शुक्रवार, २० एप्रिल, २०१२

प्रिय,


खूप दिवसांनी पत्र लिहितोय. कशी आहेस? आठवण येत नव्हती, असे नाही आणि पत्र लिहायला घेतले नाही, असेही नाही, पण लिहिता मात्र आलं नाही हे खरं. तुम्ही शब्दांना कितीही चांगले मित्र माना पण, ते ऐनवेळी तुम्हाला मदत करतीलच असे नाही. खाऊसाठी भर बाजारात हट्‌टाला पेटून मटकन बसणाऱ्या पोरट्यांसारखे कधी ते भोकाड पसरून वाटेतच बसतील याचा नेम नाही; मग कितीही मिनत्या करा, ते ऐकायचे नाहीत, मग त्यांना झटका द्यावाच लागतो. त्या पोराला जशी चापट द्यावी लागते, अगदी तशीच चापट शब्दांना वेळेची द्यावी लागते, मग शब्द वठणीवर येतात. सांगितलेल्या वाक्‍यांच्या मार्गावरुन मग सरळ चालतात. आता हेच बघ ना! मागचे पत्र लिहून आता जवळपास वीस-पंचवीस दिवस होऊन गेले. या दिवसांत कितीतरी वेळा पेनाचे टोक कागदावर टेकवले; पण शब्द काही उमटले नाहीत. सांगायचे उरले नाही, असेही नाही, पण ज्या गोष्टी सांगायच्या त्या गोष्टी शब्दांची वस्त्रे घालायलाच तयार नव्हत्या. मग कितीतरी वेळा कागदावर रेघोट्या ओढून रात्र काढली. आता आजही सांगायचे खूप आहे. खूप लिहायचे आहे, पण तरीही हट्‌टी शब्द अडून बसलेतच की, आता एवढे गोंजारल्यावर ते नक्‍कीच शांत होतील असं वाटतं...
"तुला बोलायचं असतं एक आणि तू बोलतोस तिसरंच' हा तुझा आरोप मान्यच आहे. आजही बघ मला लिहायचे आहे एक आणि लिहितोय दुसरंच.
तुझी खूप आठवण येत आहे. खूप वाटतं... अगदी आता तुला समोर बसवावं आणि तुझ्या डोळ्यात डोळे घालून रात्रभर त्यात डुंबत राहावं.. हलकेच तुझ्या केसांतून हात फिरवावा...कोणीच बोलू नये... ना तू, ना मी....निःशब्दांतून शब्द उमटत राहावे आणि ते फक्‍त तुला आणि मलाच कळावे..... तुला आठवतं मी तुला काळी म्हटलेलं... आम्ही काही काळे नाही, गहू वर्णीय असं तुझं म्हणणं. ठिकच होतं, पण तरीही तुला चिडवायला मी काळीच म्हटलं होतं.. खरं तर काळी का म्हटलं होतं माहिती आहे तुला... काळा रंग सगळं पोटात घेतो.. क्षमा करण्याचा गुण काळ्या रंगात जितका आहे तितका कुणाच्यातच नाही. आणि जो या रंगाशी सलगी करतो तो या रंगासारखाच होऊन जातो.. म्हणून तू काळीच. आपल्या रंगात रमणारी.. आपल्या रंगाशी एकरुप असलेली...तुझा काळा रंग गडदतेतून आलेला... सगळे गडद रंग एकत्र करुन ते तुझ्यात भरले आहेत आणि ते इतके एकजीव आहेत की त्यामुळे तू काळी भासते आहेस... हा काळा रंग डोळ्यांत साठवून घ्यायचा आहे... अगदी काजळ घातल्यासारखा... मग दुसऱ्या दिवशी ऑफीसात कितीही लोकं कुजबुजू देत की अरे हा काजळ घालून आला की काय? एक दिवस वेडा होण्यातही मजा असते नाही का? नाही तरी तू मला वेडा म्हणतेसच की, कधी कधी...
तुझाच 

रविवार, १५ एप्रिल, २०१२

एक सांज अनुभवायलाच हवी

जगण्याचे संदर्भ बदललेत... एक एक मिनिट महत्त्वाचा ठरू लागलाय... कामं तर पाचवीला पुजल्यासारखीच मागं लागली आहेत... हात रिकामे म्हणून रिकामा वेळ म्हणायचा, तर तोही रिकामा कुठे आहे? मेंदूत तणाव निर्माण करणाऱ्या पेशी कॅन्सरसारख्या वाढत असतातच की! त्या स्वस्थ कुठे बसू देतात... मग एक दिवस सरतो... आठवडे सरतात... महिने, वर्षेही कधी सरून गेली हेच कळत नाही... मागे वळून बघितले तर पाऊलखुणाही दिसत नाहीत... खरं आहे ना!
जरा बाहेर पडून बघा... चैत्र फुललाय... झाडांची हिरवी-पोपटी पालवी सूर्याच्या डोळ्यांत डोळे घालून पाहत आहे... कधी पावसाळ्यात पाऊस आला म्हणून ज्या झाडाखाली थांबलो होतो, त्या झाडांना आता तांबड्या-पिवळ्या फुलांचे गुच्छ लगडलेले आहेत... तापलेले रस्ते मुजोर वाटताहेत खरे, पण ती मुजोरी नाही... नाराजी आहे. संध्याकाळी भरून वाहणाऱ्या रस्त्यांवर दुपारी कोणीच नसते याची... आणि नेहमी पश्‍चिमेच्याच दिशेकडून येणारे ढग आता कुठल्याही दिशेने येत आहेत. आभाळ काळ्या-निळ्या ढगांनी गच्च होत आहे... दिवसभर तापलेल्या धरित्रीवर जणू छत घालावे म्हणून ढग दाटीवाटीने बसलेले असतात... मग हलकेच टप टप करत टपोरे थेंब पडताहेत... कधी कधी गाराही पडताहेत... पण हे अनुभवायला थोडं बाहेर पडायला हवं. एक संध्याकाळ एकटेच रस्त्यावर येऊन फिरायला हवं... किमान खिडक्‍यांची दारे पडद्यातून मुक्‍त करायला हवीत.
चैत्र-वैशाखातला पाऊस हा श्रावणातल्या पावसापेक्षा वेगळा... त्याचा आवेग वेगळा... त्याची गती वेगळी... तो येणार याची खात्री नसते आणि जाताना काय नेईल याचा नेम नसतो; म्हणूनच तर तो कधी काय होईल हे सांगता न येण्यासारख्या आयुष्यासारखा असतो.. "अनप्रेडिक्‍टेबल'. तो येतानाही आवाज करत येणार आणि गेल्यानंतरही आपल्या खुणा मागे ठेवणार... ढगांचा गडगडाट आणि विजांचा लखखाट होतोय, ढग गच्च दाटून आलेत म्हणून तुम्ही घरातून बाहेर पडलाच नाहीत तर त्या दिवशी पाऊस यायचाच नाही आणि आज पाऊस नाही येणार म्हणून तुम्ही बाहेर पडावे आणि त्यावेळी हृदयाचा ठोका चुकविण्यासारखी सर्रकन वीज चमकावी आणि धबाबा पाऊस कोसळावा... खरी मजा इथे आहे... या पावसात एकदा भिजलं की मग अख्खा चैत्र-वैशाख कितीही आग ओकत राहिला तरी त्याचा राग येत नाही... चैत्रातील एक संध्याकाळ खरंच अनुभवायला हवी... अगदी पावसाच्या गच्च मिठीत शिरताना अंगावरचा "ब्रॅंडेड' ड्रेस भिजतोय, याची काळजी सोडायला हवी. चिखल बूट, सॅंडलला जरा लागलाच पाहिजे... डोक्‍यावरून ओघळणारे थेंब नाकाच्या शेंड्यावरून अलगद तोंडात घेताना जी मजा आहे ती पंधरा-वीस रुपयांच्या मिनरल वॉटरमध्ये नक्‍कीच नाही. पाकिटातील नोटांना तसेच भिजू द्यावे. बघा या महिन्यात एक संध्याकाळ अशी जगता येते का? संध्याकाळचा बाहेर पडणारा पाऊस मनात साठवता येतो का?... खरंच एक सांज अनुभवायलाच हवी!


** 14 एप्रिललच्या "सकाळ' मध्ये छापून आलेला माझा लेख....**

सोमवार, ९ एप्रिल, २०१२

भातुकली...

भातुकली...

त्याने तिला टपली मारली आणि तो आत गेला. बंगल्याच्या दारातच तिने आपला भातु कलीचा खे ळ मांडला होता. गोबऱ्या गालाची, कुरळ्या केसांची, ती चार-पाच वर्षांची मुलगी आपल्या बाहुलीला न्हाऊ-माखू घालत होती.
आत गेला तसा तो सैल झाला. सोफ्यावर अंग टाकून तो पडून राहिला. तू कधी आलास... घराची ती मालकीन असावी. अठ्‌ठेचाळीस-पन्नास वर्षांची असेल. काळ्या रंगाआड केसांचे वय लपविले असले तरी गालावर रुळणाऱ्या काही बटा चहाडी करतच होत्या. चेहऱ्यावर सुरकुत्यांनी खेळ मांडायची तयारी सुरू केली होती. गडद लालीने ओठांची कमान उगाच रुंद केल्याचे वाटत होते. त्याने तिच्याकडे बघितले आणि जोराचा सुस्कारा टाकला.
""बाहुलीला अंघोळ घालणं चालू होतं त्यावेळी आलो.आता ती जेवून झोपी पण गेली असेल. हा हा हा..''
त्याचा हा स्वभाव तिला माहीत होता. कोणत्याही गोष्टीकडे तो नेहमीच विनोदाच्या अंगाने बघायचा आणि मग स्वतःच मोठ-मोठ्याने हसायचा.. त्याच्या बोलण्यातला रोख तिला कळला. पण तिनं त्याकडे दुर्लक्ष केलं.
""चहा-कॉफी काय हवं''
तिचा साधा प्रश्‍न.
""काही नको. बघायला आलो होतो...''
त्याने सरळ मुद्द्याला हात घातला.
""बघितलंस ना मग कशी वाटली.''
तिने सहज राहण्याचा प्रयत्न केला, पण प्रयत्नच.
""छान आहे. सगळीच मुलं छान दिसतात. त्यात ही पण छान आहे. मला तिचा राग नाहीच..''
""जाऊ दे ना जयंता..'' तिने विषय टाळायचा प्रयत्न केला.
""जाऊ दे तर जाऊ दे... पण तरीही मला काही प्रश्‍नांची उत्तरं नाही मिळाली.
म्हणून आलो इथे..''
""मला तुझ्या काही प्रश्‍नांची उत्तरे द्यायची नाहीत.'' तिने स्पष्टपणे उत्तर देण्याचे टाळले..
"पण..'
"पण नाही आणि बिन नाही. जयंता आपलं काय ठरलं होतं. आपण एकमेकांच्या आयुष्यात डोकावायचे नाही.. मग तुझे हे प्रश्‍न का'
""का?''
जयंताने चेहरा त्रासिक करत प्रश्‍न विचारला.
""कारण ती माझं नाव लावणार आहे. आपला अजून घटस्फोट झालेला नाही, म्हणून.''
"हो! मग नाही लावणार ती तुझं नावं. तुझं नाव तिला लावण्यात मला स्वारस्य नाही.''
तिने तोडायचं म्हणून सांगून टाकलं.
""प्रश्‍न नावाचा नाही.. हे तुलाही माहीत आहे.''
जयंताने जितकं शांत राहता येईल तितकं शांत राहण्याचा प्रयत्न केला. तू उद्या आणखी दहा मुलं आणलीस आणि त्यांनी माझं नाव लावलं तरी मला हरकत नाही, हे तुलाही माहीत आहे. मला त्या मुलीविषयीही राग नाही.. पण हेच जर करायचं होतंतर मग...'
""मग काय''
"मग जणू तुला माहीतच नाही..''
जयंताने प्रश्‍न विचारायचा केविलवाणा प्रयत्न केला. पण तिने चेहरा बाजूला केला.
मघाशी भातुकली खेळणारी ती मुलगी आत आली. तिने डाव्या हातात बाहुली घट्‌ ट धरली होती. डोळ्यात करुणेशिवाय दुसरा भाव नव्हता. गालांवर उदासतेचे ढग दाटीवाटीने बसले होते. त्या मुलीने एकदा तिच्याकडे आणि एकदा जयंताकडे बघितले. मग तिने हलकेच हातातील बाहुली समोरच्या टेबलवर ठेवली आणि तिच्यापाशी आली. जयंता बघत होता. तिला न्याहाळत होता. तिने एकदा तिच्याकडे बघितले आणि नंतर जयंताकडे बघितले. मग हलकेच तिने जयंताच्या पायाला हात लावला आणि मग तिच्या पायाला.... जयंताला कळले नाही. काय होतंय ते.. तिने ती बाहुली उचलली आणि आपल्या खोलीकडे निघून गेली. जयंता तिच्या पाठमोऱ्या बाल मूर्तीकडे बघत राहिला.
"जयंता... मला वाटतं तुझ्या प्रश्‍नांची उत्तरं तुला मिळाली असतील..'
तिच्या या वाक्‍याने तो प्रचंड अस्वस्थ बनला. त्याच्या स्वप्नांना सुरुंग लागला होता. कोणीतरी त्याचा गळा आवळतोय असं वाटत होतं. तो तिच्याकडे बघत होता आणि स्वतःला शिव्या घालत होता. त्या क्षणी त्या घरात राहणं म्हणजे नरक वाटून तो ताडकन्‌ बाहेर पडला. दरवाजातून बाहेर येताना त्याचा पाय एका खेळण्याला लागला. चटकन त्याचं मन हललं. त्याने ते खेळणं उचललं. त्याला त्या मुलीची नजर आठवली आणि मग तिची. आयुष्यात एवढा मोठा भातुकलीचा खेळ त्याने बघितला नव्हता. जिवंत खेळण्यांनी खेळणाऱ्या तिच्या भातुकलीच्या खेळाचे तो एक खेळणे केव्हांच होऊन गेला होता. आता त्यात आणखी एका खेळण्याची भर पडली होती..
**पाडवा सृजनमध्ये प्रसिध्द झालेली माझी लघुकथा**


सोमवार, २६ मार्च, २०१२

प्रिय,

एवढा हतबल मी कधीच नव्हतो. जगण्याला आव्हान मानणारा मी आता त्याच्या हातातील कठपुतळी बनून गेलोय, असं वाटतं. तुझा नकार, तुझा होकार, तुझ्या नसण्यातील असणं आणि आता तुझ्या असण्यातील नसणं सगळंच असह्य होत आहे.... तू नव्हतीच तेव्हाची ती अपुरेपणाची भावनाही आपली वाटायची. आता मात्र ती अपुरेपणाची भावनाही राहिली नाही.. आता तुटलेपण जाणवते...मला माहीत आहे हे तुटलेपण तुलाही जाणवत असेल. तुलाही त्याच्या वेदना होत असतीलच पण तरीही हे अपुरेपण आता अवघड होऊन गेले आहे. जगण्याच्या लढाईला काही जखमा आवश्‍यक असतातच... आज मी या जखमाही हरवून बसलो आहे.. तुझ्या असण्यातील नसलेपण मला आता पोखरुन टाकेल... केवळ पोखरनार नाही तर तो मलाच खाऊन टाकेल की काय असे वाटू लागले आहे. बाहेर चैत्र फुलतोय आणि इथे मनात माझ्या पानगळती सुरू आहे.. विचित्रच सगळं... कधी कधी मला या कोवळ्या पानांचा हेवा वाटतो...सूर्य निर्दयीपणे आग ओकत असताना ही झाडांची कोवळी पालवी आपल्या एवढुशा छातीवर ती सूर्याचे अग्नीबाण कसे झेलतात.. याचे कौतुक वाटते...तू दुर्गा भागवतांचे ऋतुचक्र वाचलं असशीलच ना? त्यांनी सगळे ऋतु मांडलेत. पण बाईंही काही ऋतुंबाबत अज्ञानीच होत्या. नाही! एकटेपणा त्यांनीही अनुभवलाच पण तरीही एकटेपणा आणि नसलेपणा या दोन गोष्टी वेगळ्याच असतात ना? तुझं असून नसणं हे सगळ्यात वाईट... हाक पोचतेय पण हाक मारता येत नाही आणि तुलाही मागे वळून बघायचे आहे आणि बघता येत नाही... ही अवस्था दोघांचीही...एक दडपण आले आहे...वेदना कुरवाळण्यात काही अर्थ नसतो हे तुझं सांगणं मला मान्य आहे पण ते मनापर्यंत पोचत नाही.... हा चैत्र संपेल आणि वैशाख येईल आणि तो कायम राहील... कदाचित त्या वैशाखात कुठून तरी तू पुन्हा भरुन येशील.. ढगांसारखी... नाही तरी तुझा रंग ढगांसारखाच की... सावळा... देणारा.. आणि बरसून जाशील... काही काळ पुन्हा चैतन्य पसरले आणि मग पुन्हा आजच्यासारखा दाह....बरसून रिकामे होणे तुला जमते...मला नाही जमत... मला भरुन घेण्याची सवय लागली आहे.. आणि मग तो भरलेपणा सहन करत जगायचे... मोकळे नाही होता येत मला... मला तो शाप आहे.. तू बोलतानाही नुसताच ऐकायचो मी. तुझा हुंकार... तुझा दोन शब्दांमधला चड-उतार...काही शब्दांवर तू देत असलेला भर आणि मग प्रत्येक गोष्ट अगदी पहिल्यापासून शेवटापर्यंत सांगताना त्याचे तू केलेले विस्तारीकरण... प्रत्येक प्रसंग एक एक पायरीनेच सांगण्याची हातोटी.. मला नाहीच कधी जमली... मला जमले ते तुझे तूपण साठवण्यात...तुझी प्रत्येक गोष्ट साठवून ठेवण्यात... तो मिळणार नाही कधी.. ही जाणिव जीतकी घट्‌ट होत गेली तितकेच मी या साठवण्याकडेच जास्त लक्ष दिले... मला सांगायचेच बरेच काही राहून गेले.... हे साठवलेपण आता माझ्याबरोबरच जाईल... ज्या दिवशी अचानक तुझ्या हातातून एखादे भांडे पडून फुटेल, त्या दिवशी समज एक श्‍वास कायमचा थांबला..

तुझाच 

मंगळवार, १३ मार्च, २०१२

बांगड्या....

तिने कपाटातून पुन्हा बांगड्या काढल्या... त्या बांगड्या तिने डोळे भरून बघितल्या आणि फडताळात कोंबून ठेवल्या. जोरात दार लावले, लाकडी कपाटाचे ते दार पावसाळी हवामानामुळे फुगले होते. त्याचे दरवाजे घट्ट बसत नव्हते. तरी ताकदीने दोन्ही दरवाजे तिने लावले आणि त्याच्या कोयंड्याला कुलूप लावले. काही क्षण ती तिथेच बसून राहिली. मग कसल्या तरी आठवाने उठली आणि आवेगातच तिने घर सोडले. या बांगड्यांबद्दल वहिनींना सांगायलाच हवे. त्यांना किती आनंद होईल. त्यांनी प्रत्येकवेळी मदत केली. तिच्या डोक्‍यात विचार येत होते.. ती लगबगीने चालत होती... जणू पळतच होती... बंगल्याच्या दारात आल्यावर तिने दीर्घ श्‍वास घेतला. चेहऱ्यावरचा आनंद जितका लपवता येईल तितका लपवला आणि तिने बंगल्याची बेल वाजवली... वहिनींनीच दार उघडले... एवढ्या सक्‍काळी - सकाळी कशी ही म्हणून त्यांना आश्‍चर्य वाटले, पण त्यांनी ते चेहऱ्यावर आणू दिले नाही. ती आत गेली...
अगं, अजून भांडी नाही पडलीत... थोडा वेळ थांब... चहा घेणार का? वहिनी बोलत बोलत आत गेल्या... ती गप्प बसून राहिली... थोडा वेळ तसाच गेला. धीटाई करून आत जावे आणि वहिनींना सांगावे, असे तिला वाटले; पण आपलेच सुख आपण कसे सांगायचे म्हणून ती गप्प बसली... तिला सुख कुठल्या शब्दात व्यक्‍त करतात हेच माहीत नव्हतं...
वहिनी थोड्या वेळाने बाहेर आल्या... तशी ती पुढे झाली. तिचे डबडबलेले डोळे आता कोणत्याही क्षणी पाझरू लागतील अशी स्थिती होती... पण ती बोलली नाही. वहिनी काहीबाही सांगत राहिल्या... तिच्या कानावर ते शब्द पडत राहिले; पण डोक्‍यात काही गेले नाहीत.
भांड्यांचा ढीग बघून तिने पदर खोचला आणि ती कामाला लागली... एक-एक भांडे घासता-घासता तिच्या डोळ्यांतून अश्रूंची माळ वाहत होती. जणू कित्येक वर्षांपासून ती माळ तिच्या पापण्यांच्या आत तशीच होती आणि कुणीतरी हलकेच त्यातील धागा काढून टाकावा आणि एक एक मोती सरकत सरकत खाली यावा... अगदी तसेच... तिला काही क्षण ते अश्रू लपवावेत वाटले; पण तिने आज त्यांना आडवले नाही...
वहिनी कोणाला तरी सांगत होत्या... या आता भांडी घासताहेत. त्या खूपच सोशिक आहेत. नवरा लवकर गेला... यांनीच मुलाला वाढविले... धुणी-भांडी करून त्याला इंजिनिअर केले... सासूनं दिलेल्या दोन बांगड्या काय ते तिची मालमत्ता, ती पण तिने पोराच्या शिक्षणासाठी मोडून टाकली... पोरगंही हुशार निघालं... कॅम्पस इंटरव्ह्यूमधूनच त्याचे सिलेक्‍शन झाले... चार-पाच लाखांचे पॅकेज मिळाले; पण हिचे दुर्दैव काही संपले नाही. गेल्या चार महिन्यांपासून त्याने एक पत्र की फोन केला नाही. त्याला नोकरी लागली, त्यावेळी किती आनंदात होती ती. म्हणाली होती, ""वहिनी, पोरगं मिळवतं झालं... आता काय तुमच्याकडं येणं हुईल, असं वाटत नाही... पण माझ्या सासूनं दिलेल्या बांगड्या म्या मोडल्या. आता सुनंला चार बांगड्या घातल्या की माझं काम सपलं... त्यामुळे काही दिस तुमच्याकडं काम करायला लागंलच... ''
पोरगं एवढं मिळवतं झालं तरी हिचं काम काही सुटलं नाही बघा... सुनेला सोन्याच्या बांगड्या घालेपर्यंत हिचे हात तेवढे मजबूत राहू दे एवढीच प्रार्थना... एवढं कष्ट करून हिने पोराला वाढविलं... चांगला इंजिनिअर केला... पण आता त्याला आईची लाज वाटत असणार. त्यामुळेच फिरकला नाही. आला नाही तर नाही, पण चार पैसे तरी पाठवायचे... पण ते पण नाही... असली पोरं जन्माला येण्यापेक्षा निपुत्रिक असलेलं बरं... वहिनी ताड-ताड बोलत होत्या... वहिनी नेहमीच तिच्याविषयी मायेने बोलायच्या... पोरासाठी आपल्या पोराचा जुना सदरा हक्‍काने द्यायच्या... घरात काही चांगलं-चुंगलं केलं की पोरासाठी घेऊन जा म्हणून सांगायच्या... झेपेल तेवढी पैशाची पण मदत केली... पण वहिनींचे हे बोलणे तिला आज नाही आवडले... ती उठली आणि सरळ निघून गेली... वहिनींना काही समजले नाही...
दुसऱ्या दिवशीही ती वेळेअगोदरच आली... वहिनींना काही कळेना...
""अगं, तू जादा काम लावून घेतले आहेस की काय? तुझी तब्येत बघ किती तोळा-मासा झाली आहे. अशी जर तू काम करायला लागलीस तर आजारी पडशील आणि इथे तू आजारी पडलीस तर कोण आहे बघायला... तुझा तो पोरगा दीडशहाणा एकदा नोकरी लागली तो गेला तिकडेच... तू बसलीएस इथे सुनेला मी हे करणार - ते करणार करत. उद्या तो येईल बायकाबरोबर आणि सांगेल ही तुझी सून आणि हा तुझा नातू...'
वहिनी कळकळीने बोलत होत्या... ती गप्प बसली... काय करावे हेच तिला सुचत नव्हते... तिने तरी हिम्मत केली... कनवटीची चिठ्‌ठी काढली आणि वहिनींसमोर धरली... वहिनींनी चिठ्‌ठी वाचायला सुरवात केली..
प्रिय, आई
खूप दिवसांनी पत्र लिहितोय. तू रागावली असशील. पण काय करू... मागे एकदा शेजारघरी फोन लावला होता, त्यांना तुला बोलवायला सांगितले होते... पण काकांनी फोनच असा उचलला की तू त्या घरात यावी असं वाटलंच नाही. मग फोन करायचे सोडून दिले. काका फोनवर बोलले पण तसेच दुसरेही... ते बोलत नाहीत म्हणून त्यांना गृहीत धरण्यात अर्थ नाही. तुला वाचता येत नाही. त्यामुळे पत्र तरी कसं लिहिणार... पण आज ऑफिसमधलाच एक सहकारी तिकडे येतोय असं कळल्यावर त्याच्याकडून दिलं हे पत्र. तो दाखवेल वाचून... सोबत चार सोन्याच्या बांगड्या पाठविल्यात. दुकानदार मला म्हणाला, अरे बांगड्या घेताय पण हाताचे माप आणले नाहीत... मला तुझी मूर्ती आठवली... तुझ्या हाताचे माप काय आणि कसे द्यायचे हेच कळेना... मग मी सरळ माझ्या हातांचे माप दिले... माहीत आहे मला, त्या तुला मोठ्या होतील. पण त्या तुला नक्‍की वर्षभरात येतील. आणि हो... सोबत मी काही पैसे पाठविले आहेत... मीही पुढच्या महिन्यात दहा-बारा दिवसांची सुटी घेऊन येतोय... रागावू नकोस...
तुझाच..

या चिठ्‌ठीबरोबर तिने त्या बांगड्या वहिनींच्या हाती दिल्या... वहिनींनी त्या बांगड्या बघितल्या आणि एवढेच शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडले... हा मुलगा स्वतःच्या पोटाला खातो की आईच्या हातांना स्वप्नात बघून जगतो कळत नाही... त्याच्या पगाराच्या मानाने त्या बांगड्या खूपच महाग होत्या...

.................................
****सकाळ स्मार्ट सोबतीमध्ये 8 मार्चला छापलेली माझी लघुकथा

सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१२

प्रिय,

प्रिय,
रात्रीचे तीन वाजलेत. अंगभर कंटाळा आणि झोप दाटून आली आहे. पापण्यांना चहाचा टेकू आता देणे गरजेचे आहे. हा टेकूही फारकाळ टिकणार नाही, हे माहीत आहे; पण तरी तो द्यायला पाहिजे. आता जर असेच थांबलो, तर कोणत्याही क्षणी पापण्या खाली कोसळतील आणि त्या कोसळलेल्या पापण्यांचा आधार घेत मग एक-एक गात्र आपली हत्यारे टाकून देतील. जागे राहण्याची लढाई संपून जाईल आणि निद्रेची शांतता पसरेल. त्यामुळे चहाची आता आवश्‍यकता आहेच. प्रिंटिंग मशिनचा आवाज आता कानापर्यंत येऊ लागला आहे. धडधड करत एक एक पेपर बाहेर पडत असणार... वातावरणात माणसाच्या आवाजाचा लवलेशही नाही. मशिनची घरघर-घरघर आणि घरघरच ऐकू येत आहे. आणखी काही वेळ तरी जागे राहणे गरजेचे आहे. त्यामुळे कॅन्टीनचा दरवाजा खटखटवणे भाग आहे.

कॅन्टीनचा दरवाजा खटखटला तसा चहावाला पोऱ्या डोळे चोळत बाहेर आला. त्याने एकवार माझ्याकडे तिरस्काराच्या नजरेने बघितले आणि पुन्हा डोळे चोळले. मी काही म्हणण्याआगोदरच तो आत गेला. स्टोव्ह त्याने पेटवला. त्या स्टोव्हचा आवाज आता त्या मशिनच्या आवाजात मिसळला आहे. जणू त्या दोघांची जुगलबंदी चालली होती. पण ही जुगलबंदी फारकाळ टिकणारी नाही. चहाला उकळी फुटेल आणि स्टोव्ह गप्प होऊन जाईल... अगदी तसेच झाले... पोऱ्याने चहा आणून दिला आणि बाहेरची लाईट बंद करून निघून गेला. अस्ताव्यस्त मांडलेल्या खुर्च्यांमध्ये मी, माझा चहा आणि सोबतीला होते काळेभोर आकाश, त्यात टिमटिमणारे तारे, हलक्‍या पावलांनी प्रवास करणारा वारा आणि झाडांच्या मुळाशी रात्रीचे काही किडे.. बस बाकी काहीच नव्हतं. मी सरळ वर आकाशात बघितले, टिमटिमणारे तारे जणू माझ्याकडेच बघत असल्याचा भास झाला. प्रत्येक तारा वेगळा. त्याची तऱ्हा वेगळी. कोणी लांबवरचे तर कोणी जवळचे. कोणी फटकून राहणारे तर कोणी उगाच सलगी दाखविणारे... तोंड लपविणारेही काही तारे, तर काही तारे उगाचच आपला तोरा मिरविणारे... सगळेच तारे वेगळे... निराळे... आठवणींसारखे... प्रत्येक आठवणींची खासियत वेगळी... काही आठवणी जुन्याच होऊ नये वाटतात, तर काही आठवणींपासून आपण दूर होऊ पाहतो... तरीही त्या टिमटिमत राहतात... आपल्या असण्याची जाणीव सतत करून देत राहतात..आणखी तास दोन तासांनी सूर्याची काही किरणे आवेगात सगळ्या आकाशभर पसरतील आणि हे टिमटिमणारे तारे हळुहळु लुप्त होतील. तरी काही चावट तारका त्यातूनही आपले अस्तित्व दाखवत राहतील. आठवणींसारखेच..... मग सरळ सूर्यबिंब वर येईल आणि त्यापुढे त्या तारकेची धीटाई अपुरी पडेल. त्याच्या त्या प्रखरतेपुढे मान तुकवत तिलाही विरळ व्हावेच लागेल.... मग प्रतीक्षा अंधाराची... सूर्य मावळण्याची... .. आयुष्याचेही असेच असते ना? प्रत्येक प्रहर वेगळा त्याच्या गरजा वेगळ्या आणि त्याने मागितलेल्या आहुत्या वेगळ्या... प्रत्येक आहुतीनंतरच कळते की ती किती मोठी होती.. ... आता हे विचारांचे रंग कागदावर तसेच उमटतील का? हा प्रश्‍नच आहे. पण तसेच उतरावेत यासाठी प्रयत्न करतोय.... बघू जमेल कदाचित.... आज एक काळी रात्र आठवणींची रुपेरी किनार लेवून गेली हे मात्र निश्‍चित!

तुझाच....

शनिवार, १८ फेब्रुवारी, २०१२

प्रिय, प्रिय

प्रिय,
पहिले पत्र लिहिताना लगेच दुसरे पत्र लिहिण्याचे वचन दिले तर होते पण ते काही पाळता आले नाही. काही तरी खटोटोप करुन चार ओळी लिहिण्याचा मनोदयही केला होता, पण तेही जमलं नाही. आयुष्य असंच असतं. सगळीच गणितं आपल्या म्हणण्यानुसार सुटत नाहीत, काही फासे नकळत जास्त पडतात, तर कधी कमी पडतात. गुणाकार करायला जाताना ज्यादा आलेल्या अंकाना वजाबाकीत टाकावे लागते तर कधी भागाकारच जमत नाही. एकूण बाकी शुन्य काही येत नाही आणि गणित काही सुटत नाही. मग एका आकड्यांनी गणित सुटलं नाही म्हणून दुसऱ्या आकड्यांशी खेळ मांडायचा. अगदी शेवटपर्यंत डोक्‍याच्या शिरा ताणायच्या... पण तरीही गणित काही सुटत नाही. प्रत्येक माणसासाठी वेगळं गणित असतं हेच खरं आणि ज्याचा-त्यानं त्या गणिताचा फॉर्म्यूला शोधणं गरजेचं असतं. कधी कोणाला हा फॉर्म्युला सापडतो तर कधी कोणाला हा सापडत नाही. पण जोपर्यंत हा फॉर्म्यूला सापडत नाही तोपर्यंतचा प्रवास चालूच ठेवावा लागतो. हा नाही तर तो, तो नाही तर तो असे रोज नवे फॉर्म्यूले शोधत त्यात आकडे मांडून बसावे लागते किंवा मग गणितच सोडून देऊन होईल ते होऊ द्या, ही भूमिका घ्यावी लागते. माझं गणित तसं कच्चच त्यामुळे असे काही फॉर्म्यूले शोधत मी काही बसत नाही. जे आकडे येतात त्यांना मी हाय म्हणतो, आणि सरळ बाजुला निघून जातो. अनेकवेळा मग असे हे सुटलेले आकडे रात्री, अपरात्री डोळ्यासमोर येऊन नाच करतात, फेर धरुन नाचू लागतात. दरदरुन घाम सुटतो आणि डोक्‍यातील पेंशीचा रक्‍तप्रवाह आणखी गरम करतात, त्यावेळीही त्या आकड्यांना पकडून त्यांना त्याच्या जाग्यावर बसवावं आणि एका झटक्‍यात गणित सोडवून टाकावं, असं वाटतं खरं पण गणित चुकण्याचीच भीती मनाचा इतका ताबा घेते की मग नकळत हातातून हे आकडे कसे सुटतात हेच कळत नाही. मग पुन्हा प्रवास सुरु होतो आकड्यांना टाळण्याचा, त्यांच्यापासून तोंड लपविण्याचा.... अरे, पत्र लिहिण्यास वेळ का लागला एवढयाचे कारण एवढं मोठं लिहिणं म्हणजे जास्तच आहे ना ! जाऊ देत... पण खरे सांगू पहिले पत्र लिहिल्यानंतर दुसऱ्या पत्रात काय लिहायचे हेच कळेनासे झाले होते. कालच्या सगळ्या घटना आठवून बघितल्या. काय तुला सांगता येईल याची यादी करुन बघितली, पण तुला सांगण्यासारखं असं काहीच घडलं नाही. गाडी दोन वेळा पंक्‍चर झाली आणि बुटाची लेस सुटल्याने पडता-पडता वाचलो, या दोन घटना तशा तुला सांगण्यासारख्या होत्या, पण त्यातही गंम्मत अशी काही नव्हती. त्यामुळे काय सांगावे हा प्रश्‍न पडला... त्यामुळे पत्र दोन दिवस उशीरा लिहितोय... बाकी तुझं उत्तम चालंलं असेलच.....

तुझाच.... 

मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०१२

प्रिय,


खरे तर तिला खूप पत्रे लिहायची होती... पण धाडसच झालं नाही. अगदी खरं सांगायचं झाल्यास एक भीती होती.. तिला आवडलं नाही तर... आजही आहे पण आता तिला ही पत्रे धाडायचीच नाहीत... ती लिहायची आहेत फक्‍त माझ्यासाठी... खूप बोलायचं राहून गेलेलं बोलायचं आहे... म्हणून ही पत्रे... आता रोज एक पत्र लिहायचंच असं ठरवून ही पत्रे लिहिणार आहे. अगदी डेलीसोप सारखं... ती आहेत फक्‍त माझ्यासाठी आणि माझ्या मनातील तिच्यासाठी.... प्रेमपत्रात खरे तर एक अल्लडपणा असतो, अजाणतेपण असते. त्यातल्या भावना खऱ्या असतात आणि त्या दुसऱ्यांसाठी विनोदीही वाटू शकतात...

प्रिय,
खरं तर पहिल्याच पत्रात प्रिय लिहिताना हात अडखळतोय. पण तसंही काही हे पहिलं पत्र नाही. या पूर्वी एक पत्र लिहिलं होतं. त्यावर नावही नव्हतं. त्यावेळी तर नेमकं काय लिहावं हेच कळत नव्हतं. पण आता मात्र प्रिय लिहावं वाटू लागलं आहे. खरं तर प्रतिपासून प्रियपर्यंतचा प्रवास खूप अडखळणारा आणि मजेशीरही आहे. सगळेच मनाचे खेळ. पुढच्या माणसाला गृहीत धरुन चालणारे. आपल्याच नादात, विश्‍वात रमणारे. त्यामुळे यातील प्रिय शब्द तुझा कुठे आहे; तो माझा आणि केवळ माझा आहे. तुलाही मी प्रिय वाटलो पाहिजे, हा काही आग्रह नाही. (अपेक्षा मात्र आहेच) त्यामुळे तुला प्रिय आवडलं नसलं तरी ते तुझं नाही. त्यामुळे ते नावडण्याचा तुला अधिकारही नाही. त्यामुळे पुन्हा लिहितोच प्रिय....
पत्रास कारण की, खरेच पत्राला काही कारण आहे का? माहीत नाही. अगदी खरं सांगायचं झाल्यास कारण नाहीच..अकारण म्हण हवं तर. पण आपण मित्रांना, मैत्रिणींना फोन करतो त्या प्रत्येकवेळी कारण असतं का? नाही ना. अगदी तसंच. आपण मित्राला फोन करतो कारण, आपल्याला त्याला सांगायचं असतं की तुझी आठवण आली रे! अगदी तसंच तुझी आठवण आली, एवढंच कारण पुरेसं आहे. खरं तर तुझी आठवण कधी येतच नाही. फिल्मी डायलॉगप्रमाणे " मै तुम्हे भूलाही कहा हूू, की मुझे तुम्हारी याद आएं'. अगदी तसं काही नाही. खरेच असे काही क्षण असतात माणसाच्या आयुष्यात की आपण स्वतःलाही विसरतो. पण तेवढेच काही क्षण असतील, ज्या क्षणी मी तुला विसरलो असेन. तेवढेच. उर्वरित प्रत्येक क्षणी मला तुझी आठवणच तर असते की जिच्यावर मी जगतो आहे. आताही हे पत्र लिहिताना तू काय करत असशील, हा प्रश्‍न मला पडला आहेच. खरं तर ते जाणून घेण्याची इच्छा नसते, तरीही प्रश्‍न पडतो. का? याचे उत्तर मात्र देता येत नाही. खरंच का? माहीत नाही. तुझ्याभोवती रुंजी घालणाऱ्या क्षणांचा गुंजारव ऐकण्याची एक अनामिक इच्छा मात्र असते. त्या गुंजारवाचा नाद कानभर ऐकावा, त्यात गुरफटून राहावे, भाळून म्हण हवं तर, पण त्या नादात, मदहोशीत राहावे एवढे मात्र वाटते. म्हणून त्या क्षणांची ओढ. पहिलेच पत्र आहे. खूप काही लिहित नाही. उद्याही पत्र लिहायचे आहेच की.

तुझाच....

रविवार, ८ जानेवारी, २०१२

अनंता

अनंता

सहसा तो वैतागत नसे. कितीही मोठी गोष्ट झाली तरी हे असंच चालायचं असं त्याचं तत्त्वज्ञान. त्यामुळे पुढच्या माणसाच्या चुकांविषयी बोलण्यापेक्षा तो स्वतःच रस्ता बदलायचा. कोणत्याही गोष्टीचा स्वतःवर परिणाम होऊ द्यायचा नाही. पण आज मात्र त्याला हे ट्रॅफिक प्रचंड त्रास देत होतं. जनावरेही या माणसांपेक्षा नियम पाळतात, असं त्याला वाटून गेलं. मघाशी तर त्या रस्त्यात आडवी-तिडवी गाडी मारणाऱ्या पोराच्या मुस्काटात एक ठेवून द्यावी, असं त्याला वाटून गेलं; पण त्यानं रागावर नियंत्रण ठेवलं. आणखी अर्धा किलोमीटर अंतर गेलं की हायवे लागणार होता. पण गाड्या मुंगीच्या पावलाने पुढे सरकत होत्या. मध्येच मोटारसायकलस्वार घुसत होते. त्याच्या गाडीसमोर आडवे येत होते. तो वैतागत होता. जोराने हॉर्न वाजवत होता, पण त्यांच्यावर काहीच फरक पडत नव्हता. इंच इंच करत तो पुढे सरकत होता. त्याचा संयमाचा बांध आता फूटू पाहत होता. आता जर कोण आडवे आलं तर सरळ उतरून कानाखाली द्यायची असंच त्यानं ठरवलं; पण ती वेळ आली नाही. शहरातला गर्दीचा रस्ता संपला आणि तो हायवेला लागला. ऍक्‍सिलेटरवरचा त्याचा पाय नकळत दाबला गेला. गाडीने वेग घेतला. डोक्‍यातून अजून विचार जात नव्हते. गाडीच्या वेगाबरोबर विचारांचा गोंधळ वाढत होता.
रोजच्या सवयीप्रमाणे आजही त्याला पहाटे पाचलाच जाग आली. ऑफिसला आज जायचंच नाही असं ठरवून तो अंथरुणावर पडून होता. पण झोप काही येत नव्हती. रोजच्या दगदगीची शरीरालाही इतकी सवय होते, की मग आरामही नको वाटतो. सक्‍तीने दिलेला आराम शरीर स्वीकारत नव्हतं; पण तोही हट्टाने उठत नव्हता. एवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. नाईट शिफ्टमधल्या त्याच्या हाताखालच्या माणसाचा फोन असणार म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले. त्यात आज उठायचेच नाही, असं ठरवून तो पडून राहिला. दोन कॉल त्यानं उचललेच नाहीत. शेवटी फोन वाजायचा बंद झाला. सकाळी चहा पिताना त्याच्या लक्षात आलं. पहाटे कोणी तरी फोन केला होता. त्याने मिसकॉल बघितले; तर ऑफिसचा नंबर नव्हताच.
आईचेच दोन मिसकॉल होते. आता एवढ्या पहाटे कशाला आईने फोन केला असेल, याचा विचार त्याला स्वस्थ बसू देईना. काही अघटित तर घडलं नसेल ना?. त्यानं घाईघाईनं फोन केला. पण लागला नाही. आता त्याची अस्वस्थता प्रचंड वाढली. आई सहसा रात्री, पहाटे फोन करत नाही हे त्याला माहीत होतं. अनंतानं दंगाच जास्त केला तरच ती फोन करते. आजही एवढ्या पहाटे फोन करावा लागला याचा अर्थच काही तरी नक्‍की घडले असणार, असं त्याचं मन सांगत होतं, किंवा नेहमीप्रमाणे अनंतानं दंगा केला असेल आणि आईनं दटविण्यासाठी फोन लावला असणार, असंही वाटून गेलं. त्याला काही कळेना. शेवटी आईच्या फोनवर रिंग वाजली.
आईनंच फोन उचलला. हॅलो म्हटल्यावर ती एवढंच "म्हणाली... अनंता...'
याला काही कळेना, अनंताला काय झालं...? त्यानं दोनदा विचारलं. पण आई काही बोलली नाही. आता त्याचा बांध सुटायला लागला.
आईच्या "तुम्ही या इकडे' या सांगण्यातला त्याला अर्थ कळला. अनंताच्याच बाबतीत काहीतरी बरं-वाईट झालं असणार... नेहमीप्रमाणे त्यानं दंगा केला असता तर आईनं फोनवरच सांगितलं असतं. तिला आता त्याचं काही वाटत नाही. तीही या गोष्टींना सरावली आहे.

-------

समोरचा ट्रकवाला उगाचच हळू चालला आहे असं त्याला वाटू लागलं. त्यानं दोनदा कर्कशपणे हॉर्न वाजविला. तो बाजूला झाला. यानं ऍक्‍सिलेटरवरचा पाय आणखी जोरात दाबला. आता आई एकटी काय करत असेल? अनंता बरा असेल ना? याचा विचार करून करून त्याचं डोकं भंडावून गेलं होतं. दोन तासाचं अंतरही त्याला आता हजारो मैलांचं वाटू लागलं होतं. तो स्वतःशीच चिडत होता. वैतागत होता. रिकाम्या रस्त्याचाही त्याला राग येत होता. त्याची बायको गप्पपणे त्याच्या शेजारी बसली होती. त्याची होणारी तगमग ती बघत होती. ऍक्‍सिलेटरवरच्या पायाचा दाब वाढतच होता... अनंताचा चेहरा त्याच्या समोर आला.
बारावीला चांगले मार्क मिळाल्यावर त्याचे झालेले कौतुक... मेडिकलला ऍडमिशन मिळाल्यावर वडिलांनी खास त्याच्यासाठी घेतलेली मोटारसायकल. वडिलांच्या जाण्याने कोलमडून पडलेला... दोन दोन दिवस जेवणही नाकारलेला... डॉक्‍टर झाल्यावर आईनं केलेली नेमप्लेट बघून लाजलेला. साध्या साध्या गोष्टीत आनंद मानायचा. आईच्याच हॉस्पिटलमध्ये त्यानं प्रॅक्‍टिस सुरू केली होती. सगळं कसं चांगलं चाललं होतं आणि...
त्यानं कचकन्‌ ब्रेक दाबायचा प्रयत्न केला; पण समोर आडवं आलेलं कुत्रं त्याच्या गाडीच्या चाकाखाली आलंच. जीवाच्या अकांतानं ओरडत होतं गाडीखाली चिरडलेलं ते कुत्रं. त्यानं आरशातून मागे बघितलं. ते तडफडत तिथेच रस्त्याच्या मध्यभागी बसलं. एवढ्यात पाठीमागून येणारा ट्रक त्याच्या अंगावरून पुढे आला. आता ते मरून गेलं असेल किंवा त्याच्या नरड्यात राहिलेला प्राण बाहेर पडण्यासाठी तडफडत असेल. मग त्या मांसाच्या गोळ्यावरून एक एक करत अनेक वाहने जातील. रस्त्यावरच मग रक्‍त सुकेल आणि मग तिथे कधी काही घडले होते हेच कळणार नाही. त्याला दरदरून घाम फुटला. त्यानं घाम पुसण्याचा प्रयत्न केला. अनंताचा चेहरा त्याला आता आणखी छळू लागला. त्यानं गडबडीने गाडी लावली. दारात फारशी गर्दी नव्हती. सगळे व्यवहार नेहमीसारखेच सुरू होते. त्याच्या जीवात जीव आला. लिफ्ट खाली यायची त्यानं वाट बघितली नाही. पटपट पायऱ्या चढून त्यानं फ्लॅटला जवळ केलं. फ्लॅटच्या दारातही कसलीच गडबड नव्हती. त्यानं बेल वाजवली. आईनंच दार उघडलं.
त्याला बघताच तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. ""अनंता...'' एवढंच ती बोलली आणि त्याच्या छातीवर कोसळली. त्याला कळेना.
आईला त्यानं सावरत विचारलं...
""कुठाय?''
""बाथरुममध्ये... रात्री तीन - साडेतीनपर्यंत नाडी लागत होती, बघ.'' तो धावत बाथरुमध्ये शिरला. पाठोपाठ त्याची बायकोही. अनंताचा तो जडावलेला देह निस्तेज होऊन अस्ताव्यस्त पडला होता. त्याला रडूही येईना. काय होतंय हेच कळत नव्हतं.
""...रात्री एक वाजता बाथरुममध्येच पडला. त्यावेळीच कोमात गेला होता. शेजारच्या दोन-तीन घरांच्या बेल वाजविल्या. त्यांना नेहमीसारखं अनंता आरडाओरडा करत असेल असं वाटलं असणार. त्यामुळे कोणीच दरवाजा उघडला नाही. त्याच्या वाढलेल्या वजनामुळे त्याला उचलून मला आत काही आणता आले नाही. मग मांडीवर डोकं ठेवून सकाळ व्हायची वाट बघू लागले. तीननंतर तर नाडीही लागायची बंद झाली. काय करावे काहीच कळेना. तुला रात्री फोन करावा तर तू गडबडीने यायचास. म्हणून सकाळी फोन केला. या लोकांनी माझ्या लेकाचा जीव घेतला बघ. रात्री कोणी मदत केली असती तर जगला असता.'' आई सांगत होती. रडत होती. त्याच्या कानावर ते शब्द आदळत होते आणि मनात चलबिचल होत होती.

----

बाबा गेल्यानंतर अनंता आपली फारच काळजी करायचा. त्याचा राग यायचा. प्रत्येक गोष्ट त्याला सांगायला लागायची. मग चिडचिड व्हायची. असेच एकदा लिफ्ट सुरू करू नको म्हणून तो खाली उतरला होता. स्वतःला फार शहाणा समजतो, म्हणून लिफ्टचे गिअर सोडले आणि लिफ्ट दाणकन्‌ खाली आदळली. हा खाली बसला होता. पण तरीही लिफ्टची एक कडा त्याच्या डोक्‍याला लागलीच. त्याच्या डोक्‍यावर जो परिणाम झाला तो झालाच. लोकांना वाटलं, अपघात झाला. कोणालाच याच्यावर संशय आला नाही. पण रात्री-अपरात्री त्याला जाग आली की, त्याचं मन खायचं. आपणच त्याच्या या अवस्थेला कारणीभूत आहोत असं वाटून अपराधी वाटायचं. अनंताच्या निस्तेज चेहऱ्याकडे त्याला बघवायचेही नाही. नोकरीनिमित्त गाव सुटलं तसा तो विचार थोडा बाजूला सरला. त्याला त्या मघाशी ठोकरलेल्या कुत्र्याची आठवण झाली. त्यानं ठोकरल्यानंतर त्या कुत्र्याच्या अंगावरून ट्रक गेला होता. ट्रकने थोडाच त्या कुत्र्याचा जीव घेतला होता. तसेच अनंताच्या मृत्यूला आई शेजाऱ्या-पाजाऱ्यांना दोष देत होती. खरा तर त्याचा जीव त्यानेच तर चार वर्षांपूर्वी गिअर सोडविला तेव्हा घेतला होता... 

मोगॅम्बो ना खुश (कुश) हुआ

नागपूरमधल्या आपल्या निवासस्थानी आपल्या खुर्चीवर (सर्वसामान्य याला कोच म्हणतात) बसलेल्या राष्ट्रीय अध्यक्षांचा मोबाईल फोन वाजला. आता या क्षणी कोणाचा फोन म्हणून त्यांनी मोबाईलच्या स्क्रीनवर बघितले. डोके जेवढे चालविता येते, तेवढे चालवून बघितले; पण नंबर काही लक्षात येईना. मोहनदर्शन चारच दिवसांपूर्वी झाले होते, इतक्‍यात तिकडून बोलवणे येणे शक्‍य नाही, याची त्यांना खात्री होती. वरळीपासून परळीपर्यंत आता चिंता नव्हती, मग फोन कुठून असणार.
राष्ट्रीय अध्यक्षांना उगाचच राग आला. अरे, या मोबाईलवरून काहीच कळत नाही, फोन कुठला ते. लॅंडलाईन असेल तर नेमके कळते तरी की, फोन कुठल्या राज्यातील, कुठल्या गावातील. अध्यक्षांनी स्वतःच त्रागा करून घेतला. फोन उचलावा तरी पंचाईत आणि न उचलावा तरी. न जाणो, उत्तर प्रदेशमधील मंत्र्याबाबतच्या घोटाळ्याची बातमी द्यायला कोणी फोन केला असेल तर. पण तरीही त्याचा आता आपल्याला उपयोग नाही. आपल्याला काही त्याचा फार पाठपुरावा करायला जमणार नाही. पण आपले एक खंदे कार्यकर्ते आहेत की. एकदा का माहिती त्यांना मिळाली, की मंत्र्यांच्या डोक्‍यावरचे "किरीट' कसे खाली खेचायचे हे त्यांना चांगलेच कळते. त्यांना परस्पर हा नंबर द्यावा. पण न जाणो, आपल्यासाठी काही तरी असेल तर... सलग सातवा मिस कॉल पडल्यावर मग मात्र अध्यक्षांची चलबिचल झाली. आता फोन उचलायलाच हवा. या लोकांना कोण देतं हा पर्सनल नंबर कोण जाणे? राष्ट्रीय अध्यक्ष स्वतःशीच पुटपुटले आणि त्यांनी फोन कानाला लावला.
""नमस्कार साहेब, मी आपला... हा अमुक तमूक...''
""बोला काय काम होतं...?'' अध्यक्षांनी नाराजीचा सूर कायम ठेवला.
""काही नाही.. तुमची आठवण झाली. बाकी तुमचे आरोग्य मात्र आता चांगलेच दिसते आहे. जरा हलकेही वाटायला लागला आहात.''
राष्ट्रीय अध्यक्षांना ही स्तुती प्रचंड आवडली. त्यांनी आपले बाहेर आलेले पोट थोडे आणखी आत घेतले. कसंचं कसंचं ... भाव चेहऱ्यावर आणत आपल्या तलवारकट मिशांतून स्मित केलं; पण फोनवरून त्या माणसाला ते कळलं नाही.
साहेब चुकून रागावले की काय, असे वाटून त्यानं सरळ सांगून टाकलं.
""साहेब, आरोग्य योजनेबद्दल नाही बोलत, तर तुमच्या आरोग्याबद्दल बोलतो आहे.''
आरोग्य योजनेबद्दल... काय ही काय भानगड आहे. अध्यक्षांना नेमके कळेना, हा काय बोलतो आहे.
""काही नाही साहेब, परवाच्या त्या पक्षप्रवेशाने पक्षातील आरोग्य बिघडले असल्याची चर्चा सगळीकडे घडते आहे. आपल्याच कार्यकर्त्यांनी ज्यांच्या डोक्‍यावरचा "किरीट' उतरवला, त्यांनाच तुम्ही कमळाचा मुकुट घातला. लोकांची "आड'"वाणी'ही आता सरळ बोलू लागली आहे. ते मोठे साहेब यात्रा काढून आरोग्य सुधारण्याच्या गोष्टी करताहेत आणि तुम्ही येईल त्याला मुकुट घालताहात.''
""हेऽऽ हेऽऽ सांगण्यासाठी मला तू फोन केलास... या वेळी...?'' राष्ट्रीय अध्यक्षांनी घड्याळाकडे बघत पुन्हा दटावणीच्याच सुरात प्रश्‍न केला.
""नाही साहेब...'' फोनवरचा माणूस अगदी लीन होऊन म्हणाला. ""तिकडे कितीही चर्चा झाल्या तरी त्याचा आपल्याला कायपण तोटा नाही. पण "रेशीमबागेत' याबाबत चर्चा आहे.''
राष्ट्रीय अध्यक्ष ताडकन्‌ जाग्यावरून उठले. (खुर्चीला काही क्षण का होईना बरे वाटले) पुन्हा खाली बसले. ""कोण आहे तिकडे...?'' एक स्वयंसेवक पुढे झाला.
""काय रे काय? शाखेत माझ्याबद्दल काही चर्चा-बिर्चा असतात का?''
""नाही साहेब? पण एक डायलॉग मात्र नागपुरात आता प्रत्येक स्वयंसेवकाच्या तोंडात आहे.''
"काय?''
""मोगॅम्बो ना खुश (कुश) हुआ''

शनिवार, २४ डिसेंबर, २०११

आणखी एक दिवस बुडाला....

तो
आणखी एक दिवस बुडाला. हा सूर्य पश्‍चिमेला गेल्यावर एक अनामिक ओढ निर्माण होत आहे. सूर्याचा हा प्रवास थोडा वेगात करता आला तर... आयुष्य जर-तर वर चालत नाही. व्यवहाराच्या पक्‍क्‍या भिंतींनी आयुष्य कोंडलेलं असतं. कितीही म्हटलं तरी या भिंती मोडकळीला येत नाहीत. त्याची रंगरंगोटी होते एवढंच. आज ती कुठे असेल.. अशीच माझ्यासारखी कातरवेळी मनात हुरहूर घेऊन एकांतात बसली असेल, की कामाच्या ओझ्याखाली स्वतःला दाबून टाकून स्वतःलाच हरवून बसली असेल.. की, प्रश्‍नांच्या जंजाळात तिने स्वतःला अडकवून घेतले असेल. अनेक प्रश्‍न तिच्या मनात उमटत असतील.. मी का थांबलो नाही...? का, पुन्हा एकदा तिचा हात जोरात पकडून तिला सांगितले नाही की मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही... ? अर्ध्या वाटेत का सोडलं..? .जर सोडायचेच होते तर कशाला आशेचे मोरपंख लावायचे.. कितीतरी प्रश्‍न.. प्रश्‍नांचा कोळी तिच्याभोवती आपली जाळी विणत असेल आणि ती त्यातून स्वतःला सोडवत असेल....माहित नाही. कदाचित विसरूनही गेली असेल. नव्या वाटेवर नव्या सवंगड्याबरोबर खूष असेल. काहीच माहित नाही.... जगणं इतकं अवघड या पुर्वी कधीच नव्हतं. व्यवहाराच्या भिंती इतक्‍या उंच व इतक्‍या काळ्या कधीच भासत नव्हत्या, ज्यात साध्या मैत्रीच्या नात्यासाठीही झरोका नसावा. कालप्रवाहाचा हा वेग वाढावा, त्या प्रवाहाच्या आवेगात या भिंती कोसळाव्यात आणि जगण्याला एक निमित्त मिळावं. खरे, तर हीच भावना एक निमित्त आहे जगण्यासाठी!. कधीतरी या भिंती कोसळतील हीच एक आशा आहे. कालप्रवाहाचा वेग वाढवावा आणि त्याच्या खुणा अंगावर दिसाव्यात. जख्खड म्हातारपण यावं, जिथे समाजाच्या बंधनांचा पिळ सुटलेला असेल, खुपऱ्या झालेल्या डोळ्यातूनही जाणिवा प्रकट होतील, अगदी तिथपर्यंत पोचायचे आहे. हा आजचा एक दिवस बुडाला, असे अनेक दिवस बुडावेत आणि मग तो एकच दिवस उगवावा. जो एकच दिवस जगलो तरी आयुष्य तृप्त व्हावे.... आजचा आणखी एक दिवस बुडाला...

ती
आणखी एक दिवस बुडाला.....मावळतीचे रंग खूप फिके वाटताहेत आज. आजच नव्हे तर गेल्या कित्येक दिवसांत हा केशरी रंग केशरी वाटतच नाही. जणू आयुष्याचेच रंग फिके पडलेत की काय? असे वाटते. तो सोडून गेला याचे दुःख आहे, की त्याला जाऊ दिले हेच कळत नाही. हात सोडवून घेताना त्याचीही नक्‍कीच घालमेल झाली असेल, किंबहूना आपल्यापेक्षा जास्त त्याचीच घालमेल झाली असणार, हे निश्‍चित! वेड्यासारखं मरायचा. बोलायचा कमी, पण ऐकायचा खूप.. प्रेम करायचा... आणि ते जाणवूही द्यायचा. त्याच्या प्रेमाला प्रतिसाद द्यायला धीरच झाला नाही. ज्यावेळी द्यावा वाटला त्यावेळी त्याने हात सोडवून घेतला होता. मोरपंखी काही दिवस त्याच्या सहवासात गेले खरे पण त्याच्या आठवणींवर कसे जगायचे. व्यवहाराच्या भिंतीपलीकडील त्याची कुजबूज ऐकावी म्हटलं तरी ते शक्‍य नाही. रितेपणा जावणतो आहे सगळा... त्याच्या नसण्याचा... तो नव्हताच कधी; पण तो येण्याची एक आस होती. तीही मावळली.. या मावळतीच्या सूर्याप्रमाणे आता अंधार आणि मग त्यातून डोकावणारा चंद्र.. चांदण्या.. याच तर सोबतीला... प्रत्येक रात्र हवीहवीशी वाटावी... चांदण्याच्या जागा बदलताना, चंद्राच्या कला न्याहाळताना रात्र सरावी... डोळ्यात झोप असतानाही अशा कितीतरी रात्री जागून काढल्यात, रात्रीसारखी सखी नाही, तिच्या खांद्यावर डोके ठेवून कितीहीवेळ रडा, ती खुलासे मागत नाही. थोपटत राहाते. आजचा दिवस संपला... असे अनेक दिवस संपतील.. कधीतरी एक दिवस नक्‍की येईल, जो रात्रसखीप्रमाणे खुलासे मागणार नाही... व्यवहाराच्या भिंती इतक्‍या जोरात कोसळतील की पलीकडची कुजबूजच नाही तर त्याची हाकही ऐकू येईल...त्या एका दिवसासाठी असे अनेक दिवस जायला हवेत.... आजचा आणखी एक दिवस बुडाला.....

रविवार, २० नोव्हेंबर, २०११

चर्चा में युवराज

युवराजांनी टीव्ही बंद केला, रिमोट फेकून दिला आणि जोरात हाक मारली. चापलुसी करणाऱ्यांपैकी एक दोन जण धावत युवराजांच्या शयनकक्षात आले. युवराज अस्वस्थपणे येरझाऱ्या मारत होते. हातोपे मागे सारत होते, पुढे घेत होते. त्यांच्या गालावरची खळी आणखी खोल झाल्यासारखी दिसत होती. चापलुसी करणाऱ्यांना समजेना युवराज एवढे अस्वस्थ का आहेत? एकाने धीर केला आणि विचारलेच, साहेब काय झालं आहे? एवढी चिंता कशाची...? युवराजांनी एकदा चापलुसी करणाऱ्याकडे बघितलं.
अरे ! हे राज ठाकरे कोण? केवढा आहे त्यांचा पक्ष? किती राज्यात सत्ता आहे, किती आमदार, खासदार आहेत... बोला लवकर बोला...
साहेब फारसे काही नाही... महाराष्ट्र प्रदेशी 13 आमदार असलेला छोटा पक्ष आहे. आपल्या तुलनेत तर काहीच नाही. कुठे आपला पक्ष आणि कुठे राज ठाकरे यांचा पक्ष... चापलुसी करणारे जशी-जशी माहिती सांगत होते तसे युवराज संतापत होते...
अरे! एवढासा पक्ष आणि त्यांच्या नेत्याच्या भाषणाचे लाईव्ह प्रक्षेपण आणि आमची केंद्रात सत्ता, 9-10 राज्यांत सत्ता, तरी कोणी आमचे लाईव्ह भाषण दाखवत नाही, म्हणजे काय? आमच्या भाषणाची बातमी दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात आतल्या पानात कुठेतरी आणि राज ठाकरे काहीही बोलायला लागले की लाईव्ह. हे काही बरोबर नाही. आपलंही भाषण लाईव्ह झालं पाहिजे शोधा काय जादू असते त्यांच्या भाषणात, ज्यामुळे राज ठाकरेंचे भाषण लाईव्ह दाखविले जाते... शोधा...
चापलुसी करणाऱ्यापैकी दुसरा एक जण पुढे झाला, साहेब राज ठाकरेंसारखे आपले भाषण लाईव्ह व्हायचे असेल तर भाषण चर्चेत यायला हवे... काही तरी असं बोललं पाहिजे, की सगळ्या वर्तमानपत्रात त्याची मेन बातमी झाली पाहिजे... पुढचे चार-पाच दिवस सगळ्या वाहिन्यांवर त्याचीच चर्चा झाली पाहिजे... विरोधी पक्षाने हिरीरीने पुढे येत त्यावर बोलले पाहिजे.
युवराजांना स्वप्ने पडू लागली... सगळ्या चॅनेलवर आपलीच चर्चा... सगळे आपल्याविषयीच बोलताहेत... युवराजांनी सचिवाला भाषण लिहायला सांगितले, ""यावेळी असे भाषण लिहा, की साऱ्या वर्तमानपत्रांची मुख्य बातमी झाली पाहिजे, चार दिवस आपलीच चर्चा झाली पाहिजे.'' सचिवांनी भाषण लिहिले... खूप मोठे भाषण लिहिले... युवराजांनी एकदा वाचले आणि फाडून टाकले... यापेक्षा जोरकस लिहा... चर्चा लक्षात ठेवा... चर्चा झाली पाहिजे... सचिवाने पुन्हा भाषण लिहिले. युवराजांनी पुन्हा भाषण फाडून टाकले... सचिवाने तिसऱ्यांदा भाषण लिहिले. युवराजांना यावेळी भाषण आवडले नाही त्यांनी स्वतः पेन हातात घेतलं आणि एका टाकात भाषण लिहून टाकलं... आता हे भाषण केलं, की आपलीच चर्चा... केवळ उत्तर प्रदेशी नाही तर महाराष्ट्रदेशीही आपलीच चर्चा... युवराज आपल्याच स्वप्नात रंगून गेले.
भाषणाचा दिवस उजाडला... युवराज स्टेजवर माईकपुढे उभे राहिले, चापलुसी करणाऱ्या काहींनी घोषणा द्यायला सुरवात केली, युवराजांनी हातोपे वर केले आणि भाषण द्यायला सुरवात केली लोक बावरून बसले... युवराज बोलत सुटले... जोरकसपणे हातवारे करीत राहिले... भाषण संपवून युवराज खुर्चीवर येऊन बसले, कसं झालं भाषण... जोरकस झालं ना...? स्वतःवर खुश होत युवराजांनी विचारलं... चापलुसी करणाऱ्याने मान डोलावली युवराजांना घाई झाली हे टीव्हीवाले काय चर्चा करताहेत... त्यावर आपले लोक काय प्रतिक्रिया देत आहेत... युवराज घाई-घाईने घरी आले टीव्ही लावला... सटासट चॅनेल सर्फ केलं सगळीकडे युवराजच दिसत होते... युवराजांनी एका चॅनेलवर रिमोट स्थिर ठेवला... चर्चा में युवराज .. लोकांच्या भावनेला ठेच... लोकांची युवराजांनी माफी मागावी... युवराजांना कळेना आपलं काय चुकलं... त्यांच्या जोरकस भाषणाची चिरफाड सुरू होती आणि त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांकडून त्याबाबत खुलासा मागितला जात होता... पक्षाच्या नेत्यांना उत्तर देताना कठीण जात होतं... युवराजांच्या भाषणाने पक्षाला फायदा होण्याऐवजी तोटाच होण्याची शक्‍यता जास्त होती... युवराज बावरले... त्यांनी सचिवाला विचारलं, ठाकरे भाषण करतात त्यावेळी त्यांच्यावर स्तुतिसुमने आणि आपण बोललो की जाब, असं का? सचिव हळूच कानात बोलला... साहेब विरोधक खरं बोलण्यासाठी भाषण करतात आणि सत्ताधाऱ्यांना खरं लपवावं लागतं...

****"सकाळ'मध्ये 20 नोव्हेंबरला छापून आलेला माझाच लेख****