मंगळवार, ११ ऑगस्ट, २००९

चांगदेवाची अवस्था

प्रती,
े,
खरंच चांगदेवाची काय अवस्था झाली असेल, हे मला आत्ता नक्‍की कळते. अर्थात मी चांगदेव नाही आणि तू ज्ञानेश्‍वर नाहीस तरीही मायना काय लिहावा हा प्रश्‍नच होता. परत पत्र लिहिताना एकेरी उल्लेख करावा की आदर व्यक्‍त करावा काहीच कळलं नाही. शेवटी शब्द तरी तुम्हाला कुठपर्यंत साथ देणार फक्‍त भावना महत्वाच्या. त्या व्यक्‍त झाल्या की शब्दांचं काम संपलं. म्हणजे त्यांचं काम हे फक्‍त वाहकांचं. तुमच्या अभियांत्रिकी भाषेत सांगायचं झालं, तर शब्द काही भावनांचे चांगले वाहक नाहीत. गरजेला उपयोगी पडतात एवढाच त्यांचा कार्यभार.
कुणाचे पत्र, का लिहिलं असेल, गरज होती का अशा प्रश्‍नांची एक रांग तुझ्या मनात असणार हे नक्‍की. पण या प्रश्‍नांच्या जाळ्यातून बाहेर आल्यावर तुलाही पटेल. तशी आपली ओळख "तोंडदेखली' असंही म्हणता येत नाही. तरी आपली ओळख आहे. बऱ्याचदा आपल्या भोवती असणारे सगळे आपल्याशी खूप चांगलं बोलत असतात, आपल्याबद्दल त्यांच्या मनात खूप चांगल्या भावना असतात तरीही काही गोष्टींसाठी मात्र त्यांच्याकडे वेळ असतोच असं नाही. जगाच्या दृष्टीने अगदी शुल्लक गोष्टी असतील पण त्या गोष्टी आपल्यासाठी खूप मोठ्या असतात. जगण्याचं बळ देवून जाणाऱ्या असतात. आमचे एक आकाशवाणीवरील सहकारी आहेत, श्रीनिवास जरंडीकर तू नाव ऐकून असशील त्यांना पदोन्नती मिळाली. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांना एखादं पुस्तक भेट देता येईल का हे बघण्यासाठी मी "ग्रंथ'मध्ये गेलो होतो. अनेक पुस्तके बघीतल्यानंतर एक पुस्तक हाती लागलं ते संदीप खरे यांच्या कवितांचे. हा कवितासंग्रह तुलाही आवडेल असा चटकन विचार माझ्या मनात आला. खरे तर तू लेक्‍चरर म्हणून रुजू झाल्यावरच तुला एखादे पुस्तक देवून तुझे अभिनंदन करावे अशी इच्छा होती पण एकतर आपली ओळख अगदीच त्रोटक आणि त्यात तू मुलगी. थोडं स्पष्ट लिहतोय पण त्याला इलाज नाही. यानं मुद्दाम पुस्तक भेट दिलं की काय ही भावना साहाजिक उमटली असती. त्यामुळे तो विचार मी बाजुला ठेवला. खरे तर कविता आवडणारी लोकं खूप आहेत पण कवितांवर प्रेम करणारी लोकं खूप कमी आहेत. आणि मग अशा विषयांवर चर्चा करणारी माणसं मिळत नाहीत. मग अतृप्ततेची भावना रेंगाळत राहते. काहीच सूचत नाही. बिघडलं काय असं कोणी विचारलं तर त्याचं उत्तर काही नाही असंच तर असतं पण बिघाड दुरुस्त कसा करायचा हेही सूचत नाही. अशावेळी तुझ्यासारखे मित्र असणं आवश्‍यक असतं.
तुझ्या नव्या भूमिकेसाठी अभिनंदन !

प्रवीण कुलकर्णी
कोल्हापूर
11 ऑगस्ट 2009

ता. क. तुला आवडलं नसेल तर तसा स्क्रॅपही तू ऑर्कूटवर टाकू शकतेस. थोडं वाईट वाटेल बाकी शुन्य!

प्रती, जरंडीकर सर यांना

प्रती,
जरंडीकर सर यांना,
मोबाईल फोनमुळे आजकाल पत्र लिहिण्याचा सराव उरलेला नाही. किंबहुना आमच्या पिढीने परीक्षेत जेवढी पत्रे लिहिली तेवढीच. बाकी कार्यालयीन रुक्ष पत्रे लिहीत असलो तरी त्याला "अर्ज' (मनातून कितीही राग असला तरी) हेच स्वरूप राहिले. सांगायचा मुद्दा असा, की बऱ्याच मोठ्या कालावधीत पत्र लिहिण्याचा योग तसा आलेला नाही. त्यामुळे पत्रात जर काही चुका असतील तर त्या समजून घ्याल, ही अपेक्षा.
परवाच्या दिवशी तुमच्याशी फोनवर बोलताना तुम्हाला पदोन्नती मिळाली हे समजले. फोनवरुन शुभेच्छाही दिल्या; पण या शुभेच्छात तो ओलावा नव्हता, की काय याची रुखरुख मलाच लागून राहिली. आजकाल शुभेच्छांचे मेसेज या मोबाईलवरुन त्या मोबाईलवर सगळीकडे बागडत असतात, ज्याने धक्‍का दिला त्याचा मेसेज, एवढंच. बाकी सगळा शब्दांचा बुडबुडा. त्यामुळे मेसेज पाठवावा की न पाठवावा या द्विधा मनःस्थितीत होतो. बऱ्याचदा फोनवरुन बोलताना आपल्या नेमक्‍या काय भावना आहेत हे समोरच्याला कळतेच असे नाही. त्यासाठी लागणारे शब्दांचे गुच्छ प्रत्येक वेळी आपल्याकडे असतातच असे नाही आणि मग एखाद्या सुंदर घटनेच्या आनंदाच्या कळ्या फुलतातच असे नाही. त्यामुळे हा पत्राचा अट्टहास.
तुम्हाला मिळालेल्या पदोन्नतीबद्दल अभिनंदन! अगदी खूप वर्षांचा नसला तरी गेल्या तीन वर्षांच्या आपल्या स्नेहात मला हे
माहीत आहे की, तुमचे (सरकारी कर्मचारी असला तरी) कामावर किती प्रेम आहे. आपण पुढच्या आठवड्यात सुटीवर जाणार असाल तर या आठवड्यात बारा बारा तास काम केल्याचे मी बघितले आहे. तुमची कामाबद्दलची निष्ठा आणि झोकून घेणे, त्यासाठी लागणारे कष्ट उपसणे बघितले की तुमच्यापेक्षा आम्ही किती लहान आहे हे लक्षात येते. त्यामुळेच या पदोन्नतीतील आणखी महत्त्व. बाकी तुमच्यापेक्षा वयाने (तांत्रिक अर्थाने), अनुभवाने आणि बुद्धीने सगळ्याच बाबतीत खूप लहान आहे. भावना पोहोचविणे एवढाच या पत्राचा उद्देश, बाकी काहीच नाही.
पुन्हा एकदा तुमचे अभिनंदन!
प्रवीण कुलकर्णी
कोल्हापूर
11 ऑगस्ट 2009

प्रती, जरंडीकर सर यांना

प्रती,
जरंडीकर सर यांना,
मोबाईल फोनमुळे आजकाल पत्र लिहिण्याचा सराव उरलेला नाही. किंबहुना आमच्या पिढीने परीक्षेत जेवढी पत्रे लिहिली तेवढीच. बाकी कार्यालयीन रुक्ष पत्रे लिहीत असलो तरी त्याला "अर्ज' (मनातून कितीही राग असला तरी) हेच स्वरूप राहिले. सांगायचा मुद्दा असा, की बऱ्याच मोठ्या कालावधीत पत्र लिहिण्याचा योग तसा आलेला नाही. त्यामुळे पत्रात जर काही चुका असतील तर त्या समजून घ्याल, ही अपेक्षा.
परवाच्या दिवशी तुमच्याशी फोनवर बोलताना तुम्हाला पदोन्नती मिळाली हे समजले. फोनवरुन शुभेच्छाही दिल्या; पण या शुभेच्छात तो ओलावा नव्हता, की काय याची रुखरुख मलाच लागून राहिली. आजकाल शुभेच्छांचे मेसेज या मोबाईलवरुन त्या मोबाईलवर सगळीकडे बागडत असतात, ज्याने धक्‍का दिला त्याचा मेसेज, एवढंच. बाकी सगळा शब्दांचा बुडबुडा. त्यामुळे मेसेज पाठवावा की न पाठवावा या द्विधा मनःस्थितीत होतो. बऱ्याचदा फोनवरुन बोलताना आपल्या नेमक्‍या काय भावना आहेत हे समोरच्याला कळतेच असे नाही. त्यासाठी लागणारे शब्दांचे गुच्छ प्रत्येक वेळी आपल्याकडे असतातच असे नाही आणि मग एखाद्या सुंदर घटनेच्या आनंदाच्या कळ्या फुलतातच असे नाही. त्यामुळे हा पत्राचा अट्टहास.
तुम्हाला मिळालेल्या पदोन्नतीबद्दल अभिनंदन! अगदी खूप वर्षांचा नसला तरी गेल्या तीन वर्षांच्या आपल्या स्नेहात मला हे
माहीत आहे की, तुमचे (सरकारी कर्मचारी असला तरी) कामावर किती प्रेम आहे. आपण पुढच्या आठवड्यात सुटीवर जाणार असाल तर या आठवड्यात बारा बारा तास काम केल्याचे मी बघितले आहे. तुमची कामाबद्दलची निष्ठा आणि झोकून घेणे, त्यासाठी लागणारे कष्ट उपसणे बघितले की तुमच्यापेक्षा आम्ही किती लहान आहे हे लक्षात येते. त्यामुळेच या पदोन्नतीतील आणखी महत्त्व. बाकी तुमच्यापेक्षा वयाने (तांत्रिक अर्थाने), अनुभवाने आणि बुद्धीने सगळ्याच बाबतीत खूप लहान आहे. भावना पोहोचविणे एवढाच या पत्राचा उद्देश, बाकी काहीच नाही.
पुन्हा एकदा तुमचे अभिनंदन!
प्रवीण कुलकर्णी
कोल्हापूर
11 ऑगस्ट 2009

मंगळवार, १४ एप्रिल, २००९

धर्म, पुतळा आणि गल्लत



त्यानं जगाला हसवलं. हसवताना जात-पात, धर्म कधी पाहिला नाही. परिस्थितीने अनेक वेळा त्याच्याविरोधात बंड पुकारलं; पण त्यानं त्या परिस्थितीला आपल्या कलेत डोकावू दिलं नाही... चार्ली चॅप्लिन हे त्या थोर कलाकराचं नाव. त्याच्या पुतळ्याच्या अनुषंगाने कर्नाटकात निर्माण झालेला वाद यातना देणारा आहे.

एकीकडे महाराष्ट्रात साहित्य संमेलन आणि आनंद यादव यांच्या पुस्तक आणि त्यांच्या संमेलनाध्यक्षपदाच्या अनुषंगाने घडलेल्या गोष्टींबाबत जोरदार चर्चा होत असतानाच तिकडे कर्नाटकातही अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याचा गळा घोटण्यात आला. धर्म आणि कला यांची अनावश्‍यक गल्लत झाल्यावर काय स्थिती निर्माण होऊ शकते, याचे एक उदाहरण सध्या कर्नाटकात पाहायला मिळते. तिथल्या राज्यकर्त्यांनी धर्मालाच कलेच्या खांद्यावर बसवून टाकले आहे. धर्माचा बोजा सहन न होऊन लडखडणाऱ्या कलेकडे राज्यकर्ते त्रयस्थासारखे बघत आहेत. त्यामुळेच ज्याचा धर्म केवळ लोकांना हसविणे हा होता त्या चार्ली चॅप्लीनच्या पुतळ्याला तो केवळ ख्रिश्‍चन आहे म्हणून विरोध होत आहे. केवढा हा दैवदुर्विलास!
चार्ली चॅप्लीन यांचा 67 फूट उंचीचा पुतळा पश्‍चिम किनारपट्टीवरील पदूवारी या गावात उभारण्यात येणार होता. कर्नाटकातील प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक हेमंत हेगडे त्यांच्या आगामी चित्रपटासाठी हा पुतळा उभारणार होते; पण स्थानिकांनी या पुतळ्यास विरोध केला. त्यासाठी प्रमुख कारण होते ते चार्ली चॅप्लीन यांच्या धर्माचे. ज्या जागेवर हा पुतळा उभारण्यात येणार होता, तेथे समोरच एक मंदिर आहे. हिंदूंच्या मंदिराच्या दारात एका ख्रिश्‍चन माणसाचा पुतळा उभा करू देणार नाही असे स्थानिकांचे म्हणणे आहे. मुखवटा स्थानिकांचा असला, तरी हिंदुत्ववादी संघटनांची भूमिकाच स्थानिकांच्या मुखातून बाहेर पडत आहे हे उघड आहे. विशेष म्हणजे हा पुतळा कायमस्वरूपीही नव्हता. केवळ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होईपर्यंतच पुतळा त्या ठिकाणी उभारला जाणार होता. त्यानंतर तो तेथून हलविलाही जाणार होता; पण तरीही स्थानिकांनी त्याला जोरदार विरोध केला.
विशेष म्हणजे प्रशासनाची भूमिका या प्रकरणात बोटचेपी आहे. कलेचे स्वातंत्र्यच धोक्‍यात येत असताना प्रशासन विरोधकांची बाजू घेत आहे. कला आणि धार्मिकता या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कलेला धर्म असत नाही. धर्माच्या पलीकडे कला असते, म्हणूनच कलाकार धर्मातीत असतात. त्यामुळेच त्यांच्या अभिव्यक्‍तीला पाठिंब्याची आवश्‍यकता असते. समाजाने आणि राज्यकर्त्यांनी कलाकारांना प्रोत्साहन द्यावे असे अभिप्रेत असते. इथे कलाकारांना प्रोत्साबन लांबच उलट त्यांना दबावाखाली काम करावे लागत आहे. "विशिष्ट' समुदायाला न आवडणारे भाष्य केले, तर त्यांच्यावर हल्ला होण्याची भीतीही आहे. याची उदाहरणे रोजच समोर येऊ लागली आहेत. स्वयंघोषित धर्म आणि संस्कृतीरक्षकांनी कर्नाटकातच पबमधील महिलांना मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच ही दुसरी घटना घडली आहे. कर्नाटकात अल्पसंख्याकांवर हल्ला, प्रार्थनास्थळांवर हल्ला असे प्रकार तर आता नित्याचेच होऊ लागले आहेत. एका विशिष्ट पक्षाची सत्ता असली, की आपला धार्मिकतेचा अजेंडा पुढे ढकलता येतो हे तथाकथित संस्कृतीरक्षकांना पाठ झाले आहे. त्याचाच फायदा घेत त्यांनी चॅप्लीनच्या पुतळ्यास विरोध केला आहे. पुतळ्याला विरोध करण्यामागे काही तात्विक दृष्टिकोन असता तर तो समजून घेता आला असता; पण केवळ चॅप्लीन ख्रिश्‍चन आहे आणि हिंदू मंदिरासमोर एका ख्रिश्‍चन माणसाचा पुतळा उभा राहणे म्हणजे धर्म बुडणे असा अपप्रचार करण्यात आला. विशेष म्हणजे हा पुतळा कोणा ख्रिश्‍चन मिशनऱ्यांना उभा करायचा नव्हता, तर तो एका हिंदू दिग्दर्शकाला आपल्या चित्रपटासाठी उभा करायचा होता; पण याला अविचाराने विरोध करण्यात आला.
पुतळ्याला झालेला विरोध पाहून कर्नाटकातील नाट्य आणि चित्रपट क्षेत्रांतील अनेकांना धक्‍काच बसला. अभिव्यक्‍ती आणि कलेचा संकोच होतो आहे, असा टाहोही त्यांनी फोडला; पण त्याकडे कोणी लक्ष दिले नाही. एरवी राज्यकर्त्यांना अवैध, अनैतिक कामे करण्यास परवानगी लागतेच असे नाही; पण पुतळ्यासाठी ग्रामपंचायतीने परवानगी दिलेली नाही आणि स्थानिकांच्या भावना महत्त्वाच्या असे समर्थन करण्यात येत आहे. ते दुर्देवी आहे.