बुधवार, २७ जानेवारी, २०१०

टाईमपास ः वेळेचा अपमानच

टाईमपास ः वेळेचा अपमानच
अलिकडे आता कोणत्याही नाट्य संस्थेने नवीन नाटक आणले, की सगळेच त्याचे तोंड भरून कौतुक करू लागतात. कोणीच कुणाच्या नाटकाला नावं ठेवायचं नाही. तू चांगला, तो चांगला, मीही चांगला असे सगळंच चांगभलं सुरू आहे.
संस्कृतमध्ये एक कथा आहे. गाढव आणि उंट एकत्र चाललेले असतात. मध्येच उंटाला गाढवाची स्तुती करावी वाटते म्हणून ते म्हणतं, ""हे गर्दभमहाराज, तुमचा आवाज किती गोड आहे.'' उंटाने केलेल्या स्तुतीने गाढवाच्या अंगावर मूठभर मांस चढतं. आपल्या या मित्राने एवढी स्तुती केली म्हटल्यावर तेही उंटाची स्तुती करतं. ""हे उंटमहाराज, तुम्ही दिसायला किती सुंदर आहात.'' ही गोष्ट आठवायचं कारण "टाईमपास' हे नाटक. नावाप्रमाणे टाईमपास म्हणूनही या नाटकाकडे बघितलं तरी नाटक बघायला जाऊन वेळ वायाच घालविला नाही तर वेळेचा अपमानही केला असं वाटतं.
सुयोगची निर्मिती, शफाअत खान यांचे लेखन आणि भरत जाधव, सुप्रिया पिळगावकर यांचा अभिनय म्हणून प्रेक्षक नाटकाकडे वळतात खरे; पण आपल्या हाती निखळ मनोरंजनसुद्धा लागू नये, या बद्दलची हळहळ व्यक्‍त करतच नाट्यगृहातून बाहेर पडतात. नाटकाचं नाव "टाईमपास' असल्याने त्यातून तत्त्वज्ञान सांगितले जाणार नाही, हे निश्‍चित होतेच;
पण विनोद तरी निखळ आणि खळखळून हसविणारा हवा. (विनोदनिर्मिती थोड्या अतिशयोक्‍तीने आणि डोक्‍याचा वापर न करता केली असती, तरी चालली असती) पण नाटक कोणत्याच अंगाने फुलत नाही आणि ते संपले कधी हेही कळतच नाही. नाटकाची संकल्पना चांगली असली, तरी संहितेवर कामच नाही. नवरा-बायको कंटाळा घालविण्यासाठी एकमेकांना अनोळखी म्हणून भेटतात आणि त्यातून विनोदाची निर्मिती ही संकल्पना खूपच चांगली असली तरी संहितेवर मेहनत नाही. एक-दोन कोट्या सोडल्या तर नाटकातील विनोद लक्षात राहत नाही. तेच तेच संवाद परत परत येत राहतात. आणि मग कंटाळा घालविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचाच कंटाळा येऊ लागतो. प्रेक्षागृहात थोडी खसखस पिकली असली तरी ती पोरासोरांची आणि ती नवदाम्पत्यांची. नवरा हसला म्हणून बायको हसते आणि बायको हसली म्हणून नवरा; पण चांगले नाटक बघण्यासाठी आलेला प्रेक्षक मात्र हिरमूसूनच बाहेर पडतो. वेगवेगळी पात्रं उभी करण्यात नाटककाराला यश आलेले नाही. आणि नाटक बहुंताश चॅनेलवर दिसणाऱ्या हास्य कार्यक्रमाच्या अंगाने जाते आणि तिथेच फसते. खासकरून एमटीचे पात्र उभे करताना त्यात आणखी संवाद चांगले हवे होते. वेशभूषाही करायला हरकत नव्हती; पण काहीच नाही. प्रेक्षागृहातून नाटकाच्या सुरवातीपासून खसखस पिकत असली, तरी ती दमदार संहितेचे यश नसून भरत आणि सुप्रियाच्या अभिनयाला प्रेक्षकांनी दिलेली दाद आहे. खासकरून भरतच्या चेहऱ्यावरील भाव नेहमीप्रमाणे बदलतात आणि त्यातून थोडी विनोदनिर्मिती होते; पण ती भरतचीच जमेची बाजू. पहिल्या अंकानंतर प्रेक्षक दुसऱ्या अंकात काही तरी वेगळं शोधण्याचा प्रयत्न करतो; पण त्याला त्यातही काहीच मिळत नाही. नाटकाचा शेवटही तसाच. तो थोडा आणखी भावनिक करता येऊ शकला असता.
नाटक संपल्यावर एकांकिकेचे ओढूनताणून दोनअंकी नाटक केल्याचे जाणवते. खरे तर काही प्रसंग आणखी थोडे रंजक केले असते, थोडी वेशभूषाही केली असती तर जमेची बाजू ठरली असती. त्यामुळे नाटक उभे राहिले असते, की नाही माहीत नाही; पण पडतानाही थोडा कमी आवाज झाला असता. या नाटकाची चर्चा एवढी का झाली हा प्रश्‍न आहे. अलिकडे आता कोणत्याही नाट्य संस्थेने नवीन नाटक आणले, की सगळेच त्याचे तोंड भरून कौतुक करू लागतात. कोणीच कुणाच्या नाटकाला नावं ठेवायचं नाही. तू चांगला, तो चांगला, मीही चांगला असे सगळंच चांगभलं सुरू आहे. टाईमपासने या सगळ्याचा पुरेपूर लाभ उठविला आहे. सुमार संहिता, सुमार संवाद, दिग्दर्शनाला वावच नाही, रंगमंचावर वीस वीस वर्षे अभिनय केल्यानंतर सुप्रिया आणि भरतने केलेला अभिनय खूप उच्च दर्जाचा म्हणणे हा त्यांचाच अपमान आहे. त्यामुळे टाईमपासला जाणे म्हणजे वेळ वाया घालविणे नव्हे; तर वेळेचा अपमान करण्यासारखेच आहे.

सोमवार, २५ जानेवारी, २०१०

स्वल्पविराम

तो (स्वल्पविराम)
will you marry me.... मी सरळ तिला विचारुन टाकलं. तिला ते अनपेक्षित नव्हतं पण हा प्रश्‍न मी इतक्‍या सरळ विचारेन असं वाटलं नसावं. माझी उत्तराच्या अपेक्षेने रोखलेली नजर तिला असाह्य झाली असावी. तिनं गालावर आलेल्या बटा हलकेच मागे सारल्या मग चेहरा वळवला आणि दीर्घ उच्छ्शास सोडला..... हे बघ...... मी तिला तिथेच थांबवलं. उत्तर फक्‍त हो की नाही एवढंच तर दे.... मी आवडतो किंवा नाही एवढं महत्त्वाचं.... कारणांत अडकवू नको मला... मी सरळ सांगितलं. माझ्या या सरळ बोलण्याचा तिच्यावर व्हायचा तो परिणाम झाला. तिचे डोळे लकाकले माझ्या रोखलेल्या नजरेला टाळत तिनं पुन्हा एकदा दीर्घ उच्छ्शास सोडला आणि म्हणाली......sorry I can't. म ाझी तिच्यावर रोखलेली नजर खाली झुकली...... o. k. चहा घ्यायचा काय? मी इतक्‍या सहजतेनं पुढे जाईन असं तिला वाटलं नसावं कदाचित. तिने निमिषभर माझ्याकडे बघितलं. मग नजरेत तोच मिश्‍किलपणा आणत म्हणाली चल!
आयुष्यात असे स्वल्पविराम पडत असतातच.
..................
ती (स्वल्पविराम)

तो विचारणार हे आपल्याला नक्‍की ठावूक होतं. त्याच्या नेहमीच्या बोलण्यातूनही ते जाणवत राहायचही.... त्यानं विचारावं असही आत खोल वाटत होतच की आपल्याला पण आज त्यानं विचारलं आणि आपण मात्र त्याला नाही म्हटलं......का? तोच म्हणतो, कुठलाही निर्णय घेण्यापुर्वी फायदा तोटा यांचा विचार करायचा नसतो. फक्‍त मनाशी प्रामाणिक राहायचं मन तुम्हाला कधी धोका देत नाही.... पण मन आणि बुद्धी वेगळे कुठे असतात. त्याला होय म्हणायचं धाडस ना मनात आहे ना बुद्धीत. तो शंभर टक्‍के हसबंड मटेरियल आहे पण लग्न म्हणजे गारमेंट नव्हे. चांगला वाटला म्हणून केलं आणि नंतर फेकून दिलं. तो मित्र म्हणून चांगला आहे.... त्यानं तिथंच राहावं.....गाज देत. पण तो काही किनाऱ्याला धडका देत बसणाऱ्यातला नव्हे..... सावरेल लगेचच..... पण एक नक्‍की आयुष्याच्या ओळीत एक स्वल्पविराम नक्‍की पडला.

रविवार, २४ जानेवारी, २०१०

अस्वस्थता

तो (अस्वस्थता)
चैत्रातलं उन वखवखत असावं.... आणि पायाखालची तापलेली वाळू रक्‍त शोषीत असावी....नजर जाईपर्यंत केवळ आग आग आणि आग असावी..... अंगातील पेशी अन्‌ पेशी पाण्यासाठी टाहो फोडत असावी.... जगण्याच्या लढाईतील शेवटच्या शस्त्रांचीही धार बोथट व्हावी.... गात्रांतला प्राणवायू निसटू पहावा.....त्याचवेळी अचानक आकाशात काळ्या ढगांनी गट्‌टी करावी......सजीवतेचा ढोल पिटावा आणि संवेदनांची लकेर आकाशात उमटून जावी.... मिटलेल्या पापण्यांवर पाण्यांचे तीर चालावेत .... अशीच ती आयुष्यात आली.... अगदी अचानक, आश्‍वासक आणि आवश्‍यक वेळी.....ती आलीच अशी गर्जत येणाऱ्या वळीवासारखी, उन्हाला आपल्या हुकमी आवाजात दटावत कोरडेपणा नाहिसा करत. तिच्या या वर्षावात आपण चिंब भिजलो. अक्षरशः निथळलो.... पण ह्या जलधारांचा आवेग आपल्याला नेहमी पेलवेल....विजेशी स्पर्धा करत, गर्जत येणाऱ्या मेघधारांत आपण स्थिर राहू शकू की तिच्या प्रवाहाबरोबर वाहवत जाऊ....व्याकूळतेने सुखाची प्रतिक्षा बघावी आणि ते दारात आल्यानंतर मात्र त्याला आत घेण्याची भीती वाटावी, अशी का अवस्था झाली आहे....... अस्वस्थता.... अस्वस्थता आणि अस्वस्थता भरुन राहिली आहे.

ती....(अस्वस्थता)

अविचल वृक्षासारखा आहे तो. येणाऱ्या प्रत्येक वाटसरुला आपल्या छायेत घेणारा, त्यांच्याशी मुकेपणाने संवाद साधणारा. आपल्या अंगा-खांद्यावर पक्षांना खेळू देणारा निश्‍चल, निश्‍चिंत आणि निग्रहीसुध्दा. त्याच्या छायेत गेल्यावर आपल्याला निवांतपणा लाभतो. डोळे मिटावेत आणि पडून राहावं असं वाटतं त्या छायेतला गारवा श्‍वासात भरुन जातो पण पण दुसऱ्याच क्षणी त्याच्या त्या अजस्त्र अशा फांद्यांची भीती वाटते... कधीतरी त्या कोसळतील आणि आपल्याला गाढून टाकतील इतकी तिव्र भीती..... अंगावर शहारे आणणारी भीती. त्याच्या पानांची सळसळ डोळे उघडे असेपर्यंत रम्य वाटते पण तेच डोळे मिटले की त्या पानांतून सर्पाची सळसळ भासते. आकाशाशी स्पर्धा करणारा एखाद्या तीव्र वेदनेने तो कोसळणार तर नाही ना? वाऱ्याशी झिम्मा खेळणारे त्याचे हात वाऱ्याच्या एका तीव्र झटक्‍यात तुटणार तर नाहीत ना? कोसळणाऱ्या जलधारांना आपल्या पानांवर थोपविता थोपविता तो वाहवत तर जाणार नाही ना? काहीच समजत नाही....पाऊल पुढे टाकावे की इथेच थांबावे.... अस्वस्थता अस्वस्थता आणि अस्वस्थता भरुन राहिली आहे.

अस्वस्थता

तो (अस्वस्थता)
चैत्रातलं उन वखवखत असावं.... आणि पायाखालची तापलेली वाळू रक्‍त शोषीत असावी....नजर जाईपर्यंत केवळ आग आग आणि आग असावी..... अंगातील पेशी अन्‌ पेशी पाण्यासाठी टाहो फोडत असावी.... जगण्याच्या लढाईतील शेवटच्या शस्त्रांचीही धार बोथट व्हावी.... गात्रांतला प्राणवायू निसटू पहावा.....त्याचवेळी अचानक आकाशात काळ्या ढगांनी गट्‌टी करावी......सजीवतेचा ढोल पिटावा आणि संवेदनांची लकेर आकाशात उमटून जावी.... मिटलेल्या पापण्यांवर पाण्यांचे तीर चालावेत .... अशीच ती आयुष्यात आली.... अगदी अचानक, आश्‍वासक आणि आवश्‍यक वेळी.....ती आलीच अशी गर्जत येणाऱ्या वळीवासारखी, उन्हाला आपल्या हुकमी आवाजात दटावत कोरडेपणा नाहिसा करत. तिच्या या वर्षावात आपण चिंब भिजलो. अक्षरशः निथळलो.... पण ह्या जलधारांचा आवेग आपल्याला नेहमी पेलवेल....विजेशी स्पर्धा करत, गर्जत येणाऱ्या मेघधारांत आपण स्थिर राहू शकू की तिच्या प्रवाहाबरोबर वाहवत जाऊ....व्याकूळतेने सुखाची प्रतिक्षा बघावी आणि ते दारात आल्यानंतर मात्र त्याला आत घेण्याची भीती वाटावी, अशी का अवस्था झाली आहे....... अस्वस्थता.... अस्वस्थता आणि अस्वस्थता भरुन राहिली आहे.

ती....(अस्वस्थता)

अविचल वृक्षासारखा आहे तो. येणाऱ्या प्रत्येक वाटसरुला आपल्या छायेत घेणारा, त्यांच्याशी मुकेपणाने संवाद साधणारा. आपल्या अंगा-खांद्यावर पक्षांना खेळू देणारा निश्‍चल, निश्‍चिंत आणि निग्रहीसुध्दा. त्याच्या छायेत गेल्यावर आपल्याला निवांतपणा लाभतो. डोळे मिटावेत आणि पडून राहावं असं वाटतं त्या छायेतला गारवा श्‍वासात भरुन जातो पण पण दुसऱ्याच क्षणी त्याच्या त्या अजस्त्र अशा फांद्यांची भिती वाटते... कधीतरी त्या कोसळतील आणि आपल्याला गाढून टाकतील इतकी तिव्र भीती..... अंगावर शहारे आणणारी भीती. त्याच्या पानांची सळसळ डोळे उघडे असेपर्यंत रम्य वाटते पण तेच डोळे मिटले की त्या पानांतून सर्पाची सळसळ भासते. आकाशाशी स्पर्धा करणारा तो एखाद्या तीव्र वेदनेने तो कोसळणार तर नाही ना? वाऱ्याशी झिम्मा खेळणारे त्याचे हात वाऱ्याच्या एका तीव्र झटक्‍यात तुटणार तर नाहीत ना? कोसळणाऱ्या जलधारांना आपल्या पानांवर थोपविता थोपविता तो वाहवत तर जाणार नाही ना? काहीच समजत नाही....पाऊल पुढे टाकावे की इथेच थांबावे.... अस्वस्थता अस्वस्थता आणि अस्वस्थता भरुन राहिली आहे.

शुक्रवार, २२ जानेवारी, २०१०

लपंडाव

तो....(लपंडाव)

तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. हे चारच शब्द आपण किती घोगऱ्या आवाजात बोललो. अखंड बडबडणारी ती मग शांत झाली. बोल की एवढच म्हणाली, नंतरची एक दोन मिनीटं तरी दोघंही काहीच बोललो नाही. नंतर महत्त्वाचं बोलणं राहूनच गेलं. पण तिला बहुतेक ते कळलं असावं. त्यामुळे तीही बोलली नाही. खूप दिवसांपासून तिला विचारायचं धाडसं करत होतो पण ते जमलं नाही म्हणून आज मनाचा हिय्या केला. पण मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे, एवढं एकच वाक्‍य बोलल्यानंतर मात्र आपला धीर झाला नाही. श्‍वास जड झाला... छाती धडधडत होती. बहुतेक तिला ते जाणवलं त्यामुळे नंतर
तिने बोलण्याचा आग्रह धरला नाही. अखंड बडबडणारी ती हरवून गेल्यासारखी होती. नजर चोरटी आणि श्‍वास जलद होतं होते.
नंतर बराच वेळ हवा-पाण्यासंदर्भात बोलत होतो. एका चित्रपटाची सगळी कथाही सांगून टाकली. उगाच हसलो... पण ती शांत होती.....तिच्या केसांच्या बटांनी आपल्याला वेड लावले आहे हेच तर सांगायचे होते. पण धीर झाला नाही. महत्त्वाचं बोलण्यासाठी भेटलो पण शब्दांचाच लपंडाव खेळत राहिलो.

ती....(लपंडाव)

तो असा का आहे वाट चुकलेल्या वाटसरुसारखा. कायम भांबावलेला असतो. समोरची सरळ वाट त्याला त्याच्या मुक्‍कामापर्यंत घेवून जाणारी असते पण तो वळणं घेत राहातो. आणि वळल्यावर मग तो मार्गदर्शकाची वाट बघत राहातो. प्रत्येकवेळा त्याला सावरणारं कोणीतरी लागतं. तो मुलगा आहे त्यानं विचारलं पाहिजे. मी कोण वाघीण आहे का सिंहीण याला फाडून खाणार आहे का? .... पण त्याचा हाच स्वभाव तर आपल्याला खूप आवडला. त्यानं चटकन विचारलं असतं तर त्याच आश्‍चर्य वाटलं असतं. पण त्याचं वळणं घेत बोलणंच तर आपल्याला आवडतं. नेहमी शांत शांत असणारा आज किती बडबडला. महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणाला, पण हवा पाण्याच्या गप्पा मारत राहिला. उगाचच हसत होता.
आज आपण नुसतं हं हा हू करत राहिलो, पण तो बोलत होता. त्याच्या बोलण्याचे हसू येत होते, पण तो ओशाळेल म्हणून ते दाबून धरले. कदाचित मनातल्या भावना ओठावर येऊ नयेत यासाठीच तर तो बोलण्याचा लपंडाव करत होता.

बुधवार, २० जानेवारी, २०१०

अनाथ

अनाथ

ऑफीसला जायच्या रस्त्याच्या कडेचे ते झाड नेहमी कुणाला ना कुणाला सावलीत ठेवायचं. प्रत्येक सिझनमध्ये त्या झाडाखाली कोणी ना कोणी वेगळं असायचं. पावसाळ्यात छत्री दुरुस्त करणारा, हिवाळ्यात स्वेटरवाला, उन्हाळ्यात टोप्या विक्रेता बसलेला असायचा. परवाच्या रस्तारुंदीकरणात त्याच्या पारंब्या तोडल्या गेल्या आणि फांद्यांवरही कुऱ्हाड चालविली गेली. आता त्या झाडाची सावलीही संकुचित झाली. अलीकडे तर तर तिथे कोणीच दिसायचे नाही. परवा सहज त्या झाखाली नजर गेली आणि बघितलं तर काही कुत्र्याची पिलं तिथं खेळत होती. ती तिथे कशी आली, कुठून आली काहीच कळलं नाही. रोज ऑफीसला जाताना ती तिथे खेळत असलेली दिसायची. चार- पाच तरी असतील. भुऱ्या रंगाची, मऊ केसांची. मग रोज त्या झाडाखाली थोडावेळ थांबायचं आणि त्या कुत्र्यांना निरखायचं हा छंदच लागला. आईच्या अंगा खांद्यावर खेळणारी ती पिलं बघितली की मजा वाटायची. त्या पिलांची आईही त्यांना खेळवायची, चावायची, गुरगुरायची. ती गुरगुरली की काही पिलं लांब जायची आणि परत फिरायची.थोडे दिवसांनी त्यातील एक-एक पिल्लू कमी होत गेलं. शेवटी एकच पिल्लू राहिलं. ते पिल्लू आणि त्याची आई त्या झाडाभोवती फिरत असायची. हायवेवरुन होणाऱ्या वाहनांच्या ये-जा पासून ती त्याची जणू रक्षण करायची. काल त्याच रस्त्यावरुन जाताना समोरच्या ट्रकने जोरात ब्रेक दाबला. गाडी कचकन थांबली. काय झालं म्हणून पुढे जाऊन बघितलं तर ती पिलाची आई ट्रकच्या पुढच्या चाकात सापडलेली. थोडावेळ तिची धाप सुरु होती आणि नंतर तिही थांबली. तिचं ते पिल्लू शेजारीच केकाटत होतं. ट्रकचालकानं त्या मेलेल्या कुत्रीला रस्त्याच्या एका कडेला आणून टाकलं आणि तो पिलाकडे गेला. त्यानं ते पिल्लू उचललं आणि ट्रकच्या केबीनमध्ये ठेवलं. मला राहावलं नाही म्हणून मी त्याला विचारलं, ""सरदारजी क्‍या करोगे इसका?'' सहा फूट दोन
इंच उंचीच्या त्या सरदाराचे डोळे थोडे किलकीले झाले. माझ्याकडे त्यानं बघितलं आणि म्हणाला, कुछ नहीं, पालुंगा! यतीम होने का दुख मालुम है

मंगळवार, १९ जानेवारी, २०१०

हार

तो. (हार)
मला गांधीजी आवडत नाहीत. एवढं एकच तर वाक्‍य आपण बोललो. कुठल्या संदर्भात बोललो तेही कळलं नाही. पण तिने एकदा मला नथुराम असल्यासारखं पाहिलं आणि मग तोंडाचा पट्‌टा सुरु केला, तो शेवटपर्यंत. गांधीजी आवडत नाही हे म्हणून मी जणू ब्रह्महत्या केल्याच्या आवेषात ती बोलत होती, आणि मला फाशीवर आत्तापर्यंत का चढवलं नाही ,असं तिची नजर विचारत होती. आपले मोठे डोळे आणखी मोठे करत ती काही-बाही सांगत होती. ती बोलत असताना हं, हू, हो शिवाय काही बोलता येत नाही हे खरंच, पण तरीही आपण तेही बोललो नाही. माझं ते गप्प बसणं तिला आणखी टोचलं असावं. त्यामुळे ती आणखीन उखडली. तुमच्यासारख्यांनी या देशात राहायलाही नको, सरळ सांगून टाकलं तिनं, मी नुसतंच बरं म्हणालो, त्यावरही चीडली. चहा घेतानाही तिची अखंड बडबड सुरु होती. शेवटी कंटाळून मी हरलो म्हटल्यावर ती थोडी शांत झाली. पण तुला आता सटकायचं आहे म्हणून तू हरलो म्हणतोयस हे सांगायला ती विसरली नाही. काय गांधीवादी आहे, गांधीवाद असा असतो हे जर गांधीजींना कळलं तर ते गांधीवादाची पुन्हा नव्याने व्याख्या करतील. गांधीवादी छे जहालवादी आहे....तिखट... शेवटी हरलो हे आपण उगाचच कुठे म्हटलं आपण. खरंच हरलेलोच आहोत की....

ती...(हार)
कोण समजतो कोण स्वतःला. क्रांतिकारी. पाच फूट चार इंच उंचीचा क्रांतिकारी. बोलता येतं का नीट आणि म्हणे गांधीजी आवडत नाहीत. काय माहिती आहेत याला गांधीजींबद्दल आणि एवढं आपण बोलत होतो तर पढ्ढ्यानं हू की चू केलं नाही. नाहीतर किमान हं.... हा... ही... ही... तरी चालू असतं पण ते काहीच नाही. शेवटी बरं आणि हरलो म्हणाला, पण तेही मजबुरीनं, कदाचित मला बरं वाटावं म्हणून. पण खरंच त्याला जर गांधीजी नसतील आवडत तर नसतील ना, त्याला ते आवडावेत म्हणून आपला अट्‌टाहास का? आणि आपण त्याच्यावर एवढं उखडायचं काय कारण होतं. केवढी आदळ-आपट केली आपण बिच्चारा ! छे वस्ताद आहे.. एखादाच शब्द बोलतो आणि मग आपला निवांत राहातो. पण खरंच तोच गांधीवाद्यासारखा वागला, अगदी शांत राहात सहन करत राहिला. त्याला या देशात राहण्याचा काडीचाही अधिकारही नाही असंही म्हणून टाकलं. पण शेवटी हरलो म्हणालाच की....खरचं तो हरला की मी हरले.....

सोमवार, १८ जानेवारी, २०१०

मेघ

तो ....(मेघ)
किती बडबडे. श्‍वास कमी घेते पण बडबडते खूप. काल आपण फोन केला, हॅलो एवढाच शब्द आपण बोललो त्यानंतर हं... हं... हं... याशिवाय तिने काही बोलूच दिले नाही. हरिदास संमेलनातील बुवांबद्दल किती बोलली, त्यानंतर नवीन चित्रपट आणि नंतर स्वारी चक्‍क राजकारणावर घसरली. पण खूपच गोड मुलगी आहे. मनात येतं ते सारं बोलून जाते. काही मनात ठेवत नाही. रिकामं होऊन जाते. अगदी वादळी पावसासारखं, रितं होईपर्यंत कोसळत राहावं आणि रिकामं रिकामं व्हावं तसं. बोलताना कुणाला नावं ठेवणार नाही, पण चुकीला चूक म्हणण्याचं धाडस मात्र तिच्यात आहे. एकूणच ती केवळ बोलकी नाही, तर ठाम मतांचीही आहे. म्हणूनच तर ती आपल्याला आवडू लागली आहे. जगण्याची एक विशिष्ट कला तिला अवगत आहे. जे आपल्याजवळ आहे ते दुसऱ्याला द्यायचं आणि स्वतः श्रीमंत व्हायचं. म्हणूनच ती पावसानंतरच्या पांढऱ्या ढगासारखी भासते. त्या पांढऱ्या ढगांच्या चित्रविचित्र आकारामुळे त्यात लोक अनेक आकृत्या शोधतात, त्या आकृत्यांचे वेगवेगळे अर्थ लावतात. पण ती त्यातही भासते पांढऱ्या मोगऱ्यासारखी, गंधीत.......

ती ....(मेघ)
काय विचित्र माणूस आहे. स्वतः फोन करतो आणि काहीही बोलत नाही... हं...हं... हं. या शिवाय मराठी भाषेत दुसरे शब्द आहेत हे त्याला माहित आहे की नाही, कोणास ठाऊक.. खरंच तो मीतभाषी आहे का? आपणच जास्त बोलतो. थोडं आपण जास्त बोलतो हे खरंच, पण आपण नेहमीच जास्त बोलतो. पण लोक तरीही आपलं बोलणं पुरं करतातच की, पण याला मराठीत हं...हं शिवाय आणखी काही शब्द आहेत हेच माहित नसावं. तसा तो मीतभाषी हे खरंच पण त्याचा स्वभावही मृदू आहे असं सारखं वाटतं. त्याला आणखीन जवळून बघायला पाहिजे. पण काही का असेना गोड आहे. भारदस्त वाटतो. त्याच्या कमी बोलण्यामुळे असेल पण प्रत्येक शब्दाला धार वाटते. अगदी ओथंबून आलेल्या ढगांसरखा केव्हाही वाऱ्याची झुळूक येईल आणि आपल्या असंख्य हातांनी जलधारांचे दान धरित्रीच्या पदरात टाकेल असा मेघ. कृष्णवर्णीय का? हो काळाच. पण हा काळा रंग कुरुपतेचा कुठे आहे. हा तर श्‍यामचा लाघवी श्‍यामवर्ण......

रविवार, १७ जानेवारी, २०१०

मैफल रंगली

तो.... (मैफल रंगली)
हरिदास संमेलनाचे रिपोर्टींग करायला गेल्यावर आधी बुवांची छोटेखानी मुलाखत घ्यायला स्टेजच्या मागे गेलो, तर ती तिथेच होती. आपल्याला बघून ती चटकन सामोरी आली. बुवांना नमस्कार करायला आलात ना? मीही नमस्कार करायला आले आहे. तुम्हाला शास्त्रीय संगीत आवडतं? खरं तर नाही म्हणायचं होतं. पण तोंडातून नकळत हो! आलं. मलाही आवडतं मी तर दोन परीक्षाही दिल्या आहेत इती ती. मी बुवांची मुलाखत न घेताच तिच्याबरोबर कार्यक्रमाला गेलो. व्यासपीठावर बुवा ताणा घेत होते आणि आपली नजर मात्र तिच्यावरच खेळली होती. एखादं निरागसं बाळ आजी सांगत असलेल्या गोष्टींकडे कसं लक्ष देवून ऐकेल तसंच ती गाणं ऐकत होती. तिच्या पापण्यांची होणारी जलद उघडझाप जाणवून गेली. मध्यंतरात तिचे अखंड बोलणं चालू होतं. एक मात्र जाणवलं ज्या मैत्रीणीबरोबर ती कार्यक्रमाला आली होती तिला सोडून तिने माझ्या शेजारील खुर्चीवरुन मैफल ऐकली. मैफल रंगली रंगमंचावर बुवांची आणि रंगमंचाखाली माझी.....

ती..... (मैफल रंगली)
त्याला शास्त्रीय संगीताची आवड असेल असं वाटलं नव्हतं. किंबहूना त्या नाटकानंतर आपली त्याच्याशी भेट होईल असंही वाटलं नव्हतं. केवळ शास्त्रीय संगीताची आवड आहे असं नाही तर बुवांचा किती आदर करतो तो.नाहीतर मैफीलीआधि कशाला आला असता बुवांना नमस्कार करायला. बुवांचे गाणं आपण यापुर्वीही अनेकदा ऐकलं अगदी प्राण कर्णाशी आणून ऐकलं. पण आज मात्र आपलं सगळं लक्ष बुवांच्या गाण्याकडे नव्हतंच. बुवांचं गाणं एकीकडे रंगत असताना आपलं मन मात्र दुसरीकडेच स्वप्न रंगवत होतं. एकदा दोनदा आपण चोरुन त्याच्यावर कटाक्ष टाकला तेव्हा त्याचं लक्ष आपल्याकडेच असल्याचं जाणवलं. कदाचित आपल्या मनाचे ते मांडेही असावेत. पण तो आपल्याकडे चोरुन बघत होता हे मात्र नक्‍की. मध्यंतरात आपण गाण्याविषयी इतकं बोललो पण तो मात्र शांत होता. अगदी विरक्‍त साधूसारखा पण त्याची नजर तशीच रोखलेली आणि टोकदार. नंतरचा दीड तास मैफल रंगली व्यासपीठावर बुवांची आणि मनात त्याची....

गुरुवार, १४ जानेवारी, २०१०

तो आणि ती

तो....(पडदा उघडला)
नाट्यगृहाच्या खिडकीपाशी किती वेगात आली ती. तिकीट घेतलं आणि झटकन सटकली.. तिकिटासाठी आपण तासभर रांगेत ताटकळत बसलोय हेच विसरलो. वाऱ्याचा झंझावात यावा तशी ती आली आणि गेलीही. आपण नुसतेच तिच्याकडे बघत राहिलो. नंतर नाटकाच्या मध्यंतरात चहा पीताना ती दिसली. रमेशही होता तिच्याबरोबर.... त्यानेच तिची ओळख करुन दिली. किती बडबडत होती. एखाद्या धबधब्यासारखी अखंड वहात होती. डोळे कितीदा मिचकावत होती. जाताना "परत भेटू' म्हटल्यावर आपण उत्स्फूतपणे कधी म्हणालो. त्या कधीवर ती काय खळखळून हसली. एखाद्या निष्पाप बाळासारखी आणि तेवढ्यात तिच्या गालावरची खळी आपल्याला दिसली....
नाटकाचा दुसरा अंक रंगमंचावर चालू झाला. पडदा वर गेल्याचे तेवढे जाणवले... पुढचे काही आठवतच नाही. उरलेला दिड तास तीच तर दिसत होती. नाट्यगृहाच्या खिडकीपाशी गडबडीत येणारी, अखंड बोलणारी, खळखळून हसणारी, हसताना गालावरचे केस मागे सारणारी, नाटकाचा हाच तर अंक डोळ्यासमोर उभा राहिला अगदी पडदा पडेपर्यंत.
....................................................................
ती....(पडदा उघडला)
काय शामळू आहे. तिकिटासाठी रांगेत उभा होता. पण एखादी मुलगी सरळ येते तिकिट घेते म्हणजे काय. मख्खपणे तसाच होता. चम्याच दिसतोय. नंतर मध्यंतरात भेटला. शर्टाचे हातोबे कोपरापर्यंत दुमडलेले. नाटक बघायला आलात की मारामारी करायला असं विचारल्यावर नुसताच हसला. आत्तापर्यंत अनेक मुले बघितली. अगोदर मुलीकडे एकटक बघतात आणि मुलगी बघायला लागली की मग नजर फिरवतात. हा मात्र एकटक बघत होता. आपण नजरेला नजर दिली तर नजर फिरवेल असं वाटलं पण पठ्ठ्याने नजर फिरविली नाही. पाच मिनीटात आपण किती बडबडलो पण त्याने मान हलविण्याशिवाय दुसरं काही केलं नाही. जाताना भेटू म्हटल्यावर मात्र "कधी' किती उत्स्फूर्तपणे म्हणाला.
नाटक मध्यंतरानंतर पुढे सरकलंच नाही." कधी' एवढाचा त्यानं उच्चारलेला शब्द कानात घुमत राहिला आणि त्याची नजर टोचत राहिली. त्याचा चेहरा नजरेसमोरुन हललाच नाही, अगदी पडदा पडेपर्यंत.

मंगळवार, ३ नोव्हेंबर, २००९

लोकशाहीची लक्‍तरे.................

महाराष्ट्रातील 288 पैकी 184 आमदारांची संपत्ती पाच कोटींपेक्षा अधिक आहे तर अवघ्या सहा आमदारांची घोषित संपत्ती पाच लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे. लोकशाही ही धनिकांची बाटीक आहे हे पुन्हा एकदा अधोरेखीत झालं आहे. त्यामुळे आपण लोकशाहीचा का टेंभा मिरवतोय त्याचा गांभीर्याने विचार करायला हवा.


लोकशाहीची लक्‍तरे.................

एखादी व्यवस्था चांगली की वाईट हे व्यवस्थेमध्ये अंतर्भूत गोष्टींवर जितके अवलंबून असते त्यापेक्षाही जास्त ती व्यवस्था राबविणारे ती कशी राबवितात यावर अवंबून असते. व्यवस्थेतील त्रुटी राबविणाऱ्यांमुळे जर कमी होत असतील तर ती व्यवस्था चांगली म्हणायला पाहिजे, त्याचवेळी राबविणाऱ्या हातांतील व्यवस्था कठपुतळी बनत असेल, तर व्यवस्थेतच काही त्रुटी आहेत असे मानून ती व्यवस्था बदलायला हवी. मानवी चुका म्हणून व्यवस्थेची पाठराखण करणे म्हणजे तिच्या त्रुटींवर पांघरुण घालण्याचा प्रकार आहे. व्यवस्थेपेक्षा माणूस मोठा मानला गेला तरच व्यवस्थेकडे तटस्थ नजरेने बघता येऊ शकते.
लोकांनी लोकांसाठी लोकांकरवी चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही, अशी लोकशाहीची व्याख्या अब्राहम लिंकन यांनी जरी केली असली तरी तीही काही लोकशाहीच्या निर्मितीपुर्वी केलेली नाही. ज्या लोकशाही व्यवस्थेतनू ते अमेरिकेचे राष्ट्रपती बनले त्याच लोकशाहीची त्यांनी व्याख्या केली. (अमेरिकेचे ते 16 वे राष्ट्रपती बनले होते.) त्यामुळे ही व्याख्या काही अलीप्ततेतून आलेली नाही. ज्या व्यवस्थेचा लाभ उठवून सत्तास्थानापर्यंत ते पोहचले त्याचे गोडवे त्यांना गावे लागणार यात शंका नाही. जगभरातील राज्यशास्त्राच्या पुस्तकातून ती व्याख्या आहे तशी जरी शिकविली जात असली तरी त्यातील त्रुटीकडे फारसे लक्ष दिले जात नाही. यामागे एक तर ज्या देशांनी लोकशाही व्यवस्थेचा पुरस्कार केला आहे त्या देशांतील प्रस्थापींतासाठी लोकशाही ही प्रतिष्ठेची बनली आहे. लोकशाही मुल्य म्हणजेच मानवी मुल्य असाच एक अर्थ अधोरेखीत केला आहे. त्यामुळे त्याविरोधात बोलले तर सरळ राष्ट्रद्रोहच ठरतो आणि मग त्याच्यावर एक अलिखित बहिष्कार आणला जातो. आणि ज्या देशांनी लोकशाही स्वीकारलेली नाही तेथील जनतेच्या दृष्टीने ही व्यवस्था म्हणजे स्वर्गीय आहे, असंच वाटतं त्यामुळे ते त्याचा पुरस्कार करतात. त्यामुळे लोकशाही म्हणजे नेमके काय हेही पुन्हा एकदा तपासायला हवे.
लोकशाहीवादी सगळ्यात जास्त टेंभा मिरवतात ते व्यक्‍ती स्वातंत्र्य आणि समान संधी(?)बद्दल. व्यक्‍ती स्वातंत्र्य आणि समान संधी म्हणजे काय याच्या व्याख्याही त्यांनीच केल्या, त्या व्याख्या करताना व्यवस्थेचा लाभ सर्वांना न होता तो ठरावीक लोकांना व्हावा, याचा छुपा अजेंडा राबविण्यात आला. लहान मुलांना औषध कडू लागू नये म्हणून त्यावर साखरेचा मुलामा दिलेला असतो अगदी त्याचप्रमाणे लोकशाहीच्या व्याख्या करण्यात आल्या. त्या सकृतदर्शनी गोड वाटत असल्या तरी त्याच्या अंतरंगात कडवटपणा भरुन राहिला आहे. लहानमुलांना दिलेल्या औषधांचह रोगावर तरी उपाय होता पण इथे तर रोग्याला जगण्याचा अधिकारच नाकारला जातो आहे आणि ही वस्तुस्थिती आहे.
आज महाराष्ट्रातील 288 पैकी 184 आमदारांची संपत्ती पाच कोटी किंवा त्यापेक्षा अधिक आहे. लोकशाही मार्गाने निवडूण आलेल्या या आमदारांना 22 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक मतदारांनी पसंती दिलेली नाही. त्यामुळे जवळ जवळ 78 टक्‍के जनतेचे हे लोक प्रतिनिधीत्व करतात आणि कायदे मंडळाचे सदस्य म्हणून हेच लोक काम पाहाणार असतील तर त्यात ते जनतेचा किती आणि स्वतःचा किती विचार करणार हे स्पष्टच आहे. ज्या महाराष्ट्रातील साडे नऊकोटी जनतेचे हे लोक प्रतिनिधीत्व करताहेत त्यापैकी जवळपास निम्या लोकांना दिवसभर काम केल्याशिवाय संध्याकाळी जेवण मिळत नाही. (महाराष्ट्रात बालकामगारांची संख्या कमी दिसत असली तरी तीही सरकारी कागदपत्रांवरच, घर सांभाळणे आणि गुरांना चारायला घेवून जाणाऱ्या बालकांना शिक्षण नाकारुन कामालाच लावले जात आहे, या वस्तुस्थितीवर पडदा झाकला जातो.) दारिद्य्र रेषेखालील लोकांची संख्या त्यांच्या घरात असलेल्या चैनीच्या वस्तूवरुन ठरविणे आणि चैनिच्या गोष्टी कोणत्या हेही सरकारनेच ठरविणे हे म्हणजे नकाराला कायद्याचे पाठबळच देणे आहे. (आठवा महाराष्ट्रात एकेकाळी एका मंत्र्याने चहा म्हणजे चैनी मानलं होते). घरात टिव्ही आहे किंवा नाही यावरच जर दारिद्य्ररेषा ठरणार असेल तर सरकार किती नकारात्मक काम करते याकडे लक्ष जाते.
जवळपास 20 टक्‍क्‍यांहून अधिक जनतेसाठी प्राथमिक शिक्षण तर 60 टक्‍के जनतेसाठी उच्चशिक्षण हे मध्यमवर्गीयांसाठी शोरुममध्ये ठेवलेल्या चकचकीत गाडीसारखंच स्वप्न आहे. ती गाडी घ्यायला कोणाची ना नाही पण ती घेण्याची ऐपतच या समाजात नाही. किमान मध्यमवर्गीयांनी गाडी घ्यावी यासाठी लाखाची गाडी बाजारात येते पण इथे शिक्षण मिळूच नये म्हणून यंत्रणा काम करते आहे. (खासगी संस्थांतर्फे चालविल्या जाणाऱ्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना शुल्क ठरविण्याचा अधिकार संस्थांना देण्याचा सरकार विचार करत आहे.) आरोग्याबाबतीत तर यापेक्षा कमालीची वाईट अवस्था आहे.गरीबांना आणखी दारिद्य्रात कसं टाकता येईल, त्यांना लाचार कसं करता येईल यासाठी संपत्तीतून सत्ता आणि सत्तेतून संपत्ती हे सूत्र राबविले जात आहे.
लोकशाहीने सर्वांना समान अधिकार दिले आहेत. लोकशाहीने अधिकार दिले म्हणजे नेमके काय असा प्रश्‍न उपस्थित होतो, जे
अधिकार जन्मानं मिळतात त्याला लोकशाहीने मान्यता दिलेली आहे. पण हे अधिकार देताना त्यात पारदर्शकता ठेवलेली नाही. कल्याणकारी राज्यात सर्वांना संपत्ती मिळविण्याचा अधिकार असला पाहिजे, पण सर्वांना अधिकार म्हणजे सरकारातीलच सर्वांना असा काढला जात आहे. लोकशाही ही सध्या ज्ञात असलेल्या इतर राज्यपध्दतीपेक्षा चांगली असेलही पण ती काही परिपूर्ण नाही आणि जर तिलाच परिपूर्ण मानले तर त्यापेक्षा पुढे कसे जायचे... या राज्यपध्दतीपेक्षा आणखी चांगली व्यवस्था काळाच्या पोटात नक्‍कीच दडलेली असेल.....

गुरुवार, २९ ऑक्टोबर, २००९

पन्नास रुपडे......

माय! आजचा शेवटचा दिस हाय, आज जर पैसं दिलं नाय तर मास्तर शाळंत बसू देणार नाय.... बारा-तेरा वर्षाच्या पोरानं काकुळतीला येत आईचा पदर धरत तिला थांबवायचा प्रयत्न केला....ती थांबली... त्याच्या रडवेल्या चेहऱ्याकडे तिनं निमिषभर बघितलं पण त्याच्या डोळ्यात बघणं तिला पेलवलं नाही.... तिने पदराचा काठ त्याच्या हातातून सोडवला ...आणि निघून गेली...

बाई! पोरगं आठ दिस झालं, मागं लागलंया आज त्याला पैकं दिलं नायी तर त्येला मास्तर शाळंत बसू देणार नाय... म्होरल्या पगारातनं कापून घ्या की....भांडी घासता घासता ती ज्या घरी धुनं-भांडी करायची तिथल्या मालकीनीकडं तीनं पन्नास रुपयांची मागणी केली...
नाही गं ! आत्ता कुठले माझ्याकडे पैसे... आणि साहेबही बाहेरगावी गेलेत ना... तुला पुढच्या आठवड्यात पैसे देते काय... तिच्या पुढे आणखी चार भांडी आणून ठेवत मालकीनीनं नकाराची घंटा वाजवली.
मग, तीनं खूप गया-वया केली... पण मालकीनीनं काही पन्नासाची नोट तिच्या हातावर ठेवली नाही.... नंतर ती निघून गेली...
काही पोराचं शिक्षण बिक्षण थांबत नाही... हिलाच पाहिजे असतील पैसे, गावाला जायला... मालकीन स्वतःशीच पुटपुटली...
नंतर चार दिवस झाले तरी ती कामावर आली नाही...
मालकिनीचा संशय आणखी गडद झाला... कोणीतरी नक्‍की हिला पैसे दिले असणार आणि ही नक्‍की गावाला गेली असणार... पण आता मालकिनिला धुन्या-भांड्याचा कंटाळा येवू लागला होता.... ती आज नाही पण पुन्हा कधी येणार हे तरी कळावं म्हणून ती तिच्या घराकडं गेली...
त्या एवढ्याशा झोपडीत खूप माणसं बघून तिला काही सुचलं नाही.... तिनं शेजारच्या बाईकडं चौकशी केली....
बाई ! ती मेली....
मेली.... मालकिनीला आता भोवळ यायला लागली होती...
आवं परवाच्या दिशी पोराला पैकं पायजे म्हणून ती म्होरल्या बिल्डींगवर कामाला गेलती....असलं काम कवा केलं न्हवतं न्हवं......पाचव्या मजल्यावरनं पाय घसरला... खाली पडली.... जागच्या जागी गेली बघा.....
मालकिनीला काय करावं कळलं न्हायी.....ती घराकडे जाण्यासाठी वळली....
त्या झोपडीसमोरच तिचं ते पोरगं विटी-दांडूनं खेळत होतं.... त्याला बहुतेक मास्तरांनी शाळेतनं काढलं होतं.......