शुक्रवार, २२ जानेवारी, २०१०

लपंडाव

तो....(लपंडाव)

तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. हे चारच शब्द आपण किती घोगऱ्या आवाजात बोललो. अखंड बडबडणारी ती मग शांत झाली. बोल की एवढच म्हणाली, नंतरची एक दोन मिनीटं तरी दोघंही काहीच बोललो नाही. नंतर महत्त्वाचं बोलणं राहूनच गेलं. पण तिला बहुतेक ते कळलं असावं. त्यामुळे तीही बोलली नाही. खूप दिवसांपासून तिला विचारायचं धाडसं करत होतो पण ते जमलं नाही म्हणून आज मनाचा हिय्या केला. पण मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे, एवढं एकच वाक्‍य बोलल्यानंतर मात्र आपला धीर झाला नाही. श्‍वास जड झाला... छाती धडधडत होती. बहुतेक तिला ते जाणवलं त्यामुळे नंतर
तिने बोलण्याचा आग्रह धरला नाही. अखंड बडबडणारी ती हरवून गेल्यासारखी होती. नजर चोरटी आणि श्‍वास जलद होतं होते.
नंतर बराच वेळ हवा-पाण्यासंदर्भात बोलत होतो. एका चित्रपटाची सगळी कथाही सांगून टाकली. उगाच हसलो... पण ती शांत होती.....तिच्या केसांच्या बटांनी आपल्याला वेड लावले आहे हेच तर सांगायचे होते. पण धीर झाला नाही. महत्त्वाचं बोलण्यासाठी भेटलो पण शब्दांचाच लपंडाव खेळत राहिलो.

ती....(लपंडाव)

तो असा का आहे वाट चुकलेल्या वाटसरुसारखा. कायम भांबावलेला असतो. समोरची सरळ वाट त्याला त्याच्या मुक्‍कामापर्यंत घेवून जाणारी असते पण तो वळणं घेत राहातो. आणि वळल्यावर मग तो मार्गदर्शकाची वाट बघत राहातो. प्रत्येकवेळा त्याला सावरणारं कोणीतरी लागतं. तो मुलगा आहे त्यानं विचारलं पाहिजे. मी कोण वाघीण आहे का सिंहीण याला फाडून खाणार आहे का? .... पण त्याचा हाच स्वभाव तर आपल्याला खूप आवडला. त्यानं चटकन विचारलं असतं तर त्याच आश्‍चर्य वाटलं असतं. पण त्याचं वळणं घेत बोलणंच तर आपल्याला आवडतं. नेहमी शांत शांत असणारा आज किती बडबडला. महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणाला, पण हवा पाण्याच्या गप्पा मारत राहिला. उगाचच हसत होता.
आज आपण नुसतं हं हा हू करत राहिलो, पण तो बोलत होता. त्याच्या बोलण्याचे हसू येत होते, पण तो ओशाळेल म्हणून ते दाबून धरले. कदाचित मनातल्या भावना ओठावर येऊ नयेत यासाठीच तर तो बोलण्याचा लपंडाव करत होता.

बुधवार, २० जानेवारी, २०१०

अनाथ

अनाथ

ऑफीसला जायच्या रस्त्याच्या कडेचे ते झाड नेहमी कुणाला ना कुणाला सावलीत ठेवायचं. प्रत्येक सिझनमध्ये त्या झाडाखाली कोणी ना कोणी वेगळं असायचं. पावसाळ्यात छत्री दुरुस्त करणारा, हिवाळ्यात स्वेटरवाला, उन्हाळ्यात टोप्या विक्रेता बसलेला असायचा. परवाच्या रस्तारुंदीकरणात त्याच्या पारंब्या तोडल्या गेल्या आणि फांद्यांवरही कुऱ्हाड चालविली गेली. आता त्या झाडाची सावलीही संकुचित झाली. अलीकडे तर तर तिथे कोणीच दिसायचे नाही. परवा सहज त्या झाखाली नजर गेली आणि बघितलं तर काही कुत्र्याची पिलं तिथं खेळत होती. ती तिथे कशी आली, कुठून आली काहीच कळलं नाही. रोज ऑफीसला जाताना ती तिथे खेळत असलेली दिसायची. चार- पाच तरी असतील. भुऱ्या रंगाची, मऊ केसांची. मग रोज त्या झाडाखाली थोडावेळ थांबायचं आणि त्या कुत्र्यांना निरखायचं हा छंदच लागला. आईच्या अंगा खांद्यावर खेळणारी ती पिलं बघितली की मजा वाटायची. त्या पिलांची आईही त्यांना खेळवायची, चावायची, गुरगुरायची. ती गुरगुरली की काही पिलं लांब जायची आणि परत फिरायची.थोडे दिवसांनी त्यातील एक-एक पिल्लू कमी होत गेलं. शेवटी एकच पिल्लू राहिलं. ते पिल्लू आणि त्याची आई त्या झाडाभोवती फिरत असायची. हायवेवरुन होणाऱ्या वाहनांच्या ये-जा पासून ती त्याची जणू रक्षण करायची. काल त्याच रस्त्यावरुन जाताना समोरच्या ट्रकने जोरात ब्रेक दाबला. गाडी कचकन थांबली. काय झालं म्हणून पुढे जाऊन बघितलं तर ती पिलाची आई ट्रकच्या पुढच्या चाकात सापडलेली. थोडावेळ तिची धाप सुरु होती आणि नंतर तिही थांबली. तिचं ते पिल्लू शेजारीच केकाटत होतं. ट्रकचालकानं त्या मेलेल्या कुत्रीला रस्त्याच्या एका कडेला आणून टाकलं आणि तो पिलाकडे गेला. त्यानं ते पिल्लू उचललं आणि ट्रकच्या केबीनमध्ये ठेवलं. मला राहावलं नाही म्हणून मी त्याला विचारलं, ""सरदारजी क्‍या करोगे इसका?'' सहा फूट दोन
इंच उंचीच्या त्या सरदाराचे डोळे थोडे किलकीले झाले. माझ्याकडे त्यानं बघितलं आणि म्हणाला, कुछ नहीं, पालुंगा! यतीम होने का दुख मालुम है

मंगळवार, १९ जानेवारी, २०१०

हार

तो. (हार)
मला गांधीजी आवडत नाहीत. एवढं एकच तर वाक्‍य आपण बोललो. कुठल्या संदर्भात बोललो तेही कळलं नाही. पण तिने एकदा मला नथुराम असल्यासारखं पाहिलं आणि मग तोंडाचा पट्‌टा सुरु केला, तो शेवटपर्यंत. गांधीजी आवडत नाही हे म्हणून मी जणू ब्रह्महत्या केल्याच्या आवेषात ती बोलत होती, आणि मला फाशीवर आत्तापर्यंत का चढवलं नाही ,असं तिची नजर विचारत होती. आपले मोठे डोळे आणखी मोठे करत ती काही-बाही सांगत होती. ती बोलत असताना हं, हू, हो शिवाय काही बोलता येत नाही हे खरंच, पण तरीही आपण तेही बोललो नाही. माझं ते गप्प बसणं तिला आणखी टोचलं असावं. त्यामुळे ती आणखीन उखडली. तुमच्यासारख्यांनी या देशात राहायलाही नको, सरळ सांगून टाकलं तिनं, मी नुसतंच बरं म्हणालो, त्यावरही चीडली. चहा घेतानाही तिची अखंड बडबड सुरु होती. शेवटी कंटाळून मी हरलो म्हटल्यावर ती थोडी शांत झाली. पण तुला आता सटकायचं आहे म्हणून तू हरलो म्हणतोयस हे सांगायला ती विसरली नाही. काय गांधीवादी आहे, गांधीवाद असा असतो हे जर गांधीजींना कळलं तर ते गांधीवादाची पुन्हा नव्याने व्याख्या करतील. गांधीवादी छे जहालवादी आहे....तिखट... शेवटी हरलो हे आपण उगाचच कुठे म्हटलं आपण. खरंच हरलेलोच आहोत की....

ती...(हार)
कोण समजतो कोण स्वतःला. क्रांतिकारी. पाच फूट चार इंच उंचीचा क्रांतिकारी. बोलता येतं का नीट आणि म्हणे गांधीजी आवडत नाहीत. काय माहिती आहेत याला गांधीजींबद्दल आणि एवढं आपण बोलत होतो तर पढ्ढ्यानं हू की चू केलं नाही. नाहीतर किमान हं.... हा... ही... ही... तरी चालू असतं पण ते काहीच नाही. शेवटी बरं आणि हरलो म्हणाला, पण तेही मजबुरीनं, कदाचित मला बरं वाटावं म्हणून. पण खरंच त्याला जर गांधीजी नसतील आवडत तर नसतील ना, त्याला ते आवडावेत म्हणून आपला अट्‌टाहास का? आणि आपण त्याच्यावर एवढं उखडायचं काय कारण होतं. केवढी आदळ-आपट केली आपण बिच्चारा ! छे वस्ताद आहे.. एखादाच शब्द बोलतो आणि मग आपला निवांत राहातो. पण खरंच तोच गांधीवाद्यासारखा वागला, अगदी शांत राहात सहन करत राहिला. त्याला या देशात राहण्याचा काडीचाही अधिकारही नाही असंही म्हणून टाकलं. पण शेवटी हरलो म्हणालाच की....खरचं तो हरला की मी हरले.....

सोमवार, १८ जानेवारी, २०१०

मेघ

तो ....(मेघ)
किती बडबडे. श्‍वास कमी घेते पण बडबडते खूप. काल आपण फोन केला, हॅलो एवढाच शब्द आपण बोललो त्यानंतर हं... हं... हं... याशिवाय तिने काही बोलूच दिले नाही. हरिदास संमेलनातील बुवांबद्दल किती बोलली, त्यानंतर नवीन चित्रपट आणि नंतर स्वारी चक्‍क राजकारणावर घसरली. पण खूपच गोड मुलगी आहे. मनात येतं ते सारं बोलून जाते. काही मनात ठेवत नाही. रिकामं होऊन जाते. अगदी वादळी पावसासारखं, रितं होईपर्यंत कोसळत राहावं आणि रिकामं रिकामं व्हावं तसं. बोलताना कुणाला नावं ठेवणार नाही, पण चुकीला चूक म्हणण्याचं धाडस मात्र तिच्यात आहे. एकूणच ती केवळ बोलकी नाही, तर ठाम मतांचीही आहे. म्हणूनच तर ती आपल्याला आवडू लागली आहे. जगण्याची एक विशिष्ट कला तिला अवगत आहे. जे आपल्याजवळ आहे ते दुसऱ्याला द्यायचं आणि स्वतः श्रीमंत व्हायचं. म्हणूनच ती पावसानंतरच्या पांढऱ्या ढगासारखी भासते. त्या पांढऱ्या ढगांच्या चित्रविचित्र आकारामुळे त्यात लोक अनेक आकृत्या शोधतात, त्या आकृत्यांचे वेगवेगळे अर्थ लावतात. पण ती त्यातही भासते पांढऱ्या मोगऱ्यासारखी, गंधीत.......

ती ....(मेघ)
काय विचित्र माणूस आहे. स्वतः फोन करतो आणि काहीही बोलत नाही... हं...हं... हं. या शिवाय मराठी भाषेत दुसरे शब्द आहेत हे त्याला माहित आहे की नाही, कोणास ठाऊक.. खरंच तो मीतभाषी आहे का? आपणच जास्त बोलतो. थोडं आपण जास्त बोलतो हे खरंच, पण आपण नेहमीच जास्त बोलतो. पण लोक तरीही आपलं बोलणं पुरं करतातच की, पण याला मराठीत हं...हं शिवाय आणखी काही शब्द आहेत हेच माहित नसावं. तसा तो मीतभाषी हे खरंच पण त्याचा स्वभावही मृदू आहे असं सारखं वाटतं. त्याला आणखीन जवळून बघायला पाहिजे. पण काही का असेना गोड आहे. भारदस्त वाटतो. त्याच्या कमी बोलण्यामुळे असेल पण प्रत्येक शब्दाला धार वाटते. अगदी ओथंबून आलेल्या ढगांसरखा केव्हाही वाऱ्याची झुळूक येईल आणि आपल्या असंख्य हातांनी जलधारांचे दान धरित्रीच्या पदरात टाकेल असा मेघ. कृष्णवर्णीय का? हो काळाच. पण हा काळा रंग कुरुपतेचा कुठे आहे. हा तर श्‍यामचा लाघवी श्‍यामवर्ण......

रविवार, १७ जानेवारी, २०१०

मैफल रंगली

तो.... (मैफल रंगली)
हरिदास संमेलनाचे रिपोर्टींग करायला गेल्यावर आधी बुवांची छोटेखानी मुलाखत घ्यायला स्टेजच्या मागे गेलो, तर ती तिथेच होती. आपल्याला बघून ती चटकन सामोरी आली. बुवांना नमस्कार करायला आलात ना? मीही नमस्कार करायला आले आहे. तुम्हाला शास्त्रीय संगीत आवडतं? खरं तर नाही म्हणायचं होतं. पण तोंडातून नकळत हो! आलं. मलाही आवडतं मी तर दोन परीक्षाही दिल्या आहेत इती ती. मी बुवांची मुलाखत न घेताच तिच्याबरोबर कार्यक्रमाला गेलो. व्यासपीठावर बुवा ताणा घेत होते आणि आपली नजर मात्र तिच्यावरच खेळली होती. एखादं निरागसं बाळ आजी सांगत असलेल्या गोष्टींकडे कसं लक्ष देवून ऐकेल तसंच ती गाणं ऐकत होती. तिच्या पापण्यांची होणारी जलद उघडझाप जाणवून गेली. मध्यंतरात तिचे अखंड बोलणं चालू होतं. एक मात्र जाणवलं ज्या मैत्रीणीबरोबर ती कार्यक्रमाला आली होती तिला सोडून तिने माझ्या शेजारील खुर्चीवरुन मैफल ऐकली. मैफल रंगली रंगमंचावर बुवांची आणि रंगमंचाखाली माझी.....

ती..... (मैफल रंगली)
त्याला शास्त्रीय संगीताची आवड असेल असं वाटलं नव्हतं. किंबहूना त्या नाटकानंतर आपली त्याच्याशी भेट होईल असंही वाटलं नव्हतं. केवळ शास्त्रीय संगीताची आवड आहे असं नाही तर बुवांचा किती आदर करतो तो.नाहीतर मैफीलीआधि कशाला आला असता बुवांना नमस्कार करायला. बुवांचे गाणं आपण यापुर्वीही अनेकदा ऐकलं अगदी प्राण कर्णाशी आणून ऐकलं. पण आज मात्र आपलं सगळं लक्ष बुवांच्या गाण्याकडे नव्हतंच. बुवांचं गाणं एकीकडे रंगत असताना आपलं मन मात्र दुसरीकडेच स्वप्न रंगवत होतं. एकदा दोनदा आपण चोरुन त्याच्यावर कटाक्ष टाकला तेव्हा त्याचं लक्ष आपल्याकडेच असल्याचं जाणवलं. कदाचित आपल्या मनाचे ते मांडेही असावेत. पण तो आपल्याकडे चोरुन बघत होता हे मात्र नक्‍की. मध्यंतरात आपण गाण्याविषयी इतकं बोललो पण तो मात्र शांत होता. अगदी विरक्‍त साधूसारखा पण त्याची नजर तशीच रोखलेली आणि टोकदार. नंतरचा दीड तास मैफल रंगली व्यासपीठावर बुवांची आणि मनात त्याची....

गुरुवार, १४ जानेवारी, २०१०

तो आणि ती

तो....(पडदा उघडला)
नाट्यगृहाच्या खिडकीपाशी किती वेगात आली ती. तिकीट घेतलं आणि झटकन सटकली.. तिकिटासाठी आपण तासभर रांगेत ताटकळत बसलोय हेच विसरलो. वाऱ्याचा झंझावात यावा तशी ती आली आणि गेलीही. आपण नुसतेच तिच्याकडे बघत राहिलो. नंतर नाटकाच्या मध्यंतरात चहा पीताना ती दिसली. रमेशही होता तिच्याबरोबर.... त्यानेच तिची ओळख करुन दिली. किती बडबडत होती. एखाद्या धबधब्यासारखी अखंड वहात होती. डोळे कितीदा मिचकावत होती. जाताना "परत भेटू' म्हटल्यावर आपण उत्स्फूतपणे कधी म्हणालो. त्या कधीवर ती काय खळखळून हसली. एखाद्या निष्पाप बाळासारखी आणि तेवढ्यात तिच्या गालावरची खळी आपल्याला दिसली....
नाटकाचा दुसरा अंक रंगमंचावर चालू झाला. पडदा वर गेल्याचे तेवढे जाणवले... पुढचे काही आठवतच नाही. उरलेला दिड तास तीच तर दिसत होती. नाट्यगृहाच्या खिडकीपाशी गडबडीत येणारी, अखंड बोलणारी, खळखळून हसणारी, हसताना गालावरचे केस मागे सारणारी, नाटकाचा हाच तर अंक डोळ्यासमोर उभा राहिला अगदी पडदा पडेपर्यंत.
....................................................................
ती....(पडदा उघडला)
काय शामळू आहे. तिकिटासाठी रांगेत उभा होता. पण एखादी मुलगी सरळ येते तिकिट घेते म्हणजे काय. मख्खपणे तसाच होता. चम्याच दिसतोय. नंतर मध्यंतरात भेटला. शर्टाचे हातोबे कोपरापर्यंत दुमडलेले. नाटक बघायला आलात की मारामारी करायला असं विचारल्यावर नुसताच हसला. आत्तापर्यंत अनेक मुले बघितली. अगोदर मुलीकडे एकटक बघतात आणि मुलगी बघायला लागली की मग नजर फिरवतात. हा मात्र एकटक बघत होता. आपण नजरेला नजर दिली तर नजर फिरवेल असं वाटलं पण पठ्ठ्याने नजर फिरविली नाही. पाच मिनीटात आपण किती बडबडलो पण त्याने मान हलविण्याशिवाय दुसरं काही केलं नाही. जाताना भेटू म्हटल्यावर मात्र "कधी' किती उत्स्फूर्तपणे म्हणाला.
नाटक मध्यंतरानंतर पुढे सरकलंच नाही." कधी' एवढाचा त्यानं उच्चारलेला शब्द कानात घुमत राहिला आणि त्याची नजर टोचत राहिली. त्याचा चेहरा नजरेसमोरुन हललाच नाही, अगदी पडदा पडेपर्यंत.

मंगळवार, ३ नोव्हेंबर, २००९

लोकशाहीची लक्‍तरे.................

महाराष्ट्रातील 288 पैकी 184 आमदारांची संपत्ती पाच कोटींपेक्षा अधिक आहे तर अवघ्या सहा आमदारांची घोषित संपत्ती पाच लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे. लोकशाही ही धनिकांची बाटीक आहे हे पुन्हा एकदा अधोरेखीत झालं आहे. त्यामुळे आपण लोकशाहीचा का टेंभा मिरवतोय त्याचा गांभीर्याने विचार करायला हवा.


लोकशाहीची लक्‍तरे.................

एखादी व्यवस्था चांगली की वाईट हे व्यवस्थेमध्ये अंतर्भूत गोष्टींवर जितके अवलंबून असते त्यापेक्षाही जास्त ती व्यवस्था राबविणारे ती कशी राबवितात यावर अवंबून असते. व्यवस्थेतील त्रुटी राबविणाऱ्यांमुळे जर कमी होत असतील तर ती व्यवस्था चांगली म्हणायला पाहिजे, त्याचवेळी राबविणाऱ्या हातांतील व्यवस्था कठपुतळी बनत असेल, तर व्यवस्थेतच काही त्रुटी आहेत असे मानून ती व्यवस्था बदलायला हवी. मानवी चुका म्हणून व्यवस्थेची पाठराखण करणे म्हणजे तिच्या त्रुटींवर पांघरुण घालण्याचा प्रकार आहे. व्यवस्थेपेक्षा माणूस मोठा मानला गेला तरच व्यवस्थेकडे तटस्थ नजरेने बघता येऊ शकते.
लोकांनी लोकांसाठी लोकांकरवी चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही, अशी लोकशाहीची व्याख्या अब्राहम लिंकन यांनी जरी केली असली तरी तीही काही लोकशाहीच्या निर्मितीपुर्वी केलेली नाही. ज्या लोकशाही व्यवस्थेतनू ते अमेरिकेचे राष्ट्रपती बनले त्याच लोकशाहीची त्यांनी व्याख्या केली. (अमेरिकेचे ते 16 वे राष्ट्रपती बनले होते.) त्यामुळे ही व्याख्या काही अलीप्ततेतून आलेली नाही. ज्या व्यवस्थेचा लाभ उठवून सत्तास्थानापर्यंत ते पोहचले त्याचे गोडवे त्यांना गावे लागणार यात शंका नाही. जगभरातील राज्यशास्त्राच्या पुस्तकातून ती व्याख्या आहे तशी जरी शिकविली जात असली तरी त्यातील त्रुटीकडे फारसे लक्ष दिले जात नाही. यामागे एक तर ज्या देशांनी लोकशाही व्यवस्थेचा पुरस्कार केला आहे त्या देशांतील प्रस्थापींतासाठी लोकशाही ही प्रतिष्ठेची बनली आहे. लोकशाही मुल्य म्हणजेच मानवी मुल्य असाच एक अर्थ अधोरेखीत केला आहे. त्यामुळे त्याविरोधात बोलले तर सरळ राष्ट्रद्रोहच ठरतो आणि मग त्याच्यावर एक अलिखित बहिष्कार आणला जातो. आणि ज्या देशांनी लोकशाही स्वीकारलेली नाही तेथील जनतेच्या दृष्टीने ही व्यवस्था म्हणजे स्वर्गीय आहे, असंच वाटतं त्यामुळे ते त्याचा पुरस्कार करतात. त्यामुळे लोकशाही म्हणजे नेमके काय हेही पुन्हा एकदा तपासायला हवे.
लोकशाहीवादी सगळ्यात जास्त टेंभा मिरवतात ते व्यक्‍ती स्वातंत्र्य आणि समान संधी(?)बद्दल. व्यक्‍ती स्वातंत्र्य आणि समान संधी म्हणजे काय याच्या व्याख्याही त्यांनीच केल्या, त्या व्याख्या करताना व्यवस्थेचा लाभ सर्वांना न होता तो ठरावीक लोकांना व्हावा, याचा छुपा अजेंडा राबविण्यात आला. लहान मुलांना औषध कडू लागू नये म्हणून त्यावर साखरेचा मुलामा दिलेला असतो अगदी त्याचप्रमाणे लोकशाहीच्या व्याख्या करण्यात आल्या. त्या सकृतदर्शनी गोड वाटत असल्या तरी त्याच्या अंतरंगात कडवटपणा भरुन राहिला आहे. लहानमुलांना दिलेल्या औषधांचह रोगावर तरी उपाय होता पण इथे तर रोग्याला जगण्याचा अधिकारच नाकारला जातो आहे आणि ही वस्तुस्थिती आहे.
आज महाराष्ट्रातील 288 पैकी 184 आमदारांची संपत्ती पाच कोटी किंवा त्यापेक्षा अधिक आहे. लोकशाही मार्गाने निवडूण आलेल्या या आमदारांना 22 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक मतदारांनी पसंती दिलेली नाही. त्यामुळे जवळ जवळ 78 टक्‍के जनतेचे हे लोक प्रतिनिधीत्व करतात आणि कायदे मंडळाचे सदस्य म्हणून हेच लोक काम पाहाणार असतील तर त्यात ते जनतेचा किती आणि स्वतःचा किती विचार करणार हे स्पष्टच आहे. ज्या महाराष्ट्रातील साडे नऊकोटी जनतेचे हे लोक प्रतिनिधीत्व करताहेत त्यापैकी जवळपास निम्या लोकांना दिवसभर काम केल्याशिवाय संध्याकाळी जेवण मिळत नाही. (महाराष्ट्रात बालकामगारांची संख्या कमी दिसत असली तरी तीही सरकारी कागदपत्रांवरच, घर सांभाळणे आणि गुरांना चारायला घेवून जाणाऱ्या बालकांना शिक्षण नाकारुन कामालाच लावले जात आहे, या वस्तुस्थितीवर पडदा झाकला जातो.) दारिद्य्र रेषेखालील लोकांची संख्या त्यांच्या घरात असलेल्या चैनीच्या वस्तूवरुन ठरविणे आणि चैनिच्या गोष्टी कोणत्या हेही सरकारनेच ठरविणे हे म्हणजे नकाराला कायद्याचे पाठबळच देणे आहे. (आठवा महाराष्ट्रात एकेकाळी एका मंत्र्याने चहा म्हणजे चैनी मानलं होते). घरात टिव्ही आहे किंवा नाही यावरच जर दारिद्य्ररेषा ठरणार असेल तर सरकार किती नकारात्मक काम करते याकडे लक्ष जाते.
जवळपास 20 टक्‍क्‍यांहून अधिक जनतेसाठी प्राथमिक शिक्षण तर 60 टक्‍के जनतेसाठी उच्चशिक्षण हे मध्यमवर्गीयांसाठी शोरुममध्ये ठेवलेल्या चकचकीत गाडीसारखंच स्वप्न आहे. ती गाडी घ्यायला कोणाची ना नाही पण ती घेण्याची ऐपतच या समाजात नाही. किमान मध्यमवर्गीयांनी गाडी घ्यावी यासाठी लाखाची गाडी बाजारात येते पण इथे शिक्षण मिळूच नये म्हणून यंत्रणा काम करते आहे. (खासगी संस्थांतर्फे चालविल्या जाणाऱ्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना शुल्क ठरविण्याचा अधिकार संस्थांना देण्याचा सरकार विचार करत आहे.) आरोग्याबाबतीत तर यापेक्षा कमालीची वाईट अवस्था आहे.गरीबांना आणखी दारिद्य्रात कसं टाकता येईल, त्यांना लाचार कसं करता येईल यासाठी संपत्तीतून सत्ता आणि सत्तेतून संपत्ती हे सूत्र राबविले जात आहे.
लोकशाहीने सर्वांना समान अधिकार दिले आहेत. लोकशाहीने अधिकार दिले म्हणजे नेमके काय असा प्रश्‍न उपस्थित होतो, जे
अधिकार जन्मानं मिळतात त्याला लोकशाहीने मान्यता दिलेली आहे. पण हे अधिकार देताना त्यात पारदर्शकता ठेवलेली नाही. कल्याणकारी राज्यात सर्वांना संपत्ती मिळविण्याचा अधिकार असला पाहिजे, पण सर्वांना अधिकार म्हणजे सरकारातीलच सर्वांना असा काढला जात आहे. लोकशाही ही सध्या ज्ञात असलेल्या इतर राज्यपध्दतीपेक्षा चांगली असेलही पण ती काही परिपूर्ण नाही आणि जर तिलाच परिपूर्ण मानले तर त्यापेक्षा पुढे कसे जायचे... या राज्यपध्दतीपेक्षा आणखी चांगली व्यवस्था काळाच्या पोटात नक्‍कीच दडलेली असेल.....

गुरुवार, २९ ऑक्टोबर, २००९

पन्नास रुपडे......

माय! आजचा शेवटचा दिस हाय, आज जर पैसं दिलं नाय तर मास्तर शाळंत बसू देणार नाय.... बारा-तेरा वर्षाच्या पोरानं काकुळतीला येत आईचा पदर धरत तिला थांबवायचा प्रयत्न केला....ती थांबली... त्याच्या रडवेल्या चेहऱ्याकडे तिनं निमिषभर बघितलं पण त्याच्या डोळ्यात बघणं तिला पेलवलं नाही.... तिने पदराचा काठ त्याच्या हातातून सोडवला ...आणि निघून गेली...

बाई! पोरगं आठ दिस झालं, मागं लागलंया आज त्याला पैकं दिलं नायी तर त्येला मास्तर शाळंत बसू देणार नाय... म्होरल्या पगारातनं कापून घ्या की....भांडी घासता घासता ती ज्या घरी धुनं-भांडी करायची तिथल्या मालकीनीकडं तीनं पन्नास रुपयांची मागणी केली...
नाही गं ! आत्ता कुठले माझ्याकडे पैसे... आणि साहेबही बाहेरगावी गेलेत ना... तुला पुढच्या आठवड्यात पैसे देते काय... तिच्या पुढे आणखी चार भांडी आणून ठेवत मालकीनीनं नकाराची घंटा वाजवली.
मग, तीनं खूप गया-वया केली... पण मालकीनीनं काही पन्नासाची नोट तिच्या हातावर ठेवली नाही.... नंतर ती निघून गेली...
काही पोराचं शिक्षण बिक्षण थांबत नाही... हिलाच पाहिजे असतील पैसे, गावाला जायला... मालकीन स्वतःशीच पुटपुटली...
नंतर चार दिवस झाले तरी ती कामावर आली नाही...
मालकिनीचा संशय आणखी गडद झाला... कोणीतरी नक्‍की हिला पैसे दिले असणार आणि ही नक्‍की गावाला गेली असणार... पण आता मालकिनिला धुन्या-भांड्याचा कंटाळा येवू लागला होता.... ती आज नाही पण पुन्हा कधी येणार हे तरी कळावं म्हणून ती तिच्या घराकडं गेली...
त्या एवढ्याशा झोपडीत खूप माणसं बघून तिला काही सुचलं नाही.... तिनं शेजारच्या बाईकडं चौकशी केली....
बाई ! ती मेली....
मेली.... मालकिनीला आता भोवळ यायला लागली होती...
आवं परवाच्या दिशी पोराला पैकं पायजे म्हणून ती म्होरल्या बिल्डींगवर कामाला गेलती....असलं काम कवा केलं न्हवतं न्हवं......पाचव्या मजल्यावरनं पाय घसरला... खाली पडली.... जागच्या जागी गेली बघा.....
मालकिनीला काय करावं कळलं न्हायी.....ती घराकडे जाण्यासाठी वळली....
त्या झोपडीसमोरच तिचं ते पोरगं विटी-दांडूनं खेळत होतं.... त्याला बहुतेक मास्तरांनी शाळेतनं काढलं होतं.......

सोमवार, २६ ऑक्टोबर, २००९

खिडकी

ऑफीसला जाताना तो नेहमी त्या घरासमोर थांबायचा. त्या घराच्या दरवाजाचे ते मोठे कुलूप त्याला जितके अस्वस्थ करायचे, त्यापेक्षाही अधिक त्याला त्या दरवाजाशेजारील खिडकी अस्वस्थ करायची. बंद दरवाजाआडच्या खिडकीतील तिचा चेहरा बघितला की त्याला सुचायचं नाही.... चालताना त्याचा वेग तिथे मंद व्हायचा.. वळून वळून तो त्या खिडकीत बघत राहायचा आणि मग स्वतःला समजावत पुढे जायचा.... तो रोज त्या खिडकीकडे बघयाचा... ती नेहमी तिथेच असायची कधी शुन्यात नजर लावून बसलेली.... तर कधी तिच्या खिडकीत चढलेला मोगऱ्याच्या वेलाला कुरवाळत... त्याशिवाय ती वेगळं काही करताना दिसायची नाही...... कधी कधी तिच्या डोक्‍यावर पट्‌टी बांधलेली असायची....तर कधी चेहऱ्यावर ओरखडे असायचे....डोळे खोल गेलेल्या तिच्याकडे बघितलं की त्याला चिड यायची... अलिकडे तर तो त्या खिडकीत बघायचंही टाळायचा, पण त्याला ते जमायचं नाही... तिचा तो केविलवाणा चेहरा काही तरी मदत मागतोय, असं नेहमी त्याला वाटायचं... सरळ जावून ते कुलूप तोडावं, असं त्याला वाटायचं, पण त्याला धीर झाला नाही.... एकदा रविवारी तो असाच त्या रस्त्यावरुन चालला होता... तो दरवाजा उघडा होता आणि तीही खिडकीतही नव्हती.... तो खूप वेळ तिथं रेंगाळला पण त्या खिडकीत ना ती आली ना कोणतीही हालचाल दिसली, मग कंटाळून तो निघून गेला.... त्या रात्री त्याला झोप लागली नाही.... घरी काहीच करायला नव्हतं म्हणून ऑफीसला जायला तो लवकरच घराबाहेर पडला.... त्या घरापाशी आल्यावर एक चाळीशीचा माणूस त्या दरवाजाला कुलूप लावताना त्याला दिसला....त्याला वाटलं तो तिचा नवरा असावा.... तो थोडे मागेच थांबला मग त्याच्यामागून तो चालू लागला... बस स्टॉपवर आल्यावर त्याच्याशी काहीतरी बोलायचं म्हणून त्याने अमुक तमुक गाडी गेली का? विचारलं.... त्यानं शांतपणे नाही म्हटलं.... मग तो रोज त्याच वेळेत त्या बस स्टॉपवर यायचा ... त्याच्याशी बोलायचा
प्रयत्न करायचा पण तो बोलायचा नाही..... आता त्याला त्याचा राग यायला लागला.... त्याला खडसावून विचारायचं म्हणून त्यानं मनाशी पक्‍क केलं पण त्याचा भिडस्त स्वभाव त्याला साथ देत नव्हता.... तरीही एके दिवशी त्यानं त्याला बस स्टॉपवर गाठलंच .... त्यानं तिचा विषय काढताच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले....त्याने सरळ त्याला जाबच विचारला का? तुम्ही तिला कैद केलंय.... काय गुन्हा आहे तिचा.... त्याच्या चेहऱ्यावरचे रागाचे भाव मावळले....
तुम्हाला वेळ असेल तर चला माझ्याबरोबर , त्यानं विचारलं....
मग तो त्याच्यामागून परत त्याच्या घरी आला... त्यानं कुलूप काढलं, सोफ्यावर टाकलं.... ती खिडकीत तशीच होती...
त्यानं हाक मारली
"" मनू '' तीनं हू केलं नाही कि चू..... मग तो तिच्याजवळ गेला....मग त्याच्याजवळ
आला... जरा बाहेर थांबता तिनं कपडे ओले केले आहेत, तेवढे बदलतो.... त्याला त्याच्या नजरेला नजर देता आली नाही...तो बाहेर आला....परत मागे फिरुन त्याच्याशी बोलण्याचा त्याला धीर झाला नाही....

रविवार, २५ ऑक्टोबर, २००९

कायदा

हॅ, हॅ, हॅ करत ते अवघं दहा-बारा वर्षांचं पोरगं हात पुढे करत माझ्यासमोर आलं.... कपाळावर मळवट भरलेला, जटा वाढलेल्या, कमरेला चिंद्या गुडाळलेल्या... पायात मोठाले वाळे घातलेल्या त्या पोराकडे बघत मी काहीतरी देण्यासाठी खिशात हात घातला पण हाताला काहीच लागलं नाही... मी तसाच हात त्याच्या हातात देत खांदे उडविले.... ते पोरगं काही बोललं नाही. तसंच ते पुढच्या, मग पुढच्या असं करत त्या गोलाकार जमावात फिरत राहिलं... त्याची बहुतेक आई असावी ती, ढोलकीवर काठी फिरवत मधीच हॅ हॅ हॅ करत होती.....सगळ्या गर्दीत फिरल्यावर त्याच्या हाताला थोडी नाणी लागली.... ती समोरच्या त्या कपाटासदृश्‍य देव्हाऱ्यासमोर ठेवत त्याने त्यावर ठेवलेला चाबूक उचलला... मग हवेत दोन तीन फटके मारत त्याने समोरच्या गर्दीकडे बघितलं आणि स्वतःच्या अंगावर त्या चाबकाचे फटके मारायला सुरवात केली एक, दोन, तीन, चार...... अंगावर चाबकाचे फटके मारून झाल्यावर ते पोरगं पुन्हा त्या गर्दीकडे वळलं मघासारखा हात पुढे करत परत ते फिरलं.... मग आणखी थोडी नाणी त्याला मिळाली.... मघाची आणि आताची नाणी बघून ते हिरमुसलं त्यानं आईकडं बघितलं.... आईचं ढोलकीवर काठी फिरवत हॅ हॅ हॅ करणं सुरुच होतं........ मग त्याची आई समोर आली.... तिच्या हातात मोरपीसांचा पंखा होता....तिनं ती मोरपीसं त्याच्या दंडावर फिरवलं.... ती ते मोरपीस फिरवायला लागली तसं ते पोरगं कळवलं... पण त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले नाहीत.... भीतीने त्यानं अंग आक्रसून घेतलं.... पण त्याच्या आईनं एका हाताने त्याचा दंड पकडत दुसऱ्या दंडावर मोरपीस फिरवणं सुरुच ठेवलं...मग तिनं ते मोरपीस त्या देव्हाऱ्यावर ठेवत तिथली मोठी सुई उचलली.... त्याच्या हातावर ती बळेच दिली आणि ढोलकीवर काठी जोरात घासली.... आता ते पोरगं उठलं.. ती मोठी सुई त्यानं त्या गर्दीला दाखविली आणि दुडक्‍या चालीत स्वतःभोवती गिरकी घेत त्यानं ती आपल्या दंडा
वर टोचली..... ती सुई घुसली... रक्‍ताची चिळकांडी उडाली.... मी डोळे घट्‌ट मिटले... आता ते पोरगं पुढं झालं नाही... त्याची आई पुढे झाली.... कुणी नाणी टाकली... कुणी नोटा टाकल्या...तिने सगळे पैसे गोळा केले आणि डोक्‍यावर तो देव्हारा घेतला आणि चालू लागली..... तिचं ते पोरगं.... दंड चोळत तिच्या मागून चालू लागली..... गर्दी ओसरली.....रस्ता मोकळा झाला.... रस्त्याच्या पलीकडील घराच्या भिंतीवर लिहलं होतं... बालकांचा निरागसपणा हिरावून घेऊ नका...... बालकांना कामाला लावू नका....कायद्यानं बंदी आहे.....

गुरुवार, १५ ऑक्टोबर, २००९

ओझं

माई ! दिवाळी हाय, काय करंजी लाडू असत्याल तर घाला गरिबाच्या झोळीत..... वाड्याच्या अंगणात आलेल्या त्या भिकारणीकडे बघून तिचं मस्तक तापलं.... चल बाहेर हो आधी... चल... तिनं थरथरत्या आवाजात फर्मान सोडलं... पण ती हलली नाही आपली लाचार नजर तिच्याकडे टाकत तिथल्या पायरीवर ती पसरली.... हातातील ताटली समोर ठेवत तीनं माई द्या चा घोष लावला.... त्या भिकारणीचं ते पसरणं तिला आवडलं नाही.
चल म्हटलं ना! काही, मिळणार नाही.... उचल ती ताटली आणि निघ... तिनं शब्दात जितका जोर आणायचा तितका आणला....
पण तरी ती भिकारीण हालली नाही....
माई! आज दिवाळी हाय कालपसनं कायबी खाल्लं नाही.... खायाला कायतरी द्या... गरीबाचा आशीर्वाद लागंल.... घरात दुधा-तुपाच्या नद्या व्हातील.... त्या चौसोपी वाड्याकडं बघत ती असं काही बाही बडबडत राहिली....
आता मात्र ती अस्वस्थ झाली....तिला त्या भिकारणीला वाड्याबाहेर कसे घालवायचे हेच कळत नव्हतं.
ती पुन्हा जोरात खेककसली... चल बाहेर काही काही मिळणार नाही....
आपला केवीलवाणा चेहरा आणखी केवीलवाणा करत ती तिथंच बसून राहिली..
तिला हाताला धरावं आणि सरळ वाड्याबाहेर काढावं असं तिला वाटून गेलं पण तिच्या हातात ते बळ आलं नाही.....
भिकारणीनं आपल्या फाटक्‍या झोळीतील काहीबाही काढलं आणि ताटलीत टाकलं.... माई पानी तरी द्या....
आता मात्र कळस झाला.... हे खाऊन झाल्यावर जाणार ना येथून..तिनं विचारलं......भिकारणीनं मान डोलावली.....
तिनं कळकट मळकट तांब्यातून पाणी आणलं.... भिकारणीनं थोडं खाल्ल,पाणी प्यायली आणि आल्या वाटनं निघून गेली...
तिनं दरवाजा लावला.... त्या मोठ्या वाड्याचा दरवाजा थोडा करकरला आणि बंद झाला. बंद दरवजाकडं बघंत ती तिथंच थोडावेळ बसली.... मग उठली... काटी टेकत टेकत ती सोप्यात आली.... मग तिथं बसून राहिली.... दिवे लागणीची वेळ आल्यावर तिनं दरवाजा उघडला..... बाहेर सगळीकडे दिव्यांची झगमगाट होती...ती स्वतःशीच हसली... . तिने तुळशीपाशी आणि बाहेर एक एक दिवा लावला.....मग ती देवापाशी दिवा लावायला गेली.... जुन्या समईतील संपत आलेली वात तिने पुढे ढकलली आणि काडी पेटवली....समई लागली....मग तिच्या लक्षात आलं, अरे आज तर लक्ष्मीपूजन.... मग कनवटीची चार नाणी तिनं काढली आणि ती देवासमोर ठेवली....दिवाळीचा नैवैद्य काय दाखवावा, म्हणून तिला प्रश्‍न पडला... घरी काहीच नव्हतं... नंतर तिच्या लक्षात आलं मघाशी जी भिकारीण बसून गेली तिथं तिची एक करंजी तशीच पडलीय.... ती उठली आणि तिनं ती करंजी उचलली... त्या करंजीचं ओझं तिला तिच्या आयुष्यापेक्षा जास्त वाटलं.....

सोमवार, १२ ऑक्टोबर, २००९

डोळे......

खिडकीच्या काचेवर चोच मारणाऱ्या त्या चिमणीकडे बघून आईचा जीव कळवळला... तिला चार तांदळाचे दाणे टाक रे असं म्हणून तिने रोळी माझ्यासमोर ठेवली. मी माझ्या मुठीत मावेल तितके तांदूळ घेतले आणि खडीकीसमोर ते टाकले. ती चिमणी घाबरुन उडून गेली. मी हिरमुसून परत आलो... आई म्हणाली येईल थोड्या वेळाने लांब उभा राहा.... मी खूप वेळ तिची वाट बघितली पण पुन्हा ती काही आली नाही.... नंतर पुन्हा एक दिवस ती परत त्याच खिडकीत आली आणि काचेवर चोच मारत राहीली. मी आईला सांगितलं... आईनं लांबून हलक्‍या हाताने तांदूळ टाकले... चिमणी उडाली पण ती लांब गेली नाही... आजुबाजूचा अंदाज घेत टुणटुण उड्या मारत एक एक तांदूळ ती टीपत राहीली..... मग थोड्यावेळाने ती परत निघून गेली. मी आईला विचालं, ""आई ती परत येईल.? आई हो म्हणाली...
मग दुसऱ्या दिवशीही ती आली... मी अंगणात काहीतरी करत होतो.... आईनं हाक मारली. तुझी चिमणी आली बघ म्हणून मी धावत आलो... रोळीतील तांदूळ मुठभरुन घेणार इतक्‍यात आईनं कण्यांचा एक डबा माझ्यासमोर ठेवला.""यातील तांदूळ घालत जा'' आईन सांगितलं. मी मूठभर कण्या घेतल्या आणि आईनं जसं लांबून तांदूळ टाकले तसे टाकल्या... आता चिमणी घाबरली नाही...तिने धिटपणे काही दाणे टीपले आणि निघून गेली.... मग रोजचाच आमचा हा खेळ बनला.... रोज शाळेतून आल्यावर मी त्या खिडकीच्या काचेकडे बघत तासनतास बसायचो... ती येईल याची वाट बघत.... तीही नित्यनेमाने यायची.... मी तिला कण्या टाकायचो, ती त्या टीपायची आणि परत निघून जायची.... अलीकडे तर आई मी शाळेतून यायच्या वेळी खिडकीतच खावू ठेवायची. त्या चिमणीचा मुक्‍कामही आता वाढू लागला होता.... एकदिवस मी बघितलं की तिने खडकीच्या वरच्या कोपऱ्यात काही काटक्‍या गोळा करुन घर बांधलंय..... मग मी रोज त्या घरट्यात डोकाऊन बघयचो पण त्याला हात लावायचा नाही, असं आईनं बजावलेलं होतं, त्यामुळं त्याला हात लावायची इच्छा होऊनही मी हात लावला नाही... एक दिवस त्यात मला छोटी छोटी अंडी दिसली.... आईनं सांगितलं की काही दिवसांनी त्यातून पिलं बाहेर येतील म्हणून.... मी वाट बघायचो रोज आईला विचारायचो, आई रोज उद्या म्हणायची... आणि एक दिवस त्यातून चिवचिवाट सुरु झाला.... मी आनंदानं आईला सांगितलं... आईन त्या दिवशी मला रोळीतील तांदूळ घ्यायला मुभा दिली होती.... मग मी रोज संध्याकाळी त्या खिडकीपाशी बसून त्या इवल्याश्‍या चिमण्यांचा चिवचिवाट ऐकायचो.... आई ओरडायची....अभ्यासाला बैस म्हणून पण तिने कधी चिमणीला दोष दिला नाही.... चोचीच चोच घालून दाणे भरवणं बघितलं की मला मजा वाटायची.... माझ्यासाठी आईनही तोच प्रसंग कित्येकवेळा बघितला होता....
एका संध्याकाळी मी असाच शाळेतून पळत आलो.. दप्तर बाजुला टाकलं... आईनं खिडकीत शिरा आणि पाणी ठेवलं होतं. मी हातपाय न धुताच हातात प्लेट घेवून त्या खिडकीच्या कोपऱ्याकडे बघत होतो.... तिथं ते घरटंच दिसलं नाही.... मला काही कळलं नाही.... मी धावत आईला जावून विचारलं... आई खिडकीपाशी आली तिनं बघितलं ..... खिडकीच्या खाली ते काट्याकुट्यांचं घरटं पडलं होतं.... आणि जवळच काही पिसं पडली होती.....ती चिमणी चिवचिवाट करत इकडून तिकटे फिरत होती...खिडकीच्या काचेवर चोच मारत होती... आईनं माझ्याकडं बघीतल आणि मला कवळून घेतलं आणि तिने डोळ्याच्या कडा पुसल्या....आजही आईचे ते डोळे मला अस्वस्थ करतात.....