मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०१०

पंड्या

पुर्वी गावाकडे आमच्या घरी अनेक माणसं यायची.... गोंधळी, रामदासी अशी बरीच माणसं त्यात असायची... आजीने तर अनेक विधवा, परितक्‍त्या बायांना आमच्या वाड्याच्या समोरच्या खोलीत राहायची मुभा दिली होती. घरातील नीटवाट, पाणी भरण्याची कामं या बाया करायच्या आणि मग आजीच त्यांना लागेल तो शिधा द्यायची.... खूप वर्षे हे असंच चालू होतं. यामध्येच एक यायचा म्हणजे काशिचा पंड्या. साठी पार केलेला... डोक्‍याचा गोटा, कळकट मळकट धोतर आणि तशीच कळकट पिशवी खांद्याला अडकवलेला पंड्या दरवर्षी हिवाळ्यात आमच्या घरी यायचा. हा काशिहून यायचा म्हणे ...आणि तेथील गंगाजल आणि काळा दोरा आम्हाला द्यायचा. खरे तर तो काशिचा पंडित पण का कोणास ठावूक आमच्या घरातील सगळ्या बाया-बापड्या त्याला पंड्याच म्हणायच्या. विशेष म्हणजे तो आला हे कळल्यावर आमच्या आत्याही खास त्याच्याकडून काशिचा गंडा बांधायला माहेरला यायच्या. तो महाराष्ट्रातील बऱ्याच देशस्थांच्या घरी जायचा, आमच्या अनेक पाहुण्यांकडे तो कधी ना कधी गेलेला असायचाच... कुणाकडे उन्हाळ्यात... कुणाकडे पावसाळ्यात...सगळीकडे तो त्याच्या त्या कळकट मळकट पिशवीतून काळ्यामीट्‌ट बाटलीतील गंगाजल पाजायचा. माझे वडील नेहमी म्हणायचे हा कुठला जातोय काशिला, इथेच पंचगंगेचं पाणी बाटतील भरत असेल आणि आंबाबाईच्या देवळातील दोरे वाटत असेल.... पण असं असलं तरी तेही त्याच्याकडून भक्‍तीभावानं पाणी घ्यायचे आचमन करुन डोक्‍याला हात पुसायचे....आणि वर्षभर तो काळा गंडा हातात जपायचे... असा हा पंड्या कमरेत वाकलेला, अनुनासिक हिंदी बोलणारा, कर्मठ दरवर्षी हिवाळ्यात आमच्या घरी मुक्‍कामला यायचा. एकदा आला की किमान पंधरा दिवस त्याचा मुक्‍काम हालयाचा नाही.
खरे तर पंड्याचा आम्हाला फार राग यायचं कारण काहीच नव्हतं....पण त्याच्याकडून काळा गंडा बांधून घेणं म्हणजे एक दिव्यच असायचं. काळा दोरा बांधला की
त्याला नमस्कार करायला लागायचा....नमस्कार केला की तो दोन्ही हातांनी जोराचा धपाटा पाठीवर मारायचा.. त्याने पाठित सणकच भरायची... त्यामुळे पंड्याचा आम्हाला प्रचंड राग यायचा......तर त्याला बायकांची शिवाशिव चालयची नाही याचा घरातील बायकांना त्रास. शीव... शीव...शीव असा कायमचा जप त्याच्या तोंडात असायचा...त्याच्यासाठी सडलेले तांदूळ, स्टोव्ह, तांब्याच्या घागरीत पाणी याची तजवीज करायला लागायची...तो स्वयंपाक करत असला की त्याच्याशेजारी कोणी गेल्याचे त्याला आवडायचे नाही. खासकरुन बायकांनी. त्याने म्हणे स्वतःच केलेल्या स्वयंपाकाशिवाय दुसरा घास तोंडात टाकला नव्हता.. कधी मधी आई स्वयंपाक घरात गेलीच तर
लगेच म्हणायचा
दूर... दूर...दूर.. भाभींजी आप थोडा अलग रहें.... आईला याचा प्रचंड राग यायचा
मेल्याने माझ्याच घरातील स्वयंपाकघरावर आपला हक्‍क सांगितलाय.. आई पुटपुटायची.... तो पंड्या लगेच माझ्या आजीकडे आईची तक्रार करायचा. मग आजी म्हणायची, ""त्याला नका रे त्रास देवू काशिचा ब्राह्मण आहे.... ब्रह्मचारी आहे.... शाप देईल...... दरवर्षी तो यायचा नंतर नंतर तो थकत चालला होता..... पण पीळ मात्र तसाच... शीव..शीव..शीव..चा जप कायम....आता तर आजीही नव्हती जिच्याकडे तक्रार करायला.... एकदा आई अशीच चिडली... म्हणाली, दक्षिणा घ्या आणि चालते व्हा... तुमची नाटकं इथं कोणी सहन करणार नाही... मग तो आमच्या शेजाऱ्यांच्या घरी गेला.... तिथून पुढे कुठे गेला ते कळलेच नाही.... नंतर बरेच वर्षे पंड्या आला नाही... आम्हालाही त्याची आठवण आली नाही.... नंतर एकदा माझ्या मावशीनं सांगितलं.... तो तिच्या गावात राहायचा एकटाच... नंतर नंतर त्याला स्वयंपाक करायला जमायचं नाही... पण त्याने हेका सोडला नाही.... मग एकदिवस त्याने स्वतःला रेल्वेखाली झोकून दिलं..... पोलिस रिपोर्टमध्ये आलं 80 वर्षांचा माणूस... आत्महत्या.... सोबत पिशवी, त्यात एक पाण्याची बाटली आणि काही काळे दोरे....

शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०१०

बंद दरवाजा

कोण आहे?... दारावची थाप ऐकून नाराजीनेच तो ओरडला... पापण्या उघडण्याचा त्याने प्रयत्न केला पण जाडावलेल्या पापण्या उघडण्यास तयार नव्हत्या... हळू हळू दारावरचा थापांचा वेग वाढला... आता तर त्याला राग आला... अंगावरचे पांघरुण बाजुला सारुन त्याने दार उघडले.... समोर एक अनोळखी माणूस बघून त्याचा पारा पार चढला...
कोण तुम्ही? काय काम आहे?.
मी... मी... तो अडखळला...
काय मी... मी... आहो पहाटेचे चार वाजताहेत आणि तुम्ही कुणाच्याही दारावर थापा काय मारताय.?.. त्याने शक्‍य तितका राग दाबण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या बोलण्यातून तो जाणवलाच...
नाही... मी... थोडावेळ आत येवू का?...
त्याच्या विस्कटलेल्या केसांवरुन आणि अंगावरच्या कपड्यावरुन तो कोणी भूकेला भिकारीच वाटत होता... त्याला आत घेतले तर तो पुन्हा जेवण मागणार....नकोच ती कटकट
आतबित काय नको..त्या बाहेरच्या माणसाने काही तरी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्याने ऐकले नाही.... ओ... चालते व्हा बघू येथून... च्यायला रात्रभर काम करायचं... आणि ह्या कटकटी...
त्याने दरवाजा बंद करुन घेतला... बंद कसला त्याने तो जोरात आदळलाच...
मग त्याने बेडवर स्वतःला सैल सोडलं... जडावलेल्या पापण्या पुन्हा बंद झाल्या...
थोड्या वेळाने पुन्हा दारावची थाप ऐकू आली... त्याने कुस बदलली... पण दार उघडले नाही... ती थाप थोडी जोरात झाली... मग थांबली...
दुपारी आकरा बारा वाजता कधीतरी तो उठला...दरवाजाच्या कडीला लावलेला पेपर हाती घेतला आणि मग एक, एक पान उलटत ... एक अन्‌ एक बातमी वाचून काढली... रात्रभर उपसंपादकगिरी केलेल्या कामांतील काही चुका आता त्याला ठळक जाणवू लागल्या...काही शब्दांचा त्यालाच राग आला.... हा इथे नको होता वापरायला.... ही ची जागा चुकलीय.... या बातमीत च लावायचाच राहिलाच की.... असं तो मनाशी काहीतरी पुटपुटला... त्याने पेपर मिटला... मग त्याला पहाटेच्याच्या प्रसंगाची आठवण झाली... कुणाला तरी सांगायचे म्हणून त्याने फोन लावला...
पण फोन बराचवेळ वाजला तरी उचलला नाही... त्याने दोनदा प्रयत्न केला पण काहीच उत्तर नाही... त्याने मग दुसरा फोन लावला....
काय बातम्या कशा लागल्या... चांगल्या... तिकडून फारसा उत्साह नव्हताच....
का रे आवाज असा का?
गोट्या गेला...
तो किंचाळला... कसा?
काल त्याला हार्ट अटॅक आला होता...दवाखान्यात पोहचलाच नाही....
अरे पण...
अरे पहाटेच त्याला हार्ट अटॅक आला...त्याच्या वडिलांना काहीच कळलं नाही....ते इथे नवीन आलेत ना... त्यांना इथले काहीच माहिती नाही... त्यामुळे ते तिथूनच जवळ असलेल्या कुठल्या तरी गोट्याच्या मित्राच्या घरी
गेले होते, काही गाडीची व्यवस्था होते का बघायला.... पण त्याने यांना बघून दारच बंद करुन घेतले......तो नंतर बरच काही सांगत होता.... पण त्याच्या हातातून मोबाईल केव्हाच पडून गेला होता...
आता त्याला भोवळ आली...... समोरच आरसा होता... त्यात त्याने पाहिले.... त्याला उगाचच आपले पुढचे दोन दात सुळ्यांसारखे भासले.... त्यावर रक्‍तही होतं....

शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१०

मौनाची भाषांतरे व्हावीत

तिच्या पैंजणाची रुणझुण ऐकली की तो तिथेच थबकायचा. मग त्याच्या समोरचे सगळे रंग बदलून जायचे. भरदुपारीही मग त्याला पश्‍चिमेची गुलाबी प्रभा दिसायची. तो तसाच होता. अगदी वेडा. ती समोर आली की मग मात्र तो मुग्ध व्हायचा. तिच्या प्रत्येक हालचाली तो डोळे भरून पाहायचा. मग घसा खाकरून बोलण्याचा प्रयत्न करायचा; पण ओठ साथ द्यायचे नाहीत, जीभ वळायची नाही. बोलायचं असायचं एक आणि तो भलतंच बोलून जायचा. तिला हे जाणवायचं; पण तिही काही बोलायची नाही. फक्‍त हसत राहायची, गालावर आलेले केस मागे घेत राहायची. मग त्याची अवस्था बघून आपणच काहीतरी सांगत राहायची. खूप बोलल्यावर मग ती जाते म्हणायची, तो थांबवायचा तिला. ""जाऊ नको,'' म्हणायचा... थोडा वेळ परत ती थांबायची. मग जायला निघायची. मग त्याच्या हृदयाची धडधड आणखी वाढायची; पण तिला अडवायचं बळ त्याच्या हातात यायचं नाही. ती निघून गेली की, मग याला सगळे विषय सुचायचे... काय बोलायचे होते, ते सगळे आठवायचे. मघाशी बोलताना आपण खूपच मूर्खपणा केला, हेही त्याला जाणवायचे. मग तो स्वतःच्याच डोक्‍यावर एक टपली मारायचा. जोरात शीळ फुंकायचा आणि पुन्हा ती कधी भेटेल याची वाट बघत राहायचा. पुन्हा ती भेटली की याचं असंच व्हायचं. ती त्याला नेहमी म्हणायची, ""तू असा कसा?'' मग तो गप्प बसायचा. काही प्रश्‍नांची उत्तरे नाही देता येत, असं काहीबाही समजावयाचा. मग तीही ताणायची नाही. त्याला त्याच्या स्थितीत सोडून द्यायची. कस्तुरीमृगाच्या बेंबीसारखं त्यांचं प्रेम दरवळत राहायचं आणि ते दोघेही त्याच्याच शोधात हिंडत राहायचे. माझं तुझ्यावर प्रेम आहे, असं तिला सांगायलाच पाहिजे का? तिला ते समजत नसेल का, असं त्याला वाटायचं. तर त्याचं माझ्यावर प्रेम आहे, तर तो मग सांगत का नाही, असं तिला वाटायचं आणि मग दोघेही मौन बाळगून राहायचे. उद्याच्या व्हॅलेंटाईन डेनिमित्त त्यांच्या मौनांची भाषांतरे व्हावीत.

बुधवार, २७ जानेवारी, २०१०

चांगुलपणा, पावित्र्य हीच खरी शक्‍ती

चांगुलपणा, पावित्र्य हीच खरी शक्‍ती

विवेकानंदांसारख्या सन्यस्त जीवन जगणाऱ्या प्रभुतीने पैशाला महत्त्व दिले नाही, यात आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही; पण पैशाची निकड त्यांनीही अमान्य केलेली नाही. मात्र पैसा हेच सर्वस्व नाही हे ते वारंवार सांगतात. तरुणच देशाचे भवितव्य बदलतील! असा गाढ आशावाद दाखविणाऱ्या विवेकानंदांचे विचार आजही तरुणांना प्रेरणादायी आहेत.-----------
""आपण गरीब आहोत असे समजू नका. केवळ पैसा हीच जगातील शक्‍ती नव्हे; चांगुलपणा, पावित्र्य हीच खरी शक्‍ती होय. साऱ्या जगात हीच खरी शक्‍ती आहे. हे तुम्ही स्वतःच बाहेर येऊन पाहा.''
2 नोव्हेंबर 1883 मध्ये अळसिंगा पेरुमल या आपल्या गुरुबंधूंना लिहिलेल्या पत्रामध्ये विवेकानंदांनी नितीमत्ता आणि पावित्र्याला पैशापेक्षा जास्त महत्त्व आहे हे पटवून दिले आहे.
शिकागो येथे सर्वधर्मपरिषदेत विवेकानंदांनी "ते' ऐतिहासिक भाषण केले. त्या भाषणाआधी त्यांना पैशाची आवश्‍यकता होती आणि त्यासाठीच त्यांनी पेरुमल यांना पत्र लिहिले असल्याचे जाणवते. पेरुमल यांना काही कारणांनी पैसे जमविता आले नाहीत, त्याबद्दल ते स्वतःला दोषी मानत होते. त्यामुळे पेरुमल यांना समजावताना विवेकानंदांनी वरील पत्र लिहिले. त्या पत्रात, पैसा हेच सर्वस्व नसल्याचे ते पटवून देतात. केवळ याच पत्रात नव्हे तर विवेकानंदांनी त्या काळात ज्या-ज्या वेळी भारतात पत्र लिहिले त्या-त्या वेळी पैशाला महत्त्व देऊ नका, पैसा हा आवश्‍यक असला तरी तो सर्वस्व नाही, हेच वारंवार सांगितले.
अमेरिका म्हणजे पैशाचं झाड! याबद्दल भारतात वाटणारी उत्सुकता आणि ते मिळत नसल्याचे दुःख हे त्या काळातही होतेच; पण अमेरिकेतील ऐषोआरामबद्दल येथे वाटणाऱ्या कुतुहलामुळे आणि तो ऐषोआराम मिळत नसल्याचे वाईट वाटून घेणाऱ्या आपल्या गुरुबंधूंना ते समजावून सांगताना आपल्याकडे पैसा नसला तरी अनेक अशा गोष्टी आहेत ज्यांची पैशात मोजमाप करता येणार नाही हे ते सांगतात.
पैसा हेच दुःखाचे मूळ असेल तर इथे (अमेरिकेत) तो प्रश्‍न नाही; मग येथील लोक दुःखी का? कारण येथे नितीमत्ता नाही. त्यापेक्षा भारतातील लोक अधिक सुखी आहेत. आपल्याकडे काय नाही याचा विचार करण्यापेक्षा प्रत्येकवेळी आपल्याकडे काय अधिक आहे! याचा विचार करायला हवा ! हेच ते वारंवार सांगतात.
म्हैसूरच्या राजेसाहेबांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात,""पाश्‍चात्य लोक आमच्या जातीभेदांवर कितीही टीका करोत; पण त्यांच्यात आमच्यापेक्षा देखील वाईट असा जातीभेद आहे आणि तो म्हणजे पैशावर उभारलेला जातीभेद, अर्थगत जातिभेद. अमेरिकन लोक म्हणतात की सर्व शक्‍तीमान डॉलर काहीही करू शकतो; पण या देशात जेवढे कायदे आहेत तेवढे जगात इतरत्र कुठेही नाहीत आणि येथील लोक कायद्यांना जेवढे धाब्यावर बसवितात तेवढे दुसरीकडे कुठे आढळत नाही. साधारणपणे आपले गरीब लोक या पाश्‍चात्यांपेक्षा कितीतरी अधिक नितीमान आहेत आणि हीच आपली शक्ती आहे.
खास करुन तरुणांना मार्गदर्शन करताना विवेकानंदांनी धर्म आणि जगणं यांची सांगड घातली आहे. स्पर्धा असतेच, पण ही स्पर्धा कुठल्या पातळीपर्यंत करायची हे ठरविले पाहिजे. आजच्या धकाधकीच्या आणि उर फुटेपर्यंत धावायला लावणाऱ्या स्पर्धेत तरुणांना पैसा सर्वस्व वाटू लागला आहे. पैसा काहीही करु शकतो. त्यामुळे पैशासाठी काहीही हे सूत्र ठळक झाले आहे. याच सूत्राला गिरवत तरुणाई पुढे जात आहे. मग पैसा मिळाला नाही की निराशा आणि निराशेतून आत्महत्या! अशा दुष्टचक्रात तरुणाई सापडत आहे; पण कोणत्याही दुष्टचक्राला भेदण्याची ताकद केवळ तरुणांतच आहे हा अशावाद ते जागवत राहातात.
त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक पत्रातून आशावाद आणि जगण्याची उर्मी यांना प्रथम प्राधान्य दिल्याचे जाणते. खास करुन कर्मकांड म्हणजे धर्म नसून नितीमत्ता हाच धर्म आहे हेच ते वारंवार पटवून देतात. धर्म आणि जगणं यांची सांगड घालताना जगण्यापासून धर्माला वेगळं करता येत नसल्याचे ते स्पष्ट करतात.आज "पैसा' या शब्दाभोवतीच यशापयश केंद्रीत होत असताना विवेकानंद तरुण सहकाऱ्यांना विवेक, नितीमत्ता यांची किंमत पैशात करता येणार नाही, हे सोदाहरण स्पष्ट करतात.

टाईमपास ः वेळेचा अपमानच

टाईमपास ः वेळेचा अपमानच
अलिकडे आता कोणत्याही नाट्य संस्थेने नवीन नाटक आणले, की सगळेच त्याचे तोंड भरून कौतुक करू लागतात. कोणीच कुणाच्या नाटकाला नावं ठेवायचं नाही. तू चांगला, तो चांगला, मीही चांगला असे सगळंच चांगभलं सुरू आहे.
संस्कृतमध्ये एक कथा आहे. गाढव आणि उंट एकत्र चाललेले असतात. मध्येच उंटाला गाढवाची स्तुती करावी वाटते म्हणून ते म्हणतं, ""हे गर्दभमहाराज, तुमचा आवाज किती गोड आहे.'' उंटाने केलेल्या स्तुतीने गाढवाच्या अंगावर मूठभर मांस चढतं. आपल्या या मित्राने एवढी स्तुती केली म्हटल्यावर तेही उंटाची स्तुती करतं. ""हे उंटमहाराज, तुम्ही दिसायला किती सुंदर आहात.'' ही गोष्ट आठवायचं कारण "टाईमपास' हे नाटक. नावाप्रमाणे टाईमपास म्हणूनही या नाटकाकडे बघितलं तरी नाटक बघायला जाऊन वेळ वायाच घालविला नाही तर वेळेचा अपमानही केला असं वाटतं.
सुयोगची निर्मिती, शफाअत खान यांचे लेखन आणि भरत जाधव, सुप्रिया पिळगावकर यांचा अभिनय म्हणून प्रेक्षक नाटकाकडे वळतात खरे; पण आपल्या हाती निखळ मनोरंजनसुद्धा लागू नये, या बद्दलची हळहळ व्यक्‍त करतच नाट्यगृहातून बाहेर पडतात. नाटकाचं नाव "टाईमपास' असल्याने त्यातून तत्त्वज्ञान सांगितले जाणार नाही, हे निश्‍चित होतेच;
पण विनोद तरी निखळ आणि खळखळून हसविणारा हवा. (विनोदनिर्मिती थोड्या अतिशयोक्‍तीने आणि डोक्‍याचा वापर न करता केली असती, तरी चालली असती) पण नाटक कोणत्याच अंगाने फुलत नाही आणि ते संपले कधी हेही कळतच नाही. नाटकाची संकल्पना चांगली असली, तरी संहितेवर कामच नाही. नवरा-बायको कंटाळा घालविण्यासाठी एकमेकांना अनोळखी म्हणून भेटतात आणि त्यातून विनोदाची निर्मिती ही संकल्पना खूपच चांगली असली तरी संहितेवर मेहनत नाही. एक-दोन कोट्या सोडल्या तर नाटकातील विनोद लक्षात राहत नाही. तेच तेच संवाद परत परत येत राहतात. आणि मग कंटाळा घालविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचाच कंटाळा येऊ लागतो. प्रेक्षागृहात थोडी खसखस पिकली असली तरी ती पोरासोरांची आणि ती नवदाम्पत्यांची. नवरा हसला म्हणून बायको हसते आणि बायको हसली म्हणून नवरा; पण चांगले नाटक बघण्यासाठी आलेला प्रेक्षक मात्र हिरमूसूनच बाहेर पडतो. वेगवेगळी पात्रं उभी करण्यात नाटककाराला यश आलेले नाही. आणि नाटक बहुंताश चॅनेलवर दिसणाऱ्या हास्य कार्यक्रमाच्या अंगाने जाते आणि तिथेच फसते. खासकरून एमटीचे पात्र उभे करताना त्यात आणखी संवाद चांगले हवे होते. वेशभूषाही करायला हरकत नव्हती; पण काहीच नाही. प्रेक्षागृहातून नाटकाच्या सुरवातीपासून खसखस पिकत असली, तरी ती दमदार संहितेचे यश नसून भरत आणि सुप्रियाच्या अभिनयाला प्रेक्षकांनी दिलेली दाद आहे. खासकरून भरतच्या चेहऱ्यावरील भाव नेहमीप्रमाणे बदलतात आणि त्यातून थोडी विनोदनिर्मिती होते; पण ती भरतचीच जमेची बाजू. पहिल्या अंकानंतर प्रेक्षक दुसऱ्या अंकात काही तरी वेगळं शोधण्याचा प्रयत्न करतो; पण त्याला त्यातही काहीच मिळत नाही. नाटकाचा शेवटही तसाच. तो थोडा आणखी भावनिक करता येऊ शकला असता.
नाटक संपल्यावर एकांकिकेचे ओढूनताणून दोनअंकी नाटक केल्याचे जाणवते. खरे तर काही प्रसंग आणखी थोडे रंजक केले असते, थोडी वेशभूषाही केली असती तर जमेची बाजू ठरली असती. त्यामुळे नाटक उभे राहिले असते, की नाही माहीत नाही; पण पडतानाही थोडा कमी आवाज झाला असता. या नाटकाची चर्चा एवढी का झाली हा प्रश्‍न आहे. अलिकडे आता कोणत्याही नाट्य संस्थेने नवीन नाटक आणले, की सगळेच त्याचे तोंड भरून कौतुक करू लागतात. कोणीच कुणाच्या नाटकाला नावं ठेवायचं नाही. तू चांगला, तो चांगला, मीही चांगला असे सगळंच चांगभलं सुरू आहे. टाईमपासने या सगळ्याचा पुरेपूर लाभ उठविला आहे. सुमार संहिता, सुमार संवाद, दिग्दर्शनाला वावच नाही, रंगमंचावर वीस वीस वर्षे अभिनय केल्यानंतर सुप्रिया आणि भरतने केलेला अभिनय खूप उच्च दर्जाचा म्हणणे हा त्यांचाच अपमान आहे. त्यामुळे टाईमपासला जाणे म्हणजे वेळ वाया घालविणे नव्हे; तर वेळेचा अपमान करण्यासारखेच आहे.

सोमवार, २५ जानेवारी, २०१०

स्वल्पविराम

तो (स्वल्पविराम)
will you marry me.... मी सरळ तिला विचारुन टाकलं. तिला ते अनपेक्षित नव्हतं पण हा प्रश्‍न मी इतक्‍या सरळ विचारेन असं वाटलं नसावं. माझी उत्तराच्या अपेक्षेने रोखलेली नजर तिला असाह्य झाली असावी. तिनं गालावर आलेल्या बटा हलकेच मागे सारल्या मग चेहरा वळवला आणि दीर्घ उच्छ्शास सोडला..... हे बघ...... मी तिला तिथेच थांबवलं. उत्तर फक्‍त हो की नाही एवढंच तर दे.... मी आवडतो किंवा नाही एवढं महत्त्वाचं.... कारणांत अडकवू नको मला... मी सरळ सांगितलं. माझ्या या सरळ बोलण्याचा तिच्यावर व्हायचा तो परिणाम झाला. तिचे डोळे लकाकले माझ्या रोखलेल्या नजरेला टाळत तिनं पुन्हा एकदा दीर्घ उच्छ्शास सोडला आणि म्हणाली......sorry I can't. म ाझी तिच्यावर रोखलेली नजर खाली झुकली...... o. k. चहा घ्यायचा काय? मी इतक्‍या सहजतेनं पुढे जाईन असं तिला वाटलं नसावं कदाचित. तिने निमिषभर माझ्याकडे बघितलं. मग नजरेत तोच मिश्‍किलपणा आणत म्हणाली चल!
आयुष्यात असे स्वल्पविराम पडत असतातच.
..................
ती (स्वल्पविराम)

तो विचारणार हे आपल्याला नक्‍की ठावूक होतं. त्याच्या नेहमीच्या बोलण्यातूनही ते जाणवत राहायचही.... त्यानं विचारावं असही आत खोल वाटत होतच की आपल्याला पण आज त्यानं विचारलं आणि आपण मात्र त्याला नाही म्हटलं......का? तोच म्हणतो, कुठलाही निर्णय घेण्यापुर्वी फायदा तोटा यांचा विचार करायचा नसतो. फक्‍त मनाशी प्रामाणिक राहायचं मन तुम्हाला कधी धोका देत नाही.... पण मन आणि बुद्धी वेगळे कुठे असतात. त्याला होय म्हणायचं धाडस ना मनात आहे ना बुद्धीत. तो शंभर टक्‍के हसबंड मटेरियल आहे पण लग्न म्हणजे गारमेंट नव्हे. चांगला वाटला म्हणून केलं आणि नंतर फेकून दिलं. तो मित्र म्हणून चांगला आहे.... त्यानं तिथंच राहावं.....गाज देत. पण तो काही किनाऱ्याला धडका देत बसणाऱ्यातला नव्हे..... सावरेल लगेचच..... पण एक नक्‍की आयुष्याच्या ओळीत एक स्वल्पविराम नक्‍की पडला.

रविवार, २४ जानेवारी, २०१०

अस्वस्थता

तो (अस्वस्थता)
चैत्रातलं उन वखवखत असावं.... आणि पायाखालची तापलेली वाळू रक्‍त शोषीत असावी....नजर जाईपर्यंत केवळ आग आग आणि आग असावी..... अंगातील पेशी अन्‌ पेशी पाण्यासाठी टाहो फोडत असावी.... जगण्याच्या लढाईतील शेवटच्या शस्त्रांचीही धार बोथट व्हावी.... गात्रांतला प्राणवायू निसटू पहावा.....त्याचवेळी अचानक आकाशात काळ्या ढगांनी गट्‌टी करावी......सजीवतेचा ढोल पिटावा आणि संवेदनांची लकेर आकाशात उमटून जावी.... मिटलेल्या पापण्यांवर पाण्यांचे तीर चालावेत .... अशीच ती आयुष्यात आली.... अगदी अचानक, आश्‍वासक आणि आवश्‍यक वेळी.....ती आलीच अशी गर्जत येणाऱ्या वळीवासारखी, उन्हाला आपल्या हुकमी आवाजात दटावत कोरडेपणा नाहिसा करत. तिच्या या वर्षावात आपण चिंब भिजलो. अक्षरशः निथळलो.... पण ह्या जलधारांचा आवेग आपल्याला नेहमी पेलवेल....विजेशी स्पर्धा करत, गर्जत येणाऱ्या मेघधारांत आपण स्थिर राहू शकू की तिच्या प्रवाहाबरोबर वाहवत जाऊ....व्याकूळतेने सुखाची प्रतिक्षा बघावी आणि ते दारात आल्यानंतर मात्र त्याला आत घेण्याची भीती वाटावी, अशी का अवस्था झाली आहे....... अस्वस्थता.... अस्वस्थता आणि अस्वस्थता भरुन राहिली आहे.

ती....(अस्वस्थता)

अविचल वृक्षासारखा आहे तो. येणाऱ्या प्रत्येक वाटसरुला आपल्या छायेत घेणारा, त्यांच्याशी मुकेपणाने संवाद साधणारा. आपल्या अंगा-खांद्यावर पक्षांना खेळू देणारा निश्‍चल, निश्‍चिंत आणि निग्रहीसुध्दा. त्याच्या छायेत गेल्यावर आपल्याला निवांतपणा लाभतो. डोळे मिटावेत आणि पडून राहावं असं वाटतं त्या छायेतला गारवा श्‍वासात भरुन जातो पण पण दुसऱ्याच क्षणी त्याच्या त्या अजस्त्र अशा फांद्यांची भीती वाटते... कधीतरी त्या कोसळतील आणि आपल्याला गाढून टाकतील इतकी तिव्र भीती..... अंगावर शहारे आणणारी भीती. त्याच्या पानांची सळसळ डोळे उघडे असेपर्यंत रम्य वाटते पण तेच डोळे मिटले की त्या पानांतून सर्पाची सळसळ भासते. आकाशाशी स्पर्धा करणारा एखाद्या तीव्र वेदनेने तो कोसळणार तर नाही ना? वाऱ्याशी झिम्मा खेळणारे त्याचे हात वाऱ्याच्या एका तीव्र झटक्‍यात तुटणार तर नाहीत ना? कोसळणाऱ्या जलधारांना आपल्या पानांवर थोपविता थोपविता तो वाहवत तर जाणार नाही ना? काहीच समजत नाही....पाऊल पुढे टाकावे की इथेच थांबावे.... अस्वस्थता अस्वस्थता आणि अस्वस्थता भरुन राहिली आहे.

अस्वस्थता

तो (अस्वस्थता)
चैत्रातलं उन वखवखत असावं.... आणि पायाखालची तापलेली वाळू रक्‍त शोषीत असावी....नजर जाईपर्यंत केवळ आग आग आणि आग असावी..... अंगातील पेशी अन्‌ पेशी पाण्यासाठी टाहो फोडत असावी.... जगण्याच्या लढाईतील शेवटच्या शस्त्रांचीही धार बोथट व्हावी.... गात्रांतला प्राणवायू निसटू पहावा.....त्याचवेळी अचानक आकाशात काळ्या ढगांनी गट्‌टी करावी......सजीवतेचा ढोल पिटावा आणि संवेदनांची लकेर आकाशात उमटून जावी.... मिटलेल्या पापण्यांवर पाण्यांचे तीर चालावेत .... अशीच ती आयुष्यात आली.... अगदी अचानक, आश्‍वासक आणि आवश्‍यक वेळी.....ती आलीच अशी गर्जत येणाऱ्या वळीवासारखी, उन्हाला आपल्या हुकमी आवाजात दटावत कोरडेपणा नाहिसा करत. तिच्या या वर्षावात आपण चिंब भिजलो. अक्षरशः निथळलो.... पण ह्या जलधारांचा आवेग आपल्याला नेहमी पेलवेल....विजेशी स्पर्धा करत, गर्जत येणाऱ्या मेघधारांत आपण स्थिर राहू शकू की तिच्या प्रवाहाबरोबर वाहवत जाऊ....व्याकूळतेने सुखाची प्रतिक्षा बघावी आणि ते दारात आल्यानंतर मात्र त्याला आत घेण्याची भीती वाटावी, अशी का अवस्था झाली आहे....... अस्वस्थता.... अस्वस्थता आणि अस्वस्थता भरुन राहिली आहे.

ती....(अस्वस्थता)

अविचल वृक्षासारखा आहे तो. येणाऱ्या प्रत्येक वाटसरुला आपल्या छायेत घेणारा, त्यांच्याशी मुकेपणाने संवाद साधणारा. आपल्या अंगा-खांद्यावर पक्षांना खेळू देणारा निश्‍चल, निश्‍चिंत आणि निग्रहीसुध्दा. त्याच्या छायेत गेल्यावर आपल्याला निवांतपणा लाभतो. डोळे मिटावेत आणि पडून राहावं असं वाटतं त्या छायेतला गारवा श्‍वासात भरुन जातो पण पण दुसऱ्याच क्षणी त्याच्या त्या अजस्त्र अशा फांद्यांची भिती वाटते... कधीतरी त्या कोसळतील आणि आपल्याला गाढून टाकतील इतकी तिव्र भीती..... अंगावर शहारे आणणारी भीती. त्याच्या पानांची सळसळ डोळे उघडे असेपर्यंत रम्य वाटते पण तेच डोळे मिटले की त्या पानांतून सर्पाची सळसळ भासते. आकाशाशी स्पर्धा करणारा तो एखाद्या तीव्र वेदनेने तो कोसळणार तर नाही ना? वाऱ्याशी झिम्मा खेळणारे त्याचे हात वाऱ्याच्या एका तीव्र झटक्‍यात तुटणार तर नाहीत ना? कोसळणाऱ्या जलधारांना आपल्या पानांवर थोपविता थोपविता तो वाहवत तर जाणार नाही ना? काहीच समजत नाही....पाऊल पुढे टाकावे की इथेच थांबावे.... अस्वस्थता अस्वस्थता आणि अस्वस्थता भरुन राहिली आहे.

शुक्रवार, २२ जानेवारी, २०१०

लपंडाव

तो....(लपंडाव)

तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. हे चारच शब्द आपण किती घोगऱ्या आवाजात बोललो. अखंड बडबडणारी ती मग शांत झाली. बोल की एवढच म्हणाली, नंतरची एक दोन मिनीटं तरी दोघंही काहीच बोललो नाही. नंतर महत्त्वाचं बोलणं राहूनच गेलं. पण तिला बहुतेक ते कळलं असावं. त्यामुळे तीही बोलली नाही. खूप दिवसांपासून तिला विचारायचं धाडसं करत होतो पण ते जमलं नाही म्हणून आज मनाचा हिय्या केला. पण मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे, एवढं एकच वाक्‍य बोलल्यानंतर मात्र आपला धीर झाला नाही. श्‍वास जड झाला... छाती धडधडत होती. बहुतेक तिला ते जाणवलं त्यामुळे नंतर
तिने बोलण्याचा आग्रह धरला नाही. अखंड बडबडणारी ती हरवून गेल्यासारखी होती. नजर चोरटी आणि श्‍वास जलद होतं होते.
नंतर बराच वेळ हवा-पाण्यासंदर्भात बोलत होतो. एका चित्रपटाची सगळी कथाही सांगून टाकली. उगाच हसलो... पण ती शांत होती.....तिच्या केसांच्या बटांनी आपल्याला वेड लावले आहे हेच तर सांगायचे होते. पण धीर झाला नाही. महत्त्वाचं बोलण्यासाठी भेटलो पण शब्दांचाच लपंडाव खेळत राहिलो.

ती....(लपंडाव)

तो असा का आहे वाट चुकलेल्या वाटसरुसारखा. कायम भांबावलेला असतो. समोरची सरळ वाट त्याला त्याच्या मुक्‍कामापर्यंत घेवून जाणारी असते पण तो वळणं घेत राहातो. आणि वळल्यावर मग तो मार्गदर्शकाची वाट बघत राहातो. प्रत्येकवेळा त्याला सावरणारं कोणीतरी लागतं. तो मुलगा आहे त्यानं विचारलं पाहिजे. मी कोण वाघीण आहे का सिंहीण याला फाडून खाणार आहे का? .... पण त्याचा हाच स्वभाव तर आपल्याला खूप आवडला. त्यानं चटकन विचारलं असतं तर त्याच आश्‍चर्य वाटलं असतं. पण त्याचं वळणं घेत बोलणंच तर आपल्याला आवडतं. नेहमी शांत शांत असणारा आज किती बडबडला. महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणाला, पण हवा पाण्याच्या गप्पा मारत राहिला. उगाचच हसत होता.
आज आपण नुसतं हं हा हू करत राहिलो, पण तो बोलत होता. त्याच्या बोलण्याचे हसू येत होते, पण तो ओशाळेल म्हणून ते दाबून धरले. कदाचित मनातल्या भावना ओठावर येऊ नयेत यासाठीच तर तो बोलण्याचा लपंडाव करत होता.

बुधवार, २० जानेवारी, २०१०

अनाथ

अनाथ

ऑफीसला जायच्या रस्त्याच्या कडेचे ते झाड नेहमी कुणाला ना कुणाला सावलीत ठेवायचं. प्रत्येक सिझनमध्ये त्या झाडाखाली कोणी ना कोणी वेगळं असायचं. पावसाळ्यात छत्री दुरुस्त करणारा, हिवाळ्यात स्वेटरवाला, उन्हाळ्यात टोप्या विक्रेता बसलेला असायचा. परवाच्या रस्तारुंदीकरणात त्याच्या पारंब्या तोडल्या गेल्या आणि फांद्यांवरही कुऱ्हाड चालविली गेली. आता त्या झाडाची सावलीही संकुचित झाली. अलीकडे तर तर तिथे कोणीच दिसायचे नाही. परवा सहज त्या झाखाली नजर गेली आणि बघितलं तर काही कुत्र्याची पिलं तिथं खेळत होती. ती तिथे कशी आली, कुठून आली काहीच कळलं नाही. रोज ऑफीसला जाताना ती तिथे खेळत असलेली दिसायची. चार- पाच तरी असतील. भुऱ्या रंगाची, मऊ केसांची. मग रोज त्या झाडाखाली थोडावेळ थांबायचं आणि त्या कुत्र्यांना निरखायचं हा छंदच लागला. आईच्या अंगा खांद्यावर खेळणारी ती पिलं बघितली की मजा वाटायची. त्या पिलांची आईही त्यांना खेळवायची, चावायची, गुरगुरायची. ती गुरगुरली की काही पिलं लांब जायची आणि परत फिरायची.थोडे दिवसांनी त्यातील एक-एक पिल्लू कमी होत गेलं. शेवटी एकच पिल्लू राहिलं. ते पिल्लू आणि त्याची आई त्या झाडाभोवती फिरत असायची. हायवेवरुन होणाऱ्या वाहनांच्या ये-जा पासून ती त्याची जणू रक्षण करायची. काल त्याच रस्त्यावरुन जाताना समोरच्या ट्रकने जोरात ब्रेक दाबला. गाडी कचकन थांबली. काय झालं म्हणून पुढे जाऊन बघितलं तर ती पिलाची आई ट्रकच्या पुढच्या चाकात सापडलेली. थोडावेळ तिची धाप सुरु होती आणि नंतर तिही थांबली. तिचं ते पिल्लू शेजारीच केकाटत होतं. ट्रकचालकानं त्या मेलेल्या कुत्रीला रस्त्याच्या एका कडेला आणून टाकलं आणि तो पिलाकडे गेला. त्यानं ते पिल्लू उचललं आणि ट्रकच्या केबीनमध्ये ठेवलं. मला राहावलं नाही म्हणून मी त्याला विचारलं, ""सरदारजी क्‍या करोगे इसका?'' सहा फूट दोन
इंच उंचीच्या त्या सरदाराचे डोळे थोडे किलकीले झाले. माझ्याकडे त्यानं बघितलं आणि म्हणाला, कुछ नहीं, पालुंगा! यतीम होने का दुख मालुम है

मंगळवार, १९ जानेवारी, २०१०

हार

तो. (हार)
मला गांधीजी आवडत नाहीत. एवढं एकच तर वाक्‍य आपण बोललो. कुठल्या संदर्भात बोललो तेही कळलं नाही. पण तिने एकदा मला नथुराम असल्यासारखं पाहिलं आणि मग तोंडाचा पट्‌टा सुरु केला, तो शेवटपर्यंत. गांधीजी आवडत नाही हे म्हणून मी जणू ब्रह्महत्या केल्याच्या आवेषात ती बोलत होती, आणि मला फाशीवर आत्तापर्यंत का चढवलं नाही ,असं तिची नजर विचारत होती. आपले मोठे डोळे आणखी मोठे करत ती काही-बाही सांगत होती. ती बोलत असताना हं, हू, हो शिवाय काही बोलता येत नाही हे खरंच, पण तरीही आपण तेही बोललो नाही. माझं ते गप्प बसणं तिला आणखी टोचलं असावं. त्यामुळे ती आणखीन उखडली. तुमच्यासारख्यांनी या देशात राहायलाही नको, सरळ सांगून टाकलं तिनं, मी नुसतंच बरं म्हणालो, त्यावरही चीडली. चहा घेतानाही तिची अखंड बडबड सुरु होती. शेवटी कंटाळून मी हरलो म्हटल्यावर ती थोडी शांत झाली. पण तुला आता सटकायचं आहे म्हणून तू हरलो म्हणतोयस हे सांगायला ती विसरली नाही. काय गांधीवादी आहे, गांधीवाद असा असतो हे जर गांधीजींना कळलं तर ते गांधीवादाची पुन्हा नव्याने व्याख्या करतील. गांधीवादी छे जहालवादी आहे....तिखट... शेवटी हरलो हे आपण उगाचच कुठे म्हटलं आपण. खरंच हरलेलोच आहोत की....

ती...(हार)
कोण समजतो कोण स्वतःला. क्रांतिकारी. पाच फूट चार इंच उंचीचा क्रांतिकारी. बोलता येतं का नीट आणि म्हणे गांधीजी आवडत नाहीत. काय माहिती आहेत याला गांधीजींबद्दल आणि एवढं आपण बोलत होतो तर पढ्ढ्यानं हू की चू केलं नाही. नाहीतर किमान हं.... हा... ही... ही... तरी चालू असतं पण ते काहीच नाही. शेवटी बरं आणि हरलो म्हणाला, पण तेही मजबुरीनं, कदाचित मला बरं वाटावं म्हणून. पण खरंच त्याला जर गांधीजी नसतील आवडत तर नसतील ना, त्याला ते आवडावेत म्हणून आपला अट्‌टाहास का? आणि आपण त्याच्यावर एवढं उखडायचं काय कारण होतं. केवढी आदळ-आपट केली आपण बिच्चारा ! छे वस्ताद आहे.. एखादाच शब्द बोलतो आणि मग आपला निवांत राहातो. पण खरंच तोच गांधीवाद्यासारखा वागला, अगदी शांत राहात सहन करत राहिला. त्याला या देशात राहण्याचा काडीचाही अधिकारही नाही असंही म्हणून टाकलं. पण शेवटी हरलो म्हणालाच की....खरचं तो हरला की मी हरले.....