शुक्रवार, १८ सप्टेंबर, २००९

डोळ्यांची "शाळा'


गुरुजी! गुरुजी! पाचवीच्या वर्गात मुन्ना आणि बंटी भांडताहेत. एकमेकांच्या गळपट्ट्या धरताहेत. स्टाफरुमध्ये पळत आलेल्या दक्षिण्यानं धापा टाकत गुरुजींना सांगितलं. बहुतेक या भांडणात त्यालाही दोन-तीन बसल्या असतील, असा त्याचा अवतार बघून गुरुजी उठले आणि त्याच्याबरोबर चालू लागले.
काय रे आज काय कारण ः गुरुजी
काही नाही गुरुजी कमळीला वही कोणी आणि कशी दिली त्यावरून भांडणं सुरू आहेत.
म्हणजे? ः गुरुजी
अहो! गेल्या वाढदिवसाला मिळालेल्या वह्यांपैकी एक वही बंटीनं कमळीला दिली, तर मुन्नानं बाजारात जाऊन विकत घेऊन वही दिली.
मग देईनात की! यात भांडायचं काय?
तसं नाही गुरुजी, पण कमळीनं दोघांच्याही वह्या घेतल्या ना.
गुरुजींना आता कळेना. अरे वह्या दिल्या म्हटल्यावर घेणारच. त्यात भांडायचं कारण काय ः गुरुजी
तसं नाही गुरुजी, तिनं बंटीकडून वह्या घेताना बंटीला डोळा मारला, तर मुन्नाकडून घेताना मुन्नालापण डोळा मारला. आता त्यांच्यात भांडण चाललंय, ते डोळा खरा मारला कुणाला.
गुरुजींचं डोकं फिरलं अरे गेली पाच वर्षे बघतोय एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून चालणारे हे दोघे एकदम भांडायला का लागलेत.
काय रे, ते दोघे भांडताहेत का?
काही नाही गुरुजी, वहीचं निमित्त आहे सगळं. दोघांचाही जीव आहे कमळीवर; पण ती नेमकी कुणाची हेच कळेना. मग तिला पटवायला दोघंही काही ना काही करताहेत आणि भांडणात अडकताहेत. दक्षिण्यानं खुलासा केला.
........
गुरुजी आणि दक्षिण्या वर्गाजवळ येतात
........
मुन्नानं बंटीची आणि बंटीनं मुन्नाची गळपट्टी धरलेलेली. दोघं एकमेकांकडं बघून दात-ओठ खात भांडत होते. गुरुजी आलेले बघून दोघंही आपापल्या बाकावर जाऊन बसले.
काय रे, आतापर्यंत तुम्ही चांगले मित्र होता ना? अगदी हातावर बांधलेल्या घड्याळासारखं नातं होतं ना तुमचं, मग असं भांडताय का? ः गुरुजींनी प्रश्‍नपत्रीकाच उघडली.
गुरुजी, मी आपला माझ्या रस्त्यानं चाललोय; पण हाच "वाम' मार्गाला लागलाय. बंटीनं खुलासा केला.
वाम मार्गाला! एवढूश्‍या पोरांकडून वाम मार्ग वगैरे ऐकून गुरुजींना घामच फुटला.
मागच्या वेळी नाही का डाव्यांबरोबर हा लग्नात अक्षता घेऊन उभा होता. बंटीनं आपलं घोडं पुढं दामटलं.
नाही, गुरुजी मी माझ्या रस्त्यानं चाललोय. यालाच मी आडवा येतोय, असं वाटतंय. त्याला मी काय करू. आपलं उगाच ज्यात-त्यात नाक खुपसायचं. कमळीवरच नाही, तर काकांच्या साखरेवरही याचा डोळा होता, आता त्यात काही जमलं नाही म्हणून माझ्याशी भांडतोय. मुन्नानं आपलं म्हणनं मांडलं.
आता गुरुजींना काहीच समजेना. कमळी काय, साखर काय, डावा काय, काही काही कळेना. त्यांनी मघाशी त्यांच्याकडे आलेल्या दक्षिण्याला जवळ बोलावलं आणि विचारलं, ही भानगड काय आहे.
भानगड वैगेरे काही नाही गुरुजी. कमळी एकदा याला डोळा मारते तर एकदा त्याला; पण ती नेमकी कोणाची होणार हेच कळत नाही.
पण आतापर्यंत ती त्या दिंगतात कीर्ती असणाऱ्या विजयबरोबर फिरत होती ना.?
होती की. मागं एकदा तिची साथ सुटली ती अजून काय जमली नाही बघा. त्यामुळे आता ती नेमकी कोणाला होय म्हणणार हेच कळत नाही. एवढंच नाही तो किल्ल्यावरचा आपला संजयही तिच्यावर बाण रोखून आहे.
बाण ः गुरुजी
नयनबाण.
मग त्यालाही डोळा मारते की काय ती... गुरुजींनी आवाक होऊन विचारलं.
काय माहीत, आता 22 आक्‍टोबरलाच काय ते कळेल.

गुरुवार, १७ सप्टेंबर, २००९

गर्दीतील "माणूस'



कोल्हापूर एसटी स्टॅंडवर सोलापूर फलाटावर बसलेल्या त्या वृद्धेकडं लक्ष जाण्याचं काहीच कारण नव्हतं. विस्कटलेले पांढरे केस, अस्ताव्यस्त झालेली मळकी साडी, शेजारीच गाठोडेसदृश असलेली पिशवी आणि त्यावर असलेली काठी बघून ती कोणी भिकारीच वाटत होती. गाडीची वाट पाहणाऱ्या स्टॅंडवरील माझ्यासारख्या अनेकांनी तिच्याकडं बघून न बघितल्यासारखं केलं; पण मला मात्र तिची आशाळभूत नजर अस्वस्थ करत होती. तिच्याकडं लक्ष द्यायचं नाही असं ठरवूनही नजर मात्र तिच्याकडंच वळत होती. अर्ध्याएक तासात तिच्याजवळून जवळपास पन्नासएक लोक इकडेतिकडं गेले; पण तिनं कोणाकडेच पैसे मागितले नाहीत आणि कोणी तिला पैसेही टाकले नाहीत. एवढ्यात एक पन्नाशीचा विजार-शर्ट घातलेला माणूस तिथं आला. तो काहीतरी तिच्याशी बोलला आणि निघून गेला. मला वाटलं काही पैसे देऊन तो गेला असेल; पण तो परत आला. त्याच्या हातात ब्रेड आणि पेला होता. बहुतेक त्यात चहा असावा. तिनं तो ब्रेड आणि चहा संपवला. तो माणूस पेला घेऊन परत गेला आणि पुन्हा आला. एसटीची चौकशी करून परत तिथं आला. मग मात्र मला राहावलं नाही. मी त्याच्याजवळ गेलो. शांतपणे त्यांच्या मागे उभा राहिलो, तो तिला सांगत होता, "आता लगेचच एसटी आहे.' एवढ्यात एसटी लागली. त्यानं तिची काठी आणि गाठोडं एका हातात घेतलं आणि दुसऱ्या हातानं तिला आधार दिला. मला ते गाठोडं घ्यावं वाटलं; पण धीर झाला नाही. त्यानं तिला सोलापूरच्या एसटीत बसविलं आणि कंडक्‍टरकडून तिकीट घेतले. तिच्या त्या गाठोड्यात ते ठेवत त्यानं ते कुठे ठेवलं ते कंडक्‍टरला दाखविलं. जाताना पन्नासाची नोट तिच्या हातावर ठेवत रिक्षानं जा, असं त्यानं सांगितलं. एसटीतून उतरल्यावर मी त्याला नाव विचारलं, पण तो फक्‍त हसला आणि ज्या गर्दीतून तो आला होता त्याच गर्दीत पुन्हा मिसळला. कोण असावा तो?

सोमवार, ७ सप्टेंबर, २००९

प्राथमिक शिक्षकांची मानसिकता बदलायला हवी


कल्याणकारी राज्यात सरकारी दायित्त्व फार मोठे असले तरी ज्या समाजाच्या जाणिवा जाग्या असतात त्या समाजाला सरकारपेक्षा स्वतःवरच फार विश्‍वास असतो आणि आज तोच डळमळताना दिसत आहे. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा खालविण्यात अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे शिक्षकांची बदललेली मानसिकता हा आहे, आणि त्यावर फार कमी प्रमाणात लक्ष दिले जात आहेत.

प्राथमिक शिक्षकांची मानसिकता बदलायला हवी


दहावीची मंडळाची परीक्षा असावी की नसावी हा वाद गेली अनेक वर्षे अधूनमधून डोके वर काढतो, त्याप्रमाणे तो सध्याही जोरात सुरू आहे. शिक्षणतज्ज्ञांतच दोन मोठे गट पडले आहेत. त्यांच्या जोडीला मानसशास्त्रतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्तेही हिरीरीने सहभागी होताना दिसत आहेत. मोठ-मोठी चर्चासत्रे बोलाविली जात आहेत आणि त्या चर्चासत्रांना शहरात इंग्रजी शाळांत शिकणारे आणि शिकविणारे दोघेही पोटतिडकीने मते मांडत आहेत. शैक्षणिक गुणवत्तेपेक्षा परीक्षाकेंद्रीत विद्यार्थी बनत चालल्याची ओरड सगळेच करत आहेत आणि त्याच्या बाजूने आणि विरोधात मते मांडली जात आहेत. ज्याप्रमाणे इतर सर्वच क्षेत्रात ग्रामीण भागाचे प्रश्‍न शहरातील मंडळी अभ्यासूपणे मांडतात त्याचप्रमाणे शिक्षणाच्या दर्जाविषयीही जमीनस्तरावर काम करणाऱ्या खेडेगावातील शिक्षकाला न विचारता शहरात राहाणाऱ्या आणि कधी तरी ग्रामीण भागात जावून शाळांना भेट देणाऱ्या तथाकथीत शिक्षणतज्ज्ञांना विचारुन निष्कर्षापर्यंत पोहचले जात असल्याचे चित्र आहे.
आज प्राथमिक शिक्षणाचा दर्जा खालावला आहे आणि हा खालाविण्याचा आलेख आणखी तीव्र होत असल्याचे म्हणणे सगळेच मांडताना दिसत आहेत. प्राथमिक शिक्षण हा संपूर्ण व्यक्‍तीमत्त्वाचा एक महत्त्वाचा (अपवादात्मक ठिकाणी नसला तरी) घटक आहे हे सारेच मान्य करतात. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा खालाविण्याला सरकार आणि सरकारची धोरणेच जबाबदार आहेत हा सरळ साधा निष्कर्ष मांडला जातो. कल्याणकारी राज्यात सरकारी दायित्त्व फार मोठे असले तरी ज्या समाजाच्या जाणिवा जाग्या असतात त्या समाजाला सरकारपेक्षा स्वतःवरच फार विश्‍वास असतो आणि आज तोच डळमळताना दिसत आहे. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा खालविण्यात अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे शिक्षकांची बदललेली मानसिकता हा आहे, आणि त्यावर फार कमी प्रमाणात लक्ष दिले जात आहेत.
शिक्षण देणे हे पुण्यकर्म संपून आठ-दहा दशके उलटून गेली असली तरी शिक्षकीपेशातील त्याग अजून टिकून होता. त्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन नक्‍कीच चांगला होता. अगदी पंधरा वर्षांपुर्वीचे प्राथमिक शिक्षक आणि सध्याचे शिक्षक यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. फरक केवळ विजार जावून पॅंट आली आणि गुरुंजीचे सर झाले या बाह्य रुपात नाही तर शिक्षकांचा शिक्षकीपेशाकडे बघण्याचा आणि समाजाचा शिक्षकांकडे बघण्याच्या दृष्टीचा अर्थात मानसिकतेचा फरक आहे.
अगदी 70 च्या दशकांपर्यंत शिक्षकच विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचे शिल्पकार होते. एखादा विद्यार्थी शाळेत आला नाही तर त्याला घेवून येण्यासाठी वर्गातीलच चार मुलांना पाठवत असत. उचल बांगडी हा प्रकार त्यावेळी सर्रास चालायचा. शाळेबाहेरही जर एखादा मुलगा उनाडक्‍या करत असेल तर त्याला शाळा मास्तरांचा धाक असायचा अर्थात या धाकापोटी अनेक विद्यार्थ्यांनी शाळेला कायमचा रामराम केला ही गोष्ट खरीच पण मुलांना प्रत्येक गोष्ट ही आलीच पाहिजे हा ध्यास पराकोटीचा होता. इतर कोणत्याही नोकरीपेक्षा त्याकाळात शिक्षकाला मिळणारा पगार तुटपुंजा असला तरी त्यात तो समाधानी असायचा. शाळाबाह्य उपक्रमातही शाळेतीलच जे विद्यार्थी कच्चे आहेत त्यांना शिकविण्याचा एकमात्र धंदा असायचा (कोणतीही फी न घेता). विद्यार्थ्यांत सामाजिक जाणिवा जागृत करण्यात या शिक्षकांचा हात सर्वात मोठा होता. विशेष म्हणजे ज्या समाजातून (जातीचा इथे संदर्भ नाही) विद्यार्थी येत त्याच समाजातून शिक्षक येत असल्याने विद्यार्थ्यांना तो आपला वाटे. त्याने दिलेली उदाहरणे आपली वाटत आणि ती त्यांच्या जगण्यातील होती.
पण गेल्या दोन दशकांत शिक्षकांत प्रचंड बदल होत गेला. मास्तराचा गुरुजी आणि गुरुजीचा सर होणाऱ्या बदलात धोतर जावून विजार आणि विजार जावून जीन्स एवढाच फरक राहिला नाही तर शिक्षक समाजापासून दुरावत गेला. त्यामुळे विद्यार्थी शिक्षक यांच्यातील दरी रुंदावत गेली. प्राथमिक शिक्षणाचा उगम आणि संगम शहरी आणि ग्रामीण भागात एकच असला तरी त्याचा प्रवाह वेगवेगळ्या स्तरातून वाहतो आणि हाच मुद्‌दा बऱ्याचदा दुर्लक्षीत राहातो. शहरातील प्राथमिक शिक्षणापुढची संकटे वेगळी आणि ग्रामीण भागातील वेगळी आहेत. जीथे शहरात एका संथ लयीत प्राथमिक शिक्षण देणे सुरु आहे त्याचवेळी ग्रामीण भागात त्याची वाट फारच बिकट आहे. अनेक बांध पार करुन त्याला संगमापर्यंत पोहाचावे लागते. त्यामुळे या प्रवाहात पडलेल्यांना मार्गदर्शन करणारेही तितक्‍याच ताकदीचे पोहणारे हवेत.
गाव तेथे शाळा आणि वर्ग तिथे शिक्षक ही योजना कितीही लाभदायक वाटली तरी तिचे परीणाम मात्र तितकेसे चांगले दिसत नाहीत. शिक्षकांना मिळणारा पगार आणि त्यांना मिळणाऱ्या अनेक सोयी-सुविधांमुळे अनेकजण शिक्षकीपेशाकडे वळले आहेत. यात नागरी विद्यार्थी जसे आहेत तसेच ग्रामीण भागातीलच नागरी बेटांच्या संस्कृतीत वाढलेल्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी ज्या सामाजिकस्तरातून येतात त्या समाजाशी शिक्षकांचा संबंध असत नाही. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी ही दरी केवळ रुंद होत नाही तर ती खोलही होत आहे. त्यामुळे शिक्षक एका परीने शिकवत राहातो आणि विद्यार्थी कोरडाच राहातो. त्यामुळे दहावीपर्यंत पोहचलेला विद्यार्थी दहावीत नापास होतो.
मला काय करायचे, मी एकटा काय करणार, माझा पगार थांबणार आहे थोडीच , या मानसिकतेतूनच विद्यार्थ्यांना शिकविलं जाते. याला काही अपवाद आहेत पण सर्रास हेच दिसत आहे. हे चित्र ग्रामीण आणि शहरात सारखेच दिसत असले तरी त्याचा विचार मात्र पुन्हा वेगळा करायला हवा. एखाद्या विद्यार्थ्याला शहरात एखादी शाळा नाही आवडली तर त्याला पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे संधी दवडली जाण्याची शक्‍यता कमी आहे. पण ग्रामीण भागात शाळाच एक, एकशिक्षकी असल्याने तिथे जे पदरात पडलं आहे ते पवित्र मानायला हवे. एकंदरीतच प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावयचा असेल तर प्राथमिक शिक्षकांची मानसिकता बदलायला हवी.(त्यांच्यावर असलेल्या शालाबाह्य कामांना गृहीत धरुन).

गुरुवार, २७ ऑगस्ट, २००९

मोठी माणसं...

"तुम्ही जेवढे लहान होता, तेवढेच तुम्ही मोठे होता' अशा अर्थाचा इंग्रजीत एक वाक्‌प्रचार आहे. त्याचा प्रत्यय या महिन्यात दोनदा आला. मॅगसेसे पुरस्कारविजेते आणि "नाही रे' वर्गाचे प्रश्‍न पोटतिडकीने मांडणारे पी. साईनाथ व संपूर्ण जगाला दहशतवादी "कसाब' कोण हे दाखविणारे ज्येष्ठ छायाचित्रकार श्रीराम वेर्णेकर यांच्याशी संवाद साधण्याचा योग जुळून आला. दोघेही पत्रकार. आपल्या पेशाशी प्रामाणिक आणि तितकीच मोठी माणसंही. पी. साईनाथ यांच्याशी संवाद साधताना त्यांच्यातील प्रांजळ माणूस प्रखरतेने भेटला. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रश्‍नांवर जरी मी लक्ष वेधले असले तरी "इनाडू'ने (आंध्र प्रदेशमधील एक दैनिक) हा प्रश्‍न सर्वात आधी खूप जोरकसपणे मांडला, हे सांगायला ते विसरले नाहीत किंबहुना त्याचे सारे श्रेय आपले एकट्याचे नसल्याचेही त्यांनी नम्रपणे सांगितले. खरे तर पी. साईनाथ यांच्या पत्रकारितेमुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडे सरकारने गांभीर्याने पाहिले हे सर्वज्ञात आहे; मात्र तरीही त्याचे सर्व श्रेय घेण्यापेक्षा त्यांनी ते इनाडूच्या संबंधित पत्रकाराला दिले. यातच त्यांचे मोठेपण दिसून येते. जगन फडणीस पुरस्कार स्वीकारण्यास आलेल्या श्री. वेर्णेकरांशीही संवाद साधताना दुसरी तशीच मोठी व्यक्ती भेटल्याचे समाधान लाभले. त्यांना एका पत्रकाराने विचारले, की खरंच तुम्हाला स्वतसुरक्षितता, वर्तमानपत्राने दिलेले काम, की सामाजिक दायित्व मोठे वाटते? त्यांनी क्षणाचा विलंब न करता सुरक्षिततेला प्रथम क्रमांक देत सामाजिक दायित्वाला अखेरचा क्रमांक दिला. खरे तर जिवावर उदार होऊनच त्यांनी कसाबचे छायाचित्र काढले. हॅंडग्रेनेड फेकत, गोळीबार करत असलेल्या दहशतवाद्यावर फ्लॅश मारणे म्हणजे मृत्यूचे छायाचित्र घेण्यासारखेच; पण तरीही त्या घटनेला उगाच मोठा साज न चढवता त्यांनी
वास्तविकता मांडली. खरे तर त्यांना कामाप्रति असलेली निष्ठा, त्याबद्दल जिवावर उदार होणे अशा पद्धतीची गुळगुळीत वाझोडता आली असती आणि त्यांच्या तोंडी ती वाईटही दिसली नसती; पण तरीही अत्यंत नम्रपणे त्यांनी परिस्थितीजन्य निर्णय कसे घ्यावे लागतात हेच सांगितले.
या दोन्ही माणसांनी उत्तुंग यश मिळविले. हे यश मिळविताना त्यांनी अपार कष्ट घेतले; पण तरीही त्यांच्या वागण्या-बोलण्यात कसलाही अभिनिवेश नाही. समोरच्यांना तेवढेच योग्य लेखत त्यांचा यथोचित सन्मानच केला, माणूसपण विसरले नाहीत म्हणूनच ते मोठे झाले.

20 जुलै 2009

बुधवार, १२ ऑगस्ट, २००९

प्रति, सुप्रिया मॅडम,

प्रति, सुप्रिया मॅडम,
गेल्या शुक्रवारी पुस्तक घेण्या-देण्याच्या निमित्ताने तुमची भेट झाली. खूप दिवसांपासून तुम्हाला भेटण्याची इच्छा होतीच, पण तसा योग येत नव्हता. तो यानिमित्ताने आला. भेटीपूर्वी तुमच्याबद्दल वाटणारा आदर भेटीनंतर दुप्पट-चौपट झाला. अनेकवेळा आपण एखाद्याचे लेखन वाचतो किंवा त्या लेखकाबद्दल इतरांनी सांगितलेल्या गोष्टीवरुन त्याची मनात एक प्रतिमा तयार करतो. याला मी पूर्वग्रह असं म्हणत नाही, पण अशा चौकटीत आपण लेखकाला ठेवतो. त्यामुळे आपल्यातील अस्वस्थता थोडी कमी होते. तशी एक प्रतिमा तुमच्याबद्दल माझ्या मानात होतीच. पण जेव्हा प्रत्यक्षात तुमच्याशी बोलणं झालं, त्यावेळी प्रत्यक्ष बऱ्याचवेळा प्रतिमेच्या खूपच उत्कट असंत हे माझ्यालेखी पुन्हा अधोरेखीत झालं.(याचं श्रेय मा. भोसलेसाहेबांना जाते.)
एक आठवड्यानंतर पत्र लिहण्याला एक कारण आहे ते म्हणजे तुमची पुस्तके. शुक्रवारी संध्याकाळी "पॉपकॉर्न' वाचायला घेतलं. पहिला लेख वाचल्यानंतर दुसरा आणि दुसऱ्यानंतर तिसरा लेख वाचण्याचा मोह आवरता आवरला नाही. बऱ्याचवेळा रात्री बेडवर पडल्यावर झोप येईपर्यंत पुस्तक नाकासमोर राहातं आणि त्यानंतर ते उलटं छातीवर कधी पडतं हे कळतच नाही..पण एखाद्या लहान मुलापुढे खाऊचा डबा ठेवला तर ते मूल किती हरखून जाईल तेवढाच हरखून गेलो. घड्याळाच्या काट्याकडे लक्ष देत आता हा शेवटचाच लेख वाचायचा आणि झोपायचा असा विचारही केला. लाईट बंद केली पण तरी एक अस्वस्थता कायम राहीली आणि पुन्हा लाईट लावला पुस्तक पूर्ण केलं मगच शांत झोप आली. विशेष म्हणजे मला आता जेव्हा जेव्हा खूप अस्वस्थ वाटेल आणि रिलॅक्‍स होण्यासाठी एक लेख सकाळी आणि एक लेख रात्री वाचण्याचा डोस पुरेल हे नक्‍की!
"टाईमपास' मात्र पाच- सहा वर्षांपुर्वी माझ्या वाचनात आलं नाही हे बरे झाले. बऱ्याचवेळेला शब्दांचा समोरचा अर्थ दिसतो तसा असतोच असं नाही. किंवा एखाद्या वाक्‍याचाही अर्थ असाच संदर्भहीन आला तर त्याच्या छटा वेगळ्याच दिसतात. किमान मला तरी समुहातील शब्द आणि समुहाबाहेरचा शब्द वेगवेगळा भासतो. पुस्तकांत येणारा शब्द हा रिलेतील खेळाडूसारखा असतो अगदी आपल्या हातातील काठी पुढच्या खेळाडूच्या हातात देणारा, तर एकटा शब्द धावण्याच्या स्पर्धेत एकटा धावत असल्यासारखा. त्यामुळे शब्दांचे समोरचेच अर्थ घेण्याच्या वयात मला हे पुस्तक कदाचित आवडलं नसतं. पण आज मात्र हे पुस्तक वाचताना जगण्यातली शुचिर्भूतता ही कल्पनेतच असते पण जसं जगलो तसं मांडणं याला किती धीटपणा असावा लागतो याची जाणीव आहे. त्यामुळे हे पुस्तक डोक्‍यात कमी जातं आणि मनात घर करुन बसतं. प्रोतिमांचं जगणं जितकं प्रवाही आहे, त्याहीपेक्षा तुम्ही केलेलं त्याचं भाषांतर. या प्रवाहात एकदा माणूस पडला की पुन्हा किनाऱ्याचा शोध तो घेत नाही अगदी शेवटापर्यंतच तो येवून पोहोचतो. यासाठी तुम्हाला धन्यवाद!

ता.क. काही व्याकरणाच्या चुका असतील तर क्षमा! मी त्या सुधारण्याचा प्रयत्न करत आहे.

मंगळवार, ११ ऑगस्ट, २००९

चांगदेवाची अवस्था

प्रती,
े,
खरंच चांगदेवाची काय अवस्था झाली असेल, हे मला आत्ता नक्‍की कळते. अर्थात मी चांगदेव नाही आणि तू ज्ञानेश्‍वर नाहीस तरीही मायना काय लिहावा हा प्रश्‍नच होता. परत पत्र लिहिताना एकेरी उल्लेख करावा की आदर व्यक्‍त करावा काहीच कळलं नाही. शेवटी शब्द तरी तुम्हाला कुठपर्यंत साथ देणार फक्‍त भावना महत्वाच्या. त्या व्यक्‍त झाल्या की शब्दांचं काम संपलं. म्हणजे त्यांचं काम हे फक्‍त वाहकांचं. तुमच्या अभियांत्रिकी भाषेत सांगायचं झालं, तर शब्द काही भावनांचे चांगले वाहक नाहीत. गरजेला उपयोगी पडतात एवढाच त्यांचा कार्यभार.
कुणाचे पत्र, का लिहिलं असेल, गरज होती का अशा प्रश्‍नांची एक रांग तुझ्या मनात असणार हे नक्‍की. पण या प्रश्‍नांच्या जाळ्यातून बाहेर आल्यावर तुलाही पटेल. तशी आपली ओळख "तोंडदेखली' असंही म्हणता येत नाही. तरी आपली ओळख आहे. बऱ्याचदा आपल्या भोवती असणारे सगळे आपल्याशी खूप चांगलं बोलत असतात, आपल्याबद्दल त्यांच्या मनात खूप चांगल्या भावना असतात तरीही काही गोष्टींसाठी मात्र त्यांच्याकडे वेळ असतोच असं नाही. जगाच्या दृष्टीने अगदी शुल्लक गोष्टी असतील पण त्या गोष्टी आपल्यासाठी खूप मोठ्या असतात. जगण्याचं बळ देवून जाणाऱ्या असतात. आमचे एक आकाशवाणीवरील सहकारी आहेत, श्रीनिवास जरंडीकर तू नाव ऐकून असशील त्यांना पदोन्नती मिळाली. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांना एखादं पुस्तक भेट देता येईल का हे बघण्यासाठी मी "ग्रंथ'मध्ये गेलो होतो. अनेक पुस्तके बघीतल्यानंतर एक पुस्तक हाती लागलं ते संदीप खरे यांच्या कवितांचे. हा कवितासंग्रह तुलाही आवडेल असा चटकन विचार माझ्या मनात आला. खरे तर तू लेक्‍चरर म्हणून रुजू झाल्यावरच तुला एखादे पुस्तक देवून तुझे अभिनंदन करावे अशी इच्छा होती पण एकतर आपली ओळख अगदीच त्रोटक आणि त्यात तू मुलगी. थोडं स्पष्ट लिहतोय पण त्याला इलाज नाही. यानं मुद्दाम पुस्तक भेट दिलं की काय ही भावना साहाजिक उमटली असती. त्यामुळे तो विचार मी बाजुला ठेवला. खरे तर कविता आवडणारी लोकं खूप आहेत पण कवितांवर प्रेम करणारी लोकं खूप कमी आहेत. आणि मग अशा विषयांवर चर्चा करणारी माणसं मिळत नाहीत. मग अतृप्ततेची भावना रेंगाळत राहते. काहीच सूचत नाही. बिघडलं काय असं कोणी विचारलं तर त्याचं उत्तर काही नाही असंच तर असतं पण बिघाड दुरुस्त कसा करायचा हेही सूचत नाही. अशावेळी तुझ्यासारखे मित्र असणं आवश्‍यक असतं.
तुझ्या नव्या भूमिकेसाठी अभिनंदन !

प्रवीण कुलकर्णी
कोल्हापूर
11 ऑगस्ट 2009

ता. क. तुला आवडलं नसेल तर तसा स्क्रॅपही तू ऑर्कूटवर टाकू शकतेस. थोडं वाईट वाटेल बाकी शुन्य!

प्रती, जरंडीकर सर यांना

प्रती,
जरंडीकर सर यांना,
मोबाईल फोनमुळे आजकाल पत्र लिहिण्याचा सराव उरलेला नाही. किंबहुना आमच्या पिढीने परीक्षेत जेवढी पत्रे लिहिली तेवढीच. बाकी कार्यालयीन रुक्ष पत्रे लिहीत असलो तरी त्याला "अर्ज' (मनातून कितीही राग असला तरी) हेच स्वरूप राहिले. सांगायचा मुद्दा असा, की बऱ्याच मोठ्या कालावधीत पत्र लिहिण्याचा योग तसा आलेला नाही. त्यामुळे पत्रात जर काही चुका असतील तर त्या समजून घ्याल, ही अपेक्षा.
परवाच्या दिवशी तुमच्याशी फोनवर बोलताना तुम्हाला पदोन्नती मिळाली हे समजले. फोनवरुन शुभेच्छाही दिल्या; पण या शुभेच्छात तो ओलावा नव्हता, की काय याची रुखरुख मलाच लागून राहिली. आजकाल शुभेच्छांचे मेसेज या मोबाईलवरुन त्या मोबाईलवर सगळीकडे बागडत असतात, ज्याने धक्‍का दिला त्याचा मेसेज, एवढंच. बाकी सगळा शब्दांचा बुडबुडा. त्यामुळे मेसेज पाठवावा की न पाठवावा या द्विधा मनःस्थितीत होतो. बऱ्याचदा फोनवरुन बोलताना आपल्या नेमक्‍या काय भावना आहेत हे समोरच्याला कळतेच असे नाही. त्यासाठी लागणारे शब्दांचे गुच्छ प्रत्येक वेळी आपल्याकडे असतातच असे नाही आणि मग एखाद्या सुंदर घटनेच्या आनंदाच्या कळ्या फुलतातच असे नाही. त्यामुळे हा पत्राचा अट्टहास.
तुम्हाला मिळालेल्या पदोन्नतीबद्दल अभिनंदन! अगदी खूप वर्षांचा नसला तरी गेल्या तीन वर्षांच्या आपल्या स्नेहात मला हे
माहीत आहे की, तुमचे (सरकारी कर्मचारी असला तरी) कामावर किती प्रेम आहे. आपण पुढच्या आठवड्यात सुटीवर जाणार असाल तर या आठवड्यात बारा बारा तास काम केल्याचे मी बघितले आहे. तुमची कामाबद्दलची निष्ठा आणि झोकून घेणे, त्यासाठी लागणारे कष्ट उपसणे बघितले की तुमच्यापेक्षा आम्ही किती लहान आहे हे लक्षात येते. त्यामुळेच या पदोन्नतीतील आणखी महत्त्व. बाकी तुमच्यापेक्षा वयाने (तांत्रिक अर्थाने), अनुभवाने आणि बुद्धीने सगळ्याच बाबतीत खूप लहान आहे. भावना पोहोचविणे एवढाच या पत्राचा उद्देश, बाकी काहीच नाही.
पुन्हा एकदा तुमचे अभिनंदन!
प्रवीण कुलकर्णी
कोल्हापूर
11 ऑगस्ट 2009

प्रती, जरंडीकर सर यांना

प्रती,
जरंडीकर सर यांना,
मोबाईल फोनमुळे आजकाल पत्र लिहिण्याचा सराव उरलेला नाही. किंबहुना आमच्या पिढीने परीक्षेत जेवढी पत्रे लिहिली तेवढीच. बाकी कार्यालयीन रुक्ष पत्रे लिहीत असलो तरी त्याला "अर्ज' (मनातून कितीही राग असला तरी) हेच स्वरूप राहिले. सांगायचा मुद्दा असा, की बऱ्याच मोठ्या कालावधीत पत्र लिहिण्याचा योग तसा आलेला नाही. त्यामुळे पत्रात जर काही चुका असतील तर त्या समजून घ्याल, ही अपेक्षा.
परवाच्या दिवशी तुमच्याशी फोनवर बोलताना तुम्हाला पदोन्नती मिळाली हे समजले. फोनवरुन शुभेच्छाही दिल्या; पण या शुभेच्छात तो ओलावा नव्हता, की काय याची रुखरुख मलाच लागून राहिली. आजकाल शुभेच्छांचे मेसेज या मोबाईलवरुन त्या मोबाईलवर सगळीकडे बागडत असतात, ज्याने धक्‍का दिला त्याचा मेसेज, एवढंच. बाकी सगळा शब्दांचा बुडबुडा. त्यामुळे मेसेज पाठवावा की न पाठवावा या द्विधा मनःस्थितीत होतो. बऱ्याचदा फोनवरुन बोलताना आपल्या नेमक्‍या काय भावना आहेत हे समोरच्याला कळतेच असे नाही. त्यासाठी लागणारे शब्दांचे गुच्छ प्रत्येक वेळी आपल्याकडे असतातच असे नाही आणि मग एखाद्या सुंदर घटनेच्या आनंदाच्या कळ्या फुलतातच असे नाही. त्यामुळे हा पत्राचा अट्टहास.
तुम्हाला मिळालेल्या पदोन्नतीबद्दल अभिनंदन! अगदी खूप वर्षांचा नसला तरी गेल्या तीन वर्षांच्या आपल्या स्नेहात मला हे
माहीत आहे की, तुमचे (सरकारी कर्मचारी असला तरी) कामावर किती प्रेम आहे. आपण पुढच्या आठवड्यात सुटीवर जाणार असाल तर या आठवड्यात बारा बारा तास काम केल्याचे मी बघितले आहे. तुमची कामाबद्दलची निष्ठा आणि झोकून घेणे, त्यासाठी लागणारे कष्ट उपसणे बघितले की तुमच्यापेक्षा आम्ही किती लहान आहे हे लक्षात येते. त्यामुळेच या पदोन्नतीतील आणखी महत्त्व. बाकी तुमच्यापेक्षा वयाने (तांत्रिक अर्थाने), अनुभवाने आणि बुद्धीने सगळ्याच बाबतीत खूप लहान आहे. भावना पोहोचविणे एवढाच या पत्राचा उद्देश, बाकी काहीच नाही.
पुन्हा एकदा तुमचे अभिनंदन!
प्रवीण कुलकर्णी
कोल्हापूर
11 ऑगस्ट 2009

मंगळवार, १४ एप्रिल, २००९

धर्म, पुतळा आणि गल्लत



त्यानं जगाला हसवलं. हसवताना जात-पात, धर्म कधी पाहिला नाही. परिस्थितीने अनेक वेळा त्याच्याविरोधात बंड पुकारलं; पण त्यानं त्या परिस्थितीला आपल्या कलेत डोकावू दिलं नाही... चार्ली चॅप्लिन हे त्या थोर कलाकराचं नाव. त्याच्या पुतळ्याच्या अनुषंगाने कर्नाटकात निर्माण झालेला वाद यातना देणारा आहे.

एकीकडे महाराष्ट्रात साहित्य संमेलन आणि आनंद यादव यांच्या पुस्तक आणि त्यांच्या संमेलनाध्यक्षपदाच्या अनुषंगाने घडलेल्या गोष्टींबाबत जोरदार चर्चा होत असतानाच तिकडे कर्नाटकातही अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याचा गळा घोटण्यात आला. धर्म आणि कला यांची अनावश्‍यक गल्लत झाल्यावर काय स्थिती निर्माण होऊ शकते, याचे एक उदाहरण सध्या कर्नाटकात पाहायला मिळते. तिथल्या राज्यकर्त्यांनी धर्मालाच कलेच्या खांद्यावर बसवून टाकले आहे. धर्माचा बोजा सहन न होऊन लडखडणाऱ्या कलेकडे राज्यकर्ते त्रयस्थासारखे बघत आहेत. त्यामुळेच ज्याचा धर्म केवळ लोकांना हसविणे हा होता त्या चार्ली चॅप्लीनच्या पुतळ्याला तो केवळ ख्रिश्‍चन आहे म्हणून विरोध होत आहे. केवढा हा दैवदुर्विलास!
चार्ली चॅप्लीन यांचा 67 फूट उंचीचा पुतळा पश्‍चिम किनारपट्टीवरील पदूवारी या गावात उभारण्यात येणार होता. कर्नाटकातील प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक हेमंत हेगडे त्यांच्या आगामी चित्रपटासाठी हा पुतळा उभारणार होते; पण स्थानिकांनी या पुतळ्यास विरोध केला. त्यासाठी प्रमुख कारण होते ते चार्ली चॅप्लीन यांच्या धर्माचे. ज्या जागेवर हा पुतळा उभारण्यात येणार होता, तेथे समोरच एक मंदिर आहे. हिंदूंच्या मंदिराच्या दारात एका ख्रिश्‍चन माणसाचा पुतळा उभा करू देणार नाही असे स्थानिकांचे म्हणणे आहे. मुखवटा स्थानिकांचा असला, तरी हिंदुत्ववादी संघटनांची भूमिकाच स्थानिकांच्या मुखातून बाहेर पडत आहे हे उघड आहे. विशेष म्हणजे हा पुतळा कायमस्वरूपीही नव्हता. केवळ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होईपर्यंतच पुतळा त्या ठिकाणी उभारला जाणार होता. त्यानंतर तो तेथून हलविलाही जाणार होता; पण तरीही स्थानिकांनी त्याला जोरदार विरोध केला.
विशेष म्हणजे प्रशासनाची भूमिका या प्रकरणात बोटचेपी आहे. कलेचे स्वातंत्र्यच धोक्‍यात येत असताना प्रशासन विरोधकांची बाजू घेत आहे. कला आणि धार्मिकता या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कलेला धर्म असत नाही. धर्माच्या पलीकडे कला असते, म्हणूनच कलाकार धर्मातीत असतात. त्यामुळेच त्यांच्या अभिव्यक्‍तीला पाठिंब्याची आवश्‍यकता असते. समाजाने आणि राज्यकर्त्यांनी कलाकारांना प्रोत्साहन द्यावे असे अभिप्रेत असते. इथे कलाकारांना प्रोत्साबन लांबच उलट त्यांना दबावाखाली काम करावे लागत आहे. "विशिष्ट' समुदायाला न आवडणारे भाष्य केले, तर त्यांच्यावर हल्ला होण्याची भीतीही आहे. याची उदाहरणे रोजच समोर येऊ लागली आहेत. स्वयंघोषित धर्म आणि संस्कृतीरक्षकांनी कर्नाटकातच पबमधील महिलांना मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच ही दुसरी घटना घडली आहे. कर्नाटकात अल्पसंख्याकांवर हल्ला, प्रार्थनास्थळांवर हल्ला असे प्रकार तर आता नित्याचेच होऊ लागले आहेत. एका विशिष्ट पक्षाची सत्ता असली, की आपला धार्मिकतेचा अजेंडा पुढे ढकलता येतो हे तथाकथित संस्कृतीरक्षकांना पाठ झाले आहे. त्याचाच फायदा घेत त्यांनी चॅप्लीनच्या पुतळ्यास विरोध केला आहे. पुतळ्याला विरोध करण्यामागे काही तात्विक दृष्टिकोन असता तर तो समजून घेता आला असता; पण केवळ चॅप्लीन ख्रिश्‍चन आहे आणि हिंदू मंदिरासमोर एका ख्रिश्‍चन माणसाचा पुतळा उभा राहणे म्हणजे धर्म बुडणे असा अपप्रचार करण्यात आला. विशेष म्हणजे हा पुतळा कोणा ख्रिश्‍चन मिशनऱ्यांना उभा करायचा नव्हता, तर तो एका हिंदू दिग्दर्शकाला आपल्या चित्रपटासाठी उभा करायचा होता; पण याला अविचाराने विरोध करण्यात आला.
पुतळ्याला झालेला विरोध पाहून कर्नाटकातील नाट्य आणि चित्रपट क्षेत्रांतील अनेकांना धक्‍काच बसला. अभिव्यक्‍ती आणि कलेचा संकोच होतो आहे, असा टाहोही त्यांनी फोडला; पण त्याकडे कोणी लक्ष दिले नाही. एरवी राज्यकर्त्यांना अवैध, अनैतिक कामे करण्यास परवानगी लागतेच असे नाही; पण पुतळ्यासाठी ग्रामपंचायतीने परवानगी दिलेली नाही आणि स्थानिकांच्या भावना महत्त्वाच्या असे समर्थन करण्यात येत आहे. ते दुर्देवी आहे.