. त्या पोरांच्या तुलनेत तो खूपच घाणेरडा दिसत होता. त्यालाच त्याची लाज वाटत होती. त्या टकटकीत मुलांत कसं जायचं? म्हणून मग ते गप्पच बसलं.
पुन्हा त्या मुलाच्या आईची हाक ऐकू आली.. तरी ते पोर खेळत राहिलं.. आईची हाक जवळ-जवळ येऊ लागली.. ती जशी जवळ येऊ लागली तशी पोरांची चलबिचल वाढली..
काकू आली रे, स्टंप, बॅट घेऊन पळा... एकाने जोरात आरोळी ठोकली, तशी सगळी पोरं पटपट गोळा झाली.. सगळ्या वस्तू पोरांनी गोळा केल्या आणि त्यांनी धुम ठोकली. बॅट घेतलेलं पोर मात्र शूर शिपायासारखं तिथेच टिकून राहिलं. त्या बोचकेवाल्या पोराला त्याचं आश्‍चर्य वाटलं..
आता त्याची आई त्याच्याजवळ आली होती. तिने त्याला हलकेच टपली मारली.
किती हाका मारायच्या रे, सुटी लागली म्हणून किती वेळ खेळायचे... त्याची आई त्याला दटावत होती.. ती माय-लेक बोलत बोलत त्याच्यासमोरुन गेली. समोरुन जाताना त्या पोराच्या आईने त्याच्याकडे बघितलं, मग त्याच्या बोचक्‍याकडे आणि म्हणाली, बघ तुझ्यापेक्षा किती लहान आहे, पण तरीही सुटीत बघ कसा आईला मदत करतो ते. आता तुही सुटीत काम कर. ती माय-लेक अंधारात निघून गेली.
त्या पोराने बोचकं उचललं. घर जवळ करायला हवं होतं. घर कसलं, कालच तर त्या माळावर त्याच्या आई-बाबांनी पालं टाकलं होतं. हे गाव अजून नवं होतं. कळायला लागल्यापासून किती गावं बदलली हेही आता आठवेनासं झालं आहे. अंधारातच तो आपल्या पालांकडं वळला. पोटात भूक होतीच पण त्यापेक्षा मनात खूप विचार होते. त्या पोरांनी टोलवलेले चेंडू त्याच्या डोक्‍यात टप्पे खात होते. ते त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. त्या पोराची आई आणि ते पोरंग यांचं बोलणं त्याच्या मनात कोरुन गेलं होतं. पालांत शिरल्या शिरल्या त्यानं बोचक्‍यातील बाहुली काढली आणि आपल्या लहान बहिणीच्या हातात दिली. आई चुलीला लाकूड लावत होती. त्यानं ते बोचकं बाहेर ठेवलं आणि ते आईकडे गेलं.. आईकडे सगळ्या प्रश्‍नांची उत्तरे असतात याची त्याला खात्री होती. त्यानं हलकेच आईच्या गळ्यात हात घातला, गालाला गाल लावला आणि विचारलं...
माये, सुटी म्हणजे काय गं?

सोमवार, ९ एप्रिल, २०१२

भातुकली...

भातुकली...

त्याने तिला टपली मारली आणि तो आत गेला. बंगल्याच्या दारातच तिने आपला भातु कलीचा खे ळ मांडला होता. गोबऱ्या गालाची, कुरळ्या केसांची, ती चार-पाच वर्षांची मुलगी आपल्या बाहुलीला न्हाऊ-माखू घालत होती.
आत गेला तसा तो सैल झाला. सोफ्यावर अंग टाकून तो पडून राहिला. तू कधी आलास... घराची ती मालकीन असावी. अठ्‌ठेचाळीस-पन्नास वर्षांची असेल. काळ्या रंगाआड केसांचे वय लपविले असले तरी गालावर रुळणाऱ्या काही बटा चहाडी करतच होत्या. चेहऱ्यावर सुरकुत्यांनी खेळ मांडायची तयारी सुरू केली होती. गडद लालीने ओठांची कमान उगाच रुंद केल्याचे वाटत होते. त्याने तिच्याकडे बघितले आणि जोराचा सुस्कारा टाकला.
""बाहुलीला अंघोळ घालणं चालू होतं त्यावेळी आलो.आता ती जेवून झोपी पण गेली असेल. हा हा हा..''
त्याचा हा स्वभाव तिला माहीत होता. कोणत्याही गोष्टीकडे तो नेहमीच विनोदाच्या अंगाने बघायचा आणि मग स्वतःच मोठ-मोठ्याने हसायचा.. त्याच्या बोलण्यातला रोख तिला कळला. पण तिनं त्याकडे दुर्लक्ष केलं.
""चहा-कॉफी काय हवं''
तिचा साधा प्रश्‍न.
""काही नको. बघायला आलो होतो...''
त्याने सरळ मुद्द्याला हात घातला.
""बघितलंस ना मग कशी वाटली.''
तिने सहज राहण्याचा प्रयत्न केला, पण प्रयत्नच.
""छान आहे. सगळीच मुलं छान दिसतात. त्यात ही पण छान आहे. मला तिचा राग नाहीच..''
""जाऊ दे ना जयंता..'' तिने विषय टाळायचा प्रयत्न केला.
""जाऊ दे तर जाऊ दे... पण तरीही मला काही प्रश्‍नांची उत्तरं नाही मिळाली.
म्हणून आलो इथे..''
""मला तुझ्या काही प्रश्‍नांची उत्तरे द्यायची नाहीत.'' तिने स्पष्टपणे उत्तर देण्याचे टाळले..
"पण..'
"पण नाही आणि बिन नाही. जयंता आपलं काय ठरलं होतं. आपण एकमेकांच्या आयुष्यात डोकावायचे नाही.. मग तुझे हे प्रश्‍न का'
""का?''
जयंताने चेहरा त्रासिक करत प्रश्‍न विचारला.
""कारण ती माझं नाव लावणार आहे. आपला अजून घटस्फोट झालेला नाही, म्हणून.''
"हो! मग नाही लावणार ती तुझं नावं. तुझं नाव तिला लावण्यात मला स्वारस्य नाही.''
तिने तोडायचं म्हणून सांगून टाकलं.
""प्रश्‍न नावाचा नाही.. हे तुलाही माहीत आहे.''
जयंताने जितकं शांत राहता येईल तितकं शांत राहण्याचा प्रयत्न केला. तू उद्या आणखी दहा मुलं आणलीस आणि त्यांनी माझं नाव लावलं तरी मला हरकत नाही, हे तुलाही माहीत आहे. मला त्या मुलीविषयीही राग नाही.. पण हेच जर करायचं होतंतर मग...'
""मग काय''
"मग जणू तुला माहीतच नाही..''
जयंताने प्रश्‍न विचारायचा केविलवाणा प्रयत्न केला. पण तिने चेहरा बाजूला केला.
मघाशी भातुकली खेळणारी ती मुलगी आत आली. तिने डाव्या हातात बाहुली घट्‌ ट धरली होती. डोळ्यात करुणेशिवाय दुसरा भाव नव्हता. गालांवर उदासतेचे ढग दाटीवाटीने बसले होते. त्या मुलीने एकदा तिच्याकडे आणि एकदा जयंताकडे बघितले. मग तिने हलकेच हातातील बाहुली समोरच्या टेबलवर ठेवली आणि तिच्यापाशी आली. जयंता बघत होता. तिला न्याहाळत होता. तिने एकदा तिच्याकडे बघितले आणि नंतर जयंताकडे बघितले. मग हलकेच तिने जयंताच्या पायाला हात लावला आणि मग तिच्या पायाला.... जयंताला कळले नाही. काय होतंय ते.. तिने ती बाहुली उचलली आणि आपल्या खोलीकडे निघून गेली. जयंता तिच्या पाठमोऱ्या बाल मूर्तीकडे बघत राहिला.
"जयंता... मला वाटतं तुझ्या प्रश्‍नांची उत्तरं तुला मिळाली असतील..'
तिच्या या वाक्‍याने तो प्रचंड अस्वस्थ बनला. त्याच्या स्वप्नांना सुरुंग लागला होता. कोणीतरी त्याचा गळा आवळतोय असं वाटत होतं. तो तिच्याकडे बघत होता आणि स्वतःला शिव्या घालत होता. त्या क्षणी त्या घरात राहणं म्हणजे नरक वाटून तो ताडकन्‌ बाहेर पडला. दरवाजातून बाहेर येताना त्याचा पाय एका खेळण्याला लागला. चटकन त्याचं मन हललं. त्याने ते खेळणं उचललं. त्याला त्या मुलीची नजर आठवली आणि मग तिची. आयुष्यात एवढा मोठा भातुकलीचा खेळ त्याने बघितला नव्हता. जिवंत खेळण्यांनी खेळणाऱ्या तिच्या भातुकलीच्या खेळाचे तो एक खेळणे केव्हांच होऊन गेला होता. आता त्यात आणखी एका खेळण्याची भर पडली होती..
**पाडवा सृजनमध्ये प्रसिध्द झालेली माझी लघुकथा**


मंगळवार, १३ मार्च, २०१२

बांगड्या....

तिने कपाटातून पुन्हा बांगड्या काढल्या... त्या बांगड्या तिने डोळे भरून बघितल्या आणि फडताळात कोंबून ठेवल्या. जोरात दार लावले, लाकडी कपाटाचे ते दार पावसाळी हवामानामुळे फुगले होते. त्याचे दरवाजे घट्ट बसत नव्हते. तरी ताकदीने दोन्ही दरवाजे तिने लावले आणि त्याच्या कोयंड्याला कुलूप लावले. काही क्षण ती तिथेच बसून राहिली. मग कसल्या तरी आठवाने उठली आणि आवेगातच तिने घर सोडले. या बांगड्यांबद्दल वहिनींना सांगायलाच हवे. त्यांना किती आनंद होईल. त्यांनी प्रत्येकवेळी मदत केली. तिच्या डोक्‍यात विचार येत होते.. ती लगबगीने चालत होती... जणू पळतच होती... बंगल्याच्या दारात आल्यावर तिने दीर्घ श्‍वास घेतला. चेहऱ्यावरचा आनंद जितका लपवता येईल तितका लपवला आणि तिने बंगल्याची बेल वाजवली... वहिनींनीच दार उघडले... एवढ्या सक्‍काळी - सकाळी कशी ही म्हणून त्यांना आश्‍चर्य वाटले, पण त्यांनी ते चेहऱ्यावर आणू दिले नाही. ती आत गेली...
अगं, अजून भांडी नाही पडलीत... थोडा वेळ थांब... चहा घेणार का? वहिनी बोलत बोलत आत गेल्या... ती गप्प बसून राहिली... थोडा वेळ तसाच गेला. धीटाई करून आत जावे आणि वहिनींना सांगावे, असे तिला वाटले; पण आपलेच सुख आपण कसे सांगायचे म्हणून ती गप्प बसली... तिला सुख कुठल्या शब्दात व्यक्‍त करतात हेच माहीत नव्हतं...
वहिनी थोड्या वेळाने बाहेर आल्या... तशी ती पुढे झाली. तिचे डबडबलेले डोळे आता कोणत्याही क्षणी पाझरू लागतील अशी स्थिती होती... पण ती बोलली नाही. वहिनी काहीबाही सांगत राहिल्या... तिच्या कानावर ते शब्द पडत राहिले; पण डोक्‍यात काही गेले नाहीत.
भांड्यांचा ढीग बघून तिने पदर खोचला आणि ती कामाला लागली... एक-एक भांडे घासता-घासता तिच्या डोळ्यांतून अश्रूंची माळ वाहत होती. जणू कित्येक वर्षांपासून ती माळ तिच्या पापण्यांच्या आत तशीच होती आणि कुणीतरी हलकेच त्यातील धागा काढून टाकावा आणि एक एक मोती सरकत सरकत खाली यावा... अगदी तसेच... तिला काही क्षण ते अश्रू लपवावेत वाटले; पण तिने आज त्यांना आडवले नाही...
वहिनी कोणाला तरी सांगत होत्या... या आता भांडी घासताहेत. त्या खूपच सोशिक आहेत. नवरा लवकर गेला... यांनीच मुलाला वाढविले... धुणी-भांडी करून त्याला इंजिनिअर केले... सासूनं दिलेल्या दोन बांगड्या काय ते तिची मालमत्ता, ती पण तिने पोराच्या शिक्षणासाठी मोडून टाकली... पोरगंही हुशार निघालं... कॅम्पस इंटरव्ह्यूमधूनच त्याचे सिलेक्‍शन झाले... चार-पाच लाखांचे पॅकेज मिळाले; पण हिचे दुर्दैव काही संपले नाही. गेल्या चार महिन्यांपासून त्याने एक पत्र की फोन केला नाही. त्याला नोकरी लागली, त्यावेळी किती आनंदात होती ती. म्हणाली होती, ""वहिनी, पोरगं मिळवतं झालं... आता काय तुमच्याकडं येणं हुईल, असं वाटत नाही... पण माझ्या सासूनं दिलेल्या बांगड्या म्या मोडल्या. आता सुनंला चार बांगड्या घातल्या की माझं काम सपलं... त्यामुळे काही दिस तुमच्याकडं काम करायला लागंलच... ''
पोरगं एवढं मिळवतं झालं तरी हिचं काम काही सुटलं नाही बघा... सुनेला सोन्याच्या बांगड्या घालेपर्यंत हिचे हात तेवढे मजबूत राहू दे एवढीच प्रार्थना... एवढं कष्ट करून हिने पोराला वाढविलं... चांगला इंजिनिअर केला... पण आता त्याला आईची लाज वाटत असणार. त्यामुळेच फिरकला नाही. आला नाही तर नाही, पण चार पैसे तरी पाठवायचे... पण ते पण नाही... असली पोरं जन्माला येण्यापेक्षा निपुत्रिक असलेलं बरं... वहिनी ताड-ताड बोलत होत्या... वहिनी नेहमीच तिच्याविषयी मायेने बोलायच्या... पोरासाठी आपल्या पोराचा जुना सदरा हक्‍काने द्यायच्या... घरात काही चांगलं-चुंगलं केलं की पोरासाठी घेऊन जा म्हणून सांगायच्या... झेपेल तेवढी पैशाची पण मदत केली... पण वहिनींचे हे बोलणे तिला आज नाही आवडले... ती उठली आणि सरळ निघून गेली... वहिनींना काही समजले नाही...
दुसऱ्या दिवशीही ती वेळेअगोदरच आली... वहिनींना काही कळेना...
""अगं, तू जादा काम लावून घेतले आहेस की काय? तुझी तब्येत बघ किती तोळा-मासा झाली आहे. अशी जर तू काम करायला लागलीस तर आजारी पडशील आणि इथे तू आजारी पडलीस तर कोण आहे बघायला... तुझा तो पोरगा दीडशहाणा एकदा नोकरी लागली तो गेला तिकडेच... तू बसलीएस इथे सुनेला मी हे करणार - ते करणार करत. उद्या तो येईल बायकाबरोबर आणि सांगेल ही तुझी सून आणि हा तुझा नातू...'
वहिनी कळकळीने बोलत होत्या... ती गप्प बसली... काय करावे हेच तिला सुचत नव्हते... तिने तरी हिम्मत केली... कनवटीची चिठ्‌ठी काढली आणि वहिनींसमोर धरली... वहिनींनी चिठ्‌ठी वाचायला सुरवात केली..
प्रिय, आई
खूप दिवसांनी पत्र लिहितोय. तू रागावली असशील. पण काय करू... मागे एकदा शेजारघरी फोन लावला होता, त्यांना तुला बोलवायला सांगितले होते... पण काकांनी फोनच असा उचलला की तू त्या घरात यावी असं वाटलंच नाही. मग फोन करायचे सोडून दिले. काका फोनवर बोलले पण तसेच दुसरेही... ते बोलत नाहीत म्हणून त्यांना गृहीत धरण्यात अर्थ नाही. तुला वाचता येत नाही. त्यामुळे पत्र तरी कसं लिहिणार... पण आज ऑफिसमधलाच एक सहकारी तिकडे येतोय असं कळल्यावर त्याच्याकडून दिलं हे पत्र. तो दाखवेल वाचून... सोबत चार सोन्याच्या बांगड्या पाठविल्यात. दुकानदार मला म्हणाला, अरे बांगड्या घेताय पण हाताचे माप आणले नाहीत... मला तुझी मूर्ती आठवली... तुझ्या हाताचे माप काय आणि कसे द्यायचे हेच कळेना... मग मी सरळ माझ्या हातांचे माप दिले... माहीत आहे मला, त्या तुला मोठ्या होतील. पण त्या तुला नक्‍की वर्षभरात येतील. आणि हो... सोबत मी काही पैसे पाठविले आहेत... मीही पुढच्या महिन्यात दहा-बारा दिवसांची सुटी घेऊन येतोय... रागावू नकोस...
तुझाच..

या चिठ्‌ठीबरोबर तिने त्या बांगड्या वहिनींच्या हाती दिल्या... वहिनींनी त्या बांगड्या बघितल्या आणि एवढेच शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडले... हा मुलगा स्वतःच्या पोटाला खातो की आईच्या हातांना स्वप्नात बघून जगतो कळत नाही... त्याच्या पगाराच्या मानाने त्या बांगड्या खूपच महाग होत्या...

.................................
****सकाळ स्मार्ट सोबतीमध्ये 8 मार्चला छापलेली माझी लघुकथा

रविवार, ८ जानेवारी, २०१२

अनंता

अनंता

सहसा तो वैतागत नसे. कितीही मोठी गोष्ट झाली तरी हे असंच चालायचं असं त्याचं तत्त्वज्ञान. त्यामुळे पुढच्या माणसाच्या चुकांविषयी बोलण्यापेक्षा तो स्वतःच रस्ता बदलायचा. कोणत्याही गोष्टीचा स्वतःवर परिणाम होऊ द्यायचा नाही. पण आज मात्र त्याला हे ट्रॅफिक प्रचंड त्रास देत होतं. जनावरेही या माणसांपेक्षा नियम पाळतात, असं त्याला वाटून गेलं. मघाशी तर त्या रस्त्यात आडवी-तिडवी गाडी मारणाऱ्या पोराच्या मुस्काटात एक ठेवून द्यावी, असं त्याला वाटून गेलं; पण त्यानं रागावर नियंत्रण ठेवलं. आणखी अर्धा किलोमीटर अंतर गेलं की हायवे लागणार होता. पण गाड्या मुंगीच्या पावलाने पुढे सरकत होत्या. मध्येच मोटारसायकलस्वार घुसत होते. त्याच्या गाडीसमोर आडवे येत होते. तो वैतागत होता. जोराने हॉर्न वाजवत होता, पण त्यांच्यावर काहीच फरक पडत नव्हता. इंच इंच करत तो पुढे सरकत होता. त्याचा संयमाचा बांध आता फूटू पाहत होता. आता जर कोण आडवे आलं तर सरळ उतरून कानाखाली द्यायची असंच त्यानं ठरवलं; पण ती वेळ आली नाही. शहरातला गर्दीचा रस्ता संपला आणि तो हायवेला लागला. ऍक्‍सिलेटरवरचा त्याचा पाय नकळत दाबला गेला. गाडीने वेग घेतला. डोक्‍यातून अजून विचार जात नव्हते. गाडीच्या वेगाबरोबर विचारांचा गोंधळ वाढत होता.
रोजच्या सवयीप्रमाणे आजही त्याला पहाटे पाचलाच जाग आली. ऑफिसला आज जायचंच नाही असं ठरवून तो अंथरुणावर पडून होता. पण झोप काही येत नव्हती. रोजच्या दगदगीची शरीरालाही इतकी सवय होते, की मग आरामही नको वाटतो. सक्‍तीने दिलेला आराम शरीर स्वीकारत नव्हतं; पण तोही हट्टाने उठत नव्हता. एवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. नाईट शिफ्टमधल्या त्याच्या हाताखालच्या माणसाचा फोन असणार म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले. त्यात आज उठायचेच नाही, असं ठरवून तो पडून राहिला. दोन कॉल त्यानं उचललेच नाहीत. शेवटी फोन वाजायचा बंद झाला. सकाळी चहा पिताना त्याच्या लक्षात आलं. पहाटे कोणी तरी फोन केला होता. त्याने मिसकॉल बघितले; तर ऑफिसचा नंबर नव्हताच.
आईचेच दोन मिसकॉल होते. आता एवढ्या पहाटे कशाला आईने फोन केला असेल, याचा विचार त्याला स्वस्थ बसू देईना. काही अघटित तर घडलं नसेल ना?. त्यानं घाईघाईनं फोन केला. पण लागला नाही. आता त्याची अस्वस्थता प्रचंड वाढली. आई सहसा रात्री, पहाटे फोन करत नाही हे त्याला माहीत होतं. अनंतानं दंगाच जास्त केला तरच ती फोन करते. आजही एवढ्या पहाटे फोन करावा लागला याचा अर्थच काही तरी नक्‍की घडले असणार, असं त्याचं मन सांगत होतं, किंवा नेहमीप्रमाणे अनंतानं दंगा केला असेल आणि आईनं दटविण्यासाठी फोन लावला असणार, असंही वाटून गेलं. त्याला काही कळेना. शेवटी आईच्या फोनवर रिंग वाजली.
आईनंच फोन उचलला. हॅलो म्हटल्यावर ती एवढंच "म्हणाली... अनंता...'
याला काही कळेना, अनंताला काय झालं...? त्यानं दोनदा विचारलं. पण आई काही बोलली नाही. आता त्याचा बांध सुटायला लागला.
आईच्या "तुम्ही या इकडे' या सांगण्यातला त्याला अर्थ कळला. अनंताच्याच बाबतीत काहीतरी बरं-वाईट झालं असणार... नेहमीप्रमाणे त्यानं दंगा केला असता तर आईनं फोनवरच सांगितलं असतं. तिला आता त्याचं काही वाटत नाही. तीही या गोष्टींना सरावली आहे.

-------

समोरचा ट्रकवाला उगाचच हळू चालला आहे असं त्याला वाटू लागलं. त्यानं दोनदा कर्कशपणे हॉर्न वाजविला. तो बाजूला झाला. यानं ऍक्‍सिलेटरवरचा पाय आणखी जोरात दाबला. आता आई एकटी काय करत असेल? अनंता बरा असेल ना? याचा विचार करून करून त्याचं डोकं भंडावून गेलं होतं. दोन तासाचं अंतरही त्याला आता हजारो मैलांचं वाटू लागलं होतं. तो स्वतःशीच चिडत होता. वैतागत होता. रिकाम्या रस्त्याचाही त्याला राग येत होता. त्याची बायको गप्पपणे त्याच्या शेजारी बसली होती. त्याची होणारी तगमग ती बघत होती. ऍक्‍सिलेटरवरच्या पायाचा दाब वाढतच होता... अनंताचा चेहरा त्याच्या समोर आला.
बारावीला चांगले मार्क मिळाल्यावर त्याचे झालेले कौतुक... मेडिकलला ऍडमिशन मिळाल्यावर वडिलांनी खास त्याच्यासाठी घेतलेली मोटारसायकल. वडिलांच्या जाण्याने कोलमडून पडलेला... दोन दोन दिवस जेवणही नाकारलेला... डॉक्‍टर झाल्यावर आईनं केलेली नेमप्लेट बघून लाजलेला. साध्या साध्या गोष्टीत आनंद मानायचा. आईच्याच हॉस्पिटलमध्ये त्यानं प्रॅक्‍टिस सुरू केली होती. सगळं कसं चांगलं चाललं होतं आणि...
त्यानं कचकन्‌ ब्रेक दाबायचा प्रयत्न केला; पण समोर आडवं आलेलं कुत्रं त्याच्या गाडीच्या चाकाखाली आलंच. जीवाच्या अकांतानं ओरडत होतं गाडीखाली चिरडलेलं ते कुत्रं. त्यानं आरशातून मागे बघितलं. ते तडफडत तिथेच रस्त्याच्या मध्यभागी बसलं. एवढ्यात पाठीमागून येणारा ट्रक त्याच्या अंगावरून पुढे आला. आता ते मरून गेलं असेल किंवा त्याच्या नरड्यात राहिलेला प्राण बाहेर पडण्यासाठी तडफडत असेल. मग त्या मांसाच्या गोळ्यावरून एक एक करत अनेक वाहने जातील. रस्त्यावरच मग रक्‍त सुकेल आणि मग तिथे कधी काही घडले होते हेच कळणार नाही. त्याला दरदरून घाम फुटला. त्यानं घाम पुसण्याचा प्रयत्न केला. अनंताचा चेहरा त्याला आता आणखी छळू लागला. त्यानं गडबडीने गाडी लावली. दारात फारशी गर्दी नव्हती. सगळे व्यवहार नेहमीसारखेच सुरू होते. त्याच्या जीवात जीव आला. लिफ्ट खाली यायची त्यानं वाट बघितली नाही. पटपट पायऱ्या चढून त्यानं फ्लॅटला जवळ केलं. फ्लॅटच्या दारातही कसलीच गडबड नव्हती. त्यानं बेल वाजवली. आईनंच दार उघडलं.
त्याला बघताच तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. ""अनंता...'' एवढंच ती बोलली आणि त्याच्या छातीवर कोसळली. त्याला कळेना.
आईला त्यानं सावरत विचारलं...
""कुठाय?''
""बाथरुममध्ये... रात्री तीन - साडेतीनपर्यंत नाडी लागत होती, बघ.'' तो धावत बाथरुमध्ये शिरला. पाठोपाठ त्याची बायकोही. अनंताचा तो जडावलेला देह निस्तेज होऊन अस्ताव्यस्त पडला होता. त्याला रडूही येईना. काय होतंय हेच कळत नव्हतं.
""...रात्री एक वाजता बाथरुममध्येच पडला. त्यावेळीच कोमात गेला होता. शेजारच्या दोन-तीन घरांच्या बेल वाजविल्या. त्यांना नेहमीसारखं अनंता आरडाओरडा करत असेल असं वाटलं असणार. त्यामुळे कोणीच दरवाजा उघडला नाही. त्याच्या वाढलेल्या वजनामुळे त्याला उचलून मला आत काही आणता आले नाही. मग मांडीवर डोकं ठेवून सकाळ व्हायची वाट बघू लागले. तीननंतर तर नाडीही लागायची बंद झाली. काय करावे काहीच कळेना. तुला रात्री फोन करावा तर तू गडबडीने यायचास. म्हणून सकाळी फोन केला. या लोकांनी माझ्या लेकाचा जीव घेतला बघ. रात्री कोणी मदत केली असती तर जगला असता.'' आई सांगत होती. रडत होती. त्याच्या कानावर ते शब्द आदळत होते आणि मनात चलबिचल होत होती.

----

बाबा गेल्यानंतर अनंता आपली फारच काळजी करायचा. त्याचा राग यायचा. प्रत्येक गोष्ट त्याला सांगायला लागायची. मग चिडचिड व्हायची. असेच एकदा लिफ्ट सुरू करू नको म्हणून तो खाली उतरला होता. स्वतःला फार शहाणा समजतो, म्हणून लिफ्टचे गिअर सोडले आणि लिफ्ट दाणकन्‌ खाली आदळली. हा खाली बसला होता. पण तरीही लिफ्टची एक कडा त्याच्या डोक्‍याला लागलीच. त्याच्या डोक्‍यावर जो परिणाम झाला तो झालाच. लोकांना वाटलं, अपघात झाला. कोणालाच याच्यावर संशय आला नाही. पण रात्री-अपरात्री त्याला जाग आली की, त्याचं मन खायचं. आपणच त्याच्या या अवस्थेला कारणीभूत आहोत असं वाटून अपराधी वाटायचं. अनंताच्या निस्तेज चेहऱ्याकडे त्याला बघवायचेही नाही. नोकरीनिमित्त गाव सुटलं तसा तो विचार थोडा बाजूला सरला. त्याला त्या मघाशी ठोकरलेल्या कुत्र्याची आठवण झाली. त्यानं ठोकरल्यानंतर त्या कुत्र्याच्या अंगावरून ट्रक गेला होता. ट्रकने थोडाच त्या कुत्र्याचा जीव घेतला होता. तसेच अनंताच्या मृत्यूला आई शेजाऱ्या-पाजाऱ्यांना दोष देत होती. खरा तर त्याचा जीव त्यानेच तर चार वर्षांपूर्वी गिअर सोडविला तेव्हा घेतला होता... 

रविवार, ३० ऑक्टोबर, २०११

उंटाचं पोर...

नदीच्या त्या पुलावरून जाताना त्याला नेहमी तिथं थांबावं वाटायचं. नदीच्या दोन्ही बाजूला पसरलेल्या त्या हिरवळीवर मस्त पडून राहावं, त्या हिरवळीवरून प्रतिबिंबित झालेली उन्हं अंगावर झेलावीत. रात्री तिथून चांदण्यांचा प्रकाश अंगावर ल्यावा, असं काहीबाही त्याला वाटत राहायचं. नदीवरील पुलावरून जाताना त्याची जी स्वप्नं सुरू व्हायची ती ऑफिस येईपर्यंत. स्वप्न बघणं हा त्याचा जणू नित्यक्रमच बनला होता. नदीपेक्षा तिचा किनारा त्याला फार आपला वाटायचा. त्या किनाऱ्यावर बसून दिवस अन्‌ दिवस घालवावा, असं त्याला वाटत राहायचं. पण ही स्वप्नांची माळ ऑफिसच्या दारात येताच विरून जायची. कामाच्या ओझ्याखाली माळेचे मणी पिचून जायचे. पण दुसऱ्या दिवशी परत ते मणी चमकत त्याच्या डोळ्यासमोर यायचे आणि त्यातील धाग्याप्रमाणे तो त्यात गुंगून जायचा. आजही त्यानं पुलावरून जाताना सहज त्या नदीकिनाऱ्याकडं बघितलं आणि त्याला आश्‍चर्य वाटलं. एक उमदा उंट... छे उंटीण असावी ती... तिच्यासोबत एक पिल्लूही होतं. अगदी तिच्यासारखंच... त्या किनाऱ्यावर होती... ती उंटीण कुणाचीही पर्वा न करता त्या कुरणात हिंडत होती. तिचं ते पिल्लू तिच्या मागे मागे करत होतं. त्यांच्या मागे दोन-तीन गाढवं आणि एखाद-दुसरी मेंढी. त्या हिरव्यागार हिरवळीवर मनसोक्‍तपणे चरणारी ती उंटीण, त्या गाढव आणि मेंढ्यांचे जणू नेतृत्वच करीत होती. कळपाच्या प्रमुखाप्रमाणे ती डौलदारपणे, आपल्याच मस्तीत चरत होती. त्यानं गाडी थांबविली आणि त्या उंटीणीला न्याहाळायला सुरवात केली... तपकिरी रंगाचे ते उमदे जनावर एखाद्या राजाच्या सांडणीस्वारांच्या
तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या सैनिकाने प्रेमाने वाढवावे त्याप्रमाणे असावे असे वाटले. तिचे ते भुरभुरीत केस नदीवरून वाहणाऱ्या वाऱ्यांना कुठलीच दाद देत नव्हते. कशाचीच तमा न बाळगता आपल्या ऐटीत ती उंटीण चरत होती आणि तिच्या मागून ते पिल्लू... ती गाढवं... आणि मेंढ्या...
ती उंटीण चरत होती त्याच्या पलीकडेच थोड्या अंतरावर काही माणसांची लगबग चालू होती. गेल्या पावसाळ्यात पुराने खचलेली जमीन भराव टाकून ते ती सपाट करत होते.
मग रोज तो त्या पुलावर थांबून त्या उंटीणीला आणि तिच्या पिलाला निरखायचा. ती उंटीण आणि तिचं ते विजातीय कुटुंब आपल्या मस्तीत त्या कुरणावर ताव मारायचं. ती उंटीण मध्येच आपल्या पिलाला चाटायची... त्याची माया करत राहायची..
आता त्या पलीकडचा भराव टाकून तिथं पालं उभी राहिली होती. कधी कधी तो आता त्या उंटीणीबरोबर त्या पालांकडेही नजर टाकायचा. त्या पालांतून खेळणारी मुलं आणि तेथील माणसांना निरखायचा. खरे तर त्यांच्या त्या मुक्‍त जगण्याचा त्याला हेवा वाटायचा. खास करून त्या पालातील "त्या' माणसाचा. तो त्या उंटीणीप्रमाणेच त्या पालांचा प्रमुख असावा. काळाकुट्ट, पिळदार शरीराचा, त्याच्या दंडावरचा तो काळा दोरा आणि उंटीणीच्या गळ्यातील काळी दोरी यामध्ये त्याला बरेच साम्य दिसायचे. तो पुलावर थांबून त्याला निरखायचा. शहरात फिरतानाही तो कुठे कुठे दिसायचा, कधी गटार खणताना, कधी कुठल्या इमारतीच्या बांधकामावर काम करताना, तर कधी त्या उंटीणीवर पोरांना बसवून फेरफटका मारताना... अलीकडे तो त्याच्याकडे बघतो हे त्यालाही कळले होते. त्यामुळे तोही याच्याकडे बघून ओळखीचा हसायचा, पण दोघांत बोलणं व्हायचं नाही. कधी कधी रात्री ऑफिसमधून परतताना त्याच्या पालाशेजारी लावलेली शेकोटी त्याला दिसायची. त्या शेकोटीभोवती तो आणि त्याची बायको आणि त्याची ती दोन चिल्लीपिल्ली दिसायची. त्या कडाक्‍याच्या थंडीत ती तिथंच झोपलेली असायची. कधी अंगावर पांघरुण असायचे तर कधी तेही नसायचे. तो मात्र रात्रीच्या जागत्यासारखा त्या सगळ्यांसाठी जागा असायचा. ती उंटीण आणि तिचं पिल्लूही तिथेच असायचे... थंडी संपली तसे ते नदीभोवतीचं ते गवतही आता खुरटलं होतं. उन्हाच्या सरळ किरणांना ती उंटीण जुमानायची नाही. खरे तर ती सरळ किरणांना आपल्या तिरप्या मानेवर झेलत जणू आव्हान द्यायची... भर उन्हात काम करताना तिचा मालकही उन्हाला आव्हान द्यायचा. त्याच्या त्या रापलेल्या काळ्या शरीरावर घामाचे थेंब मोत्यांसारखे चमकायचे... आता अलीकडे तो त्याच्याकडे बघायचा. हसायचा. "क्‍या साब' असं बोलायचाही. त्यालाही बरं वाटायचं.
पावसाळा सुरू झाला तसं नदीचं पाणी वाढू लागलं. नदीने आपला विस्तार करायला सुरवात केली. तिथली बरीच पालं उठली होती... फक्‍त त्याचे पाल तिथे तसेच होते... पावसाच्या धारांत पालांचे कापड टिकाव धरत नव्हतं. त्यावरचा प्लास्टिकचा कागद वाऱ्यावर उडून जायचा. तो मालक त्या पालाला ठीक करायचा प्रयत्न करायचा... पण तो कुठे टिकाव धरणार होता... तो आता त्याच्याकडे बघायचा; पण हसायचा नाही. ती उंटीण आणि तिचं ते पिल्लू आता नदीपासून दूर रस्त्याकडेला झाडाचा आडोसा घेत उभे राहिलेले असायचे... तिचे ते विजातीय कुटुंब एक एक करत गायब झालं होतं. बहुतेक मालकाने ते विकले असावे. आता पावसामुळे त्या उंटीणीचे तपकिरी केस काळे पडले होते. त्या उमद्या जनावराला काय करावे तेच कळत नव्हते. पाऊस त्याच्या अंगावर पेलवत नव्हता. जणू पावसाने त्याचे अंग कुजवायला सुरवात केली होती. अंगावर अनेक जखमा झाल्या होत्या. त्याच्याकडे बघवत नव्हते. तिच्या जखमी कासेमुळे पिलाचीही उपासमार होत असावी. पावसाने ते फार बिथरलं होतं. त्या एवढ्याशा जीवाला तो पाऊस सहन होत नव्हता... येणारे-जाणारे रस्त्यात थांबून त्या उंटीणीकडे बघायचे, पिलाबाबत हळहळायचे आणि मालकाला शिव्या घालायचे... पाऊस जोराचा सुरू होता... नदीचे पाणी वाढत होते... एके दिवशी त्या पालाशेजारी कसलीशी गर्दी झाली म्हणून तो पाहायला थांबला... काही प्राणीप्रेमी त्याची ती उंटीण घेऊन चालले होते... तो दयावया करत होता. पाया पडत होता... जगण्याचे तेच एक साधन राहिल्याचे वारंवार सांगत होता. पण ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते... प्राणीप्रेमींपैकी एकाने त्या उंटीणीचे पिल्लू ओढत आणले. त्याने त्याच्यासमोर उभे केले आणि त्याला दोन शिव्या घातल्या.
बघ. या छोट्या जीवाचे हाल काय झाले आहेत... तुम्हाला जनावरं सांभाळता येत नाही तर पाळता कशाला... त्यातील एकाने आणखी शिवी हासडली. तो रडत होता. गयावया करत होता. आता ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. त्यांनी एक मोठा ट्रक आणला.. त्यात त्या उंटीणीला आणि त्या पिलाला घातले. ट्रक गेला, तशी गर्दी ओसरली. पावसाची रिमझीम सुरूच होती. परवाच्या जोराच्या वादळी पावसानं त्याचे ते पाल पार विस्कटून गेलं होतं. तो, त्याची बायको आणि त्याचं ते चार-पाच वर्षांचं पोर त्या गेलेल्या ट्रककडे शून्य नजरेने बघत होते. पुढे जावं. त्याच्या खांद्यावर हात ठेवून धीर द्यावा म्हणून तो पुढे गेला. तो पुढे झाला तशी त्याची बायको पालात शिरली...
त्यानं त्याच्या खांद्यावर हात ठेवला. एवढ्यात त्याच्या डोळ्यातील पाण्याचा लोट बेभानपणे सुटला.
"साब..' एवढाच शब्द त्याला ऐकू आला अणि मग पालाच्या आत गेलेल्या त्याच्या बायकोचा जोराचा हुंदका....
साब ए लोक पुछते है, उस बछडे को देखा क्‍यों नही... परसो रात आयी बाढ में मेरा बच्चा बह गया... पुलीसने कहा यहॉं गैरकानुनी रहते हो! ...किसी से कुछ नही कहना... नही तो जेल में सड जाओगे...
त्याला काही सुचेनासं झालं... इथं उंटाच्या पोरापेक्षा माणसाचं पोर फार स्वस्त झालं होतं...!!

*** आकांक्षा दिवाळी अंकात छापून आलेली लघुकथा***

दोन पत्रं


आता वाहनांची वर्दळ बरीच कमी झाली होती. रात्रीचे 12 वाजून गेले असतील, मघापासून पुलाभोवती फिरणारा तो पुलाखाली आला. पुलाच्या एका खांबाशेजारी एक दगड होता, त्यावर तो रेलून बसला. दिवसभर वणवण करत भटकलेले शरीर थकून गेलं होतं. पण पोटातील भूक डोळ्यातील झोपेला अडवून धरत होती. त्यानं खूप प्रयत्न केला; पण झोप येत नव्हती. डोळ्यासमोरून बायको आणि पोराचा चेहरा जात नव्हता; काय करत असतील... हाच विचार त्याच्या मनात येत होता... कदाचित बायको रडून रडून थकून गेली असेल... बिचारीच्या डोळ्यातील पाणी आटलं असेल पण हुंदका अजून तसाच असेल.... खूप प्रेम करायची...तिच्यामुळेच पूर्णत्व आलं आहे.... पण.... पोराला अजून काही कळत नाही. पण आपला बाबा चार दिवसांपासून घरी का परतला नाही, हा प्रश्‍न त्यालाही पडला असेलच. हा प्रश्‍न विचारून विचारून त्यानं आईला भंडावून सोडलं असेल. त्याला दोघांची काळजी वाटली... त्यांच्या आठवाने त्याचे डोळे भरुन आले...त्याने हलकेच गालावर आलेले थेंब पुसले...

चार दिवसापूर्वी ऑफीसला जातो सांगून तो बाहेर पडला होता. तो अद्याप घरी पतला नव्हता. चार महिन्यापूर्वीच कंपनीने त्याला मंदिच्या कारणावरून काढलं होतं. बायकोला हा धक्‍का सहन होणार नाही... बिचारी फार सोसते आणि आता विचारांनीही खंगायची... लग्नापासून तिच्या अंगाला तसं काही लागलंच नाही...कदाचित मला सोडून जाईल...छे ती सोडून जाण्याचा विचार येताच त्याला कसंतरी झालं... तिच्याशिवाय मी नाही जगू शकत. ती आहे म्हणून मी आहे....वीज चमकावी तसा तो विचार त्याच्या मेंदूतून सरसरला.... त्यामुळे त्यानं ही गोष्ट बायकोला सांगायचं टाळलं.मग तो रोज ऑफीससाठी म्हणून बाहेर पडायचा आणि नोकरी शोधत कंपन्यांची दारं झिजवत राहायचा. दिवस जात होते आणि जमा पुंजी संपत होती. दोन महिने खुळ्या आशेतच गेले. आता त्याला निराशा येऊ लागली होती, पण काहीतरी प्रयत्न केलेच पाहिजेत म्हणून तो रोज घराबाहेर पडायचा आणि रात्री उशिरा परतायचा. पण काही उपयोग व्हायचा नाही.... घरात बायको-पोरापुढे हसताना... त्यांच्याशी गप्पा गोष्टी करताना त्याची नजर चोर बनायची... त्याची बायकोही त्याच्या नजरेत नजर मिसळायला टाळायचीच.... चार दिवसांपूर्वी तो असाच घराबाहेर पडत होता एवढ्यात बायकोचे ते शब्द त्याच्या कानावर पडले.... पोरगं कसला तरी हट्ट करत होतं, त्याची आई त्याला समजावत होती.
आज बाबांचा पगार होणार आहे, ते नक्की आणतील हं !
तिचा तो "नक्‍की' शब्द त्याला दिवसभर टोचत राहीला. संध्याकाळ झाली... मंदिराच्या पायऱ्यांवरुन तो खाली उतरला.... आता घराकडे जायचं तर पोरगं हट्‌ट करणार... त्याला आणि बायकोला समजाविताही येणार नाही....कदाचित आपल्याला नोकरी नाही म्हणून ती सोडूनही जाईल... छे तिने सोडून जाण्याची कल्पनाही त्याला सहन झाली नाही.... त्याला काहीच सुचेना...
तो मटकन खाली बसला... थोडावेळ तिथेच बसून राहिला.... आज घराकडेच जायचं नाही हे त्यानं मनाशी पक्‍क ठरवून टाकलं...मग शहरात फिरत राहिला रात्री एका बसमध्ये चढला कंडक्‍टरने त्याच्याकडे बघून न बघितल्यासारखं केलं.... बस कुठे निघाली हेही त्याला माहित नव्हतं.. एका स्टॉपवर बस थांबली.. सगळे उतरले हाही उतरला... रात्र बरीच झाली होती....मग तो रस्त्यावरुन फिरु लागला.... दिवसभराच्या कंटाळ्याने पाय पुरते थकले होते...त्याची नजर कुठे निवारा मिळतो का याचा शोध घेऊ लागली.... तिथल्याच रस्त्याच्या एका पुलाखाली त्यानं आपलं ठाण मांडलं. आणि तिथे तो झोपून गेला.....
आता गाड्यांचा आवाज पूर्ण मंदावत होता. गेली चार दिवस तो या पुलाच्या आधाराने जगत होता. कपडे आता मळके म्हणण्यापलिकडे गेले होते. दाढी वाढली होती. आणि चपलाचा तुटका बंद त्याच्या भिकारीपणांच्या लक्षणांना आणखी अधोरेखीत करत होता. दोन दिवसापूर्वी सकाळी फिरायला येणाऱ्यापैकी कोणीतरी त्याच्यासमोर शिळी चपाती ठेवली; त्यावेळी तो मनाशीच हसला. दुपारपर्यंत त्यानं त्या चपातीला हात लावला नाही. नंतर मात्र पोटाने मनावर विजय मिळविला.चपातीचा प्रत्येक घास खाताना त्याला प्रचंड वेदना होत होत्या... नंतर तिसऱ्या दिवशी आणि आजही कोणीतरी चपात्या आणून त्याच्यापुढे टाकल्या..... त्याला पहिल्यांदा त्या खाव्यात असं वाटलं पण नंतर त्यानं धीर केला त्यानं हात लावला नाही... दुपारी कधीतरी कुत्री त्याभोवती जमा झालेली त्यानं बघितलं आणि मग तो वेड्यासारखा हसत राहिला....
आता त्याला काही सुचत नव्हतं... कुत्र्याचं जगणं त्याला नकोच होतं....त्यानं खिसा चाचपला.... पेन अजून खिशात होते. त्यानं समोरच्या कचरा कुंडांतील एक कागद उचलला आणि रेल्वे स्टेशनच्या दिशेने चालायला लागला.
दुसऱ्या दिवशी पहाटे रेल्वे पोलिसांना रुळावर एक बॉडी मिळाली आणि खिशात एक पत्र
प्रिय,
रिमा.
आपल्या लग्नाला 3 वर्षे झाली. या तीन वर्षात जेवढं सुख देता येईल तेवढं मी देण्याचा प्रयत्न केला. सप्तपदीची सगळी वचनं मी पाळण्याचा प्रयत्न केला; पण आता ते शक्‍य नाही. तू सोडून जाण्यापेक्षा तू सोडून जाण्याची भीतीच मोठी आहे...ही व्दिधा सहन होत नाही... जगायचं तुझ्याशिवाय ही कल्पनाही सहन होत नाही..... म्हणून मी जगाचा निरोप घेतोय; जमलं तर माफ कर.
तुझाच रघू

पोलिसांनी पत्र वाचलं आणि त्या पत्रावरील पत्ता. त्या पत्त्यावर ते पोचले तर घराला मोठं कूलूप होतं. पोलिसांनी शेजारी चौकशी केली. त्यांना एक पाकिट मिळाल आणि त्यात रघुच्या नावाने एक पत्र


रघु.
आपल्या लग्नाला तीन वर्षे झाली. पण या तीन वर्षात मी तुमची कधीच होऊ शकले नाही... सप्तपदीची वचंन मी पाळू शकले नाही. खरे तर मी हे आधीच सांगायला हवं होतं... मनाविरुद्ध लग्न झालं होतं माझं... मला तुम्हाल धोका द्यायचा नव्हता....त्यामुळे नेटाने तीनवर्षे संसार केला पण आता हि व्दिधा सहन होत नाही... त्यामुळे मी आता सोडून जात आहे कायमचीच.... सोबत पिंटूंला घेऊन जात आहे... जमलं तर माला माफ करा.



*** 27 आक्‍टोबरच्या "ंसकाळ'च्या स्मार्ट सोबतीमध्ये छापून आलेली माझी लघुकथा ***

बुधवार, १४ सप्टेंबर, २०११

स्टेथ्‌स्कोप

पोरीचा फोन होता. तिला तीन हजार रुपये पाहिजे आहेत. ते डॉक्‍टरांच्या गळ्यात नसतं का? तसलं काही तरी घ्यायचं आहे. त्यानं एकदा तिच्याकडे बघितलं आणि तो तिथेच सैंपाकघरात केलेल्या मोरीत पाय धुवायला गेला.
रात्रभर झोप लागली नव्हतीच. वॉचमन म्हणून काम करत असला, तरी रात्री उशिरा एखादी झोप मिळायची. तेवढंच बरं वाटायचं. पण गेल्या काही दिवसांपासून ही झोप पण पार उडाली होती. त्या प्रसंगानंतर तर ती मिळणे शक्‍यच नव्हती. आता शाळेत दिवसभर काम करायला लागणार. मुख्याध्यापक आज नसले तर बरं होईल, थोडं डोकं तरी टेकता येईल, असा विचार त्याच्या डोक्‍यात येत होता. त्याचे डोळे तारवटले होते. त्यातच बायकोची बडबड.
गेल्याच महिन्यात सहा हजार दिले होते ना?
ते होस्टेलचं बिल भागवलं. आता हे पैसे त्या स्टेथ्‌स्कोप का काय म्हणतात, त्यासाठी आहे. मी काय म्हणतेय, उद्या पैसे पाठवायलाच हवेत.'' पोरीचे मास्तरांनी वर्गात यायचं नाही, म्हणून सांगितलं आहे. तीनं चार दिवसांपूर्वीच सांगितले होते; पण मी मुद्दामच सांगितले नव्हतं.
आता यावर त्याला बायकोचा रागच आला. आधीच सांगितलं असतं तर काय तरी तजवीज करता आली नसती का? आता उद्या लगेच पैसे कोठून आणायचे.
पण तो काही बोलला नाही. आतापर्यंत किती पैसे दिले. शाळेतल्या शिपायाला पगार तो केवढासा; पण पोरीला डॉक्‍टर करण्यासाठी त्यानं कितीही कष्ट उपसायचे ठरवले होते. प्रॉव्हिडंड फंड तर तिच्या बारावीच्या आणि प्रवेश परीक्षेच्या क्‍लासलाच संपला होता. बाकी कर्जाची मर्यादा केव्हाच उलटली होती. लोकांसमोर किती हात पसरायचा, म्हणून त्यानं रात्री वॉचमन म्हणून काम करायला सुरवात केली. मोठ्या बिल्डींगची वॉचमनगिरी असल्याने त्याची सुरूवातील काही महिने झोपही व्हायची. पोरीचा दर महिन्याचा खर्च भागायचा. दुसऱ्या पोराचा शिक्षणाचा खर्च भागायाचा. त्याचं ठीक चाललं होतं. पण आता पोरीचा खर्च दिवसेंनदिवस वाढत चालला होता. त्यातच बिल्डींगमध्ये झोपताही येत नव्हतं. रात्र-रात्र जागून त्याची तब्येत पुरती ढासळली होती. शाळेत काही काम सांगितलं की तिथेही चुका व्हायच्या, मुख्याध्यापक ताडताड बोलायचे; पण पोरीला डॉक्‍टर करायचंच हा त्याचा हट्‌ट मात्र कायम होता.
त्यानं बायकोकडे बघितलं. तिच्या बापाने दिलेली चार टिकल्यांची माळ त्यानं केव्हाच विकली होती. गळ्यातील खोट्या मंगळसुत्राला बाजारात चार आणेसुद्धा कोणी देणार नव्हतं; पण पोरीला पैसे तर पाठवायला हवेच. बिल्डींगच्या सोसायटीकडून गेल्याच महिन्यात दोन महिन्याचा ऍडव्हान्स घेतला होता. त्यामुळे तिथेही कोणी पैसे देणार नव्हते. शाळेतल्या प्रत्येक शिक्षकाचे देणे होते, सगळे दरवाजे बंद होते. आता काय करायचे त्याला प्रश्‍न पडला. त्यातच रात्रीचा तो प्रसंग त्याला आणखी बेचैन करत होता. काय करायचे त्याला कळत नव्हते. डोकं फार बधीर झालं होतं.
तो तसाच शाळेत गेला. रात्रीच्या त्या प्रसंगानंतर तर त्याला स्वतःचीच लाज वाटायला लागली. काय करावे काहीच कळत नव्हतं. दिवसभर तो तीन हजारांचा आकडा त्याच्या डोळ्यासमोरून हलत नव्हता. पैसे कसे उभे करायचे. कोणाकडे मागायचे. आणखी काही काम करता येईल का? त्यानं मेंदूची पेशी आणि पेशी झिजवली. पण हातात काहीच लागलं नाही.
शाळा सुटल्याची घंटा त्यानंच वाजवली. घंटेवर दिलेल्या प्रत्येक ठोक्‍यासरशी त्याच्या डोक्‍यात विचारचक्र सुरू झालं. त्यानं निश्‍चय केला. पोरीला डॉक्‍टर करायचंच. काही झालं तरी डॉक्‍टर करायचं. कितीही पैसे लागोत.. कितीही... यातना सहन कराव्या लागोत.
तो घरात आला.
जरा पडून घेता का? रात्री पण झोप नाही मिळत. बायको म्हणाली.
तो गप्प गप्प होता. त्यानं दाढी केली. रात्रीची वाट बघत शांत बसला....जेवला.. जेवण कसलं ते काहीतरी खायचं म्हणून खाल्लं. डोक्‍याची टोपी, काठीबरोबर आज त्यानं बायकोची साडीही पिशवीत टाकली.
गेल्या कित्येक दिवसांपासून त्या बिल्डींगमधला एक मोठा साहेब त्याला सांगत होता. जवळ आलास तर तीन हजार देईन फक्‍त साडी नेसायची.

शनिवार, २० ऑगस्ट, २०११

काळा

माझ्यातील लेखकावर प्रेम करणाऱ्या एका चाहत्याने काळा या रंगावर गोष्ट लिही असं सांगितलं होतं, ही गोष्ट म्हणून खास आहे.
ं.....
काळा
.........
तिनं डबीतून काजळ काढलं आणि हलकेच बाळाच्या डोळ्यांत घातलं. त्या बाळाच्या गालाचा हळूच पापा घेतला आणि त्याला पाळण्यात झोपवलं. त्यानं मिटलेली मूठ, त्याचं ते इवलंसं नाक, फुगरे गाल, कुरळे केस ती तासन्‌ तास बघत राहायची. त्याच्या इवल्याशा डोक्‍यावरून मायेचा हात फिरवत राहायची. त्या झोपलेल्या सानुल्याला अलगद उचलायची आणि छातीशी धरायची. त्याला कुठे ठेवू, कुठे नको असंच तिला व्हायचं.... लग्नानंतर दहा वर्षांनंतर तर ते जन्माला आलं होतं. या दहा वर्षांत तिनं किती सोसलं होतं. बायकांच्या नजरा टोचायच्या तिला. त्यांचं ते कुजबुजणं असह्य व्हायचं. पहिल्यांदा ती त्याकडे दुर्लक्ष करायची, पण अलीकडे तिला ती असह्य झाली होती. लग्नापूर्वीही तिला अशाच कुजबुजी ऐकायला मिळायच्या.
""तिशी गाठली की, अजून किती दिवस हुंदडायचं. घर बसवायचं नाही का? की पोरं फिरवत बसणार आहे नुसती....
एवढा सुंदरतेचा मिजास कशाला.... बाहेर कमी का बायका सुंदर असतात?
थोडी करायची ऍडजेस्टमेंट... नवऱ्याचा नसला पगार जास्त ;पण हिचा आहेच ना? मग त्यात भागवायचं... लग्नच करायचं नाही, असं सरळ सांगून टाकायचं. कारणं कशाला द्यायची..... अशा कुजबुजी ती ऐकायची. अनेकवेळा तिला ऐकू येईल अशीच कुजबूज व्हायची... तिची आत्या, मावशी, सगळेच यांत सामील असायचे; पण ती
ऐकून न ऐकल्यासारखी करायची. गप्प बसायची. ती खरंच देखणी होती. अगदी गोरीपान, नाक सरळ, केस लांब... पण तिला त्याचं फार कौतुक नव्हतं. लग्न करायचं तर किमान बरोबरीचा तरी हवा.. तिची आई तिच्यासोबत असायची... तिला म्हणायची, तू नको काळजी करू... तिच्या आईनं तिच्यासाठी पारड्यात जोखूनच मुलगा आणला.... लग्न झालं... पहिली दोन-तीन वर्षे खूप चांगली गेली... पण नंतर सुरू झालं मूल पाहिजे... ती गप्प बसायची.. तिच्याबाबतीत काहीबाही बोलणं सुरु असायचं...
काही नाही... पदर उडवत फिरायची सवय लागली आहे... त्यामुळे मूल कशाला?
फिगरची काळजी, बाकी काय कारण असतंय.... बॉसशी लफडं आहे म्हणे, त्यामुळेच तर प्रमोशन मिळालं ना?... ती वैतागायची, नवऱ्याशी भांडायची.. पण तो शांत बसायचा.... कशाला पाहिजे मूल, तुझ्या करिअरला ब्रेक लागेल... तिला नवऱ्याचं म्हणणं पटायचं. ती गप्प बसायची... अलीकडे मात्र ती मुलाबाबत हळवी झाली होती... तिने नवऱ्याच्या मागे धोशा लावला, "मला मूल हवंच.... तिने दोन वर्षे वाट बघितली; पण यश आले नाही; मग तपासण्या झाल्या. सहा वर्षांनी मोठ्या असलेल्या नवऱ्याला तिनं कारण सांगितलं... त्यालाही ते पटलं... मूल हवंच आहे...डॉक्‍टरांनी उपाय सांगितला... नवरा समजूतदार होता... त्यानं पटकन सही केली...
तिच्या सासूला किती मोठा आनंद झाला होता. तिला कुठे, ठेवू कुठे नको असंच केलं. हे नऊ महिन्यांत नवऱ्यानेही किती काळजी घेतली. तिच्या पोटात दुखायला लागलं, नवऱ्याचा जीव कासावीस व्हायला लागला... तिची ती तळमळ त्याला बघवत नव्हती. सासूने देवापुढे दिवा लावला... तिथला अंगारा तिच्या कपाळाला लावला... डॉक्‍टरांनी तिला आत घेईपर्यंत तिचा नवरा तळमळत होता... त्या खोलीच्या बाहेरही तो येरझाऱ्या घालत होता... सकाळी दहापासून येणारा तिचा आतला ओरडण्याचा आवाज दुपारी तीनच्या दरम्यान थांबला....
नर्स धावत बाहेर आली... मुलगा झाला...बाळ फारच पोसवलंय त्यामुळे त्रास झाला बाईंना.... दोघेही आता उत्तम आहेत...
नर्सचे शेवटचे वाक्‍य ऐकल्यावर त्याच्या जिवात जीव आला... तो धावत आत गेला.... थकव्याने तिची शुद्ध नव्हती...त्याने तिला बघितले... डोळ्यांच्या कडा पुसल्या... नर्सने त्याच्या हातात ते कपड्यात गुंडाळलेलं बाळ दिलं... त्यानं एकदा बाळाकडं बघितलं आणि एकदा तिच्याकडं.... त्याने नर्सला जोरात हाक मारली... नर्स आज आणखी कोणाला बाळ झालं आहे का?... चुकून बाळ बदललंय का?...
नर्सने नकारार्थी मान डोलवली... आता त्या खोलीत तो.. ती... आणि ते तासभर वयाचं पोर एवढेच काय ते होती.... त्याला ते पोर हातात धरवेना... तो काळामिट्ट कुरळ्या केसांचा मांसाचा दोन-अडीच किलोचा गोळा त्याला शंभर किलोचा वाटायला लागला.... त्याला ते बाळ धरवेना... त्याची आई सोबतच होती... तिनं बाळाकडे बघितलं न बघितल्यासारखं केलं.. तिच्या आईकडे बाळ देऊन दोघे खोलीच्या बाहेर आले... त्याच्या डोळ्यासमोरून तो काळा गोळा सरकत नव्हताच. काहीही सांगितले तरी कळणार होतेच....तो अस्वस्थ झाला... त्याने घर गाठले... त्याची आईही होती समोर....
दुसऱ्या दिवशी तो आला.... त्यानं तिला बघून हसायचा प्रयत्न केला... तिनं बाळाला छातीला लावलं होतं... तो गप्प बसला; मग हळूच बोलला... तुला काय वाटतं....
ती म्हणाली, कशाबद्दल...
बाळाला घरला घेऊन जाण्याबद्दल.... लोकांना सगळं कळेल...
ती गप्प बसली... तो तिला समजावत राहिला... ती काहीच बोलली नाही.... तो जायला निघाला, त्यावेळी ती इतकंच बोलली...
ते बाळ तुमचं नाही म्हणून तुम्हाला त्याचं काही वाटणार नाही... पण ते माझं आहे... मी त्याला सांभाळेन... तुमची साथ असली तर तुमच्यासोबत नाही तर एकटी.... त्या काळ्या कुरळ्या केसांतून फुन्हा हात फिरवताना तिला उगाच त्या बाळाचा अभिमान वाटला....

मंगळवार, २६ जुलै, २०११

पैंजण

तिनं कपाटातून जुनं पैंजण काढलं आणि तिच्यासमोर ठेवलं.
हं! घाल हे..
तिची सोळा - सतरा वर्षांची पोरगी पसरली होती.
तिच्या पसरलेल्या पायावर तिनं जोरात चापट मारली...
""हे असं फतकाल मांडून बसायचं न्हाई, असं कितीयेळा सांगिटलंय. कवा अक्‍कल येणार हाय देवास ठावूक. बारकी ऱ्हायली न्हाईस आता. '' तिच्या आईचा तोंडाचा पट्‌टा चालू झाला.
तिनं पाय मागं घेतले, पण तिचं आईकडं लक्षच नव्हतं. गेल्या काही दिवसांपासून ती सारखी चिडचिड करत होती. रोज रोज सूचनांचे डोस पाजायची. त्यामुळं तिला त्यात नवीन काहीच वाटलं नाही. आईकडं दुर्लक्ष करत ती टी.व्ही.चे चॅनेल बदलू लागली.
तिच्या आईचा तोंडाचा पट्‌टा सुरूच होता. तिचं सगळं लक्ष टीव्हीकडेच होतं.
मी काय म्हणते आहे...
आपल्या बोलण्याकडं पोरीचं लक्षच नाही कळल्यावर तिची चिडचिड आणखी वाढली. तिनं सरळ टीव्ही बंद केला आणि तिच्यासमोर टाकलेलं पैंजण तिच्या हातात दिलं.
"घाल हे....'
"अगं हे ल्हान व्हईल. सातवीत असताना घेतलं होतंस.'
"काय होत न्हाई एका दिसानं.. माघारी आल्यावर काढून टाक..
पण आपण जातोय कुठं....
तुला दाखवाय न्यायची हाय!
गेल्या चार-पाच दिवसांपासून आईची धावपळ अशाच काही कामासाठी चाललीय हे तिला कळत होतं. पण तिने स्पष्ट काही सांगितलं नव्हतं. त्यामुळे विचारायचा प्रश्‍न नव्हता. आता मात्र आईनं सरळ दाखवायचीच भाषा केल्याने ती जाम पिसाळलीच. मला काही लगीनबिगीन नाही करायचं, आताशी कुठं कॉलेजात जायाला लागलीय. धाव्हीला चांगलं मार्क मिळाल्यावर तूच म्हणाली व्हतीस की, तू शिक, तू मोठी झाल्याबिगर तुझं लगीन करणार न्हाई म्हणून..
म्हणले व्हते... पण आताचं आयकायचं... निमूटपणे ते पैंजण घाल पायात... बोडक्‍या पायांनी जायाचं न्हाई.
तिला माहीत होतं, आईला आता विरोध केला तर ती मारायला कमी करणार नाही. आज तिचा चुलताही घरात नव्हता. ज्याच्याजवळ तिला तक्रार करता आली असती. आज जाऊन येऊ या. एवढं काय तातडीनं लगीन लावीत न्हाई, असा विचार करून ती उठली. तिनं ते पैंजण घेतलं आणि पायात घालू लागली.
आये, येत न्हाई गं...
अगं फासकी मोठी कर म्हंजे ईल.... तिच्या आईनं पर्याय सुचविला.
तिनं फासकी मोठी केली आणि ते पैंजण ओढून पायात घातलं....तरी काही ते येईना..
तिची आई बघत होती.. तिनं चटकन पुढे होऊन ती फासकी मोठी केली आणि जोरात दाबली. ते पैंजण ओढून ताणून तिच्या पायात बसले, पण त्याचे ते टोक तिच्या पायात रुतलं. ती जोरात ओरडली, पण त्याचा तिच्या आईवर परिणाम झाला नाही. तिनं तशीच कपाटातील तिची नवी कोरी साडी काढली आणि तिच्यासमोर टाकली.
नेस ही.... चल... पावणे धा ची गाडी हाय.... मामा बी तिथंच येणार हाय.
तिच्या पायातल्या पैंजणाची फासकी रुतत होती, पण तिला माहीत होतं, आई माया करायला लागली, की गाय होते, नाही तर कडकलक्ष्मीचा अवतार. झिंज्या पकडून बुकलून काढील. त्यामुळं तिनं साडी उचलली. पायात पैंजण फारच रुतत होतं.
"यंदा अकरावीला हाय', मुलगी काय करते, या मुलाच्या बापाने विचारलेल्या प्रश्‍नावर मामानेच उत्तर दिले.
मग शिकवा की तिला.. लवकर का लगीन करतायसा? मुलाच्या बापाने तिच्याकडे एकदा बघितलं आणि मामाला प्रश्‍न केला.
मामा काही बोलला नाही.
मुलगा तरतरीत होता. तो काही बोलला नाही. पण त्याला ही मुलगी पसंत पडलेली त्याच्या नजरेत दिसत होते.
आमचा मुलगा दहावी नापास हाय, काय? घरची पाच एकर शेती हाय, ती त्योच कसतोय. खायाला ल्यायला कमी न्हाई, पर थेरं इथं चालणार न्हायती. राबायला पाहिजे तवा खायला मिळंल.
तिची आई मुलाच्या बापाच्या प्रत्येक वाक्‍यावर डोके हलवत होती.
मग हातावर पाणी टाकू आजच....
व्हंय पर पोरीला आठरावं बी लागल्यालं न्हाई ! कायद्याचं काय? पोराकडच्या एकाने शंका विचारली.
तेची काळजी तुमी करू नका. शाळेचा मास्तर हाय माझ्या वळखीचा... वरीस दीड वरीस वाढवून दिल.
मग घालायचं का आज हातावर पाणी.. मुलाच्या बापानं आग्रह सोडला नाही.
तिची आई गडबडली.... तिनं मामाला खुणावलं... कोपऱ्यात नेलं....
ही माणसं जरा जास्तच घाई करत्यात .... मामानं तोंडावर बोट ठेवलं...
अगं पोराची आई जाऊन वरीस झाले... हाताची गाठ तोंडाशी पडत न्हाई....पोरीचं कल्याण व्हील...
पर समदं जमायचं कसं.. माझ्या अंगावरच्या ह्या चार टिकल्याशिवाय काई न्हाई....
तू नग काळजी करू, मी हाय.... पण पोरीला इचारायला पाहिजे....
तिनं हाक मारली... ती आली.... काय गं... पोरगा कसा हाय!
आये, शिकलेला न्हाई...
मग काय धोंडा न्हाई, पाच एकर शेती हाय....एकर इकला तरी लाखाची मालकीण व्हशील.
ती काही बोलली न्हाई.... पोरगं दिसायला चांगलंच होतं.. घरदारपण बरं दिसत होतं.. नकार द्यायला तिच्याजवळ दुसरं कारण नव्हतं..
चला तर मग हातावर पाणी टाकू.... मामानं सांगितलं.....
लग्नन झालं... लग्नाच्या फेऱ्यात पोरीच्या पायातील पैंजण लोकांच्या नजरेत आलं.. रुतलेल्या फासकीतून रक्‍त येत होतं.... पण कोणी बोललं नाही..
पोरीचं लग्न करून ती परतली.... पोरीचा चुलता भलताच बिघडला होता...पण बोलला नाही...
तिच्या शेजारीनं विषय काढलाच... का गं एवढी घाई केलीस... शिकली असती पोरगी....तिच्या शेजारच्या चार-पाच बायांनी तोच प्रश्‍न विचारला...
तिला काही सुचेना.... सकाळपासनं तिनं धरलेला बांध सुटला....
मला नगो व्हती व्हंय माजी पोर.... अजून न्हाणपण पण सरलं न्हाई तिचं.... पर काय करणार.... पाच दिस झालं तेला, ह्यो रेडा मला म्हणतोय कसा... पोरगी तुजी ताजीतवानी दिसतीया.... तवापसनं डोळ्याला डोळा लागला न्हाई माजा...
तिच्या आईचा हुंदका सुटला.... पोरीच्या चुलत्याची वाईट नजर व्हती....राक्षसानं मला खाल्ली आता हिला खायचा....
पोरीच्या पायात रुतलेल्या पैंजणापेक्षा तिच्या आईची कळ जरा जास्त मोठी होती.....

सोमवार, ६ जून, २०११

मोगऱ्याची वेणी

केवढयाला रे, हे केवड्याचे पान.. सोळा, सतरा वर्षांच्या त्या मुलीने त्याच्याकडे बघत, थोडं मुरकंतच विचारलं.
बारा रुपये! त्याने थंडपणे उत्तर दिलं. त्याला माहित होतं की बारा रुपये म्हणून सांगितलं की पुढची बाई दहा रुपयाला मागते. थोडा मोलभाव केला की दहा रुपयाला ते पान विकलं जायचं. पण तीनं ना पर्समध्ये हात घातला, ना मोलभाव केला, जशी आली तशी ती निघून मंदिरात शिरली.
त्याला क्षणभर वाटलं पुढे जावं... दहा रुपयाला देईन असं सांगाव पण त्याचा धीर झाला नाही. कदाचीत ती जर त्याच्या वयाचीच नसती तर तो पुढे नक्‍की गेला असता. पण ती त्याच्याच वयाची असल्याने तो संकोचला. जाऊ देत, म्हणून तो मागे सरला...
काय रे! काल तू केवड्याची पाने विकत होतास ना? मग आज तू या मोगऱ्याच्या वेण्या का आणल्या आहेस... कालची तीच ती होती. काल घातलेल्या निळ्या ड्रेसपेक्षा आज हिने घातलेला लाल रंगाचा ड्रेस खूप छान शोभतो. त्याच्या मनात एक विचार येऊन गेला..
केवड्याची पाने मिळाली नाहीत. विकायला काहीतरी पाहिजे ना? म्हणून मग मोगऱ्याच्या वेण्या आणल्या आहेत. घ्या ना वेण्या! दहा रुपयाला दोन दिल्या... त्यानं विनंती केली.
तिनं वेण्या उचलल्या... त्या मोगऱ्याचा गंध श्‍वास भरुन घेतला. केवड्याचा सुगंध, मोगऱ्याला नाही रे! मला केवडा हवा होता. ती एवढीच बोलली आणि निघून गेली.
तिसऱ्या दिवशी तो माळ्याशी भांडला, पण केवडा मिळाला नाही. आज कधी नव्हे तो त्याला केवडा हवा होता. नाही तर वेण्या संपल्या की याला केवडा मिळायचा...
आज ती परत आली आणि परत तिने केवडाच मागितला तर.. आज तिनं येऊच नये... उद्या तिच्यासाठी केवडा आणीन अगदी कुठूनही आणीन, पण आज तिनं येऊ नये...असं त्याला वाटत होतं... पण कालच्यावेळीच ती आली.
ती सरळ त्याच्यासमोरच आली... तीनं पुन्हा त्याच्याकडे बघितल... त्याच्या परडीतील मोगऱ्याच्या वेण्या इकडे तिकडे केल्या.
""केवडा नाही ना आणलास तू''
नाही... नाराजीनंच त्याने मान हलविली.
हातातील वेण्या तिथेच ठेवून ती निघायला लागली, तसा तो पुढे झाला.
"" या वेण्या घ्या... बघा किती ताजा मोगरा आहे...पैसे नका देऊ....''
त्याने हातात एक वेणी उचलली. त्या पांढऱ्या शुभ्र कळ्यांच्या पार्श्‍वभूमिवरचा तिचा सावळा चेहरा आणखी तजेलदार दिसत होता. क्षणभर तीही भांबावली, पण लगेच सावरली...
""नको! मला केवडाच हवा.''
तिच्या उत्तराने तो हिरमुसा झाला. मागे सरला.... पुढच्या दोन दिवसांत त्याला केवडा मिळाला नाही, मिळालेले गजरेही त्याने घेतले नाहीत... तो रस्त्यावर आलाच नाही.... नंतर तो कितीतरी दिवस त्याच रस्त्यावर यायचा. केवडा घेऊन .. पण ती यायची नाही... तो गजरे विकायचा... पण त्याच्या परडीत एक केवड्याचे पान मात्र तसेच सूकुन जायचे... कोणी त्याला विचारलेच तर केवडा विकायला नाही एवढेच म्हणायचा... कधीतरी ती येईल म्हणून तो परडीत नेहमी केवड्याचे एक पान ठेवायचा.... पण ती आली नाही. त्याची नजर तिच्या रस्त्याकडे असायची....दिवसा मागून दिवस सरले....त्याचं कॉलेज संपलं.... तसं त्याचा गजरे विकण्याचा पार्ट टाईम जॉबही सुटला......हातात गाडी आली... कधी तो त्या रस्त्यावर थांबायचा... गाडीच्या काचा खाली करुन तेथील गजरे विकणाऱ्या पोरांकडे बघायचा.... तेथील पोऱ्याकडून केवडा घ्यायचा... त्या केवड्याचा वास त्याच्या केबीनमध्ये दरवळत राहायचा....
आजही तो असाच आपल्या नादात चालला होता... त्याची गाडी मंदिरासमोर थांबली.... एक पोरगं परडी सांभाळत त्याच्यासमोर आलं...
"" केवडा आहे का रे!''
""नाय साहेब! '' त्यानं उत्तर दिलं.... आज माळ्याने केवडा दिला नाही...
तो हसला... पोराला नाराज करायला नको म्हणून त्याने एक छानशी मोगऱ्याची वेणी घेतली आणि तो मंदिराच्या पायऱ्या चढला.... त्यानं देवीला नमस्कार केला आणि तो परतला... चप्पल घालायला तो सहज वाकला, तर एक केवड्याचे पान त्याच्या चपलासमोर पडलं होतं. त्यानं ते उचललं... समोर ती तीच होती... काळ लोटला असला तरी त्यानं तिला कधीच ओळखले होते... बहुतेक तिनेही ते ओळखले असावं... ती हलकेच पुढे आली... तिने त्याच्या हातातील ते केवड्याचे पान हलकेच घेतले... त्याच्यासमोरच ते केसांत माळले.... त्याने मघाशी घेतलेली वेणी तिच्या समोर केली.... आज तिने ती वेणीही घेतली....