बुधवार, ९ फेब्रुवारी, २०११

हे डोळे पुन्हा दिसणार...


तिच्या डोळ्यांनी घायाळ झालेल्यांची संख्या कमी नाही। अगदी अख्खा चित्रपट तिच्या डोळ्यांसाठीच बघणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. तिने नुसती पापण्यांची उघडझाप केली, तरी अनेक थांबलेली हृदये धडधडायची. अगदी तिच्या चेहऱ्यावरची रेघ बघता बघता मरण यावं, अशी इच्छा बाळगणारे कमी नव्हते, नाहीत. कोमेजलेली फुलेही तिच्या हसण्याने पुन्हा टवटवीत व्हायची. ती मीनाक्षी होती, ती रोहिणी होती, ती नूतन होती. नूतन यांचे टपाल तिकीट टपाल खाते प्रकाशित करणार आहे. आपले बोलके डोळे रूपेरी पडद्यावर ठेवून गेलेल्या या अभिनेत्रीची आठवण राहावी म्हणून हे टपाल तिकीट खचितच नाही, तर तो टपाल खात्याचा सन्मानच आहे."नूतनचा चेहराच एक अभिनयाचे व्यासपीठ होते. आजही जेव्हा तिचे चित्रपट बघतो, तेव्हा तिच्या चेहऱ्याशिवाय नजर दुसरीकडे वळत नाही' नाना पाटेकरसारख्या स्पष्ट आणि खरे बोलणाऱ्या अभिनयसम्राटाचे हे उद्‌गार नूतन यांचा गौरव अधिकच अधोरेखित करतात. नूतन यांचा मुखाभिनय त्यांच्या डोळ्यांतून प्रवाहित होत होता. त्यांचे हरिणीसारखे डोळे आणि पातळ ओठ एखाद्या सामान्य प्रसंगातही प्राण भरायचे. स्मिता पाटील, तब्बू किंवा दीप्ती नवल या नूतन यांच्या अभिनयाच्या विस्तारकच वाटतात. "बंदिनी' हा नूतन यांचा प्रचित्रपट. यात प्रत्येक फ्रेममध्ये नूतन नव्याने भेटतात. डोळ्यांतील भाव इतक्‍या सहजतेने बदलतात, की प्रेक्षक त्या डोळ्यांभोवतीच घुटमळत राहतो. एकीकडे त्यांचे ते पातळ ओठ थरथरत निशब्दता व्यक्त करतात आणि त्याच वेळी त्यांचे डोळे ती निशब्दतेला चिरून ओरडत राहतात. त्यांच्या याच अभिनयावर बेहद्द खूश झालेल्या दिलीप कुमार यांनी मी "कर्मा'पूर्वी नूतन यांच्याबरोबर चित्रपट का केला नाही, असा स्वत:ला प्रश्‍न विचारतात. दिलीप कुमार असो वा अशोक कुमार किंवा अमिताभ यांच्यासोबतच्या फ्रेम नूतन यांचा मुद्राअभिनय ठळकच होत नाही तर तो सहकलाकाराच्या चेहऱ्यावरचा चेहरा बनून जातो.संकोच, प्रेम, माया, हुरहूर हे भाव डोळ्यांतून अगदी सहजपणे उतरत होते. "मै तो भूल गयी बाबूल का देस, पिया का घर प्यारा लगे', हे गाणे याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. अशा या मुद्रेला टपाल खात्याने मुद्रित केले नसते तर नवलच; पण नूतन यांच्या तिकिटावर शिक्का मारताना पोस्टमनचे डोळे मात्र भरून येणार, हे निश्‍चित!



शनिवार, ५ फेब्रुवारी, २०११

रेल्वे स्टेशन

दादा,
एवढाच शब्द त्या पोरीनं उच्चारला आणि त्याच्यासमोर तिने हात पुढे केला. पहाटे साडेतीन-चारची वेळ.
रेल्वे स्टेशनवर त्याच्याबरोबर उतरलेले, घराकडे लगबगीने चाललेले प्रवासी, चहावाल्या पोरांच्या आरोळ्या.. पेपर स्टॉलवर मोठ्याने लावलेला रेडिओ.. रिक्षावाल्यांची येणाऱ्या प्रवाशांकडे कुठे जाणार म्हणून विचारपूस. या गर्दीत भिकारी नव्हतेच. नव्हते म्हणजे ते भीक मागत नव्हते. झोपलेली, पेंगाळलेली भिकाऱ्यांची पोरे आणि बाया अस्थाव्यस्थ पडल्या होत्या. अशा या पहाटेच्या वेळी हात पुढे केलेली ती बारा-तेरा वर्षांची पोरगी अस्वस्थ करत होती. अंगात कुठल्याशा शाळेचा युनीफॉर्म होता. पण तो इतका मळला होता, की तो नेमक्‍या कोणत्या शाळेचा हेच कळत नव्हतं. हातात कंडे, केस विस्कटलेले आणि मातीने माखलेले. गाल खोल गेलेले, अगदी बरेच दिवस काही खाल्लं नसल्यासारखे. बरेच दिवस झोप नसल्यासारखे डोळे तारवटलेले आणि पोटातील भूकेमुळे लाचार झालेले. तिची ती नजर आणखी अस्वस्थ करत होती.
चल हट यहॉं से!
बहुतेक त्याची अस्वस्थ नजर बघून चहावाल्याने तिला हटकलं. पण ती हलली नाही. आपली लाचार दृष्टी आणखी लाचार करत ती त्याच्याभोवती घुटमळत राहिली. त्याने खिशात हात घातला, काही नाणी हाताला लागतात का बघायला, पण हात रिकामा वर आला.
तू चहा पिणार?
त्याच्या या प्रश्‍नावर ती काही बोलली नाही. पण हललीही नाही. हिला एक चहा दे.. चहावाल्याने आपल्या ठेवणीतील एक कप काढला आणि तिच्यापुढे चहा ओतला. ब्रेड खाणार...तिने नकार दिला नाही. चहावाल्याने न सांगताच ब्रेड काढला आणि तिच्या हातात दिला. तिने तो अगदी आधाशासारखा खाल्ला. पुन्हा तिने हात पुढे केला नाही. अजून उजाडायला दोन तास अडिच तास अवकाश होता, तोपर्यंत त्याला स्टेशनवरच थांबावे लागणार होते. तिथल्याच एका बाकड्यावर त्याने बॅग ठेवली आणि प्रवासाने थकलेल्या अंगाला त्या बाकड्यावर अक्षरशः सैल सोडलं. डोळ्यातील झोप चहाने कमी झाली नव्हती, त्याने जोराची जांभई दिली. एवढ्यात ती पोरगी त्याच्याजवळ येऊन बसली. ती जवळ बसल्यावर त्याला काही सुचेना. बॅगेत फारसे सामान नव्हतेच पण आहे, ती बॅगही चोरीला गेली तर या अनोळखी शहरात फार पंचायत व्हायची म्हणून त्याने ती मांडीवर ठेवली. पोरीच्या ते लक्षात आलं असावं, त्यामुळे तिने नजर फिरवली. तो काही बोलला नाही. बसून राहिला. तीही काही बोलली नाही. बराच वेळ गेल्यानंतर तीची चूळबूळ सुरु झाली.
सुटे पैसे नाहीत माझ्याकडे, तिच्यापासून सुटका करण्यासाठी तो बोलला.
""नको दादा, पैसे नको मला.''
मग काय? जा इथून निघून. मला थोडं झोपायचं आहे.
ती काही बोलली नाही, पण तिथून निघूनही गेली नाही. बाकड्याच्या कोपऱ्यावर बसून ती बाकड्याचा हात टोकरत राहिली.
आई-बाबा कोणी आहे का नाही? तिची अस्वस्थता सहन न होऊन तो काहीतरी बोलायचं म्हणून बोलला.
त्याच्या या प्रश्‍नासरशी ती गडबडीने मागे सरकली. त्याच्याकडे बघत म्हणाली.
आहेत की.
मग तू इथे काय करते आहेस.
घरातून पळून आले आहे?..
काय म्हणतेस काय? त्या प्रश्‍नाने तो उडाला. आता त्याला ती भिकारी वाटेनाशी झाली. आपल्यासारखीच कोणीतरी चांगल्या घरातील मुलगी ही भावना त्याला सुखावून गेली.
का आलीस पळून... मघापेक्षा त्याच्या बोलण्यात आलेला तो ओलावा. तिला जाणवला पण लगेच ती सावरली. मघाशी मागे सरलेली ती पुन्हा पुढे सरकरली, तिने बाकड्याचा कडा आणखी घट्‌ट पकडला.
त्याला ते जाणवलं. तो मागे सरला. काहीच बोलला नाही. बराचवेळ शांतता पसरली.
काय झालं.. आई रागावली म्हणून घर सोडलंस?
नाही..
मग?
ती काही बोलली नाही. कदाचित तिला कारण सांगायचे नसेल, समजून तो गप्प बसला. कुठे राहातात आई-बाबा..
बोरीवलीला.
फोन नंबर आहे. आपण फोन करुया.
त्याने खिशातून मोबाईल काढला आणि तिच्याकडे आशेने बघायला लागला.
पण, बाबा मारतील मला.
नाही मारायचे..
काय करतात तुझे बाबा..
मॅथचे प्रोफेसर आहेत.
मग, गणितात नापास झालीस म्हणून घर सोडलंस काय?
नाही. गणितात मला नेहमीच सेंट परसेंट असतात.
मग?
पुन्हा ती गप्प बसली.
बर राहू दे, नंबर सांग...
तिने नंबर दिला. नावही सांगितलं. तिचे बाबाच होते फोनवर. खूपवेळ रडले. मग बोलले. गयावया करु लागले, पोरीची काळजी घ्या म्हणून... खूपवेळ दोघे तसेच बसून राहिले. आता उजाडले होते, गर्दीचा आवाज वाढला होता.
बराच काळ गेल्यानंतर त्याने पुन्हा चहा घेतला. दोन-चार तास तसेच निघून गेले. त्याचा मोबाईल वाजला. साहेब त्याची वाट बघत बसला होता. त्याने थातूर-मातूर उत्तरे दिली. थोड्यावेळान पुन्हा फोन वाजला. तिच्या वडिलांचा फोन होता. ते समोरच उभे होते. त्यांची पोरगी मात्र त्याच्यामागे लपली होती. तो काही बोलला नाही. ते पुढे आले त्यांनी तिला एका हाताने जवळ घेतलं. त्याच्याही डोळ्यातून अश्रु आले. ती अस्वस्थता त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती. बाप-लेकीचं भेटणं झाल्यावर ते त्याच्याजवळ आले, त्यांनी त्याचा हात हातात घेतला. डोळ्याच्या कडा ओलावल्याच होत्या.
""आम्हला आनाथ होण्यासापासून वाचवलंत.'' त्यांचे हे वाक्‍य त्याच्या जिव्हारी लागलं. फोनवर मघाशी त्यांनी सांगितलं होतं, ती अनाथ होती, हे समजल्याने तिनं घर सोडलं होतं.
तो मागे न बघता निघून गेला. मागे त्यानेच त्याच्या आई-वडिलांना असंच आनाथ केलं होतं.

सोमवार, १० जानेवारी, २०११

लोकांचा हुंकार सरकारपर्यंत पोचेल?

सरकारची जशी परराष्ट्र नीती असते तशीच ती अंतर्गत कारभारातही असायला पाहिजे. जिथे लोकशाही आहे, अशा देशांत तर ही जबाबदारी आणखी वाढते. परराष्ट्र नीतीत ज्याप्रमाणे प्रत्येक देशाबरोबरचे संबंध वेगवेगळे असतात, तेच भानदेशातील विविध घटकांशी संवाद साधताना सरकारने ठेवायला पाहिजे. बहुतेक सर्वच लोकशाही राज्ये बहुतेकवेळा या प्रकारानेच कारभार करतात; पण काहीवेळा देशांतील खूप ताकदवान समुहाला खूश करताना, कमकुवत पण संख्येने खूप अशा समाजाला दुखावले जाते. त्यामुळे "आहे रे' आणि "नाही रे' गटात संघर्ष पेटतो. त्यामुळे "नाही रे' गटाला सोबत घेऊन त्याला "आहे रे' गटापर्यंत आणण्यासाठी सरकार नावाच्या यंत्रणेला काही ठोस पावले उचलावी लागतात. यात अनेकवेळा कायद्याच्या जाळ्यातून समस्येला बाहेर काढून तिचा विचार करावा लागतो. एका बाजूला भारत सरकार उल्फाचा प्रमुख अरविंद राजखोवा याला जामीन मिळवून देऊन मुक्‍त करताना आपल्या "नाही रे' गटाच्या विचारांना ऐकण्याची मानसिकता दाखवित आहे; तर दुसरीकडे डॉ. बिनायक सेन यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवून या गटात पुन्हा चलबिचल निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. डॉ. सेन यांना देशभरातील संघटनांकडून मिळत असलेला पाठिंबा पाहता ही चलबिचल खूप मोठी आहे हे जाणवते.

लोकशाहीत राजकारण आणि सरकार या दोन गोष्टी भिन्न करता येत नाहीत. सरकार नावाची व्यवस्था राजकारणीच चालवत असल्याने ज्या विचारसरणीने ते राजकारण करतात त्याचे प्रतिबिंब सरकाराच्या कारभारात उमटते. बहुसंख्य लोकांच्या पसंतीने सरकार सत्तेत आल्याने समाजातूनही सरकारच्या कारभाराला मान्यता मिळते. त्यामुळेच लोकशाहीत विरोधी विचारांच्या लोकांना मान देऊन प्रसंगी ते मुख्य प्रवाहातून बाहेर पडत असतील तर त्यांचा सरकार आणि व्यवस्थेवरील विश्‍वास उडू नये यासाठी सत्ताधारी पक्षाला प्रयत्न करावे लागतात. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांत फारसा फरक नसेल तर तिथे नैसर्गिक न्यायाने सरकार विरोधकांना डावलत नाही, किंबहुना डावलता येत नाही; पण विरोधक केवळ विरोधी बाकावर बसलेलेच नसतात तर तिथंपर्यंत न पोचलेले अनेक जण विरोधाचे काम करत असतात. अशांचा आवाज सरकारपर्यंत पोचला पाहिजे, त्यांच्या अडचणी समजून घेऊन, प्रसंगी त्यांच्यासाठी चार पावले मागे यावे लागते. पण जिथे विरोधी आवाज खूप क्षीण असतो आणि सरकार नावाची व्यवस्था त्या आवाजाला ऐकण्याच्या पलीकडे गेलेली असते, तिथे तो आवाज सर्वांसमोर आणण्याची जबाबदारी सामाजिक कार्यकर्त्यांची असते आणि त्यांना साथ राजकारण्यांनी साथ देण्याची गरज असते आणि इथेच भारतीय राजकारणी कमी पडले की काय, असा प्रश्‍न येतो. डॉ. बिनायक सेन यांच्याबाबत सरकारी यंत्रणांनी जी भूमिका घेतली ती बघता ही रेष आणखी अधोरेखित होते.

डॉ. बिनायक सेन हे खरे तर गरिबांत काम करणारे, ज्या भागात ते काम करतात तिथे व्यवस्थेविद्ध प्रचंड चीड आहे. आपले प्रश्‍न सध्याची यंत्रणा सोडवू शकत नाही, अशी तेथील लोकांची धारणा बनल्याने ते यंत्रणा राबवू देत नाहीत. पण तरीही हे लोक गरीब, त्यांच्यात आरोग्याबाबत अनास्था, त्यामुळे सरकारी यंत्रणेपलीकडे त्यांच्यात जाऊन काम करणे आवश्‍यक होते. अशी पोकळी डॉ. बिनायक सेन यांच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते भरून काढतात. व्यवस्थेविरुद्ध जाणाऱ्या घटकाला पुन्हा व्यवस्थेत आणणे आणि त्यांचा व्यवस्थेवर पुन्हा विश्‍वास निर्माण करण्यात अशा सामाजिक कार्यकर्त्यांचा फायदा सरकारने करून घ्यायला पाहिजे. पण डॉ. बिनायक सेन यांच्याबाबतीत सरकारला हेच कळले नाही की काय, असा प्रश्‍न पडतो. मुळात डॉ. सेन हे आदिवासी आणि गरिबांच्यात काम करायचे. त्यामुळे तेथील लोकांशी संपर्क हा त्यांच्या कार्याचा भागच होता. आता त्यांना ज्या कारणांनी सरकारने अटक केली; (न्यायालयाचा निकाल हा स्वतंत्र विषय आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक माजी न्यायाधीशांनी नाराजी व्यक्‍त केली आहे.) मुळात डॉ. बिनायक सेन यांच्यावर देशद्रोहाचा खटला सरकारी पक्ष कसा काय चालवू शकतो हाच प्रश्‍न आहे.

गरिबांसाठी काम करणाऱ्या प्रत्येकाला सरकारने पाठिंबा द्यायला हवा आणि गरिबांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करायचे, की अशा कार्यकर्त्यांवर देशद्रोहाचे खटले चालवायचे हा खरा मुद्दा आहे. एकीकडे डॉ. बिनायक सेन यांना देशद्रोही ठरविण्याकडे सरकारचे (मग ते छत्तीसगडचे डॉ. रमणसिंग यांचे असो वा त्यापूर्वीचे कॉंग्रेसचे); दुसरीकडे मात्र उल्फाचा प्रमुख अरविंद राजखोवा याला मात्र सरकारने जामीन मिळावा म्हणूनच प्रयत्न केला. देशाविरुद्ध बंड पुकारलेल्या राजखोवावरही राजद्रोहाचा आरोप आहे. पण त्याला एकट्याला शिक्षा करण्यापेक्षा उल्फा संघटनेतील इतरांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारने राजखोवाला संधी दिली. "नखाच्या कामासाठी तलवारीची गरज काय', या उक्‍तीप्रमाणे सरकारने राजखोवाला मुक्‍त केले, आणि अंतर्गत नीतीचा भाग म्हणून हे योग्यच होते. हिंसाचाराला हिंसाचाराचे उत्तर नसून ते चर्चेत आणि विचारात आहे, ही सरकारची भूमिका रास्त आहे. एका बाजूला कठोरपणे सरकारविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कारवाई करायची तर दुसऱ्या बाजूला या संघटनांचे बळ वाढू नये, एखादी संघटना नेस्तनाबूत झाल्यानंतर तिच्या राखेतून दुसरी त्याच विचारांची संघटना निर्माण होऊ नये यासाठी विचारांचा मार्ग मोकळा करणे आवश्‍यक असते. त्यामुळे राजखोवाबाबतीत जो सुज्ञपणा सरकारने दाखविला, तो सुज्ञपणा डॉ. सेन यांच्याबाबत का दाखविला नाही हा प्रश्‍न आहे.सामाजिक कार्यकर्त्यांना हा देश आपला वाटला पाहिजे, या देशातील गरिबांतील गरिबांसाठी काम करताना भांडवलशाहीला विरोध करण्याचा अधिकार सर्वसामान्य माणसाला असला पाहिजे. विशेष म्हणजे घटनेच्या चौकटीतील अधिकार घटनेच्या चौकटीत न राहता ते सर्वसामान्यांपर्यंत झिरपले पाहिजेत आणि यासाठी सरकार नावाच्या यंत्रणेने पुढाकार घेतला पाहिजे. सामाजिक कार्यकर्त्यांना गजाआड टाकून आणि त्यांचा आवाज दाबून प्रश्‍न सुटणार नाहीत तर प्रश्‍न चिघळतील आणि आज जिथे "नाही रे' गटात प्रचंड नाराजी आहे, तिथे प्रश्‍न चिघळू नये यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, समाजातून उमटणारा हुंकार राज्यकर्त्यांपर्यंत पोचला तरी डॉ. सेन यांची सुटका शक्‍य आहे.

रविवार, १९ डिसेंबर, २०१०

नारंगी

ते रानबोरांनी लदडलेलं झाड बघत ती पोरं फाटकाच्या दारात रेंगाळली होती. त्यांचे आई-वडिल समोरच चालू असलेल्या रस्त्यावर काम करत होते. त्या बंगल्याच्या कंपाऊंडच्या सावलीत ती पोरं खेळत होती. त्यातच एकाची नजर त्या बोरांनी बहरलेल्या झाडाकडे गेली आणि मग ती फाटकापाशी रेंगाळू लागली. फाटकाच्या कोपऱ्यावर असलेली वॉचमन केबीन आणि त्यातल्या त्या मिशावाल्या बंदुकधारी माणसाची नजर त्यांना आत जाण्यापासून रोखत होती, पण तो कधीतरी तिथून जाईल आणि आपल्याला आत शिरता येईल या आशेने ती तीन-चार पोरं त्या तिथंच रेंगाळत राहिली. थोडा वेळ तसाच गेला... त्या केबीनमधला तो मिशावाला बंदुकधारी आता कुठेतरी गेला होता. एका पोराच्या ही बाब लक्षात आली. त्यानं इतरांना खुणावलं आणि त्या तीन-चार पोरांनी हलकेच फाटक ढकललं. फाटकाचा किर्र-कट असा आवाज आला पण लगेच थांबला. ती पोरं पळतच त्या बोराच्या झाडापाशी गेली. तिथे तर पिकलेल्या बोरांचा सडा पडला होता. आता एक बोर तोंडात आणि थोडी फाटक्‍या ओट्यात साठवत ती पोरं त्या झाडाभोवती पिंगा घालू लागली.... पोरांचा दंगा वाढला तसा तो मिशावाला तिथे आला... त्या पोरांचा चाललेला पिंगा त्याने बघितला आणि न बघितल्यागत करुन तो केबीनमध्ये शिरला. पोरांना वाटलं त्याचं लक्षच नाही. पोरांनी झाडाला हलवायला सुरवात केली. बोरांचा आणखी सडा पडला. ती आंबट गोड, पिठूर बोरं तोंडात घालत मिटक्‍या मारत पोरं झाडाभोवती फिरत होती. हाताला लागेल ती हिरवी, पिवळी, नारिंगी बोरं गोळा करत होती... एवढ्यात फाटकाचा दरवाजा पुन्हा करकरला. एक मोठी गाडी आत आली... मघाच्या मिशावाल्यानं त्यातल्या साहेबाला नमस्कार केला. ती गाडी पुढे गेली... पोरांचं लक्ष गाडीकडे गेलं... ती पुढं गेलेली गाडी मागे आली... तो मिशावाला बंदुकधारी लगबगीने पुढे गेला... आणि मग गयावया करु लागला... पोरांना काही समजले नाही... तो तसाच गेला... त्याने फाटक लावले आणि त्याला कुलूप घातले... आणि तो पोरांकडे येऊ लागला... आता पोरांना भीती वाटू लागली होती... आता हा आपल्याला मारणार!... त्यातल्या लहान पोरांना मोठ्याने आपल्या पाठिशी धरले आणि हात पुढे केला... त्या मिशावाल्याने त्या पोरांना मारलं नाही. चला, साहेबांनी बोलावलंय... पोरांना आता पळून जावं वाटलं... पण फाटक बंद होतं..... पोरं गुमान त्या मिशावाल्याच्या मागून चालू लागली... थोड्यावेळाने बंगला आला... मघाच्या त्या गाडीतला तो उंचापुरा साहेब गाडीच्या बाहेर उभा होता... पोरांना आता हा आपल्याला काय शिक्षा करणार याची उत्सुकता लागली होती... साहेब तिथल्याच एका पायरीवर बसला... त्याने पोरांना जवळ बोलावलं... ओट्यातली बोरं सांभाळत पोरं जवळ गेली... साहेबाने त्या बोरांकडे बघितलं...बोरं कोणी कोणी खाल्ली... साहेबाच्या या प्रश्‍नावर कोणीच काही बोललं नाही... साहेबानं पुन्हा प्रश्‍न विचारला... साहेबाची भाषाच पोरांना कळली नाही... साहेब या बोरांबाबतच काहीतरी विचारत असणार याची त्यांना खात्री होती... त्यामुळे त्यातल्या दोघा मोठ्या पोरांनी माना डोलावल्या. बारक्‍यांनीही त्यांचं अनुकरण केलं... साहेबाने त्यांना ओट्यातली बोरं खाली टाकायला सांगितलं... पोरांनी बोरं खाली टाकली... मग साहेबाने त्यातल्या सगळ्यात लहान पोराला जवळ बोलावलं,तुला चॉकलेट आवडतं?... पोराला साहेबाची भाषाच कळली नाही... त्यामुळं ते मख्ख चेहरा करुन उभं राहिलं... साहेबाला काय करावं काही कळेना... साहेबाने आत हाक मारली... त्याबरोबर एक नोकर पळत पुढे आला... त्याला काहीतरी साहेबांनी सांगितले... तो लगबगीने गेला आणि बरीच चॉकलेटं घेऊन आला... साहेबाने प्रत्येक पोराला चॉकलेट दिलं... पोरांना ते चॉकलेट फोडता येईना... साहेबाने त्यातलं एक चॉकलेट फोडलं आणि खाल्लं. पोरांनी बघितलं आणि तसंच ते चॉकलेट फोडून तोंडात टाकलं... पोरांची भीती पार पळाली होती... पोरांनी आता आपल्या ओट्यात, खिशात ती चॉकलेटं भरुन घेतली... साहेबाने त्या मिशावाल्या बंदुकधाऱ्याला पुन्हा खुणावलं... तो लगबगीने पुढे झाला. पोरांसाठी फाटक खुलं झालं... पोरं आनंदानं उड्या मारत गेली... फाटक बंद करुन तो साहेबांपाशी आला... साहेब त्या विखुरलेल्या बोरांकडे बघत होता... ती पिवळी नारिंगी बोरं त्याला खुणावत होती... त्यातलं एक बोर त्यांनं उचललं आणि तोंडात टाकलं... त्या पिढूर नारंगी बोराच्या आंबट तुरट चवीने साहेबाच्या मनावरचे अनेक बंध सुटे झाल्याचे त्या बंदुकधाऱ्या मिशावाल्याला वाटले....

शनिवार, १८ डिसेंबर, २०१०

कुलकर्णी

समस्त कुलकर्ण्यांची माफी मागून....
मला नेहमी प्रश्‍न पडायचा की नावाच्या शेवटी जे काही आपण लावतो त्याला आडनाव का म्हणायचं. या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्यासाठी मी खूप पुस्तके चाळली, अनेक लोकांना भेटला पण समाधान करेल असे उत्तर मिळाले नाही. एखाद्या प्रश्‍नाचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही की मला कुलकर्णी आडनावं आठवतात. जगातील सर्व प्रश्‍नांची उत्तरे आपल्याकडे असतातच या आविर्भावात ते असतात.त्यामुळे या प्रश्‍नाचे उत्तरही त्यांच्याकडे असावे हे मानून मी एका कुलकर्ण्याला हा प्रश्‍न पुसला. पहिल्यांदा मी प्रश्‍न पुसला आणि नंतर त्याने आपल्या ज्ञानाचा बोळा माझ्या मेंदवारुन फरशीवरुन फडकं पुसावं तसा पुसला. आहे हो.... काय आहे त्यात.... आडनाव का म्हणतात तेच ना आहे की उत्तर आहे ... कुलकर्ण्यांनं आपल्या पोटावरुन हात फिरवत उत्तर दिलं.हे बघ... (पुढचा माणुस कितीही लहान असो वा मोठा त्याला एकेरी हाक मारण्याची यांची कसब वादातीत आहे.... )जे नाव इतरांच्या प्रगतीच्या आडवे येतं ते आडनाव.... कुलकर्ण्यांनं आडनावाची केलेली ही व्याख्याआपल्याच आडनावरुन केल्याचं कोणाच्याही लक्षात येईल. पण खरेच आहे ही व्याख्या इतरांना लागू पडो अथवा न पडो पण समस्थ कुलकर्ण्यांना लागू पडते हे निश्‍चित......अहो! काही म्हणा महाराष्ट्रात जर तुम्ही बघितलं तर पाटील आणि कुलकर्णी इतरांच्या कायम आड येऊन उर्वरितांना विहिरीत कसे ढकलायचे याचाच विचार करत असतात की काय असा प्रश्‍न मला पडत आला आहे. महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात निम्मे पाटील आणि उरलेले कसले तरी खरे तर कसलेले पाटील असल्याने सत्तेत असलेल्यांबद्दल आम्ही बोलत नाही. त्यामुळे पाटलांच्या आड जाणे आम्हाला परवडण्यासारखे नसल्याने आम्ही त्यांचा आडा आडानेच उल्लेख करतो. पण कुलकर्णी ना सत्तेत ना विद्‌वत्तेत. तरीही आपलं घोडं पुढं दामटायचं यांना चांगलं माहित.आता परवाचीच गोष्ट एक ग्रहस्थ बसमधुन निघाले होते.... गाडी तशी रिकामीच त्यामुळे आपले बाकड्‌यावर जरा पसरुनच बसले होते... एका बाजुला पिशवी... पिशवीतून डोकावणारी शेवग्याची शेंग... त्या पिशवीचा तुटलेला एक बंध आणि तो दुसऱ्या बंधाला बांधलेला... आता हा इसम अशा अवस्थेत पसरुन बसल्यावर तो कुलकर्णीच असणार यात शंका घेण्याचे कारण नाही... एवढ्यात दुसरा एक माणुस बसमध्ये चढला... इतकी गाडी रिकामी असूनही त्याला तो बाकडाच आवडला...सरका?आता त्याचा तो आवाज आणि सरका म्हणण्याच्या पध्दतीवरुन तो पाटील असणार हे नक्‍कीच... पण लगेच ऐकतील ते कुलकर्णी कसले... क्‍यॉ पुढे जागा नाही.... आता गप्प सरकून बसायचं का नाही....पण बदकाच्या क्‍यॅ क्‍यॅ प्रमाणे कुलकर्ण्यांने आपला चोमडेपणा केलाच....का जागा तुझ्या बापाची आहे....आता मात्र कुलकर्ण्या भ्याला... आपला लेचापेचा दंड दाबत त्याने पिशवी उचलली..प्रत्येक गोष्टीत नाक खुपसायची सवयच यांना लागलेली असते. एकुणच कुलकर्णी ही जमात विलक्षण वेगळी.. यांची तऱ्हाच निराळी.... वर्षानुवर्षे कारकुनी केल्याने यांच्या रक्‍तातच कारकुनी भिनलीय की काय असा प्रश्‍न पडतो... म्हणजे एखाद्या कुलकर्ण्यांनं जर मान मोडली तर त्यातून कार कुन कार कुन... असाच आवाज येतो की काय हे बघायला पाहिजे....कुठल्याही वर्गातील पोरांना तू मोठेपणी कोण होणार असं विचारा.... जे पोरगं ठोसपणे नोकरी म्हणतंय ते कुलकर्णी आहे हे बीनदिक्‍कत समजायचे..... कुलकर्ण्यांची पोरं.....इंजिनिअरिंगपासून एमबीबीएसपर्यंत शिक्षण घेतील आणि परत आएएसच्या परीक्षेला बसून नोकरीच करतील.... कुलकर्ण्यांच्या बायकांची तऱ्हाही निराळी असते.. कधीही बघा... चार कुलकर्ण्यांच्या बाया एकत्र आल्या की त्यांच्यातील संवाद ऐकायचा.... ती भटीन... आता ही भटीन म्हणजे जोशी आडनावाची कोणतरी बाई असणार हे नक्‍की.... ती नोडगीन आता ही नोडगीन म्हणजे कोण हे मात्र त्या गावातील इतर आडनावांर अवलंबून म्हणजे सरदेसाई, सोनटक्‍के अशा अडनावांच्या बायकां... कुलकर्णी सोडून इतर सर्व बायकांना यांच्या काही ना काही उपाध्या असतातच... वन्स, वहिनी, आणि काकू असा उल्लेख ज्या बायकांचा होतो त्या कुलकर्ण्यांच्याच कोणीतरी असणार हे नक्‍की...पण काही म्हणा ज्या गावात कुलकर्णी आणि पाटील या आडनापैकी जर एक आडनाव गावात नसेल तर शिळोप्याच्या गप्पात पाटलाचा पोर आणि कुलकर्ण्याची पोरगी आणायची कोठून........

सोमवार, २२ नोव्हेंबर, २०१०

हिरवा


""तुला माहीत होतं मी या कार्यक्रमाला येणार होतो ते'', त्यानं विचारलं.
हो !
ती नेहमी तुटक बोलायची... त्याला त्याची सवय झाली होती. आजही ती खूप बडबडेल मनातलं सगळं सांगले, याची अपेक्षा नव्हतीच पण तरीही ती थांबली याचेच त्याला खूप होते.
किती वर्षे झाली असतील नाही,
तो काही तरी बोलायचे म्हणून बोलला...
अठरा...
पुन्हा तिचे तुटक उत्तर.... हो अठरा वर्षे झाली... काळ गेल्यानंतर तो कसा गेला वाटतो पण खरेच ही आठरा वर्षे कशी काढलीत ती मलाच माहित.ती काही बोलली नाही.... आपलं बोलणं तिला आवडलं नाही काय असं वाटून तो मध्येच थांबला.... काही क्षण तसेच निःशब्दात गेले त्या कार्यक्रमातील इतकी धावपळ आणि गोंधळातही दोघांना त्यांच्यातील शांतता असह्य झाली
"बोला की'...
ती पुटपुटली.
""गेल्या आठरा वर्षांत आज तू भेटशील, उद्या तू भेटशील असे वाटत राहायचं.. खरे तर अनेकदा तुला भेटण्यासाठी घरातून बाहेर पडायचो पण पाय साथ द्यायचे नाहीत. कितीतरी वेळा परतलोय तुला भेटण्यासाठी निघून....''
ती त्याच्याकडे एकटक बघत होती, जणू तो बोलत असलेला प्रत्येक शब्द अन्‌ शब्द ती मनात कोरुन घेत होती.
"" तुला कधी वाटलं का मी तुला भेटायला येईन असं...''
त्याला हा प्रश्‍न आपण विचारायला नको होता, असं वाटून गेलं पण तरीही तिच्या उत्तराच्या अपेक्षेने तो थांबला....
"" नाही !'' ती बोलली... यावेळी त्यानं तिच्या डोळ्यात खोल बघितलं त्यातून त्याला काही दिसतं का.... तिच्या नाही म्हणण्यात ठामपणापेक्षा नाराजी जास्त दिसली.
का? असा प्रश्‍न विचारावा वाटला पण त्यानं घाई केली नाही....काही तरी बोलायचं म्हणून त्यान विचारलं.
""आज थंडी खूप आहे नाही. तू स्वेटर नाही घातलास...
अरे स्वेटरवरुन आठवलं तुला हिरवा स्वेटर हवा होता आणि मला तो आवडला नव्हता कितीवेळ तू माझ्याशी बोलली नव्हतीस तुला प्रत्येक गोष्टीचा रंग हिरवा का नाही असाच प्रश्‍न पडायचा? घराची अक्षरशः बाग केली होतीस...
त्यावेळी मी तुझ्यावर रागवायाचो, आदळाआपट करायचो... पण तू गेल्यानंतर मात्र घरातील प्रत्येक कुंडी मी आजही जपली आहे आजही ती बाग तशीच आहे हिरवीगार.... घराचे पडदे अनेकवेळा बदलले पण त्यांचा हिरवा रंग आजही तसाच आहे...... तुझे सगळे कपडे हिरव्या रंगाचे असायचे नाही, अगदी रुमालापर्यंत. त्याच्या ओठातून हे वाक्‍य निघाले आणि त्याचे लक्ष तिच्या साडीकडे गेले. तिने अमंगळ साडीचा पदर चाचपला. आत्तापर्यंत त्याच्यावर खिळलेली तिची नजर खाली झुकली. तिच्या साडीचा रंग वेगळा बघून त्यालाही काही सुचले नाही..... पुन्हा दोघांत निःशब्दता आली.. काही रिकामे क्षण तसेच निघून गेले....खरे तर ते क्षण रिकामे नव्हतेच उलट आतापर्यंत जगलेल्या आयुष्यातली पोकळी भरुन काढून ओसंडून वाहू देणारे इतके भरलेले.... तो तिच्याकडे एकटक बघत होता. तिच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावरची एक एक रेघ निरखीत होता.
""आता हिरवाई उरली नाही....ती बोलली. तुझ्यापासून वेगळं झाल्यावर वाटलं होतं आता आयुष्य आपल्या मर्जीनुसार घालवायचं..... मला कोणाचीच बंधने नको होती. काही काळ गेलाही तसाच... पण नंतर ते जगणं बेचव वाटू लागलं. तुझ्याकडे परतायचे सगळे दरवाजे मीच बंद करुन घेतले होते. त्यामुळे तो रस्ता बंदच होता. पर्याय काहीच नव्हता. त्यानंतर "तो' माझ्या आयुष्यात आला. आमच्याच ऑफीसमध्ये काम करायचा. लग्न केलं दहा वर्षे संसारही केला. अगदी निमूटपणे केला. पण आमचे सूर काही जुळले नाहीत. तुझ्याबरोबर घालवलेल्या दिड वर्षांतील मोजके क्षणही त्याच्याबरोबरच्या दहा वर्षात मिळाले नाहीत. तो माझ्यावर प्रेम करायचा का? मी त्याच्यावर प्रेम केलं का? खरेच तो माझ्या आयुष्यातून गेल्यावर जी पोकळी जाणवायला हवी होती ती जाणवते का? या प्रश्‍नांची उत्तरे मला आजही सापडलेली नाहीत. ती भरभरुन बोलत होती. इतकी ती कधी बोललीच नव्हती. ..... तो गेला आणि माझं हिरवाईशी नातं तुटलं... तू मघाशी विचारलंस ना की तू येशील का? असे कधी वाटले होते का? खरे तर त्या प्रश्‍नाचं उत्तर होतं, तू येऊ नये असंच वाटायचं. अगदी दिवस सुरु झाला की एक भीती वाटायची की तू कुठेतरी भेटलास तर आपल्याला तुला सामोरे जाता येईल का?तुला आठवतं मी एक पोपट आणला होता.. त्या पोपटावरुन तुझ्यात आणि माझ्यात किती भांडणे झाली होती.
"" किती मुर्ख होतो मी. मला खरेच कळलं नाही तुझ्यापेक्षा पोपट जास्त महत्त्वाचे वाटत होते.''
"" तू नाही रे मीच मुर्खपणा केला. सौंदर्य स्वातंत्र्यात असते याची जाणिवच नव्हती. ऐक तो पोपट नंतर आमच्या घरात होतां बराच काळ. पण एक दिवस काय झालं काय ठाऊक, पिंजऱ्याचे तोंड उघडे राहिले. पण तो काही हलला नाही.. त्या दरवाजातून बाहेर पडायचेच त्याला कळले नाही. माझ्या हिरवाईचेही तसेच झाले. पहिल्यांदा मला हिरवा रंग आवडतो म्हणून आख्खं घर मी हिरवं केलं आणि नंतर तो हिरवा मीच माझ्यावर लादत गेले.
तो गेल्यावर मात्र हिरव्याचे दार मी उघडले. आणि पुन्हा त्यात प्रवेश नाही केला.
""चल जाऊ या! '' त्यानं विचारलं. तुला सोडू घरी... त्यानं विचारलं... तिनं नकार दिला नाही.
तिच्या घरचा रस्ता याच्या घरावरुन होता. यानं तिला घर दाखवायला आत नेले. ती जसे घर सोडून गेली होती अगदी तसंच घर होतं. अठरा वर्षांपुर्वीचे घर आणि आताचे घर यात काहीच फरक नव्हता. कुड्यांही तशाच आणि त्यातील झाडेही तशीच.... तुझी इतकी सवय झाली होती की काहीच बदलू दिले नाही... त्याच्या या वाक्‍याने ती भानावर आली. तिने त्याच्याकडे बघितले.... त्याचे डोळे भरुन आले होते...तिच्याही कडा ओल्या झाल्या होत्या....तिने जिथे पिंजरा ठेवला होता. त्याच ठिकाणी त्यानं पिंजरा आणून ठेवला होता... त्यातील पोपटाकडे तिने बफघितले....तिने हलकेच त्याच्या दरवाजाची कडी काढली. कडी काढताच पोपट उडाला आणि त्या अंधारात दिसेनासा झाला....
चलायचं....ती पायऱ्या उतरता उतरता म्हणाली...तोही लगबगीने तिच्या मागून चालू लागला. ती थांबली... त्याचा हात हातात घेतला आणि पायऱ्या उतरु लागली.... तिच्या डोळ्यातून उडालेले पोपट त्याच्या डोळ्यात दिसत होते..........

मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०१०

भात पीठलं...

खिशातील पाचशेची नोट त्यानं दोनदा चाचपून बघितली. पगार होण्याला अजून किमान दहा-बारा दिवस तरी आहेत. हे दहा दिवस ही नोट जपून वापरायला पाहिजे. खरे तर या महिन्यात तशी तोशीस पडण्याची कारण नव्हते, पण पोरांनी हट्‌टच केला बाबा कुठेतरी फिरायला जाऊया.... बायकोनेही मग पोरांच्या हो मध्ये हो मिसळला आणि मग पर्याय नव्हता. सज्जनगडाच्या त्या गंधीत वातावरणात आपण आज इकडे आलो ते बरेच झाले असं त्याला वाटू लागलं. मग पोरांचे हट्‌ट त्याने बिनबोभाट पुरवायला सुरवात केली. मनाला एक प्रकारची शांती मिळाली.
बायकोला तो म्हणालाही
""बरं झालं आपण आज आलो इकडे. त्या रोजच्या दगदगीच्या दलदलील नाका तोंडात सगळा चिखल जातो बघ, कितीही हातपाय हलवा तसूभरही इकडे वा तिकडे जात नाही... चिखलातच खोल खोल जात राहतो आणि मग धडपड फक्‍त नाक वर राहण्याची करायची... या धडपडीत कधी उगवलेला दिवस मावळतो तेच कळत नाही....
तो काय बोलतो हे त्याच्या बायकोला काही समजायचे नाही, हे त्यालाही कळायचे पण तो बोलत राहायचा... पुर्वी कधी कधी त्याला तिचा राग यायचाही पण पर्याय नसायचा...मग तो उठून निघून जायचा... कधी कधी रात्री उशीरा परत यायचा, तोंडाचा वास लपवत...
पण अलीकडे त्याची बायको समजुतदार झाल्यासारखी वागायची... तिला त्याचं कोड्यातलं बोलणं कळायचं नाही पण ऐकून घ्यायची, कधी कधी ती मानही डोलवायची... तिला काय समजलं असेल का नसेल याचा तो आता विचार करायचा नाही पण बोलत राहायचा....
ती काही बोलली नाही, फक्‍त हुं हां तिने केले. पोरं लांब खेळत होती. त्यानं खिशात पुन्हा हात कोंबला आणि ती नोट चाचपली. पोराच्या शाळेत दोनशे रुपये द्ययाचे होते.. शंभर रुपये भाड्याला जाणार होते....मग दोनशे रुपये शिल्लक राहणार होते. आता तेवढ्यावर दहा-बारा दिवस कसे काढायचे, पण निघतील काहीतरी करुन निघतील... तो स्वतःशीच पुटपुटला.... संध्याकाळेने आता अंगावर अंधाराची चादर ओढून घेतली होती... त्याला आता गडावरुन खाली उतरायची घाई झाली होती... शेवटची गाडी चुकली की गडावरुन पहाटेच खाली उतरता येणार होते... रात्र गडावर काढणे त्याला परवडणारे नव्हतेच... त्याने लगबगीने पोरांना हाक मारली आणि स्टॅंडच्या दिशेने चालू लागला.... मनात देवाचे नाव घेत तो एक एक पाऊल टाकत होता.... तो स्टॅंडवर पोहचला...
शेवटची गाडी कधी सुटणार? दुकानदाराला त्याने प्रश्‍न केला.
अर्धवट राहिलेले शटर बंद करत तो पुटपुटला
सुटली....
काय गाडी सुटली, अहो रात्री आठ वाजता गाडी सुटते ना?
हो पण गडाचा दरवाजा आता आठला बंद होत असल्याने पावणे आठलाच गाडी सुटते... तुम्ही पोहचेपर्यत गडाचा दरवाजाही बंद होणार
मग?
मग काय पावणं, आता रात्र इथेच काढायची...
मंदिराचे भक्‍तनिवास आहे... तिथे झोपण्याची मोफत सोय आहे... फक्‍त जेवणाची सोय तुम्हाला करावी लागणार.... त्याच्या डोळ्यापुढे प्रश्‍नचिन्ह उभे राहिले... आजची रात्र इथे काढायची म्हणजे जेवणाचाही खर्च वाढला....खिशातली ती पाचशेची नोट आता त्याला ढिसूळ लागू लागली...
मघाशी त्याला पोरांचा हेवा वाटू लागला होता... आता त्यांचा त्याला राग यायला लागला. कशाला यायचं इथे... घरात काय जीव जात होतो यांचा.... त्याला बायकोचाही राग यायला लागला. काय आफत आहे, मठ्‌ठ आहे नुसती... तो त्या मंदिराच्या भक्‍तनिवासात पोहचला. तिथल्या कर्मचाऱ्याने त्याला राहण्याची जागा दाखविली. तिथे असलेल्या चादरीवर तो आडवा झाला. आता सकाळच्या पहिल्या गाडीने परतायचे एवढेच त्याच्या डोक्‍यात होते. त्याचा तिथेच डोळा लागला. थोड्यावेळाने पोराच्या रडण्योन त्याला जाग आली. त्याची आईने त्याला बहुतेक मारले असावे. त्याने विचारलं का मारलंस...
सकाळपासून नुसता भूक भूक करतोय... आता हाडं खा म्हणावं...
एकदा त्याची आईही त्याला असंच म्हटल्याचे त्याला आठवलं.... च्यायला पोरांच्या नशिबीही आपलंच दुर्दैव का..
त्यानं पोरांना उठवलं आणि कुठे काही खायला मिळतंय का ते बघितलं....
रस्ते सगळे झोपलेले... दुकाने बंद... त्याला काय करावे कळले नाही... एका हॉटेलच्या खिडकीतून मिणमिणता दिवा त्याला दिसला. त्याने खिशात हात घातला आणि पुन्हा ती पाचशेची नोट चाचपली... त्याने दारावर थाप मारली...
एक साठीच्या आसपास असलेल्या बाईने दार उघडले....
काय काय पाहिजे...
जेवायला काही आहे.....
त्या बाईने एकदा त्याच्याकडे आणि नंतर त्या बाईकडे आणि मुलाकडे बघितलं....
नाही काहीच शिल्लक नाही....
बघा की पोरं उपाशी आहेत काही आहे का?
भात पिठलं चालेल का? पन्नास रुपये पडतील....
भात पिठल्याला पन्नास रुपये म्हणजे चौघांचे मिळून दोनशे रुपये झाले.... या पोरांना एक रात्र उपाशी काढायला काय होतंय... मरणार आहेत काय एका रात्रीतून....त्याच्या मनात आलं पण तो बोलला नाही...पोरांना खायला घालू आणि जाऊ... त्यानं विचार केला...
मलाही भूक लागलीय.... मीही भात-पिठलं खाईन.... त्याच्या बायकोने सांगितले.. मग मी काय घोडं मारलं आहे.
द्या की...
तो आत आला.. त्या एकत्र केलेल्या खुर्च्या त्याने वेगवेगळ्या केल्या ....सगळे बसले....
काय बाई आहे.. गरजवंताला अक्‍कल नसते असं म्हणतात ते उगाच नाही.. दहा रुपयांचे भात-पिठलं पन्नास रुपयांना... त्याने मनातल्या मनात त्या बाईला शिवी हासडली.... त्याला त्याच्या बायकोचाही राग आला.. येताना काहीतरी खायला घेऊन आली असती तर... पण तो काही बोलला नाही..... घरी गेल्यावर बघतो....
अर्ध्या तासाने त्या बाईने चार पानं केली...
प्रत्येक घास खाताना त्याला मोडल्या जाणाऱ्या पाचशे रुपयांची नोट समोर येत होती... आता पन्नास रुपये घेणार आहेच तर मग खा की भरपूर म्हणून मग त्याने पुन्हा पुन्हा भात मागितला. शेवटी भात संपला सांगण्यासाठी तिने पातेलंच समोर आणलं...
पन्नास रुपयांत आता पोटभर भातही नाही याची त्याला आणखी चिड आली...
पोरं जेवली.... यानंही मग हात धुतला...
खिशातून त्याने पाचशेची नोट काढली....त्या बाईच्या हातात दिली...
भात पोटभर मिळाला नाही मावशी....
माफ करा हं पण मला अंदाज नाही आला... त्या बाईने अपराधी भावनेनं माफी मागितली...
एवढे पैसे सुटे कुठले..... जरा सुटे पैसे असतील तर द्या की....
नाही हो... एवढेच आहेत... यातील दोनशे रुपये घ्या आणि बाकीचे तिनशे परत द्या....
म्हातारीची चेष्टा करता काय? आहो भात पिठल्याला कोणी दोनशे रुपये घेते काय? आणि मी भात-पिठलं काय धंदा म्हणून नाही वाढलं... ही पोरं उपाशी झोपू नयेत म्हणून केलं.... त्यात तूमचं पोट तरी कुठे भरलं. तुम्हाला मी पन्नास रुपये म्हटलं खरं पण तीस रुपये असले तरी द्या...
त्याला काही सुचेनासं झालं... म्हणजे या बाईने चौघांसाठी पन्नास रुपये सांगितले होते. मघाशी प्रत्येक घास खाताना आपण या बाईला शिव्या-शाप दिला...
सुटे तीस रुपये नसतील तर नाही दिले तर चातलील.... बाईच्या त्या वाक्‍याने तो भानावर आला...
नाही घ्या नाय यातील तीस रुपये....
नाही ओ... चार दिवस धंदा कुठे झालाय पैसे असायला.... तुम्ही नंतर कधी आलात गडावर तर द्या पैसे....
त्याने पाचशेची नोट खिशात कोंबली. त्या रात्री त्याला झोप लागली नाही.... दुसऱ्या दिवशी सकाळी गाडी पकडण्याच्या नादात त्याला त्या बाईची आठवण झाली नाही, पण आजही मध्यरात्री कधीतरी त्याला त्या बाईचा चेहरा आठवतो आणि तो दचकून उठतो...
त्या बाईचे ते तीस रुपये तसेच त्याच्या खिशात वेगळे आहेत... सज्जनगडावर जाण्याच्या प्रतीक्षेत.......

शुक्रवार, १ ऑक्टोबर, २०१०

लाल

प्रार्थना संपली आणि सगळी मुले खाली बसली....वर्गशिक्षक एक एक विद्यार्थ्याचे नाव घेऊन हजेरीपट मांडत होते.....
तिचं नाव घेतल्यावर दारातूनच उत्तर आलं
""हजर''
शिक्षकांनी नाकावर आलेल्या चष्म्यावरुन तिच्याकडे बघितलं आणि डोळ्यांनीच तिथंच थांब म्हणून दटावलं.
सगळ्या विद्यार्थ्यांची हजेरी घेऊन झाल्यावर शिक्षकांनी तिला बोलावलं...
हं या आत. कुठे मैदान मारुन आलात?.....अर्थात या शब्दांचा तिच्यावर काही परिणाम होणार नसल्याचे त्यांना माहित होतं.
ती काही बोलली नाही, गप्प उभी राहिली... खूप रडली असावी असे तिचे डोळे लाल असायचे....त्यांनी तिला एकदा विचारलेही होते; पण तिने काही सांगितले नाही.....तशी ती कधीच काही बोलायची नाही... ताठ मानेने डोळ्यात डोळे घालून उभी राहायची... तिचे ते लालभडक डोळे बघुन त्यांना त्यांची भीती वाटायची... त्या डोळ्यांत त्यांना कधी पाणी दिसलेच नाही...
ती शाळेला रोजच उशिरा यायची... रोज ते शिक्षक तिला त्याचे कारण विचारायचे पण ती बोलायची नाही.... तिच्या उशिरा येण्यापेक्षा ती न बोलता गप्प बसायची याचाच त्यांना राग यायचा....
आज जर कारण सांगितले नाहीस तर वर्गात बसू देणार नाही... तुझ्या आई-बाबाला घेऊन ये..... शिक्षकांनी फर्मावलं.
तरीही ती गप्प उभी राहिली... तिचा तो गप्पपणा शिक्षकांना बोचू लागला.... शिक्षा करावी तर दहावीच्या वर्गातील मुलीला शिक्षा तरी काय करणार.... त्यांना काही सुचेना... पण आज सोक्षमोक्ष लावायचाच याचा निर्धार त्यांनी केला.
"चल ! मुख्याध्यापकांनी जर तुला बसू दिलं तर बस वर्गात...' शिक्षक मुख्याध्यापकांच्या केबीनच्या दिशेने चालू लागले... ती त्यांच्या मागे....
मुख्याध्यापकांची केबीन ...छे! मारुतीच्या मंदिरात एका बाजुने दानात मिळालेली तिजोरी आणि दुसऱ्या बाजुला असलेल्या कट्ट्याचा आधार घेऊन केलेली छोटी जागा म्हणजे केबीन.... शाळाच चार घरांत भरायची तर केबीन कुठली असणार....
त्या दहा बारा गावांत एकच शाळा... वाड्या-पाड्यातील पोरं यायची... कधीही यायची... कधीही जायची.... शिक्षकांना त्याची सवयच झाली होती.... पण इथे फरक होता... पोरांना उशीर का म्हणून विचारलं की काही-बाही उत्तर सांगायची.... म्हस चारायला गेलतो, आई गावाला गिलीया, बाबा आजारी हाय... काहीही उत्तरं यायची पण उत्तरं यायची पण ही मुलगी काहीच उत्तर द्यायची नाही....
तसे ते शिक्षक नवीनच, इथल्या पोरांची त्यांना भाषाच कळायची नाही.. कधी कधी ते चिडायचे...पण पोरंच त्यांच्या भाषेला हसत राहायची... ते तिला घेऊन मुख्याध्यापकांकडे घेऊन गेले...
मुख्याध्यापक.... ते कधी असत कधी नसत. असले तरी त्यांचे शाळेकडे लक्ष कमीच... कुठल्या तरी चळवळीत ते काम करायचे... त्याच्या मासिकाचे संपादनाचेच काम मोठे...ते काही तरी पांढऱ्यावर काळे करत बसले होते....
सर, ही मुलगी रोज शाळेला उशिरा येते आणि कारण विचारले तरी बोलतही नाही....
मुख्याध्यापकांनी एकदा तिच्याकडे बघितलं.. ती खाली मान घालून गप्प उभी होती....
अभ्यास कसा करुन राहिला, सर? मुख्याध्यापकांनी मान वर न काढताच शिक्षकांना प्रश्‍न केला.
चांगला आहे... म्हणजे दहावीला जर मंडळाने नंबर काढला तर हीचाच नंबर येईल... शिक्षकांनी सांगितलं...
मग येऊ द्या की.... , मुख्याध्यापकांनी तिला काहीच न विचारता सुनावलेला हा निर्णय ऐकून शिक्षकांना काय बोलावे सुचेना....
ते वर्गात आले... आज त्यांना शिकविण्याचा मूडच राहिला नाही... सरांनी असा का निर्णय दिला असेल... तिला बोलतं करण्याचा प्रश्‍नच नव्हता....
तिच्या उशिरा येण्याचा प्रश्‍न नव्हताच, पण ती उशिरा का येते याचे कारण कधीच सांगत नव्हती हाच प्रश्‍न होता...ते वर्गावर आले पण त्यांचे शिकविण्याकडे लक्ष लागले नाही....
पुढच्या जवळपास प्रत्येक दिवशी ती उशिराच यायची.... एकदा त्यांनी तिला सरळ सांगून टाकलं तू मला विचारत जाऊ नकोस आलीस की सरळ वर्गात येऊन बस.... पण तरीही ती उशिरा आली की पहिली एक दोन मिनीटे त्यांना त्रास व्हायचाच....
दहावीची परीक्षा झाली...... निकाल लागला....अपेक्षेप्रमाणे ती शाळेत पहिली आली होतीच.... कदाचीत ती मंडळातही पहिलीच असावी... सगळ्या शिक्षकांनी तिचे तोंडभरुन कौतुक केलं... पण ती बोलली नाही...
त्या शिक्षकांनीही ती शाळा सोडली... पुन्हा धकाधकीच्या प्रवाहात स्वतःला वाहतं केलं... इथं चकचकीत बुट आणि टाय घातलेली पोरं बघितली की त्यांचा त्यांना हेवा वाटायचा... एखादा विद्यार्थी उशिरा आला की मग त्यांना ती आठवायची...त्याचबरोबर तिचे ते लाल डोळे आठवायचे. ती मुलगी त्यांच्या डोक्‍यातून काही गेली नाही....एकदा असेच नवीन कुठले मासीक आले म्हणून ते बघत होते.... मासीक चाळता चाळता त्यांची नजर त्या फोटोवर गेली... तीच ती...त्यांची उत्सुकता ताणली... त्यावेळी ते ज्या शाळेत शिकवत होते त्या शाळेच्या मुख्याध्यापकांचा तो लेख होता.....
"" वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षीच तिने या लढाईत भाग घेतला. शालेय शिक्षणही पूर्ण झालं नव्हतं पण व्यवस्थेला संपवायचा विडाच तिने उचलला. खरे तर तिने पेनाने लढाई लढावी, असेच मला वाटायचे पण तिने तो मार्ग नाकारला आणि पेनाऐवजी तिने हातात बंदूक घेतली...या दिशेने पाऊल टाकल्यानंतर येणारा शेवट निश्‍चित होता... पण, ती शेवटपर्यंत डळमळली नाही...'' लेख खूपच मोठा होता... पण त्यांना पुढे वाचता आले नाही.... त्या लालभडक डोळ्यांना आठवून त्यांच्या डोळ्यात पाणी दाटले.....

जांभळा

ट्रंकेतील तो जांभळा ड्रेस हलकेच काढतानाही त्याचा कडेचा पत्रा लागलाच... जीर्ण झालेल्या त्या कपड्याला तो पत्र्याचा स्पर्श पेलवला नाही, भाजी चिरताना नकळत विळीची धार बोटांना लागावी, अशी ती कळकळली.... किती वर्षे झाली ... बारा तरी होऊन गेली असावीत.... अकरावी परीक्षा पास झाल्यावर हट्‌टाने बाबांकडून तो ड्रेस मागून घेतला होता.... दुकानाच्या काचेतून दिसणारा तो मोरपंखी जांभळा ड्रेस कितीतरी दिवस तिच्या डोळ्यात घर करुन राहिला होता...तोच ड्रेस घ्यायचा म्हणून ती हट्‌टून बसली होती....घागरा चोली घालून काय तमाशा करायचा आहे काय? असं बाबा म्हणाले खरे पण त्यांचा हा राग लटका होता..
""एकच तर मुलगी आहे तिचा हट्‌ट नाही, पुरवायचा तर मग कोणाचा हट्‌ट पुरवायचा.''
आईच्या या वाक्‍यापुढे बाबांचं काहीच चालायचं नाही. त्या तलम मोरपंखी जांभळ्या कपड्याचा पहिला स्पर्श झाल्यावर असंख्य मोर मनात नाच करत होते....
त्यावर्षी दांडिया खेळताना उगाचच आपण कोणीतरी वेगळे आहोत असे वाटून गेलं. कितीजणींनी त्या ड्रेसबद्दल विचारलं होतं....
""असे गडद रंग तुला फार शोभून दिसतात.''
शेजारच्या काकूंनी केलेली ती स्तुती आठवली तरी आजही अंगावर मुठभर मांस चढते....
तिला त्या ड्रेसविषयीच्या सगळ्या आठवणी दाटून आल्या.... कितीकाळ ती त्या ड्रेसला कुरवाळत बसली...
""उठा ! पब्लीकला जमा करायचंय. आजच्या खेळाला चार पैसं मिळालं न्हायी तर जेवायला घावणार न्हायी.... ''
तिचा नवरा तिच्यावर डाफरत होता.... तो सायकल सर्कस करायचा... पण त्याच्या खेळाला माणसं कुठं जमायची म्हणून तिला आधी नाचवायचा....
त्याच्यासोबत पळून आली त्यावेळी ती अवघी आठरा वर्षांची होती. घरात बाबांना विचारायची हिम्मतच झाली नाही.... त्याच्याही घरात विरोधच....
""कुठेही राहू, मीठ भाकर खाऊ'', तो सांगायचा... तिलाही ते पटायचं....दोघांनीही पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला... पळण्याचा आधी निर्णय घेतला आणि नंतर तो नशीबाचाच भाग बनला... पळणं मागेच लागलं....लग्न होऊन सहा महिने झाले नसतील... तोच एका रात्री तिचा नवरा भीत भीत घरात शिरला....गेल्या चार-पाच महिन्यात तो कमालीचा दारु प्यायला लागला होता... दुकानदाराशी उदारीवरुन भांडण झालं, हातातील फुटलेली बाटली तशीच त्याच्या पोटात खुपसली....तिला समजायचं ते समजलं... हातात जे लागेल ते घेतलं आणि पळायला सुरवात केली... एक गाव झालं की दुसरं... दुसरं झालं की तिसरं....प्रत्येक गावात जाऊन रोजगार कुठे मागायचा, म्हणून मग सायकल सर्कस सुरु केली.... तो सायकलीवर कसरती करायचा.... पण पब्लीक जमा व्हायचं नाही....म्हणून मग तिच्या नवऱ्याने तिला नाचायला लावलं....घरातनं बाहेर पडताना घेतलेला तो ड्रेस तेवढीच तिची संपत्ती.... तो ड्रेस घालून ती रस्त्यावर उतरली की भल्या भल्यांच्या नजरा तिच्यावर खिळायच्या... त्या लोकांची लोचट नजर बघून तिला असह्य व्हायचं पण इलाज चालायचा नाही....चार पैसे हाताशी लागायचे पोटाची खळगी भरायची आणि पुढच्या गावचा रस्ता धरायचा....ज्याचा हात धरुन ती पळून आली होती त्याच्यासाठी पळणं एवढंच तिच्या नशीबी उरलं होतं...
पाठित एक जोराचा मुक्‍का मारुन त्यानं तिला जोरात शिवी हासडली, तशी ती भानावर आली.
"चल बाहेर''
तो म्हणाला आणि तसाच मागे वळला..
तिने हातातल्या त्या जांभळ्या रंगाच्या ड्रेसकडे बघितलं...त्याचा रंग आता पार फिका पडला होता....
तिनं घागरा, चोली घातली आणि रस्त्यावर येण्यासाठी दारात उभी राहिली.... तिचा नवरा मोठ-मोठ्याने ओरडत होता... तमाशा देखो- तमाशा देखो....
नवऱ्याचे ते शब्द ऐकून बांबाचे शब्द तिला आठवले....घागरा चोली घालून काय तमाशा करायचाय....ती अस्वस्थ झाली...
मघाशी ट्रंकेतून बाहेर काढताना तो ड्रेस दंडावरच फाटला होता.... लोक त्या फाटलेल्या भागाकडेच बघत राहाणार...तिला स्वतःचीच किळस आली...आता नाचलं की पैसे मिळणार आणि त्याच पैशानं हा दारु पिणार आणि रात्री पुन्हा मारणार.... ती स्वतःशीच पुटपुटली.... त्या जांभळ्या ड्रेसचा रंग जसा फिका पडला होता....तसंच तिच्या नवऱ्याविषयी वाटणाऱ्या भावनांच्या आता चिंध्या झाल्या होत्या... त्याचा रंग तर केव्हाच उडून गेला होता...तीची ही जाणीव आणखी तीव्र झाली... तिने अंगावरचा तो ड्रेस काढला, त्या ड्रेसकडे पुन्हा एकदा तिने पाहिले... त्या विटलेल्या जांभळ्या ड्रेसमधुन असंख्य मोर तिला खुणावत होते.... तो ड्रेस तिने ट्रंकेत ठेवला.....तिचा नवरा बाहेर ओरडत होता..... तीने ट्रंक उचललली आणि ती पळू लागली... यावेळी तिच्या नशिबापासून नाही तर नशीबाच्या शोधात डोळयात नाचणारे जांभळे मोर घेऊन.....

निळा.....

या समुद्रात आणि मनात तसे बरेच साम्य.... समुद्र अथांग आणि मनाचाही कोठे थांग लागतो......दोघांनाही भरती-ओहटी येते... समुद्रालाही मर्यादा पाळायला लागतात आणि मनालाही.... दोघांनीही मर्यादा सोडली की अनर्थच.... मग मागे उरतो केवळ कचारा, गाळ, असह्य करुन सोडणारा कुजलेला कुबट वास ... एक लाट चटकन आली तिने मघाशी ओढलेल्या रेघोट्या घेऊन निघून गेली.... मनावरचे आठवणींचे ओरखडे असे मिटले असते तर.... पुन्हा डोक्‍यात विचारांनी गलका सुरु केला.... एका विचारातून दुसरा आणि दुसऱ्यातून तिसरा.... पण ही साखळी कुठे आहे... एका कडीतून दुसऱ्या कडीत घेवून जाणारा विचार हवा... पण तसे होत नाही.... सगळेच आपली मतं मांडतात आणि मग गलका होतो.... डोकं भणभणतं....पण या विचारातून बाहेर कसं पडायचं.... एक विचार मारायला दुसरा विचार डोक्‍यात आणायचा.... पण पहिल्याने ती जागा सोडायला तर हवी. ती जागा सोडली तर पुढे जाता येतं पण पहिल्या विचाराने जागाच सोडली नाही तर... तर मग साचलेपण येतं..... विचारांच्या गलक्‍याचा आवाज जसा टीपेला पोहचला तसं तिचं डोकं भणभणायला लागलं.... तिची चलबिचल वाढली. ती थरथरली.... सुरकुतलेली तिची गोरी कातडी आणखी पांढरी पडू लागली....
चला आत, वारा सुटायला लागलाय....तिच्यासोबत आलेल्या त्या मुलीने तिच्या आंगावरची शाल सरळ केली. आणि तिला उठण्यासाठी हात दिला... तिने तो हात नाकारला... स्वतःच उठण्याचा प्रयत्न केला... पण अशक्‍तपणाने तो फसला.... ती मुलगी सरळ पुढे झाली तिने दोन्ही हातांनी तिच्या हातांना धरलं आणि तिला उठण्यास मदत केली. यावेळी मात्र तिने कोणताच प्रतिकार केला नाही.... तिच्या खांद्याच्या आधाराने ती चालू लागली... समुद्रावरची तिची दृष्टी तशी खिळून होती....
ती राहात होती त्या खोलीतूनही समुद्र दिसायचा....समुद्र पाहायचा तिला नादच लागला होता.....ती इथे आल्यापासून ती समुद्राला डोळ्यात साठवत होती...ती खिडकीत बसुन राहिली.... काळोखाचा पडदा गडद झाला, तशी ती उठली... जेवणावरची वासनाच उठली होती... तरी तिने दोन घास पाण्याबरोबर घशात कोंबले...जेवणापेक्षा तिला दिल्या जाणाऱ्या औषधांच्या गोळ्याच जास्त होत्या.... रोज गोळ्या घेताना तिला वाटायचं अजून कशी जगण्याची वासना टिकून आहे....कधी कधी गोळ्या घ्यायची इच्छा नसली की तिचा नवरा तिला समजावयाचा... गेलेल्या माणसांचा विचार करु नको....आपल्याला जगलं पाहिजे, माझ्यासाठी तरी तू जग.... मग तासन्‌ तास ती लेकरांच्या फोटाखाली आसवं ढाळीत बसायची.... नवराच मग घास भरवायचा, गोळ्या द्यायचा..... पण ते गेल्यापासून तिला काहीच सुचेना....काही काळ तिने गोळ्या नाकारुन बघितल्याही ....मग पाय बांधून, हात बांधून गोळ्या चारणं सुरु झालं....मग तिनं गोळ्या नाकारणं बंद केलं..
दुसऱ्या दिवशीही ती किनाऱ्यावर बसून राहिली.... समुद्राची निळाई तिच्या निळ्या डोळ्यात साठत राहिली... या समुद्राचा रंगही निळा आणि आकाशाचाही रंग निळाच.... किती दिवसांनी ती आकाशाकडे बघत होती... दिवस छे किती वर्ष झाली आकाशाकडे बघून... रोज दिसाणारी ही निळाई डोळ्यात का साठत नव्हती....तिचा नवरा तिला म्हणायचा... तुझ्या डोळ्यात मला काहीच दिसत नाही.... या निळ्या रंगाचा अर्थ काय?, ती काही बोलायची नाही.... समोरचा सागरही तसाच निळा तिच्या डोळ्यांसारखा. या आकाशाची निळाईच या सागरात प्रतिबिंबित होते.... तो निर्वाताचा, पोकळीचा रंगच खरा..... मग तिला जाणवलं आपले डोळेही असेच निळे.... पोकळीचा रंग ल्यायलेले... आता पोकळीच तर उरली बाकी काहीच नाही... आठवणीच्या पापुद्य्रात केवळ पोकळी.... अंनतांचा ध्यास घेणारी.... ती उठली.... अडखळत ती घरात शिरली.... होत्या नव्हत्या त्या गोळ्या तिने घेतल्या..... सकाळी कोणीतरी दार उघडलं.... आजाराला कंटाळून आत्महत्या असा पोलिस रिपोर्ट आला....एक पोकळी दुसऱ्या पोकळीत विलीन झाली होती...

पिवळा......

कितीवेळ गेला ठाऊक नाही. पण या काळात ढगांनी किती आकार बदलले, जशी सुर्याची किरणे तिरपी होत गेली तसा रंगही बदलत गेला. कापसासारखा मऊ मुलायम रंग... एखाद्या विरक्‍त माणसासारखा... सगळ्या इच्छा अर्पून रिता झाल्यासारखा... नाही तरी तो रिता झालेलाच असतो की... ओंजळ लहान आहे की मोठी, काही बघत नाही... देत राहतो, बरसत राहतो. जेवढं आहे ते सगळं देतो म्हणूनच त्याचा तो पांढरा रंग... मग येणारी पिवळसर छटा... विरक्‍तीतून जाणिवांच्या दिशेने नेणारी... या रंगाचा अर्थ लावायचा तरी कसा?... कारण अगोदर असणारा पांढरा हा विरक्‍तीचाच आणि नंतरचा भगवा हाही विरक्‍तीचा! अर्थात भगवा पुढे मोक्षाच्या दिशेने जाणारा... पहिल्या पांढऱ्या रंगात मोक्षाचीही अभिलाषा नाही. तिथे फक्‍त देणे आहे. दिल्यानंतरचे समाधान त्यात ओतप्रोत आहे. त्यामुळे तिथे कुठलेच इच्छेचे रंग दिसत नाहीत. दिसतो तो फक्‍त पांढरा शुभ्र रंग... इच्छा आकांक्षांना मागे ठेवलेला पांढरा रंग.... नंतरच्या केशरी किंवा भगव्या रंगाचा अर्थही विरक्‍तीच्या दिशेने जाणाराच पण इथे त्याला मोक्षाची इच्छा आहे... म्हणूनच मघाशी कापसाच्या पुंजक्‍यासारखा पांढरा शुभ्र दिसणारा ढग आता भगवा रंग घेतल्यानंतर विरळ होतो आहे... त्याला मोक्षाची, विरुन जाण्याची फार घाई झाल्याचे जाणवते... पण या मधला जो पिवळा रंग आहे त्याचा अर्थ काय लावायचा?... समाधानाच्या समाधीतून जागे होऊन मोक्षाच्या दिशेने जाणाऱ्या वाटेचा हा रंग... विचारांची तंद्री सुटली तसे सगळ्या परिसराचा ताबा आंधाराने घेतल्याचे त्याला जाणवले... तो उठला... त्याने देवासमोर दिवा लावला... ती पिवळी ज्योत फडफडली आणि पुन्हा त्याच्या मनाने त्या पिवळ्या रंगाचा शोध सुरु केला... काय असेल याचा अर्थ... ही ज्योतही मोक्षाच्या दिशेनेच चाललेली... कापसाचा पांढरा रंग हरवून ती ही याच वाटेने चाललेली... मोक्षाच्या इच्छेचाच रंग पिवळा... तो अस्वस्
थ झाला... अंगाला त्याच्या घाम सुटला... आयुष्यभर ज्याच्यामागे धावलो तो साक्षात्कार वयाच्या उत्तरार्धात असाही मिळू शकतो का? त्यालाच प्रश्‍न पडला! सगळ्या इच्छा, आकांक्षा मागे ठेवून एकाकीपणाचे जीवन आपण पसंत केले... अगोदर पसंत केले मग ते समाजाने लादले... कपड्याचे रंग बदलले... पांढऱ्याशुभ्र धोतराचे रुपांतर मग भगव्या वस्त्रात केव्हा झाले ते त्यालाही कळले नाही... मग तो रंग चिकटला तो चिकटलाच... पण या भगव्यापेक्षाही त्याला आता पिवळा रंग फार जवळचा वाटू लागला... तो पिवळा रंग त्याच्या डोळ्यात साकाळत राहिला... सकाळी कोणीतरी कडी वाजवली..... दार उघडले नाही... प्रतिसाद आला नाही... महाराजऽऽऽऽऽऽऽ... शिष्याने टाहो फोडला... त्यांचा पिवळा पडलेला देह बघून कोणीतरी म्हणाले, महाराजांना काविळीने गिळले... त्यांना काय माहित, महाराज मोक्षाच्या वाटेवर निघून गेले होते...

गुरुवार, १६ सप्टेंबर, २०१०

गांधीवाद आता पेलवत नाही....

गांधीवाद आता पेलवत नाही....

कोणतीही राजकीय व्यवस्था परिपूर्ण असत नाही. सगळ्यांना खुश ठेवणे हे कोणत्याही व्यवस्थेला शक्‍यच नाही, त्यामुळे अशी राजकीय व्यवस्था असली पाहिजे जी बहुसंख्यांकांना खुश करणारी आणि अल्पसंख्यांकाना नाराज न करणारी. लोकशाहीत ती मुल्ये अंतर्भूत असतात म्हणूनच लोकशाही ही सध्याच्या ज्ञात राजकीय व्यवस्थेत सर्वोत्कृष्ट मानली गेली, पण तरीही लोकशाहीने बहुसंख्यांचे हित जोपासले का?( इथे बहुसंख्यांक या शब्दाचा अर्थ बहुसंख्यांक असाच आहे. भारतात अल्पसंख्यांक, बहुसंख्यांक अशा शब्दांना जाती धर्माचा वास येतो, तो अर्थ इथे अपेक्षित नाही. त्यामुळेच जर गरीब, मध्यमवर्गीय आणि श्रीमंत असे वर्ग केले तर गरीब या वर्गात, जो बहुसंख्यांक आहे त्यात हिंदूंबरोबर मुस्लिम, ख्रिश्‍चन आणि बौध येतातच) हा प्रश्‍नच आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगाच्या पाठिवर लोकशाहीने भांडवलदारांचे पाय चेपण्यातच धन्यता मानली आहे. सकृतदर्शनी सगळं चांगलं दिसत असलं तरी व्यवस्था म्हणून अनेक बाबतीत लोकशाही अपयशी ठरली आहे, हे मान्यच करावे लागेल.
अंधपणाने लोकशाहीवर प्रेम करणाऱ्यांचा दावा असतो की, गरीबातील गरीबाला राजव्यवस्थेत स्थान लोकशाहीनेच मिळाले, गरीब-अशिक्षीत जात-धर्म यांपलीकडे जाऊन आपला नेता आणि राज्यकर्ते कोण असावेत हे ठरविण्याचा अधिकार लोकशाहीनेच दिला. पण सध्याची परिस्थीती बघितली तर खरेच हा अधिकार आता उरला आहे का? कि केवळ सांगडा उरला आहे. गेल्या लोकसभेत आणि विधानसभेतील निवडणूक लढविणाऱ्या कोणत्याही उमेदवाराच्या खासगी स्वीय सहायकला विचारले तर तो सांगेल की निवडणूक लढविण्याचा खर्च किती आला ते. या अकड्यांवरील शुन्य कीती असतात हेही सर्वसामान्य लोकांना कळत नाही मग निवडणूक लढविणे तर सोडाच.
लोकशाही ही धनिकांची बाटीक बनली आहे की काय हा प्रश्‍न उपस्थित होतो. लोकसभेत उधळलेल्या नोटांनी हे आणखी स्पष्ट केले आहे.

बहुसंख्यांकांचे धिंडवडे
जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारत बिरुदावली मिरवतो. लोकसंख्येच्या अंकशास्त्रानुसार भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाहीवादी देश आहे, यात शंका नाही, पण लोकशाही म्हणजे केवळ लोकांना मतदानाचा अधिकार एवढंच मर्यादित आहे का? की त्यापुढे जाऊन काही वेगळे आहे हे तपासायला गेले तर हातात केवळ कचरा कचरा आणि कचराच लागतो. लोकशाहीत खरे तर मुखवट्यांचे राज्य असते. जसा सण येता तसा मुखवटा चढवून रस्त्यावर नाच करणाऱ्यांप्रमाणे प्रत्येकवेळा मुखवटा बदलला जातो. हे बहुतेक मुखवटे बहुसंख्यांकाना खुश करण्यासाठीच चढविलेले असतात, या मुखवट्यामागचा भेसुर चेहरा मात्र दिसत नाही.
साधे उदाहरण घ्यायचे झाल्यास शेतकऱ्यांसाठी दिलेल्या कर्जमाफीचे घेता येईल. ज्या देशाची लोकसंख्या आगामी काळात दिडशे कोटींच्या घरात जाईल आणि या वाढलेल्या तोंडांची भूक भागविण्यासाठी जे हात दिवसरात्र राबताहेत, संसदेत बसलेले लोक ज्यांच्या मतावर निवडून आले आहेत त्यांचे (शेतीसाठी घेतलेले) कर्ज माफ करताना सरकारने दयाळू आणि दानशूरपणाचा मुखवटा असा काही घातला होता की कर्जमाफी घेणाऱ्या हातांना आपण खूप मोठे पातक करतो आहोत की काय असा भास होत राहिला. पण त्याचवेळी उद्योगजगताला सरकारेन जे स्टीम्युलेटींग पॅकेज दिले त्याचा गाजावाजा झाला नाही. देशातील 70 टक्‍के जनता ही शेतीवर अवलंबून आहे. त्या 70 टक्‍के म्हणजेच जवळपास 90 कोटी लोकसंख्येसाठी सरकारने 60 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली तर जी संख्या एक कोटींपेक्षा कमी आहे, त्या लोकसंख्येसाठी सरकारने स्टीम्युलेटींग पॅकेज दिले, ज्याव्दारे सरकारच्या तिजोरीत येणारे 16 हजार कोटी रुपये थांबले किंबहूना ते या उद्योजकांना मिळाले. प्रश्‍न हे बरोबर की चूक असा नाही. प्रश्‍न आहे तो नैतीकतेचा आणि सरकारी दायित्वाचा. शेतकऱ्यांच्या पुढे टाकलेल्या तुकड्यांचा गाजावाजा होतो तर मग या उद्योगांना खाऊ घातलेल्या श्रीखंड पुरीचाही गाजावाजा व्हायलाच हवा.
खरे तर एकूणच राजकीय व्यवस्थेकडे बघण्याचा दृष्टीकोन लोकांनी बदलायला हवा. जगातील सर्व कालीन आणि सर्व राजकीय व्यवस्थांनी आम्ही तुमच्यासाठी "सर्वकाही' करतो असा असेच सांगितले. खरे तर राजकीय व्यवस्था ही सर्वसामान्यांनी त्यांचे जगणे सुसह्या व्हावे म्हणून स्वीकरलेले एक साधन आहे. जसं एखाद्या चित्रकाराने जर खूप चांगले चित्र काढले तर त्याचे श्रेय कुंचल्याला जात नाही तसेच राजकीय व्यवस्थेचे आहे. मग याच्या पुढचा भाग असा येतो की जर चित्र चांगले झाले नाही तर याचा अर्थ चित्रकारालाच बाद म्हणावे लागेल. तसे म्हणण्यातही अडचण नाही, पण त्याचबरोबर हेही तपासायला हवे की कुंचला कुठे बिघडला नाही का? आणि जर हा कुंचलाच बिघडलेला असेल तर मग तो बदलायचे धाडस हवे. इथे येणारे चित्र महत्त्वाचे, त्यामुळे कुंचला कीतीही रेखीव असला तरी तो बदलायचे धाडस चित्रकाराने दाखविले पाहिजे. त्याचप्रमाणे राजकीय व्यवस्था समाजातील स्वास्थ्य टिकवून त्याची प्रगती घडविण्याचे साधन आहे. त्यामुळे जर हे साधनच बिघडले असेल तर ते बदलायचा पर्याय ठेवायलाच हवा. त्यामुळेच राज्यकर्ते जेव्हा म्हणतात की आम्ही हे केले ते केले त्यावेळी त्यांना प्रश्‍न विचारायला हवा की तुमची नेमणूकच त्यासाठी आहे. राज्यकर्ते जेव्हा सांगतात की आम्ही एक कोटीचा निधी तुमच्यासाठी आणला, शंभर कोटींची विकासकामे केली, त्यावेळी त्यांना विचाराला हवे की बाबांनो हे कोटींचे आकडे तुम्ही कोणाच्या जीवावर बोलता आहात, आम्ही इथे श्‍वास घेतो त्यावरच फक्‍त कर लावलेला नाही. नाही तर सर्वच गोष्टींवर कर लागतोच की. त्यामुळे आमच्या खिशातून काढून तुम्ही खर्च केले आणि वर आम्हालाच सांगता की आम्ही खर्च केला म्हणून. आता हा पैसा खर्च करतानाही तो आमच्याच वाट्याला परिपूण येतो कुठे. पिकाला पाणी देणाऱ्या पाईपलाईला जर शंभर छिद्रे पाडली आणि तीन दिवस
पाणी देत जरी राहिलो तरी पीक वाळायचे तसे वाळणारच की त्याच प्रमाणे हा पैसा खर्च होतो. गरीबांच्या नावाने योजना तयार करायची, त्यासाठी निधीची तरतूद करायची आणि मग त्या योजनेतून पैशाचा रतीब खात राहायचे. राजीव गांधी नेहमी म्हणत असत जर शंभर रुपयांची योजना जाहीर केली तर तळात येईपर्यंत केवळ पंधरा पैशांचेच काम होते.. ती परिस्थीती राजीव गांधी सत्तेत येण्यापुर्वीही होती आणि आजही आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार राज्यकर्तेच आहे.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने हे पुन्हा अधोरेखीत झाले आहे. 46 हजार कोटी रुपये या स्पर्धेच्या आयोजनासाठी खर्च करण्यात आले आहेत. 16 हजार कोटी रुपये आफ्रीकेतील अनेक देशांचे वार्षीक अर्थसंकल्पही एवढा नाही. हे पैसे आले कोठून. लोकांनी घाम गाळून मिळविलेल्या पैसे कराच्या मार्गातून सरकारकडे जमा झाले आणि तेच पैसे सरकारने (खोट्या) प्रतष्ठिेसाठी खर्च केले. खर्च केले म्हणण्यापेक्षा मुठभर लोकांच्या खिशात कोंबले. हजारो कोटी रुपयांचा घोटाळ झाला. घोटाळा हा शब्दच चुकीचा चक्‍क पैसे खाल्ले. आता बरेच पोपट हे सांगतात की राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित केल्यामुळे देशातील पर्यटन क्षेत्राचा विकास होण्यास मदत होईल म्हणून. पण हे काही खरे नाही. कुठलेही नियोजन नसताना केवळ कल्पनांच्या भरारीवर मांडलेली ही गृहीतके आहेत. हे 46 हजार कोटी रुपये काही पर्यटनक्षेत्रांच्या विकासासाठी खर्च केले जाणार नाहीत. त्यामुुळे राष्ट्रकुलच्या निमित्ताने जे लोक येतील ते लोक पर्यटनस्थळांना भेट देतीलही पण पुढे काय?. कोणत्याही तयारीशिवाय परीक्षेला बसल्यानंतर जी अवस्था होते तीच अवस्था होणार. हेच लोक पुन्हा आपपल्या देशात परतल्यानंतर येथील पर्यटनस्थळांचे वर्णन करतील आणि जे चार लोक येणार होते तेही कमी हाईल. कोणत्याही निर्णयाच्या दोन बाजू असतातच एक चांगली आणि एक वाईट. बहुसंख्य लोकांना जो निर्णय अपील होतो तो निर्णय घेणे इष्ट. मुळात ज्या देशातील 30 कोटींहून अधिक जनता एकवेळ उपाशी राहते त्या देशाने असे खेळावर पैसे लुटावेत का? हा प्रश्‍न आहे, आणि त्यापुढे जाऊन इतके पैसे खर्च केल्यानंतर तरी देशातील काही खेळांत प्रगती होणार आहे का?...या प्रश्‍नांची उत्तरे नकारात्मकच येतात. हे 46 हजार कोटी खेळासाठी आणि खेळांडूंसाठी वापले असते तर भारतात अनेक चांगली क्रीडासंकुले उभारली गेली असती. खेळाडूं
च्या गरजा पूर्ण झाल्या असत्या आणि केवळ पदकांच्या जीवावर आपण अनेक देशांत मानाचे आणि आदराचे स्थान मिळविले असते. पण आपल्या लोकांना सगळे झटपट पाहिजे असते. अगदी मान-सन्मानही. राष्ट्रकुलसारखी स्पर्धा आपण का आयोजित करतो आहोत हेच कळत नाही. चीनने ऑलिम्पीक स्पर्धा आयोजित केली म्हणून जर तुम्हाला पोटशुळ उठून जर स्पर्धा आयोजित करत असाल तर आकलेची डीवाळखोरीच आहे. त्या देशाच्या आर्थिक संरचनेची आणि आपल्या आर्थिक संरचेनेची तुलना होत नाही पण केवळ अमुक तमुक देशाने ही स्पर्धा आयोजित केली तर मग मी का नाही हा पोरखेळ आहे. आपली आर्थिक स्थीती बघून आपण पाय पसले पाहिजेत. केवळ राष्ट्रकुल स्पर्धाच नाही तर सगळ्याच बाबतीत आता आपण नापास झालो आहोत, सगळी व्यवस्था सडली आहे आताच जर बदल केला नाही तर उद्या तो बदल करणे शक्‍यही होणार नाही. सापाचे गांडुळ करण्याच्या दिशेने आपला प्रवास चालला आहे. एकदा का आपण गांडूळ झालो की आपल्याला फणाच काढता येणार नाही.

व्यवस्था उलथवून टाकली पाहिजे.....
गेल्या पन्नास वर्षात आपल्याला लोकांनी बऱ्याच वाईट गोष्टी शिकविल्या. तो त्यांच्या धोरणंचा भाग होता. एखाद्या लहान मुलाला जर सारखंच ांगितले की तू खूप महान आहेस तर तोही त्याची शेखी मिरवायला लागतो तसेच आपले झाले आहे. गांधीजींचे कार्य आणि गांधीवाद या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एखादी गोष्ट एखाद्या वेळी योग्य असली तर ती सर्व काळात योग्य ठरतेच असे नाही. गांधीवादाबद्दल तसाच वास येतो. एखाद्या समाजाला निष्क्रीय करण्याचा तो मार्ग आहे की काय अशी शंका येतो. युरोपीय देशांच्या इतिहासाकडे बघितले तर ते कधीच राजकारणात नजीकचा विचार करताना दिसत नाही, त्यांना दुरगामी परिणाम हवे असतात. त्यामुळेच भारतीय समाजापुढे एक आदर्शवाद ठेवून त्या निष्क्रीय करण्याचे काम त्यांनी केले. गांधीवाद केवळ अहिंसा आणि सत्य या दोनच चाकांभोवती फिरत नाही तर त्यांच्या चरख्याप्रमाणे तो जीवनातील प्रत्येक घटकांत सामावलेला आहे. गांधीवादाची उद्दीष्ट्ये उच्च असली तरी तो मार्ग खूपच काट्याकुट्यांचा आहे. व्यवस्था बदलण्याची ताकद गांधीवादात नाही( ती गांधीजींच्यात होती यात शंका नाही). त्यामुळे गांधीवाद जोपासत व्यवस्थेवर हल्ला करता येणार नाही.कदाचीत एखादी अशी वेळ येते की जिथे सर्वकालीन मुल्यांना बाजुला ठेवून क्रांती घडवावी लागते. त्यावेळी घडणाऱ्या सगळ्या गोष्टी मुल्यांच्या कसोटीवर बरोबरच असतील असे नाही पण येणाऱ्या पिढ्यांसाठी त्या गोष्टी करणे आवश्‍यक असते. आणि बरोबर की चूक हे ठरविणार कोण? आपण आपल्या उन्नतीसाठी जर एखादी व्यवस्था बदलत असू तर तो आपला अधिकार आहे. त्याचे मार्ग नैतीक आणि माणुसकीला धरुन असावेत एवढीच अपेक्षा.