आज काल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आज काल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ८ जानेवारी, २०१२

मोगॅम्बो ना खुश (कुश) हुआ

नागपूरमधल्या आपल्या निवासस्थानी आपल्या खुर्चीवर (सर्वसामान्य याला कोच म्हणतात) बसलेल्या राष्ट्रीय अध्यक्षांचा मोबाईल फोन वाजला. आता या क्षणी कोणाचा फोन म्हणून त्यांनी मोबाईलच्या स्क्रीनवर बघितले. डोके जेवढे चालविता येते, तेवढे चालवून बघितले; पण नंबर काही लक्षात येईना. मोहनदर्शन चारच दिवसांपूर्वी झाले होते, इतक्‍यात तिकडून बोलवणे येणे शक्‍य नाही, याची त्यांना खात्री होती. वरळीपासून परळीपर्यंत आता चिंता नव्हती, मग फोन कुठून असणार.
राष्ट्रीय अध्यक्षांना उगाचच राग आला. अरे, या मोबाईलवरून काहीच कळत नाही, फोन कुठला ते. लॅंडलाईन असेल तर नेमके कळते तरी की, फोन कुठल्या राज्यातील, कुठल्या गावातील. अध्यक्षांनी स्वतःच त्रागा करून घेतला. फोन उचलावा तरी पंचाईत आणि न उचलावा तरी. न जाणो, उत्तर प्रदेशमधील मंत्र्याबाबतच्या घोटाळ्याची बातमी द्यायला कोणी फोन केला असेल तर. पण तरीही त्याचा आता आपल्याला उपयोग नाही. आपल्याला काही त्याचा फार पाठपुरावा करायला जमणार नाही. पण आपले एक खंदे कार्यकर्ते आहेत की. एकदा का माहिती त्यांना मिळाली, की मंत्र्यांच्या डोक्‍यावरचे "किरीट' कसे खाली खेचायचे हे त्यांना चांगलेच कळते. त्यांना परस्पर हा नंबर द्यावा. पण न जाणो, आपल्यासाठी काही तरी असेल तर... सलग सातवा मिस कॉल पडल्यावर मग मात्र अध्यक्षांची चलबिचल झाली. आता फोन उचलायलाच हवा. या लोकांना कोण देतं हा पर्सनल नंबर कोण जाणे? राष्ट्रीय अध्यक्ष स्वतःशीच पुटपुटले आणि त्यांनी फोन कानाला लावला.
""नमस्कार साहेब, मी आपला... हा अमुक तमूक...''
""बोला काय काम होतं...?'' अध्यक्षांनी नाराजीचा सूर कायम ठेवला.
""काही नाही.. तुमची आठवण झाली. बाकी तुमचे आरोग्य मात्र आता चांगलेच दिसते आहे. जरा हलकेही वाटायला लागला आहात.''
राष्ट्रीय अध्यक्षांना ही स्तुती प्रचंड आवडली. त्यांनी आपले बाहेर आलेले पोट थोडे आणखी आत घेतले. कसंचं कसंचं ... भाव चेहऱ्यावर आणत आपल्या तलवारकट मिशांतून स्मित केलं; पण फोनवरून त्या माणसाला ते कळलं नाही.
साहेब चुकून रागावले की काय, असे वाटून त्यानं सरळ सांगून टाकलं.
""साहेब, आरोग्य योजनेबद्दल नाही बोलत, तर तुमच्या आरोग्याबद्दल बोलतो आहे.''
आरोग्य योजनेबद्दल... काय ही काय भानगड आहे. अध्यक्षांना नेमके कळेना, हा काय बोलतो आहे.
""काही नाही साहेब, परवाच्या त्या पक्षप्रवेशाने पक्षातील आरोग्य बिघडले असल्याची चर्चा सगळीकडे घडते आहे. आपल्याच कार्यकर्त्यांनी ज्यांच्या डोक्‍यावरचा "किरीट' उतरवला, त्यांनाच तुम्ही कमळाचा मुकुट घातला. लोकांची "आड'"वाणी'ही आता सरळ बोलू लागली आहे. ते मोठे साहेब यात्रा काढून आरोग्य सुधारण्याच्या गोष्टी करताहेत आणि तुम्ही येईल त्याला मुकुट घालताहात.''
""हेऽऽ हेऽऽ सांगण्यासाठी मला तू फोन केलास... या वेळी...?'' राष्ट्रीय अध्यक्षांनी घड्याळाकडे बघत पुन्हा दटावणीच्याच सुरात प्रश्‍न केला.
""नाही साहेब...'' फोनवरचा माणूस अगदी लीन होऊन म्हणाला. ""तिकडे कितीही चर्चा झाल्या तरी त्याचा आपल्याला कायपण तोटा नाही. पण "रेशीमबागेत' याबाबत चर्चा आहे.''
राष्ट्रीय अध्यक्ष ताडकन्‌ जाग्यावरून उठले. (खुर्चीला काही क्षण का होईना बरे वाटले) पुन्हा खाली बसले. ""कोण आहे तिकडे...?'' एक स्वयंसेवक पुढे झाला.
""काय रे काय? शाखेत माझ्याबद्दल काही चर्चा-बिर्चा असतात का?''
""नाही साहेब? पण एक डायलॉग मात्र नागपुरात आता प्रत्येक स्वयंसेवकाच्या तोंडात आहे.''
"काय?''
""मोगॅम्बो ना खुश (कुश) हुआ''

रविवार, २० नोव्हेंबर, २०११

चर्चा में युवराज

युवराजांनी टीव्ही बंद केला, रिमोट फेकून दिला आणि जोरात हाक मारली. चापलुसी करणाऱ्यांपैकी एक दोन जण धावत युवराजांच्या शयनकक्षात आले. युवराज अस्वस्थपणे येरझाऱ्या मारत होते. हातोपे मागे सारत होते, पुढे घेत होते. त्यांच्या गालावरची खळी आणखी खोल झाल्यासारखी दिसत होती. चापलुसी करणाऱ्यांना समजेना युवराज एवढे अस्वस्थ का आहेत? एकाने धीर केला आणि विचारलेच, साहेब काय झालं आहे? एवढी चिंता कशाची...? युवराजांनी एकदा चापलुसी करणाऱ्याकडे बघितलं.
अरे ! हे राज ठाकरे कोण? केवढा आहे त्यांचा पक्ष? किती राज्यात सत्ता आहे, किती आमदार, खासदार आहेत... बोला लवकर बोला...
साहेब फारसे काही नाही... महाराष्ट्र प्रदेशी 13 आमदार असलेला छोटा पक्ष आहे. आपल्या तुलनेत तर काहीच नाही. कुठे आपला पक्ष आणि कुठे राज ठाकरे यांचा पक्ष... चापलुसी करणारे जशी-जशी माहिती सांगत होते तसे युवराज संतापत होते...
अरे! एवढासा पक्ष आणि त्यांच्या नेत्याच्या भाषणाचे लाईव्ह प्रक्षेपण आणि आमची केंद्रात सत्ता, 9-10 राज्यांत सत्ता, तरी कोणी आमचे लाईव्ह भाषण दाखवत नाही, म्हणजे काय? आमच्या भाषणाची बातमी दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात आतल्या पानात कुठेतरी आणि राज ठाकरे काहीही बोलायला लागले की लाईव्ह. हे काही बरोबर नाही. आपलंही भाषण लाईव्ह झालं पाहिजे शोधा काय जादू असते त्यांच्या भाषणात, ज्यामुळे राज ठाकरेंचे भाषण लाईव्ह दाखविले जाते... शोधा...
चापलुसी करणाऱ्यापैकी दुसरा एक जण पुढे झाला, साहेब राज ठाकरेंसारखे आपले भाषण लाईव्ह व्हायचे असेल तर भाषण चर्चेत यायला हवे... काही तरी असं बोललं पाहिजे, की सगळ्या वर्तमानपत्रात त्याची मेन बातमी झाली पाहिजे... पुढचे चार-पाच दिवस सगळ्या वाहिन्यांवर त्याचीच चर्चा झाली पाहिजे... विरोधी पक्षाने हिरीरीने पुढे येत त्यावर बोलले पाहिजे.
युवराजांना स्वप्ने पडू लागली... सगळ्या चॅनेलवर आपलीच चर्चा... सगळे आपल्याविषयीच बोलताहेत... युवराजांनी सचिवाला भाषण लिहायला सांगितले, ""यावेळी असे भाषण लिहा, की साऱ्या वर्तमानपत्रांची मुख्य बातमी झाली पाहिजे, चार दिवस आपलीच चर्चा झाली पाहिजे.'' सचिवांनी भाषण लिहिले... खूप मोठे भाषण लिहिले... युवराजांनी एकदा वाचले आणि फाडून टाकले... यापेक्षा जोरकस लिहा... चर्चा लक्षात ठेवा... चर्चा झाली पाहिजे... सचिवाने पुन्हा भाषण लिहिले. युवराजांनी पुन्हा भाषण फाडून टाकले... सचिवाने तिसऱ्यांदा भाषण लिहिले. युवराजांना यावेळी भाषण आवडले नाही त्यांनी स्वतः पेन हातात घेतलं आणि एका टाकात भाषण लिहून टाकलं... आता हे भाषण केलं, की आपलीच चर्चा... केवळ उत्तर प्रदेशी नाही तर महाराष्ट्रदेशीही आपलीच चर्चा... युवराज आपल्याच स्वप्नात रंगून गेले.
भाषणाचा दिवस उजाडला... युवराज स्टेजवर माईकपुढे उभे राहिले, चापलुसी करणाऱ्या काहींनी घोषणा द्यायला सुरवात केली, युवराजांनी हातोपे वर केले आणि भाषण द्यायला सुरवात केली लोक बावरून बसले... युवराज बोलत सुटले... जोरकसपणे हातवारे करीत राहिले... भाषण संपवून युवराज खुर्चीवर येऊन बसले, कसं झालं भाषण... जोरकस झालं ना...? स्वतःवर खुश होत युवराजांनी विचारलं... चापलुसी करणाऱ्याने मान डोलावली युवराजांना घाई झाली हे टीव्हीवाले काय चर्चा करताहेत... त्यावर आपले लोक काय प्रतिक्रिया देत आहेत... युवराज घाई-घाईने घरी आले टीव्ही लावला... सटासट चॅनेल सर्फ केलं सगळीकडे युवराजच दिसत होते... युवराजांनी एका चॅनेलवर रिमोट स्थिर ठेवला... चर्चा में युवराज .. लोकांच्या भावनेला ठेच... लोकांची युवराजांनी माफी मागावी... युवराजांना कळेना आपलं काय चुकलं... त्यांच्या जोरकस भाषणाची चिरफाड सुरू होती आणि त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांकडून त्याबाबत खुलासा मागितला जात होता... पक्षाच्या नेत्यांना उत्तर देताना कठीण जात होतं... युवराजांच्या भाषणाने पक्षाला फायदा होण्याऐवजी तोटाच होण्याची शक्‍यता जास्त होती... युवराज बावरले... त्यांनी सचिवाला विचारलं, ठाकरे भाषण करतात त्यावेळी त्यांच्यावर स्तुतिसुमने आणि आपण बोललो की जाब, असं का? सचिव हळूच कानात बोलला... साहेब विरोधक खरं बोलण्यासाठी भाषण करतात आणि सत्ताधाऱ्यांना खरं लपवावं लागतं...

****"सकाळ'मध्ये 20 नोव्हेंबरला छापून आलेला माझाच लेख****




रविवार, १३ नोव्हेंबर, २०११

डबल बेल...

बाईंनी पुन्हा घड्याळात बघितलं. आपल्या विस्कटलेल्या केसांवरून हात फिरवला, पण केस काही बसले नाहीत... साडी जरा सारकी-वारकी करायचा प्रयत्न केला, आणि बाई बसमध्ये चढल्या. कंडक्‍टरने डबल बेल मारली आणि जोरात घोषणा केली, "इथून पुढच्या प्रवासाला आता आणखी दोन रुपये तिकीटवाढ करण्यात आली आहे.' तिकीट दरवाढ ऐकल्यावर बसमध्ये कुजबूज सुरू झाली... हा अन्याय आहे? मागच्याच थांब्यावर तिकीट दरवाढ करण्यात आली होती. आता परत दरवाढ... अशक्‍य आहे... आम्ही तिकीट दरवाढ खपवून घेणार नाही, कपाळाला भगव्या पट्ट्या बांधलेल्या काही प्रवाशांनी जोरात घोषणा केली. या प्रवाशांबाबत लांब फटकून राहणाऱ्या काही हिरव्या पट्ट्या बांधलेल्या लोकांनीही अशीच घोषणा केली... बाई सगळं बघत होत्या... समजून घेत होत्या... तिकीट दरवाढीला विरोध करणाऱ्यांबाबत त्यांना आता "ममत्व' वाटू लागले तर... आता या सगळ्याच्या आंदोलनात बाईही पडल्या तर... अवघड होईल म्हणून कंडक्‍टर भांबावला होता... त्यानं आशेनं चालक सरदारजींवर नजर खिळविली... पण त्यांनी हूं की चूं केलं नाही... गाडीतील गोंधळ वाढतोय तसा त्यांनी आपली तुरबान आणखी खाली खेचत आवाज कानापर्यंत पोचणार नाही याची काळजी घ्यायला सुरवात केली. बाईंच्या हे ध्यानी आलं. त्यांनी आता या कालव्यात आपलाही आवाज मिसळायला सुरवात केली. तुरबानीतून आवाज पोहोचेपर्यंत आवाजाचा पिच मोठा करत त्यांनी घोषणा दिली... अन्यायी तिकीट दरवाढ मागे घेतलीच पाहिजे... तिकीट वाढ मागे घेतलीच पाहिजे... बसमधल्या साऱ्यांचेच लक्ष आता बाईंवर खिळून राहिले. बाईंनी दिलेल्या स्टेपनीवरच तर गाडी चालू आहे. त्यामुळे बाई म्हणताहेत त्या प्रमाणे तिकीट दरवाढ मागे घेतली जाईल... अशी सगळ्यांना अशा लागली... कपाळावर भगव्या पट्ट्या बांधलेल्या प्रवाशांना घाई झाली... बाईंनी आता स्टेपनी काढून घ्यावी... म्हणजे ही गाडी इथेच थांबेल... सरदारज
ी जातील आणि शेठजी गाडी चालवतील... त्यांनी मनाचे मांडे खायला सुरवात केली... बाईंच्या घोषणेने कंडक्‍टर गोंधळला. आता या वळणावर जर बाईंनी स्टेपनी काढून घ्यायचा निर्णय घेतला तर पुढचा प्रवास करायचा कसा... आणखी कोणाकडे स्टेपनी उपलब्ध होऊ शकते का? झाली तर ती किती काळ टिकेल... कंडक्‍टरच्या डोक्‍याचा भुगा झाला... तो सरळ सरदारजींच्या पाशी गेला... बाई नाराज आहेत... स्टेपनी मागितली तर... काही तरी उपाय केला पाहिजे... बाईंना समजावलं पाहिजे... सरदारजींनी आरशातून बघितलं... बसमध्ये गोंधळ सुरू होता... भगवे, निळे, हिरवे सगळे पट्टे बांधलेले तिकीट दरवाढीचा विरोध करत होते... त्यातून त्यांना बाई दिसल्या... बाई आपल्या कपाळावर आलेले केस मागे घेत जोरात घोषणा देत होत्या.... तिकीट दरवाढ मागे घेतलीच पाहिजे... घेतलीच पाहिजे, घेतलीच पाहिजे. त्यांचे काही सहकारी त्यांच्या घोषणेला साथ देत होते... आता हे सगळे जर ओरडत राहिले तर गोंधळ वाढणार हे बघून सरदारजींनी गाडी धाब्यावर थांबविली... बाईंसाठी लस्सी मागवली... लोकांना वाटू लागलं. बाई चर्चा करताहेत... तिकीट दरवाढ मागे घेतली जाणार... काहींना आनंदाच्या उकळ्या फुटल्या... भगवे पट्टेवाले चर्चा फिसकटण्याची वाट बघू लागले... आता चर्चा फिसकटेल... बाई स्टेपनी काढून घेतील... त्यांचे मनाचे मांडे सुरू झाले... धाब्यावरून गाडी सुटायला लागली... सरदारजींनी स्टार्टर मारला... बाई बसमध्ये चढल्या... आता साऱ्यांचीच उत्सुकता शिगेला पोचली... तिकीट दरवाढ मागे घेतली जाणार का? स्टेपनी काढली जाणार का? काही वेळ बाई बोलल्याच नाहीत... कंडक्‍टरने डबल बेल मारली... लोक कुजबुजायला लागले... बाईंनी घोषणा केली... पुढच्या थांब्यावर आणखी दोन रुपयांनी तिकीट दरवाढ होणार होती, माझ्यामुळे ती थांबली... भगवे पट्टेवाले, हिरवे पट्टेवाले, निळे पट्टेवाले मघाच्या घोषणा देऊन दमून गेले होते... कंडक्‍टरने पुन्हा डबल बेल
मारली... या वेळी सरदारजींनी बसमधले दिवे बंद केले... कोणी काही बोलत नव्हते, घोषणा नव्हत्या... कुजबुज नव्हती... होती ती केवळ झोप...!!

****"सकाळ'मध्ये 13 नोव्हेंबरला छापून आलेला माझाच लेख****

रविवार, ६ नोव्हेंबर, २०११

खाली डोकं वर पाय...

बाबांनी आपल्या काळ्या लांब वाढलेल्या दाढीवरून पुन्हा हात फिरविला आणि आपला डावा डोळा आणखी लहान करत मानेनं आणखी एक मुरका मारला... प्रेक्षकांतल्या काही बायका लाजल्या... "तो अब मै आप को शीर्षासन कर के दिखाता हुँ!' असं म्हणत बाबांनी आपलं खाली डोकं वर पाय केले... लोकांनी जोरात टाळ्या वाजवल्या... बाबांना नेमके काही कळेना... अरे मी इथे योग शिकवतोय आणि लोक त्याला सर्कस समजून टाळ्या काय वाजवताहेत... बाबा गरजले... "टाळ्या वाजवू नका, तुम्हीही करण्याचा प्रयत्न करा...' काही पोरा-सोरांनी प्रयत्न केला; पण तो पार फसला... बाबा पुन्हा पुन्हा स्टेजवर उड्या मारत होते... पोट आत घेत होते, बाहेर काढत होते... काही जण बाबांप्रमाणे करायचा प्रयत्न करत होते; तर बरेच जण बाबांचा स्टेज परफॉर्मन्स बघून हसत होते, टाळ्या वाजवत होते... बाबांनी मोठ्याने स्टेजवर उडी मारली आणि एका झटक्‍यात खाली डोके वर पाय केले आणि तशाच अवस्थेत घोषणा केली... या सरकारला असंच खाली डोकं वर पाय करायला लावीन... प्रेक्षकांनी जोरात टाळ्या वाजविल्या आणि बाबांना प्रोत्साहन दिलं...

बाबा मनोमनी खूश झाले... आपल्या वर्गाला येणाऱ्या प्रेक्षकांनी साथ दिली की मग झालं... बाबा गावोगाव सांगत सुटले... लोक त्यांचं ऐकायचे... त्यांच्या शीर्षासनाला टाळ्या ठोकायचे आणि घरी परतायचे... बाबांना वाटायचं, लोक आपल्या मागे आहेत, त्यांच्या जीवावर आपण सरकारला खाली डोकं वर पाय करायला लावू...
मग बाबा जोरात उड्या मारायचे... हातवारे करत सुटायचे... तिरकी मान करत डावा डोळा आणखी बारीक करत राहायचे.... शीर्षासन कसं आरोग्याला चांगलं आहे सांगायचे... देशासाठी, लोकांसाठी शीर्षासन सरकारला करावंच लागणार हे ते पुन्हा पुन्हा सांगत होते... लोक माना डोलवत होते... बाबा खूश होत होते... दिवस ठरला... स्टेज ठरलं... सरकारला धडा शिकवायला बाबांनी मुहूर्त बघितला... बाबांचा आवेग बघितल्यावर सगळ्यांनाच वाटायला लागलं, आता सरकारचे खाली डोके वर पाय होणार... सरकार घाबरणार... बाबा मनोमनी खूश होते... बाबा स्टेजवरून सांगत होते... आदेश देत होते... लोक पोट आत घेत होते, बाहेर काढत होते... बाबांना आता विश्‍वास आला, आता आपण सरकारला शीर्षासन करायला लावू... बाबा दाढीवरून हात फिरवत होते, डोळा बारीक करून प्रेक्षकांकडे बघत होते... आता सरकारचे शीर्षासन नक्‍की... रात्र चढत चालली तशी बाबांच्या स्टेजवरच्या उड्या वाढल्या... लोक पेंगाळून झोपले... पण बाबा मात्र कधी पोट आत घेत, कधी बाहेर सोडत... असंच बाबांनी पोट आत घेतलं आणि ते बाहेर काढणार इतक्‍यात सरकारच्या सैनिकांनी त्यांनाच स्टेजवरून बाहेर काढलं... बाबा तोंड लपवत-छपवत बाहेर आले... लोक चिडले... सरकारने बाबांचा घात केला... सैनिकांची कारवाई रात्री झाली... सरकारला काही सुचेना... बाबांचा महिमा कसा कमी करायचा... सरकारचा एक मानकरी पुढे झाला... बाबांच्या दाढीला हात घालायची त्यानं घोषणा केली... लोक बोलू लागले, आता बाबा आणि यांच्यात चकमक उडणार... बाबा सांगत राहिले, नखावर नख घासत राहा... केस काळे ठेवत राहा... मानकऱ्याच्या लक्षात आलं... लोकांना नखावर नख घासायला सांगणाऱ्या बाबांच्या दाढीचे दोन केस पांढरे आहेत... मानकऱ्याने लगेच ढोल वाजवायला सुरवात केली... बाबांच्या दाढीत पांढरे केस... बाबांचं हे काम एकट्याचे नसून "सांघी'क आहे... लोकांनाही बाबांच्या दाढीतले हे पांढरे केस दिसू लागले... लोक कु
जबुजू लागले... मानकऱ्याचे काम झाले... सरकारला संधी मिळाली... सरकारचं खाली डोकं वर पाय करण्याच्या गप्पा मारणाऱ्या बाबांचंच सरकारने खाली डोकं वर पाय केलं होतं... आणि त्यांच्या संघातलेच इतर जण "सर्कस' कशी झाली म्हणून टाळ्या वाजवत राहिले...!!

6 नोव्हेंबरच्या सकाळ मधील माझा लेख

रविवार, ३० ऑक्टोबर, २०११

पोपटपंची

सारथ्याने लगाम हातात घेतले आणि चाबूक मारला. घोडे उधळले... रथाने वेग घेतला. हवेत एक धुळीचा लोट उठला... कोणी म्हणाले, आता रथ हाकून काय उपयोग, फार वेळ झाला... कोणी म्हणाले, आता रथ हाकला तरी रथपत्यालाच त्याचा फायदा होईल असे म्हणता येणार नाही... काहींनी मात्र रथपती अजून कसे पट्टीचे रथपती आहेत आणि तेच कसे उद्या सिंहासनावर बसतील, हे ठासून सांगायला सुरवात केली... रथपती मात्र हवालदिल झाले होते... रथातून उठणाऱ्या धुळीपेक्षा या अशाच धुळीची वावटळं त्यांच्याभोवती फिरत होती... यातून मार्ग कसा काढायचा हेच त्यांना कळत नव्हतं... एवढ्यात...
नमस्ते, नमस्ते, नमस्ते....रथपतींकडे बघून पोपट जोरात किंचाळला.. त्या पोपटाकडे बघून रथपत्याने रथ थांबण्यिाचा आदेश दिला. हा पोपट खूप महान दिसतो. नाही तरी आपल्या मनात असलेला "नमस्ते' त्याला कसं कळलं. रथपती खाली उतरले. समोर पोपटवाला आपल्या पोपटाला डाळ खाऊ घालत होता.
महाराज... महाराज... रथपतींनी धोशा लावला... पोपटवाला खूश झाला. एवढा मोठा रथपती, पण आपल्यासमोर येऊन थांबल्याचे त्याला आश्‍चर्य वाटले. पण जमेल तितके आश्‍चर्य त्याने लपवले.
रथपतीने पुन्हा धोशा लावला...
महाराज... महाराज... नमस्ते सदा वत्सले केलं, यात्रा काढल्या, लोहपुरुषाची बिरुदावली मिरवून घेतली, अनेक जिने चढलो तरी माशी कुठं तरी शिंकते आहे. पंतप्रधानपदाची रेष काही हातावर उमटत नाही... काही तरी उपाय सांगा महाराज... उपाय सांगा? त्यांनी आपल्या थरथरत्या हाताने पोपटवाल्यासमोर "नोट' ठेवली. पोपटवाल्याने एकदा नोटेकडे आणि दुसऱ्यांदा रथपतींच्या चेहऱ्याकडे बघितले.
"लाल'बुंद चेहऱ्यावरची चिंतेची "कृष्ण' रेघ पोपटवाल्याला उठून दिसली.
पोपटवाल्याने नोट दाखवताच पोपटाने एक कार्ड चोचीत पकडले आणि पोपटवाल्याच्या हाती दिले.
""तुम्ही म्हणता तेवढं पक्षानं तुम्हाला दिलं नाही, लोकांना तुम्ही पुढं आणता, पण लोक मात्र तुमचं नाव घेत नाहीत. तुम्ही धाडसाचे, पण आता वय साथ देत नाही... "रामा'चं नाव सोडल्यापासून त्रास फार होतो आहे. ''
पोपटवाल्याने आपल्या तोंडाचा पट्टा सुरू केला. रथपतींची अस्वस्थता वाढू लागली. हा पोपट भलताच हुशार निघाला.
""महाराज भूतकाळ चांगला सांगितलात; पण भविष्याचं काय? पंतप्रधान होईन का नाही...?''
पोपटवाल्याने मघाशी ठेवलेल्या नोटेकडे पुन्हा बघितलं. रथपतींच्या रथाच्या मानाने "नोट अगदीच तोकडी होती. त्या नोटेकडे बघून काय भविष्य सांगायचं हेच त्याला कळेना.
""तुमची इच्छा फार, पण दैव साथ देत नाही. तुमच्या मार्गात चार चार ग्रह वक्री आहेत. त्यांची शांती केली पाहिजे. ''
""त्यासाठी उपाय काही महाराज... ''रथपत्याने आग्रह सोडला नाही.
""उपाय भारी आहे... पण झेपला पाहिजे. नागासाठी दुधाचा पूर आणला पाहिजे. मेद आणि मोद दोन्ही वाढले, की पदापर्यंत पोचण्याचा मार्ग आणखी कठीण... त्यामुळे तब्येत चांगली ठेवण्यासाठी "गड' सर केले पाहिजेत. ''
""महाराज मग तरी मार्ग सुकर होईल ना?''
""एवढं करूनही खरे तर सांगता येत नाही.''
""का का महाराज? आता आणखी काही अडचणी..?''
""अडचणी खूप आहेत.'' पोपटवाल्याने "नोटे'कडे पुन्हा लक्ष देत सांगायला सुरवात केली. ""अहो राहू आणि केतूचा अनिष्ट काळ चालू आहे. हे दोन्ही जोपर्यंत तुमच्या कुंडलीत आहेत तोपर्यंत या पदापर्यंत पोचणे अवघडच.''
""मग यावर काही उपाय...?''
""उपाय आहे, पण तो जालीम आहे. "भागवत' धर्माचा आधार घ्यायला पाहिजे... त्या मोहनासमोर नतमस्तक झालं की सगळं ठीक होतं. ''
पोपटवाल्याचा हा उपाय ऐकून रथपती उठले. त्यांनी पोपटवाल्याला नमस्कार केला आणि ते निघू लागले.
एवढ्यात पोपटवाला मोठ्याने बोलला,
""आणखी एक करायचे... लोकसभेत सरकार पाडण्यासाठी "नोट' कामाला आली नसली तरी चांगलं भविष्य ऐकण्यासाठी "चांगली नोट नकामी येते.''

***30 आक्‍टोबरच्या "ंसकाळ'मध्ये छापून आलेला माझा लेख***

रविवार, २५ सप्टेंबर, २०११

महाराजांचं उपरणं....

अमुक तमुक महाराज की जय... महाराज की जय... एक पट्टेवाला जोरात ओरडला. त्याच्या पाठीमागून मग दुसरा आणि मग तिसराही ओरडला. "महाराज की जय...' जयजयकार गगनात दुमदुमला.
महाराजांनी हात वर केला. दरबार शांत झाला..
मग एक एक दरबारी बोलू लागला.
महाराजांचा विजय असो.... महाराजांच्या राज्यात गुरं-ढोरं सुखी आहेत. महाराजांची कृपा आहे.... एका दरबाऱ्याने सूर आळवला.
महाराजांचा विजय असो... महाराजांच्या राज्यात स्त्रिया सुखी आहेत... दुसऱ्या दरबाऱ्याने री ओढली.
महाराजांचा विजय असो... विजय असो... महाराजांच्या राज्यात पोरं-सोरं सगळी प्रजा सुखी आहे... महाराजांचा विजय असो... आता अश्‍वमेध केलाच पाहिजे...
दरबाऱ्याने अश्‍वमेधाचं नाव काढताच महाराजांच्या अंगावर मास चढलं.
उद्याच्या चक्रवर्ती सम्राटाचा विजय असो... पट्टेवाला जोरात ओरडला... त्याच्या पाठीमागून दरबारानेही जयजयकार केला.
"उद्याच्या चक्रवर्ती सम्राटांचा विजय असो... पण...' एका दरबाऱ्याने मुजरा करता करता "पण...' थोडा लांबवला...

पण काय? महाराजांना काही कळेना...
गुरं-ढोरं... पोरं-सोरं... सगळी सुखी; तरी पण काय? महाराजांनी सवाल केला...
दरबार शांत. पट्टेवाल्याने जोरदार "अमुक तमुक महाराजांचा विजय असो...' "उद्याच्या सम्राटाचा विजय असो' अशी जोरात घोषणा केली... "महाराजांचा विजय असो... महाराजांचा विजय असो...' दरबारी एकसुरात ओरडले.
थांबा... दरबाऱ्याच्या पण या... प्रश्‍नाला उत्तर नाही मिळालं... पण काय?
सरदार बोला... पण काय?... सुभेदार बोला. पण काय?... मंत्री बोला... कोणी तरी बोला हा "पण' कशासाठी?
कोणी बोलेना... महाराज संतापले... काय आहे ही भानगड... आम्ही एवढं चांगलं राज्य करतोय; पण तरीही "पण' आहेच...
एका दरबाऱ्याने अभय मागितले... महाराजांनी हात वर केला...
होय महाराज... पोरं-सोरं... गुरं-ढोरं... सगळी सुखी आहेत... पण महाराजांच्या उपरण्यावरचा डाग लोकांच्या डोळ्यात खुपतोच आहे...
लोकं म्हणताहेत... सगळी प्रजा सुखी; पण तरीही उपरण्यावरचा डाग काही जात नाही...
महाराजांनी एकदा उपरण्याकडे बघितले आणि दुसऱ्यांदा दरबारात... सगळे दरबारी माना खाली घालून बसलेले...
यावर उपाय आहे की नाही... सरदार, चोपदार, मंत्री सगळे चूप...
प्रधानजी, तुम्ही सांगा आहे का उपाय?... प्रधानजी काही बोलले नाहीत...
आहे. महाराज उपाय आहे... जालीम उपाय आहे... मघाचाच दरबारी बोलला.
काय आहे उपाय तातडीने सांगा... उपरण्यावरचा डाग घालवायचा कसा...?
महाराज... आता तुमच्या वाढदिवसाला राज्यातल्या सगळ्या धोब्यांना बोलवा.... तीन दिवस धोबी उपरणे धुतील. डाग धुऊन जाईल... उपरणे लख्ख होईल. मग अश्‍वमेधाची तयारी जोरात करता येईल...
महाराजांना दरबाऱ्याचा हा सल्ला आवडला... चला. शाही थाटात धोब्यांची फौज तयार करा... राज्यातले सगळे धोबी बोलावून घ्या...
खलिते सुटले... घोडेस्वार चारी दिशांना रवाना झाले... राज्यातील धोबी राजधानीत येऊ लागले... महाराजांनी त्यांची बडदास्त ठेवली... धोब्यांची फौज बघून महाराज मनातच खूश झाले... आता डाग धुतला जाणारच... एवढ्या लोकांनी उपरणे धुतल्यावर कशाला डाग राहतोय.... महाराजांचा आनंद गगनात मावेना...
महाराजांनी सगळ्या धोब्यांना साबण दिले... उपरण्याचा डाग धुण्यासाठी एक एक धोबी पुढे येऊ लागला.
महाराजांना उपरणे उंचावून दाखवू लागला... महाराज मनोमनी खूश होत होते... महाराजांचे उपरणे किती देखणे, किती रेशमी... महाराजही किती देखणे, किती चांगले याचे कौतुक होत होते...
एक दिवस झाला... महाराजांनी उपरण्याकडे बघितले... डाग अजून शिल्लक होताच... दुसऱ्या दिवशी दुसरे धोबी आले... उपरणे धुऊन निघून गेले... महाराजांनी पुन्हा उपरणे बघितले... उपरण्यावर डाग तसाच होता... महाराजांनी तिसऱ्या दिवशी नेटाने उपरणे धुण्यास सांगितले... धोब्यांनी केलेल्या साबणाचा फेस दुसऱ्या राज्याच्या राजांच्या तोंडाला यायला लागला...
राजांनी उपरणे पुन्हा बघितले... आता मात्र महाराजांना कळलं... उपरणं पुरतं फाटलं होतं... पण डाग काही गेला नव्हता... अश्‍वमेधाची तयारी थांबवावी लागणार होती...


http://72.78.249.107/Sakal/25Sep2011/Normal/Kolhapur/KolhapurToday/page4.htm
("सकाळ' च्या 25 सप्टेंबरच्या टुडेमध्ये छापलेला माझा लेख.... (सुषमेय) प्रवीण कुलकर्णी )