शनिवार, १८ फेब्रुवारी, २०१२

प्रिय, प्रिय

प्रिय,
पहिले पत्र लिहिताना लगेच दुसरे पत्र लिहिण्याचे वचन दिले तर होते पण ते काही पाळता आले नाही. काही तरी खटोटोप करुन चार ओळी लिहिण्याचा मनोदयही केला होता, पण तेही जमलं नाही. आयुष्य असंच असतं. सगळीच गणितं आपल्या म्हणण्यानुसार सुटत नाहीत, काही फासे नकळत जास्त पडतात, तर कधी कमी पडतात. गुणाकार करायला जाताना ज्यादा आलेल्या अंकाना वजाबाकीत टाकावे लागते तर कधी भागाकारच जमत नाही. एकूण बाकी शुन्य काही येत नाही आणि गणित काही सुटत नाही. मग एका आकड्यांनी गणित सुटलं नाही म्हणून दुसऱ्या आकड्यांशी खेळ मांडायचा. अगदी शेवटपर्यंत डोक्‍याच्या शिरा ताणायच्या... पण तरीही गणित काही सुटत नाही. प्रत्येक माणसासाठी वेगळं गणित असतं हेच खरं आणि ज्याचा-त्यानं त्या गणिताचा फॉर्म्यूला शोधणं गरजेचं असतं. कधी कोणाला हा फॉर्म्युला सापडतो तर कधी कोणाला हा सापडत नाही. पण जोपर्यंत हा फॉर्म्यूला सापडत नाही तोपर्यंतचा प्रवास चालूच ठेवावा लागतो. हा नाही तर तो, तो नाही तर तो असे रोज नवे फॉर्म्यूले शोधत त्यात आकडे मांडून बसावे लागते किंवा मग गणितच सोडून देऊन होईल ते होऊ द्या, ही भूमिका घ्यावी लागते. माझं गणित तसं कच्चच त्यामुळे असे काही फॉर्म्यूले शोधत मी काही बसत नाही. जे आकडे येतात त्यांना मी हाय म्हणतो, आणि सरळ बाजुला निघून जातो. अनेकवेळा मग असे हे सुटलेले आकडे रात्री, अपरात्री डोळ्यासमोर येऊन नाच करतात, फेर धरुन नाचू लागतात. दरदरुन घाम सुटतो आणि डोक्‍यातील पेंशीचा रक्‍तप्रवाह आणखी गरम करतात, त्यावेळीही त्या आकड्यांना पकडून त्यांना त्याच्या जाग्यावर बसवावं आणि एका झटक्‍यात गणित सोडवून टाकावं, असं वाटतं खरं पण गणित चुकण्याचीच भीती मनाचा इतका ताबा घेते की मग नकळत हातातून हे आकडे कसे सुटतात हेच कळत नाही. मग पुन्हा प्रवास सुरु होतो आकड्यांना टाळण्याचा, त्यांच्यापासून तोंड लपविण्याचा.... अरे, पत्र लिहिण्यास वेळ का लागला एवढयाचे कारण एवढं मोठं लिहिणं म्हणजे जास्तच आहे ना ! जाऊ देत... पण खरे सांगू पहिले पत्र लिहिल्यानंतर दुसऱ्या पत्रात काय लिहायचे हेच कळेनासे झाले होते. कालच्या सगळ्या घटना आठवून बघितल्या. काय तुला सांगता येईल याची यादी करुन बघितली, पण तुला सांगण्यासारखं असं काहीच घडलं नाही. गाडी दोन वेळा पंक्‍चर झाली आणि बुटाची लेस सुटल्याने पडता-पडता वाचलो, या दोन घटना तशा तुला सांगण्यासारख्या होत्या, पण त्यातही गंम्मत अशी काही नव्हती. त्यामुळे काय सांगावे हा प्रश्‍न पडला... त्यामुळे पत्र दोन दिवस उशीरा लिहितोय... बाकी तुझं उत्तम चालंलं असेलच.....

तुझाच.... 

मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०१२

प्रिय,


खरे तर तिला खूप पत्रे लिहायची होती... पण धाडसच झालं नाही. अगदी खरं सांगायचं झाल्यास एक भीती होती.. तिला आवडलं नाही तर... आजही आहे पण आता तिला ही पत्रे धाडायचीच नाहीत... ती लिहायची आहेत फक्‍त माझ्यासाठी... खूप बोलायचं राहून गेलेलं बोलायचं आहे... म्हणून ही पत्रे... आता रोज एक पत्र लिहायचंच असं ठरवून ही पत्रे लिहिणार आहे. अगदी डेलीसोप सारखं... ती आहेत फक्‍त माझ्यासाठी आणि माझ्या मनातील तिच्यासाठी.... प्रेमपत्रात खरे तर एक अल्लडपणा असतो, अजाणतेपण असते. त्यातल्या भावना खऱ्या असतात आणि त्या दुसऱ्यांसाठी विनोदीही वाटू शकतात...

प्रिय,
खरं तर पहिल्याच पत्रात प्रिय लिहिताना हात अडखळतोय. पण तसंही काही हे पहिलं पत्र नाही. या पूर्वी एक पत्र लिहिलं होतं. त्यावर नावही नव्हतं. त्यावेळी तर नेमकं काय लिहावं हेच कळत नव्हतं. पण आता मात्र प्रिय लिहावं वाटू लागलं आहे. खरं तर प्रतिपासून प्रियपर्यंतचा प्रवास खूप अडखळणारा आणि मजेशीरही आहे. सगळेच मनाचे खेळ. पुढच्या माणसाला गृहीत धरुन चालणारे. आपल्याच नादात, विश्‍वात रमणारे. त्यामुळे यातील प्रिय शब्द तुझा कुठे आहे; तो माझा आणि केवळ माझा आहे. तुलाही मी प्रिय वाटलो पाहिजे, हा काही आग्रह नाही. (अपेक्षा मात्र आहेच) त्यामुळे तुला प्रिय आवडलं नसलं तरी ते तुझं नाही. त्यामुळे ते नावडण्याचा तुला अधिकारही नाही. त्यामुळे पुन्हा लिहितोच प्रिय....
पत्रास कारण की, खरेच पत्राला काही कारण आहे का? माहीत नाही. अगदी खरं सांगायचं झाल्यास कारण नाहीच..अकारण म्हण हवं तर. पण आपण मित्रांना, मैत्रिणींना फोन करतो त्या प्रत्येकवेळी कारण असतं का? नाही ना. अगदी तसंच. आपण मित्राला फोन करतो कारण, आपल्याला त्याला सांगायचं असतं की तुझी आठवण आली रे! अगदी तसंच तुझी आठवण आली, एवढंच कारण पुरेसं आहे. खरं तर तुझी आठवण कधी येतच नाही. फिल्मी डायलॉगप्रमाणे " मै तुम्हे भूलाही कहा हूू, की मुझे तुम्हारी याद आएं'. अगदी तसं काही नाही. खरेच असे काही क्षण असतात माणसाच्या आयुष्यात की आपण स्वतःलाही विसरतो. पण तेवढेच काही क्षण असतील, ज्या क्षणी मी तुला विसरलो असेन. तेवढेच. उर्वरित प्रत्येक क्षणी मला तुझी आठवणच तर असते की जिच्यावर मी जगतो आहे. आताही हे पत्र लिहिताना तू काय करत असशील, हा प्रश्‍न मला पडला आहेच. खरं तर ते जाणून घेण्याची इच्छा नसते, तरीही प्रश्‍न पडतो. का? याचे उत्तर मात्र देता येत नाही. खरंच का? माहीत नाही. तुझ्याभोवती रुंजी घालणाऱ्या क्षणांचा गुंजारव ऐकण्याची एक अनामिक इच्छा मात्र असते. त्या गुंजारवाचा नाद कानभर ऐकावा, त्यात गुरफटून राहावे, भाळून म्हण हवं तर, पण त्या नादात, मदहोशीत राहावे एवढे मात्र वाटते. म्हणून त्या क्षणांची ओढ. पहिलेच पत्र आहे. खूप काही लिहित नाही. उद्याही पत्र लिहायचे आहेच की.

तुझाच....

रविवार, ८ जानेवारी, २०१२

अनंता

अनंता

सहसा तो वैतागत नसे. कितीही मोठी गोष्ट झाली तरी हे असंच चालायचं असं त्याचं तत्त्वज्ञान. त्यामुळे पुढच्या माणसाच्या चुकांविषयी बोलण्यापेक्षा तो स्वतःच रस्ता बदलायचा. कोणत्याही गोष्टीचा स्वतःवर परिणाम होऊ द्यायचा नाही. पण आज मात्र त्याला हे ट्रॅफिक प्रचंड त्रास देत होतं. जनावरेही या माणसांपेक्षा नियम पाळतात, असं त्याला वाटून गेलं. मघाशी तर त्या रस्त्यात आडवी-तिडवी गाडी मारणाऱ्या पोराच्या मुस्काटात एक ठेवून द्यावी, असं त्याला वाटून गेलं; पण त्यानं रागावर नियंत्रण ठेवलं. आणखी अर्धा किलोमीटर अंतर गेलं की हायवे लागणार होता. पण गाड्या मुंगीच्या पावलाने पुढे सरकत होत्या. मध्येच मोटारसायकलस्वार घुसत होते. त्याच्या गाडीसमोर आडवे येत होते. तो वैतागत होता. जोराने हॉर्न वाजवत होता, पण त्यांच्यावर काहीच फरक पडत नव्हता. इंच इंच करत तो पुढे सरकत होता. त्याचा संयमाचा बांध आता फूटू पाहत होता. आता जर कोण आडवे आलं तर सरळ उतरून कानाखाली द्यायची असंच त्यानं ठरवलं; पण ती वेळ आली नाही. शहरातला गर्दीचा रस्ता संपला आणि तो हायवेला लागला. ऍक्‍सिलेटरवरचा त्याचा पाय नकळत दाबला गेला. गाडीने वेग घेतला. डोक्‍यातून अजून विचार जात नव्हते. गाडीच्या वेगाबरोबर विचारांचा गोंधळ वाढत होता.
रोजच्या सवयीप्रमाणे आजही त्याला पहाटे पाचलाच जाग आली. ऑफिसला आज जायचंच नाही असं ठरवून तो अंथरुणावर पडून होता. पण झोप काही येत नव्हती. रोजच्या दगदगीची शरीरालाही इतकी सवय होते, की मग आरामही नको वाटतो. सक्‍तीने दिलेला आराम शरीर स्वीकारत नव्हतं; पण तोही हट्टाने उठत नव्हता. एवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. नाईट शिफ्टमधल्या त्याच्या हाताखालच्या माणसाचा फोन असणार म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले. त्यात आज उठायचेच नाही, असं ठरवून तो पडून राहिला. दोन कॉल त्यानं उचललेच नाहीत. शेवटी फोन वाजायचा बंद झाला. सकाळी चहा पिताना त्याच्या लक्षात आलं. पहाटे कोणी तरी फोन केला होता. त्याने मिसकॉल बघितले; तर ऑफिसचा नंबर नव्हताच.
आईचेच दोन मिसकॉल होते. आता एवढ्या पहाटे कशाला आईने फोन केला असेल, याचा विचार त्याला स्वस्थ बसू देईना. काही अघटित तर घडलं नसेल ना?. त्यानं घाईघाईनं फोन केला. पण लागला नाही. आता त्याची अस्वस्थता प्रचंड वाढली. आई सहसा रात्री, पहाटे फोन करत नाही हे त्याला माहीत होतं. अनंतानं दंगाच जास्त केला तरच ती फोन करते. आजही एवढ्या पहाटे फोन करावा लागला याचा अर्थच काही तरी नक्‍की घडले असणार, असं त्याचं मन सांगत होतं, किंवा नेहमीप्रमाणे अनंतानं दंगा केला असेल आणि आईनं दटविण्यासाठी फोन लावला असणार, असंही वाटून गेलं. त्याला काही कळेना. शेवटी आईच्या फोनवर रिंग वाजली.
आईनंच फोन उचलला. हॅलो म्हटल्यावर ती एवढंच "म्हणाली... अनंता...'
याला काही कळेना, अनंताला काय झालं...? त्यानं दोनदा विचारलं. पण आई काही बोलली नाही. आता त्याचा बांध सुटायला लागला.
आईच्या "तुम्ही या इकडे' या सांगण्यातला त्याला अर्थ कळला. अनंताच्याच बाबतीत काहीतरी बरं-वाईट झालं असणार... नेहमीप्रमाणे त्यानं दंगा केला असता तर आईनं फोनवरच सांगितलं असतं. तिला आता त्याचं काही वाटत नाही. तीही या गोष्टींना सरावली आहे.

-------

समोरचा ट्रकवाला उगाचच हळू चालला आहे असं त्याला वाटू लागलं. त्यानं दोनदा कर्कशपणे हॉर्न वाजविला. तो बाजूला झाला. यानं ऍक्‍सिलेटरवरचा पाय आणखी जोरात दाबला. आता आई एकटी काय करत असेल? अनंता बरा असेल ना? याचा विचार करून करून त्याचं डोकं भंडावून गेलं होतं. दोन तासाचं अंतरही त्याला आता हजारो मैलांचं वाटू लागलं होतं. तो स्वतःशीच चिडत होता. वैतागत होता. रिकाम्या रस्त्याचाही त्याला राग येत होता. त्याची बायको गप्पपणे त्याच्या शेजारी बसली होती. त्याची होणारी तगमग ती बघत होती. ऍक्‍सिलेटरवरच्या पायाचा दाब वाढतच होता... अनंताचा चेहरा त्याच्या समोर आला.
बारावीला चांगले मार्क मिळाल्यावर त्याचे झालेले कौतुक... मेडिकलला ऍडमिशन मिळाल्यावर वडिलांनी खास त्याच्यासाठी घेतलेली मोटारसायकल. वडिलांच्या जाण्याने कोलमडून पडलेला... दोन दोन दिवस जेवणही नाकारलेला... डॉक्‍टर झाल्यावर आईनं केलेली नेमप्लेट बघून लाजलेला. साध्या साध्या गोष्टीत आनंद मानायचा. आईच्याच हॉस्पिटलमध्ये त्यानं प्रॅक्‍टिस सुरू केली होती. सगळं कसं चांगलं चाललं होतं आणि...
त्यानं कचकन्‌ ब्रेक दाबायचा प्रयत्न केला; पण समोर आडवं आलेलं कुत्रं त्याच्या गाडीच्या चाकाखाली आलंच. जीवाच्या अकांतानं ओरडत होतं गाडीखाली चिरडलेलं ते कुत्रं. त्यानं आरशातून मागे बघितलं. ते तडफडत तिथेच रस्त्याच्या मध्यभागी बसलं. एवढ्यात पाठीमागून येणारा ट्रक त्याच्या अंगावरून पुढे आला. आता ते मरून गेलं असेल किंवा त्याच्या नरड्यात राहिलेला प्राण बाहेर पडण्यासाठी तडफडत असेल. मग त्या मांसाच्या गोळ्यावरून एक एक करत अनेक वाहने जातील. रस्त्यावरच मग रक्‍त सुकेल आणि मग तिथे कधी काही घडले होते हेच कळणार नाही. त्याला दरदरून घाम फुटला. त्यानं घाम पुसण्याचा प्रयत्न केला. अनंताचा चेहरा त्याला आता आणखी छळू लागला. त्यानं गडबडीने गाडी लावली. दारात फारशी गर्दी नव्हती. सगळे व्यवहार नेहमीसारखेच सुरू होते. त्याच्या जीवात जीव आला. लिफ्ट खाली यायची त्यानं वाट बघितली नाही. पटपट पायऱ्या चढून त्यानं फ्लॅटला जवळ केलं. फ्लॅटच्या दारातही कसलीच गडबड नव्हती. त्यानं बेल वाजवली. आईनंच दार उघडलं.
त्याला बघताच तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. ""अनंता...'' एवढंच ती बोलली आणि त्याच्या छातीवर कोसळली. त्याला कळेना.
आईला त्यानं सावरत विचारलं...
""कुठाय?''
""बाथरुममध्ये... रात्री तीन - साडेतीनपर्यंत नाडी लागत होती, बघ.'' तो धावत बाथरुमध्ये शिरला. पाठोपाठ त्याची बायकोही. अनंताचा तो जडावलेला देह निस्तेज होऊन अस्ताव्यस्त पडला होता. त्याला रडूही येईना. काय होतंय हेच कळत नव्हतं.
""...रात्री एक वाजता बाथरुममध्येच पडला. त्यावेळीच कोमात गेला होता. शेजारच्या दोन-तीन घरांच्या बेल वाजविल्या. त्यांना नेहमीसारखं अनंता आरडाओरडा करत असेल असं वाटलं असणार. त्यामुळे कोणीच दरवाजा उघडला नाही. त्याच्या वाढलेल्या वजनामुळे त्याला उचलून मला आत काही आणता आले नाही. मग मांडीवर डोकं ठेवून सकाळ व्हायची वाट बघू लागले. तीननंतर तर नाडीही लागायची बंद झाली. काय करावे काहीच कळेना. तुला रात्री फोन करावा तर तू गडबडीने यायचास. म्हणून सकाळी फोन केला. या लोकांनी माझ्या लेकाचा जीव घेतला बघ. रात्री कोणी मदत केली असती तर जगला असता.'' आई सांगत होती. रडत होती. त्याच्या कानावर ते शब्द आदळत होते आणि मनात चलबिचल होत होती.

----

बाबा गेल्यानंतर अनंता आपली फारच काळजी करायचा. त्याचा राग यायचा. प्रत्येक गोष्ट त्याला सांगायला लागायची. मग चिडचिड व्हायची. असेच एकदा लिफ्ट सुरू करू नको म्हणून तो खाली उतरला होता. स्वतःला फार शहाणा समजतो, म्हणून लिफ्टचे गिअर सोडले आणि लिफ्ट दाणकन्‌ खाली आदळली. हा खाली बसला होता. पण तरीही लिफ्टची एक कडा त्याच्या डोक्‍याला लागलीच. त्याच्या डोक्‍यावर जो परिणाम झाला तो झालाच. लोकांना वाटलं, अपघात झाला. कोणालाच याच्यावर संशय आला नाही. पण रात्री-अपरात्री त्याला जाग आली की, त्याचं मन खायचं. आपणच त्याच्या या अवस्थेला कारणीभूत आहोत असं वाटून अपराधी वाटायचं. अनंताच्या निस्तेज चेहऱ्याकडे त्याला बघवायचेही नाही. नोकरीनिमित्त गाव सुटलं तसा तो विचार थोडा बाजूला सरला. त्याला त्या मघाशी ठोकरलेल्या कुत्र्याची आठवण झाली. त्यानं ठोकरल्यानंतर त्या कुत्र्याच्या अंगावरून ट्रक गेला होता. ट्रकने थोडाच त्या कुत्र्याचा जीव घेतला होता. तसेच अनंताच्या मृत्यूला आई शेजाऱ्या-पाजाऱ्यांना दोष देत होती. खरा तर त्याचा जीव त्यानेच तर चार वर्षांपूर्वी गिअर सोडविला तेव्हा घेतला होता... 

मोगॅम्बो ना खुश (कुश) हुआ

नागपूरमधल्या आपल्या निवासस्थानी आपल्या खुर्चीवर (सर्वसामान्य याला कोच म्हणतात) बसलेल्या राष्ट्रीय अध्यक्षांचा मोबाईल फोन वाजला. आता या क्षणी कोणाचा फोन म्हणून त्यांनी मोबाईलच्या स्क्रीनवर बघितले. डोके जेवढे चालविता येते, तेवढे चालवून बघितले; पण नंबर काही लक्षात येईना. मोहनदर्शन चारच दिवसांपूर्वी झाले होते, इतक्‍यात तिकडून बोलवणे येणे शक्‍य नाही, याची त्यांना खात्री होती. वरळीपासून परळीपर्यंत आता चिंता नव्हती, मग फोन कुठून असणार.
राष्ट्रीय अध्यक्षांना उगाचच राग आला. अरे, या मोबाईलवरून काहीच कळत नाही, फोन कुठला ते. लॅंडलाईन असेल तर नेमके कळते तरी की, फोन कुठल्या राज्यातील, कुठल्या गावातील. अध्यक्षांनी स्वतःच त्रागा करून घेतला. फोन उचलावा तरी पंचाईत आणि न उचलावा तरी. न जाणो, उत्तर प्रदेशमधील मंत्र्याबाबतच्या घोटाळ्याची बातमी द्यायला कोणी फोन केला असेल तर. पण तरीही त्याचा आता आपल्याला उपयोग नाही. आपल्याला काही त्याचा फार पाठपुरावा करायला जमणार नाही. पण आपले एक खंदे कार्यकर्ते आहेत की. एकदा का माहिती त्यांना मिळाली, की मंत्र्यांच्या डोक्‍यावरचे "किरीट' कसे खाली खेचायचे हे त्यांना चांगलेच कळते. त्यांना परस्पर हा नंबर द्यावा. पण न जाणो, आपल्यासाठी काही तरी असेल तर... सलग सातवा मिस कॉल पडल्यावर मग मात्र अध्यक्षांची चलबिचल झाली. आता फोन उचलायलाच हवा. या लोकांना कोण देतं हा पर्सनल नंबर कोण जाणे? राष्ट्रीय अध्यक्ष स्वतःशीच पुटपुटले आणि त्यांनी फोन कानाला लावला.
""नमस्कार साहेब, मी आपला... हा अमुक तमूक...''
""बोला काय काम होतं...?'' अध्यक्षांनी नाराजीचा सूर कायम ठेवला.
""काही नाही.. तुमची आठवण झाली. बाकी तुमचे आरोग्य मात्र आता चांगलेच दिसते आहे. जरा हलकेही वाटायला लागला आहात.''
राष्ट्रीय अध्यक्षांना ही स्तुती प्रचंड आवडली. त्यांनी आपले बाहेर आलेले पोट थोडे आणखी आत घेतले. कसंचं कसंचं ... भाव चेहऱ्यावर आणत आपल्या तलवारकट मिशांतून स्मित केलं; पण फोनवरून त्या माणसाला ते कळलं नाही.
साहेब चुकून रागावले की काय, असे वाटून त्यानं सरळ सांगून टाकलं.
""साहेब, आरोग्य योजनेबद्दल नाही बोलत, तर तुमच्या आरोग्याबद्दल बोलतो आहे.''
आरोग्य योजनेबद्दल... काय ही काय भानगड आहे. अध्यक्षांना नेमके कळेना, हा काय बोलतो आहे.
""काही नाही साहेब, परवाच्या त्या पक्षप्रवेशाने पक्षातील आरोग्य बिघडले असल्याची चर्चा सगळीकडे घडते आहे. आपल्याच कार्यकर्त्यांनी ज्यांच्या डोक्‍यावरचा "किरीट' उतरवला, त्यांनाच तुम्ही कमळाचा मुकुट घातला. लोकांची "आड'"वाणी'ही आता सरळ बोलू लागली आहे. ते मोठे साहेब यात्रा काढून आरोग्य सुधारण्याच्या गोष्टी करताहेत आणि तुम्ही येईल त्याला मुकुट घालताहात.''
""हेऽऽ हेऽऽ सांगण्यासाठी मला तू फोन केलास... या वेळी...?'' राष्ट्रीय अध्यक्षांनी घड्याळाकडे बघत पुन्हा दटावणीच्याच सुरात प्रश्‍न केला.
""नाही साहेब...'' फोनवरचा माणूस अगदी लीन होऊन म्हणाला. ""तिकडे कितीही चर्चा झाल्या तरी त्याचा आपल्याला कायपण तोटा नाही. पण "रेशीमबागेत' याबाबत चर्चा आहे.''
राष्ट्रीय अध्यक्ष ताडकन्‌ जाग्यावरून उठले. (खुर्चीला काही क्षण का होईना बरे वाटले) पुन्हा खाली बसले. ""कोण आहे तिकडे...?'' एक स्वयंसेवक पुढे झाला.
""काय रे काय? शाखेत माझ्याबद्दल काही चर्चा-बिर्चा असतात का?''
""नाही साहेब? पण एक डायलॉग मात्र नागपुरात आता प्रत्येक स्वयंसेवकाच्या तोंडात आहे.''
"काय?''
""मोगॅम्बो ना खुश (कुश) हुआ''

शनिवार, २४ डिसेंबर, २०११

आणखी एक दिवस बुडाला....

तो
आणखी एक दिवस बुडाला. हा सूर्य पश्‍चिमेला गेल्यावर एक अनामिक ओढ निर्माण होत आहे. सूर्याचा हा प्रवास थोडा वेगात करता आला तर... आयुष्य जर-तर वर चालत नाही. व्यवहाराच्या पक्‍क्‍या भिंतींनी आयुष्य कोंडलेलं असतं. कितीही म्हटलं तरी या भिंती मोडकळीला येत नाहीत. त्याची रंगरंगोटी होते एवढंच. आज ती कुठे असेल.. अशीच माझ्यासारखी कातरवेळी मनात हुरहूर घेऊन एकांतात बसली असेल, की कामाच्या ओझ्याखाली स्वतःला दाबून टाकून स्वतःलाच हरवून बसली असेल.. की, प्रश्‍नांच्या जंजाळात तिने स्वतःला अडकवून घेतले असेल. अनेक प्रश्‍न तिच्या मनात उमटत असतील.. मी का थांबलो नाही...? का, पुन्हा एकदा तिचा हात जोरात पकडून तिला सांगितले नाही की मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही... ? अर्ध्या वाटेत का सोडलं..? .जर सोडायचेच होते तर कशाला आशेचे मोरपंख लावायचे.. कितीतरी प्रश्‍न.. प्रश्‍नांचा कोळी तिच्याभोवती आपली जाळी विणत असेल आणि ती त्यातून स्वतःला सोडवत असेल....माहित नाही. कदाचित विसरूनही गेली असेल. नव्या वाटेवर नव्या सवंगड्याबरोबर खूष असेल. काहीच माहित नाही.... जगणं इतकं अवघड या पुर्वी कधीच नव्हतं. व्यवहाराच्या भिंती इतक्‍या उंच व इतक्‍या काळ्या कधीच भासत नव्हत्या, ज्यात साध्या मैत्रीच्या नात्यासाठीही झरोका नसावा. कालप्रवाहाचा हा वेग वाढावा, त्या प्रवाहाच्या आवेगात या भिंती कोसळाव्यात आणि जगण्याला एक निमित्त मिळावं. खरे, तर हीच भावना एक निमित्त आहे जगण्यासाठी!. कधीतरी या भिंती कोसळतील हीच एक आशा आहे. कालप्रवाहाचा वेग वाढवावा आणि त्याच्या खुणा अंगावर दिसाव्यात. जख्खड म्हातारपण यावं, जिथे समाजाच्या बंधनांचा पिळ सुटलेला असेल, खुपऱ्या झालेल्या डोळ्यातूनही जाणिवा प्रकट होतील, अगदी तिथपर्यंत पोचायचे आहे. हा आजचा एक दिवस बुडाला, असे अनेक दिवस बुडावेत आणि मग तो एकच दिवस उगवावा. जो एकच दिवस जगलो तरी आयुष्य तृप्त व्हावे.... आजचा आणखी एक दिवस बुडाला...

ती
आणखी एक दिवस बुडाला.....मावळतीचे रंग खूप फिके वाटताहेत आज. आजच नव्हे तर गेल्या कित्येक दिवसांत हा केशरी रंग केशरी वाटतच नाही. जणू आयुष्याचेच रंग फिके पडलेत की काय? असे वाटते. तो सोडून गेला याचे दुःख आहे, की त्याला जाऊ दिले हेच कळत नाही. हात सोडवून घेताना त्याचीही नक्‍कीच घालमेल झाली असेल, किंबहूना आपल्यापेक्षा जास्त त्याचीच घालमेल झाली असणार, हे निश्‍चित! वेड्यासारखं मरायचा. बोलायचा कमी, पण ऐकायचा खूप.. प्रेम करायचा... आणि ते जाणवूही द्यायचा. त्याच्या प्रेमाला प्रतिसाद द्यायला धीरच झाला नाही. ज्यावेळी द्यावा वाटला त्यावेळी त्याने हात सोडवून घेतला होता. मोरपंखी काही दिवस त्याच्या सहवासात गेले खरे पण त्याच्या आठवणींवर कसे जगायचे. व्यवहाराच्या भिंतीपलीकडील त्याची कुजबूज ऐकावी म्हटलं तरी ते शक्‍य नाही. रितेपणा जावणतो आहे सगळा... त्याच्या नसण्याचा... तो नव्हताच कधी; पण तो येण्याची एक आस होती. तीही मावळली.. या मावळतीच्या सूर्याप्रमाणे आता अंधार आणि मग त्यातून डोकावणारा चंद्र.. चांदण्या.. याच तर सोबतीला... प्रत्येक रात्र हवीहवीशी वाटावी... चांदण्याच्या जागा बदलताना, चंद्राच्या कला न्याहाळताना रात्र सरावी... डोळ्यात झोप असतानाही अशा कितीतरी रात्री जागून काढल्यात, रात्रीसारखी सखी नाही, तिच्या खांद्यावर डोके ठेवून कितीहीवेळ रडा, ती खुलासे मागत नाही. थोपटत राहाते. आजचा दिवस संपला... असे अनेक दिवस संपतील.. कधीतरी एक दिवस नक्‍की येईल, जो रात्रसखीप्रमाणे खुलासे मागणार नाही... व्यवहाराच्या भिंती इतक्‍या जोरात कोसळतील की पलीकडची कुजबूजच नाही तर त्याची हाकही ऐकू येईल...त्या एका दिवसासाठी असे अनेक दिवस जायला हवेत.... आजचा आणखी एक दिवस बुडाला.....

रविवार, २० नोव्हेंबर, २०११

चर्चा में युवराज

युवराजांनी टीव्ही बंद केला, रिमोट फेकून दिला आणि जोरात हाक मारली. चापलुसी करणाऱ्यांपैकी एक दोन जण धावत युवराजांच्या शयनकक्षात आले. युवराज अस्वस्थपणे येरझाऱ्या मारत होते. हातोपे मागे सारत होते, पुढे घेत होते. त्यांच्या गालावरची खळी आणखी खोल झाल्यासारखी दिसत होती. चापलुसी करणाऱ्यांना समजेना युवराज एवढे अस्वस्थ का आहेत? एकाने धीर केला आणि विचारलेच, साहेब काय झालं आहे? एवढी चिंता कशाची...? युवराजांनी एकदा चापलुसी करणाऱ्याकडे बघितलं.
अरे ! हे राज ठाकरे कोण? केवढा आहे त्यांचा पक्ष? किती राज्यात सत्ता आहे, किती आमदार, खासदार आहेत... बोला लवकर बोला...
साहेब फारसे काही नाही... महाराष्ट्र प्रदेशी 13 आमदार असलेला छोटा पक्ष आहे. आपल्या तुलनेत तर काहीच नाही. कुठे आपला पक्ष आणि कुठे राज ठाकरे यांचा पक्ष... चापलुसी करणारे जशी-जशी माहिती सांगत होते तसे युवराज संतापत होते...
अरे! एवढासा पक्ष आणि त्यांच्या नेत्याच्या भाषणाचे लाईव्ह प्रक्षेपण आणि आमची केंद्रात सत्ता, 9-10 राज्यांत सत्ता, तरी कोणी आमचे लाईव्ह भाषण दाखवत नाही, म्हणजे काय? आमच्या भाषणाची बातमी दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात आतल्या पानात कुठेतरी आणि राज ठाकरे काहीही बोलायला लागले की लाईव्ह. हे काही बरोबर नाही. आपलंही भाषण लाईव्ह झालं पाहिजे शोधा काय जादू असते त्यांच्या भाषणात, ज्यामुळे राज ठाकरेंचे भाषण लाईव्ह दाखविले जाते... शोधा...
चापलुसी करणाऱ्यापैकी दुसरा एक जण पुढे झाला, साहेब राज ठाकरेंसारखे आपले भाषण लाईव्ह व्हायचे असेल तर भाषण चर्चेत यायला हवे... काही तरी असं बोललं पाहिजे, की सगळ्या वर्तमानपत्रात त्याची मेन बातमी झाली पाहिजे... पुढचे चार-पाच दिवस सगळ्या वाहिन्यांवर त्याचीच चर्चा झाली पाहिजे... विरोधी पक्षाने हिरीरीने पुढे येत त्यावर बोलले पाहिजे.
युवराजांना स्वप्ने पडू लागली... सगळ्या चॅनेलवर आपलीच चर्चा... सगळे आपल्याविषयीच बोलताहेत... युवराजांनी सचिवाला भाषण लिहायला सांगितले, ""यावेळी असे भाषण लिहा, की साऱ्या वर्तमानपत्रांची मुख्य बातमी झाली पाहिजे, चार दिवस आपलीच चर्चा झाली पाहिजे.'' सचिवांनी भाषण लिहिले... खूप मोठे भाषण लिहिले... युवराजांनी एकदा वाचले आणि फाडून टाकले... यापेक्षा जोरकस लिहा... चर्चा लक्षात ठेवा... चर्चा झाली पाहिजे... सचिवाने पुन्हा भाषण लिहिले. युवराजांनी पुन्हा भाषण फाडून टाकले... सचिवाने तिसऱ्यांदा भाषण लिहिले. युवराजांना यावेळी भाषण आवडले नाही त्यांनी स्वतः पेन हातात घेतलं आणि एका टाकात भाषण लिहून टाकलं... आता हे भाषण केलं, की आपलीच चर्चा... केवळ उत्तर प्रदेशी नाही तर महाराष्ट्रदेशीही आपलीच चर्चा... युवराज आपल्याच स्वप्नात रंगून गेले.
भाषणाचा दिवस उजाडला... युवराज स्टेजवर माईकपुढे उभे राहिले, चापलुसी करणाऱ्या काहींनी घोषणा द्यायला सुरवात केली, युवराजांनी हातोपे वर केले आणि भाषण द्यायला सुरवात केली लोक बावरून बसले... युवराज बोलत सुटले... जोरकसपणे हातवारे करीत राहिले... भाषण संपवून युवराज खुर्चीवर येऊन बसले, कसं झालं भाषण... जोरकस झालं ना...? स्वतःवर खुश होत युवराजांनी विचारलं... चापलुसी करणाऱ्याने मान डोलावली युवराजांना घाई झाली हे टीव्हीवाले काय चर्चा करताहेत... त्यावर आपले लोक काय प्रतिक्रिया देत आहेत... युवराज घाई-घाईने घरी आले टीव्ही लावला... सटासट चॅनेल सर्फ केलं सगळीकडे युवराजच दिसत होते... युवराजांनी एका चॅनेलवर रिमोट स्थिर ठेवला... चर्चा में युवराज .. लोकांच्या भावनेला ठेच... लोकांची युवराजांनी माफी मागावी... युवराजांना कळेना आपलं काय चुकलं... त्यांच्या जोरकस भाषणाची चिरफाड सुरू होती आणि त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांकडून त्याबाबत खुलासा मागितला जात होता... पक्षाच्या नेत्यांना उत्तर देताना कठीण जात होतं... युवराजांच्या भाषणाने पक्षाला फायदा होण्याऐवजी तोटाच होण्याची शक्‍यता जास्त होती... युवराज बावरले... त्यांनी सचिवाला विचारलं, ठाकरे भाषण करतात त्यावेळी त्यांच्यावर स्तुतिसुमने आणि आपण बोललो की जाब, असं का? सचिव हळूच कानात बोलला... साहेब विरोधक खरं बोलण्यासाठी भाषण करतात आणि सत्ताधाऱ्यांना खरं लपवावं लागतं...

****"सकाळ'मध्ये 20 नोव्हेंबरला छापून आलेला माझाच लेख****




रविवार, १३ नोव्हेंबर, २०११

डबल बेल...

बाईंनी पुन्हा घड्याळात बघितलं. आपल्या विस्कटलेल्या केसांवरून हात फिरवला, पण केस काही बसले नाहीत... साडी जरा सारकी-वारकी करायचा प्रयत्न केला, आणि बाई बसमध्ये चढल्या. कंडक्‍टरने डबल बेल मारली आणि जोरात घोषणा केली, "इथून पुढच्या प्रवासाला आता आणखी दोन रुपये तिकीटवाढ करण्यात आली आहे.' तिकीट दरवाढ ऐकल्यावर बसमध्ये कुजबूज सुरू झाली... हा अन्याय आहे? मागच्याच थांब्यावर तिकीट दरवाढ करण्यात आली होती. आता परत दरवाढ... अशक्‍य आहे... आम्ही तिकीट दरवाढ खपवून घेणार नाही, कपाळाला भगव्या पट्ट्या बांधलेल्या काही प्रवाशांनी जोरात घोषणा केली. या प्रवाशांबाबत लांब फटकून राहणाऱ्या काही हिरव्या पट्ट्या बांधलेल्या लोकांनीही अशीच घोषणा केली... बाई सगळं बघत होत्या... समजून घेत होत्या... तिकीट दरवाढीला विरोध करणाऱ्यांबाबत त्यांना आता "ममत्व' वाटू लागले तर... आता या सगळ्याच्या आंदोलनात बाईही पडल्या तर... अवघड होईल म्हणून कंडक्‍टर भांबावला होता... त्यानं आशेनं चालक सरदारजींवर नजर खिळविली... पण त्यांनी हूं की चूं केलं नाही... गाडीतील गोंधळ वाढतोय तसा त्यांनी आपली तुरबान आणखी खाली खेचत आवाज कानापर्यंत पोचणार नाही याची काळजी घ्यायला सुरवात केली. बाईंच्या हे ध्यानी आलं. त्यांनी आता या कालव्यात आपलाही आवाज मिसळायला सुरवात केली. तुरबानीतून आवाज पोहोचेपर्यंत आवाजाचा पिच मोठा करत त्यांनी घोषणा दिली... अन्यायी तिकीट दरवाढ मागे घेतलीच पाहिजे... तिकीट वाढ मागे घेतलीच पाहिजे... बसमधल्या साऱ्यांचेच लक्ष आता बाईंवर खिळून राहिले. बाईंनी दिलेल्या स्टेपनीवरच तर गाडी चालू आहे. त्यामुळे बाई म्हणताहेत त्या प्रमाणे तिकीट दरवाढ मागे घेतली जाईल... अशी सगळ्यांना अशा लागली... कपाळावर भगव्या पट्ट्या बांधलेल्या प्रवाशांना घाई झाली... बाईंनी आता स्टेपनी काढून घ्यावी... म्हणजे ही गाडी इथेच थांबेल... सरदारज
ी जातील आणि शेठजी गाडी चालवतील... त्यांनी मनाचे मांडे खायला सुरवात केली... बाईंच्या घोषणेने कंडक्‍टर गोंधळला. आता या वळणावर जर बाईंनी स्टेपनी काढून घ्यायचा निर्णय घेतला तर पुढचा प्रवास करायचा कसा... आणखी कोणाकडे स्टेपनी उपलब्ध होऊ शकते का? झाली तर ती किती काळ टिकेल... कंडक्‍टरच्या डोक्‍याचा भुगा झाला... तो सरळ सरदारजींच्या पाशी गेला... बाई नाराज आहेत... स्टेपनी मागितली तर... काही तरी उपाय केला पाहिजे... बाईंना समजावलं पाहिजे... सरदारजींनी आरशातून बघितलं... बसमध्ये गोंधळ सुरू होता... भगवे, निळे, हिरवे सगळे पट्टे बांधलेले तिकीट दरवाढीचा विरोध करत होते... त्यातून त्यांना बाई दिसल्या... बाई आपल्या कपाळावर आलेले केस मागे घेत जोरात घोषणा देत होत्या.... तिकीट दरवाढ मागे घेतलीच पाहिजे... घेतलीच पाहिजे, घेतलीच पाहिजे. त्यांचे काही सहकारी त्यांच्या घोषणेला साथ देत होते... आता हे सगळे जर ओरडत राहिले तर गोंधळ वाढणार हे बघून सरदारजींनी गाडी धाब्यावर थांबविली... बाईंसाठी लस्सी मागवली... लोकांना वाटू लागलं. बाई चर्चा करताहेत... तिकीट दरवाढ मागे घेतली जाणार... काहींना आनंदाच्या उकळ्या फुटल्या... भगवे पट्टेवाले चर्चा फिसकटण्याची वाट बघू लागले... आता चर्चा फिसकटेल... बाई स्टेपनी काढून घेतील... त्यांचे मनाचे मांडे सुरू झाले... धाब्यावरून गाडी सुटायला लागली... सरदारजींनी स्टार्टर मारला... बाई बसमध्ये चढल्या... आता साऱ्यांचीच उत्सुकता शिगेला पोचली... तिकीट दरवाढ मागे घेतली जाणार का? स्टेपनी काढली जाणार का? काही वेळ बाई बोलल्याच नाहीत... कंडक्‍टरने डबल बेल मारली... लोक कुजबुजायला लागले... बाईंनी घोषणा केली... पुढच्या थांब्यावर आणखी दोन रुपयांनी तिकीट दरवाढ होणार होती, माझ्यामुळे ती थांबली... भगवे पट्टेवाले, हिरवे पट्टेवाले, निळे पट्टेवाले मघाच्या घोषणा देऊन दमून गेले होते... कंडक्‍टरने पुन्हा डबल बेल
मारली... या वेळी सरदारजींनी बसमधले दिवे बंद केले... कोणी काही बोलत नव्हते, घोषणा नव्हत्या... कुजबुज नव्हती... होती ती केवळ झोप...!!

****"सकाळ'मध्ये 13 नोव्हेंबरला छापून आलेला माझाच लेख****

रविवार, ६ नोव्हेंबर, २०११

खाली डोकं वर पाय...

बाबांनी आपल्या काळ्या लांब वाढलेल्या दाढीवरून पुन्हा हात फिरविला आणि आपला डावा डोळा आणखी लहान करत मानेनं आणखी एक मुरका मारला... प्रेक्षकांतल्या काही बायका लाजल्या... "तो अब मै आप को शीर्षासन कर के दिखाता हुँ!' असं म्हणत बाबांनी आपलं खाली डोकं वर पाय केले... लोकांनी जोरात टाळ्या वाजवल्या... बाबांना नेमके काही कळेना... अरे मी इथे योग शिकवतोय आणि लोक त्याला सर्कस समजून टाळ्या काय वाजवताहेत... बाबा गरजले... "टाळ्या वाजवू नका, तुम्हीही करण्याचा प्रयत्न करा...' काही पोरा-सोरांनी प्रयत्न केला; पण तो पार फसला... बाबा पुन्हा पुन्हा स्टेजवर उड्या मारत होते... पोट आत घेत होते, बाहेर काढत होते... काही जण बाबांप्रमाणे करायचा प्रयत्न करत होते; तर बरेच जण बाबांचा स्टेज परफॉर्मन्स बघून हसत होते, टाळ्या वाजवत होते... बाबांनी मोठ्याने स्टेजवर उडी मारली आणि एका झटक्‍यात खाली डोके वर पाय केले आणि तशाच अवस्थेत घोषणा केली... या सरकारला असंच खाली डोकं वर पाय करायला लावीन... प्रेक्षकांनी जोरात टाळ्या वाजविल्या आणि बाबांना प्रोत्साहन दिलं...

बाबा मनोमनी खूश झाले... आपल्या वर्गाला येणाऱ्या प्रेक्षकांनी साथ दिली की मग झालं... बाबा गावोगाव सांगत सुटले... लोक त्यांचं ऐकायचे... त्यांच्या शीर्षासनाला टाळ्या ठोकायचे आणि घरी परतायचे... बाबांना वाटायचं, लोक आपल्या मागे आहेत, त्यांच्या जीवावर आपण सरकारला खाली डोकं वर पाय करायला लावू...
मग बाबा जोरात उड्या मारायचे... हातवारे करत सुटायचे... तिरकी मान करत डावा डोळा आणखी बारीक करत राहायचे.... शीर्षासन कसं आरोग्याला चांगलं आहे सांगायचे... देशासाठी, लोकांसाठी शीर्षासन सरकारला करावंच लागणार हे ते पुन्हा पुन्हा सांगत होते... लोक माना डोलवत होते... बाबा खूश होत होते... दिवस ठरला... स्टेज ठरलं... सरकारला धडा शिकवायला बाबांनी मुहूर्त बघितला... बाबांचा आवेग बघितल्यावर सगळ्यांनाच वाटायला लागलं, आता सरकारचे खाली डोके वर पाय होणार... सरकार घाबरणार... बाबा मनोमनी खूश होते... बाबा स्टेजवरून सांगत होते... आदेश देत होते... लोक पोट आत घेत होते, बाहेर काढत होते... बाबांना आता विश्‍वास आला, आता आपण सरकारला शीर्षासन करायला लावू... बाबा दाढीवरून हात फिरवत होते, डोळा बारीक करून प्रेक्षकांकडे बघत होते... आता सरकारचे शीर्षासन नक्‍की... रात्र चढत चालली तशी बाबांच्या स्टेजवरच्या उड्या वाढल्या... लोक पेंगाळून झोपले... पण बाबा मात्र कधी पोट आत घेत, कधी बाहेर सोडत... असंच बाबांनी पोट आत घेतलं आणि ते बाहेर काढणार इतक्‍यात सरकारच्या सैनिकांनी त्यांनाच स्टेजवरून बाहेर काढलं... बाबा तोंड लपवत-छपवत बाहेर आले... लोक चिडले... सरकारने बाबांचा घात केला... सैनिकांची कारवाई रात्री झाली... सरकारला काही सुचेना... बाबांचा महिमा कसा कमी करायचा... सरकारचा एक मानकरी पुढे झाला... बाबांच्या दाढीला हात घालायची त्यानं घोषणा केली... लोक बोलू लागले, आता बाबा आणि यांच्यात चकमक उडणार... बाबा सांगत राहिले, नखावर नख घासत राहा... केस काळे ठेवत राहा... मानकऱ्याच्या लक्षात आलं... लोकांना नखावर नख घासायला सांगणाऱ्या बाबांच्या दाढीचे दोन केस पांढरे आहेत... मानकऱ्याने लगेच ढोल वाजवायला सुरवात केली... बाबांच्या दाढीत पांढरे केस... बाबांचं हे काम एकट्याचे नसून "सांघी'क आहे... लोकांनाही बाबांच्या दाढीतले हे पांढरे केस दिसू लागले... लोक कु
जबुजू लागले... मानकऱ्याचे काम झाले... सरकारला संधी मिळाली... सरकारचं खाली डोकं वर पाय करण्याच्या गप्पा मारणाऱ्या बाबांचंच सरकारने खाली डोकं वर पाय केलं होतं... आणि त्यांच्या संघातलेच इतर जण "सर्कस' कशी झाली म्हणून टाळ्या वाजवत राहिले...!!

6 नोव्हेंबरच्या सकाळ मधील माझा लेख

रविवार, ३० ऑक्टोबर, २०११

पोपटपंची

सारथ्याने लगाम हातात घेतले आणि चाबूक मारला. घोडे उधळले... रथाने वेग घेतला. हवेत एक धुळीचा लोट उठला... कोणी म्हणाले, आता रथ हाकून काय उपयोग, फार वेळ झाला... कोणी म्हणाले, आता रथ हाकला तरी रथपत्यालाच त्याचा फायदा होईल असे म्हणता येणार नाही... काहींनी मात्र रथपती अजून कसे पट्टीचे रथपती आहेत आणि तेच कसे उद्या सिंहासनावर बसतील, हे ठासून सांगायला सुरवात केली... रथपती मात्र हवालदिल झाले होते... रथातून उठणाऱ्या धुळीपेक्षा या अशाच धुळीची वावटळं त्यांच्याभोवती फिरत होती... यातून मार्ग कसा काढायचा हेच त्यांना कळत नव्हतं... एवढ्यात...
नमस्ते, नमस्ते, नमस्ते....रथपतींकडे बघून पोपट जोरात किंचाळला.. त्या पोपटाकडे बघून रथपत्याने रथ थांबण्यिाचा आदेश दिला. हा पोपट खूप महान दिसतो. नाही तरी आपल्या मनात असलेला "नमस्ते' त्याला कसं कळलं. रथपती खाली उतरले. समोर पोपटवाला आपल्या पोपटाला डाळ खाऊ घालत होता.
महाराज... महाराज... रथपतींनी धोशा लावला... पोपटवाला खूश झाला. एवढा मोठा रथपती, पण आपल्यासमोर येऊन थांबल्याचे त्याला आश्‍चर्य वाटले. पण जमेल तितके आश्‍चर्य त्याने लपवले.
रथपतीने पुन्हा धोशा लावला...
महाराज... महाराज... नमस्ते सदा वत्सले केलं, यात्रा काढल्या, लोहपुरुषाची बिरुदावली मिरवून घेतली, अनेक जिने चढलो तरी माशी कुठं तरी शिंकते आहे. पंतप्रधानपदाची रेष काही हातावर उमटत नाही... काही तरी उपाय सांगा महाराज... उपाय सांगा? त्यांनी आपल्या थरथरत्या हाताने पोपटवाल्यासमोर "नोट' ठेवली. पोपटवाल्याने एकदा नोटेकडे आणि दुसऱ्यांदा रथपतींच्या चेहऱ्याकडे बघितले.
"लाल'बुंद चेहऱ्यावरची चिंतेची "कृष्ण' रेघ पोपटवाल्याला उठून दिसली.
पोपटवाल्याने नोट दाखवताच पोपटाने एक कार्ड चोचीत पकडले आणि पोपटवाल्याच्या हाती दिले.
""तुम्ही म्हणता तेवढं पक्षानं तुम्हाला दिलं नाही, लोकांना तुम्ही पुढं आणता, पण लोक मात्र तुमचं नाव घेत नाहीत. तुम्ही धाडसाचे, पण आता वय साथ देत नाही... "रामा'चं नाव सोडल्यापासून त्रास फार होतो आहे. ''
पोपटवाल्याने आपल्या तोंडाचा पट्टा सुरू केला. रथपतींची अस्वस्थता वाढू लागली. हा पोपट भलताच हुशार निघाला.
""महाराज भूतकाळ चांगला सांगितलात; पण भविष्याचं काय? पंतप्रधान होईन का नाही...?''
पोपटवाल्याने मघाशी ठेवलेल्या नोटेकडे पुन्हा बघितलं. रथपतींच्या रथाच्या मानाने "नोट अगदीच तोकडी होती. त्या नोटेकडे बघून काय भविष्य सांगायचं हेच त्याला कळेना.
""तुमची इच्छा फार, पण दैव साथ देत नाही. तुमच्या मार्गात चार चार ग्रह वक्री आहेत. त्यांची शांती केली पाहिजे. ''
""त्यासाठी उपाय काही महाराज... ''रथपत्याने आग्रह सोडला नाही.
""उपाय भारी आहे... पण झेपला पाहिजे. नागासाठी दुधाचा पूर आणला पाहिजे. मेद आणि मोद दोन्ही वाढले, की पदापर्यंत पोचण्याचा मार्ग आणखी कठीण... त्यामुळे तब्येत चांगली ठेवण्यासाठी "गड' सर केले पाहिजेत. ''
""महाराज मग तरी मार्ग सुकर होईल ना?''
""एवढं करूनही खरे तर सांगता येत नाही.''
""का का महाराज? आता आणखी काही अडचणी..?''
""अडचणी खूप आहेत.'' पोपटवाल्याने "नोटे'कडे पुन्हा लक्ष देत सांगायला सुरवात केली. ""अहो राहू आणि केतूचा अनिष्ट काळ चालू आहे. हे दोन्ही जोपर्यंत तुमच्या कुंडलीत आहेत तोपर्यंत या पदापर्यंत पोचणे अवघडच.''
""मग यावर काही उपाय...?''
""उपाय आहे, पण तो जालीम आहे. "भागवत' धर्माचा आधार घ्यायला पाहिजे... त्या मोहनासमोर नतमस्तक झालं की सगळं ठीक होतं. ''
पोपटवाल्याचा हा उपाय ऐकून रथपती उठले. त्यांनी पोपटवाल्याला नमस्कार केला आणि ते निघू लागले.
एवढ्यात पोपटवाला मोठ्याने बोलला,
""आणखी एक करायचे... लोकसभेत सरकार पाडण्यासाठी "नोट' कामाला आली नसली तरी चांगलं भविष्य ऐकण्यासाठी "चांगली नोट नकामी येते.''

***30 आक्‍टोबरच्या "ंसकाळ'मध्ये छापून आलेला माझा लेख***

उंटाचं पोर...

नदीच्या त्या पुलावरून जाताना त्याला नेहमी तिथं थांबावं वाटायचं. नदीच्या दोन्ही बाजूला पसरलेल्या त्या हिरवळीवर मस्त पडून राहावं, त्या हिरवळीवरून प्रतिबिंबित झालेली उन्हं अंगावर झेलावीत. रात्री तिथून चांदण्यांचा प्रकाश अंगावर ल्यावा, असं काहीबाही त्याला वाटत राहायचं. नदीवरील पुलावरून जाताना त्याची जी स्वप्नं सुरू व्हायची ती ऑफिस येईपर्यंत. स्वप्न बघणं हा त्याचा जणू नित्यक्रमच बनला होता. नदीपेक्षा तिचा किनारा त्याला फार आपला वाटायचा. त्या किनाऱ्यावर बसून दिवस अन्‌ दिवस घालवावा, असं त्याला वाटत राहायचं. पण ही स्वप्नांची माळ ऑफिसच्या दारात येताच विरून जायची. कामाच्या ओझ्याखाली माळेचे मणी पिचून जायचे. पण दुसऱ्या दिवशी परत ते मणी चमकत त्याच्या डोळ्यासमोर यायचे आणि त्यातील धाग्याप्रमाणे तो त्यात गुंगून जायचा. आजही त्यानं पुलावरून जाताना सहज त्या नदीकिनाऱ्याकडं बघितलं आणि त्याला आश्‍चर्य वाटलं. एक उमदा उंट... छे उंटीण असावी ती... तिच्यासोबत एक पिल्लूही होतं. अगदी तिच्यासारखंच... त्या किनाऱ्यावर होती... ती उंटीण कुणाचीही पर्वा न करता त्या कुरणात हिंडत होती. तिचं ते पिल्लू तिच्या मागे मागे करत होतं. त्यांच्या मागे दोन-तीन गाढवं आणि एखाद-दुसरी मेंढी. त्या हिरव्यागार हिरवळीवर मनसोक्‍तपणे चरणारी ती उंटीण, त्या गाढव आणि मेंढ्यांचे जणू नेतृत्वच करीत होती. कळपाच्या प्रमुखाप्रमाणे ती डौलदारपणे, आपल्याच मस्तीत चरत होती. त्यानं गाडी थांबविली आणि त्या उंटीणीला न्याहाळायला सुरवात केली... तपकिरी रंगाचे ते उमदे जनावर एखाद्या राजाच्या सांडणीस्वारांच्या
तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या सैनिकाने प्रेमाने वाढवावे त्याप्रमाणे असावे असे वाटले. तिचे ते भुरभुरीत केस नदीवरून वाहणाऱ्या वाऱ्यांना कुठलीच दाद देत नव्हते. कशाचीच तमा न बाळगता आपल्या ऐटीत ती उंटीण चरत होती आणि तिच्या मागून ते पिल्लू... ती गाढवं... आणि मेंढ्या...
ती उंटीण चरत होती त्याच्या पलीकडेच थोड्या अंतरावर काही माणसांची लगबग चालू होती. गेल्या पावसाळ्यात पुराने खचलेली जमीन भराव टाकून ते ती सपाट करत होते.
मग रोज तो त्या पुलावर थांबून त्या उंटीणीला आणि तिच्या पिलाला निरखायचा. ती उंटीण आणि तिचं ते विजातीय कुटुंब आपल्या मस्तीत त्या कुरणावर ताव मारायचं. ती उंटीण मध्येच आपल्या पिलाला चाटायची... त्याची माया करत राहायची..
आता त्या पलीकडचा भराव टाकून तिथं पालं उभी राहिली होती. कधी कधी तो आता त्या उंटीणीबरोबर त्या पालांकडेही नजर टाकायचा. त्या पालांतून खेळणारी मुलं आणि तेथील माणसांना निरखायचा. खरे तर त्यांच्या त्या मुक्‍त जगण्याचा त्याला हेवा वाटायचा. खास करून त्या पालातील "त्या' माणसाचा. तो त्या उंटीणीप्रमाणेच त्या पालांचा प्रमुख असावा. काळाकुट्ट, पिळदार शरीराचा, त्याच्या दंडावरचा तो काळा दोरा आणि उंटीणीच्या गळ्यातील काळी दोरी यामध्ये त्याला बरेच साम्य दिसायचे. तो पुलावर थांबून त्याला निरखायचा. शहरात फिरतानाही तो कुठे कुठे दिसायचा, कधी गटार खणताना, कधी कुठल्या इमारतीच्या बांधकामावर काम करताना, तर कधी त्या उंटीणीवर पोरांना बसवून फेरफटका मारताना... अलीकडे तो त्याच्याकडे बघतो हे त्यालाही कळले होते. त्यामुळे तोही याच्याकडे बघून ओळखीचा हसायचा, पण दोघांत बोलणं व्हायचं नाही. कधी कधी रात्री ऑफिसमधून परतताना त्याच्या पालाशेजारी लावलेली शेकोटी त्याला दिसायची. त्या शेकोटीभोवती तो आणि त्याची बायको आणि त्याची ती दोन चिल्लीपिल्ली दिसायची. त्या कडाक्‍याच्या थंडीत ती तिथंच झोपलेली असायची. कधी अंगावर पांघरुण असायचे तर कधी तेही नसायचे. तो मात्र रात्रीच्या जागत्यासारखा त्या सगळ्यांसाठी जागा असायचा. ती उंटीण आणि तिचं पिल्लूही तिथेच असायचे... थंडी संपली तसे ते नदीभोवतीचं ते गवतही आता खुरटलं होतं. उन्हाच्या सरळ किरणांना ती उंटीण जुमानायची नाही. खरे तर ती सरळ किरणांना आपल्या तिरप्या मानेवर झेलत जणू आव्हान द्यायची... भर उन्हात काम करताना तिचा मालकही उन्हाला आव्हान द्यायचा. त्याच्या त्या रापलेल्या काळ्या शरीरावर घामाचे थेंब मोत्यांसारखे चमकायचे... आता अलीकडे तो त्याच्याकडे बघायचा. हसायचा. "क्‍या साब' असं बोलायचाही. त्यालाही बरं वाटायचं.
पावसाळा सुरू झाला तसं नदीचं पाणी वाढू लागलं. नदीने आपला विस्तार करायला सुरवात केली. तिथली बरीच पालं उठली होती... फक्‍त त्याचे पाल तिथे तसेच होते... पावसाच्या धारांत पालांचे कापड टिकाव धरत नव्हतं. त्यावरचा प्लास्टिकचा कागद वाऱ्यावर उडून जायचा. तो मालक त्या पालाला ठीक करायचा प्रयत्न करायचा... पण तो कुठे टिकाव धरणार होता... तो आता त्याच्याकडे बघायचा; पण हसायचा नाही. ती उंटीण आणि तिचं ते पिल्लू आता नदीपासून दूर रस्त्याकडेला झाडाचा आडोसा घेत उभे राहिलेले असायचे... तिचे ते विजातीय कुटुंब एक एक करत गायब झालं होतं. बहुतेक मालकाने ते विकले असावे. आता पावसामुळे त्या उंटीणीचे तपकिरी केस काळे पडले होते. त्या उमद्या जनावराला काय करावे तेच कळत नव्हते. पाऊस त्याच्या अंगावर पेलवत नव्हता. जणू पावसाने त्याचे अंग कुजवायला सुरवात केली होती. अंगावर अनेक जखमा झाल्या होत्या. त्याच्याकडे बघवत नव्हते. तिच्या जखमी कासेमुळे पिलाचीही उपासमार होत असावी. पावसाने ते फार बिथरलं होतं. त्या एवढ्याशा जीवाला तो पाऊस सहन होत नव्हता... येणारे-जाणारे रस्त्यात थांबून त्या उंटीणीकडे बघायचे, पिलाबाबत हळहळायचे आणि मालकाला शिव्या घालायचे... पाऊस जोराचा सुरू होता... नदीचे पाणी वाढत होते... एके दिवशी त्या पालाशेजारी कसलीशी गर्दी झाली म्हणून तो पाहायला थांबला... काही प्राणीप्रेमी त्याची ती उंटीण घेऊन चालले होते... तो दयावया करत होता. पाया पडत होता... जगण्याचे तेच एक साधन राहिल्याचे वारंवार सांगत होता. पण ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते... प्राणीप्रेमींपैकी एकाने त्या उंटीणीचे पिल्लू ओढत आणले. त्याने त्याच्यासमोर उभे केले आणि त्याला दोन शिव्या घातल्या.
बघ. या छोट्या जीवाचे हाल काय झाले आहेत... तुम्हाला जनावरं सांभाळता येत नाही तर पाळता कशाला... त्यातील एकाने आणखी शिवी हासडली. तो रडत होता. गयावया करत होता. आता ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. त्यांनी एक मोठा ट्रक आणला.. त्यात त्या उंटीणीला आणि त्या पिलाला घातले. ट्रक गेला, तशी गर्दी ओसरली. पावसाची रिमझीम सुरूच होती. परवाच्या जोराच्या वादळी पावसानं त्याचे ते पाल पार विस्कटून गेलं होतं. तो, त्याची बायको आणि त्याचं ते चार-पाच वर्षांचं पोर त्या गेलेल्या ट्रककडे शून्य नजरेने बघत होते. पुढे जावं. त्याच्या खांद्यावर हात ठेवून धीर द्यावा म्हणून तो पुढे गेला. तो पुढे झाला तशी त्याची बायको पालात शिरली...
त्यानं त्याच्या खांद्यावर हात ठेवला. एवढ्यात त्याच्या डोळ्यातील पाण्याचा लोट बेभानपणे सुटला.
"साब..' एवढाच शब्द त्याला ऐकू आला अणि मग पालाच्या आत गेलेल्या त्याच्या बायकोचा जोराचा हुंदका....
साब ए लोक पुछते है, उस बछडे को देखा क्‍यों नही... परसो रात आयी बाढ में मेरा बच्चा बह गया... पुलीसने कहा यहॉं गैरकानुनी रहते हो! ...किसी से कुछ नही कहना... नही तो जेल में सड जाओगे...
त्याला काही सुचेनासं झालं... इथं उंटाच्या पोरापेक्षा माणसाचं पोर फार स्वस्त झालं होतं...!!

*** आकांक्षा दिवाळी अंकात छापून आलेली लघुकथा***

दोन पत्रं


आता वाहनांची वर्दळ बरीच कमी झाली होती. रात्रीचे 12 वाजून गेले असतील, मघापासून पुलाभोवती फिरणारा तो पुलाखाली आला. पुलाच्या एका खांबाशेजारी एक दगड होता, त्यावर तो रेलून बसला. दिवसभर वणवण करत भटकलेले शरीर थकून गेलं होतं. पण पोटातील भूक डोळ्यातील झोपेला अडवून धरत होती. त्यानं खूप प्रयत्न केला; पण झोप येत नव्हती. डोळ्यासमोरून बायको आणि पोराचा चेहरा जात नव्हता; काय करत असतील... हाच विचार त्याच्या मनात येत होता... कदाचित बायको रडून रडून थकून गेली असेल... बिचारीच्या डोळ्यातील पाणी आटलं असेल पण हुंदका अजून तसाच असेल.... खूप प्रेम करायची...तिच्यामुळेच पूर्णत्व आलं आहे.... पण.... पोराला अजून काही कळत नाही. पण आपला बाबा चार दिवसांपासून घरी का परतला नाही, हा प्रश्‍न त्यालाही पडला असेलच. हा प्रश्‍न विचारून विचारून त्यानं आईला भंडावून सोडलं असेल. त्याला दोघांची काळजी वाटली... त्यांच्या आठवाने त्याचे डोळे भरुन आले...त्याने हलकेच गालावर आलेले थेंब पुसले...

चार दिवसापूर्वी ऑफीसला जातो सांगून तो बाहेर पडला होता. तो अद्याप घरी पतला नव्हता. चार महिन्यापूर्वीच कंपनीने त्याला मंदिच्या कारणावरून काढलं होतं. बायकोला हा धक्‍का सहन होणार नाही... बिचारी फार सोसते आणि आता विचारांनीही खंगायची... लग्नापासून तिच्या अंगाला तसं काही लागलंच नाही...कदाचित मला सोडून जाईल...छे ती सोडून जाण्याचा विचार येताच त्याला कसंतरी झालं... तिच्याशिवाय मी नाही जगू शकत. ती आहे म्हणून मी आहे....वीज चमकावी तसा तो विचार त्याच्या मेंदूतून सरसरला.... त्यामुळे त्यानं ही गोष्ट बायकोला सांगायचं टाळलं.मग तो रोज ऑफीससाठी म्हणून बाहेर पडायचा आणि नोकरी शोधत कंपन्यांची दारं झिजवत राहायचा. दिवस जात होते आणि जमा पुंजी संपत होती. दोन महिने खुळ्या आशेतच गेले. आता त्याला निराशा येऊ लागली होती, पण काहीतरी प्रयत्न केलेच पाहिजेत म्हणून तो रोज घराबाहेर पडायचा आणि रात्री उशिरा परतायचा. पण काही उपयोग व्हायचा नाही.... घरात बायको-पोरापुढे हसताना... त्यांच्याशी गप्पा गोष्टी करताना त्याची नजर चोर बनायची... त्याची बायकोही त्याच्या नजरेत नजर मिसळायला टाळायचीच.... चार दिवसांपूर्वी तो असाच घराबाहेर पडत होता एवढ्यात बायकोचे ते शब्द त्याच्या कानावर पडले.... पोरगं कसला तरी हट्ट करत होतं, त्याची आई त्याला समजावत होती.
आज बाबांचा पगार होणार आहे, ते नक्की आणतील हं !
तिचा तो "नक्‍की' शब्द त्याला दिवसभर टोचत राहीला. संध्याकाळ झाली... मंदिराच्या पायऱ्यांवरुन तो खाली उतरला.... आता घराकडे जायचं तर पोरगं हट्‌ट करणार... त्याला आणि बायकोला समजाविताही येणार नाही....कदाचित आपल्याला नोकरी नाही म्हणून ती सोडूनही जाईल... छे तिने सोडून जाण्याची कल्पनाही त्याला सहन झाली नाही.... त्याला काहीच सुचेना...
तो मटकन खाली बसला... थोडावेळ तिथेच बसून राहिला.... आज घराकडेच जायचं नाही हे त्यानं मनाशी पक्‍क ठरवून टाकलं...मग शहरात फिरत राहिला रात्री एका बसमध्ये चढला कंडक्‍टरने त्याच्याकडे बघून न बघितल्यासारखं केलं.... बस कुठे निघाली हेही त्याला माहित नव्हतं.. एका स्टॉपवर बस थांबली.. सगळे उतरले हाही उतरला... रात्र बरीच झाली होती....मग तो रस्त्यावरुन फिरु लागला.... दिवसभराच्या कंटाळ्याने पाय पुरते थकले होते...त्याची नजर कुठे निवारा मिळतो का याचा शोध घेऊ लागली.... तिथल्याच रस्त्याच्या एका पुलाखाली त्यानं आपलं ठाण मांडलं. आणि तिथे तो झोपून गेला.....
आता गाड्यांचा आवाज पूर्ण मंदावत होता. गेली चार दिवस तो या पुलाच्या आधाराने जगत होता. कपडे आता मळके म्हणण्यापलिकडे गेले होते. दाढी वाढली होती. आणि चपलाचा तुटका बंद त्याच्या भिकारीपणांच्या लक्षणांना आणखी अधोरेखीत करत होता. दोन दिवसापूर्वी सकाळी फिरायला येणाऱ्यापैकी कोणीतरी त्याच्यासमोर शिळी चपाती ठेवली; त्यावेळी तो मनाशीच हसला. दुपारपर्यंत त्यानं त्या चपातीला हात लावला नाही. नंतर मात्र पोटाने मनावर विजय मिळविला.चपातीचा प्रत्येक घास खाताना त्याला प्रचंड वेदना होत होत्या... नंतर तिसऱ्या दिवशी आणि आजही कोणीतरी चपात्या आणून त्याच्यापुढे टाकल्या..... त्याला पहिल्यांदा त्या खाव्यात असं वाटलं पण नंतर त्यानं धीर केला त्यानं हात लावला नाही... दुपारी कधीतरी कुत्री त्याभोवती जमा झालेली त्यानं बघितलं आणि मग तो वेड्यासारखा हसत राहिला....
आता त्याला काही सुचत नव्हतं... कुत्र्याचं जगणं त्याला नकोच होतं....त्यानं खिसा चाचपला.... पेन अजून खिशात होते. त्यानं समोरच्या कचरा कुंडांतील एक कागद उचलला आणि रेल्वे स्टेशनच्या दिशेने चालायला लागला.
दुसऱ्या दिवशी पहाटे रेल्वे पोलिसांना रुळावर एक बॉडी मिळाली आणि खिशात एक पत्र
प्रिय,
रिमा.
आपल्या लग्नाला 3 वर्षे झाली. या तीन वर्षात जेवढं सुख देता येईल तेवढं मी देण्याचा प्रयत्न केला. सप्तपदीची सगळी वचनं मी पाळण्याचा प्रयत्न केला; पण आता ते शक्‍य नाही. तू सोडून जाण्यापेक्षा तू सोडून जाण्याची भीतीच मोठी आहे...ही व्दिधा सहन होत नाही... जगायचं तुझ्याशिवाय ही कल्पनाही सहन होत नाही..... म्हणून मी जगाचा निरोप घेतोय; जमलं तर माफ कर.
तुझाच रघू

पोलिसांनी पत्र वाचलं आणि त्या पत्रावरील पत्ता. त्या पत्त्यावर ते पोचले तर घराला मोठं कूलूप होतं. पोलिसांनी शेजारी चौकशी केली. त्यांना एक पाकिट मिळाल आणि त्यात रघुच्या नावाने एक पत्र


रघु.
आपल्या लग्नाला तीन वर्षे झाली. पण या तीन वर्षात मी तुमची कधीच होऊ शकले नाही... सप्तपदीची वचंन मी पाळू शकले नाही. खरे तर मी हे आधीच सांगायला हवं होतं... मनाविरुद्ध लग्न झालं होतं माझं... मला तुम्हाल धोका द्यायचा नव्हता....त्यामुळे नेटाने तीनवर्षे संसार केला पण आता हि व्दिधा सहन होत नाही... त्यामुळे मी आता सोडून जात आहे कायमचीच.... सोबत पिंटूंला घेऊन जात आहे... जमलं तर माला माफ करा.



*** 27 आक्‍टोबरच्या "ंसकाळ'च्या स्मार्ट सोबतीमध्ये छापून आलेली माझी लघुकथा ***

बुधवार, २६ ऑक्टोबर, २०११

पौर्णिमा...

तो
गॅलरीत उभं राहून तासन्‌ तास चंद्र न्याहाळण्यात काय मजा असते कोणास ठाऊक. पण ती न्याहाळत बसायची... रात्री तीन तीन वाजता उठून गॅलरीतून चंद्र बघायची... हा चंद्र किती वेगळा भासतो नाही? तिचा नेहमीचा प्रश्‍न.. या प्रश्‍नाचे तिला उत्तर हवे असायचेच असे नाही... पण ती रोज हा प्रश्‍न विचारायची... अशा वेळी कधी चहा किंवा कॉफीचा मग तिच्या हाती दिला की नुसती हसायची... गालातल्या गालात... तिच्या त्या गोबऱ्या सावळ्या गालांवर एक चमक दिसायची.... चंद्राचा प्रकाश तिच्या गालावरून ओघळत राहायचा... ती चंद्राला न्याहाळात राहायची आणि मी तिला... चंद्राची कितीतरी रूपं तिनं कॅमेराबद्ध केली होती... प्रत्येकवेळा तिच्या नजरेतून दिसणारा चंद्र वेगळा भासायचा... तो तिचा चंद्र होता... जणू तिच्यासाठीच रोज उगवायचा... तिच्या भावनांच्या वेग आवेगाप्रमाणे आपली रूपं बदलायचा... कधी झावळ्यांच्या आडोशातून तिला बघायचा तर कधी ढगांशी लपाछपी खेळायचा... तिच्या विस्कटलेल्या केसांत जणू रातराणीचा गंध भरत राहायचा... ती होतीच तशी... जगण्याची मजा लुटणारी... ही अमावस्या नसतीच तर?... कधी कधी ती प्रश्‍न विचारायची.
""अगं अमावस्या आहे, म्हणूनच तर चंद्राच्या या कला दिसतात ना!''
माझं हे उत्तर तिला कळायचं, पण पटायचं नाही... पण मग ती जास्त बोलायची नाही, गप्प राहायची. तिनं बहुतेक अमावस्या स्वीकारली होती... अशा कितीतरी अमावस्या तिनं स्वीकारल्या होत्याच, कदाचित त्या सगळ्या अमावस्या विसरण्यासाठीच ती चंद्राला जवळ करत होती... त्या आठवणीतून बाहेर पडण्यासाठीच... पण कधी कधी या आठवांचे ढग एवढे गडद व्हायचे की त्यातून चंद्र दिसायचाच नाही... मग एक हुंदका गॅलरीतून यायचा... अशा वेळी तिच्यासोबत असावं... हलकेच तिच्या खांद्यावर हात ठेवावा, असं वाटायचं. पण काही ढग गळलेलेच बरे म्हणून मग मीही लांब राहायचो. तिच्या मोकळ्या होणाऱ्या आकाशासाठी... मग त्यानंतर तिचा चेहरा पौर्णिमेच्या चंद्रासारखा दिसायचा पूर्ण... अपूर्णतेची त्यात छटाही असायची नाही.

--------------------------

ती

त्याला चंद्र आवडतो का माहीत नाही... नसेल. कदाचित असेलही; पण... आपल्यासाठी तासन्‌ तास गॅलरीत बसून चंद्र बघायचा... आपण काहीबाही बडबडत राहायचो. पण तो नुसता गप्प बसायचा ...कधी कधी वाटायचं, हा चंद्राकडे बघतो की आपल्याकडे?... एकदा त्याला विचारलंही, ""अरे चंद्र बघ किती मस्त दिसतोय, पौर्णिमा हा पूर्णत्वाचा उत्सव असतो बघ.. अपूर्णतेचा लवलेशही नसतो...'' त्यावेळी एकदाच म्हणाला होता,
""पूर्णत्वात मजा नाही... पूर्णत्व आलं की लय सुरू होते... त्यामुळे मजा आहे ती अपूर्णतेत... त्याला अपूर्ण राहायला आवडायचे... तो पाण्याचा ग्लासही पूर्णपणे प्यायचा नाही... थोडं पाणी शिल्लक ठेवायचा... त्यामुळे तो बहुतेक वेळा चंद्राकडे न बघता आपल्याकडेच बघत असल्याचा भास व्हायचा... रात्री तीन-तीन वाजता आपल्यासाठी कॉफी देताना त्याचा चेहरा असाच द्वितीयेच्या चंद्रासारखा दिसायचा.... पूर्णत्वाची आस असलेला... पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत असलेला तो वेगळाच आहे.... त्याचा चेहराच अनेकवेळा अमावस्येत साथ देतो... तो नसलेल्यापणाची, अर्धवटपणाची जाणीव पिऊन टाकतो. तेच त्याचे वैशिष्ट्य आहे... त्याच्या चेहऱ्यावर एक अजिब लकीर आहे... चंद्रावरच्या खळग्यासारखी ही लकेर नेहमी आधाराचा हात द्यायला तयार असते, पण कधी कधी आधारालाही आधार लागतोच ना... पण त्याची नजर कधी आधार मागत नाही. अपूर्णतेत मजा जशी तो मानतो तशीच सोसण्यात... अशा वेळी त्याला एकटं सोडणं हेच चांगलं... अशावेळी त्याच्या चेहऱ्यावरचे ढग आपण हलकेच दूर करावेत. त्याचा चेहरा हातात घेऊन त्याला विश्‍वास द्यावा, असं वाटून जायचं. पण आपल्याला ते जमलं नाही... मग तो नजर चुकवत राहायचा. आपल्या वेदना सहन करत राहायचा... त्याचे ढग कधीच फुटले नाहीत... ढग फुटायला, त्यातून पाणी बरसायला गारव्याच्या बिजांचा शिरकाव व्हायला लागतोच की... अनेकदा आपण त्याच्या दारापर्यंत पोचून त्याला रितं करण्याचा विचार केला खरा; पण दारावर थाप मारून आपण अनेकदा मागे फिरलो आहे... आताही त्याच्या ढगांना गारव्याच्या स्पर्शाची आस लागून असेल... कदाचित मग त्यानंतर दिसणारा चेहरा पौर्णिमेच्या चंद्रासारखा पूर्ण दिसून जाईल. त्यात अपूर्णतेची कोणतीच भावना असणार नाही.

https://docs.google.com/open?id=0B6FpjbggjhRAMDdmMzFmMDUtOTA2Mi00YjlhLWJlNjEtMWY2MjllMzk2NTJl