शुक्रवार, १० ऑगस्ट, २०१२

प्रिय



खूप दिवसांनी पत्र लिहितोय. त्याबद्दल माफ कर. तुझ्याकडे माफी मागायची हाही एक बहाणा असतो, तुझ्याजवळ जाण्याचा, हे बहुतेक तुलाही माहीत आहे. काही नात्यांचं असंच असतं. जे दिसतं तसं असत नाही. महाभारत हा जसा तुझ्या आवडीचा विषय तसा माझ्याही. महाभारताचे वैशिष्ट्यच हे की ते प्रत्येकाला आपपल्या नजरेतून वेगळे भासते. कृष्ण-राधा ही जोडी महाभारतात नाही, ती नंतरच्या काळात कीर्तनकारांनी टाकली, दुर्गा भागवतांनी याबाबत खूप संशोधन केले आहे. खरे तर राधा आणि द्रौपदी ही पात्रे कीर्तनकारांनी वेगळी केली. राधाही विवाहित आणि द्रौपदीही विवाहित. पण दोघींचे कृष्णावर प्रेम. राधा-कृष्ण मांडताना कीर्तनकारांनी त्या प्रेमाला भक्‍तीचे रुप दिले आणि द्रौपदी-कृष्ण प्रेमाला बहीण-भावाचा मुलामा; पण मला नेहमी वाटते, राधा ही काही गोकुळातली गवळण नव्हती. शिवाजी सावंतांनी युगंधर लिहिताना राधेचा शोध घ्यायचा प्रयत्न केला; पण त्यांनाही तो लागला नाही. मग त्यांनी शब्दांचा किस काढत राधा म्हणजे मोक्ष वगैरे असा काहीसा अर्थ लावला. पण राधेला महाभारतात शोधण्याचा त्यांनी आणखी थोडा प्रयत्न केला असता तर राधा महाभारतात क्षणा-क्षणाला भेटली असती. राधा आणि द्रौपदी या तर एकाच नाण्याच्या दोन बाजू. द्रौपदीत राधेला बघायचे थोडेसे धाडस केले तर तिच्यात राधा दिसतेच. अगदी स्वच्छ निर्मळपणे ती दिसते. विशेष म्हणजे प्रियतमेसाठी सर्वस्व देणारा कृष्ण द्रौपदीसाठीच भारतीय युद्ध घडवून आणतो हेही आरशासारखे स्पष्ट आहे. पाच पती असूनही द्रौपदीला कृष्ण का आवडावा? हा प्रश्‍न उपस्थित होईलही, पण नवऱ्यांची संख्या किती यावर का प्रेम असते. पाचही पतींमध्ये पराक्रम आणि शौर्य होते, पण प्रेम केवळ शौर्य आणि पराक्रमावर केले जात नाही, ती अंतरिक गोष्ट आहे. दुर्गाबाई याबाबत खूप सविस्तर सांगायच्या, पण त्यांनीही राधेला आणि द्रौपदीला एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे मांडलेले नाही. कृष्ण आणि द्रौपदी यांच्यातील नाते हे भावा-बहिणीचे रंगविले ते खरे कीर्तनकारांनी आणि त्यानंतर भावगीत रचणाऱ्या कवींनी. द्रौपदी खरे तर कृष्णाची सखी. गंमत बघ हं, कृष्णाच्या रुक्‍मिणी-सत्यभामेसह सोळा सहस्र स्त्रिया असल्या तरी त्याला त्याची सखी भेटली ती द्रौपदीत आणि पाच नवरे असूनही कृष्णेला अर्थात द्रौपदीला कृष्णातच सखा दिसला. खरे तर हा प्रेमाचा रंग नाटककारांनी आणि कवींनी फुलवायला हवा होता. अगदी प्लेटो सांगतो तसे हे प्रेम अशारीरिक आणि उच्च पातळीवर होते. द्रौपदीच्या लज्जा रक्षणापासून ते तिच्यातील सूडाला मूर्त रूप देण्यापर्यंतच्या प्रवासात पांडवांहून जास्त पुढाकार कृष्णाने घेतला आहे. त्यासाठी त्याने वाट्‌टेल ते केले आहे. यांत तिच्यासाठी सर्वस्व द्यायचा हेतू होता. कृष्णाला भारतीय युद्ध थांबवायचे असते तर ते केव्हाच थांबले असते. पण ते त्याला थांबवायचे नव्हते. द्रौपदीचा झालेला अपमान जितका पांडवांना जिव्हारी लागला होता, त्यापेक्षा जास्त कृष्णाला लागला होता. म्हणूनच तर त्याने अर्जुनाला "युगंधर' तत्त्वज्ञान सांगून लढायला भाग पाडले. एखाद्या शूर सेनानीने युद्ध लढण्यापूर्वी आपल्या शस्त्रांना धार द्यावी, दारूगोळ्यांचा साठा करावा, व्यूहरचना करावी, अगदी त्याचप्रमाने द्यूत सभेनंतर कृष्णाने केले. पांडवांपेक्षा कृष्णालाच हे युद्ध हवे होते हे उघड आहे. हे युद्ध जिंकल्यानंतर कृष्ण काही चक्रवर्ती सम्राट वगैरे होणार नव्हता, किंवा तोही चक्रवर्ती सम्राट युधिष्ठिरच्या साम्राज्यातील एक मांडलिक राजा होणार होता. तरीही त्याने पांडवांना मदत केली. याचे कारण धर्माची पुनर्स्थापना हे नव्हतेच. कारण कौरवांचा पक्ष अधर्माचा आणि पांडवांचा पक्ष धर्माचा हे कशावरून ठरणार? युद्धभूमीवरचा धर्म काय हे कृष्णाने सांगितले, याचा अर्थ असा नव्हे, की कौरवांचे राज्यच मूळी अधर्माचे होते. त्याचे संदर्भ वेगळे वेगळे करायला हवेत. सांगायचा मुद्दा हाच, की कृष्णाने केवळ आणि केवळ द्रौपदीसाठी हा महाभयंकर संग्राम घडवून आणला. पण हे अमूर्त आणि संयमी प्रेम उघड झाले नाही हे खरेच. आपल्याकडे सामाजिकदृष्टया स्त्री-पुरुषांना कुठल्यातरी नात्यात अडकविणे भाग पडते. तसे न झाल्यास अनैतिकतेच्या गाळात त्यांना अडकावे लागते. द्रौपदी विवाहित आणि कृष्णही विवाहित त्यात कृष्णाला दैवपद बहाल केलेले. त्यामुळे द्रौपदी आणि कृष्ण यांच्यात प्रेम होते आणि राधा दुसरी तिसरी कोणी नसून ती द्रौपदीच होती, असे जर कोणी सांगितले तर त्याला एक तर मुर्खात काढण्याचा संभव होता किंवा त्याच्यावर बहिष्कार टाकण्याचा. त्यामुळे राधेला कृष्णेतून वेगळे करण्यात आले आणि द्रौपदीला बहीण करण्यात आले. पण द्रौपदी आणि कृष्णाचे खरे प्रेम होते. अपुरेपण दोघांतही होते, माणसांच्या गर्दीत आपण एकटे असतो ना तसेच त्या दोघांचे होते.
पण त्यातही गंमत आहे. या दोघांचे प्रेम उच्च असले तरी खरे उच्चतम प्रेम महाभारतात सापडते ते भीमाचे. युधिष्ठिर एकपत्नीव्रत राहिला पण त्यात त्याच्या प्रेमापेक्षा तत्त्वाचा भाग जास्त होता, भीमाचे हिडिंबाशी लग्न झाले होते, ते खरे द्रौपदी त्याच्या आयुष्यात येण्यापूर्वी. हे खरे तर एकतर्फी प्रेम होते. द्रौपदी मनाने कृष्णाची होती. खरे तर ती राधेसारखी कृष्णाबरोबर होती आणि भीम राधेप्रमाणे द्रौपदीवर प्रेम करायचा. द्यूत सभेत कृष्णेची विटंबना होताना तिला आठवला तो कृष्ण, पण पांडवात ज्याची सर्वात जास्त तडफड झाली तो भीम.
तुझाच..

सोमवार, ६ ऑगस्ट, २०१२

फेडरर तू हरायला नको होतस....

मला टेनिसमधला "टे' कळत नाही,
रॅकेट कशाची असते काही माहीत नाही,
बॅक हॅण्ड, फोर हॅण्ड मला समजत नाहीत
पण तरीही फेडरर तू हरायला नको होतस....

सर्व्हीस म्हणजे काय याचा मला पत्ता नाही
गुणांचा तक्‍ता कसा केला जातो, कळत नाही
ब्रेक पॉंईट म्हणजे कशाला ब्रेक ते समजत नाही
पण तरीही फेडरर तू हरायला नको होतस....

स्ट्रेट ड्राईव्ह आणि कव्हर ड्राईव्ह
टेनीसमध्येही असतं का माहीत नाही..
चेंडू प्रेक्षकांत भिरकावल्यावर टाळ्या
मिळतात का हेही माहीत नाही
पण तरीही फेडरर तू हरायला नको होतंस...


टेनिसमधला तू बादशाह वैगेरे असशील
अनेक लढाया तू जिंकल्या असशीलही
पण तरीही तू उपयोगाचा नाहीस.....
तू खरंच हरायला नको होतंस...

मला गोल्डन चेरी माहीत नाही..
पण मला माहीत आहे डोळ्यांतील अश्रुंची किंमत
लाखो डोळ्यांतून तुझ्यासाठी गालावर आलेल्या
आणि त्यापेक्षा जास्त "त्या' दोन डोळ्यांतील अश्रू,
तुझ्या हरण्यामुळे तसेच डोळ्यात थबकून राहिलेले
त्या दोन डोळ्यांसाठी किमान तू हरायला नको होतसं...

फेडरर खरेच तू जिंकायला हवं होतंस, त्या दोन डोळ्यांसाठी तरी.......

(लंडन ऑलिंपिकमध्ये ब्रिटनच्या अँडी मरेने रॉजर फेडररला हरवून गोल्ड जिंकल्यानंतर) 

बुधवार, ४ जुलै, २०१२

प्रिय,

प्रिय,
पहाटेचे तीन वाजलेत. गेल्या चार दिवसांप्रमाणे आजही झोप आलेली नाही. येण्याची शक्‍यताही नाही. खिडकीतून चंद्राचा मंद प्रकाश आत येतोय. नुकत्याच चालायला लागलेल्या बाळाच्या पायातील पैंजणाप्रमाणे पावसाच्या थेंबांचा नाद होत आहे. मघाशी ऑफीसमधून येताना त्याचा नाद कानात साठवतच आलो. पावसाची रिपरिप सुरू होती. पाऊस थांबायची खूप वेळ वाट बघितली आणि मग रेनकोट अंगावर चढविला. गाडीला किक मारता मारता सहज नजर आकाशाकडे गेली. आषाढी पौर्णिमेचा चंद्र ढगांच्या दाटीतून चांदण बरसत होता. शब्दशः चांदणं बरसत होतं. चंद्राचा मंद प्रकाश आणि पावसाच्या धारा अंगावर झेलण्यासाठी रेनकोट काढला आणि पाऊस आणि चांदण दोन्ही अंगावर झेललं. रिकाम्या, एकट्या रस्त्याला सोबत करत रस्त्याच्या मध्येच गाडी लावून चिंब भिजत राहिलो. पावसाच्या धारांसोबत तुला आठवत राहिलो. तू उच्चारलेला प्रत्येक शब्द, तू घेतलेला एक अन्‌ एक हुंकार, तुझं हसणं. सगळं आठवत राहीलं. पावसाचा सांगाती बनून जणू आठवणींच्या धारा बरसत राहिल्या आणि त्यात मी चिंब होत राहिलो. पावसासारखा आठवणींचा दुसरा कोणी सांगाती नाही. आवणींबरोबर येणाऱ्या आसवांना तो हलकेच आपलेसे करतो. तू कोण? कोणासाठी? असले प्रश्‍न विचारत बसत नाही आणि त्याचे डागही मागे ठेवत नाही. त्यामुळे त्याच्यासोबतीने खूप रडून घेतले. मोकळे होण्याचे मी नवनवे मार्ग शोधतो आणि प्रत्येक वाटेत तूच भेटत राहतेस. तू एकदा म्हणाली होतीस, माझं सगळं विश्‍व तू व्यापून टाकले आहेस. तू तर माझं विश्‍वच आहे. त्यातून कसं बाहेर पडणार. पण पडायचे आहे कोणाला ?
तुला लहानपणीची एक गोष्ट सांगतो. तेव्हा दुसरीत होतो मी. नागपंचमीची सुटी होती. गावाकडे त्यावेळी आमच्या वर्गातील बरीच मुलं गुरांना चारायला घेऊन जात. मग मीही त्यादिवशी त्यांच्यासोबत गेलो. दिवसभर त्या माळरानात आम्ही चिखलाचे नाग करत राहिलो. संध्याकाळ झाली तरी आम्ही तिथून हालायला तयार नाही म्हटल्यावर आमच्यासोबत असलेल्या एका मोठ्या माणासाने उगाचच आम्हाला दटावले. नागपंचमीला नाग करायचे नसतात. त्यात तुम्ही मातीचा नाग करुन तो मोडलात. आता नाग रात्री येऊन तुम्हाला चावणार. आप्पांना विचारलं, त्यांना वाटलं मला देवघरात ठेवलेला नाग हवाय, त्यामुळे त्यांनीही सांगितलं, नाग मोडला की नाग रात्री येतोच. मला काही सुचेना. भीती प्रचंड वाटत होती. त्या रात्री नाग बऱ्याचदा स्वप्नात आला. दरदरून घाम फुटला आणि कडाडून ताप आला. दुसरा आख्खा दिवस आप्पा समजावत राहिले, नाग-बिग काही येत नाही. पण भीती काही पुरती गेली नाही. पुढे-पुढे तो नाग माझ्या गळ्याभोवती वेटोळा घालून बसलाय असं वाटायचं. पण गेल्या काही दिवसांपासून तो कुठे बिळात लपून बसला होता, देव जाणे. तू गेलीस आणि पुन्हा तो नाग वळवळायला लागला. जणू कात टाकून ताज्या दमाने तो येतो आहे असं वाटू लागलं, आणि तेवढ्यात तुझ्या आठवणींचे हजारो गरुड आकाशात घिरट्या घालू लागले. आता काही तो परत येईल असे वाटत नाही.


तुझाच

शनिवार, २३ जून, २०१२

प्रिय,


प्रिय,
तुला माहीत आहेच, मी जिथे राहतो तिथे झाडांची दाटी आहे. तिथे एक आंब्याचे डेरेदार झाड आहे. गच्च काळपट हिरव्या पानांनी बहरलेल्या त्या झाडाच्या एका फांदीवर एक कोकीळ नेहमी बसलेला असतो. गेल्या अडीच वर्षांपासून मी त्याला बघतोय. तो त्याच फांदीवर असतो. अगदी एकटा. दिवसाच्या कुठल्याही वेळेत मी त्या फांदीकडे बघतो, त्यावेळी तो तिथेच असल्याचे मला दिसले आहे. अगदी पहाटेच्या चंद्रप्रकाशातही त्याची ती लांब काळी शेपूट फांदीतून खाली दिसतच असते. अर्थात त्याला मी तिथे पहाटेच जास्त वेळा बघितले आहे. पण भर दुपारीही तो तिथून आर्त गात असायचा. अगदी गेल्या गुरुवारपर्यंत त्याचे ते आर्त गाणे सुरू होते. हिवाळा असो वा उन्हाळा अथवा पावसाळा, अशा कुठल्याच ऋतूचा आणि त्याच्या गायनाचा काहीच संबंध नसायचा. कोकीळ सहसा वसंतातच गातात हा झाला विज्ञानाचा नियम, पण हा पठ्ठ्या कधीही गायचा. कुठल्याही ऋतूत, कुठल्याही वेळी.
पण त्यातही भर दुपारी त्याची गायनसमाधी लागायची. त्याची ती आर्तता बघून मला मंदिरात व्याकूळ होऊन एकतारी घेऊन भजन गाणाऱ्या भक्‍ताची आठवण येते. देवाची आळवणी करताना स्वतःला विसरून गाणारा भक्‍त आणि तो कोकीळ यांच्यात मला बरेच साम्य वाटते. भजनकऱ्याला जसे स्वतःचीही जाणीव नसते. अगदी तसेच त्या कोकीळला कुठल्याही ऋतूची जाणीवच नसते. जणू एक ऋतू त्याच्याभोवती वेढा टाकून बसला आहे आणि तो त्यात गुरफटून राहिला आहे. त्यामुळेच अगदी भर पावसातही तो "कुहू'चा टाहो फोडत असतो. त्याला मी असे पावसातही गाताना बऱ्याचवेळा ऐकले आहे. जणू आपल्या प्रियतमेची आठवण त्याला जगू देत नाही आणि मरूही देत नाही. तिला आळवताना त्याचा सूर आर्त व्हायचा. त्याची ती आर्तता ऐकून स्वर्गात जर देव असतील तर तेही नक्‍कीच व्याकूळ झाले असतील यात शंका नाही. अगदी निसर्गाच्या उलटच आहे. पण जे आहे ते हे आहे. पण का कोणास ठाऊक पण तो कोकीळ गेल्या गुरुवारपासून गायचाच बंद झाला. तो तिथेच असतो. त्याची ती काळी शेपटी त्या फांदीतून तिथेच दिसते, पण तो गात नाही. अगदी समाधी लावल्यासारखा असतो. मला वाटलं त्याला जोड मिळाला असेल. पण त्या फांद्याआडून दुसरी शेपटी दिसली नाही कधी. तरीही तो गात नाही, सूर आळवत नाही. त्याची आर्तता संपली की काय असा प्रश्‍न मला पडला होता. समाधीस्त ऋषीच्या दर्शनानेही समाधान मिळते ना अगदी तसेच समाधान त्याच्याकडे बघितले की मिळते. काल पहिल्यांदा मी त्याला त्याच्या नेहमीच्या फांदीपेक्षा दुसऱ्या फांदीवर बसलेलं बघितलं. त्याच्या पंखांची थोडी फडफडही ऐकू आली. अगदी कीर्तनात दंग झालेल्या महाराजांसारखाच तो. देवाने दृष्टांत द्यावा आणि कीर्तनकाराच्या चेहऱ्यावर ओसंडून आनंद वाहावा असाच तो भासला. बहुतेक त्यालाही त्याच्या प्रियतमेने दृष्टांत दिला असेल. त्या क्षणभर दर्शनानेही तो मोहरून गेला असेल. कोकीळच तो... आता तो येत्या वसंतात गायीलही, पण ते सूर आनंदाचे असतील आणि समाधानाचेही.....त्याला ते सूर नक्‍की सापडतील... तुला काय वाटतं....
तुझाच...

शुक्रवार, ८ जून, २०१२

काजळी



काजळी

त्याने समईची वात हलकेच बाहेर काढली, काडेपेटीतील काडी पेटविली आणि हलकेच समईवर धरणार इतक्‍यात वीज चमकून गेली आणि त्यापाठोपाठ आलेल्या ढगांच्या गडगटाने खिडक्‍यांची तावदाने वाजली. तावदानांची बंधने झुगारुन आत आलेल्या वाऱ्याने हातातल्या काडीला अगोदर गच्च मिठी मारली तशी ती लाजून विझून गेली.
समई लावायची तर खिडक्‍या बंद केल्या पाहिजेत म्हणून तो उठला. त्याने खिडक्‍यांची दारे लावून घेतली. त्यावरचे पडदे लावून घेतले. बाहेर पाऊस कोसळायला लागला होता. धबाबा... हा कोसळणारा पाऊस मृगाचा नव्हता. वळीवाचा, आवेगाने आलेला... वाजत गाजत... वळीवाच्या पावसाला जितकी आतुरता असते तितकी मृगाच्या पावसाला नसते, असं त्याला पुर्वी वाटायचं. जणू तो प्रियकरासारखाच असतो, अगदी उत्कट... असं त्याचं ठाम मत होतं. आता छतावर टपोरे थेंब वाजू लागले होते. पावसाच्या आवेशात आता त्याचं अवघं घर आलं होतं. त्याला ते कोरडं हवं होतं... या मुरदाड पावसाने आपल्याला न सांगता आपल्या घराचा असा ताबा घेतल्याचा त्याला राग येऊ लागला होता.
कधी काळी त्याला वळीवाचा पाऊस प्रचंड आवडायचा. कधीही मग रात्री-अपरात्रीही पाऊस पडायला लागला की तो बाईक काढायचा आणि पावसात मनसोक्‍त भिजून घरी परतायचा. पाऊस मनात साठवून घ्यायचा. त्याच्याइतकी वळीवाच्या पावसाची कोणीच वाट बघितली नसेल... पहिला पाऊस अंगावर झेलण्यासाठी तो कुठलीही किंमत द्यायचा. एकदा ऑफीसची कसली तरी महत्त्वाची मिटींग सुरू होती. बाहेर ढगांनी गच्च दाटी केली होती. तो त्या मिटिंगरुममध्ये अस्वस्थपणे बसून राहिला होता. आता कुठल्याही क्षणी पाऊस पडायला सुरवात होईल, आणि इथली मिटींग तशीच सुरू राहिली तर.. या विचाराने तो अस्वस्थ होत होता.. बाहेर हलके हलके थेंब पडायला सुरवात झाले आणि त्याने मिटींगमध्ये स्पष्ट सांगितले, "" मला पावसात भिजायचे आहे. हा या वर्षीचा पहिला पाऊस आहे. आता पुन्हा पहिल्या पावसात भिजायला पुढच्या वर्षीशिवाय पर्याय नाही.'' गंमत म्हणजे त्या मिटींगला आलेल्या अनेकांनाही त्याचा हा पाऊसवेडेपणा आवडला आणि मिटींग भर पावसातच झाली. त्या मिटींगनंतर त्याला प्रमोशन मिळत गेली आणि मग त्याच्या आणि भिजण्याच्या आड कधी नोकरी आली नाही. पहिल्या पावसात मग तो भिजत राहायचा. कपड्यांसकट. ते कपडे मग अंगावरच वाळवायचा... पावसाच्या थेंबामुळे पडलेले डाग मग मिरवत राहायचा.. त्या डागांतून अत्तराचा वास येतो असं काही-बाही सांगत राहायचा. मग कधी-कधी उन्हाळा कडक वाटू लागला की तोच शर्ट घालून तो त्या पावसाच्या आठवणींत रमून जायचा. लोक त्याच्या माघारी मूर्ख, भावूक, मोठे पद मिळाले म्हणून असली थेरे सुचतात, असं म्हणायचे पण त्याकडे तो लक्ष द्यायचा नाही. त्या भिजून वाळलेल्या शर्टाचा त्याला अभिमान वाटायचा. दरवर्षीचे असे पहिल्या पावसात भिजलेले शर्ट त्याच्या कपाटात नांदत राहायचे. अलीकडे मात्र तो या पहिल्या पावसालाच घाबरायचा. काय कोण जाणे पण त्याला हा वळीवाचा पाऊस आवडायचा नाही.

ती शेवटची भेटली त्यालाही आता दहा वर्षे झाली. तिने नकार तर त्याअगोदर दहा वर्षांपुर्वी दिला होता. पण तरीही त्या दिवशी ती एवढंच म्हणाली होती...
तुला पहिला पाऊस आवडतो ना? त्याचा आवेग, त्याची आतुरता.. त्याचं निरपेक्ष अस्तीत्व.. त्याला ना धरतीवर काही पिकवायचे नसते ना नदी नाल्यांच्या प्रवाहात स्वतःला अडकवून घ्यायचे असते. त्याला फक्‍त समाधान द्यायचे असते, असं तू मानायचास ना?...
हो! एवढंच तो म्हणाला..
खरे तर तिला पाऊस नावडायचा नाही पण पावसावर तिने बोलावे इतका काही पाऊस तिला आवडत नव्हता खचितच.
पण तरीही त्याने आडवले नाही. तिला बोलू दिले.
...तूही वळीवाच्या पावसासारखाच रे. जगण्याची मजा एकाच गोष्टीतून अनुभवणारा. माझ्यावर वळीवाच्या उत्कटतेने प्रेम करणारा आणि नकारानंतर पुन्हा न परतणारा.. मला तू आषाढातल्या पावसासारखा हवा होतास. अनुराग करणारा... हक्‍काने पडणारा... आपल्या अस्तीत्वाने सगळं रान हिरवंगार करणारा... नद्या-नाल्यांतून ओसंडून वाहणारा... पण ती मजा तुला नाही कळली किंवा तू समजावून नाही घेतलीस... तु तुझ्याच मापाने सगळं मोजलंस... ती एवढंच म्हणाली आणि निघून गेली. कितीतरी दिवस त्याला तिच्या त्या शब्दांचे अर्थच समजले नाहीत. काही तरी बडबडायचे म्हणून ती बडबडली असेच वाटून तो आपल्या कामाला लागला... पण तिचे शब्द त्याच्या मेंदूत घर करुन राहिले होते.
चार वर्षांपुर्वी असाच तो खिडकीतून बाहेर बघत होता... बाहेर आषाढातला पाऊस कोसळत होता.. अखंडपणे... पण त्यात जोर-जबरदस्ती नव्हती... गवताच्या कोवळ्या पानालाही स्पर्श करताना त्याला काही यातना तर होत नाहीत याचीच जणू काळजी घेत असल्यासारखा. त्या दिवशी त्याला कळले.. ती काय म्हणाली ते... पण वेळ निघून गेली होती..
त्याने बाहेर बघितले... वळीवाचा पाऊस नेहमीप्रमाणे कोसळला आणि आता ओसरुनही गेला होता... त्याने पुन्हा काडेपेटीतील काडी पेटविली. समईच्या वातीने काजळी धरली होती. ही काजळी त्याला आज तरी काढता येणार नव्हती... समई आज पेटणार नव्हतीच..!


*** "सकाळ'च्या स्मार्टसोबतीमध्ये 7 जूनला प्रसिद्ध झालेली माझी लघुकथा 

शनिवार, २८ एप्रिल, २०१२

सुटी

किक्रेट खेळणाऱ्या त्या मुलांकडे तो एकटक बघत होता. कोणी चेंडू टाकत होता, कोणी बॅटने तो फटकावत होता. ती दहा बारा पोरं आपल्या खेळात रंगून गेली होती. ते. हातातील बोचकं सावरत ते सात-आठ वर्षांचं पोरगं त्या खेळणाऱ्या पोरांकडे बघत होतं. त्यांच्यात दंगा चालू होता. भांडणं होत होती.. जिंकणं-हरणं चालू होत. एकमेकांच्या उरावर बसणं चालू होतं. ते पोरगं आपल्या बोचक्‍याला सावरत शेजारच्याच गडग्यावर बसलं. हलकेच त्याने बोचकं बाजुला ठेवलं. ते ठेवताना त्यातली एक फाटकी-तुटकी बाहुली खाली पडली. मघाशी कचराकुंडी चाचपताना सापडलेली ती कापडी बाहुली त्याने हलकेच त्या बोचक्‍यात कोंबली होती.
गोट्या...
आईच्या चौथ्या हाकेनंतर त्या क्रिकेट खेळणाऱ्यापैकी बॅट घेतलेला मुलगा थोडा चलबिचल झाला. त्याने तरीही डाव तसाच चालू ठेवला. बोचकं सांभळणाऱ्या त्या पोरानं हाकेच्या दिशेकडे बघितलं. मग त्या पोरांकडे बघत राहिलं. त्या पोराची आई त्याला पुन्हा-पुन्हा हाक मारत होती. आणि ते मात्र आपल्या खेळांत गुंगून गेलं होतं. पोरांचा गोंधळ उडाला होता. चिडा-चिडी दंगामस्ती सुरु होती. कोणी त्यांना हाक मारते आहे याकडे त्यांचं लक्षच नव्हते. एवढ्यात त्या बॅट धरलेल्या पोरानं चेंडू टोलावला तो त्या बोचकं घेतलेल्या पोराच्या पायाशी आला. त्याला तो चेंडू आवडला. तो चेंडू उचलण्यासाठी ते खाली वाकलं पण इतक्‍यात दुसरं एक पोरगं तिथं आलं त्याने तो चेंडू उचलला आणि जोरात फेकला.
त्या पोरांत जावं, तो चेंडू हातात घ्यावा, बॅट घुमवावी.. असं त्या बोचकं घेतलेल्या पोराला वाटलं पण त्याने तो विचार सोडून दिला. त्या पोरांइतके चांगले कपडे त्याच्याकडं नव्हते, दिवसभर उन्हात काम केल्यानं अंग सगळं घामेजून गेलं होतं. त्यातच कचऱ्यात शोधा-शोध करुन त्याची सगळी घाण अंगाला लागली होती. अंग मळलं होतं, कपडे मळके होते. त्या पोरांच्या तुलनेत तो खूपच घाणेरडा दिसत होता. त्यालाच त्याची लाज वाटत होती. त्या टकटकीत मुलांत कसं जायचं? म्हणून मग ते गप्पच बसलं.
पुन्हा त्या मुलाच्या आईची हाक ऐकू आली.. तरी ते पोर खेळत राहिलं.. आईची हाक जवळ-जवळ येऊ लागली.. ती जशी जवळ येऊ लागली तशी पोरांची चलबिचल वाढली..
काकू आली रे, स्टंप, बॅट घेऊन पळा... एकाने जोरात आरोळी ठोकली, तशी सगळी पोरं पटपट गोळा झाली.. सगळ्या वस्तू पोरांनी गोळा केल्या आणि त्यांनी धुम ठोकली. बॅट घेतलेलं पोर मात्र शूर शिपायासारखं तिथेच टिकून राहिलं. त्या बोचकेवाल्या पोराला त्याचं आश्‍चर्य वाटलं..
आता त्याची आई त्याच्याजवळ आली होती. तिने त्याला हलकेच टपली मारली.
किती हाका मारायच्या रे, सुटी लागली म्हणून किती वेळ खेळायचे... त्याची आई त्याला दटावत होती.. ती माय-लेक बोलत बोलत त्याच्यासमोरुन गेली. समोरुन जाताना त्या पोराच्या आईने त्याच्याकडे बघितलं, मग त्याच्या बोचक्‍याकडे आणि म्हणाली, बघ तुझ्यापेक्षा किती लहान आहे, पण तरीही सुटीत बघ कसा आईला मदत करतो ते. आता तुही सुटीत काम कर. ती माय-लेक अंधारात निघून गेली.
त्या पोराने बोचकं उचललं. घर जवळ करायला हवं होतं. घर कसलं, कालच तर त्या माळावर त्याच्या आई-बाबांनी पालं टाकलं होतं. हे गाव अजून नवं होतं. कळायला लागल्यापासून किती गावं बदलली हेही आता आठवेनासं झालं आहे. अंधारातच तो आपल्या पालांकडं वळला. पोटात भूक होतीच पण त्यापेक्षा मनात खूप विचार होते. त्या पोरांनी टोलवलेले चेंडू त्याच्या डोक्‍यात टप्पे खात होते. ते त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. त्या पोराची आई आणि ते पोरंग यांचं बोलणं त्याच्या मनात कोरुन गेलं होतं. पालांत शिरल्या शिरल्या त्यानं बोचक्‍यातील बाहुली काढली आणि आपल्या लहान बहिणीच्या हातात दिली. आई चुलीला लाकूड लावत होती. त्यानं ते बोचकं बाहेर ठेवलं आणि ते आईकडे गेलं.. आईकडे सगळ्या प्रश्‍नांची उत्तरे असतात याची त्याला खात्री होती. त्यानं हलकेच आईच्या गळ्यात हात घातला, गालाला गाल लावला आणि विचारलं...
माये, सुटी म्हणजे काय गं?

प्रिय,

खूप दिवसांनी जुने कपाट आवरायला घेतले होते. वर्तमानपत्रातील काही कात्रणे, काही टिपण्या आणि पिवळे पडलेल्या पुष्कळश्‍या कागदांनी कपाट गच्च भरुन गेलं होतं. अर्धवट लिहिलेले.. रेघोट्या ओढलेले.. टाचण मारुन ठेवलेले....कोणी कथेच्या शेवटाच्या प्रतिक्षेत तर कोणी अगदीच एखादा शब्द लिहून ठेवून टाकल्यामुळे रुसलेले, तर काही पत्रे लिहून पूर्ण झालेली पण पत्त्याच्या शोधात... म्हटलं तर सगळा कचरा म्हटलं तर प्रत्येक कागद आणि कागद एक-एक जाणिव.. एक-एक भावना.. एकाच कपाटात कोंबून ठेवलेल्या.. काही दडवलेल्या... काही कागदांच्या ओझ्यामुळे दडपून गेलेल्या... मुक्‍या आणि बहिऱ्याही...खरे तर त्या मुक्‍या होत्या म्हणूनच तर त्या एकत्र राहात होत्या. एकमेकांच्या उरावर पडलेले काही पिवळे कागद मात्र आपल्याच भावविश्‍वात रमलेले होते. अंगाला माती लागल्यावर पैलवान कसे छाती काढून चालतात, तसेच अंगावरची धूळ अभिमानाने मिरवत होते. मी ती हलक्‍या हाताने झटकल्यावर उगाचच त्यांना राग आला की काय असे वाटून गेले. त्यातच एका कोपऱ्यात एक कागद सगळ्यांपेक्षा वेगळा होता. कोरा.. हा पण पिवळा पडला नव्हता. मी सहज तो उचलला... चटकन तो थरथरला असे वाटून गेलं. सगळ्या पिवळ्या कागदांत हा पांढरा शुभ्र कागद कुठून आला हे मलाही कळले नाही. कागद आणि पेन गोळा करण्याची मला तशी हौस आहेच, पण हा त्याखातर हा कागद नक्‍कीच आणला नव्हता. कारण तसे असते तर त्याच्यासारखे आणखी काही कागद तिथे असायला हवे होते. एकटाच.. त्याचा उजवा कोपरा थोडासा मुडपला होता.. तो मुडपलेला कोपरा मी हलकेच सरळ करण्याचा प्रयत्न केला. पण वळल्याची खूण घट्‌ट उमटली होती. त्यावर तारीख 20 फेब्रुवारी असं लिहिलं होतं. आणि मग काहीच लिहिणं झालं नव्हतं.
20 फेब्रुवारी...तुला पत्र लिहायला घेतलं होतं. त्यासाठीच हा खास कागद आणला होता. पत्र लिहायचे ही कल्पनाच खूप मजेशीर आणि धाडसाची वाटत होती. अगदी उत्साहाने पत्र लिहायचा घाट घातला होता. त्यासाठी हा खास कागद आणला होता. त्याचे पाकिटही तितकेच खास आणले होते.अगदी चित्रपटात दाखवतात ना तसेच गुलाबी रंगाचे.. इथेच कपाटात कुठेतरी नक्‍की असेल. ते पाकिट मिळविण्यासाठी किती दुकाने फिरलो होतो देव जाणे. सायकल मारुन मारुन पाय थकले होते. त्यावर गुलाबाचे एक फुल चितारले होते. मस्त टपोरे फूल होते ते. तो कागद हातात घेतला आणि विचारांच्या माळेत दोरा ओवला गेला बघ.
किती दिवस.. किती वर्षे सरली तरी त्या कागदाचा शुभ्रपणा तसाच होता. अगदी पांढऱ्या ढगांसारखा. तो काळवंडला नाही की पिवळा पडला नाही. काळाच्या खुणा त्याच्या अंगावर जराही दिसत नाहीत, तुझ्यावरच्या माझ्या प्रेमासारखं. काळाचा कधीच त्यावर परिणाम झाला नाही. अगदी व्हावा, अशी इच्छा बाळगुनही. खरेच हे पत्र पहिलं प्रेमपत्र होतं. अगदी कोरं. निखळ, निरपेक्ष आणि सर्वात महत्त्वाचं खूपच निरागस. खरं बोलणारं. आपल्या भावना न दडविणारे, त्याला कसलाच मुलामा न लावलेलं. तुझ्या डोळ्यांसारखं. तू कितीही प्रयत्न केलास तरी तुझे डोळे बोलतातच, मी तुला कधी सांगितलं नाही. पण तुझे डोळे खूप बोलतात खूप..खूप.. आनंद झाला की किलकीले हसतात. रागावले की कोरडे पडतातत.. वेदना पापण्यांच्याच्या आड लपवतात.. आज या कागदाने पुन्हा डोळ्यांची आठवण करुन दिली. पापण्या.. कोरिव भूवया.. भूवयांमध्ये लावलेली टिकली.. कधी साधी..कधी चंद्रकोरीसारखी.. किती आठवणी आल्या दाटून.. आज हे पत्र त्याच कागदावर लिहितोय. पण बघ ना. मघाशी प्रिय शब्द लिहिताना त्यातील य चा पाय थोडा लांबलाच. शाई थोडी जास्तच खाली ओघळली.. हा कागद तसाच कोरा ठेवायला हवा होता. जरा माझं जास्तीच झालं.
तुझाच 

शुक्रवार, २० एप्रिल, २०१२

प्रिय,


खूप दिवसांनी पत्र लिहितोय. कशी आहेस? आठवण येत नव्हती, असे नाही आणि पत्र लिहायला घेतले नाही, असेही नाही, पण लिहिता मात्र आलं नाही हे खरं. तुम्ही शब्दांना कितीही चांगले मित्र माना पण, ते ऐनवेळी तुम्हाला मदत करतीलच असे नाही. खाऊसाठी भर बाजारात हट्‌टाला पेटून मटकन बसणाऱ्या पोरट्यांसारखे कधी ते भोकाड पसरून वाटेतच बसतील याचा नेम नाही; मग कितीही मिनत्या करा, ते ऐकायचे नाहीत, मग त्यांना झटका द्यावाच लागतो. त्या पोराला जशी चापट द्यावी लागते, अगदी तशीच चापट शब्दांना वेळेची द्यावी लागते, मग शब्द वठणीवर येतात. सांगितलेल्या वाक्‍यांच्या मार्गावरुन मग सरळ चालतात. आता हेच बघ ना! मागचे पत्र लिहून आता जवळपास वीस-पंचवीस दिवस होऊन गेले. या दिवसांत कितीतरी वेळा पेनाचे टोक कागदावर टेकवले; पण शब्द काही उमटले नाहीत. सांगायचे उरले नाही, असेही नाही, पण ज्या गोष्टी सांगायच्या त्या गोष्टी शब्दांची वस्त्रे घालायलाच तयार नव्हत्या. मग कितीतरी वेळा कागदावर रेघोट्या ओढून रात्र काढली. आता आजही सांगायचे खूप आहे. खूप लिहायचे आहे, पण तरीही हट्‌टी शब्द अडून बसलेतच की, आता एवढे गोंजारल्यावर ते नक्‍कीच शांत होतील असं वाटतं...
"तुला बोलायचं असतं एक आणि तू बोलतोस तिसरंच' हा तुझा आरोप मान्यच आहे. आजही बघ मला लिहायचे आहे एक आणि लिहितोय दुसरंच.
तुझी खूप आठवण येत आहे. खूप वाटतं... अगदी आता तुला समोर बसवावं आणि तुझ्या डोळ्यात डोळे घालून रात्रभर त्यात डुंबत राहावं.. हलकेच तुझ्या केसांतून हात फिरवावा...कोणीच बोलू नये... ना तू, ना मी....निःशब्दांतून शब्द उमटत राहावे आणि ते फक्‍त तुला आणि मलाच कळावे..... तुला आठवतं मी तुला काळी म्हटलेलं... आम्ही काही काळे नाही, गहू वर्णीय असं तुझं म्हणणं. ठिकच होतं, पण तरीही तुला चिडवायला मी काळीच म्हटलं होतं.. खरं तर काळी का म्हटलं होतं माहिती आहे तुला... काळा रंग सगळं पोटात घेतो.. क्षमा करण्याचा गुण काळ्या रंगात जितका आहे तितका कुणाच्यातच नाही. आणि जो या रंगाशी सलगी करतो तो या रंगासारखाच होऊन जातो.. म्हणून तू काळीच. आपल्या रंगात रमणारी.. आपल्या रंगाशी एकरुप असलेली...तुझा काळा रंग गडदतेतून आलेला... सगळे गडद रंग एकत्र करुन ते तुझ्यात भरले आहेत आणि ते इतके एकजीव आहेत की त्यामुळे तू काळी भासते आहेस... हा काळा रंग डोळ्यांत साठवून घ्यायचा आहे... अगदी काजळ घातल्यासारखा... मग दुसऱ्या दिवशी ऑफीसात कितीही लोकं कुजबुजू देत की अरे हा काजळ घालून आला की काय? एक दिवस वेडा होण्यातही मजा असते नाही का? नाही तरी तू मला वेडा म्हणतेसच की, कधी कधी...
तुझाच 

रविवार, १५ एप्रिल, २०१२

एक सांज अनुभवायलाच हवी

जगण्याचे संदर्भ बदललेत... एक एक मिनिट महत्त्वाचा ठरू लागलाय... कामं तर पाचवीला पुजल्यासारखीच मागं लागली आहेत... हात रिकामे म्हणून रिकामा वेळ म्हणायचा, तर तोही रिकामा कुठे आहे? मेंदूत तणाव निर्माण करणाऱ्या पेशी कॅन्सरसारख्या वाढत असतातच की! त्या स्वस्थ कुठे बसू देतात... मग एक दिवस सरतो... आठवडे सरतात... महिने, वर्षेही कधी सरून गेली हेच कळत नाही... मागे वळून बघितले तर पाऊलखुणाही दिसत नाहीत... खरं आहे ना!
जरा बाहेर पडून बघा... चैत्र फुललाय... झाडांची हिरवी-पोपटी पालवी सूर्याच्या डोळ्यांत डोळे घालून पाहत आहे... कधी पावसाळ्यात पाऊस आला म्हणून ज्या झाडाखाली थांबलो होतो, त्या झाडांना आता तांबड्या-पिवळ्या फुलांचे गुच्छ लगडलेले आहेत... तापलेले रस्ते मुजोर वाटताहेत खरे, पण ती मुजोरी नाही... नाराजी आहे. संध्याकाळी भरून वाहणाऱ्या रस्त्यांवर दुपारी कोणीच नसते याची... आणि नेहमी पश्‍चिमेच्याच दिशेकडून येणारे ढग आता कुठल्याही दिशेने येत आहेत. आभाळ काळ्या-निळ्या ढगांनी गच्च होत आहे... दिवसभर तापलेल्या धरित्रीवर जणू छत घालावे म्हणून ढग दाटीवाटीने बसलेले असतात... मग हलकेच टप टप करत टपोरे थेंब पडताहेत... कधी कधी गाराही पडताहेत... पण हे अनुभवायला थोडं बाहेर पडायला हवं. एक संध्याकाळ एकटेच रस्त्यावर येऊन फिरायला हवं... किमान खिडक्‍यांची दारे पडद्यातून मुक्‍त करायला हवीत.
चैत्र-वैशाखातला पाऊस हा श्रावणातल्या पावसापेक्षा वेगळा... त्याचा आवेग वेगळा... त्याची गती वेगळी... तो येणार याची खात्री नसते आणि जाताना काय नेईल याचा नेम नसतो; म्हणूनच तर तो कधी काय होईल हे सांगता न येण्यासारख्या आयुष्यासारखा असतो.. "अनप्रेडिक्‍टेबल'. तो येतानाही आवाज करत येणार आणि गेल्यानंतरही आपल्या खुणा मागे ठेवणार... ढगांचा गडगडाट आणि विजांचा लखखाट होतोय, ढग गच्च दाटून आलेत म्हणून तुम्ही घरातून बाहेर पडलाच नाहीत तर त्या दिवशी पाऊस यायचाच नाही आणि आज पाऊस नाही येणार म्हणून तुम्ही बाहेर पडावे आणि त्यावेळी हृदयाचा ठोका चुकविण्यासारखी सर्रकन वीज चमकावी आणि धबाबा पाऊस कोसळावा... खरी मजा इथे आहे... या पावसात एकदा भिजलं की मग अख्खा चैत्र-वैशाख कितीही आग ओकत राहिला तरी त्याचा राग येत नाही... चैत्रातील एक संध्याकाळ खरंच अनुभवायला हवी... अगदी पावसाच्या गच्च मिठीत शिरताना अंगावरचा "ब्रॅंडेड' ड्रेस भिजतोय, याची काळजी सोडायला हवी. चिखल बूट, सॅंडलला जरा लागलाच पाहिजे... डोक्‍यावरून ओघळणारे थेंब नाकाच्या शेंड्यावरून अलगद तोंडात घेताना जी मजा आहे ती पंधरा-वीस रुपयांच्या मिनरल वॉटरमध्ये नक्‍कीच नाही. पाकिटातील नोटांना तसेच भिजू द्यावे. बघा या महिन्यात एक संध्याकाळ अशी जगता येते का? संध्याकाळचा बाहेर पडणारा पाऊस मनात साठवता येतो का?... खरंच एक सांज अनुभवायलाच हवी!


** 14 एप्रिललच्या "सकाळ' मध्ये छापून आलेला माझा लेख....**

सोमवार, ९ एप्रिल, २०१२

भातुकली...

भातुकली...

त्याने तिला टपली मारली आणि तो आत गेला. बंगल्याच्या दारातच तिने आपला भातु कलीचा खे ळ मांडला होता. गोबऱ्या गालाची, कुरळ्या केसांची, ती चार-पाच वर्षांची मुलगी आपल्या बाहुलीला न्हाऊ-माखू घालत होती.
आत गेला तसा तो सैल झाला. सोफ्यावर अंग टाकून तो पडून राहिला. तू कधी आलास... घराची ती मालकीन असावी. अठ्‌ठेचाळीस-पन्नास वर्षांची असेल. काळ्या रंगाआड केसांचे वय लपविले असले तरी गालावर रुळणाऱ्या काही बटा चहाडी करतच होत्या. चेहऱ्यावर सुरकुत्यांनी खेळ मांडायची तयारी सुरू केली होती. गडद लालीने ओठांची कमान उगाच रुंद केल्याचे वाटत होते. त्याने तिच्याकडे बघितले आणि जोराचा सुस्कारा टाकला.
""बाहुलीला अंघोळ घालणं चालू होतं त्यावेळी आलो.आता ती जेवून झोपी पण गेली असेल. हा हा हा..''
त्याचा हा स्वभाव तिला माहीत होता. कोणत्याही गोष्टीकडे तो नेहमीच विनोदाच्या अंगाने बघायचा आणि मग स्वतःच मोठ-मोठ्याने हसायचा.. त्याच्या बोलण्यातला रोख तिला कळला. पण तिनं त्याकडे दुर्लक्ष केलं.
""चहा-कॉफी काय हवं''
तिचा साधा प्रश्‍न.
""काही नको. बघायला आलो होतो...''
त्याने सरळ मुद्द्याला हात घातला.
""बघितलंस ना मग कशी वाटली.''
तिने सहज राहण्याचा प्रयत्न केला, पण प्रयत्नच.
""छान आहे. सगळीच मुलं छान दिसतात. त्यात ही पण छान आहे. मला तिचा राग नाहीच..''
""जाऊ दे ना जयंता..'' तिने विषय टाळायचा प्रयत्न केला.
""जाऊ दे तर जाऊ दे... पण तरीही मला काही प्रश्‍नांची उत्तरं नाही मिळाली.
म्हणून आलो इथे..''
""मला तुझ्या काही प्रश्‍नांची उत्तरे द्यायची नाहीत.'' तिने स्पष्टपणे उत्तर देण्याचे टाळले..
"पण..'
"पण नाही आणि बिन नाही. जयंता आपलं काय ठरलं होतं. आपण एकमेकांच्या आयुष्यात डोकावायचे नाही.. मग तुझे हे प्रश्‍न का'
""का?''
जयंताने चेहरा त्रासिक करत प्रश्‍न विचारला.
""कारण ती माझं नाव लावणार आहे. आपला अजून घटस्फोट झालेला नाही, म्हणून.''
"हो! मग नाही लावणार ती तुझं नावं. तुझं नाव तिला लावण्यात मला स्वारस्य नाही.''
तिने तोडायचं म्हणून सांगून टाकलं.
""प्रश्‍न नावाचा नाही.. हे तुलाही माहीत आहे.''
जयंताने जितकं शांत राहता येईल तितकं शांत राहण्याचा प्रयत्न केला. तू उद्या आणखी दहा मुलं आणलीस आणि त्यांनी माझं नाव लावलं तरी मला हरकत नाही, हे तुलाही माहीत आहे. मला त्या मुलीविषयीही राग नाही.. पण हेच जर करायचं होतंतर मग...'
""मग काय''
"मग जणू तुला माहीतच नाही..''
जयंताने प्रश्‍न विचारायचा केविलवाणा प्रयत्न केला. पण तिने चेहरा बाजूला केला.
मघाशी भातुकली खेळणारी ती मुलगी आत आली. तिने डाव्या हातात बाहुली घट्‌ ट धरली होती. डोळ्यात करुणेशिवाय दुसरा भाव नव्हता. गालांवर उदासतेचे ढग दाटीवाटीने बसले होते. त्या मुलीने एकदा तिच्याकडे आणि एकदा जयंताकडे बघितले. मग तिने हलकेच हातातील बाहुली समोरच्या टेबलवर ठेवली आणि तिच्यापाशी आली. जयंता बघत होता. तिला न्याहाळत होता. तिने एकदा तिच्याकडे बघितले आणि नंतर जयंताकडे बघितले. मग हलकेच तिने जयंताच्या पायाला हात लावला आणि मग तिच्या पायाला.... जयंताला कळले नाही. काय होतंय ते.. तिने ती बाहुली उचलली आणि आपल्या खोलीकडे निघून गेली. जयंता तिच्या पाठमोऱ्या बाल मूर्तीकडे बघत राहिला.
"जयंता... मला वाटतं तुझ्या प्रश्‍नांची उत्तरं तुला मिळाली असतील..'
तिच्या या वाक्‍याने तो प्रचंड अस्वस्थ बनला. त्याच्या स्वप्नांना सुरुंग लागला होता. कोणीतरी त्याचा गळा आवळतोय असं वाटत होतं. तो तिच्याकडे बघत होता आणि स्वतःला शिव्या घालत होता. त्या क्षणी त्या घरात राहणं म्हणजे नरक वाटून तो ताडकन्‌ बाहेर पडला. दरवाजातून बाहेर येताना त्याचा पाय एका खेळण्याला लागला. चटकन त्याचं मन हललं. त्याने ते खेळणं उचललं. त्याला त्या मुलीची नजर आठवली आणि मग तिची. आयुष्यात एवढा मोठा भातुकलीचा खेळ त्याने बघितला नव्हता. जिवंत खेळण्यांनी खेळणाऱ्या तिच्या भातुकलीच्या खेळाचे तो एक खेळणे केव्हांच होऊन गेला होता. आता त्यात आणखी एका खेळण्याची भर पडली होती..
**पाडवा सृजनमध्ये प्रसिध्द झालेली माझी लघुकथा**


सोमवार, २६ मार्च, २०१२

प्रिय,

एवढा हतबल मी कधीच नव्हतो. जगण्याला आव्हान मानणारा मी आता त्याच्या हातातील कठपुतळी बनून गेलोय, असं वाटतं. तुझा नकार, तुझा होकार, तुझ्या नसण्यातील असणं आणि आता तुझ्या असण्यातील नसणं सगळंच असह्य होत आहे.... तू नव्हतीच तेव्हाची ती अपुरेपणाची भावनाही आपली वाटायची. आता मात्र ती अपुरेपणाची भावनाही राहिली नाही.. आता तुटलेपण जाणवते...मला माहीत आहे हे तुटलेपण तुलाही जाणवत असेल. तुलाही त्याच्या वेदना होत असतीलच पण तरीही हे अपुरेपण आता अवघड होऊन गेले आहे. जगण्याच्या लढाईला काही जखमा आवश्‍यक असतातच... आज मी या जखमाही हरवून बसलो आहे.. तुझ्या असण्यातील नसलेपण मला आता पोखरुन टाकेल... केवळ पोखरनार नाही तर तो मलाच खाऊन टाकेल की काय असे वाटू लागले आहे. बाहेर चैत्र फुलतोय आणि इथे मनात माझ्या पानगळती सुरू आहे.. विचित्रच सगळं... कधी कधी मला या कोवळ्या पानांचा हेवा वाटतो...सूर्य निर्दयीपणे आग ओकत असताना ही झाडांची कोवळी पालवी आपल्या एवढुशा छातीवर ती सूर्याचे अग्नीबाण कसे झेलतात.. याचे कौतुक वाटते...तू दुर्गा भागवतांचे ऋतुचक्र वाचलं असशीलच ना? त्यांनी सगळे ऋतु मांडलेत. पण बाईंही काही ऋतुंबाबत अज्ञानीच होत्या. नाही! एकटेपणा त्यांनीही अनुभवलाच पण तरीही एकटेपणा आणि नसलेपणा या दोन गोष्टी वेगळ्याच असतात ना? तुझं असून नसणं हे सगळ्यात वाईट... हाक पोचतेय पण हाक मारता येत नाही आणि तुलाही मागे वळून बघायचे आहे आणि बघता येत नाही... ही अवस्था दोघांचीही...एक दडपण आले आहे...वेदना कुरवाळण्यात काही अर्थ नसतो हे तुझं सांगणं मला मान्य आहे पण ते मनापर्यंत पोचत नाही.... हा चैत्र संपेल आणि वैशाख येईल आणि तो कायम राहील... कदाचित त्या वैशाखात कुठून तरी तू पुन्हा भरुन येशील.. ढगांसारखी... नाही तरी तुझा रंग ढगांसारखाच की... सावळा... देणारा.. आणि बरसून जाशील... काही काळ पुन्हा चैतन्य पसरले आणि मग पुन्हा आजच्यासारखा दाह....बरसून रिकामे होणे तुला जमते...मला नाही जमत... मला भरुन घेण्याची सवय लागली आहे.. आणि मग तो भरलेपणा सहन करत जगायचे... मोकळे नाही होता येत मला... मला तो शाप आहे.. तू बोलतानाही नुसताच ऐकायचो मी. तुझा हुंकार... तुझा दोन शब्दांमधला चड-उतार...काही शब्दांवर तू देत असलेला भर आणि मग प्रत्येक गोष्ट अगदी पहिल्यापासून शेवटापर्यंत सांगताना त्याचे तू केलेले विस्तारीकरण... प्रत्येक प्रसंग एक एक पायरीनेच सांगण्याची हातोटी.. मला नाहीच कधी जमली... मला जमले ते तुझे तूपण साठवण्यात...तुझी प्रत्येक गोष्ट साठवून ठेवण्यात... तो मिळणार नाही कधी.. ही जाणिव जीतकी घट्‌ट होत गेली तितकेच मी या साठवण्याकडेच जास्त लक्ष दिले... मला सांगायचेच बरेच काही राहून गेले.... हे साठवलेपण आता माझ्याबरोबरच जाईल... ज्या दिवशी अचानक तुझ्या हातातून एखादे भांडे पडून फुटेल, त्या दिवशी समज एक श्‍वास कायमचा थांबला..

तुझाच 

मंगळवार, १३ मार्च, २०१२

बांगड्या....

तिने कपाटातून पुन्हा बांगड्या काढल्या... त्या बांगड्या तिने डोळे भरून बघितल्या आणि फडताळात कोंबून ठेवल्या. जोरात दार लावले, लाकडी कपाटाचे ते दार पावसाळी हवामानामुळे फुगले होते. त्याचे दरवाजे घट्ट बसत नव्हते. तरी ताकदीने दोन्ही दरवाजे तिने लावले आणि त्याच्या कोयंड्याला कुलूप लावले. काही क्षण ती तिथेच बसून राहिली. मग कसल्या तरी आठवाने उठली आणि आवेगातच तिने घर सोडले. या बांगड्यांबद्दल वहिनींना सांगायलाच हवे. त्यांना किती आनंद होईल. त्यांनी प्रत्येकवेळी मदत केली. तिच्या डोक्‍यात विचार येत होते.. ती लगबगीने चालत होती... जणू पळतच होती... बंगल्याच्या दारात आल्यावर तिने दीर्घ श्‍वास घेतला. चेहऱ्यावरचा आनंद जितका लपवता येईल तितका लपवला आणि तिने बंगल्याची बेल वाजवली... वहिनींनीच दार उघडले... एवढ्या सक्‍काळी - सकाळी कशी ही म्हणून त्यांना आश्‍चर्य वाटले, पण त्यांनी ते चेहऱ्यावर आणू दिले नाही. ती आत गेली...
अगं, अजून भांडी नाही पडलीत... थोडा वेळ थांब... चहा घेणार का? वहिनी बोलत बोलत आत गेल्या... ती गप्प बसून राहिली... थोडा वेळ तसाच गेला. धीटाई करून आत जावे आणि वहिनींना सांगावे, असे तिला वाटले; पण आपलेच सुख आपण कसे सांगायचे म्हणून ती गप्प बसली... तिला सुख कुठल्या शब्दात व्यक्‍त करतात हेच माहीत नव्हतं...
वहिनी थोड्या वेळाने बाहेर आल्या... तशी ती पुढे झाली. तिचे डबडबलेले डोळे आता कोणत्याही क्षणी पाझरू लागतील अशी स्थिती होती... पण ती बोलली नाही. वहिनी काहीबाही सांगत राहिल्या... तिच्या कानावर ते शब्द पडत राहिले; पण डोक्‍यात काही गेले नाहीत.
भांड्यांचा ढीग बघून तिने पदर खोचला आणि ती कामाला लागली... एक-एक भांडे घासता-घासता तिच्या डोळ्यांतून अश्रूंची माळ वाहत होती. जणू कित्येक वर्षांपासून ती माळ तिच्या पापण्यांच्या आत तशीच होती आणि कुणीतरी हलकेच त्यातील धागा काढून टाकावा आणि एक एक मोती सरकत सरकत खाली यावा... अगदी तसेच... तिला काही क्षण ते अश्रू लपवावेत वाटले; पण तिने आज त्यांना आडवले नाही...
वहिनी कोणाला तरी सांगत होत्या... या आता भांडी घासताहेत. त्या खूपच सोशिक आहेत. नवरा लवकर गेला... यांनीच मुलाला वाढविले... धुणी-भांडी करून त्याला इंजिनिअर केले... सासूनं दिलेल्या दोन बांगड्या काय ते तिची मालमत्ता, ती पण तिने पोराच्या शिक्षणासाठी मोडून टाकली... पोरगंही हुशार निघालं... कॅम्पस इंटरव्ह्यूमधूनच त्याचे सिलेक्‍शन झाले... चार-पाच लाखांचे पॅकेज मिळाले; पण हिचे दुर्दैव काही संपले नाही. गेल्या चार महिन्यांपासून त्याने एक पत्र की फोन केला नाही. त्याला नोकरी लागली, त्यावेळी किती आनंदात होती ती. म्हणाली होती, ""वहिनी, पोरगं मिळवतं झालं... आता काय तुमच्याकडं येणं हुईल, असं वाटत नाही... पण माझ्या सासूनं दिलेल्या बांगड्या म्या मोडल्या. आता सुनंला चार बांगड्या घातल्या की माझं काम सपलं... त्यामुळे काही दिस तुमच्याकडं काम करायला लागंलच... ''
पोरगं एवढं मिळवतं झालं तरी हिचं काम काही सुटलं नाही बघा... सुनेला सोन्याच्या बांगड्या घालेपर्यंत हिचे हात तेवढे मजबूत राहू दे एवढीच प्रार्थना... एवढं कष्ट करून हिने पोराला वाढविलं... चांगला इंजिनिअर केला... पण आता त्याला आईची लाज वाटत असणार. त्यामुळेच फिरकला नाही. आला नाही तर नाही, पण चार पैसे तरी पाठवायचे... पण ते पण नाही... असली पोरं जन्माला येण्यापेक्षा निपुत्रिक असलेलं बरं... वहिनी ताड-ताड बोलत होत्या... वहिनी नेहमीच तिच्याविषयी मायेने बोलायच्या... पोरासाठी आपल्या पोराचा जुना सदरा हक्‍काने द्यायच्या... घरात काही चांगलं-चुंगलं केलं की पोरासाठी घेऊन जा म्हणून सांगायच्या... झेपेल तेवढी पैशाची पण मदत केली... पण वहिनींचे हे बोलणे तिला आज नाही आवडले... ती उठली आणि सरळ निघून गेली... वहिनींना काही समजले नाही...
दुसऱ्या दिवशीही ती वेळेअगोदरच आली... वहिनींना काही कळेना...
""अगं, तू जादा काम लावून घेतले आहेस की काय? तुझी तब्येत बघ किती तोळा-मासा झाली आहे. अशी जर तू काम करायला लागलीस तर आजारी पडशील आणि इथे तू आजारी पडलीस तर कोण आहे बघायला... तुझा तो पोरगा दीडशहाणा एकदा नोकरी लागली तो गेला तिकडेच... तू बसलीएस इथे सुनेला मी हे करणार - ते करणार करत. उद्या तो येईल बायकाबरोबर आणि सांगेल ही तुझी सून आणि हा तुझा नातू...'
वहिनी कळकळीने बोलत होत्या... ती गप्प बसली... काय करावे हेच तिला सुचत नव्हते... तिने तरी हिम्मत केली... कनवटीची चिठ्‌ठी काढली आणि वहिनींसमोर धरली... वहिनींनी चिठ्‌ठी वाचायला सुरवात केली..
प्रिय, आई
खूप दिवसांनी पत्र लिहितोय. तू रागावली असशील. पण काय करू... मागे एकदा शेजारघरी फोन लावला होता, त्यांना तुला बोलवायला सांगितले होते... पण काकांनी फोनच असा उचलला की तू त्या घरात यावी असं वाटलंच नाही. मग फोन करायचे सोडून दिले. काका फोनवर बोलले पण तसेच दुसरेही... ते बोलत नाहीत म्हणून त्यांना गृहीत धरण्यात अर्थ नाही. तुला वाचता येत नाही. त्यामुळे पत्र तरी कसं लिहिणार... पण आज ऑफिसमधलाच एक सहकारी तिकडे येतोय असं कळल्यावर त्याच्याकडून दिलं हे पत्र. तो दाखवेल वाचून... सोबत चार सोन्याच्या बांगड्या पाठविल्यात. दुकानदार मला म्हणाला, अरे बांगड्या घेताय पण हाताचे माप आणले नाहीत... मला तुझी मूर्ती आठवली... तुझ्या हाताचे माप काय आणि कसे द्यायचे हेच कळेना... मग मी सरळ माझ्या हातांचे माप दिले... माहीत आहे मला, त्या तुला मोठ्या होतील. पण त्या तुला नक्‍की वर्षभरात येतील. आणि हो... सोबत मी काही पैसे पाठविले आहेत... मीही पुढच्या महिन्यात दहा-बारा दिवसांची सुटी घेऊन येतोय... रागावू नकोस...
तुझाच..

या चिठ्‌ठीबरोबर तिने त्या बांगड्या वहिनींच्या हाती दिल्या... वहिनींनी त्या बांगड्या बघितल्या आणि एवढेच शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडले... हा मुलगा स्वतःच्या पोटाला खातो की आईच्या हातांना स्वप्नात बघून जगतो कळत नाही... त्याच्या पगाराच्या मानाने त्या बांगड्या खूपच महाग होत्या...

.................................
****सकाळ स्मार्ट सोबतीमध्ये 8 मार्चला छापलेली माझी लघुकथा